आम्ही मागे एकदा आमच्या संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त नाटक बसवत होतो. लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळा हौशी मामला होता. पण सगळ्यांना नाटकात काम करायची आवड, इच्छा होती आणि त्याप्रमाणे आपलं शिक्षण, नोकरी आणि इतर उद्योग सांभाळून सगळे जण नाटकात काम करत होते. आमच्या दिग्दर्शक मित्राबरोबर नाटकाची आवड असणारे त्याचे २-३ मित्रही तालमीला येत. दिग्दर्शक सीन समजावून सांगत असताना, संवाद, शब्दफेक, हावभाव, स्टेजचा वापर या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असताना त्याचे हे मित्रही अनाहूत 'सल्ले' देत असत. हा संवाद म्हणताना टोन असा असा असायला हवा, असे असे हातवारे हवेत वगैरे मतं मांडली जात. हे दिग्दर्शकाने सांगितलं असतं तर कोणाला काही वाटलं नसतं पण उगाच त्याचे मित्र आहोत म्हणून आपल्यालाही दिग्दर्शन करण्याचा अधिकार आपसूकच प्राप्त होतो या विचारातून दिले जाणारे हे अनाहूत सल्ले अनेकदा त्रासदायक वाटत. पण दिग्दर्शक सगळ्यांचाच मित्र आणि ती टाळकी त्याचे मित्र म्हणून कोणी विशेष लक्ष देत नव्हतं. कालांतराने नाटकात दोन अतिशय छोट्या भूमिका करायला आम्हाला कलाकार मिळेनात. तेव्हा याच दोन टाळक्यांना या भूमिका देऊ असं ठरलं. ते दोघेही आनंदाने तयार झाले. पण...
सगळ्यांसमोर उभं राहून फक्त पाहिलं वाक्य म्हणताना त्यांची अशी काही तारांबळ उडाली की बास रे बास !!!!
ते अडखळत होते, शब्द चुकत होते, वाक्य पूर्ण करता येत नव्हतं. हावभाव, हातवारे, आवाजातला चढउतार, संवादफेक, स्टेज कव्हर करणं वगैरे वगैरे तर फार फार पुढच्या गोष्टी होत्या.
हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे नीरजा पटवर्धन यांनी मायबोलीवर लिहिलेल्या ब्लॉगर्सच्या लेखाला मिळालेल्या
प्रतिक्रिया. १-२ गोष्टी वगळता नीरजा यांचा लेख मला पटला. मराठी ब्लॉगर्सच्या ज्या गोष्टी त्यांना खटकल्या आहेत त्या का खटकल्या आहेत हे त्यांनी योग्य शब्दांत आणि सौम्य भाषेत सांगितलं आहे. त्यामुळे या लेखाचा विषय तो लेख नाही तर त्या लेखावर भरभरून आलेल्या प्रतिक्रिया हा आहे. (सध्या तरी) तीन पानं भरून आहेत. सगळ्या वाचा. काही प्रतिक्रिया विचारी आहेत, संयत आहेत, बॅलन्स्ड आहेत. पण अशा प्रतिक्रियांची संख्या तुलनेने कमीच. इतर अनेक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा, आगाऊपणा, ब्लॉगर्सना क:पदार्थ लेखणार्या तुच्छ भावना, स्वतःबद्दलच्या (माझ्या दृष्टीने अनाकलनीय) गर्वाचा (इथे मी गर्व हा गर्व या वाईट अर्थानेच वापरतो आहे. हल्ली वापरला जातो त्या अभिमान या अर्थी नव्हे.) सोसच जास्त. मला प्रामुख्याने खटकलेल्या काही प्रतिक्रिया देतो इथे. (>> च्या खाली मी माझं उत्तर लिहिलं आहे असं वगैरे काही नाही. आधी कोणीतरी लिहिलेल्या प्रतिक्रियेवर पुढच्या व्यक्तीने दिलेली ती प्रतिक्रिया आहे. गोंधळ होऊ नये म्हणून मुद्दाम सांगितलं.)
------
- जरी काही दर्जेदार असले तरी माणशी एक ब्लॉग जर निघाला तर कुणाकुणाचे आणि कितीकिती आणि कायकाय वाचायचे हा प्रश्न उरणारच!
