Monday, June 19, 2023

इस्लाम ते सनातन, घरवापसीचा एक अविश्वसनीय प्रवास!

 "इथे आत्ता माझ्यासमोर अनेक पालक बसलेले आहेत ज्यांची मुलं सज्ञान वयाची असतील" तोडक्या मोडक्या हिंदीत व्यासपीठावरून एक प्रश्न येत होता, "तर अशा पालकांना त्यांच्या मुलांनी जर वाईटसाईट बोलून अपमान केला, तुमचा माझा काही एक संबंध नाही असं म्हंटलं, तर कसं वाटेल?" 

संपूर्ण सभागृह शांत होतं. अर्थपूर्ण विरामानंतर तोच आवाज पुढे बोलू लागला, "मी केलंय असं, मी अशी वागले आहे माझ्या पालकांशी". एक जोरदार आघात व्हावा त्याप्रमाणे संपूर्ण प्रेक्षागृहाला धक्का बसला होता. "मी आपल्या हिंदू मंदिरात जाऊन थुंकले आहे, देवदेवतांच्या मूर्त्यांना शिव्या दिल्या आहेत, घरात होणाऱ्या पूजाअर्चेला विरोध केला आहे, देवाचा प्रसाद खायला नकार दिला आहे."


प्रेक्षकांना एकामागून एक धक्के बसत होते. व्यासपीठावरून ओ श्रुती बोलत होत्या. निमित्त होतं वंदे मातरम संघ आणि दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'धर्मांतराचे वास्तव आणि सामान नागरी कायदा' या कार्यक्रमाचं. संध्याकाळी ५ वाजता, आणि ते ही सोमवारी संध्यकाळी, होणारा कार्यक्रम सुमारे साडे चार पासूनच हाऊसफुल व्हायच्या बेतात आला होता. सभागृहात किमान तीनशे प्रेक्षक उपस्थित होते तर किमान साठेक लोकांनी तर उभं राहून कार्यक्रम बघितला. आणि तरीही कोणाचीही कसलीही तक्रार नव्हती. 

'ओम नमः शिवाय' च्या धीरगंभीर मंत्राने सुरुवात करून आपल्याला हिंदी नीट येत नसल्याबद्दल क्षमा मागून आपण हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलणार असल्याचे सांगून ओ श्रुती यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. एका हिंदू संस्कारयुक्त घरात बालपण गेल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनादरम्यान आलेले अनुभव सांगायला सुरुवात केली. 'केरला स्टोरी' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हळूहळू गोड बोलून, टोमणे मारून, हिंदू देव देवतांना नावं ठेवून हिंदू धर्माबद्दल पायरीपायरीने अविश्वास, तिरस्कार आणि क्रोध उत्पन्न होईल अशा प्रकारे सापळे रचण्यात आले. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या श्रुतीजी हळूहळू इस्लामी विळख्यात अडकत गेल्या. सुमारे पाच वर्षं त्यांनी इस्लामचं शिक्षण घेतलं. पालकांना ही अजिबातच जुमानत नव्हत्या. अगदी शेवटचा उपाय म्हणून पालक त्यांना 'आर्श विद्या समाजम्' संस्थेच्या आचार्य मनोजजी यांच्या भेटीला घेऊन गेले. तिथे जातानाही श्रुतीजींच्या मनात हाच विचार होता की आपण खुद्द मनोजजींचं विचार परिवर्तन करून त्यांना इस्लाममध्ये घेऊन येऊ. मात्र त्यानंतर आचार्य मनोजजींबरोबर फक्त अडीच तास झालेल्या चर्चेनंतर श्रुतीजींच्या विचारात आमूलाग्र बदल झाला आणि त्या हिंदू धर्मात परत आल्या. आणि त्यानंतर 'आर्श विद्या समाजम्' संस्थेच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या झाल्या. १९९९ साली स्थापन झालेल्या या संस्थेनं आत्तापर्यंत ७००० हून अधिक स्त्री-पुरुष-मुले-मुली यांना इस्लाम मधून सनातन धर्मात परत आणलं आहे. 

त्यांच्या मते हे मतांतरण किंवा विचारधारेतला बदल अर्थात ideological conversion आहे आणि या बहुसंख्येने होणाऱ्या धर्मांतरांसाठी कारण ठरणाऱ्या चार प्रमुख गोष्टी म्हणजे 

१. आपल्या धर्मात योग्य वयात धार्मिक स्वरूपाचं मार्गदर्शन मिळत नाही, प्रश्नांना उत्तरं दिली जात नाहीत,

२. आपल्याला शाळेत इतिहासातल्या महान लोकांच्या चरित्राबद्दल शिक्षण दिलंच जात नाही. उलट अकबरासारख्या लोकांची चरित्र शिकवली जातात. 

३. आजच्या तरुणपिढीला चालू घडामोडी अर्थात current affairs बद्दल काहीही माहिती नाही. ही पिढी रील्स बनवण्यात आणि बघण्यात व्यग्र आहे.

४. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे Comparative religious studies चा अर्थात सर्व धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासाचा अभाव 

कुराणातल्या आयतींचे संदर्भ देत त्यांनी इस्लामचा काफरांकडे बघण्याचा दृष्टिकोन विशद केला. त्याचप्रमाणे आपल्याला श्री शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्वांची गरज आहे असेही यांनी नमूद केले. 



श्रुतीजींच्या कार्यक्रमापूर्वी 'केरला स्टोरी' चे दिग्दर्शक श्री सुदिप्तो सेन यांचेही भाषण झाले. 'केरला स्टोरी' दरम्यानचे काही अनुभव आणि त्याचप्रमाणे सात-आठ वर्षांपूर्वी श्रुतीजींशी झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीचे अनुभवही त्यांनी सांगितले. केरळ आणि कर्नाटक सीमेवर असलेले कासारगोड, मलापूरम सारखे प्रदेश या धर्मांतरांच्या विषयाच्या बाबतीत फार भयंकर आणि कट्टर आहेत. सौदी आणि अन्य इस्लामी राष्ट्रांचा पैसे वापरून या प्रदेशांमध्ये कशा प्रकारे धर्मांतरं केली जातात यावर त्यांनी महत्वाची माहिती पुरवली. अखेरीस "काही चित्रपट शंभर कोटींचा गल्ला जमा करण्यासाठी बनतात, तर काही शंभर कोटी हिंदूंना जागृत करण्यासाठी जन्माला येतात." असं सांगून त्यांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.  

