Wednesday, May 26, 2010

रहाशील?

तू शेजारी झोपलेला असतोस. किंचित चुळबुळ करत... काल किरकिर करत, रडत झोपला असल्याचा मागमूसही नसतो चेहर्‍यावर. ते गोबरे गाल, लांब पापण्या, इवलुसे ओठ.. मी एकटक बघत रहाते तुझ्याकडे आणि न राहवून चटकन पापी घेते तुझी. तुझी झोप चाळवते. मी पुन्हा पापी घेते.. दुसर्‍या गालाची.. तुझी पुन्हा थोडी हालचाल होते. तुझा छोटुसा तळवा मी हातात घेते आणि गुदगुल्या करते.. हळूच.. तू खुदकन हसतोस. माझी बोटं हळूहळू वर चढत जातात.. दंडावर, काखेत आणि शेवटी मानेला. तू दरवेळी हसत असतोस. हसणं वाढतच जातं. अक्षरशः खिदळायला लागतोस बघता बघता.. खिदळता खिदळता माझ्या कुशीत शिरतोस आणि खिदळत रहातोस.. घुसळत रहातोस.. !!

रहाशील असाच नेहमी? असाच लहानसा... असाच नेहमी घुसळत, खिदळत.. नेहमी माझ्या कुशीत..

या शशुल्या पिल्लाला हातावर घेऊन बाबुडा आला होता माझ्याकडे .. ते तुझं पहिलं दर्शन.. डॉक्टरांना किती वेळा सांगितलं तरी त्यांनी दाखवलंच नव्हतं तुला. नुसतं लांबून दाखवलं. पिल्लांना काही असं लांबून दाखवतात का? :( .. पण बाबाने तुला आणल्यावर मात्र मी लगेच बाबाकडून तुला माझ्याकडे घेतलं. डोळे भरून पहात होते तुझ्याकडे तर मधेच बाबा म्हणतो "अरे, याला हे चायनीज नाक कुठून आलं?" .. कळतच नाही त्याला.. सगळ्या पिल्लांची नाकं सुरुवातीला तशीच असतात.. हो किनई रे..

तुझं पाहिलं रडं, पहिलं हसू, पहिल्यांदा उपडं पडणं, पहिलं रांगणं, पहिला दात, पाहिलं पाउल, पाहिलं धडपडणं, पहिला ताप सगळं सगळं आठवतंय मला. पहिल्या रांगण्याचं, पहिल्या पावलाचं, पहिल्या दाताचं ते कौतुक, तो अवर्णनीय आनंद... पहिल्या तापातली ती प्रचंड काळजी, अस्वस्थता, हुरहूर. रडण्या-जागरणामुळे झालेली क्वचित चिडचिड.. तुझं ते सारखं धडपडणं.. पहिल्यांदा पडला होतास तेव्हा तर तुझ्यापेक्षा जास्त मीच रडले होते.. आठवतंय सगळंच. एक दीड वर्ष होऊन गेलं तरीही सगळं कालपरवाच घडून गेल्यासारखं वाटतंय. या गोष्टी काही विसरण्याच्या थोडीच आहेत. मीही काहीही बडबडते..

तू रांगता रांगता चालायला आणि चालता चालता धावायला कधी लागलास ते कळलंच नाही. तसंच तुझ्या त्या बडबडीचंही.. बडबड कसली खरं तर.. नुसतं अं अं, ब्या ब्या, द्या द्या .. किंवा नुसतंच आरडाओरडा करणं नाहीतर किंचाळत राहणं. पण मला तेही आवडतं. माझं सगळ्यात आवडतं म्हणजे तुझं मला 'आई' म्हणण्याऐवजी 'आ' 'आ' म्हणणं !! :)

या प्रत्येक पहिलेपणात मी रमायचेच पण तेवढेच पुढचेही वेध लागलेले असायचे. पालथा पडायला लागलास तेव्हा रांगशील कधी असं वाटायचं.. रांगायला लागल्यावर उभा कधी रहाशील याचीच हुरहूर.. उभा रहातोयस ना रहातोयस तोवर "आता पटकन मोठा होऊन पावलं टाकायला लाग" असं म्हणाले होते मी..

