Wednesday, March 2, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-७ -- अंतिम

* हा सातवा अर्थात अंतिम भाग वाचण्यापूर्वी सहावा  भाग वाचला आहेत याची खात्री करून घ्या. पाचव्या भागानंतर सहावा आणि सातवा दोन्ही लागोपाठ टाकलेत म्हणून सांगतोय.

भाग १ इथे  वाचा
भाग २ इथे  वाचा
भाग ३ इथे  वाचा
भाग ४ इथे  वाचा
भाग ५ इथे  वाचा
भाग ६ इथे  वाचा

त्या खिडकीच्या बाहेर 'नेरळ जंक्शन' असा ठसठशीत मोठ्या अक्षरात लिहिलेला रेल्वेचा बोर्ड दिसत होता आणि बाजूलाच नेरळ स्टेशनचे ऐसपैस लांब प्लॅटफॉर्म पसरले होते. आमच्या खिडकीपासून ते स्टेशन जेमतेम चार-पाचशे मीटर (होहो.. म्हणजे आम्ही जाळलेल्या (!!!) दुर्मिळ (!!!) गवताच्या सो कॉल्ड क्षेत्रफळाच्या जेमतेम चार-पाचपट) अंतरावर होतं. म्हणजे आम्ही आमची सुटका करायला येणार्‍या ट्रेनरूपी वैकुंठ विमानापासून जेमतेम अर्ध्या किलोमीटर अंतरावर होतो. त्या कल्पनेनेही इतकं हायसं वाटलं म्हणून सांगू !! अजून पंधरा मिनिटांत आम्ही ट्रेनमध्ये असणार होतो अर्थात हा जंगल्या आमची ट्रेन चुकू देणार नाही हे गृहीतक सत्य मानलं तर..

"हे बघा. इकडून आपल्याला इथे येणारी प्रत्येक गाडी आधीच दिसते. त्यामुळे तुमची ट्रेन चुकणार नाही हे नक्की."

खरं तर त्याच्या त्या वाक्याचा, त्या खिडकीचा आणि आमची ट्रेन मिळण्या-न मिळण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. पण कदाचित तो ते फॉर्म येईपर्यंत असाच काहीतरी वेळ काढत असावा. आणि अर्थातच एवढ्या जवळ स्टेशन बघून आमच्या मनाला एक उभारी मिळाली होती हे मात्र नक्की.

पुढच्या दहा मिनिटांनी दोन गोष्टी झाल्या.. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा तो माणूस फॉर्म घेऊन आला. तो आल्या आल्या लगेच ते फॉर्म त्याच्याकडून अक्षरशः हिसकावून घेऊन भरून टाकावेत आणि इथून सुटावं असा विचार मनात आला होता. पण त्या माणसाने आपल्या साहेबाच्या स्टायलीतच हळूहळू एकेक करत ते फॉर्म्स त्याच्या सायबाला दिले. साहेब एकेक फॉर्म काळजीपूर्वक भरायला लागला.

एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपण जे काम हातात घेतो ते तडीला जातं, हात लावू त्या गोष्टीचं सोनं होतं, प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. पण काही दिवस असेही असतात की त्या दिवशी प्रत्येक गोष्टीचा विचका होतो, हात लावू त्या कामाची माती होते.. आमचा हा दिवस त्यातलाच होता.

दुसरी गोष्ट अशी झाली की त्या हरकाम्याच्या मागोमाग आम्हाला ट्रेनचा मोठा हॉर्न ऐकू आला आणि त्यामागोमाग ट्रेनच्या हेडलाईटने ती खिडकी उजळून निघाली. आल्यानंतर अक्षरशः दोन मिनिटांत ट्रेनने स्टेशन सोडलं आणि त्याबरोबरच आजच्या दिवसात घरी जाऊन, मस्त गरम पाण्याने शेकत शेकत आंघोळी करून, आईच्या हातचं गरम गरम जेवून, पांघरुणात गुडुप्प होऊन, दुसर्‍या दिवशी दुपारी बाराशिवाय न उठण्याच्या आमच्या साध्या-सोप्या स्वप्नाची राखरांगोळी झाली.

"हं.. इथे करा सह्या" असं म्हणून त्याने पॅडला लावलेले फॉर्म्स आणि पेन आमच्या दिशेने सरकवलं. एका पेनाने किंवा पॅडला असलेल्या त्या स्प्रिंगने एखाद्या माणसाला जास्तीत जास्त किती जखमी करता येऊ शकतं असे आसुरी विचार मनात डोकावून गेले. आणि त्यासाठी कुठलीही शिक्षा भोगण्याची आमची तयारी होती. निदान न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्यापेक्षा ते शतपटीने चांगलं होतं. अर्थात आम्ही काही न बोलता अर्धवट बघत/वाचत त्या फॉर्म्सवर सह्या केल्या आणि काही न बोलता तिथून उठून बाहेर पडायला लागलो.

"तुमचं नशीब म्हणून आज तुम्हाला सोडतोय. पण पुढच्या वेळी सांभाळून राहा. दरवेळी माझ्यासारखा चांगला माणूस तुम्हाला भेटेलच असं नाही" असा शेरा आमच्या पाठीवर पडला. आता मात्र काय व्हायचं ते होवो. पुढच्या ट्रेनला म्हणजे पहाटेच्या पहिल्या ट्रेनला निदान ४-५ तास तरी होतेच. तोवर याची चांगली कणिक तिंबायचीच. आपलं काय व्हायचं ते होवो. असे अविचार मनात मुळ धरायला लागले. पण पुन्हा एकदा संयम राखून आम्ही तिथून बाहेर पडलो. काही क्षणांपूर्वी फक्त अर्धा किलोमीटर वाटणारं ते अंतर आता पा-च-शे मीटर वाटायला लागलं होतं. कोणाच्याही अंगात आता काडीचाही उत्साह राहिला नव्हता. कसेबसे धडपडत, पाय खेचत आम्ही स्टेशनपर्यंत पोचलो. किती वेळ लागला, किती वाजलेत कशाकशाची आम्हाला पर्वा नव्हती.