श्रुतीजींचे अनुभव मल्याळी भाषेत पुस्तकरूपातही आले असून त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या विशाली शेट्टी याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशालीजींनी त्या TCS मध्ये नोकरीला असताना त्यांच्यावरही इस्लामचा कसा प्रभाव पडला होता परंतु वेळीच 'आर्श विद्या समाजम्' च्या संपर्कात आल्याने कशा प्रकारे त्या इस्लामच्या विळख्यातून बाहेर पडल्या याविषयीचे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमादरम्यान अ‍ॅडव्होकेट अंजली हेळेकर यांनी सामान नागरी कायदा, त्याची आवश्यकता, अमंलबजावणी याविषयी त्यांचे विचार मांडले. त्याचप्रमाणे भाजपचे माजी आमदार श्री आशिष शेलार यांचेही घणाघाती भाषण झाले. कार्यक्रमानंतर श्रुतीजींच्या पुस्तकासाठी प्रेक्षक आणि वाचकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. पुस्तकं संपल्याने निम्म्याहून अधिक लोकांना पुस्तक न घेताच परत जावं लागलं. 



इस्लाम मध्ये गेलेल्या एखाद्या व्यक्तीने आणि विशेषतः स्त्रीने, काही वर्षांनी स्वधर्मात परत येऊन त्यानंतर त्याच कामात स्वतःला वाहून घेणं ही एवढी मोठी गोष्ट आहे की ती स्वतः त्या व्यक्तीने सांगितल्याशिवाय त्यावर विश्वास बसणं कठीणच. श्रुतीजींचे अनुभव पुस्तकरूपात अधिक विस्तारपूर्वक आलेले असतील आणि ते वाचणं ही एक पर्वणी असेल हे नक्कीच. तिथे पुस्तक न मिळाल्याने अखेरीस ऑनलाईन मागवलं. अर्थात इतकी पुस्तकं समोर असताना काही न घेता परत येणं ही निव्वळ अशक्य बाब होती. आणि सुदैवाने गेले काही महिने शोधत असलेलं डॉ श्रीरंग गोडबोले यांचं 'इस्लामचे अंतरंग' तिथे मिळाल्याने ते ताबडतोब घेऊन टाकलं. आता श्रुतीजींचं पुस्तक हातात पडण्याची उत्सुकता आहे. लवकरच ते मिळेल अशी अपेक्षा. 

राष्ट्र आणि धर्मकार्याला आपलं आयुष्य वाहून घेणं ही सोपी बाब नक्कीच नाही. परंतु अर्थातच ते प्रत्येकाला जमणंही शक्य नाहीच. पण त्यांना मदत म्हणून आणि त्याचबरोबर इस्लामी धर्मांतराच्या विळख्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपण श्रुतीजींचं पुस्तक ऑनलाईन नक्कीच मागवू शकतो.  

--हेरंब ओक

पुस्तक ऑनलाईन मागवण्यासाठीची लिंक 

https://www.arshaworld.org/avs/books/story-of-a-reversion/






Friday, June 2, 2023

स्थलकालाची बंधनं झुगारणारा पाशवी विखार : एका माळेचे मणी

सुविख्यात इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी पानिपत युद्ध ते हैद्राबाद स्वातंत्र्य चळवळ आणि समर्थ संप्रदाय ते भारतीय मुसलमान अशा अनेकविध विषयांवर लिहिलेली अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत. नुकतंच त्यांचं 'एका माळेचे मणी' असं इतिहासविषयक पुस्तकाला थोडंसं न शोभणाऱ्या अशा नावाचं एक पुस्तक वाचनात आलं. हा मुळात सेतुमाधवरावांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. हे लेख इतिहासातल्या वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटनांवर लिहिलेले असले तरी मूलतः या सर्वांचा पाया एकच आहे. या पुस्तकात टिपू, बेनझीर भुत्तो, झुल्फिकार अली भुत्तो, झिया उल हक, जिना, १९७१ चं बांगलादेश युद्ध, पाकिस्तान, पानिपत युद्ध आणि अगदी उझबेकिस्तान, सुदान आणि फ्रान्समधील मुस्लिम अशा विविध विषयांवर लिहिलेले लेख असून हे पुस्तक १९९१ साली प्रकाशित झालं आहे.


 

इस्लामला केंद्रस्थानी ठेवून त्यातील क्रूर चालीरीती, अन्याय, अंधश्रद्धा, क्रौर्य, इस्लाममधील स्त्रीचं यःकश्चित असं स्थान आणि त्याचबरोबर वर उल्लेखलेल्या देश आणि व्यक्तींची इस्लामच्या संदर्भातली मतं आणि त्या अनुषंगाने असलेली त्यांची वागणूक आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय या सगळ्याचा उहापोह या पुस्तकात केलेला आढळतो. थोडक्यात इस्लाम ही एक ‘माळ’ म्हणून गृहीत धरून इस्लामी कट्टरपणा आणि धर्मांधतेला स्थळकाळाचं बंधन नसतं हे सिद्ध करणारे वर उल्लेखलेले अनेक ‘मणी’ असा या शीर्षकाचा अर्थ आहे.

 


वेगवेगळ्या लेखांचा संग्रह असल्याने पुस्तक वाचताना किंचित विस्कळीतपणा जाणवतो. त्याचप्रमाणे हे लेख कालक्रमानुसार (chronological order) नसल्यानेही तसं होत असेल. सुरुवातीचे अनेक लेख टिपूवर असून नंतर बेनझीर मग पुन्हा जिना अशी लेखांची मांडणी आहे. परंतु पुस्तकाच्या मनोगतात या मुद्द्यालाही आधीच उत्तर देण्यात आलेलं आहे. यातले काही लेख हे नियतकालिकांमध्ये छापून आलेले असून काही स्वतंत्र आहेत. सेतुमाधवराव यांनी वयाच्या ब्याऐशीव्या वर्षी हे लेख लिहिलेले असून नजरेचा संपूर्ण असहकार असल्याने दुसऱ्याच्या नजरेने वाचन करून आणि दुसऱ्याच्याच लेखणीने अर्थात लेखनिकाच्या मदतीने हे दिव्य पार पाडलं आहे.