पण अचानक त्या पुढे पुढे जाणार्‍या पावलांचा वेग जाणवतो. हळूहळूच पण अटळ असणारा असा.. डे-केअर, प्ले-स्कूल, शाळा.. जाऊदे.. पुढचं नाहीच बोलत..

नावं वेगळी, टप्पे वेगळे.. पण सगळ्याचा परिणाम एकच. तू दुरावणार माझ्यापासून.. लांब जाणार. कमी वेळ मिळणार.. आत्तासारखं २४ तास एकत्र नाही रहाता येणार. हव्या तेव्हा गप्पा मारता नाही येणार सारख्या सारख्या.. तुझ्या गप्पा, बडबड ऐकता नाही येणार हवी तेव्हा.. हवं तेव्हा कुशीत घेऊन घुसळता नाही येणार.. हव्या तेव्हा पाप्या नाही घेता येणार.. तू तिथे रडलास तर इथे मला कळणारही नाही !!! तू माझ्या शेजारी नसशील तेव्हा माझं काय होईल कल्पनाही करवत नाही. रडेन का मी.. जाउदे..

तू शाळेतून येऊन बोबड्या बोलांनी दिवसभर काय केलंस शाळेत, काय गप्पा मारल्यास, काय खेळलास, काय खाऊ खाल्लास, काय मस्ती केलीस असं सारं सारं सांगत रहाशील. मी आवडीने ऐकतही राहीन. पण त्या तेवढ्या तासा-दोन तासात तुझी किती आठवण आली हे कोणाला सांगू? हसतील सगळे. तुही हसशील. अजून मोठा झालास की तर अजून हसशील.

प्रत्येक नवीन टप्पा, तुझी प्रगती हवीहवीशी वाटणारीच. पण या टप्प्यात मला ते जड जाईल कदाचित.. कदाचित नाही नक्कीच.. त्यापेक्षा तू असाच रहा ना. असाच छोटूला, लहानसा, रडका, थोडासा हट्टी, सारखं 'आ आ' करत माझ्या मागे लागणारा, आरडाओरडा करणारा, किंचाळणारा, हवी ती गोष्ट मिळाली नाही तर तमाशा करणारा, मधेच उगाचच खुद्कन हसणारा, उगाच उड्या मारणारा, पसारा करणारा, धिंगाणा करणारा, धावत येऊन पायाला विळखा घालणारा... नकोच होऊस मोठा.

कोणी म्हणेल काय बाई आहे. लोकं म्हणतात "मोठा हो, औक्षवंत हो" आणि ही बाई म्हणते आहे की असाच रहा, लहानच रहा.. जाउदे आपल्याला काय लोकांशी. त्यांना काय कळतंय. या तुझ्यामाझ्यातल्या गप्पा आपल्यालाच कळणार. म्हणून म्हणते नकोच होऊस मोठा. असाच रहा ना. नेहमीच.. कायम.. रहाशील??

49 comments:

  1. हेरंब
    कित्ती कित्ती भावनिक लिहील आहेस......खुपच सुंदर.... जगातील सर्व आईच्या ह्याच भावना असतील न रे....सहीच.....५ * एकदम....जास्त काही बोलत नाहीत खूप आज खूप जनाचे डोळे पाणावतील बघ....अप्रतिम लिहील आहेस....

    ReplyDelete
  2. सो स्वीट अँड सो टचिंग यार...
    तुझ्यामाझ्यातल्या गप्पा आपल्यालाच कळणार ...एकदम खरय

    ReplyDelete
  3. अनुजा, आरुषच्या दुसर्‍या वाढदिवसाला अगदी हेच सगळं म्हणत होते गं मी..किती लवकर आजकालची बाळं हातातुन निसटून जातात आणि आपल्यासाठी उरतात त्या फ़क्त आठवणींचे फ़ोटो आणि व्हिडीओज आणि या सगळ्यांमध्येही न मावणारं बरंच काही...

    ReplyDelete
  4. नितांत सुंदर. आईच्या भावना खरंच ह्याच असाव्यात. वडिल कधी बोलुन दाखवत नाहीत पण त्यांना नक्कीच असेच वाटत असणार. अप्रतिम हृदयस्पर्शी लिहिले आहेस.