मग त्यातुन आपल्या ब्लॉगचा टीआरपी वाढावा म्हणुन वेगवेगळी मार्केटिंग गिमिक्स वापरली जाण्याचीच आणि दर्जाकडे दु:र्लक्ष (
हा शब्द अशुद्ध आहे हे मला माहीत आहे. पण प्रतिक्रियेतला शब्द जसाच्या तसा दिला आहे.) होण्याचीच शक्यता अधिक वाटते!
- >> बाकी ब्लॉग संस्क्रुती वाढेल तसे विषयाचे वैविध्य वाढेल यात शंकाच नाही.
वैविध्य वाढेलही कदाचित पण दर्जाचे काय?
प्रिंट प्रकारात निदान प्रकाशन तरी काही निकषांवर हे साहित्य पडताळुन घ्यायचे... इथे तर ते ही मॉडरेशन नाही!
- अनेक मराठी blog वाचताना मला खटकलेली गोष्ट म्हणजे खुप nostalgic (प्रवीण दवणे छापाचे) लिखाण . विनोदी लिखाणात तोच तोच मराठी मध्यमवर्गीयपणातुन निर्माण होणारा विनोद (इथे पुलछाप म्हणायला हरकत नाही,हा प्रभाव शिरिष कणेकर, मंगला गोडबोले ह्यांच्या लिखाणातही जाणवतो ). हे इतके तेच तेच होते की मग कधीकधी खरे लिखाण असले तरी खोटे वाटायला लागते.
सामाजिक बांधिलकिच्या जाणिवेतुन केलेले लिखाणही कुठेतरी शाळु/teenager types असते (उदा. systemमधे भ्रष्टाचार आहे,राजकारणी वाईट असेच काहीतरी).
- प्रथितरश (
वरचाच कंस पुन्हा एकदा..
असो..) ब्लॉगर्स स्वतःच्या मनाने शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करताना दिसतात. ह्या लोकांकडून तू मराठी भाषेसाठी काही करण्याची अपेक्षा करते आहेस का ?
- जिथे फॉर्मचे बंधन नाही, जिथे वाट्टेल ते लिहीता येऊ शकते तिथेही अनुभवांची/कल्पनांची वानवा का? मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणुन पाहिले तर वैचारिक दिवाळखोरीच जास्त दिसते, आणि तसाच समाज असेल तर कोण काय करणार.
- इतकं बोरिंग झालंय मराठी ब्लॉगविश्व.. काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करायचे! किंवा चक्क टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडायचे.. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनचा उत्तम नमुना! लेटेस्ट हॉट टॉपिक असल्याने व 'तू मला छान म्हण, मी तुला म्हणतो' अशा प्रकारच्या कंपुबाजीने(!) कमेंट्स तर बख्खळ पडतात व लेखक समाधान करून घेतो की तो लेख फार भारी जमला होता वगैरे..
- ब्लॉग अकाउंट फुकट काढता येतं. त्यातुनच इतकं पीक उगवलय. बरं बहुत करुन साचेबब्द्ध आयुष्य असलेल्या लोकांच्या अनुभवविश्वात वैविध्य कुठुन येणार ? त्यात प्रतिभेची वानवा.
- आता इतकी प्रचंड गर्दी आलीय की निसटले जाते हे लिखाण, आणि मग उरतात नुसत्याच प्राची ला गच्ची टाईप कविता किंवा फॉर्वर्डेड माल स्वतःच्या ब्लॉगवर टाकणारी जनता.. अरे ही कुठली ब्लॉग काढायची प्रेरणा?
------
सिंडरेला यांच्या १-२ प्रतिक्रिया आणि स्वाती_आंबोळे यांच्या सगळ्याच प्रतिक्रिया पटल्या. निव्वळ त्या प्रतिक्रिया (सिंडरेला यांच्या प्रतिक्रियांमधले काही मुद्दे वगळता) ब्लॉगर्सच्या बाजूने आहेत म्हणून नव्हे तर त्या एकांगी नाहीत म्हणून.
आणि ही आहे शर्मिला फडके यांची प्रतिक्रिया. मला सगळ्यांत जास्त आणि पूर्णपणे पटलेली एकमेव प्रतिक्रिया. कारण त्यांनी अतिशय विचारपूर्वक, इतरांप्रमाणे उगाच आक्रस्ताळेपणा न करता, सगळ्या बाजूंचा सारासार विचार करून, समतोल राखत, ब्लॉगर्सची बाजू अतिशय योग्य रीतीने मांडली आहे. अतिशय माहितीपूर्ण प्रतिक्रिया आहे ही. खाली वाचा.
