Saturday, October 30, 2010

अरुदेवीची कहाणी

ऐका ऐका अरुदेवी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब स्त्री रहात असे. अरु तिचं नाव. अरु भारी बडबडी होती. सतत बडबडत असे. दिसेल त्याबद्दल बोलायची, वाटेल त्या विषयावर बकबक करत राहायची. बकबक बकबक बकबक बकबक.. बास.. दुसरं काही करीत नसे. प्रत्येक विषयावर तिचं एक मत असे.. पण काहीही बोलण्याआधी आजूबाजूचे लोक त्या विषयावर काय बोलतायत हे ती बघे, सर्वांचं म्हणणं कान देऊन एके आणि त्यानंतर आपलं मत सांगे. तर तिच्या बोलण्यात एक मोठी मौज होती. ती अशी की आसपासच्या दहा लोकांनी दगडाला दगड म्हटलं की ती दगडाला पाणी म्हणीत असे, झाडाला झाड म्हटलं की ती माती म्हणीत असे, नदीला नदी म्हटलं की ती छप्पर म्हणीत असे. लोकांनी तिला सुरुवातीला समजावयाचा प्रयत्न केला. पण ती ऐकेचना. आपला हेका सोडीच ना. लोकांनी खूप समजावून पाहिलं, चुचकारून पाहिलं. पण ती काही बधली नाही. बडबडीचा घेतला वसा काही तिने सोडला नाही. मग लोक कंटाळून निघून जात. असं वारंवार होऊ लागलं. मग तिची भीड चेपली. एकदा तिने हाच प्रयोग पन्नास लोकांसमोर करून बघितला. समोरच्या झाडाच्या पानांचा रंग काळा आहे असं पन्नास लोकांसमोर बिनदिक्कतपणे म्हणाली. पुन्हा तेच सुरु झालं. लोक समजावायला लागले. पण नेहमीप्रमाणे अरु ऐकेना. त्या पन्नासमध्ये आधीच्या दहामधलेही काही लोक होते. त्यांनी उरलेल्या चाळीस लोकांना हिच्या नादी लागणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं कसं आहे आहे हे समजावून सांगितलं. ते ऐकून नेहमीप्रमाणे पुन्हा लोक पांगले. अरुची भीड चेपतच गेली. हाच प्रयोग तिने पुढे शंभर, पाचशे, हजार लोकांपुढे करून बघितला आणि योगायोगाने, सुदैवाने दर वेळी जिंकलीही. एकदा तर तिने संपूर्ण गावाविरुद्ध बोलायला सुरुवात केली. सारं गाव तिला समजावत होतं पण हिचा हेका कायमच. हिचं बोलणं असं असे की समोरच्याला निरुत्तर व्हावंच लागे. म्हणजे कितीही खोटं असो पण त्यात इतका शब्दच्छल असे, शब्दांची इतकी फिरवाफिरवी असे, इतक्या गोंडस आवरणात शब्द लपेटलेले असत, इतके नवनवीन वेगवेगळे शब्दप्रयोग वापरलेले असत, ते इतक्या अलंकारात लपेटलेले असत की बघता बघता समोरचा निव्वळ शब्दसामर्थ्य कमी असल्याने काही करू शकत नसे, निरुत्तर होत असे आणि निरुपाय होऊन निघून जात असे. बोलणार्‍याची मातीही विकली जाते पण न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही म्हणतात ना त्याप्रमाणे जडजड, मोठमोठे शब्द वापरणारा मनुष्य हिरवा रंग काळा आहे, दगड म्हणजे पाणी आहे असं काहीही समजावून देऊ शकतो हे त्या गावकर्‍यांच्या लक्षात आलं. हळूहळू त्यांनी तिच्या नादाला लागणं सोडून दिलं. त्याने तिला अजूनच जोर चढला. निरपराध लोकांची हत्या करणार्‍या भक्ष(ल)वादी लोकांची ती बाजू घेऊ लागली. राजाने त्यांच्याशी लढायला सैन्य पाठवलं याबद्दल ती राजाचा निषेध करू लागली. हे अन्यायकारक आहे असं म्हणू लागली. हकनाक जीव गमावणार्‍या निष्पाप लोकांच्या जीवाचं महत्व, त्यांचा 'जगण्याचा अधिकार' वगैरे वगैरे ती नेहमीप्रमाणेचच सोयीस्करपणे विसरली. भक्ष(ल)वाद्यांना 'गांधीबाबाची लेकरं' म्हणू लागली. राजाने काहीही न करता दुर्लक्ष केलं.

एकदा तिने असंच दगड, पाणी, माती, झाड वगैरे वगैरेच्या गोष्टी लिहिल्या आणि अचानक तिला शेजारच्या देशातून 'भूकड' पुरस्कार मिळाला. तिचा भाव अजूनच वधारला. मिजास अजूनच वाढत गेली. आपण म्हणू तेच खरं, आपण करू तीच पूर्व दिशा असं तिला वाटू लागलं. बडबड वाढू लागली. बकबकीचा परीघ विस्तारू लागला. एकदा राजाच्या मोठ्या राजवाड्यावर हल्ला झाला. हल्ला करणारे पकडले गेले आणि त्यांच्या प्रमुख 'गुरु'जींना देहदंडाची शिक्षा झाली. गुरुजींना देहदंड मिळालाच पाहिजे असं सर्व गावांमधल्या सगळ्याच लोकांचं मत होतं. लोकांचं असं मत आहे हे कळल्यावर, ते शांतपणे ऐकून घेतल्यावर तिने तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्या विरुद्ध मत मांडायला सुरुवात केली. देहदंड देणं कसं अयोग्य आणि चुकीचं आहे याचे डिंडिम पिटायला सुरुवात केली. तेव्हाही राजाने तिच्यावर काहीच कारवाई केली नाही. अर्थात राजालाही देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची अजिबातच इच्छा नव्हती. पण येनकेनप्रकारेण आपला इतरांपेक्षा वेगळा आवाज, मत मांडायची संधी तिने बरोबर साधून घेतली.

होता होता आपल्या कुठल्याच गोष्टीला कोणीच, अगदी राजाही, आक्षेप घेत नाही हे पाहिल्यावर तिचा उत्साह अजूनच दुणावला. ती देशाशी द्रोह करू लागली, राष्ट्राचे तुकडे करू पहाणार्‍यांच्यात उठबस करू लागली. भाषणं ठोकू लागली. ज्या देशाने तिला रोजचं दोन वेळचं खाणंपिणं दिलं त्या देशाला सरळ भूखा-नंगा म्हणू लागली. या देशाचे प्रांत विभागलेच पाहिजेत, प्रदेश वेगळे केलेच पाहिजेत, हा देश तोडलाच पाहिजे असं याच देशात राहून बोलू लागली. एवढंच नाही तर काही प्रदेश हे देशातले कधीच नव्हते असं म्हणू लागली. लोक पुन्हा चवताळले. तिच्या म्हणण्यावर राग व्यक्त करू लागले. पण तिने तिच्या नेहमीच्या शैलीत आपणच कसे बरोबर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला. तुम्ही ज्याला देशद्रोह म्हणता त्याला मी माझं मत म्हणते, तुम्ही ज्याला राष्ट्रद्रोह म्हणता तेच मत त्या प्रदेशातल्या लोकांचं आहे असं उघडपणे म्हणू लागली. वास्तविक त्या प्रदेशातल्या काही लोकांचंच ते मत होतं अन्य जनतेचं नव्हतं हे तपशील ती सोयीस्करपणे विसरली. तिच्याच देशातले तिच्यासारखे देशफोडे, तुटक्या विचाराचे, फुटक्या अकलेचे आणि नजरेचे 'गिल्ली', 'वरवर' सारखे लोक तिच्याबरोबर तिच्या हो ला हो करायला होतेच. होता होता हा ही वाद राजापर्यंत गेला. राजाने नेहमीप्रमाणे आपली जात दाखवली, पळपुटेपणा सिद्ध केला. बुळचटपणे शांत राहत तिला वेळच्यावेळीच रोखली नाही, तिची जीभ हासडली नाही की तिला हद्दपारही केलं नाही. होताहोता अरुची अरुताई आणि अरुताईची अरुदेवी झाली. थोडक्यात ज्याप्रमाणे अरुदेवीला आपलंच म्हणणं खरं करता येई, ती ज्याप्रमाणे बडबड करीत राही, शब्दच्छल करीत राही, हेकेखोरपणे वागीत राही, देशद्रोह करी पण हे सगळं चांगल्याचुंगल्या शब्दांच्या वेष्टनात गुंडाळूनच करी त्याचप्रमाणे हेच गुण तुमच्यातही येओत आणि अरुताईप्रमाणेच तुमच्याही केसाला धक्का न लागता तुमच्यावरही पुरस्कारांची खैरात होवो !! सत्तरा उत्तराची कहाणी नवा उत्तरी सुफळ संपूर्ण.. (सत्तरा आणि नावाच्या ऐवजी इतर काही वापरलंत तर ते कसं चूक आहे हे स्वतः अरुदेवी प्रगट होऊन दाखवून देईल तेव्हा सांभाळून !!)