    ReplyDelete
  5. अप्रतिम.... याहून दुसरा शब्द नाहीये माझ्याकडे...

    ReplyDelete
  6. सागर, आभार... नक्कीच.. प्रत्येक आईच्याच नव्हे तर बाबाच्याही याच भावना असतात.. कठीण आहे रे..

    ReplyDelete
  7. धन्यवाद सुहास. हो रे.. या अशाच गप्पा मारत असेल प्रत्येक आई आपल्या छोट्याशी.. नक्कीच.

    ReplyDelete
  8. अपर्णा, खरंच ग.. बघता बघता हा एवढा मोठा कधी झाला कळलंच नाही. एवढासा होता हॉस्पिटलमध्ये.. आणि आता..

    >> आणि या सगळ्यांमध्येही न मावणारं बरंच काही...

    खरंच ग.. ते बरंच काही कुठल्याच कॅमेरा, कॅमकॉर्डरमध्ये कधीच पकडता येत नाही !!

    ReplyDelete
  9. अगदी ह्र्दयस्पर्शी लिहलयस. अप्रतिम

    ReplyDelete
  10. आभार आनंद.. अगदी.. प्रत्येक बाबाच्या मनात हे असंच असतं थोडंफार.. मग तो आईच्या मुखातून बोलतो..

    ReplyDelete
  11. अभिलाष, मनापासून आभार.. !!

    ReplyDelete
  12. सचिन, खूप आभार रे..

    ReplyDelete
  13. काय म्हणू हेरंब यावर.... वाचता वाचता अक्षरे दिसेनाशी झाली.... श्वास अडकला... शोमूला मी नेहमी म्हणते, कालचक्र वीस वर्षे मागे नेता आले असते तर मी कुठलीही किंमत मोजून ते केले असते.( पण त्यामुळे बरेच घोळ होतील...आत्ता ब्लॉग लिहीणारे काही तर अगदी चार-पाच वर्षांचे किंवा तान्हेही असतील. मग ते निषेध निषेध म्हणून ओरडतील... हा हा..... ) शेवटी जे क्षण आज हातात आहेत तेच भरभरून जगावे कारण आजचा शोमू उद्या आणखी वेगळा असणार आहे.

    ReplyDelete
  14. आभार श्रीताई. लिहून झाल्यावर एकदा वाचून बघत असताना माझंही असंच झालं. पुढे प्रत्यक्षात जेव्हा तो टप्पा येईल तेव्हा काय होईल कोण जाणे. असो..

    आणि वीस वर्षं मागे जायला मीही तयार आहे. केव्हाही.. !!! :)

    >> शेवटी जे क्षण आज हातात आहेत तेच भरभरून जगावे..

    हे पटतं खरं तर.. पण कधी कधी निसटून जातं आणि मग अशा एखाद्या पोस्टमधून बाहेर पडतं.

    ReplyDelete
  15. खूपच सुंदर लिहिलं आहेस हेरंब...अगदी हृदयस्पर्शी..खरच भावना किती वेड्या असतात ना .....

    ReplyDelete
  16. आईला व बाबांना भावना असतात ,आई जवळ असते पण बाबा लाब आसल्यामुळे (कामामुळे), कधी कधी असे होत असते, कौतुक तर सर्वाना असते, विशेष करून आई व वडिलांना जास्त असते आणि ते स्वाभाविक आहे पहिले कौतुक कोणाला नसते?

    ReplyDelete
  17. हेरंबा,
    आईची जबर आठवण आली रे...आता दोन दिवसांत चाललोय म्हणून ठीक आहे....नाहीतर हा आठवडा अवघड गेला असता.....
    केव्हाचा समजावतोय स्वतःला...बॉईज डोन्ट क्राय!

    ReplyDelete
  18. आणि भाग्यश्रीताई,
    माझा निषेध नाही बरं का....माझ्या आईचा तर बिलकुलच नसेल!

    ReplyDelete
  19. shabda suchat nahiyes. tu lamb gelyvar tuzya post vachun kharch chan vatat. baki bhavna me kakujaval bolaley. he post tar apratimch. dolyta pani ala. bhet lavkar ata. lavkar ye bharatat.