------
- नेटबाहेरच्या जगात गेली काही वर्षे अमाप संख्येने मराठी पुस्तके निघत आहेत पण त्यापैकी नव्वद टक्के पुस्तकांना दुसर्यांदा आवर्जून वाचावे इतकेही वाचनमूल्य नाही. मग मराठी ब्लॉगर्सकडून इतक्याच 'साहित्य निर्मितीची' अपेक्षा करणे चुकीचेच. पण असं असूनही उद्याचे दर्जेदार साहित्य किंवा कंटेपररी साहित्य हे ह्या ब्लॉग्जवरच्या पोस्ट्समधूनच निर्माण होऊ शकेल इतकी क्षमता नक्कीच निर्माण झाली आहे काही ब्लॉगर्समधे.
डायरीवजा लिखाण हा ब्लॉग्जचा काहीतरी 'कमीपणा' मानला जातो पण उलट मला तर ती ब्लॉग्जची स्ट्रेन्ग्थ वाटते. ब्लॉग्ज लिहिणारे सुरुवात 'मी' पासून करत असले तर ते योग्यच. अक्षरशः जगाच्या कानाकोपर्यात पसरलेले मराठी ब्लॉगर्स यानिमित्ताने आपले विविध क्षेत्रातले, विविध समाजांमधले अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवात शाळकरी निबंधासारखी झाली तरी त्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगणे, पलीकडे जाणे यातूनच होते. अनुभवांना थेटपणे भिडून लिखाण करण्याची कुवत त्यांच्यापैकी काहींमधे निर्माण अवश्य होते आहे.
डायरीवजा किंवा 'मी'च्या लिखाणामधे कल्ट साहित्यकृती निर्माण होण्याची किती ताकद असते हे कित्येक क्लासिक्सनी ऑलरेडी दाखवून दिलेले आहे. कोसलाही याचेच उत्कृष्ट उदाहरण.
ब्लॉगर्समधे गुणवत्ता, क्षमता आहे फक्त कमतरता आहे ती सातत्याची आणि वेगवेगळे फॉर्म्स धीटपणे हाताळण्याची. आणि अजून एक वेगळेपणा म्हणजे येणार्या इन्स्टन्ट प्रतिक्रिया. ज्या बाहेरच्या जगातल्या लेखकांना कधीच मिळू शकत नाहीत. आपले पुढचे पोस्ट जास्त दर्जेदार किंवा वेगळे करण्याची स्फुर्ती ब्लॉगर्सना यातूनच मिळू शकते मात्र उगीच सामान्य लिखाणाला चढवले गेले तर ब्लॉगर कमी कालावधीत संपूही शकतो. यात मला वाटतं वाचकांचीही जबाबदारी खूप आहे. प्रतिक्रिया देताना परखड वस्तुनिष्ठपणा दाखवणे वाचकाला जमले पाहिजे आणि क्रिटिसिझम योग्य त्या स्पिरीटने घेणे ब्लॉगरला जमले तरच तो पुढे जाऊ शकेल.
वेगळ्या स्टाईलची भाषा, काहीतरी नवा वेगळा विचार, नवा फॉर्म ब्लॉगिंगमधे अचूक पकडता येऊ शकतो. मात्र असा प्रयत्न करणारे खूप कमी. जे करताहेत त्यांचे कौतुक आहे आणि करत नाहीत त्यांनी तो आवर्जून करायला हवा.
डायरीवजा लिखाणाने सुरुवात करुन स्वतःची स्टाईल मिळणे, मग त्यापुढे जाऊन काही वेगळे मांडणे, स्वतःच्या अनुभवांतून वाचकांना स्वतःशी जोडणे, अनुभवांच्या पलिकडचे काहीतरी वाचकांच्या पदरात टाकणे, भाषा समृद्ध करत नेणे, संदर्भ मिळवण्याचा प्रयत्न करणे हे करणारे काही ब्लॉगर्स बस्केने उल्लेख केले आहेतच. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या एका ब्लॉगरला मराठीतल्या मान्यवर प्रकाशकांनी ऑलरेडी तिचे पोस्ट्स संकलित करण्याची ऑफर दिली होती. मराठी प्रकाशकांनी असे जास्तीतजास्त प्रयत्न आता करायला हवेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी काही सीमारेषा मराठी साहित्यकृतींमधे पुढल्या काळात नसावी.