-- काही संदर्भ विकीपिडियावरून

Friday, October 29, 2010

अतिथी....

जेव्हा आपल्याला एखादा लेख, कविता, स्फुट, ब्लॉगपोस्ट, उतारा प्रचंड प्रचंड आवडतो, आपण त्याच्या प्रचंड प्रेमात पडतो तेव्हा आपण काय करतो? तेव्हा तो लेख आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लोकांना मेल करतो, बझ करतो, फोनवरून कळवतो, फेसबुकवर टाकतो, ऑर्कट स्टेटस अपडेट करतो, ट्वीटचा चिवचिवाट करतो. अधिकाधिक लोकांनी ते वाचलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण लेख वाचून आपण जसे भारावून गेलेलो असतो, आनंदी झालेलो असतो, हसलेलो असतो, टाळी दिलेली असते, डोळ्याची कड हळूच पुसलेली असते, "आपल्याला असं लिहिता आलं असतं तर काय मजा ('जहाजा'तला ज) आला असता यार !!" असा विचार केलेला असतो किंवा क्वचित प्रसंगी आपल्या काळजात जशी एक किंचितशी कळ आलेली असते तो अनुभव , अगदी तसाच्या तसा अनुभव आपल्या सुहृदांना, समविचारी मित्रमैत्रिणींना यावा असं आपल्याला मनापासून वाटत असतं. पण तरीही आपण किती लोकांपर्यंत पोचणार? शंभर? दोनशे? पाचशे ? बास एवढेच... यापेक्षा अधिक खचितच नाही. पाचशे पेक्षा जास्त *चांगले* मित्रमैत्रिणी असलेल्या व्यक्तीचा मी आजन्म गुलाम म्हणून राहायला तयार आहे. असो. तर या अशा 'सोसल 'नॉट'वर्किंग' च्या माध्यमातून जरी आपण पाचशे किंवा समजा अगदी हजार लोकांपर्यंत आपली आवड पोचवली पण तरीही आपल्या यादीत नसलेल्या अन्य हजारो लाखो लोकांचं काय?.. तर या अशा 'काय?' वाल्या प्रश्नाचा आपण फक्त विचारच करत असताना किंवा कदाचित तोही करत नसताना सलील आणि प्रणवने तो विचार प्रत्यक्षात आणून दाखवला. काय केलं त्यांनी? त्यांनी एक सही काम केलं.. नियमित नव्या लेखनाची प्रचंड वेगाने भर पडत असलेल्या मराठी ब्लॉगजगतातल्या निवडक उत्कृष्ट लेखांचं एकत्रीकरण करून दर महिन्याला ते नेटभेटच्या इ-मासिक रुपात प्रकाशित करायला सुरुवात केली. यामुळे झालं काय की नियमितपणे जालावर नसणार्‍या तस्मात असे उत्तमोत्तम ब्लॉग्ज/लेख नियमित वाचू न शकणार्‍या अनेक लोकांना 'अ‍ॅट यॉर फिंगरटिप्स' म्हणतात तसं एका टिचकीसरशी हे लेख इ-पुस्तकाच्या स्वरुपात आपल्या मेलबॉक्स मध्ये मिळवून वाचण्याची सोय झाली. बघता बघता नेटभेट इ-मासिक ही कल्पना सुपरहिट झाली. लोकांना दर महिन्याला नवनवीन लेखन वाचायला मिळायला लागलं, नेटभेटचे वाचक वाढत गेले, वाचकसंख्येने एक लाखाचा आकडा पार केला, इ-मासिकांत लिहिणार्‍या ब्लॉगर्सना नित्य नवीन वाचक लाभत गेले.

एक दिवस सकाळी माझ्या मेलबॉक्समध्ये सलीलचं मेल चमकलं. उघडून बघतो तर चक्क नेटभेटच्या ऑक्टोबर अंकासाठी अतिथी संपादकपद स्वीकारण्याची विनंती. मध्यंतरी २-३ महिने कार्यबाहुल्यामुळे सलील/प्रणवला नेटभेटसाठी वेळ काढणं शक्य होत नव्हतं याची कल्पना होती. तसंच सलीलच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या ब्लॉगरने संपादकपद स्वीकारून स्वतः लेख निवडून अंक काढला तर तो नक्कीच वाचनीय होईलच. आपण सुरुवातीला जे वाचत होतो, कालांतराने ज्यात आपले लेख यायला लागले त्या मासिकाचा अतिथी संपादक म्हणून काम पाहणं ही कल्पना एकदम मस्त होती. मी ताबडतोब होकार कळवला. सलीलशी फोनवर बोलून अंक कसा अपेक्षित आहे, काय करायचं/काय करायचं नाही पक्षि 'डूज अँड डोंटस' (डोंटस असे काही नव्हतेच खरं तर) वगैरे वगैरेवर चर्चा झाली.. आणि बरोब्बर त्याच वेळी माझा *लाडका* बॉसबाबा माझ्या मदतीला धावला. म्हणजे थोडं (अधिकच) जास्तीचं आणि नवीन काम मागे लावून. पुढच्या ४-५ दिवसांत तर काम इतकं वाढलं की "मी का या अंकासाठी 'हो' म्हणालो, अंक (माझ्याच्याने) निघणार तरी आहे का" असं वाटायला लागलं. पण आठेक दिवसांत बाबा जरा थंड झाला आणि मी ऑक्टोबरात अपडेट झालेले आणि माहित असलेनसलेले जवळपास सगळे ब्लॉग्ज पालथे घालायला सुरुवात केली. पालथे घातले, भ्रमंती केली, डेरे टाकले, पडीक राहिलो काय हवं ते म्हणा. एकेक ब्लॉग, एकेक लेख पूर्वी नुसतं वाचक म्हणून वाचताना आणि आता तात्पुरत्या का होईना पण अतिथी संपादकपदाच्या चष्म्यातून म्हणून वाचताना माझ्या दृष्टीकोनात फरक पडला एवढं नक्की जाणवलं. म्हणजे नक्की काय ते मला माझ्या तोकड्या शब्दसामर्थ्यामुळे कदाचित व्यवस्थित समजावून सांगता येणार नाही. पण दृष्टीचे कोन निराळे होते हे नक्की जाणवलं.

अमाप शब्दसागरातून निवडक लखलखते मोती वेचून आणले किंवा साहित्याच्या विशाल आसमंतातून अविरत तळपणारे तेजोगोल निवडून काढले असली जडजंबाळ वाक्यरचना टाळून एवढंच सांगतो की एकापेक्षा एक भार्री सरस लेख गवसले. जगावेगळ्या माणसांवरचे महेंद्र कुलकर्णी आणि चंद्रशेखर आठवले यांचे झपाटून टाकणारे लेख असोत किंवा अम्माच्या खडतर जीवनप्रवासाच्या पुस्तकावरचा तन्वीचा लेख असो किंवा मग खैरेखेडीतल्या नागरी जीवन आणि सुधारणांपासून शेकडो योजने दूर असलेल्या लोकांच्या खडतर आयुष्याचं वर्णन करणारा सविताताईंचा लेख असो... वाचता वाचताच भारून टाकणार्‍या रोहनच्या सप्त शिवपदस्पर्शाच्या लेखमालेचा अखेरचा भाग असो की सत्तापिपासू अमेरिकेचा बुरखा फाडणार्‍या निर्भीड वेबसाईटविषयी माहिती देणारा विद्याधरचा लेख असो की एका लढवय्याच्या अखेरच्या प्रवासाची डोळे पाणावणारी सौरभची कहाणी असो.. चार रंगांना लघुकथांत गुंफणारी सुषमेयची लघुकथामाला असो वा नारीचं दुर्गेच्या विविध रूपांशी असलेलं साधर्म्य दाखवणारं जास्वंदीचं स्फुट असो किंवा मग लहान मुलं ज्यांच्या तालावर नाचतात त्या बडबडगीतांच्या मागची कांचनने सांगितलेली दुःखद कहाणी असो... किंवा मग रोजच्या धावपळीत ओठांचे कंस सुलटे करण्यास भाग पाडणारी अपर्णाची सॉफ्टवेअर कामगाराची हलकीफुलकी कहाणी असो किंवा धो धो हसून मुरकुंडी वळवणारी गुरुदत्तची मुंबई-पुणे सायकल ट्रीप असो... हे सगळं एकापेक्षा एक आहे.. विलक्षण आहे.. सरस आहे.. ऑस्सम आहे.. जबरा आहे.. लय भारी आहे.

हे सगळे माझे प्रचंड आवडते लेख आहेत या महिन्यातले. या सगळ्या लेखांचा आणि लेखकांचा मी निर्विवाद चाहता आहे. हे लोक तसेही लिहितातच मस्त पण सुदैवाने माझ्या टाळक्यावर संपादकपदाची टोपी असताना यांनी हे एवढे छान लेख लिहिणं आणि मला ते आपल्या या महिन्याच्या अंकात समाविष्ट करायला मिळणं हा माझा बहुमान आहे का ते माहित नाही किंवा माझं सदभाग्य आहे का याचीही कल्पना नाही पण हे लेख घेता आल्याने प्रचंड आनंद झाला, समाधान लाभलं एवढंच सांगतो.

