नमो नमः सुजनहो, सृजनहो व भक्तजनहो. 'आदिलीलापुराणा'च्या आजच्या श्रवणोपासनेत आपले स्वागत. विविध आदिलीलांनी ओतप्रोत भरलेल्या 'आदिलीलापुराणा'चे अमृत आपल्या कानांत साठवून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या, विशाल संख्येने उपस्थित पावलेल्या या विशाल जनसागराचे मी 'आदि-दास' मनःपूर्वक स्वागत करतो. आजवरच्या आपल्या 'आदिलीलापुराणा'च्या प्रवासादरम्यान आपण 'दंतोपनिषद', 'निद्रानाशानुभव', 'पुनर्दंत विवेचन', 'प्रथम-पाद्या-नुभुति', 'प्रथमग्रासोपनिषद' अशा आदिस्वामींच्या अनेकानेक लीलांचे मनोभावे श्रवण केले. पण आजचा अध्याय थोडा वेगळा आणि म्हणूनच गंमतीशीर आहे. त्यात एक आगळीच मौज भरलेली आहे. बाल-आदिने आपल्या बंडखोर बाललीलांनी त्याच्या मातापित्याच्या तोंडचे पाणी कसे पळविले होते याचे समग्र वर्णन आद्य 'आदि-दासां'नी या खंडात केले आहे. ते तुमच्यासमोर मांडणारा हा एक सामान्य 'आदि-दास' आहे. तर आजच्या अध्यायाचे नाव आहे 'निषेधोपनिषद' किंवा आदिस्वामींच्या तातांच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'णिषेढोपणिषड'.. क्षमायाचना.. 'णिषेढोपनिषद'. या 'णिषेढोपनिषदा'त आदिस्वामींच्या मनाविरुद्ध काही घटना घडल्यास--ज्या कधी घडू शकतील हे साक्षात आदि-स्वामी सोडून कोणासही उमगत नसे--त्यांनी वेळोवेळी केलेल्या निषेधांचे संकलन केलेले आहे. परंतु हे निषेध स्वामींनी अशा विविधांगी, विविध रूपांत, निरनिराळ्या मार्गांनी नोंदवले आहेत की आपल्यासारखी सामान्य माणसे त्यांचा विचारही करू शकत नाहीत व त्यांच्या या विविध लीलांची निव्वळ श्रवणभक्ती करणे एवढेच काय ते आपल्यासारख्या पामर भक्तांच्या हाती उरते. इतुकेच नव्हे तर कित्येकदा हा निषेधाचाच एक प्रकार आहे हे खुद्द स्वामींच्या मातापित्यांनाही उमगत नसे असे स्वतः त्यांनीच सांगून ठेवल्याचीही नोंद आहे. असो. 'णिषेढोपनिषद' वर्णिण्यासाठी, श्रवण्यासाठी ही एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. संपूर्ण णिषेढोपनिषद हे अत्यंत मधुर आणि श्रवणीय आहेच परंतु कालाभावामुळे आज आपण त्यातील काही महत्वाच्या मुद्यांबाबत व अनुभवांबाबत विवेचन करू.
'वस्तू-क्षेपण' णिषेढ :
एके समयी बाल आदिस्वामी त्यांच्याकडे असलेल्या अनेक लहान चारचाकी खेळण्यांपैकी एका चारचाकीशी खेळण्यात मग्न होते. चारचाकीशी खेळणे म्हणजे चारचाकी उलटी करून तिची चाके फिरवणे आणि मधेच मुखात घालणे अशा स्वरूपाची क्रीडा चालू होती. स्वामींच्या मातोश्रींनी ते पाहताच लगेच त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला व स्वामींना असे न करण्याविषयी बजावले. झाले !! त्याक्षणी स्वामींना क्रोध अनावर झाला व अकस्मात स्वामींनी ती छोटी चारचाकी उचलून मातोश्रींच्या दिशेने भिरकावली. ते देखोन मातोश्री अजूनच संतापदग्ध झाल्या आणि त्यांनी स्वामींना तसे न करण्याविषयी पुनश्च एकवार दटावले. जे अर्थातच स्वामींना सहन होणे शक्य नव्हते. त्यामुळे स्वामींनी दुसरी चारचाकी घेऊन ती भिंतीवर आणि तिसरी चारचाकी सज्जाच्या काचेच्या दिशेने आदळली. मातोश्रींनी लगबगीने महालातल्या सर्व चारचाक्या जमा करून त्यांच्यावर तात्पुरती जप्ती आणविली खरी पण अर्थातच स्वामींच्या अभिनव णिषेढ प्रकाराने स्वामींचे माता-पिता चांगलेच दिग्मूढ व चिंतीत झाले.