तेवढ्यात स्टेशनच्या जवळच 'पीसीओ' असं लिहिलेला एक मोठ्ठा बोर्ड दिसला आणि अचानक आम्हाला किती उशिरा झालाय, घरचे कसे आपली वाट बघत असतील, काळजीने बेजार झाले असतील वगैरे वस्तुस्थितीचा साक्षात्कार झाला. सगळ्यांनी फोन करायला जाण्यापेक्षा कोणीतरी एकानेच घरी फोन करायचा आणि त्यांच्याकडे सगळ्यांचे नंबर्स देऊन त्यांना पुढे सगळ्यांच्या घरी फोन करायला सांगायचे असा एक अतिशय विचित्र निर्णय आम्ही घेतला. आधीच्या प्रत्येक चुकीच्या (बरोबर निर्णय जवळपास नगण्य होते) निर्णयाप्रमाणेच हाही निर्णय आम्ही का घेतला याचं कुठलंही स्पष्टीकरण माझ्याकडे नाही.. कदाचित हा निर्णय पूर्णतः चुकीचा नसेलही पण माझ्यापुरता तरी तो पूर्णतः चुकला. कारण आमच्या घरी तेव्हा फोन नव्हता आणि मी आमच्या शेजारच्यांचा नंबर दिला होता. त्यांचा फोन लागला नाही किंवा त्यांना मेसेज मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्या घरीही मला यायला उशीर होतोय वगैरे काहीही निरोप मिळाला नाही. (अर्थात हे सगळं मला नंतर कळलं)

स्टेशनमध्ये शिरल्याशिरल्या आम्ही प्लॅटफॉर्मवर असलेल्या टाईमटेबलमध्ये पुढची गाडी बघितली. चुकली ती खरोखर शेवटची गाडी होती की अजून एखादी गाडी नंतर आहे अशी वेडी आशाही त्यात होतीच. पण रेल्वेला आमच्या शहाण्या/वेड्या आशेशी काही घेण-देणं नव्हतं. चुकली ती ट्रेन शेवटचीच होती आणि पुढची ट्रेन पहाटे सव्वाचारला होती. थोडक्यात आम्हाला कमीतकमी चार तास तरी या थंडीत कुडकुडत काढायचे होते. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरच्या दिसेल त्या जागेवर आम्ही बसलो आणि सॅक उशाशी घेऊन पसरलो. जरा वेळ झोप लागलीही पण भरपूर डास आणि प्रचंड थंडी यामुळे खूप त्रास होत होता. अखेरीस झोपण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्यावर आम्ही तसेच आडवे पडून, बसून गप्पा आणि डास मारत वेळ काढायला लागलो. डोंबिवली स्टेशनवर असणार्‍या रात्रभर चालणाया चहाच्या टपरीसारखी टपरी इतर कुठेही नसते या इतर वेळी अभिमानाने मिरवण्याच्या गोष्टीचं निदान त्यावेळी तरी आम्हाला चांगलंच दुःख झालं.

काही किलो गप्पा आणि अंदाजे सहा डझन डास मारायला चार तास लागत असावेत. कारण तेवढं होईस्तोवर आम्हाला ट्रेनचा प्रखर हेडलाईट आणि त्याच्या मागोमाग आमचा त्याक्षणीचा सगळ्यात आवडता आवाज म्हणजे ट्रेनचा भोंगा ऐकू आला. गाडी थांबताक्षणी आम्ही आत शिरलो आणि मिळेल त्या ठिकाणी लवंडलो. थंडगार वार्‍यात तासभर चांगली गाढ झोप लागली. तासाभराने 'डोंबिवली' असा बोर्ड दिसल्यावर आमचा क्षणभर विश्वासच बसेना. पण ते खरं होतं.

उतरल्यावर पटापटा फायनल टाटा-बाय करून आम्ही सगळे दोन ग्रुपमध्ये स्टेशनच्या दोन दिशांना पांगलो. चालत जात जात स्टेशनच्या एका टोकाला आल्यावर बाहेर पडणार एवढ्यात समोर उभ्या असलेल्या एका माणसाने आम्हाला अडवलं. तो कोण आहे वगैरे क्षणभर आम्हाला कळलंही नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा अशक्य संताप झाला........................

आता यापुढे मी जे लिहिणार आहे ते म्हणजे निव्वळ फेकाफेकी किंवा शेवटचा प्रसंग उगाच अजून चढवून चढवून सांगण्यासाठी केलेली योजना वाटण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तुमच्या जागी मी असतो तर मलाही असंच काहीसं वाटलं असतं. म्हणून मुद्दाम स्पष्टीकरण देऊन सांगतोय की जे घडलं ते अगदी असंच घडलं होतं................

सोमवारचे पहाटेचे साडेपाच वाजलेले आणि हा काळा डगला घातलेला माणूस त्या निर्मनुष्य प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला उभा राहून आमच्याकडे तिकीट मागत होता. त्याच्या तोंडावर तिकीट मारून तिथून ताबडतोब बाहेर पडावं म्हणून आम्ही खिशात हात घातला आणि चर्र झालं, बॅगा तपासल्या आणि ठार मेलो. काल पहाटे (म्हणजे बरोबर चोवीस तासांपूर्वी) ज्याने आमची सगळ्यांची तिकिटं काढली होती ती तिकिटं त्याच्याकडेच राहिली होती. पूर्ण वेळ एकत्र असल्याने ती तिकिटं मागून घेण्याचं आमच्या कोणाच्या डोक्यातही आलं नव्हतं की त्याची तशी गरजही वाटली नव्हती. पण आता या बाप्याला हे समजावणार कसं?? तिकीट नाही आणि दंड भरायला पैसेही नाहीत.. थोडक्यात नेरळचा टाळलेला तुरुंग डोंबिवलीत येऊनही आमची पाठ सोडणार नव्हता. गेल्या चोवीस तासात आमच्या मानसिकतेत कसला बदल झाला होता !! पूर्वी तुरुंग हा विचारही मनात न
आणू शकणारे आम्ही तोच शब्द किती सहजपणे उच्चारू शकत होतो..