    ReplyDelete
  20. हेरंबा खात्रीने सांगते तो खूप मोठा झाला ना तरी तो असाच राहील निरागस, भाबडा, जगण्यावर चांगुलपणावर दुर्दम्य विश्वास असणारा... आपल्याच विश्वात रमणारा, तुझ्याशी भरभरून बोलणारा.... अनुजाला "माझी आई जगातली बेस्ट मम्मा !!!" म्हणणारा....

    भान हरपून आपले आई-बाबा आपल्याला पहाताहेत... आपल्या अस्तित्त्वात श्वास अडकवून बसताहेत हे जाणणारा... तू त्याला आज ’रहाशील?" या विचारलेल्या प्रश्नाचे तो न बोलता तूला ’कायम’ हे उत्तर देईल बघ!!! :)

    आता म्हणशील तूला काय माहित... अनुभव बोलता है बॉस!! आपण एकाच पठडीतले पालक आहोत त्यामूळे मुलांना दिले जाणारे संगोपनही तसेच असायचे ना!!! :)

    पोस्ट टिपीकल खेकडे स्टाईल.. सुंदर, हळवी!!!

    ReplyDelete
  21. mast lihilayas.. :( kasa tarich vatata.. kharach aai soliid aste na !!!

    ReplyDelete
  22. आज काही खरे नाही..एकाच दिवसात तन्वी आणि तुझे दोन दोन छान लेख वाचायला मिळाले..फ़ार भारावुन गेले बघ ,हेरंब...किती सहज आणि सुंदर लिहीलेस..प्रत्येक आईच्या आणि बाबाच्या मनातले जाणुन लिहीलेस....वाचता वाचता डोळे भरुन आले.....जास्त काही लिहीत नाही.....जिंकलेस.......[:)]

    ReplyDelete
  23. सागर खूप आभार.. वेड्या असतातच आणि कधी कधी सांभाळल्या जात नाहीत.

    ReplyDelete
  24. प्रोफेटा, खूप आभार.. तुझं बरं आहे रे. तू २ दिवसात चालला आहेस.. आमचं कठीण आहे :( ..

    मी ही तेच म्हंटलं.. नो निषेध.. मी ही २० वर्षं मागे जायला आनंदाने तयार आहे :)

    ReplyDelete
  25. धन्स भक्ती. हम्म.. भेटू लवकरच ! :)

    ReplyDelete
  26. Apratim lihileyas re dada...khoop ch sunder...majhi aai suddha nehmi mhanat aste,
    " kashala ga mothi zalis tu? Lahanach bari hotis...tuze hasane, radane, tras dene, pratyek goshti sathi majhyawar avalambun rahane..awadayache mala..." mag mi bhuvaya unchavate,aani ti nustich hasate...
    aatta sudha hi post mi tila vachayala sangitali tar paani ch aale dolyatun tichya...mag mi punha bhuvaya unchavalya aani ti mala jabardastine javal gheun punha tasech nustech hasali...!!!

    ReplyDelete
  27. Aani sritaai majha matr khoop khoop nishedh...aga 20 varshan poorvi mi navhatech na ga... :(

    ReplyDelete
  28. आभार तन्वी.. हा निरागसपणा, भाबडेपणा असाच राहिला पाहिजे असं काहीतरी डोक्यात होतं. त्यातून जे सुचलं ते लिहीत गेलो. त्यालाही बरेचदा विचारून झालाय हा "रहाशील?" वाला प्रश्न. बघुया.. कळेलच उत्तर.. लवकरच.. :)

    ReplyDelete
  29. आभार विदुला.

    >> kharach aai soliid aste na !!!

    +१ .. प्रश्नच नाही.. निर्विवाद !!

    ReplyDelete
  30. आभार उमा.. आत्ताच तन्वीच्या 'माहेरचं गाणं' ऐकून आलो. कमेंटतो आता तिथे..

    आग पूर्वी आई/आजी आम्हाला असं काही म्हणायच्या किंवा मी सुट्टी संपून परत जयालो निघायचो तेव्हा रडायच्या तेव्हा मी ते हसण्यावारी न्यायचो.. आता त्याचा अर्थ कळतोय !!!