'हस्त-पार्श्वे-बंधित दौड' णिषेढ :
णिषेढाचा हा एक आगळा प्रकार स्वामीलीलांमध्ये वाचावयास मिळतो. आदिस्वामींनी हे असे विविध णिषेढांचे प्रकार कसे शोधून काढले असावेत या विचाराने त्यांचे अपार कौतुक वाटत राहते. अखेर स्वामीच ते !! तर उपरोल्लेखाप्रमाणे हा प्रकार काहीसा निराळा आहे. स्वामींना सतत निरनिराळी पुस्तके, विविध धातूंची अथवा काचेची पात्रे, अन्य अवजारे, भोजनाची अन्यान्य उपकरणे यांच्याशी खेळण्यास आवडत असे. अर्थातच त्यांना पुस्तके आणि काचेची उपकरणे इत्यादींशी खेळण्यास मज्जाव असे. तरीही अनेकदा ते माता-पिताश्रींचा डोळा चुकवून शिताफीने या वस्तू मिळवीत असत. परंतु अनेकदा तत्क्षणीच किंवा काही कालानंतर ती वस्तू त्यांचेपासून हिरावून घेतली जाई. एकदा असाच एक काचेचा घट त्यांच्या हातातून हिरावून घेतला गेला असता त्यांना अचानक काय झाले त्याची कल्पना नाही परंतु स्वामींनी अचानक आपले दोन्ही हात मागे बांधले आणि दाणदाण पावले टाकीत दौडत तेथून निघून महालाच्या एका कोपर्यात निघून गेले गेले आणि तिथून जोरजोराने चित्कारत, आक्रोश करत आपला णिषेढ णोंडवू ... क्षमायाचना.. नोंदवू लागले. परंतु त्यांचे ते उच्चरवाने ओरडणे विसरून जात त्यांचे माता-पिता त्यांचे हात मागे बांधून धावत जाण्याचे विचित्र, विनोदी परंतु तितकेच विलोभनीय दृश्य मोठ्या कौतुकाने पहात राहिले. अशा रीतीने स्वामींच्या मातापित्यांना स्वामींच्या णिषेढ-कृत्याचे एक अनोखे स्वरूप पहावयास मिळाले. अर्थात तदनंतर हे दृश्य वारंवार पहावयास मिळू लागले हे सांगणे न लगे.
'शीघ्र-कोने-दौड' णिषेढ :
'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' हा 'हस्तपार्श्वेबंधित दौड-णिषेढा'शी बहुतांशी साधर्म्य साधतो. या णिषेढाची पार्श्वभूमी आणि दरम्यान घडणार्या किंवा थोडक्यात म्हणजे त्यासाठी कारणीभूत असणार्या विविधतम घटना या अनेकदा एकसमान असत. फक्त त्या घटनेनंतर येणारी स्वामीमहाराजांची प्रतिक्षिप्त क्रिया जरा वेगळी असे. उदाहरणादाखल म्हणून आपण उपरोल्लेखित घटनाच घेतली तर काही प्रसंगी स्वामी 'हस्तपार्श्वेबंधित दौड-णिषेढा' चा वापर करीत तर कधी 'शीघ्र-कोने-दौड णिषेढा'चा. या 'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' प्रकारचा वापर करताना स्वामी घटनास्थळावरून अकस्मात दौडत दौडत निघून जात व महालाच्या एखाद्या कोन्यात--ज्यास 'कोपरा' असेही संबोधले जाते--जाऊन थांबत आणि त्या कोन्यातून उच्चरवातील आरोळ्या चालू राहत असत. तर असा हा 'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' स्वामी कोणत्या प्रसंगी वापरत ते तपशीलात पाहू.