पण नाही. अचानक आमच्यातल्या एकानेच उरलंसुरलं प्रसंगावधान आयत्या वेळी वापरलं आणि त्या टीसीला समजावलं. त्याला सगळी कहाणी इत्यंभूत कथन केली. अर्थात इत्यंभूत म्हणजे आग लागली, दंड भरला वगैरे प्रकार वगळून.. उतरताना रस्ता चुकलो, शेवटची गाडी चुकली त्यामुळे रात्रभर स्टेशनवर बसून राहायला लागलं, आमची तिकिटं मित्रांकडेच राहिली आणि ते आत्ताच दुसर्‍या बाजूने बाहेर पडले वगैरे सगळं त्याला समजावून सांगितलं. आमची एकंदर अवस्था बघून त्याचाही आमच्यावर विश्वास बसला असावा.त्याने काही न बोलता हसून आम्हाला सोडून दिलं. गेल्या चोवीस तासात आमच्याबरोबर घडलेली ही एकमेव चांगली घटना आणि त्यामुळेच इतकी छोटी असूनही (अर्थात सहीसलामत सुटल्याने आता ती आम्हाला छोटीशी वाटत होती.) आम्ही डोंबिवलीतल्या जगप्रसिद्ध २४x७ टपरीवर चहा पिऊन ती सेलिब्रेटही केली.

घरी पोचल्यावर दार उघडता उघडताच आईचा काळजीने काळवंडलेला चेहरा, रात्रभर जागरण केल्याने तारवटलेले डोळे आणि "अरे काय हे? होतास कुठे तू रात्रभर??" ने झालेलं स्वागत पाहताच मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. पण दुसर्‍याच क्षणी लक्षात आलं की निरोप पोचलेला नसावा !! त्यामुळे शूज काढता काढताच दिवसभर घडलेले वेगवेगळे किस्से आणि ओढवलेले प्रसंग यांचं साग्रसंगीत (पण अर्थातच तीव्रता कमी करून) कथाकथन करून आणि फोन करून निरोप द्यायला सांगितलं होतं हेही अगदी हायलाईट करून सांगून झालं. गरमागरम खाऊन, पिऊन गादीवर अंग टाकताना अजूनही हे खरं घडतंय यावर विश्वास बसत नव्हता. काल याच गादीवरून उठताना परत झोपायला जाईपर्यंत थेट चोवीस तास उलटून जातील आणि त्या चोवीस तासांत "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" किंवा "जान बची लाखो पाए" असल्या वाक्प्रचारांचे अर्थ एवढे जवळून आणि ठसठशीतपणे समजण्याइतके अनुभव गाठीशी बांधले जातील याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर आजूबाजूला झाडं, जंगल, दगड-धोंडे (आणि फॉरेस्ट ऑफिस आणि तुरुंगही) नसून आपली नेहमीची गादी, उशी, पांघरूण आहे हे पाहून प्रचंड हायसं वाटलं. बहुतेक स्वप्नातही मी पुन्हा एकदा प.. प.. पेब उतरून आलो होतो.. !!! संध्याकाळी सगळ्यांशी बोलताना जवळपास प्रत्येकाच्या घरी असंच स्वागत झालं असल्याचं कळलं. पण एवढं सगळं होऊनही एक गोष्ट मात्र चांगली झाली ती म्हणजे कोणाच्याही घरून ट्रेक्सना बंदी आली नाही, ट्रेक्स चालूच राहिले. मात्र त्या दिवसानंतर आम्ही कोणीही कधीच त्या दिवसाविषयी, त्या पेब ट्रेकविषयी एकमेकांशी आणि कोणाशीच कधीच विशेष बोललो नाही.

त्यानंतर अनेक ट्रेक केले.. पेबच कमीत कमी ४-५ वेळा केला. अनेक ट्रेक्सना चुकलो, पडलो, घसरलो, धडपडलो, उपाशी राहिलो, पाण्यासाठी वणवण केली, वैतागलो, चिडलो, संतापलो, डिप्रेस झालो. पण दर वेळी ८ फेब्रुवारीचा पेब ट्रेक आठवला की अचानक सगळं सुसह्य वाटायला लागायचं. त्या दिवसाच्या मानाने आजचा दिवस एवढा वाईट नक्कीच नाही असं जाणवायचं, वाट आपोआप सापडायची, आपोआपच धीर यायचा, सगळं सहज शक्य वाटायला लागायचं..... हा त्या पेब ट्रेकमधून मिळालेला पॉझिटिव्ह धडा !!!

या ट्रेकनंतर मी ट्रेकशी संबंधित तीन गोष्टी कधीही केल्या नाहीत

१. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.

२. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.

३. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही. !!!!!

- (एकदाचं) समाप्त

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-६

भाग १ इथे  वाचा
भाग २ इथे  वाचा
भाग ३ इथे  वाचा
भाग ४ इथे  वाचा
भाग ५ इथे  वाचा

सकाळपासून वेगवगळ्या प्रसंगी आम्हाला आमचे ब्रेकिंग पॉईंट आलेत असं वाटत होतं. आधी त्या टेकडीच्या समोर अडकलो तेव्हा नंतर सँडविचेस खराब झाल्याचं लक्षात आलं तेव्हा, नंतर त्या ओहोळात रस्ता चुकतो तेव्हा, त्याच्यानंतर आग लागली तेव्हा आणि नंतर जेव्हा या सायबाच्या तावडीत सापडलो त्या पहिल्या क्षणी. दर वेळी आम्हाला "झालं.. आता सगळं संपलं. आम्ही संपलो" असं वाटत होतं पण दर वेळी कधी प्रयत्नांनी कधी नशिबाने पण आम्ही उठून उभे राहत होतो.

पण आता मात्र आमचा सगळा त्राण संपला होता. आम्ही अगदी गलितगात्र झालो होतो. एकाचंही शरीर, मेंदू साथ देत नव्हतं. अशा अवस्थेत अजून नवीननवीन धक्के पचवायला आमची सिस्टम तयार नव्हती. बाहेर काहीही दाखवत असला तरी आमच्यातला प्रत्येकजण आतल्याआत तरी पूर्णतः कोलमडला होता. त्यामुळे आता काय व्हायचं ते होऊ देत, आम्हाला त्याची पर्वा नाही असेही विचार डोक्यात येऊन गेले. पण या म्हणण्याला अर्थ नव्हता. कारण काहीही घडू शकणार होतं. त्या ऑफिसबाहेर असलेला जमाव अजूनही तसाच होता. उलट अजून थोडा वाढलाच होता असं आवाजावरून तरी वाटत होतं. ते नक्की कशासाठी उभे होते कळत नव्हतं. या जंगल्याच्या डोक्यात नक्की काय शिजतंय काही कळत नव्हतं. हार मानून चालणार नव्हतं. कितीही म्हंटलं तरी आमच्यावर जवाबदारी होती. विशेषतः मुलींची अधिकच. त्यांच्या आईबाबांना समजावून, मस्का मारून आम्ही ट्रेकला पाठवायला मोठ्या मुश्किलीने तयार केलं होतं. डोक्यात येणारे नाही नाही ते विचार झटकून टाकून आम्ही अखेरचा प्रयत्न करायचा ठरवलं.