आणि हो जाताजाता.. यात माझाही एक लेख आहे. पण यात खुर्चीचा, सत्तेचा, पदाचा गैरवापर वगैरे अजिबात काही नाही हो.. कारण हा खरंच माझा मला खूप आवडलेला लेख आहे.. आणि आता ही आत्मप्रौढी वगैरेही नाही. आपण मित्राला ट्रेकचे किंवा असेच कुठलेही फोटो दाखवताना म्हणतो ना की "हा बघ .. माझा हा फोटो एकदम मस्त आलाय.." तर त्याला कोणी आत्मप्रौढी/आत्मस्तुती म्हणेल का? नाही ना? तर हाही त्यातलाच प्रकार आहे..

"हा अंक वाचकांच्या हातात देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे" किंवा "हा आम्ही आमचा बहुमान समजतो" वाली टिपिकल वाक्य नसणारं, सलीलच्या नेहमीच्या स्वतःच्या शैलीत लिहिलेलं संपादकीय वाचायची सवय असलेल्या आणि त्यामुळेच हे असलं उथळ, पाचकळ संपादकीय (!!) वाचून उरलेला अंक न वाचण्याचं जवळजवळ नक्की केलेल्या बा वाचकांनो !!!!! असं प्लीज करू नका. असं केलंत तर तो या चतुरस्त्र लेखन करणार्‍या लेखकांवर, त्यांच्या लेखांवर आणि सगळ्यांत महत्वाचं सांगायचं तर तुम्हा स्वतःवर भलामोठा अन्याय ठरेल. 'शितावरून भाताची परीक्षा' वाले नियम सगळ्या ठिकाणी लावायचे नसतात हो. तेव्हा उलटा पानं, करा सुरुवात वाचायला आणि फडशा पाडा याही अंकाचा.

तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! दिवाळीच्या शुभेच्छा देऊन हे लांबलेलं संपादकीय संपवण्यापूर्वी एकच सांगतो. हा दिवाळी अंक नाही पण तरीही शुभेच्छा मात्र अस्सल बावनकशी आणि मनापासून आहेत.. त्या दिवाळीपर्यंत पुरवा.. कारण पुढच्या महिन्यातला दिवाळी अंक घेऊन येणारी संपादक व्यक्ती माझ्यापेक्षा चिक्कार सिनियर आहे. दर्जेदार लिहिणारी आहे. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट आत्तापासूनच पाहायला लागा.. चला भेटूच... अंकाच्या पानापानांत !!



---------------------------------------------------------------------------------------

आत्ताच प्रकाशित झालेल्या 'नेटभेट' च्या ऑक्टोबर इ-मासिकासाठी लिहिलेलं हे संपादकीय. संपूर्ण अंक इथे वाचता येईल.

Wednesday, October 27, 2010

वटवटीचं निकालपत्र

मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही..... आत्मचरित्र का लिहिलं जात असावं? आपण किती 'बेस्ट' आहोत आणि तमाम पब्लिकला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाही हा टाहो फोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिलं जातं.
-वपु. 

--------

माझ्या सगळ्या हुश्शार, स्कॉली ब्लॉगु-ब्लगिनींनी आपापल्या ब्लॉगचे पहिले वादि साधारण मार्च/एप्रिल/मेच्या सुमारास साजरे केले. केले म्हणजे ते तेव्हाच होते अर्थात.. मला वाटतं त्या सुमारास जवळपास दर चार दिवसाआड कुठल्या ना कुठल्या ब्लॉगच्या वादिच्या पोस्ट्स येत असायच्या. थोडक्यात हुश्शार पोरांचं सगळं मार्चमधे असतं हेच खरं (विचित्र अर्थ काढल्यास डोळे वटारून पाहण्यात येईल : इति मी नाही तर मार्चातले ब्लॉ-ब्ल) आणि ऑक्टोबरचा महिना हा खास राखीव असतो तो या अशा आमच्यासारख्या रिपीटर* (यात श्लेष आहे. का ते नंतर सांगेन) , बॅकबेंचर, लेटलतीफ** (यातही श्लेष आहे. तोही शेष श्लेषाबरोबरच सांगेन.) ब्लॉग (आणि ब्लॉगर) साठी. थोडक्यात या ऑक्टोबरी ब्लॉगचा प्रथमवार्षिक निकाल लावायची वेळ आलीये तर. हे घ्या निकालपत्रच देऊन टाकतो कसं.

===============================================

सत्यवानाच्या वटवटीचे प्रथमवार्षिक निकालपत्र 

कालावधी : २००९-१०

महिना : (अर्थातच) ऑक्टोबर

दिनांक : २३ (च्यायला गडबड झाली. वाचत रहा. कळेल पुढे)

पूर्ण नाव : सत्यवान वटवटे

पाडलेली एकूण बाडं : ११०

छळ सोसणारे वीर : १३८

स्वतःहून स्वतःच्या मेलबॉक्सात वटवटीचा धोंडा पाडून घेणारे महा-वीर : ६६

मिळालेल्या एकूण प्रतिक्रिया, मतं, ओव्या, शिव्या-शाप वगैरे : ३७९७

मुदलातले प्रतिसाद : ~१८९८

सत्यावानाने त्यावर उलट-टपाली चढवलेलं व्याज : ~१८९८

जोडलेले मित्रमैत्रिणी, सुहृद : भर्पूर

मिळालेलं समाधान : चिक्कार

रस्त्याचा नकाशा पक्षि रोडमॅप उर्फ भविष्यकालीन योजना : मब्लॉवि त्यांच्या यादीतून हा ब्लॉग काढून हाकलून देत नाहीत तोवर लिहीत राहणे. आणि नंतरही लिहीत राहणे आणि त्याच्या नंतर आणि त्याच्या नंतरच्या नंतरही लिहीत राहणे. (वचने किम् दरिद्रता.. हाणा च्यायला)

एकुणातली प्रगती : (अ)समाधानकारक

सुधारणेला वाव : कैच्याकै जाम प्रचंड भारी

===============================================

मागे एकदा कुठेतरी "कवीला कविता वाचून दाखवण्यापुर्वी त्याची पार्श्वभूमी, उद्देश वगैरे समजावून सांगावा लागला तर तो कवितेचा आणि तस्मात् कवीचा पराभव आहे" अशा अर्थाचं काहीतरी वाचलं होतं. तशाच प्रकारे श्लेषाचा दुसरा (आणि पहिलाही) अर्थ समजावून सांगण्यात कोणाचा पराभव वगैरे आहे का ते माहित नाही बुवा. पण जनकल्याणार्थ आम्ही दोन्ही अर्थ सांगण्याचे योजिले आहे.

* वाला श्लेष -
अर्थ १ : सगळ्या हुश्शार पोरापोरींच्या मार्च-मे मधल्या ब्लॉगांनंतर आमचा ऑक्टोबरात आलेला म्हणून रिपीटर.
अर्थ २ : आमच्या गेल्या मार्चमध्ये उघडलेल्या आणि काही महिन्यांतच अगदी गतप्राण नाही तरी निष्क्रीय झालेल्या विंग्रजी ब्लॉगनंतर आलेला हा मराठी ब्लॉग म्हणून रिपीटर.

** वाला श्लेष -
अर्थ १ : अर्थ थोडाफार मगाससारखाच अर्थ म्हणजे उशिरा आलेल्या शहाणपणाप्रमाणे उशिरा सुरु केलेला म्हणून लेटलतीफ.
अर्थ २ (हा अर्थ जाम महत्वाचा आहे. नीट लक्ष देऊन ऐका) : २३ ला झालेल्या वादिचा निकाल आमच्या २७ आणि तुमच्या २८ ला जाहीर केला म्हणून लेटलतीफ.

** च्या अर्थ क्र २ चं स्पष्टीकरण : अनेक कारणांमुळे मला ब्लॉगचा वादि २३ च्या ऐवजी २९ ला आहे असं उगाचंच वाटत होतं. हापिसातलं एक मोठं/महत्वाचं प्रोजेक्ट २९ ला संपणार होतं, माझ्या एका कलिगचा २९ हा शेवटचा दिवस होता (आहे) आणि ........ माझा ट्रेनचा पास २९ ला संपणार आहे. ट्रेनच्या पासाचा आणि वादि विसरण्याचा खरं तर अर्थाअर्थी किंवा सरळ लावता येण्याजोगा संबंध नाही. कदाचित हास्यास्पदच वाटेल ते. त्यामुळे तो उलगडूनच सांगावा लागेल. काये की रोज सकाळी आणि संध्याकाळी पास त्या मशीनवर दाखवून स्टेशनात आणि स्टेशनातून बाहेर येताजाताना त्या डिस्प्लेवर 'लास्ट डे २९ ऑक्टोबर' असं मोठ्या आकारात दिसतं. समहाऊ त्याचं हॅमरिंग झालं असावं (आठवा हास्यास्पद).. थोडक्यात चहुबाजूंनी २९ च्या मार्‍यात सापडल्याने मला तोच दिवस ब्लॉगचा वादिही वाटायला लागला. गोबेल्सनीती म्हणतात ती हीच असावी बहुतेक. तर आज आता दोन दिवसच उरलेत म्हणून काहीतरी खरडून टाकायला म्हणून बसलो आणि सहज बघितलं तर पहिल्या पोस्टवर असलेल्या २३ ऑक्टोबर २००९ ने माझी विकेटच काढली. खरं तर हिटविकेटच. (गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर २९ ऑक्टोबरला आली होती का हो?)