एके समयी स्वामींचे तात उर्ध्वपटावर कार्यरत असता स्वामी तेथे अचानक विराजमान झाले आणि वविध कळांवर आपले हस्तकौशल्य आजमावू लागले. अर्थातच तातांनी त्यांस तेथोन तत्क्षणी दूर लोटले. अर्थातच स्वामी प्रचंड क्रोधित झाले व दौडत दौडत तातांपासून दूर निघोन महालाच्या एका कोन्यात गेले. तातांकडे पाठ करून, चेहरा भिंतीच्या कोन्याच्या दिशेला ठेवून तीव्र स्वरात उद्घोषू लागले. णिषेढाचा हा प्रकार पाहून तात व माता यांच्या मुखकमलावर हास्याची कारंजी उडाली.
'मही-अधर-निद्रित' णिषेढ :
स्वामींनी अवलंबिलेल्या णिषेढांच्या विविध प्रकारांपैकी 'मही-अधर-निद्रित' हा णिषेढाचा प्रकार खरंतर फारच विलक्षण, अगम्य आणिक दुर्मिळ संबोधला पाहिजे. या प्रकाराचा त्यांनी जेव्हा सर्वप्रथम उपयोग केला त्या प्रसंगाचा तपशील जाणून घेऊन मग आपण या प्रकाराचा अधिक परिचय करून घेऊ. एके दिनी स्वामी त्यांच्या माता-पित्यांसमवेत एका भ्रमणध्वनीशीयंत्रांशी संबंधित आस्थापनाच्या केंद्रात गमते झाले. स्वामींच्या माता-पित्यांना नूतन भ्रमणध्वनीयंत्रांची आवश्यकता होती. अर्थात जुनी भ्रमणध्वनीयंत्रे कार्यरत नसण्यास बव्हंशी स्वामीच कारणीभूत होते. कारण स्वामींच्या मुखग्रंथीतून स्त्रवलेल्या द्रवाने सचैल न्हाऊन निघाल्याने जुनी भ्रमणध्वनीयंत्रे गतप्राण झाली होती. असो. तर स्वामींचे माता पिता भ्रमणध्वनीयंत्रे बघण्यात गर्क असताना स्वामींनी अचानक जमिनीच्या दिशेने बोट दाखवून त्यांना खाली ठेवण्याची मागणी केली. मातोश्रींनी लगबगीने त्यांना खाली ठेवले व एकीकडे स्वामींवर लक्ष ठेवत ठेवत त्या विविध भ्रमणध्वनीयंत्रे तपासू लागल्या. स्वामी आसपास डकवलेल्या भ्रमणध्वनीयंत्रांच्या विविधरंगी कागदी पत्रकांशी खेळत होते. अकस्मात ते ज्या कारणामुळे त्यांना पुस्तकांपासून कटाक्षाने दूर ठेवले जाते हे कसे योग्य आहे हे सिद्ध करू लागले. अर्थात नित्याच्या सवयीप्रमाणे निमिषार्धातच स्वामी त्या विविधरंगी कागद व पुस्तके यांचे तुकडे तुकडे करू लागले. मातोश्री आणि यावेळी तर पिताश्रींनी त्यांना तसे न करण्याविषयी फर्मावले व बळाचा वापर करून ती कागदपत्रे त्यांच्या हातून काढून घेतली. स्वामी एक दोन वाकडी-तिकडी पावले टाकून अचानक धरतीवर गडबडा लोळवयास लागले. मधेच पालथे होणे, चित्कारणे, पुनः उताणे होऊन अजून उच्च स्वरात ओरडणे चालू होते. अधून मधून तीव्र स्वरात रोदनही चालू होते. केंद्रातील समस्त जन विस्मयाने स्वामी आणि त्यांच्या मातापित्यांकडे पाहू लागले. शरमेने गोरेमोरे होऊन स्वामींच्या मातापित्यांनी त्यांना तेथून उचलले आणि केंद्राबाहेर चालते झाले. या धरतीवर गडबडा लोळून राग व्यक्त करण्याच्या पद्धतीचा तस्मात् 'मही-अधर-निद्रित णिषेढ' पद्धतीचा स्वामींनी तदनंतरही अनेकदा उपयोग केल्याचे असंख्य उल्लेख णिषेढोपनिषदाच्या पानापानांत आढळतात.