"साहेब, प्लीज आम्हाला सोडा. आमच्याकडे हजार रुपये आहेत अंदाजे. आम्ही अजून शोधतो. सगळ्यांच्या सॅक, बॅग्ज, वॉलेट्स शोधतो. सापडतील तेवढे सगळे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. पण प्लीज आम्हाला जाऊद्या. आम्ही काहीही केलेलं नाही (आणि हे तुम्हालाही चांगलं माहित्ये). बोलता बोलता तुम्हाला चुकून काही उलटसुलट बोललं गेलं असेल तर त्याबद्दल सॉरी. पण प्लीज आम्हाला जाऊद्या." हे आणि असं बरंच कायकाय--जे आता मला आठवतही नाहीये--आम्ही बोलत राहिलो.. बोलत राहिलो. आणि मग एकदाचे थांबलो.

पुन्हा एकदा बाहेरून आरडाओरड्याचा आवाज आला. जंगल्या खूप काहीतरी विचार करतोय असं दाखवत शांत बसून होता. आम्ही सगळे आळीपाळीने एकदा त्याच्याकडे आणि एकदा बाहेर चाललेल्या गोंधळाकडे बघत होतो. बराच वेळ झाल्यावर अखेर त्याने त्याचं मौनव्रत सोडलं.

"बरं ठीके. तुम्ही चांगल्या घरची पोरं दिसता. (गेले चार तास काय डोळे फुटले होते का रे भाड्या?) आणि कदाचित तुम्ही काही केलंही नसावं.. (कदाचित?????) पण तरीही गवत तर जळलं आहेच."

"साहेब आमच्याकडे सगळे मिळून बाराशे रुपये आहेत." त्याच्या मुद्दा घोळवत, फिरवत, रवंथ करत करत बोलण्याच्या सवयीला ओळखल्याने आणि एव्हाना चांगलेच कंटाळल्याने आमच्यातला एकजण एक घाव दोन तुकडे करायचे म्हणून त्याला पुढे बोलू न देता सरळ मधे बोलला.

तो क्षणभर थांबला. चेहर्‍यावर मंद स्मित आल्यासारखं वाटलं.

"म्म्म्म बाराशे? बरं ठीके.. काढा बघू."

तो बाराशे कुठल्या बळावर म्हणाला होता याची कल्पना नव्हती पण सगळ्यांनी ताबडतोब आपापले खिसे, पाकिटं, पर्स उघडून त्यात होते नव्हते तेवढे सगळे पैसे समोर टाकायला सुरुवात केली. एकाचा त्या महिन्याचा पॉकेटमनी नुकताच झाला होता त्यामुळे त्याच्याकडून पाचशे रुपये निघाले आणि बाकी सगळ्यांचे थोडे थोडे करत जवळपास चौदाशे रुपये जमले. त्याने ते पैसे लगबगीने मोजायला सुरुवात केली. पॉकेटमनीवाल्याला आपला सगळा पॉकेटमनी एका फटक्यात जातोय हे सहन झालं नसावं. तो मधे पडला आणि म्हणाला

"साहेब, आमच्याकडे परतीच्या तिकिटाचेही पैसे नाहीयेत. निदान तेवढे तरी राहूदेत आमच्याकडे."

"तुमच्याकडे रिटर्न तिकिटं नाहीत?" त्याने जरा संशयानेच विचारलं

"नाही साहेब"

त्याक्षणी त्याने आमची किंवा आमच्या बॅग्जची वगैरे झडती घेतली असती तर आम्ही संपलोच असतो. कारण आमच्याकडे अर्थातच रिटर्न तिकिटं होती. पण तोही तितकासा मूडमधे नसावा. त्यालाही उशीर झाला होताच. आणि काही न करता चार तासात जरा धमक्या देऊन, घाबरवून चौदाशे रुपये म्हणजे त्याच्या दृष्टीने चांगलीच कमाई होती.

"नक्की?"

"खरंच नाहीयेत साहेब. परत जाताना टीसीने पकडलं तर खरंच आत जायला लागेल"

"बरोबर आहे.. बरोबर आहे.." तो उगाच खदाखदा हसत म्हणाला आणि शंभरची नोट पुढे करून म्हणाला.

"हे घ्या"

अजून एक शंभरची नोट मागायची असह्य उर्मी दाबून त्याने जेवढे मिळाले तेवढे परत घेतले.

"बरं साहेब. आम्ही जाऊ आता?"

"अरे थांबा. असं कसं?? फॉर्म भरायचे आहेत. तुमची नावं लिहायची आहेत. सरकारी काम आहे. अर्धवट करून कसं चालेल."

"पण साहेब, नावं तर मगाशीच लिहिली ना?"

"हो. पण ती डायरीत लिहिली होती. ती आता फॉर्ममधे भरायची आहेत. आणि त्याच्या खाली तुम्हाला सह्या करायला लागतील."

उगाच शब्दाने शब्द वाढवण्यात काही अर्थ नव्हता. उलट त्यापेक्षा तो म्हणतोय त्याप्रमाणे फटाफट वागलो तर आम्ही तिकडून लवकरात लवकर बाहेर पडू शकणार होतो कदाचित. त्यामुळे आम्ही (एवढ्या वेळ घेत होतो त्याप्रमाणे आत्ताही) त्याच्याच कलाने घ्यायचं ठरवलं.

"बरं.. कुठे आहेत फॉर्म्स? आम्ही सह्या करतो."

"थांबा. माझ्याकडे पुरेसे फॉर्म्स नाहीयेत. मी जरा फॉर्म्स मागवून घेतो." असं म्हणून त्याने दारात उभ्या असलेल्या एका हरकाम्याला (त्या रापलेल्या चेहर्‍यांच्या गँगमधल्या एकालाच) बोलावून त्याच्या कानात काहीतरी पुटपुटून त्याला फॉर्म आणायला पिटाळलं. एवढ्या अंधार्‍या रात्री, सुनसान माळरानावर तो इसम ते फॉर्म्स कुठून पैदा करणार होता याचं उत्तर फक्त वन-खातंच देऊ शकणार होतं. कदाचित त्याचं घर जवळपास असावं आणि तिथून त्याने फॉर्म आणायला सांगितले असावेत. अर्थात तो काय आणतो, कसं आणतो, कुठून आणतो याच्याशी आम्हाला काहीही घेणं-देणं नव्हतं. फक्त तो ते फॉर्म्स किती लवकर आणतो हाच आमच्या दृष्टीने एकमेव कळीचा मुद्दा होता.