--------

परवा 'घर हरवलेली माणसं' वाचताना वपुंच्या या बाणेदार ओळी वाचून ब्लॉगच्या पहिल्या वादिच्या पोस्टीचं 'असं' आत्मचरित्र होऊ द्यायचं नाही किंवा कदाचित पोस्टच टाकायची नाही असंही मनात आलं होतं. पण वपुंनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं नसलं तरी अन्य कोणीतरी त्यांचं चरित्र लिहावं एवढे ते महान होतेच. पण आमच्या ब्लॉगची आत्मचरित्ररूपी प्रथम वादि-पोस्ट आम्ही लिहिली नाही तर ते कोणाला कळायचंही नाही त्यामुळे त्यातल्या त्यात हळू आवाजात हा 'टाहो' फोडायचा प्रयत्न केलाय. फार कर्कश नाही झालाय ना?

Thursday, October 21, 2010

बा धनांधांनो... !!

रात्रीचा प्रसाद, आरती वगैरे सगळं आवरून झाल्यावर विठू नुकताच आडवा पडला होता. दिवसभरातले निरनिराळे प्रसंग डोळ्यासमोर तरळून जात होते. रोजच्यासारखंच आजही गरीब, आगतिक, आशाळभूत, खचलेल्या, खंगलेल्या, प्रामाणिक, दांभिक, निर्लज्ज, कोडग्या, मिजासखोर अशा अनेक चेहर्‍यांची दर्शनं झाली होती. त्यातले किती खरे-किती खोटे, किती सच्चे-किती उगाच आलेले हे आपल्याला आजतरी ओळखता आलंय का हे त्याला नीटसं कळत नव्हतं. काहीच सांगता येत नाही या माणूसजातीचं. कधी कसे दिसतील, कसे वागतील, काय करतील कोणीच सांगू शकणार नाही. विचारांची गाडी घरंगळत घरंगळत आपल्या नेहमीच्या विषयांवर आलेली पाहून त्याला स्वतःशीच हसू आलं. अचानक दार वाजल्याचा आवाज आला. बंद झालेल्या देवळात आत्ता यावेळी कोण येणार याची कल्पना न आल्याने विठूने किंचित उठत "कोण आहे?" अशी हाळी दिली.

"मी बाबा" नेहमीचा परिचित असा धीरगंभीर पण किंचित थकलेला आवाज ऐकून विठूने पटकन दार उघडलं.

"अरे बाबा तू? ये रे आत ये.. आत्ता यावेळी कसा आलास?"

"जरा महत्वाचं बोलायचं होतं रे तुझ्याशी. बरेच दिवस विचार करत होतो. पण आज ती महत्वाची गोष्ट ऐकली आणि ठरवलं की आजच जायचं तुझ्याकडे. म्हणून उठलो आणि तडक आलो तर तू हा असा दरवाजातच प्रश्नांची सरबत्ती करतोयस"

"हा हा हा. चुकलो बाबा. ये आत ये. बस इथे निवांत."

पाणी वगैरे पिऊन थोडी तरतरी आल्यावर बाबा म्हणाला,

"कसा आहेस रे विठू?"

"मी मजेत रे. तू बोल. आणि उभा का आहेस अजून? बस की खाली.. हां आता इथे माझ्याकडे तुझ्या घरच्यासारखी सोन्याची सिंहासनं नाहीत बाबा. मी स्वतः विटेवर उभा राहणारा साधा दगडाचा देव. मी कुठून आणू सोन्याचं सिंहासन? पण म्हणून तू बसणारच नसशील तर मग राहिलं. उभा रहा बापडा. मी मात्र बसतो." विठू मिश्कीलपणे म्हणाला. तो मिश्किलपणा कळला नसल्याप्रमाणे किंवा कळून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्यागत बाबाच्या चेहर्‍यावर एक किंचित वेदना उमटली.

"अरे बाबा.. एवढा चौकोनी चेहरा करायला काय झालं? मी गंमत करत होतो." विठू.

"अरे हो. मी काही रागावलो बिगावलो नाहीये. पण खरं सांगायचं तर मला त्याविषयीच बोलायचं आहे तुझ्याशी."

"बोल ना काय झालं?"

"मला एक मदत हवीये तुझ्याकडून"

"मदत? माझ्याकडून? काय हवंय बोल."

"म्म्म्म.. थेटच विचारतो कसा."

"बोल ना"

"मला सांग तू तुझ्या भक्तांना बुद्धी कसा देतोस?"

"काय? म्हणजे? कसली बुद्धी?"

"हेच रे वागण्या-बोलण्याची वगैरे."

"ए बाबा. मला काही कळत नाहीये. काय ते स्पष्ट बोल ना जरा"

"तुला आठवतं मी शिर्डीत बसायचो ती शिळा?"

"हम्म. तिचं काय?"

"आज तीही गेली. तीही सोडली नाही या लोकांनी. तिलाही मढवली  सोन्याने. आणि आता सोन्याने मढवलीये म्हणून कडीकुलुपात बंदही करून टाकली. सोन्याचे दागदागिने झाले, हार झाले, मुकुट झाले, मेघडंबर्‍या झाल्या, सिंहासनं झाली, वस्तूंचे लिलाव झाले, प्रसादाच्या किंमती लावून झाल्या, रांगांसाठी देणग्या घेऊन झाल्या, माझ्या पूजेसाठी दहापट भावाने रकमा उकळून झाल्या, भक्तनिवासाचे भव्य प्रासाद उभारून झाले.. सगळ्यासगळ्याचं बाजारीकरण करून झालं रे. सगळ्याला किंमतींची लेबलं लावून झाली. आता माझ्या अंगावरच्या वस्तू संपल्या म्हणून मग आजूबाजूच्या गोष्टी यांच्या तावडीत सापडल्यात. आज ही शिळा मढवलीये सोन्याने उद्या तर मला वाटतं हे लोक मलाच पूर्ण सोन्यात मढवतील. मढवतील कशाला सोन्यातच घडवतील. सोन्याची मूर्ती, सोन्याचं सिंहासन आणि असंच सगळं सगळं सोन्याचं.. माझं नक्की त्या मिडास राजासारखं होणार आहे. दिसेल तिथे सोनं.. पण अर्थात मिडास राजाची ती अवस्था निदान त्याच्या कर्माने तरी झाली होती. पण माझी ही अवस्था मात्र माझ्या या स्वतःला माझा भक्त म्हणवून घेणार्‍या स्वघोषित भाविकांच्या आततायीपणामुळे, श्रीमंतीच्या आणि ती मांडण्याच्या फसव्या भ्रामक हव्यासापायी होणार आहे. घुसमटतो रे जीव. मी कधी काही मागितलंय का यांच्याकडे? मला सोन्याने मढवा, चांदीने सजवा असं कधीतरी सांगितलंय का? मी स्वतः एका साध्या कफनीवर आणि फाटक्या धोतरात राहणारा माणूस. आयुष्यात कधी सोन्याचांदीला शिवलो सुद्धा नाही. पण माझ्यामागे यांनी माझे धिंडवडे आरंभलेत रे."

विठू गहिवरला. बाबाला यावेळी इथवर आलेलं पाहिलं तेव्हाच असं काहीसं ऐकायला मिळणार याची खात्री होती तरीही गहिवरला. वाईट वाटलं त्याला. विषण्ण झाला तोही.

बाबा बोलतच होता. "आज तुझ्या गाभार्‍याबद्दलची बातमी  वाचली आणि कोण आनंद झाला. खूप अभिमान वाटला तुझा म्हणून म्हटलं प्रत्यक्ष भेटूनच विचारावं की तुझ्या भक्तांना बुद्धी देतोस तरी कसा? समजावतोस कसा त्यांना?"

विठू खिन्नपणे हसला.

"का हसलास रे?"