टिपूचा अतिशय निकटवर्ती असलेला अधिकारी मीर हुसेन अली किरमानी याने टिपूचं चरित्र लिहिलेलं असून टिपूच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन वर्षांत ते लिहिण्यात आलं होतं. टिपूवरील सर्व लेख हे या चरित्राचा संदर्भग्रंथ म्हणून वापर करून लिहिण्यात आले असल्याने त्यांच्या अस्सलते (authenticity) विषयी कुठलाही प्रकारचा संशय घेण्याची गरज नाही हे नक्की. यात टिपूची धर्मांधता, क्रौर्य, काफरांविषयी त्याला वाटत असलेली आत्यंतिक घृणा, हिंदुस्थानवर शरियतचे राज्य यावे यासाठी त्याने तुर्कस्तान आणि अफगाणिस्तानच्या मदतीने हिंदुस्थानवर आक्रमण करण्याच्या आखलेल्या (आणि फसलेल्या) योजना, त्याच्या अनेक अंधश्रद्धा आणि त्यातून निर्माण झालेल्या आख्यायिका तसेच त्याचे न्यूनगंड, भीती आणि या सर्वांमुळे त्याचा अखेरीस झालेला ऱ्हास अशा अनेकविध विषयांवर प्रकाश टाकणारे अनेक लहान मोठे लेख पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात वाचकांच्या भेटीस येतात. टिपूने निव्वळ संशय आणि गैरसमज यापायी कित्येक निष्पाप जीवांचे कसे बळी दिले हे वाचून जीवाचा अक्षरशः थरकाप उडतो. आणि मुख्य म्हणजे त्याले अनेकजण तर खुद्द त्याच्या सैन्यातले, त्याच्या विश्वासातले खास सरदार होते. जवळच्या माणसांची ही कथा असेल तर असहाय प्रजा आणि निष्पाप हिंदूंवर तो कुठल्या प्रकारचे अत्याचार करत असेल याची कल्पनाही करवत नाही. काही प्रसंगांमध्ये तर आपला सरदार मेल्यावर त्याच्या बायकोला टिपूच्या अंतःपुरात (जनानखान्यात) धाडण्यासाठी खुद्द टिपूच्या आईने पुढाकार घेतला असल्याचे वाचून लहानपणी 'श्यामची आई' चे संस्कार झालेला वाचक इस्लामच्या किळसवाण्या चालीरीती बघून नक्कीच हादरून जातो. आणि यावर किरमानीने टिपूची केलेली भलामण अजूनच हादरून टाकणारी आहे. किरमानीच्या मते “अशा स्त्रिया स्वतःहूनच टिपूच्या जनानखान्यात जात असत. जर त्या स्त्रियांना हे मान्य नव्हते तर त्यांनी कुठल्यातरी मार्गाने आत्महत्या करायला नको होत्या का?" !!! ही विचारमौक्तिके ऐकून फाळणीच्या वेळी "बलात्कार झालेल्या स्त्रियांनी प्रतिकार का केला? त्यांनी श्वास रोखून धरून आत्महत्या का केल्या नाहीत?" ही ‘महात्म्याची’ विचारमौक्तिके आठवल्यावाचून राहत नाहीत!

नंतरच्या भागात जुल्फिकार अली भुत्तो, जनरल झिया उल हक, बेनझीर भुत्तो आणि त्याचप्रमाणे १९७१ सालचं भारत-पाक युद्ध या व्यक्ती आणि घटनांबद्दलचे लेख आहेत. यात दोन विशेष उल्लेख करण्यासारखे प्रसंग म्हणजे पाकिस्तानात झालेल्या सुन्नी विरुद्ध अहमदिया दंगलीत हजारो अहमदिया मारले गेले. त्या दंगलींचा अभ्यास करण्यासाठी लाहोर हायकोर्टाचे सरन्यायाधीश मुनीर यांच्या समितीने सादर केलेला अहवाल अर्थात मुनीर रिपोर्ट. तो प्रकाशित होऊ नये आणि झाला तरी भारतात येऊ नये म्हणून पाकिस्तानी सरकारने जंग जंग पछाडले होते आणि तरी अखेरीस तो एका पत्रकाराच्या मदतीने भारतात कसा आला याचं वर्णन करणारा एक प्रसंग अतिशय रंजक आहे.

दुसरा एक प्रसंगही अशाच एका अहवालाशी निगडित आहे. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर तो का झाला हे शोधण्यासाठी जुल्फिकार अली भुत्तो सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली. या समितीने हजारो लोकांच्या मुलाखती घेऊन नांतर जो अहवाल लिहिला त्यात पाकिस्तानच्या पराभवासाठी पाकिस्तानी लष्कर, तिथला भ्रष्टाचार, अनागोंदी आणि जनतेची दिशाभूल करणारे पाकिस्तानी अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरण्यात आले होते. हा अहवाल वाचून भुत्तो अक्षरशः हादरून गेले. कारण हा अहवाल सामान्य जनतेच्या नजरेस पडला असता तर पाकिस्तानी जनता लष्कराविरुद्ध बंड करून उठेल अशी भीती त्यांना वाटत होती. या अहवालाच्या उपलब्ध असलेल्या केवळ पाच प्रतीही नष्ट करून टाकण्याचे आदेश भुत्तोने दिले. परंतु कर्मधर्मसंयोगाने एक प्रत खुद्द भुत्तोंच्या पलंगाखालीच राहून गेली. दरम्यान झिया उल हकने भुत्तोला फाशीची शिक्षा दिली. या गडबडीत कोणीतरी त्या अहवालाची झेरॉक्स काढून अमेरिकेला पाठवली आणि तिथून ती टाईम्स ऑफ इंडिया चे एक पत्रकार श्री परमू यांच्या हाती लागली. त्या अहवालाचं स्फोटक स्वरूप बघून श्री परमू यांनी तो अहवाल संक्षिप्त स्वरूपात १ ऑक्टोबर १९८८ च्या अंकात छापला. या अहवालामुळे पाकिस्तानची कशी यथेच्छ नालस्ती झाली याचं वर्णन एका लेखात वाचायला मिळतं.

पुढच्या काही प्रकरणांमध्ये इस्लामने आफ्रिका आणि युरोपमध्ये कसा पाशवी विस्तार केला आहे त्याची वर्णनं आहेत. फ्रान्समध्ये मुलींनी शाळेत हिजाब घालून जाणे यावरून सरकार विरुद्ध इस्लामी जनता अशा देशभर पेटलेल्या वादावर एक महत्त्वाचं प्रकरण आहे. त्यातली सगळी वर्णनं अगदी 'ओळखीची' वाटतात आणि इस्लामची पूर्वापार चालत आलेली कार्यपद्धती (modus operandi) लक्षात येते. त्याचबरोबर आफ्रिकेत सुदानमध्ये शरिया कायदा मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांक अशा ख्रिस्ती आणि इतर धर्मियांनाही लागू करण्यात यावा या एकमेव कारणावरून संपूर्ण सुदानला वर्षानुवर्षं युद्धाच्या तोंडी देणाऱ्या इस्लामी प्रवृत्तीचं चीड आणणारं तपशीलवार वर्णन वाचायला मिळतं.