बराच वेळ झाला तरी तो फॉर्मवाला हरकाम्या काही परतला नाही. इकडे आमची चुळबुळ वाढायला लागली. हे म्हणजे नरड्यात घास कोंबलाय पण गिळू देत नाहीयेत अशासारखं काहीतरी होतं. न जाणो असाच वेळ जात राहिला आणि त्या जंगल्याचे विचार बदलले तर?? आम्हाला कल्पनाही सहन होत नव्हती. शेवटी अगदीच अति झाल्यावर आम्ही (आमच्या) प्राप्त परिस्थितीची जाणीव आणि आठवण करून देण्यासाठी त्याला पुन्हा एकवार डिवचलं.

"अजून किती वेळ लागेल? जरा लवकर करा ना. पावणे बाराची आमची शेवटची गाडी आहे. ती चुकली तर आम्हाला पूर्ण रात्र स्टेशनवर कुडकुडत काढावी लागेल." हे बोलताना त्या कल्पनेनेही आम्ही अक्षरशः थरथरत होतो.

"ते मी बघतो. त्याची तुम्ही काही काळजी करू नका" असं म्हणून तो अचानक उठला आणि त्याच्या खुर्चीमागे असलेल्या दोन कपाटांच्या मधल्या जागेतून कपाटांच्या मागे जायला लागला. त्या कपाटांमुळे त्या ऑफिसचे दोन भाग पडले होते. एक दर्शनी ऑफिस आणि दुसरा म्हणजे त्या कपाटांच्या मागे असलेली खोलीसदृश जागा. आता हा माणूस नेमकं काय करतोय हे न कळल्याने आम्हीही दोन कपाटांमधल्या जागेतून डोकावून बघू लागलो. तोवर त्याने कुठल्यातरी अदृश्य भिंतीवरचं अदृश्य बटन सराईतपणे चालू केलं. अचानक त्याच टिपिकल मंद पिवळ्या प्रकाशाने खोली भरून गेली आणि मागच्या भिंतीवर असलेल्या ठसठशीत मोठ्या खिडकीचं आम्हाला दर्शन झालं. तोवर तो त्या खिडकीपाशी पोचलाही होता. त्याने ती खिडकी उघडली आणि आमचे अक्षरशः आ वासले..

(हा शेवटचा) क्रमशः

- भाग ७ अर्थात अंतिम भाग इथे  वाचा.

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-५

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

* भाग ३ इथे  वाचा
* भाग ४ इथे  वाचा

मागोमाग दारही उघडलं गेलं. एका रापलेल्या चेहर्‍याच्या माणसाने आम्हाला बाहेर यायला फर्मावलं. आम्ही ताबडतोब बाहेर आलो. बाहेर येऊन आधी आमच्या मैत्रिणीं कशा आहेत ते पाहिलं.. त्या ठीक होत्या. सगळं ठीक वाटत होतं. आम्ही आत असताना त्यांची चौकशी चालू होती, त्यांना काही प्रश्न विचारले गेले, किंचित वादावादीही झाली  (हे सगळं आम्हाला नंतर कळलं) !!

"नावं सांगा" अचानक समोरून आवाज आला....

समोरच्या टेबलाच्या मागे असलेल्या खुर्चीवरून तो आवाज येत होता. खुर्चीत बसलेला तेल लावून केस मागे फिरवलेला, उभट चेहर्‍याचा, चष्मिस, बुटका माणूस हळू आवाजात बोलत होता. सरकारी (??) ऑफिसर आणि एवढा मृदू आवाज हे समीकरण अगदीच न पटणारं, अविश्वसनीय होतं. पण तरीही ते सत्य होतं.

"मुलांनो, तुमची नावं सांगा" तो पुन्हा एकदा तेवढ्याच हळू आवाजात म्हणाला.

त्याच्यासमोर त्याच्या नावाची पाटी होती. तो खरंच (!!) फॉरेस्ट ऑफिसर होता. पण उगाचंच लवकर हायसं वाटून घेतल्याने काय होतं याचा अनुभव नुकताच घेतला असल्याने आम्ही तेव्हा काहीही वाटून घेतलं नाही. आम्ही भराभर आमची नावं सांगितली आणि त्याने ती भराभर लिहून घेतली. त्यानंतर तो हळू आवाजात बोलायला लागला आणि बोलतच गेला. जवळपास अर्धा तास तो बोलत होता. पण त्याचं बोलणं जेव्हा संपलं तेव्हा आमच्या लक्षात एकच गोष्ट आली होती --किंवा एक गोष्ट तो आमच्या डोक्यात प्लांट करण्यात यशस्वी झाला होता असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल-- की आम्ही एक मोठा गुन्हा केला आहे आणि त्यासाठी आम्हाला दंड भरायला लागणार आहे आणि दंड भरला नाही तर आम्ही वन-संरक्षण कायद्याअंतर्गत काही (बहुतेक दहा.. आता नक्की आकडा आठवत नाहीये)  वर्षांसाठी तरी आत जाऊ शकतो.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे

- आम्ही संरक्षित (??) वनक्षेत्रात आग लावली (??) होती.

- जे जळलं ते गवत अतिशय दुर्मिळ आणि म्हणूनच अतिशय किमती होतं.

- एका चौरस मीटर गवताची किंमत कमीतकमी दोनशे रुपये होती.

- आम्ही अंदाजे शंभर चौरस मीटर क्षेत्रफळातलं गवत जाळलं होतं.

- आणि त्यामुळेच दंड म्हणून आम्हाला वीस हजार रुपये भरायला लागणार होते.

- जर दंड भरला नाही तर वनखातं आम्हाला दुसर्‍या दिवशी कोर्टात उभं करणार होतं. आमच्यावर खटला
चालणार होता आणि खटला जर हरलो असतो तर आम्हाला निदान दहा वर्षं तरी आत जायला लागणार होतं.