"काही नाही रे. तू विचारलास तोच प्रश्न विचारायला माझ्याकडे आत्तापर्यंत अनेकजण येऊन गेले. बालाजी, दगडू गणेश, सिद्धिविनायक आणि अजूनही अनेक स्नेही. त्या सगळ्यांना सांगितलं तेच तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. कोणाला बुद्धी बिद्धी देणारे आपण कोणी नाही. ज्याचं त्याला कळत असतं. पापं करा, काळे पैसे कमवा आणि मग ते असे सोन्यानाण्याच्या रुपात वाहा देवाच्या पायावर. काळ्या पैशाच्या झंझटी मिटल्या आणि पुन्हा ढीगभर पुण्य गाठीशी मारल्याचं फसवं का होईना समाधान. एक देतो म्हणून दुसरा, दुसरा देतो म्हणून तिसरा... म्हणून सातवा.... शंभरावा.... हजारावा.. पंचवीस लाखावा... चालूच सतत. अनादि कालापासून चालू आहे आणि अनंतापर्यंत चालू राहील.. आणि वर पुन्हा देवाने सांगितलं, दृष्टांत दिला, दर्शन दिलं, कौल लागला, नवसाला पावला असे आपल्याच नावाचे उलटे ढोल बडवायचे. हे आपण शिकवतो त्यांना? ही बुद्धी आपण देतो? अजिबात नाही.. मुळीच नाही.. सगळा खोटेपणा आहे रे. म्हणून म्हणतो बुद्धी बिद्धी देणारे आपण कोणी नाही रे. किंबहुना कोणीच कोणाला कसलीच बुद्धी वगैरे देऊ शकत नाही. ते त्यांच्या मनाप्रमाणे वागत असतात. तोंडी लावायला फक्त आपलं नाव. करायचं तेच करतात. किंबहुना करू नये तेच करतात."

बाबा अवाक होऊन ऐकत होता.

"तुला खरं सांगू? चूक त्यांची नाही चूक आपलीच. खूप मोठी चूक."

"आपली चूक? म्हणजे? मी नाही समजलो."

"हो आपलीच चूक. आपण त्यांच्या हृदयात नांदत होतो तोवर ठीक होतं. त्यांनी आपल्याला त्यांच्या हृदयातून काढून देव्हार्‍यात बसवलं, गाभार्‍यात स्थानापन्न केलं तेव्हाच आपण त्यांना रोखायला हवं होतं. आपल्यासमोर पहिला नारळ फोडला गेला, आपल्या अंगावर पहिलं वस्त्र चढवलं गेलं, पहिले अंगारे धुपारे केले गेले, समोरच्या पेटीत पहिला पैसा पडला किंबहुना ती पेटी तिथे ठेवली गेली त्या वेळीच, त्या प्रत्येक वेळी त्यांना तिथल्या तिथे रोखलं असतं, अडवलं असतं तर आज ही वेळ आली नसती. ही सारी फसव्या श्रीमंतीची, भ्रामक वैभवाची आरास रोजच्यारोज पाहायची आणि सगळं बाबाच्या/देवाच्या/महाराजांच्या इच्छेने, कृपेने चाललंय हे वर ऐकून घ्यायचं !! हूं .. तू मारे माझं अभिनंदन करायला आला आहेस पण तुला एक सांगतो बाबा.. आज माझा गाभारा सोन्याचा नाहीये म्हणून उद्याही तो नसेल याची मी खात्री देऊ शकत नाही रे. तू जात्यात आहेस आणि मी सुपात.. इतकाच काय तो फरक."

एक मोठ्ठा उसासा सोडून बाबा हताशपणे उठला.

"निघालास? कंटाळलास का रे माझ्या बडबडीला?"

"नाही रे. कंटाळलो नाही. कंटाळतोय कशाला.. तू खरं तेच बोलतोयस. पण तरीही मला आता गेलं पाहिजे. काकड आरतीची वेळ होत आली. गाभारा उघडायच्या आत आतमध्ये जाऊन बसलं पाहिजे. नेमका रस्त्याने चालत जाताना कोणाला दिसलो तर तो रस्ताही सोन्याने मढवून ठेवतील. म्हणून त्याच्या आत पोचलं पाहिजे रे... त्याच्या आत पोचलं पाहिजे."


*****

तळटीप : माफी मागत नाही कारण कुठल्याही देवाचा, देवळाचा, धर्माचा, देवस्थानाचा, भक्तांचा अपमान करण्याचा अजिबात उद्देश नाही. तसंच मी नास्तिकही नाही पण म्हणून स्वतःला आस्तिक म्हणवणारे करतात ते सगळंच योग्य आहे असं मानणाराही नाही त्यामुळे....... !

Thursday, October 7, 2010

'मुव्हमेंट' खतरे मे !!!!!

जनाब राहुलमियां गांधी,

अस्सलाम वालेकुम. यहावहा मुडेबिना सरळ मतलबकीच बात करतो. कालच्या अखबारमध्ये तुमचे खयालात वाचले. और हाय. बहोत बुरा लगा. बहोत बहोत बुरा लगा. दिल को ठेच पहुची. हम आपको अपना समझते थे. तुम्ही आमचेच होतात. आमच्यातलेच होतात. निदान आम्ही तरी असेच सोचत होतो. पर हाय. वो एक ख्वाबही था. एक सपना था. पण हे तुम्ही बोललात? "आरएसएस आणि सिमीमध्ये बिलकुल फर्क नाही" ही तुमची जबानी आहे? यकीन नाही होत क्षणभर. पण अखबारवाले म्हणतात म्हणजे सच असेल. पक्का सच असेल. जे काय असेल ते असो पर हम तो इतनाही कहेंगे के आपको 'मुव्हमेंट' समझीही नही. 'मुव्हमेंट' चे इरादे, 'पाक' खयालात कधी तुमच्यापर्यंत पोचलेच नाहीत. तुम्ही सिर्फ कहनेके लिये आमच्यात होतात, आमच्यातले होतात. पण या अल्लाह, तुम्हाला 'मुव्हमेंट' कधीच कळली नाही. काय हे? कळली नव्हती, समजली नव्हती, ध्यानमध्ये आली नव्हती तर निदान एक बार आम्हाला विचारायचंत तरी. एक दफा तो पुछा होता. 'मुव्हमेंट' ची महती तुम्हाला समजावून सांगायला आम्ही काहीही केलं असतं. कितीही वक्त जाया झाला असता तरी बेहत्तर. 'इस्लाम खतरे मे' असताना जिहादाचा लढा लढणारा, त्याचं महत्व सांगणारा इतका 'पाक' ग्रुप दुसरा कुठला ठाऊक आहे का तुम्हाला? क्या आप जानते भी है?? त्या अर्ध्या चड्डीवाल्या काफरांशी आमची तुलना? हो आता 'आमची' च म्हणणार. 'आपली' नाही म्हणणार. तुम्ही आता आमच्यातले राहिलाच नाहीत राहुलमियां.. आणि एवढं झाल्यावरही एका रिपोर्टरने तुमसे पुछा था के "आपको क्या वाकई असंच म्हणायचं आहे? 'मुव्हमेंट' वर बंदी आहे, काफरांच्या संघावर बंदी नही है. फिर भी वो एक कैसे?"... विचारलं होतं ना असं? पुछा था के नही? और आपने क्या कहा.. आपने कहा "मुझे उससे कोई लेना देना नही.".. या अल्लाह.. तुम्हाला लेना देना नसेल. पण तुम्ही गलत बोलता आहात आणि तुमच्या त्या म्हणण्यामुळे कौमच्या नजरेत, आमच्या कौमच्या नजरेत 'मुव्हमेंट'ची इमेज खराब होते आहे हे तुमच्या दिमागमध्ये तरी येतंय का? आणि त्यामुळेच तुम्हाला लेना-देना असलं-नसलं तरी आम्हाला लेना-देना आहे. आप गलत हो आणि तुमची गलती तुम्हाला स्पष्टपणे दाखवणं ये मेरा काम है. मेरा इमान है. मागे एकदा तुम्ही "हा हा क्यो नही? कोई भी मुसलमान शक्स प्रधानमंत्री बन सकता है, जरूर बन सकता है, हर्ज ही क्या है उसमे?" असं बोलून आमचं दिल जितलं होतंत. बाप, दादी, परदादा आणि त्याचा तो पंचेवाला मित्र या सगळ्यांप्रमाणे हा छोकरा पण आपलं आणि फक्त आपलंच भलं करणार इस बातका हमे यकीन हो गया. दिल खुश हो गया था. पर हमे क्या पता था के यही छोकरा एक दिन हमारी मुव्हमेंट को काफारोंके संघसे जोडेगा. आर एस एस शी आमची तुलना?? या अल्लाह. या खुदा. बडा ही बदतमीज लौंडा है ये. हमारा तो खून खौल रहा है. पर 'जो हुआ सो हुआ' असं म्हणून हम चूप नही रहेंगे. आणि त्यासाठीच खास हे खत लिहायला घेतलं. आम्ही म्हणजे संघ का नाही आणि संघ म्हणजे आम्ही का नाही आहोत याची एक भलीमोठी यादीच आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मुव्हमेंट म्हणजे आरएसएस नाही आणि आरएसएस म्हणजे मुव्हमेंट नाही क्योंके

१. मुव्हमेंट सिर्फ और सिर्फ इस्लामसाठी काम करते. (तुमच्या आरएसएसला इस्लाम आणि जिहाद म्हणजे काय ये मालूम भी है?)

२. मुव्हमेंटके लिये जिहादसे बडा और कुछ नही.

३. इंडियाके मुस्लीमोंको पश्चिमी दुनियाके चाकाचौंधसे बल्की इंडियासेभी दूर रखके सिर्फ इस्लाम और अल्लाह येही उनके मसिहा है ये खयालात उनके दिलोदिमागमे पैदा करना, इस्लामके तौरतरीकोंसे उन्हे वाकीफ करना और काफरोंके साये से भी उन्हे दूर रखना ये मुव्हमेंटका सबसे बडा एम है. (क्या आरएसएस ये कर सकता है?)