ब्लॉगर्समधे गेल्या काही महिन्यांमधे पेन्शनर्स लिखाणाचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरुन जाताना दिसले अमुक की टाक त्यावर पोस्ट टाईप उत्साह त्यांच्यात अमाप ओसंडून जातो आहे. ब्लॉगर्सचा दर्जा आणि संख्या याचे प्रमाण यामुळे विपरित होईल की काय अशी भिती साहजिकच वाटते. पण हा ब्लॉगर्सचा एक वेगळा, स्वतंत्र प्रकार आहे आणि त्यांचा वाचकही वेगळाच रहाणार. यामुळे तरुण, उत्साही ब्लॉगर्सनी आपला ब्लॉगिंगचा उत्साह गमावता कामा नये. लिहित रहायला हवे.
चांगले, सकस असे काही जन्मतःच प्रत्येकवेळी नसते. ते घडत जाते. ज्यांच्यात क्षमता आहे ते घडतील. बाकी फोलपटे उडून जातील आपोआप.
------
शर्मिला फडके यांचा
ब्लॉगही अतिशय उत्तम आहे. नक्की वाचा. !! असो.
तर या अशा प्रतिक्रिया टाकणार्या लोकांच्या प्रोफाईल्समध्ये डोकावून मी मुद्दाम त्यांच्या ब्लॉग्सला भेटी देऊन आलो (अनेकांचे तर स्वतःचे ब्लॉग्सही नाहीयेत. निदान प्रोफाईलमध्ये ब्लॉगची लिंक तरी नाहीये.) आणि मला सुरुवातीला सांगितलेली नाटकाची गोष्ट आठवली. याउपर काही लिहीत नाही. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. पण मला काही काही प्रश्न राहून राहून पडले.
१. आपण स्वतः एका ओळीचीही निर्मिती न करता किंवा केलीच तरी नियमितपणे न लिहिता आणि अगदी नियमितपणे आणि दर्जेदार लिहीत असलो तरीही त्यामुळे समग्र मराठी ब्लॉगविश्वावर चिखलफेक (यातून समस्त मराठी माणसाचं दैवत पुल ही सुटलेलं नाही बरं.) करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? हे म्हणजे संभाजी ब्रिगेड सारखी स्वघोषित 'सेन्सॉरबोर्ड गिरी' झाली. संभाजी ब्रिगेड चित्रपट थेटरमध्ये घुसून चित्रपट डायरेक्ट बंद पाडते आणि हे लोक असल्या प्रतिक्रियांमुळे नवख्या ब्लॉगर्सचं खच्चीकरण करून त्यांना लिखाणापासून परावृत्त करून पर्यायाने त्यांचे ब्लॉग्स बंद पडायला कारणीभूत ठरतात. याउलट मला तरी आत्तापर्यंत कुठल्याही मराठी ब्लॉगवर इतर कुठल्या मराठी संस्थळाची किंवा त्याच्या सदस्यांची अशा प्रकारे नाचक्की करणारे लेख वाचायला मिळाल्याचं स्मरत नाही.
२. एखादी व्यक्ती कसं आणि किती उत्तम लिहिते यावर तिच्या लिखाणाचा दर्जा अवलंबून असतो की ती कुठल्या संस्थळावर लिहिते यावर? (त्याशिवाय का यांना ९५% ब्लॉग्स वाचण्याच्या लायकीचे वाटत नाहीत?)
असो प्रश्न अनेक आहेत पण मला मूळ मुद्द्यापासून भरकटायचं नाहीये त्यामुळे प्रश्नावली तूर्तास इथेच थांबवतो. मला वैयक्तिकरित्या उद्देशून कोणीही काहीही लिहिलेलं नसलं तरीही समस्त 'मराठी ब्लॉगर्सना' उद्देशून ताशेरे झाडण्यात आले असल्याने मला मराठी ब्लॉगर्सची बाजू मांडणं आवश्यक वाटतं. (इथे मी समस्त मराठी ब्लॉगर्स मंडळींचा प्रतिनिधी म्हणून हे मांडतोय असा कुठल्याही प्रकारचा माझा दावा नाही. मी फक्त मराठी ब्लॉगर म्हणून माझी बाजू मांडतोय आणि अनेकांची बाजू हीच असेल याची मला खात्री आहे..... उगाच कोणी काही विचारण्याच्या आधीच स्पष्टीकरणं देऊन टाकलेली बरी असतात अनेकदा. नाहीतर पुन्हा एखादा प्रतिक्रिया टाकलेला/ली येऊन विचारायचा/ची "तुम्ही ठेका घेतला आहे का मराठी ब्लॉग विश्वाचा")
१. आत्तापर्यंत किती मराठी पुस्तकं लिहिली गेली असतील? एक अगदी अंदाजे आकडा म्हणून १००० धरू. (मला वेड लागलेलं नाही. खरा आकडा यापेक्षा कित्येक पट अधिक आहे. तरीही तूर्तास आपण अगदी छोटा आकडा धरू).