तर भक्तजनहो. आदिस्वामींनी त्यांच्या बालपणी योजिलेले व उपयोजिलेले णिषेढांचे विविध प्रकार ऐकताना नेहमीच असे लीन, तल्लीन, मंत्रमुग्ध झाल्याचे अनुभव येतात. थोडक्यात या 'णिषेढोपणिषडा'चे प्रत्येकाने हरदिनी पारायण करावेसे आहे. नियमित पारायण करणार्यास अनेक सुखद व चमत्कृतीपूर्ण अनुभव येतात. मनाविरुद्ध घडणार्या प्रत्येक गोष्टीचा णिषेढ अर्थात निषेध व विरोध करण्यासाठी हे णिषेढोपणिषड वाचावे. हे वाचल्याने
१. 'णिषेढा' च्या विविधतम व नाविन्यपूर्ण संकल्पना सुचू लागतात.
२. 'णिषेढां' च्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे विरोधक विस्मयचकित व दिग्मूढ होऊन जातात.
३. विरोधकांच्या विरोधाची तीव्रता कमी होते अथवा तो पूर्णतः गळून पडतो.
४. बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी 'णिषेढां'च्या भयापोटी तुमच्या कुठल्याही कल्पनांना विरोध केला जात नाही.
५. धनहीनाला धन मिळते, अपत्येच्छुकांना अपत्यप्राप्ती होते.
६. अंतःकरणातल्या सर्व इच्छांची पूर्ती होते.
७. 'णिषेढां'च्या वैविध्याच्या भयाने कोणीही विरोधक नुरल्याने हमखास यशप्राप्तीची हमी.
८. थोडक्यात सर्व आकांक्षा पूर्णत्वाला पोचल्याने चिरंतन यश लाभते.
|| इति णिषेढोपणिषडः समाप्तः ||
बोला आदिस्वामींचा विजय असो. णिषेढोपणिषडाचा विजय असो. ओम शांतिः शांतिः शांतिः ... इत्यलम
'वस्तू-क्षेपण' णिषेढ :
एके समयी बाल आदिस्वामी त्यांच्याकडे असलेल्या अनेक लहान चारचाकी खेळण्यांपैकी एका चारचाकीशी खेळण्यात मग्न होते. चारचाकीशी खेळणे म्हणजे चारचाकी उलटी करून तिची चाके फिरवणे आणि मधेच मुखात घालणे अशा स्वरूपाची क्रीडा चालू होती. स्वामींच्या मातोश्रींनी ते पाहताच लगेच त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला व स्वामींना असे न करण्याविषयी बजावले. झाले !! त्याक्षणी स्वामींना क्रोध अनावर झाला व अकस्मात स्वामींनी ती छोटी चारचाकी उचलून मातोश्रींच्या दिशेने भिरकावली. ते देखोन मातोश्री अजूनच संतापदग्ध झाल्या आणि त्यांनी स्वामींना तसे न करण्याविषयी पुनश्च एकवार दटावले. जे अर्थातच स्वामींना सहन होणे शक्य नव्हते. त्यामुळे स्वामींनी दुसरी चारचाकी घेऊन ती भिंतीवर आणि तिसरी चारचाकी सज्जाच्या काचेच्या दिशेने आदळली. मातोश्रींनी लगबगीने महालातल्या सर्व चारचाक्या जमा करून त्यांच्यावर तात्पुरती जप्ती आणविली खरी पण अर्थातच स्वामींच्या अभिनव णिषेढ प्रकाराने स्वामींचे माता-पिता चांगलेच दिग्मूढ व चिंतीत झाले.
'हस्त-पार्श्वे-बंधित दौड' णिषेढ :
णिषेढाचा हा एक आगळा प्रकार स्वामीलीलांमध्ये वाचावयास मिळतो. आदिस्वामींनी हे असे विविध णिषेढांचे प्रकार कसे शोधून काढले असावेत या विचाराने त्यांचे अपार कौतुक वाटत राहते. अखेर स्वामीच ते !! तर उपरोल्लेखाप्रमाणे हा प्रकार काहीसा निराळा आहे. स्वामींना सतत निरनिराळी पुस्तके, विविध धातूंची अथवा काचेची पात्रे, अन्य अवजारे, भोजनाची अन्यान्य उपकरणे यांच्याशी खेळण्यास आवडत असे. अर्थातच त्यांना पुस्तके आणि काचेची उपकरणे इत्यादींशी खेळण्यास मज्जाव असे. तरीही अनेकदा ते माता-पिताश्रींचा डोळा चुकवून शिताफीने या वस्तू मिळवीत असत. परंतु अनेकदा तत्क्षणीच किंवा काही कालानंतर ती वस्तू त्यांचेपासून हिरावून घेतली जाई. एकदा असाच एक काचेचा घट त्यांच्या हातातून हिरावून घेतला गेला असता त्यांना अचानक काय झाले त्याची कल्पना नाही परंतु स्वामींनी अचानक आपले दोन्ही हात मागे बांधले आणि दाणदाण पावले टाकीत दौडत तेथून निघून महालाच्या एका कोपर्यात निघून गेले गेले आणि तिथून जोरजोराने चित्कारत, आक्रोश करत आपला णिषेढ णोंडवू ... क्षमायाचना.. नोंदवू लागले. परंतु त्यांचे ते उच्चरवाने ओरडणे विसरून जात त्यांचे माता-पिता त्यांचे हात मागे बांधून धावत जाण्याचे विचित्र, विनोदी परंतु तितकेच विलोभनीय दृश्य मोठ्या कौतुकाने पहात राहिले. अशा रीतीने स्वामींच्या मातापित्यांना स्वामींच्या णिषेढ-कृत्याचे एक अनोखे स्वरूप पहावयास मिळाले. अर्थात तदनंतर हे दृश्य वारंवार पहावयास मिळू लागले हे सांगणे न लगे.