एका प्रकरणात उझबेकिस्तान येथील बुखारा शहरातील अमीराच्या दुष्कृत्यांचा पाढाच वाचला जातो. साधारण पहिल्या महायुद्धानंतर घडलेल्या अनेक भयानक घटना वाचकांच्या भेटीस येतात. शरिया कायद्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या अमानुष शिक्षांचं वर्णन यात आहे. डोळे फोडणे, उंच मनोऱ्यावरून खाली टाकून देणे, कोरड्या पडलेल्या खोल विहिरीत टाकून देणे अशा काही शिक्षा नुसत्या वाचूनही वाचक हादरून जातो. बुखाऱ्याच्या अमीराचा स्त्रीलंपटपणा, नुकत्याच वयात आलेल्या शेकडो तरुण मुलामुलींना जनानखान्यात डांबून ठेवणे, अन्नपाण्याचे हाल करणे, कुठल्याही मुलीला ती एखादी वस्तू असल्याप्रमाणे कधीही कुठल्याही अधिकाऱ्याला दान म्हणून देणे आणि एकूणच अशा स्त्रियांच्या आयुष्याची झालेली परवड याविषयी काही अनुभव आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या अत्यंत भयानक अनुभवांतूनही तावून सुलाखून बाहेर पडलेल्या एका स्त्रीचा जबरदस्तीने जनानखान्यात डांबण्यापासून सुरु झालेला प्रवास, एका म्हाताऱ्या अधिकाऱ्याशी लग्न, तिथून सुटका, एका तरुण विक्षिप्त शेतकऱ्याशी लग्न आणि घटस्फोट आणि अखेरीस सोव्हिएट सरकारात ट्रेड युनियनची अधिकारी म्हणून नियुक्त होणे अशा सुखकर टप्प्यावर येऊन संपलेला पाहून वाचकाला निदान एक तरी सकारात्मक अनुभव वाचल्याचं समाधान मिळतं.

प्रत्येक घटना आणि प्रसंगाचे यथायोग्य संदर्भ देऊन तो तपशिलाने मांडणे आणि त्यानंतर त्या घटना किंवा निर्णयावरील इस्लामचा प्रभाव विशद करून सांगणे अशा सोप्या पद्धतीने लेखकाने समस्त जगाला पडलेल्या इस्लामच्या पोलादी विळख्याचं प्रत्ययकारी वर्णन केलं आहे. सर्व संदर्भ समकालीन असल्याने त्यांच्या सत्यतेविषयी संशय घ्यायला तीळभरही जागा उरत नाही हे अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. इस्लामचा जगभरातला प्रवास आणि प्रभाव याचा संक्षिप्त लेखाजोखा वाचण्याची इच्छा असलेल्या कोणीही आवर्जून वाचावा असा हा लेखसंग्रह, आपण नजीकच्या भविष्यात 'माळेतले मणी' बनून जायचं की या क्षणापासूनच योग्य ती पावलं उचलून अटळ भासणारा विनाश रोखायच्या प्रयत्नांना निदान सुरुवात तरी करायची हा निर्णय घेण्यात वाचकांना मदत करणारा ठरेल हे मात्र नक्की!

Saturday, March 25, 2023

ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : अमंग द मॉस्क्स


सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया अशी सर्वत्र घोडदौड करत असलेल्या इस्लामचा गेल्या सुमारे १०० वर्षांतला प्रामुख्याने इंग्लंडमधला प्रवास आणि प्रभाव याचं वर्णन एड हुसेन या लेखकाच्या Among the Mosques: A Journey Across Muslim Britain या पुस्तकात वाचायला मिळतं. जन्माने ब्रिटिश मुस्लिम असलेल्या लेखकाचे आईवडील हे बांग्लादेशी मुस्लिम आहेत. १९६१ मध्ये त्याचे आईवडील ब्रिटनमध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. एड हुसेनचं हे इस्लामविषयक तिसरं पुस्तक असून The Islamist आणि The House of Islam या दोन पुस्तकांत त्याची पूर्वाश्रमीची जडणघडण, इस्लामकडे आकर्षित होणं, इस्लामचा अभ्यास याबद्दल तपशीलवार माहिती आहे. कालांतराने त्यातला फोलपणा कळून आल्यानंतर इस्लामचा ब्रिटनमधला प्रवास जाणून घेण्याच्या दृष्टीने केलेला प्रवास सद्य पुस्तकात पाहावयास मिळतो.



या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखकाने युकेमधील महत्वाच्या मुस्लिमबहुल शहरांमधून प्रवास केला
, तेथील सामान्य नागरिक, प्रमुख व्यक्ती, मौलवी, राजकारणी, टॅक्सी ड्रॉयव्हर अशा सर्व लोकांशी चर्चा करून, त्यांना प्रश्नं विचारून, बोलतं करून त्यांच्या अनुभवांचं एकत्रीकरण करून इस्लामचा गेल्या साधारण १०० वर्षांमधला युकेमधला प्रवास शब्दबद्ध केला आणि अमंग द मॉस्क्स या आपल्या पुस्तकातून वाचकांसमोर आणला. ब्लॅकबर्न, ब्रॅडफर्ड, बर्मिंगहम, बेलफस्ट (नॉर्दर्न आयर्लंड), एडिनबर्ग आणि ग्लास्गो (स्कॉटलंड) आणि लंडन या प्रमुख मुस्लिम बहुल शहरांमधील अनेक धक्कादायक अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. या पुस्तकात त्या शहरांमधील आणि पर्यायाने ब्रिटनमधील मुस्लिम जीवन, त्यांच्या चालीरीती, कट्टरपणा, धर्मद्वेष्टेपणा या सगळ्यासगळ्याचे हादरवून सोडणारे अनुभव वाचायला मिळतात.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच परिचयाच्या प्रकरणात लेखकाने ब्रिटन आणि तेथील मुस्लिम लोकसंख्येचा धक्कादायक विस्फोट याची सप्रमाण माहिती दिली आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी फक्त दोन मशिदी असलेल्या इंग्लंडमध्ये आज किमान दोन हजार मशिदी आहेत. इंग्लंडमधील पहिली मशीद लिव्हरपूलमध्ये सन १८८९ साली उभारण्यात आली. इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केलेल्या २० ब्रिटिश मुस्लिमांनी तिची स्थापना केली होती. शंभर वर्षांपूर्वी फक्त दोन मशिदी असणाऱ्या इंग्लंडमधील लंडन, ल्युटन, बर्मिंगहम, ब्रॅडफर्ड, ड्यूसबरी, ब्लॅकबर्न, कीली, नेल्सन इत्यादी शहरांचं आकाश आता मशिदींचे घुमट, मिनार, मनोरे यांनी भरून गेलेलं आढळतं.




ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकस (
ONS) च्या अधिकृत आकडेवारीनुसार २००१ ते २०१६ या पंधरा वर्षांत संपूर्ण ब्रिटनची लोकसंख्या ४.९ कोटींवरून सुमारे ११ टक्क्यांनी वाढून ५.४ कोटींवर जाऊन पोचली मात्र याच कालावधीत ब्रिटनची मुस्लिम लोकसंख्या मात्र पंधरा लाखांवरून थेट बत्तीस लाखांवर गेली.
थोडक्यात १०७.३ टक्क्यांची अविश्वसनीय आणि धोकादायक वाढ !!! सन २०५० पर्यंत ब्रिटनची मुस्लिम लोकसंख्या एक कोटी तीस लाखांच्या वर जाऊन पोचेल असा अंदाज आहे. 


ब्लॅकबर्न

बर्मिंगहम, रॉशडेल, ब्रॅडफर्ड, कीली अशा अनेक शहरांमध्ये वर्षानुवर्षं स्थायिक झालेल्या पंजाबी आणि काश्मिरी मुसलमानांच्या हातात त्या शहरांची सर्व सत्ता एकवटलेली आहे. मतांच्या लाचारीपायी राजकारणी आणि स्थानिक नेतेही लाळघोटेपणा करत इथल्या काळ्या कृत्यांकडे दुर्लक्ष करतात.

लंडन, बर्मिंगहम, ब्लॅकबर्न ही ब्रिटनमधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेली काही शहरं आहेत. लुईस कॅसी कमिशनने २०१६ साली केलेल्या एका सर्वेक्षणात ब्लॅकबर्नबद्दलचे धक्कादायक निष्कर्ष सामोरे आले. या सर्वेक्षणानुसार ब्रिटनमध्ये अल्पसंख्यांक असलेले लोक (मुस्लिम) प्रत्यक्षात ब्रिटनच्या अनेक शहरांच्या उपनगरांमध्ये बहुसंख्यांक झाले आहेत आणि त्यात ब्लॅकबर्नचा क्रमांक सर्वात वरचा आहे. ब्लॅकबर्नच्या बास्टवेल आणि शिअरब्रो प्रभागांत मुस्लिम लोकसंख्या अनुक्रमे ८५% आणि ७८% झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ब्लॅकबर्नच्या एकूण एक लाख सतरा हजार लोकसंख्येमध्ये सुमारे पन्नास हजार लोकसंख्या मुस्लिमांची आहे. अजून एक महत्वाची आकडेवारी म्हणजे याच शहरात बेकारी ही ६% आहे जी ब्रिटनच्या राष्ट्रीय सरासरीच्या मानाने खूप अधिक आहे. आणि अर्थातच त्यामुळे गुन्हेगारी देखील आपोआपच खूप अधिक आहे. तिथे श्वेतवर्णीय लोकांवर रस्त्यांत उघडउघड हल्ले केले जातात. ब्लॅकबर्नमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिमांव्यतिरिक्त अन्य लोकांना प्रवेश नाही. थोडक्यात ते No-Go Areas आहेत.

ब्लॅकबर्नमध्ये मशिदींवरच्या भोंग्यांना कुठलीही आडकाठी नाही परंतु श्वेतवर्णीय ब्रिटिश लोकांना मोठ्या आवाजात गाणी लावायला परवानगी नाही. इतकंच नव्हे तर तेथील नागरिकांना त्यांच्या देशाचा युनियन जॅक फडकवण्याचीही परवानगी नाही. सरकार मुस्लिमांना वर्णद्वेषी, जातीयवादी वाटू नये म्हणून घेण्यात आलेली खबरदारी आहे ही !!

ब्लॅकबर्नमधल्या एका मदरश्यातल्या शिक्षणाला कंटाळून मदरश्याला रामराम ठोकलेल्या एका तरुण मुलाशी बोलताना लेखकाला बरीच विचित्र माहिती कळली. खऱ्या जगातील सर्व झगमगाटापासून आणि प्रलोभनांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवून फक्त इस्लामचा अभ्यास करायला लागलेल्या या तरुण मुलाला आपल्या आयुष्यातली महत्वाची पाच वर्षं वाया गेल्याची जाणीव झाली. कारण पाच वर्षं  इस्लामचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या हे लक्षात आलं की खऱ्या जगातल्या स्पर्धेला सामोरं जाण्याच्या दृष्टीने आवश्यक असं कुठलंही शिक्षण किंवा कौशल्य त्याच्या ठायी नाही. त्याच्या पालकांना पाच वर्षं लुटण्यात आलं. संपत्ती, जमीजुमला, ऐश्वर्य, स्त्रिया या सर्वांना नावं ठेवणाऱ्या त्याच्या शिक्षकाची स्वतःची मात्र अनेक घरं आणि अनेक बायका आहेत. नैराश्याने भरून गेलेले असे नवीन पिढीतील अनेक तरुण या शहरात आढळतात.

ब्रॅडफर्ड

त्यानंतर लेखक ब्रॅडफर्ड या शहरात येऊन पोचतो. ब्रॅडफर्डमधल्या मशिदींचा अधिकृत आकडा हा १०३ आहे. तेथील उपाहारगृहं, क्लब्ज, बार, डिस्को आता बंद झाली आहेत. १९९१ आणि २००१ साली शहरात झालेल्या कुप्रसिद्ध दंगलींनंतर शहरातील BMW चं मोठं शोरूम बंद झालं. इतकंच नव्हे तर कुठलाही मोठा कारचा ब्रँड आता त्या शहरात प्रवेश करत नाही. खुद्द पोलीस स्टेशनच्या बाहेर सुस्वागतम/welcome च्या ऐवजी 'खुशामदीद' लिहिलेले उर्दू फलक लागलेले आहेत.