४. इंडियन सरकारने घाबरून जाऊन मुव्हमेंटवर बंदीही आणली होती.अर्थात कोर्टाच्या निर्णयाने घाबरून जाऊन वो उठानी भी पडी थी. (हा. आरएसएसभी तुम्हारी दादीने एक दफा बंद करवाया था लेकिन उसका मतलब ये तो नही की वो हमारे बराबरी के हो गए !!)

५. आमच्या मुव्हमेंटचं स्लोगन तुम्ही कधी वाचलं आहेत का? "Allah is our Lord, the Quran is our constitution, Mohammed is our leader, Jihad is our way". (तुमच्या त्या आरएसएसच्या संस्कृत की कुठल्याशा भाषेत लिहीलेल्या, इंडियाला खुदा मानणार्‍या गाण्यापेक्षा हे किती महान आहे पाहिलंत तरी का?)

६. मुव्हमेंट का ये मानना है के हुजूर-ए-आला लादेन साहेब हे इस्लामचं एक सबसे अहम उदाहरण आहेत. ते एक सच्चा मुसलमान आहेत आणि प्रत्येक मुसलमानाने वैसे बननेकी ठान लेनी चाहिये. (तुमच्या त्या केशव टोपीवाल्या किंवा माधव दाढीवाल्याला आमच्या लादेन साहेबांची सर कशी येणार?)

७. मुव्हमेंटमध्ये काम करणारे कित्येक जवान प्रत्यक्ष लादेनसाहेबांच्या कैदाच्या फौजमधले आहेत. (तुमच्या आरएसएस मध्ये कोणाची तरी इतकी लायकी आहे का?)

८. मुव्हमेंट नुसती बकबक करत नही. मुव्हमेंटचं कार्य और करिष्मा खूप मोठा आहे. २००६ के बंबई ब्लास्टस, २००८ के अहमदाबाद, जयपूर, दिल्ली ब्लास्ट्स या सगळ्यात मुव्हमेंटने दिखाई हुई हिम्मत काबिले तारीफ है. (क्या कमसकम एक ब्लास्ट करनेकी भी तुम्हारे आरएसएसकी औकाद है?)

९. आरएसएस काफरोंके लिए काम करते. इंडियाला देवी, भगवान काय काय मानते. हमने पहलेकी कहा है के मुव्हमेंट एक अल्लाह छोडके किसीको खुदा नही मानती.

१०. तुम्हारे आरएसएसने इंडिया के फ्रीडम फाईटमेभी हिस्सा लिया था. (मुव्हमेंट तो तब पैदाभी नही हुई थी.)

११. तुमची आरएसएस 'वसुधैव कुटुंबकम्' असलं काहीतरी मानते. (मुव्हमेंटचा असल्या फालतू गोष्टींवर अजिबात विश्वास नाही.)

पढा आपने? वाचलंत हे सारं? आता तरी झाली तसल्ली? जी भर गया? आता तरी तुम्हाला कळलं असेलचं की आरएसएस आणि मुव्हमेंट किती अलग आहेत एकमेकांपेक्षा. सिमीची सर संघाला कशी येणार? अर्थात आधी आम्ही चिडलो होतो. बहोत गुस्सा झालो होतो. खफा झालो होतो तुमच्यावर. पण आता तुम्हाला खत लिहून समजावल्यावर आमचा गुस्सा कमी झालाय. कारण कितीही झालं तरी तुम्ही अजून लहान आहात. बच्चे आहात. मिडियाने 'युवराज युवराज' म्हणून डोक्यावर बसवल्याने तुम्हालाही ते खरं वाटायला लागलं आहे. लोग आपके सामने झुकते है तब आप समजते है के वो राहुल के सामने झुकते है. पण ते राहुलसमोर नही तर राहुल 'गांधी' समोर झुकतात हे तुम्ही विसरताय. जाने दो. तुमच्या बालिशपणावर कसलं रागवायचं? तिकडे कसलं लक्ष द्यायचं? तुमची पार्टी आमच्यासाठी सगळं करते आहे, सगळं करेल. आम्हाला मॅडमवर पूर्ण यकीन आहे. तेव्हा तुम्ही तुमचं काम करत रहा बरं. उगाच काहीतरी छोट्या बच्चासारखं बडबडू नका. तुम्ही कुठल्या त्या दुष्काळग्रस्त, खुदकुशी करणार्‍या शेतकर्‍यांच्या घरातून जाऊन राहण्याची नाटकं करा, किंवा मग त्या शेतात काम करणार्‍या लोकांबरोबर कामं करण्याची नाटकं करा किंवा मग बंबईवर 'आम्ही' केलेल्या हल्ल्यात लढणारे कमांडोज कसे बिहारी होते ते तुमच्या भाषणात ठासून सांगा. तेवढंचं करा. जेवढं जमतंय तेवढं करावं. जो काम अपने बस मे नही उसमे क्यो टांग अडाते हो राहुल मियां? पछताओगे. और क्या कहना !!

आपला,
मीर मसूद मुल्ला मोहम्मद हकीम
प्रेसिडंट, स्टूडंटस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया

और एक बात : मियां अफझल गुरु साहिब और सरताज-ए-जिहाद कसाब के बारे मे अपनी जो बातचीत हुई थी उसे ना भुले. उन बातोंका और इस खत का कोई ताल्लुक नही. शुक्रिया !!!

Tuesday, October 5, 2010

(स)लाड

तिने हातातली पिशवी टेबलवर ठेवली. कडेला ठेवलेल्या टिश्यु पेपरच्या रोल मधून मोठा कागद फाडून घेऊन त्याने टेबल खसाखसा घासून पुसून स्वच्छ केलं. उकळत्या पाण्याने चमचे स्वच्छ धुतले. फ्रिज उघडलं. आतून तीन-चार मोठ्ठ्या पिशव्या काढल्या आणि टेबलवर ठेवल्या. एक पिशवी उघडून त्यातून लेटस (Lettuce) बाहेर काढून तो स्वच्छ धुतला आणि हळूहळू एकेक पान काढत उलगडत तो सोलला. त्याचे छान छोटे छोटे तुकडे केले आणि एका मोठ्या बोलमध्ये ठेवले. दुसर्‍या पिशवीतून ग्रेप टोमॅटो (छोटे टोमॅटो) काढले आणि ते डिशमध्ये ठेवले. ती डिश सरळ नळाखाली धरली आणि ग्रेप टोमॅटो व्यवस्थित धुतले. छोट्या चाकूने टोमॅटोचे छोटे तुकडे केले आणि तेही बोलमध्ये टाकले. तिसर्‍या पिशवीतून दोन मोठ्ठ्या काकड्या काढल्या, धुतल्या आणि हळूहळू अगदी काळजीपूर्वक पद्धतशीरपणे एकीची सालं काढली. त्यानंतर सालं काढलेल्या आणि न काढलेल्या अशा दोन्ही काकड्यांचे छोटे छोटे काप केले आणि तेही बोलमध्ये भरले. तिसर्‍या पिशवीतून अजून एक छोटी पिशवी काढली. त्या पिशवीतून थोडे मक्याचे दाणे बाहेर काढले. धुवून त्यांची रवानगीही बोलमध्ये करण्यात आली. त्यानंतर थोडा पालक घेऊन त्याची पानं तोडून, धुवून तो आधीच्या गोष्टींबरोबर मिक्स केला गेला. त्यानंतर पहिल्या पिशवीतून 'सेलेरी' नामक एक पालेभाजी (जिचं नाव सेलेरी आहे हे आत्ता मला गुगलमहाराजांच्या कृपेने समजलं) काढली. तिची पानं आणि देठ स्वच्छ धुवून, देठाचे तुकडे करून ते दोन्ही बोलच्या मिश्रणात मिक्स केले. त्यानंतर पुन्हा फ्रिज उघडून अजून एक पिशवी बाहेर काढली. त्यातून ब्रोकोली (आपल्या फ्लॉवरची सावत्र बहिण) आणि छोटी गाजरं (बेबी कॅरट्स) बाहेर काढली आणि धुवून आणि कापून झाल्यावर त्यांचीही रवानगी बोलमध्ये करण्यात आली. त्यानंतर कुठलीतरी एक पिशवी (कितवी ते आठवत नाही) उघडली जाऊन त्यातून तीन-चार छोट्या बाटल्या बाहेर काढल्या. त्यातली 'इटालियन ड्रेसिंग' नामक बाटली उघडून त्यातले काही थेंब त्या बोलमधल्या मिश्रणावर उडवले. 'व्हिनेगर', 'फ्रेश लेमन ज्यूस', 'ऑलिव्ह ऑईल' असं काय काय लिहिलेल्या अनेक बाटल्याही त्या पिशवीतून बाहेर पडल्या आणि थेंबाथेंबांचं दान बोलमधल्या मिश्रणाला देत्या झाल्या. त्यानंतर तिने ते मिश्रण सगळं नीट मिक्स झालं आहे अशी खात्री होईपर्यंत चांगलं ढवळलं.