'शीघ्र-कोने-दौड' णिषेढ :
'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' हा 'हस्तपार्श्वेबंधित दौड-णिषेढा'शी बहुतांशी साधर्म्य साधतो. या णिषेढाची पार्श्वभूमी आणि दरम्यान घडणार्या किंवा थोडक्यात म्हणजे त्यासाठी कारणीभूत असणार्या विविधतम घटना या अनेकदा एकसमान असत. फक्त त्या घटनेनंतर येणारी स्वामीमहाराजांची प्रतिक्षिप्त क्रिया जरा वेगळी असे. उदाहरणादाखल म्हणून आपण उपरोल्लेखित घटनाच घेतली तर काही प्रसंगी स्वामी 'हस्तपार्श्वेबंधित दौड-णिषेढा' चा वापर करीत तर कधी 'शीघ्र-कोने-दौड णिषेढा'चा. या 'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' प्रकारचा वापर करताना स्वामी घटनास्थळावरून अकस्मात दौडत दौडत निघून जात व महालाच्या एखाद्या कोन्यात--ज्यास 'कोपरा' असेही संबोधले जाते--जाऊन थांबत आणि त्या कोन्यातून उच्चरवातील आरोळ्या चालू राहत असत. तर असा हा 'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' स्वामी कोणत्या प्रसंगी वापरत ते तपशीलात पाहू.
एके समयी स्वामींचे तात उर्ध्वपटावर कार्यरत असता स्वामी तेथे अचानक विराजमान झाले आणि वविध कळांवर आपले हस्तकौशल्य आजमावू लागले. अर्थातच तातांनी त्यांस तेथोन तत्क्षणी दूर लोटले. अर्थातच स्वामी प्रचंड क्रोधित झाले व दौडत दौडत तातांपासून दूर निघोन महालाच्या एका कोन्यात गेले. तातांकडे पाठ करून, चेहरा भिंतीच्या कोन्याच्या दिशेला ठेवून तीव्र स्वरात उद्घोषू लागले. णिषेढाचा हा प्रकार पाहून तात व माता यांच्या मुखकमलावर हास्याची कारंजी उडाली.