सगळं भविष्य अंधकारमय झाल्यासारखं वाटलं. डोक्यावर हात मारून घेऊन मटकन खाली बसण्याची जी एक वेळ असते ती हीच असावी. खरंच सगळीकडे अंधार पसरला होता. आई-बाबा, मित्र, कॉलेज, नोकरी, पेपरात नाव, गुन्हा, शिक्षा, मनःस्ताप असं सगळं सगळं दोन मिनिटांत डोळ्यासमोरून तरळून गेलं. पण क्षणभरच....... !!

कारण यातल्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये हे आम्हाला पुढच्याच क्षणी जाणवलं. त्याची ती आयडिया आमच्या डोक्यात प्लांट झाली होती खरी. पण तात्पुरतीच.... कारण लगेचच आम्हाला त्यातला फोलपणा जाणवला. सुदैवाने आमचे विचार, सारासार बुद्धी अजूनही जागृत होती.

- ते संरक्षित वनक्षेत्र होतं तर मग कुठेही तशी पाटी आणि/किंवा कुंपण का नव्हतं?....

- ते सो कॉल्ड गवत दुर्मिळ वगैरे नाही तर आपलं नेहमीचं साधं गवतच होतं हे सांगायला आमच्यापैकी कोणी वनस्पतीशास्त्रज्ञ असण्याची आवश्यकत नव्हती.

- आग लागण्यापूर्वी ज्या जागेवर आम्ही जीव मुठीत धरून उभे होतो त्या जागेला शंभर चौरस मीटरची जागा म्हणत असतील तर एकतर आम्हाला तरी पुन्हा गणित शिकायची आवश्यकता आहे किंवा तुम्हाला तरी. विशेष करून तुम्हालाच !

त्याच्या प्रत्येक प्रश्नाची आणि आक्षेपाची अशी चिरफाड आम्ही सहज करू शकत होतो. पण त्याने निष्पन्न काहीच झालं नसतं. उलट प्रकरण अजून गंभीर मात्र नक्कीच झालं असतं. त्यामुळे आम्ही त्याची सगळी बडबड ऐकून घेतली आणि शेवटी फक्त एवढंच म्हणालो

"आमच्याकडे वीस हजार रुपये नाहीत."

"बरं ते नंतर बघू." असं म्हणून त्याने एका फायलीत डोकं घातलं.

आता हा मध्येच हे काय वाचतोय, याच्या डोक्यात नक्की शिजतंय तरी काय असे विचार आमच्या डोक्यात थैमान घालत होते. जरा वेळाने त्याने फायलीतून डोकं बाहेर काढलं आणि आमच्यातल्या प्रत्येकाकडे एकेक करत रोखून बघायला लागला. होता होता मध्येच थांबून अचानक म्हणाला,

"अरे याच्या खांद्यातून रक्त येतंय का? काय झालं त्याला?" अचानक आलेल्या या प्रश्नाने आम्ही क्षणभर गांगरलो.

"तो उतरत असताना वाटेत घसरून पडला आणि दगडावर डोकं आपटलं."

"नाही पण मग खांद्यावर रक्त कसं?" त्याच्या त्या आवाजात उगाचंच एक वेगळा अर्थ दडला असल्यासारखं काहीतरी आम्हाला जाणवलं.

"अहो सरळ आहे. रक्त ओघळत खांद्यापर्यंत आलं. आमच्याकडे पाणी नव्हतं की मोठं बँडेड नव्हतं. तशीच कशीबशी जखम साफ करून रुमाल बांधला. पण तोवर बरंच रक्त गेलं." एव्हाना चाललेल्या प्रकाराने वैतागून जाऊन एका मुलीचा संयम संपला.

"बरं ठीक आहे. पण उतरताना घसरून पडला मग डोक्याच्या मागच्या बाजूला कसं काय एवढं लागलंय? पुढच्या बाजूला लागायला हवं ना? तुम्ही काहीतरी लपवताय... !!!!!! नक्की काहीतरी गडबड आहे."

"काहीही काय बडबडताय? तो उतरत असताना मागून उतरत असलेल्या एकीच्या पायाखालचा दगड निसटला आणि तो वेगाने घरंगळत येऊन पुढच्याच्या डोक्याला लागला. यात कसली आलीये गडबड? कसलं लपवणं? आता कसं, कुठून घसरून पडायचं ते काही कोणी ठरवून पडतं का?" आता मात्र तिला राहवत नव्हतं.

एक तर आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलोय दिवसभर, त्यात पुन्हा इथे अडकलोय आता आणि त्यात तुमचे हे निरर्थक प्रश्न !!! हे सगळे सगळे भाव तिच्या चेहर्‍यावर उफाळून आले होते. प्रकरण अगदीच हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर आमच्यातल्या एकाने तिला थांबवलं आणि त्या साहेबाला विचारलं.

"तुम्ही नक्की काय सुचवायचा प्रयत्न करताय? उतरताना मागून एक दगड घरंगळत आला याच्या डोक्याला लागला हे आम्ही तुम्हाला सांगतोय तर तुम्ही आम्हालाच उलटसुलट प्रश्न का विचारताय?"

"कारण सरळ आहे." अचानक इतका वेळ मृदू आवाजात बोलत असणारा माणूस हाच का असा प्रश्न पडावा इतकी जरब आवाजात आणून तो म्हणाला "कशावरून तो दगड घरंगळत आला होता? कशावरून तुम्हीच तुमच्या मित्राला मारायचा प्रयत्न केला नसेल?"

हा मात्र शुद्ध कहर होता. तो तारेत असल्यागत बडबडतोय याची आम्हाला खात्री झाली. पण तसं नव्हतं. तो मुद्दाम आम्हाला घाबरवण्यासाठी काहीही बडबडत होता. काहीतरी आरोप करत होता. आणि हे सगळं तो का करत होता ते आम्हाला लवकरच कळणार होतं.

"ओ. तोंड सांभाळून बोला. आमच्या आईवडिलांनी असले संस्कार केलेले नाहीत आमच्यावर" मगासच्या रणरागिणीने पुन्हा समशेर फिरवली.

"तोंडं तुम्ही सांभाळा तुमची. 'दुर्मिळ गवत जाळणं' एवढ्या एकाच आरोपाखाली तुम्हाला अटक होईल असं नाही एवढंच सांगायचा मी प्रयत्न करतोय. त्याच्याबरोबरच खुनाचा कट, खुनाचा प्रयत्न असेही आरोप लागतील."