२. साधारण किती वर्षं पुस्तकं निर्मितीचं काम चालू आहे? पुन्हा अंदाजे १०० वर्षं धरू.
आता हेच दोन प्रश्न आपण आता मराठी चित्रपट आणि मराठी संगीत/गीतं यांना अनुसरून विचारू.
तर आता मला सांगा गेल्या १०० वर्षांत निघालेल्या १००० पुस्तकांपैकी सगळीच्या सगळी पुस्तकं चांगली होती का? गेल्या १०० वर्षांत निघालेलं प्रत्येक मराठी गाणं, प्रत्येक मराठी चित्रपट हा सर्वोत्तम होता का? प्रत्येकाचा दर्जा अत्युच्च होता का? चित्रपटांच्या विषयात कमालीचं वैविध्य होतं का? प्रत्येक पुस्तकं/गाणं/चित्रपट भावनेला स्पर्शून जाणारं, अनुभवाची नवीन कवाडं खुलं करणारं, प्रचंड माहितीपूर्ण, सहज प्रयोग म्हणून न करता नवनवीन संकल्पना मांडणारं, नवीन शोध लावणारं असं काही होतं का???
जर मराठी लेखक, चित्रपटकर्ते, संगीतकार/गीतकार १०० वर्षं मिळूनही निर्माण होणारं एकूणएक, प्रत्येक पुस्तक/चित्रपट/गाणं हे प्रेक्षकाला/वाचकाला आवडणारं बनवू शकले नाहीत आणि हे आपण मान्यही करतो तर मग तोच नियम मराठी ब्लॉगविश्वाला लागू का होत नाही? मराठी ब्लॉगविश्वात जन्माला येणारा एकूण एक, प्रत्येक लेख हा वेगळा, अत्त्युच्च दर्जाचा असावा हा अट्टाहास का? (आता कोणी म्हणेल की आम्ही प्रतिक्रियेत म्हटलं आहे की ५% ब्लॉग्स वाचनीय असतात. पण ती शुध्द तांत्रिक पळवाट आहे. ५% ब्लॉग्सना चांगलं म्हटलं तरीही एकूणच मराठी ब्लॉगविश्वाबद्दल असणारा अनाकलनीय आकस लपून रहात नाही.)
इंटरनेट खर्या अर्थाने घरोघरी सुरु होऊन आत्ताशी जेमतेम दहा-पंधरा वर्षं झाली आहेत. त्यात ब्लॉग प्रकरण सुरु झालं अंदाजे ६-७ वर्षांपूर्वी आणि त्यातही मराठी टंकायच्या सोयी उपलब्ध होऊन, पूर्णतः मराठीत लिहिले जाणारे ब्लॉग्स सुरु होऊन तर जेमतेम २-३ वर्षं झाली आहेत. तर थोडक्यात वय वर्ष ३ असणार्या या बाळाकडून किती जलद आणि किती मोठ्ठाल्या अपेक्षा ठेवायच्या?
लोक आत्ता कुठे मराठी लिहायला लागले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक नवीन ब्लॉग्स सुरु झाले. अनेक नवीन लोक लिहिते झाले. नवनवीन कल्पना, शैली, वर्णनं, बाज, प्रकार यायला आत्ता कुठे सुरुवात होते आहे. माझ्या स्वतःच्या ब्लॉगलाही अजून दोन आकडी संख्या (महिन्यांची) गाठायची आहे. तर अशा वेळी नवीन ब्लॉगर्सना प्रेरणा मिळेल असं काही लिहिता येत नसेल तरी निदान त्यांना झोंबेल किंवा त्यांचा उपमर्द होईल असं तरी आपल्या हातून लिहिलं जाणार नाही याची दक्षता घेणं हे (कमीत कमी आंतरजालावरच्या तरी) प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य नाही का? सगळे ब्लॉग्स अत्त्युच्च दर्जाचे नाहीत हे मान्य करू पण म्हणून काय सगळेच ब्लॉग्स टाकाऊ आहेत, दर्जाहीन आहेत, अर्थहीन आहेत, पाट्या टाकणारे आहेत?