वर्किंग मेन्स क्लब च्या जागी आता लाला'ज वेडिंग हॉल आलाय तर मेलबर्न पबची जागा एशियन फर्निचर शॉपने घेतली आहे. एका जुन्या पबच्या जागी शहाजलाल लतिफीया मशीद आहे तर अन्य एका पबच्या जागी अल-खिद्र कार्पेट्स चं दुकान उघडण्यात आलंय. मेन्स क्लबच्या जागी आता नौशाही जवीया मशीद आहे तर डॉल्स अँड डान्सिंग क्लब च्या ठिकाणी धांगरी शरीफ मशीद उभं राहिलंय  

या सगळ्या मशिदींमध्ये काश्मीर, पॅलेस्टाइनमध्ये मुस्लिमांवर होत असलेले तथाकथित अत्याचार सांगून तरुणांची माथी भडकावण्याची कामं नित्यनियमाने सुरु आहेत. किताब-अत तवहीद हे खुद्द सौदी सरकारने बंदी घातलेलं इस्लाम आणि सलाफीविषयक जहाल पुस्तक इथल्या मशिदींमध्ये राजरोसपणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

गरीब कुटुंबियांना सरकारतर्फे दिला जाणारा गरिबी भत्ता हा त्या कुटुंबातील मुलांपर्यंत पोचत नाही. हे सरकारी पैसे काश्मीरमध्ये पाठवून काश्मीरमध्ये एक तर नवीन दुकानं उघडली जातात किंवा टॅक्सीज घेतल्या जातात. इथल्या मुलांचे खाण्यापिण्याचे, कपड्यांचे हाल मात्र होतंच राहतात. अपंग मुलांसाठी देण्यात येणार सरकारी पाकिस्तनी भत्त्याचाही इथले पाकिस्तानी लोक असाच गैरवापर करतात. इथल्या अनाथ, अपंग मुलासाठी देण्यात आलेले सगळे पैसे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवले जातात.

२०१६ मध्ये सलमान रश्दी यांचं पुस्तक ब्रॅडफर्डच्या रस्त्यावर जाळण्यात आलं. त्याविरुद्ध लेख लिहून आवाज उठवणाऱ्या 'ड्रमंड रोड स्कुल' या शाळेचे  मुख्याध्यापक श्री हनीफर्ड यांना तडकाफडकीने नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. ब्रॅडफर्डचा तत्कालीन महापौराचं नाव 'मोहम्मद अजीब' होतं हा खचितच योगायोग नसावा. त्या शाळेला भेट देण्याच्या मिषाने तिथे पोचलेल्या लेखकाला अत्यंत धक्कादायक अनुभव आले.

'ड्रमंड रोड स्कुल' चं आता IQRA असं नामांतर झालं आहे असं लेखकाला कळलं. दर्शनी खिडकीवर 'Free Palestine' असं लिहिलं असलेल्या त्या शाळेच्या शेजारी आता काश्मिरी हॉल असून दुसऱ्या बाजूला पाकिस्तनी स्टोर आहे. शाळेच्या समोर मशीद बिलाल मदरसा असून मागच्या बाजूला अल मरकज उल इस्लामी ही शाळा सुरु झाली आहे.

IQRA हा उर्दू शब्द असून कुराणात त्याचा उल्लेख आहे. त्याचा अर्थ 'वाच' असा असून ही मोहम्मद पैगंबरांना कुराण वाचण्याची करण्यात आलेली आज्ञा आहे हे जेव्हा लेखक आपल्याला सांगतो तेव्हा खरा धक्का बसतो. 'ड्रमंड रोड स्कुल' चं IQRA असं नामकरण का झालं असावं याचं उत्तर थेट शाळेकडूनच जाणून घेण्याचं लेखक ठरवतो. दुसऱ्या दिवशी शाळेच्या दूरधवनी क्रमांकावर फोन करून "शाळेचं नामकरण IQRA असं उर्दू भाषेत का झालं?" असा थेट प्रश्न केल्यावर मिळणारं उत्तर अजूनच चक्रावून टाकणारं असतं. शाळेच्या मते IQRA हा उर्दू शब्द नसून ते Improvement, Quality, Respect and Achievement याचं लघुरूप आहे. "उर्दू IQRA शब्दाशी याचा काहीच संबंध नाही का?" अशी थेट पुन्हा एकवार विचारणा केल्यावर शाळेचं उत्तर असतं की "ही इस्लामी शाळा नसली तरी इथे शिकणारे अधिकतर विद्यार्थी हे मुस्लिम आहेत. त्यामुळे IQRA या शब्दाचा दोनपैकी कुठलाही अर्थ आपण घेऊ शकतो." !!!

बर्मिंगहम

त्यानंतर लेखक आपला मोर्चा बर्मिंगहम या शहराकडे वळवतो. बर्मिंगहममध्ये Boots, Tesco, Sainsbury’s, Aldi असे कुठलेही लोकप्रिय ब्रिटिश ब्रॅण्ड्स आढळत नाहीत. मात्र हलाल मटणाची दुकानं, हिजाब/बुरखे विकणारी दुकानं, इस्लामी पुस्तकं आणि भेटवस्तू विकणारी दुकानं यांची इथे रेलचेल आहे. बिस्मिल्लाह बिल्डिंगमध्ये असलेल्या जमशेद क्लोदिंग हाऊसच्या बाहेर चेहऱ्यापासून पायापर्यंत पूर्ण कपड्यांत झाकून ठेवण्यात आलेले स्त्रियांचे mannequins आहेत. जुनेद जमशेद या वादग्रस्त पाकिस्तानी गायकाच्या नावाने असलेल्या कपड्यांच्या दुकानात 'शुद्ध इस्लामी' पद्धतीचे कपडे मिळतात. मदिना गिफ्ट शॉप नावाची दुकानं तर जागोजागी दिसतात. एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या जुन्या घरांचं रूप आता बदललंय. सगळी घरं इस्लामी झाली आहेत. जवळपास प्रत्येक घराच्या अंगणात किंवा खिडकीत 'या रसूल अल्ला', 'माशा अल्ला', 'बिस्मिल्ला' असे फलक लागलेले आढळतात. मक्केच्या काबाचे फोटो तर जवळपास प्रत्येक घराच्या बाहेर टांगलेले किंवा रंगवलेले आढळतात. इथले अनेक तरुण सीरियामध्ये जाऊन आयसिस या इस्लामी अतिरेकी संघटनेत सामील झाले आहेत.