हे सगळं खरंच चाललंय का मी एक मोठं दुःस्वप्न बघतोय असं मला वाटायला लागलं. कदाचित एवढ्यात जाग येईल आणि हे सगळं खोटं होतं, स्वप्न होतं हे कळेल असं सारखं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. तो जंगली ऑफिसर बोलतच होता बोलतच होता. बराच वेळ तीच तीच बडबड करून झाल्यावर अखेरीस तो म्हणाला.

"बोला मग आता काय करताय?"

"........" आमची तर बोलतीच बंद झाली होती.

"म्हणजे दंड भरताय की कोर्टात जाताय उद्या?"

ओओ... अहा.. ओक्के !!!!!!!! त्याच्या त्या प्रश्नात एक छुपी हिंट होती आणि एवढ्या वेळ फिरवून फिरवून बडबड करत तो तेच आम्हाला सुचवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी ऑफिसरकडून दुसरी काय अपेक्षा असणार म्हणा. पण आम्हाला एवढ्या वेळात हे कसं लक्षात आलं नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
अर्थात त्यात काही नवलही नव्हतं. आजचा दिवसच असा होता की आज काहीही घडलं असतं (म्हणजे वाईट) तरी आम्हाला आश्चर्य वाटलं नसतं. त्याच्या पलीकडे गेलो होतो आम्ही एव्हाना.

"साहेब, आमच्याकडे दंड भरायला पैसे नाहीयेत. आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. त्यामुळे एवढा दंड भरणं आम्हाला कोणालाच शक्य नाहीये."

"ठीके मग तुमच्या आईवडिलांना घेऊन या. ते भरतील दंड"

"......" आता याच्यावर काय बोलणार म्हणून आम्ही पुन्हा एकदा गप्प बसलो. पण आमच्या डोळ्यात फारच आर्तता वगैरे दाटली असावी. त्याला अचानक आमच्याबद्दल कणव दाटून आली.

"बरं एक करा दोन हजार रुपये द्या मी सोडतो तुम्हाला"

ते ऐकून आम्ही सगळे प्रचंड खुश झालो. पण तरीही एक प्रॉब्लेम होताच.. आमच्याकडे दोन हजार रुपये नव्हते... खरंच नव्हते... जवळपास सगळे शिकत होते आणि जेमतेम १-२ जण नोकरी करणारे होते. आणि काहीही असलं तरी ट्रेकला कोणी हजारो रुपये घेऊन जातं का? तस्मात प्रत्येकी अंदाजे शंभर रुपये गृहीत धरता आमच्याकडेही जेमतेम हजार एक रुपये असावेत.

"साहेब आमच्याकडे हजार रुपये असतील अंदाजे. ते घ्या आणि प्लीज आम्हाला जाऊद्या."

"नाही. दोन हजार तरी पाहिजेतच. एक हजार असतील तर एकालाच सोडेन.. !!!!!"

"एकालाच? म्हणजे?" क्षणभर काही रजिस्टरच होईना टाळक्यात. हा मनुष्य काय बडबडतोय ??

"नाही. दोन हजार दिले असतेत तर मी दोघांना सोडण्याचा विचार करत होतो. म्हणजे कसं एकाने जाण्यापेक्षा दोघांनी गेलेलं बरं. दोघांनी जा आणि तुमच्या पालकांकडून उरलेले अठरा हजार रुपये घेऊन या असं म्हणत होतो मी. तोवर बाकीचे इथेच राहतील. पण काही हरकत नाही. एक हजार देत असाल तर एकालाच जाऊन उरलेले पैसे आणावे लागतील. बोला कोण जातंय तुमच्यातलं??"

क्रमशः

(यानंतर फक्त एकच क्रमशः शिल्लक आहे.)

- भाग ६ इथे  वाचा.

Tuesday, March 1, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-४

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

* भाग ३ इथे  वाचा

हे अचानक काय चाललंय आम्हाला कळेना. तरी आम्ही त्याच्याकडे लक्ष न देता पुढे जाणार इतक्यात त्याच्या आजूबाजूच्या अजून ५-६ जणांनी अचानक आमच्या समोर उभं राहून आम्हाला जागच्या जागी उभं राहायला भाग पाडलं. आता मात्र आम्हाला नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. भीतीही वाटायला लागली.

आम्ही काही बोलणार एवढ्यात आमचा रस्ता पहिल्यांदा अडवणारा माणूस म्हणाला,

"तुम्हाला साहेबांनी बोलावलंय"

"कोण साहेब?"

"इथले फॉरेस्ट ऑफिसर साहेब"

"फॉरेस्ट ऑफिसर? आणि आम्हाला कशाला बोलावलंय?"

"तुम्ही जंगलाला आग लावलीत. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचाय. त्या आगीच्या बाबतीत तुमची चौकशी करायची आहे त्यांना. तुम्हाला नुकसानभरपाई द्यावी लागेल".. हे ऐकताक्षणी आम्ही गळपटलो. हे म्हणजे "मरे हुए को और मारना" प्रकारचं होतं. तरीही त्यातल्या त्यात काहीतरी प्रयत्न करणं भागच होतं.

"ओ गुन्हा बिन्हा काहीही काय बडबडताय? आणि आग लावली काय लावली. चुकून लागली आग. आणि नुकसानभरपाई कसली. थोडंसं गवत तर जळालंय. तेही चुकून पेटलं तर त्याची चौकशी कसली आणि नुकसानभरपाई कसली त्यात?" प्रकरण भलतंच भरकटतंयसं वाटून आमच्यातल्या दोन-तीन जणांनी पुढे होऊन आमची बाजू मांडायचा प्रयत्न केला.

"ते काय ते तुम्ही साहेबांशी बोला" त्या माणसांनी साफ हात झटकून टाकले.

काही झालं तरी त्यांच्या आणि त्यांच्या त्या सायबाच्या मनातलं खरं झाल्याशिवाय आमची काही इथून सुटका नाही हे त्यामानाने चटकन लक्षात येताच प्रकरण झटपट मिटवावं म्हणून आम्ही विचारलं "बरं, कुठे आहे तुमचा साहेब?"

"हे इथेच मागे आहे फॉरेस्ट ऑफिस" त्यांच्यातल्या एकाने लांब कुठल्यातरी एका टोकाला हात दाखवला. त्याने हात दाखवलेल्या ठिकाणी आम्हाला मोठं अंधारं माळरान सोडून बाकी काहीही दिसत नव्हतं.