----

मी डबा उघडला, मायक्रोवेव्ह उघडला, त्याच्यावर एक मिनिट सेट करून, बाजूच्या वॉटर कुलर मधून थंड पाण्याची बाटली भरून घेतली. एका मिनिटानंतर मायक्रोवेव्ह उघडून डबा बाहेर काढला. अकराव्या मिनिटाला डबा बंद झाला होता. बाराव्या मिनिटाला पाणी पिऊन कॅफेटेरियामधून बाहेर पडून अर्ध्या मिनिटात मी जणु मध्ये काहीही न घडल्याप्रमाणे पुन्हा माझ्या डेस्कवर होतो.

----

ही कंपनी जॉईन करताना लंच टाईम एक तास कंपल्सरी आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.... आज ते स-'लाड' बघून त्या नियमामागची अपरिहार्यता कळली ;)

Saturday, October 2, 2010

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ४

'माझे खादाडीचे प्रयोग : भाग १' इथे  वाचा
'माझे खादाडीचे प्रयोग : भाग २' इथे  वाचा
'माझे खादाडीचे प्रयोग : भाग ३' इथे  वाचा

हल्ली हा माणूस ब्लॉगची जाहिरात करण्यासाठी स्वतःच्याच जुन्या पोस्ट्सचे दुवे देत असतो असा विचार करणार्‍यांनी ही पोस्ट इथपासून वाचावी आणि असा विचार न करणार्‍यांनी वाचन चालू ठेवण्यास हरकत नाय.

पूर्वसूचना किंवा वैधानिक इशारा किंवा 'डिस्को ला लेमन' लावतात ते कायतरी (पाकिटावरचा वैधानिक इशारा वाचता वाचता लोकं त्याच्यावरच धूर सोडतात तसा हा इशारा वाचूनही तुम्ही त्याच्याकडे धूर सोडलात आपलं दुर्लक्ष केलंत तर ......... काय होईल ते मग सांगतो) :

१. ही कुठलीही कथा नाही
२. तसेच ही कुठलीही लेखमाला, स्तंभ, दीर्घकथा, कादंबरी वगैरे वगैरे काहीही नाही.
३. (त्यामुळेच) 'भाग १' चा 'भाग २' शी काहीही संबंध नाही. तसेच 'भाग २' चा 'भाग ३' शी काहीही संबंध नाही आणि अर्थातच 'भाग ३' चा 'भाग ४' शी पक्षि या भागाशी काहीही संबंध नाही.
४. (अजून एक....) 'भाग २' चा 'भाग ४' शी तसेच 'भाग ३' चा 'भाग ४' शी व यांचा कोणाचाही उलट्या क्रमाने कोणाशीही कसलाही काहीहीहीहीहीहीही संबंध नाही.

"वुई नॉक्ड ऑन नेहाज विंडो युजिंग सम पेबल्स फ्रॉम द रूफ. नथिंग हॅपन्ड अ‍ॅट द फर्स्ट पेबल, नथिंग ऑन द सेकंड अँड थर्ड" हे भगतच्या एफपीएस मधल्या माझ्या अनेक आवडत्या भारीभारी वाक्यांपैकी एक वाक्य. त्याच्या सदृश एखादं वाक्य मला कधीपासून एखाद्या पोस्टीत वापरायचं होतं.. अनायासे संधी चालून आली म्हणून वापरून टाकलं. ठांकतू चेतू... हे 'उप-डिस्को-लेमन' हे अट क्र ३ आणि क्र ४ यांच्यासाठी होते हे ज्यांच्या लक्षात आले नसेल त्यांनी 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचण्याचे ताबडतोबीने करावे. (अर्थात ही पोस्ट वाचून झाल्यानंतर)

असो. तर या चारी पोस्टींचा एकमेकींशी असलेला संबंध आला लक्षात? थांबा.. अजून सोपं करून सांगतो. 'एमबीबीएस' आणि 'लगे रहो' मध्ये मुन्नाभाई (आणि हो सर्किटही) सोडून सामाईक काय आहे? काहीही नाही ना? तसंच या सर्व भागांमध्ये खादाडी सोडून अन्य काहीही सामाईक नाही. आलं लक्षात? हुश्श [टण्ण : जीव भांड्यात पडल्याचा आवाज. (वाचकांचा) ] .. ('चित्रपटांचे जनमानसावर होणारे दुरगामी परिणाम' या विषयावर लवकरच एक प्रबंध लिहिण्याचे चित्ती वसते आहे.)

ही पोस्ट कशाबद्दल होती बरं? अरे हो आठवलं आठवलं. खादाडीचे प्रयोग नाही का.... सूचना जरा जास्तच लांबल्या खर्‍या.. पण पोस्टीपेक्षा प्रस्तावना जड असं होतं कधीकधी (????).. तुम्हाला तर सवय आहेच. असो.

खाली एक महत्वाचा व उपयुक्त फोटू दिला आहे. परंतु पूर्ण पोस्ट वाचून झाल्याशिवाय तो फोटू बघू नये. जे वाचक ही आज्ञा धुडकावतील त्यांच्या

१. प्लेटमधल्या लाडवांची शंभर शकलं होऊन त्यांच्याच प्लेट मध्ये लोळत पडतील.
२. मॅगीवडे तळले जाणार नाहीत.
३. नान-पिझ्झा खाणे नशिबी येईल
४. चिवड्याचे पोहे मऊ होतील, दाणे खवट निघतील (या शापांवर विश्वास नसणार्‍यांनी चिवड्याची आपलं विषाची परीक्षा घेऊन बघाच.)

चला तर मग.. करुया आजच्या खादाडीची सुरुवात. पण आजची खादाडी ही नेहमीच्या खादाड्यांपेक्षा वेगळी आहे. बरीच वेगळी आहे. सगळ्या खादाडी ब्लॉग्ज आणि पुस्तकांमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या एका विषयावर आपली आजची खादाडी पोस्ट आहे. म्हणजे तिखट/गोड जेवण, पंचपक्वान्नं, नाश्त्याचे पदार्थ, ब्रेडचे प्रकार, भाताचे प्रकार, पराठ्यांचे प्रकार, उपमा, पोहे, लाडू, मोदक, पंजाबी डिशेस, पिझ्झा, पुलाव, बिर्याणी किंवा अगदी वरणभात (हो. एका साईटवर मी हे ही बघितलं आहे.) या पदार्थांच्या यादीत न बसणारा आणि या गर्दीत कव्हर न होणारा एक पदार्थाचा प्रकार आहे जो मलातरी नियमित लागतो आणि ही पोस्ट वाचणार्‍या माझ्यासारख्याच (अधाशी) वाचकांनाही तो लागतोच लागतो हे ही मला नक्की माहित आहे. कारण आपल्यापैकी कोणीच (कितीही ठरवलं आणि कितीही कंट्रोल केला तरी) नाश्ता, जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण एवढ्या (च) 'चौफेर' आहारात स्वतःला सीमित ठेवू शकत नाही. या चौफेर्‍यांच्या मधल्या चार फेर्‍यांचं काय? त्याचा कोणीच म्हणजे कोणीच विचार करत नाही. मग तो अगदी संजू असो कि कमलाबाई असोत ;) (ह. घे.) .. तर आजच्या पोस्टच्या खादाडी प्रकाराचं नाव आहे 'अधल्यामधल्या वेळेत तोंडात टाकायचे पदार्थ' .. अहा .. बघा, अधल्या मधल्या वेळचा पदार्थ आहे पण नाव कसं भरभक्कम.. भारी एकदम.. एकदम मूर्ती लहान पण कीर्ती महान. पण घाबरू नका. एवढं भलंमोठं नाव असलेला पदार्थ बनवणं अगदी सोप्पं आहे. एकदमच सोप्पं. तर आजचा पदार्थ आहे........ बोर्नव्हिटा-साखर.

बोर्नव्हिटा-साखर :

१. एक वाटी घ्या.

२. एक चमचा घ्या

३. हात वर करून वरच्या खणाच्या कोपर्‍यात ठेवलेली बोर्नव्हिटाची बरणी खाली काढा. बोर्नव्हिटा वर ठेवलेला नसल्यास हात वर करण्याची आवश्यकता नाही. तसाच काढा. ही डिश अधिक चवदार बनवायची असेल तर हीच बरणी गुपचूप काढल्यासारखा अभिनय करा. आपल्याकडे विचित्र नजरेने बघणार्‍या आजूबाजूच्या (असल्यास) 'बायको' किंवा (नसल्यास) अन्य कोणीही यांना अनुल्लेखाने मारा.

४. एक भलामोठा, रांगड्या गड्याला शोभेसा (स्त्रीवाचकांनी इथे 'रणरागिणीला' असे वाचावे) टेबलस्पून घेऊन तो बोर्नव्हिटाच्या बाटलीत बुडवा आणि खसकन वर काढा.

५. चमच्यावर स्फिंक्सच्या पिरॅमिडाला लाजवेल असा आकार तयार होत नाही तंवर चौथी पायरी चढत रहा.