'मही-अधर-निद्रित' णिषेढ :
स्वामींनी अवलंबिलेल्या णिषेढांच्या विविध प्रकारांपैकी 'मही-अधर-निद्रित' हा णिषेढाचा प्रकार खरंतर फारच विलक्षण, अगम्य आणिक दुर्मिळ संबोधला पाहिजे. या प्रकाराचा त्यांनी जेव्हा सर्वप्रथम उपयोग केला त्या प्रसंगाचा तपशील जाणून घेऊन मग आपण या प्रकाराचा अधिक परिचय करून घेऊ. एके दिनी स्वामी त्यांच्या माता-पित्यांसमवेत एका भ्रमणध्वनीशीयंत्रांशी संबंधित आस्थापनाच्या केंद्रात गमते झाले. स्वामींच्या माता-पित्यांना नूतन भ्रमणध्वनीयंत्रांची आवश्यकता होती. अर्थात जुनी भ्रमणध्वनीयंत्रे कार्यरत नसण्यास बव्हंशी स्वामीच कारणीभूत होते. कारण स्वामींच्या मुखग्रंथीतून स्त्रवलेल्या द्रवाने सचैल न्हाऊन निघाल्याने जुनी भ्रमणध्वनीयंत्रे गतप्राण झाली होती. असो. तर स्वामींचे माता पिता भ्रमणध्वनीयंत्रे बघण्यात गर्क असताना स्वामींनी अचानक जमिनीच्या दिशेने बोट दाखवून त्यांना खाली ठेवण्याची मागणी केली. मातोश्रींनी लगबगीने त्यांना खाली ठेवले व एकीकडे स्वामींवर लक्ष ठेवत ठेवत त्या विविध भ्रमणध्वनीयंत्रे तपासू लागल्या. स्वामी आसपास डकवलेल्या भ्रमणध्वनीयंत्रांच्या विविधरंगी कागदी पत्रकांशी खेळत होते. अकस्मात ते ज्या कारणामुळे त्यांना पुस्तकांपासून कटाक्षाने दूर ठेवले जाते हे कसे योग्य आहे हे सिद्ध करू लागले. अर्थात नित्याच्या सवयीप्रमाणे निमिषार्धातच स्वामी त्या विविधरंगी कागद व पुस्तके यांचे तुकडे तुकडे करू लागले. मातोश्री आणि यावेळी तर पिताश्रींनी त्यांना तसे न करण्याविषयी फर्मावले व बळाचा वापर करून ती कागदपत्रे त्यांच्या हातून काढून घेतली. स्वामी एक दोन वाकडी-तिकडी पावले टाकून अचानक धरतीवर गडबडा लोळवयास लागले. मधेच पालथे होणे, चित्कारणे, पुनः उताणे होऊन अजून उच्च स्वरात ओरडणे चालू होते. अधून मधून तीव्र स्वरात रोदनही चालू होते. केंद्रातील समस्त जन विस्मयाने स्वामी आणि त्यांच्या मातापित्यांकडे पाहू लागले. शरमेने गोरेमोरे होऊन स्वामींच्या मातापित्यांनी त्यांना तेथून उचलले आणि केंद्राबाहेर चालते झाले. या धरतीवर गडबडा लोळून राग व्यक्त करण्याच्या पद्धतीचा तस्मात् 'मही-अधर-निद्रित णिषेढ' पद्धतीचा स्वामींनी तदनंतरही अनेकदा उपयोग केल्याचे असंख्य उल्लेख णिषेढोपनिषदाच्या पानापानांत आढळतात.
तर भक्तजनहो. आदिस्वामींनी त्यांच्या बालपणी योजिलेले व उपयोजिलेले णिषेढांचे विविध प्रकार ऐकताना नेहमीच असे लीन, तल्लीन, मंत्रमुग्ध झाल्याचे अनुभव येतात. थोडक्यात या 'णिषेढोपणिषडा'चे प्रत्येकाने हरदिनी पारायण करावेसे आहे. नियमित पारायण करणार्यास अनेक सुखद व चमत्कृतीपूर्ण अनुभव येतात. मनाविरुद्ध घडणार्या प्रत्येक गोष्टीचा णिषेढ अर्थात निषेध व विरोध करण्यासाठी हे णिषेढोपणिषड वाचावे. हे वाचल्याने
१. 'णिषेढा' च्या विविधतम व नाविन्यपूर्ण संकल्पना सुचू लागतात.
२. 'णिषेढां' च्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे विरोधक विस्मयचकित व दिग्मूढ होऊन जातात.
३. विरोधकांच्या विरोधाची तीव्रता कमी होते अथवा तो पूर्णतः गळून पडतो.
४. बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी 'णिषेढां'च्या भयापोटी तुमच्या कुठल्याही कल्पनांना विरोध केला जात नाही.
५. धनहीनाला धन मिळते, अपत्येच्छुकांना अपत्यप्राप्ती होते.
६. अंतःकरणातल्या सर्व इच्छांची पूर्ती होते.
७. 'णिषेढां'च्या वैविध्याच्या भयाने कोणीही विरोधक नुरल्याने हमखास यशप्राप्तीची हमी.
८. थोडक्यात सर्व आकांक्षा पूर्णत्वाला पोचल्याने चिरंतन यश लाभते.
|| इति णिषेढोपणिषडः समाप्तः ||
बोला आदिस्वामींचा विजय असो. णिषेढोपणिषडाचा विजय असो. ओम शांतिः शांतिः शांतिः ... इत्यलम