दुसरी गोष्ट आणि अजून महत्वाची म्हणजे वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चित्रपट, संगीत, पुस्तकं वाल्यांप्रमाणे ब्लॉगर्स काही (अजून तरी) व्यावसायिक नाहीत. व्यावसायिक इंग्रजी ब्लॉगर्स आहेत पण मराठीत त्याची संख्या जवळपास नगण्य आहे. आपले नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर सगळ्या बाबी सांभाळून चालवला जाणारा प्रकार आहे हा. पूर्णतः हौशी. (तसं नसतं तर ब्लॉगर्स मेळाव्याचा संपूर्ण खर्च कोणी एका अनामिकाने उचलला नसता. स्वतःच्या प्रोडक्टचे/ब्लॉगचे पोस्टर्स, बॅनर्स लावून त्या मेळाव्यातून व्यावसायिक फायदा काढला असता.) थोडक्यात या हौशी प्रकाराच्या यशाची मोजमाप करताना व्यावसायिक फुटपट्ट्या वापरणं सर्वस्वी अयोग्य.
अजून एक म्हणजे सरसकट सगळ्या ब्लॉगर्सच्या अकलेचे बाजारभाव काढणार्यांनी नियमितपणे किती ब्लॉग्स (लिहिले म्हणत नाहीये मी) वाचले आहेत हा प्रश्नच आहे आणि त्यांची (ब्लॉग्स न वाचता केलेली) निरीक्षणं बघून तो प्रश्न म्हणजे वस्तुस्थिती आहे याबद्दल दुमत नसावं. निदान मराठी ब्लॉगर्सचं तरी. मराठी ब्लॉग विश्वातून सलग दोन-तीन आठवडे नजर फिरवली तरी लक्षात येईल की इथे अनियमित पण दर्जेदार लिहिणारे तर आहेतच आहेत पण नियमित आणि दर्जेदार अशा दुर्मिळ मिश्रणाचं कसबही सहजतेने साधणारे अनेक अनेक अनेक लोक आहेत. माझ्या ब्लॉगवर 'माझे ब्लॉगु ब्लगिनी' खाली जी चित्र दिसतायत ना तिथे टिचक्या मारून ते ब्लॉग्स वाचून बघा आणि दुसरं म्हणजे 'मला हे भावतं' च्या खाली जी यादी आहे ना तेही ब्लॉग्स आवर्जून वाचा. बरं यातल्या एकालाही मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही, कोणालाही कधीच भेटलेलोही नाही. ज्या काही ओळखी आहेत त्या ब्लॉग्समुळेच. सगळे ब्लॉग्स वाचून झाले की मग "मराठी ब्लॉग्समध्ये विविधता नाही, दर्जा नाही, वैचारिक दिवाळखोरी आहे, अनुभवांची/कल्पनांची वानवा आहे, फुकट अकाउंट आहे म्हणून ब्लॉग काढले आहेत" ही वाक्य पुन्हा एकदा म्हणून बघा. काहीतरी चुकल्यासारखं जाणवेल (चिखलफेक करणार्या सरसकट सगळ्यांना जाणवेलच असा दावा अजिबात नाही. पण निदान काही जणांना तरी जाणवेल.. !!). आणि हे झाले मला माहीत असलेले काही ब्लॉग्स पण मला/आपल्याला माहीत नसलेले किंवा आपल्या नजरेस पडले नसलेले इतरही अनेक मराठी ब्लॉग्स असतीलच की. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अशी आगपाखड करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी आणि कसा दिला? नैतिक अधिकार म्हणतोय मी अधिकार नाही. किंवा सोप्प्या शब्दांत म्हणजे आपलं त्या क्षेत्रात भरीव नाही तरी निदान काहीतरी कार्य आहे म्हणून आपण टीका करू शकतो या जाणीवेतून केली गेलेली टीका असेल तर ठीक आहे. "मी वाचक आहे आणि ब्लॉग्स नेटवर उपलब्ध आहेत म्हणून मी त्यांच्यावर तोंडसुख घेणार" वाल्या अधिकाराविषयी बोलतच नाहीये मी. त्यातून पुन्हा "पैसे मोजून तिकीट काढून चित्रपट बघितलाय त्यामुळे मला एखाद्या रामगोपाल वर्माला किंवा मधुर भांडारकरला नावं ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे" हा मुद्दाही इथे गैरलागू आहे. तिकीट काढून चित्रपट बघितलाय त्यामुळे निर्माता/दिग्दर्शकावर तिखट टीका करण्याचा जो अधिकार आपल्याला लाभतो त्याच अधिकाराने ब्लॉग्सवर (जे वाचायला विनामुल्य असतात) आणि ब्लॉगर्सवर टीका करणंही कदाचित चुकीचं नाही असं म्हणू आपण. पण टीका करताना आपण कुठल्या पातळीवर उतरतो, कुठली भाषा वापरतो याचं भान ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं. एखादं मराठी संस्थळ म्हणजे इंटरनेटवरील समस्त मराठी विश्व नव्हे हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर माझ्या म्हणण्याचा अर्थ कळायला मदत होईल. असो.. !!