६. तो सुबक आकार क्र. १ च्या वाटीत (म्हणजे क्र. १ च्या पायरीत सांगितलेल्या वाटीत.) ओता. हा कंस खरं तर "क्र. १ ची वाटी? म्हणजे? आणि क्र. २ ची वाटी कुठली मग?" वगैरे असे प्रश्न विचारणार्‍या वाचकांसाठी होता पण हे स्पष्टीकरण टाकायला कंसाच्या आधी जागा नसल्याने ते इथेच टाकलं आहे आणि त्यामुळे हे प्रश्न न विचारणार्‍या वाचकांनाही तो दुर्दैवाने वाचावा लागला. (आमच्यात इतरांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची पद्धत नाही याची कृ नों घे.)

७. आता क्र. ३ मधल्या बोर्नव्हिटाच्या बरणीप्रमाणेच साखरेची बरणी काढा, आवश्यकता असेल तरच हात वर करा, अभिनय करा, अनुल्लेखाने मारा वगैरे वगैरे सगळं शेम टू शेम.

८. पुन्हा क्र. १ च्या वाटीत (यावेळी स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही याची खात्री आहे. तरीही हवं असेल तर पायरी क्र. ६, कंस क्र. १ पहा.) चवीपुरती साखर घाला. बेचवीपुरती घातलीत तर अजून चांगलं.

९. वाटीतलं मिश्रण किंचित ढवळल्यासारखं करून एक चमचाभर तोंडात घाला.

१०. एक हात पोटावर फिरवत तोंडाने 'अम्हहहहहह' असा तृप्तीचा (म्हणजे स्वतःचाच हो. नाहीतर उगाच मिमिक्र्या करत बसाल.) आवाज काढा. क्र. ५ आणि क्र. ८ मधले स्फिंक्सचे आकार जितक्या प्रमाणात लहान असतात तितक्या प्रमाणात हे 'अम्हहहहहह' वाले तृप्तीचे (स्वतःचे) आवाज लहान येतात हा स्वानुभव आहे. तेव्हा चांगल्या आवाजासाठी क्र. ५ आणि क्र. ८ चा चांगला सराव करा. ही डिश (पक्षि वाटी) दिसते तेवढी, वाटते तेवढी सोपी नाही त्यामुळे सगळ्याच पायर्‍यांचा जेवढा अधिक सराव कराल तेवढेच अधिकाधिक समाधान पावाल !!!!


अर्थात हे मिश्रण गार दुधातून घेतल्यासही असेच स्वर्गसुख लाभते हा ही स्वानुभव आहे. त्याची रेसिपी देण्याचेही मनात होतेच परंतु ती विषयाशी प्रतारणा ठरेल. कारण आपला आजचा विषय हा खादाडी आहे परंतु 'कोल्ड बोर्नव्हिटा' हा पिदाडी विभागात येत असल्याने ते 'आउट ऑफ सिल्याबस' आहे. त्यामुळे ती रेसिपी आज इथे देऊ शकत नाही. पायरी क्र. ६ मधील कंस क्र. २ इथे लागू होतो हे विसरू नये.

एक काम करुया. 'पिदाडीच्या प्रयोगां' वरच्या पुढच्या एखाद्या पोस्टीत 'कोल्ड बोर्नव्हिटा' कव्हर करू. मात्र तोवर वाचकांनी स्वतः प्रयोग करून बघावेत असे आम्ही मुळीच सुचवणार नाही. कारण पुरेशा मार्गदर्शनाअभावी 'कोल्ड बोर्नव्हिटा' चा 'लोल बोर्नव्हिटा' झाल्यास गुर्जी जवाबदार नाहीत याची समस्त 'उतावीळ एकलव्यांनी' नोंद घ्यावी.

Friday, October 1, 2010

कंपोस्ट : १

कधीकधी उगाच लांबलचक, मोठमोठ्या पोस्ट्समुळे फार 'कं' यायला लागतो ....... वाचणार्‍याला...... अर्थात लिहिणारा माझ्यासारखा असेल तर मग हमखासच. अर्थात माझा मलाही 'कं' येतोच लिहिताना.. पण तरीही कधी कधी सगळं तपशीलवार लिहिल्याशिवाय विषय पोचत नाही, पोस्ट चांगली होत नाही. याच्या उलट कित्येकदा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांचा एका स्वतंत्र पोस्टएवढा काही जीव नसतो. पण त्यावर लिहावसं तर वाटत असतं. अर्थात असं करता करता त्या डोक्यातून निघून जातात. त्यामुळे आजपासून मी एक नवीन प्रयोग सुरु करतोय. छोट्या पोस्ट लिहिण्याचा.. (नियमित नाही हो.. कधीकधी, अधून मधूनच किंवा प्रसंगाच्या मागणीनुसार ;) .. एवढेही सुदैवी नाही आहात तुम्ही लोक)

तर या छोट्या पोस्ट म्हणजे छोटी गोष्ट तपशीलात मोठी करून लिहिण्याचा कंटाळा आलेल्या पोस्ट म्हणून कंपोस्ट... 'कं'पोस्ट .. अर्थात या कंपोस्टीतही श्लेष आहे. म्हणजे वरिजनल वाला श्लेष नव्हे पण त्याच अर्थाचा काहीसा. या कंपोस्टी अगदी छोट्या तर असतीलच पण त्या (माझा) 'कं' या विषयाला पूर्णतः वाहिलेल्या असतील. थोडक्यात कं वरच्या छोट्या पोस्टी म्हणजे कंपोस्टी... छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला कसा कं येतो आणि (जमल्यास) त्या छोट्या गोष्टी अजून सोप्या करण्यासाठी सांगितलेली छोटीशीच पोस्ट... तर या कंपोस्ट सिरीजमधलं आजचं हे पाहिलं पुष्प (आयला काय भारी वाटतं असं म्हटलं की)

ब्लॉगपोस्टवर प्रतिक्रिया देताना व्हेरिफिकेशन वर्ड इनेबल केलेल्या समस्त ब्लॉगरांची क्षमा मागून सांगतो की मला हा प्रकार बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नाही. वैताग येतो नुसता. छान लेख वाचून झाल्यावर मस्त प्रतिक्रिया द्यावी तर हे गुगलबाबा चष्म्याच्या दुकानात जाऊन डोळ्यांची चाचणी केल्याच्या थाटात चित्रविचित्र अक्षरं (न् कधी कधी आकडेही) वेड्यावाकड्या आकारात समोर आणतात आणि म्हणतात "वाचून दाखव बरं हे आणि पुन्हा लिही हेच खाली"... आणि ३-४ अक्षरी शब्द असेल तर गुगलचा शेअर जणु १०० डॉलरांनी खाली येत असल्याच्या आवेशात ते शब्दही चांगले ७-८ अक्षरी असतात. सुरुवातीला प्रामाणिकपणे मन लावून मी अख्खा शब्द टाकायचो. कारण तोवर 'कं' ने टंकण्याचा (ही) ताबा घेतलेला नव्हता. पण होता होता हे वाढायला लागलं. गुग्ल्याचे मोठमोठे शब्द आणि ते आम्ही मन लावून कॉपी करणं हे प्रकार चालूच राहिले.. आणि आणि आणि तो आलाच. "तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं" च्या थाटात एके दिनी 'कं' ने सगळी सूत्र हातात घेऊन माझ्या डोक्यात एक भुंगा सोडून दिला. तुम्हालाही सांगतो. पण "उतू नाका, मातू नाका, पूर्ण व्हेरिफिकेशन वर्ड (कधीही) टाकू नका."

तर गुग्ल्याने असा मोठा व्हेरिफिकेशन वर्ड दिला ना की सरळ डोळे मिटून ए बी सी किंवा ए ए ए किंवा १ २ ३ असं कायपण लिहून टाकायचं. गुग्ल्या गंडतो.. त्याला वाटतं आपल्याला नीट कळला नाही शब्द. आणि त्यामुळे मग तो एकदम सोपा शब्द देतो. म्हणजे आधीचा आठ अक्षरी असेल तर पुढचा थेट चार अक्षरी. अगदी आपली कीव केल्यासारखी. पण ठीक्के कीव करायची तर कर विश्वविजयी 'कं' जिंकतो हे सत्य कसं नाकारशील?

झाली आमची गोष्ट
आली पहिली कंपोस्ट

किंवा


उपाय सारे सरून जाती नेहमीच जिंकतो कंटाळा
विषय बापुडे मरून जाती सदैव विजयी कंटाळा
हुरूप हरतो, हर्ष थरथरतो दिग्विजयी योद्धा कंटाळा
उर्जा पतते, जिव्हा ढळते रामबाण, ब्रह्मास्त्र कंटाळा

-- आद्य 'कं' पोस्टीकडून साभार

तटी : या प्रथम कंपोस्टीत ओळखीपायी दोन परिच्छेद वाया गेले. पण पुढची कंपोस्ट ही नक्की या कंपोस्टीच्या निम्मी असेल.... अगदी नक्की... कं शप्पत !!!

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...