"त्याच्यापेक्षा त्यांना इकडे यायला सांगा. आम्ही इथेच थांबतो ते येईपर्यंत" हा नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार आहे याची जाणीव झाल्याने आम्ही त्यातल्या त्यात शेवटचा प्रयत्न करून बघितला. पण सकाळपपासूनच्या एकूणएक प्रयत्नांप्रमाणेच या प्रयत्नालाही यश आलं नाही. पुढच्या पाच मिनिटांत आम्ही त्यांच्या मागोमाग चालायला लागलो. आमच्या पुढे, मागे आणि भोवताली प्रत्येकी चार-पाच जण आणि त्या पंधरा जणांनी आवळलेल्या अदृश्य रिंगणात आम्ही थकलेभागलेले उपाशी दहा-बारा जण अशी सगळी वरात चालली होती. त्या सगळ्यांच्या हातात मोठमोठ्या काठ्या होत्या, चेहरे चांगले रापलेले आणि म्हणूनच भीतीदायक होते. सभोवताली मोठा मोकळा माळ आणि लांबून सतत न थांबता ऐकू येणारी रातकिड्यांची किरकिर या भयानक मिश्रणात आकाशातून येणारा शीतल चंद्रप्रकाशच काय तो मोहक वाटत होता.

होता होता चालून पंधरा वीस मिनिटं होऊन गेली तरी त्यांच्या साहेबाचं 'जवळच' असलेलं ऑफिस काही येईना. आम्ही मधेमधे दोन-तीन वेळा विचारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दोन वेळा "आहे. इथे जवळच", "आलंच" सारखी उत्तरं मिळाली. जसजसे आम्ही जास्त जास्त चालत गेलो तसतशी ती उत्तरं मिळणंही बंद झाली. एक मात्र लक्षात येत होतं ते म्हणजे आम्ही बरंच अंतर कापलं आहे आणि पुन्हा गडाच्या पायथ्याच्या दिशेने कुठेतरी चाललो आहोत. ही लोकं आम्हाला कुठे घेऊन चालली होती याचा काहीच अंदाज येत नव्हता आणि त्यांनी घातलेल्या त्या अदृश्य कुंपणाने आणि त्यांच्या हातातल्या जाड काठ्यांनी मात्र अजूनच भीती वाटत होती. शेवटी जवळपास अर्धा-पाऊण तास चालल्यावर आमची प्रतीक्षा संपली.

आम्ही एका छोट्याशा उंचवट्यावर असलेल्या एका लहान बंगलीवजा घरासमोर येऊन थांबलो. कौलारू छपराच्या त्या घराला समोरून एक दार होतं आणि त्यातून आतला मंद पिवळा प्रकाश दिसत होता. सगळाच विचित्र प्रकार वाटत होता पण त्याहीपेक्षा विचित्र वाटत होता तो त्या घराभोवती जमलेला, लाठ्याकाठ्या हातात घेतलेला, जोरजोराने आरडाओरडा करणारा २५-३० माणसांचा जमाव. ही एवढी लोकं अचानक कुठून आली, आम्ही नक्की कुठे आहोत काही कळेना. ती मगासची माणसं म्हणतात त्याप्रमाणे हे फॉरेस्ट ऑफिसरचं आहे म्हणावं तर त्या घराच्या बाहेर कुठली पाटी-बिटीही नव्हती. जरा वेळ त्या घराबाहेर उभं राहायला लावून नंतर आम्हाला आत नेण्यात आलं. आत एक खुर्ची, टेबल, त्यावर बरीच कागदपत्रं, एक छोटा टेबलफॅन वगैरे ऑफिसात असणारं किरकोळ साहित्य होतं. पण ते ऑफिसचं सामान बघूनही आम्हाला इतकं हायसं वाटलं म्हणून सांगू. आम्ही फॉरेस्ट किंवा कुठल्याही का असेना पण एका (बहुतेक सरकारी) ऑफिसात होतो एवढं मात्र नक्की. पण ते हायसं वाटणं संपायच्या आतच उगाचंच एवढ्यात हायसं वाटून घेतलं असं वाटायला लागावं असं काहीतरी झालं.

आम्ही आत प्रवेश केल्या केल्या त्यांनी आम्हाला बाजूच्या एका खोलीत जायला सांगितलं. आम्ही सगळेजण निमूटपणे आत जायला लागलो. तेवढ्यात "फक्त मुलांनीच आत जा" असं हुकुम सुटला. आता मात्र आम्हाला प्रचंड टेन्शन आलं होतं. पण तिथे त्याक्षणी प्रतिकार करणं अधिक धोकादायक होतं. नक्की काय चाललंय ते बघून किंचित थांबून मग काय घडतंय किंवा काय करता येईल याचा विचार करू असं आम्ही ठरवलं. कदाचित आम्हाला वाटतं तितकं काही गंभीर नसेलही अशी मनाची समजूत घालून घेऊन, मुलींना डोळ्यांनीच "सांभाळून राहा.. आम्ही आलोच" असं सांगून आम्ही त्या खोलीत शिरलो. मला कल्पना आहे की आमचं हे वागणं आत्ता हे वाचणार्‍यांना प्रचंड विचित्र वाटत असेल (कारण आमचं आम्हालाही तेव्हा ते खूपच विचित्र वाटलं होतं.. पण करतो काय). पण आम्ही किती असहाय होतो हे मला खरंच आत्ता शब्दांत सांगता येणार नाही. कदाचित कधीच येणार नाही. असो. आम्ही आत शिरल्या शिरल्या खोलीचं दार बाहेरून बंद झालं. कडी लावल्याचा अस्पष्ट आवाजही आला.

खोलीत अंधुक पिवळा प्रकाश होता. एका कोपर्‍यात मोठ्ठा दोर ठेवला होता. त्याच्या बाजूला जाड बांबू, काठ्या, सळया,  सुतळी असं बरंच काही ठेवलं होतं. ते सामान बघून आम्हाला चांगलीच धडकी भरली. एकीकडे बाहेर काय होतंय या कल्पनेने आमचे जीव टांगणीला लागले होते. कानात प्राण आणून आम्ही बाहेर काय घडतंय याचा कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होतो पण काहीच ऐकू येत नव्हतं, काहीच कळत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं.... आम्ही जवळपास दहा-पंधरा मिनिटं अशीच असहायपणे काढली.

आणि अचानक बाहेरून दाराची कडी उघडल्याचा आवाज आला ....... !!!!

क्रमशः

- भाग ५ इथे  वाचा.

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...