    ReplyDelete
  31. आभार मैथिली.. :)

    आणि आज तू भुवया उंचावते आहेस पण काकूंना काय वाटत असेल हे मी अगदी व्यवस्थितपणे समजू शकतो.. पूर्वी मी ही असाच हसायचो माझ्या आई/आजीला.. आता सगळे अर्थ कळतायत. !! :(

    आणि निषेध काही नाही. २० वर्षं मागे जायला बहुमत आहे.. तू अल्पमतात आहेस ;)

    ReplyDelete
  32. heramb,blog ekda vachala,dusryanda vachal ani radayalach ale.ani vachtana zanavale ki doghachyahi Bhawana sarkyach ahet.tyamulech etke manatale lihu shaktos tu.apratim. manjiri

    ReplyDelete
  33. विद्याधर, हेरंब धन्सं पण लगेच मैथिली काय म्हणाली पाहिलेत नं... हा हा.... अगदी हेच माझ्याही मनात आले होते.... काहीजण तर जन्मलेच नसतील... बरं मैथिले आपण दोन तीन वर्षे कमी करूयात... मग तर चालेलं? :)

    ReplyDelete
  34. Are kal ratri punyahun alyaalya blog vachala.chhan lihile ahes. kaku mhanatat tase dhoghyachya bhavana agadi ek ahe. ratri khup vel zopch ali nahi. kal ratri comment takayachya hotya pan akshar disenase zale.aso.aaditeyala god papa.

    ReplyDelete
  35. अगदि अप्रतिम आणि भावस्पर्शी लिहल आहेस...आणखी काय बोलु...बाकी श्री ताई म्हणते त्याप्रमाणे मैथीलीसाठी २-३ वर्षे कमी करुन संगनमताने कालचक्र मागे फ़िरवुया... :)

    ReplyDelete
  36. आभार देव. हो रे. हवं तर २० नको. १७-१८ वर्षं मागे गेलं तरी चालेल. मागे जाणं हे महत्वाचं. किती मागे जायचं ते सामंजस्याने ठरवता येईल :)

    ReplyDelete
  37. Ata yapudhe mi tu lihilelya (aditeyvarachya)post vachanar nahi karan tu lihinar khekada style aani mihi khekadach mhanaje maz kay hot asel bagh vachalyavar.kay lihu Shabd(Akshar, Vakya)ch suchat nahi ahe gr88888888. sundar lihile ahes.
    Kharach mi agadi kalach vedvrat la he bolale ki tuz khup bar aahe tu asach raha kayam niragas. Pan nantar manat mhatal kharach rahil ha asa kayam.

    ReplyDelete
  38. agg bai! kiti goad :) aani me he post atta wachtey! kase kai rahile kunas thawuk :)

    ReplyDelete
  39. आभार मेघा. तू अधून मधून एकदम गायब होऊन जातेस :)

    ReplyDelete
  40. ग्रेट. खूप छान. एकदम हृदयस्पर्शी. आता यापुढे आणखी काय लिहू? शब्द अपुरे आहेत...

    ReplyDelete
  41. आभार आभार संकेत.. कधी कधी खूप छान काहीतरी सुचून जातं !

    ReplyDelete
  42. शब्दातीत... आदीशी निगडीत सगळ्या पोस्ट एकत्र करून एक पुस्तक काढ रे... अप्रतिम...

    ReplyDelete
  43. अनेक आभार सिद्धार्थ.. पुस्तकाचा कधी विचार केला नाहीये.. बघू निदान इ-पुस्तक तरी काढेन नक्की :)

    ReplyDelete
  44. खूप छान आहे रे... अक्षरश: डोळे पाणावले.

    ReplyDelete
  45. आजच माझं बाळ पहिल्यांदा play - group मध्ये गेल आणि मी मात्र office मध्ये आले आहे. त्यालाच आठवत होते आणि हि post वाचण्यात आली... डोळ्यातील पाणीच थांबत नाहीये...

    Ujjwala Nakhwa
    Thane

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद उज्वला. सॉरी तुम्हाला रडवल्याबद्दल.

      आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा !

      Delete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...