मध्यमवर्गीय विनोद, शाळू विनोद, मॉडरेशन नसलेलं लिखाण, शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करणारे, असल्या लोकांकडून मराठीसाठी काय होणार, अनुभवांची/कल्पनांची वानवा असणारं लिखाण, अतिशय बोरिंग, टिपिकल, मोनोटोनस, कंपूबाजी करणारे (या शब्दाला तर मी प्रचंड हसलो. कारण अशा कित्येक मराठी संस्थळांवर किती कंपूबाजी चालू असते आणि तिथले सभासदच त्यावर कशी टीका करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असो.), बख्खळ कमेंट्स घेणारे (यामागचा आक्षेपच मला कळला नाही.
ब्लॉगेटिकेट्स बद्दलच्या अज्ञानातून हे असं म्हटलं गेलं असावं कदाचित), वैचारिक दिवाळखोरी, बौद्धिक दिवाळखोरी, ब्लॉग्सची प्रचंड गर्दी (यात आक्षेपार्ह काय आहे? मराठी संस्थळावर खोर्याने सभासदसंख्या झाल्यावर सुखावणारे हेच लोक पण यांच्या मते ब्लॉग्सची गर्दी मात्र होता कामा नये.) अशा वस्तुस्थितीची जाणीव न ठेवता केल्या जाणार्या आढ्यताखोर, शेलक्या विशेषणांनी भरलेल्या तुच्छतादर्शक प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का दरवेळी आपलं मत मांडताना?
"हो SSSSSS य .... आहे. अगदी आहे. पूर्ण आहे. कारण पब्लिकली छापल्या जाणार्या प्रत्येक लिखाणावर माझं मत देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे." असं उत्तर मिळण्याचीच अधिक शक्यता आहे. पण वर म्हंटल्याप्रमाणे ते मत कुठल्याही भाषेत (लँग्वेज याअर्थी नव्हे पद्धत याअर्थी म्हणतोय) अगदी अपमानजनक भाषेत दिलं गेलं असल्याने मलाही उत्तर द्यावं लागलं आणि एवढं मोठ्ठं उत्तर तिथे प्रतिक्रिया म्हणून देण्यापेक्षा माझ्या ब्लॉगवरच लिहिलं तर समस्त मराठी ब्लॉगजगताला (जगातला प्रत्येक मराठी माणूस माझा ब्लॉग वाचतो असा मुर्खासारखा दावा अजिबात नाहीये इथे.) ब्लॉगविश्वाच्या बाहेर मराठी ब्लॉगर्सविषयी काय मतं आहेत ते लक्षात येईल आणि ते (आणि मीही) आपलं लेखन अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न करतील या हेतूने इथे लिहिलं. ;-)
पण कितीही झालं तरीही ब्लॉगर्सना "काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करणारे, टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडणारे, बोरिंग लिहिणारे, तेचतेच लिहिणारे, वैचारिक दिवाळखोरी असणारे, अनुभवांची/कल्पनांची वानवा असणारे, दर्जाहीन लिहिणारे" अशा पदव्या बहाल करणार्यांचं मराठी ब्लॉग किंवा एकूणच मराठी संस्थळांवरचं किंवा मराठी भाषेकरता दिलेलं योगदान काय आणि किती आणि तरीही अशी अपमानास्पद विशेषणं वापरण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले हे प्रश्न उरतातच !!