बेलफस्ट, एडिनबर्ग, ग्लास्गो आणि इतरही अनेक महत्वाच्या शहरांमध्ये लेखकाला सर्रास होणाऱ्या इस्लामी लग्ना (निकाह) च्या घटना आढळल्या. ब्रिटनमधील जवळपास प्रत्येक मशिदीत इस्लाममान्य अशा शरिया पद्धतीने लग्ने लावली जातात. परंतु यातील कुठल्याही लग्नाची ब्रिटिश कायद्यान्वये नोंदणी केली जात नाही तर ती फक्त शरिया निकाह म्हणूनच राहतात. या पद्धतीमुळे स्त्रियांना धोका असतो. ब्रिटिश कायद्यान्वये लग्न न झाल्याने भविष्यात लग्न मोडायची वेळ आल्यास पुरुष पोटगी, मुलांच्या संगोपनाचा खर्च अशा कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेला बांधील राहत नाही. सरळ तलाक देऊन पुढचं लग्न करण्यास तो मोकळा मोकळा होतो. अशा वेळी अनेकदा स्त्रियांना स्वतःच्या मुलांचा ताबाही मिळत नाही.

कुठल्याही प्रकारच्या कायद्याचा धाक नसल्याने अशा प्रकारची लग्नं करण्याची प्रक्रियाही अतिशय सोपी आहे. मुस्लिम स्त्री-पुरुषांचे पासपोर्टस, मेहर (हुंडा) म्हणून पुरुषाने स्त्रीला काहीएक रक्कम देण्याची तयारी, जन्माला येणारी अपत्यं मुस्लिम म्हणूनच वाढवण्यात येतील अशी खात्री आणि दोन मुस्लिम पुरुष साक्षीदार (स्त्री साक्षीदार चालत नाहीत) आणले की हे निकाह लावले जातात. आणि हे अशा प्रकारचे निकाह करण्याच्या प्रकरणांत अगदी सुशिक्षित लोकांचाही अपवाद नाही. हे सर्रास सगळीकडे, सर्व आर्थिक, सामाजिक स्तरांमध्ये चालतं.

ग्लास्गो

लेखकाला ग्लास्गोमध्ये आलेला एक अनुभव तर ब्रिटिश मुस्लिमांच्या निष्ठा कुठल्या दिशेने आहेत यावर सुस्पष्टपणे प्रकाश टाकतो. ग्लास्गोमध्ये एका मशिदीत लेखकाला मेजर अब्दुल्ला बटल नावाचा एक ब्रिटिश मुस्लिम सैनिक भेटला. त्याने विषण्ण करणारे अनुभव सांगितले. इराक युद्धातून परत आलेल्या ब्रिटिश मुस्लिम सैनिकांवर इथल्या मुस्लिम जनतेने हल्ले केले, त्यांच्या अंगावर थुंकण्यात आलं. कारण एकच की ते मुस्लिम असूनही इराकमधल्या मुस्लिम लोकांशी लढले. मेजर अब्दुल्लाच्या तीन पिढ्या ब्रिटिश सैन्यात आहेत. आणि तरीही तो सैन्यात आहे हे तो ज्या मशिदीत नमाज पढायला येतो तिथे उघडपणे कोणालाही सांगत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने मुस्लिमांशी लढणारे मुस्लिम सैनिक (ब्रिटिश असले तरी) धर्मद्रोही आहेत.       

लंडन

लंडनमध्ये पाहिली मशीद बांधायला परवानगी देऊन, वर त्या मशिदीला भरघोस आर्थिक मदत करण्याचं 'पुण्यकर्म' हे अनेकांना प्रातःस्मरणीय असलेल्या विन्स्टन चर्चिल याच्या नावे आहे. १९४० साली बांधण्यात आलेल्या या मशिदीकडे आखाती देश आणि तिथल्या मुस्लिम लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल यादृष्टीने या घटनेकडे बघितलं गेलं. 

लंडन हे ब्रिटनमधलं सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेलं शहर आहे. दुकानं, टॅक्सी, बँका, हॉटेल्स इत्यादी सर्वत्र त्यांचं वर्चस्व आहे. लंडनमध्ये शिया जमातीचंही भरपूर प्रस्थ आहे. मोहरमच्या वेळी काढण्यात आलेल्या मोठ्या मिरवणुकीचं (जलूस) वर्णन करताना लेखकाने त्याला आलेले धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. मोहरमच्या आदल्या दिवसापासून लंडनच्या प्रमुख वस्तीत असलेल्या मोठ्या मशिदीपासून ते मोठ्या रस्त्यापर्यंतचा सगळा परिसर बंद केला जातो. चौकाचौकातून दुसऱ्या दिवशीच्या मोहरमच्या मिरवणुकीचे फलक पोलीस स्वतः लावतात. दुसऱ्या दिवशी कित्येक तास आरडाओरडा करत, गोंधळ घालत ती मिरवणूक चालू असते. त्यात शिया जमातीचा प्रेषित अली च्या मृत्यूनिमित्त शोक व्यक्त केला जातो. पुरुष, लहान मुलं, स्त्रिया स्वतःला जखमा करून घेतात. मिरवणुकीतही स्त्रियांची जागा दुय्यमच असते. स्त्रिया मिरवणुकीच्या शेवटी चालत असतात.

मिरवणूक संपल्यावर लेखक त्या मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या अनेक घरांमध्ये जातो आणि तेथील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ती मिरवणूक, आरडाओरडा, मारामारी,  स्त्रियांना दिली जाणारी वागणूक या सर्वांबद्दल सर्व रहिवाश्यांच्या मनात अतिशय चीड आहे. परंतु त्याविरोधात काहीही करू शकत नसल्याने सगळेजण हतबलही आहेत. नगरपालिका, पोलीस यांच्याकडे या विरोधात तक्रार केली तर तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण मुस्लिमांविरुद्ध काही कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस आणि प्रशासनावर जातीयवादी आणि इस्लामोफोबिक असल्याचे आरोप होतात. त्यामुळे त्या भीतीने त्यांच्या विरोधात कोणीही काहीही कारवाई करत नाही. "हे लोक आमच्या देशाचा सर्वनाश करणार आहेत!!." अशी तिथल्या नागरिकांची सार्वत्रिक भावना आहे.

२०१२ मध्ये ब्रिटनमध्ये एक प्रचंड मोठं लैंगिक शोषणाचा प्रकरण (सेक्स स्कॅण्डल) उघडकीस आलं ज्यात २० ते ५० वयोगटतल्या शेकडो पाकिस्तानी पुरुषांनी संपूर्ण इंग्लंडभर १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या सुमारे एकोणीस हजार मुलींचं वर्षानुवर्षं, वारंवार, सतत लैंगिक शोषण केलं, त्यांना धमक्या दिल्या, मारहाण केली, बलात्कार केले. कैक घटनांमध्ये दुर्दैवी मुली आणि त्यांचे पालक यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे असंख्य तक्रारी केल्या. परंतु एकही तक्रारीची दखल घेतली गेली नाही. कारण एकच.. "इस्लामोफोबिया आणि जातीयवादी असण्याचा आरोप होण्याची भीती".  या लैंगिक शोषणाच्या दुर्दैवी प्रकरणात सुमारे १९००० अल्पवयीन ब्रिटिश मुलींवर अत्याचार झाले असा अंदाज आहे.

या लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, अनेक चित्रपट आणि माहितीपट प्रदर्शित करण्यात आले.

पुस्तकं

Just a Child: Sammy Woodhouse

Broken and Betrayed: Jayne Senior

Pimped : Samantha Owens

Girl for Sale: Lara McDonnell

Three Girls (मिनिसिरीज)

Betrayed Girls (माहितीपट)


ब्रिटनची सद्यस्थिती

लंडन, बर्मिंगहम, ब्रॅडफर्ड, ग्लास्गो, मँचेस्टर, रॉशडेल, ड्यूसबरी या आणि अशा अनेक शहरांमधली हजारो मुस्लिम कुटुंबं बँका ते हॉस्पिटल आणि किराणासामान ते टॅक्सी अशा रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा या मूळ ब्रिटिश लोकांशी महिनोंमहिने कुठल्याही प्रकारचा संबंध न ठेवताही सहजपणे उपभोगू शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण मुस्लिमांची हलाल पासून ते बँकिंग, किंवा डेटिंग अप्स पर्यंत अशी स्वतंत्र आणि समांतर अशी अर्थव्यवस्था त्यांनी उभी केली आहे. इजिप्त, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये कदाचित नसेल इतकं मदरश्यांचं पेव ब्रिटनमध्ये फोफावतंय! शाळा, उपाहारगृह, बँका, अन्नपदार्थ, टीव्ही वाहिन्या या सगळ्या सगळ्या अधिकाधिक 'इस्लामी' बनण्याचा प्रयत्न करतायत. मदरसे, मशिदींना अधिकाधिक आर्थिक मदती केल्या जातायत, त्यांना अजून जास्त करसवलती दिल्या जातायत.

लंडनच्या शाळाशाळांमध्ये इस्लामचं अंधप्रेम आणि अन्यधर्मीय (काफर) विद्यार्थ्यांविषयी कमालीच्या द्वेषाने भरलेलं वातावरण असतं. मुस्लिम पालक आपल्या पाल्यांना शाळेतल्या नाताळाच्या कार्यक्रमात भाग घेऊ देत नाहीत. अक्षरशः पाच वर्षांच्या मुलींना सक्तीने हिजाब बांधून शाळेत पाठवलं जातं. त्यांना त्यांच्या हिंदू मित्र-मैत्रिणींशी खेळायला मज्जाव केला जातो कारण इस्लामच्या मते हिंदू वाईट/अस्वच्छ असतात. पोहणे किंवा अन्य कुठल्याही मैदानी खेळांमध्ये मुस्लिम मुलींनी भाग घेण्यास पालकांचा सक्त विरोध असतो. नाताळच्या वेळी म्हणण्यात येणाऱ्या गाण्यांच्या कार्यक्रमात मुस्लिम विद्यार्थ्यांनी भाग घेऊ नये अशा सक्त सूचना तर त्यांचे पालक करतातच पण चुकूनही ती गाणी कानांवर पडू नयेत म्हणून गाणी चालू असताना दोन्ही कानांमध्ये बोटं घालून बसण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. यातल्या कुठल्याही प्रकाराला शिक्षक आक्षेप घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाही. कारण तसं केल्यास त्यांना जातीयवादी किंवा इस्लामविरोधक ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे हे प्रकार शांतपणे बघत बसण्याव्यतिरिक्त त्यांना काहीही करता येत नाही.   

या असल्या प्रकारच्या वातावरणात ब्रिटनची पुढची पिढी वाढते आहे. अर्थात ती ही आत्ताच्या पिढीएवढीच किंबहुना अधिकच कट्टर आणि कडवी होणार हे नक्की. सन २०२० मध्ये ब्रिटिश सुरक्षा यंत्रणेने घोषित केलं की ते किमान त्रेचाळीस हजार संशयित अतिरेक्यांवर नजर ठेवून आहेत आणि त्यातले ९०% हे मुस्लिम आहेत.

भविष्य
एकूण चित्र फार विदारक आहे. सुरुवातीच्या काही शतकांमध्ये तलवारींच्या जोरावर रक्तपात करत जगभर पसरलेल्या इस्लामला रक्तविहीन क्रांती करण्याचा, संपूर्ण जगाचं  रूपांतर 'दार उल इस्लाम' अर्थात इस्लामची भूमी म्हणून करण्याचा एक अतिशय सोपा आणि तितकाच प्रभावी असा मार्ग सापडला आहे. ते त्यांच्या मार्गाने अविरतपणे चालतायत. प्रश्न हा आहे की जग डोळे उघडणार आहे का? या अक्राळविक्राळ जागतिक समस्येवर उपाय शोधणं ही तर पुढची बाब झाली पण आधी ही समस्या अस्तित्वात आहे हे तरी आपण मान्य करणार आहोत का? आपल्या उत्तरावर आपला आणि आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाळ अवलंबून आहे हे नक्की!

-हेरंब ओक

Saturday, February 25, 2023

भारत-पाकिस्तान ते कोरिया-जपान.... व्हाया चीन

गेल्या एक-दीड महिन्यांत दोन अप्रतिम पुस्तकं वाचण्याचा योग आला. अक्षरशः खिळवून ठेवणारी, हतबुद्ध करून सोडणारी! एक फिक्शन कादंबरी आणि दुसरं म्हणजे आत्मचरित्र. कादंबरी आहे ती ही भारतात घडलेल्या एका महत्त्वाच्या घटनेवर आणि त्या घटनेच्या अनुषंगाने घडलेल्या अनेक लहान मोठ्या तपशीलांबाबत महिती देणारी तर आत्मचरित्र आहे ते एका उत्तर कोरियन व्यक्तीचं.

८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पंतप्रधानांनी निश्चलनिकरणाची ऐतिहासिक घोषणा केली. या महत्त्वाच्या घटनेला मध्यवर्ती ठेवून श्री अय्यर यांनी 'हू पेंटेड माय मनी व्हाईट?' ही कादंबरी लिहिली. निश्चलनिकरण, त्याची कारणं , आवश्यकता, अनिवार्यता, परिणाम अशा अनेक अंगांना लेखाने या पुस्तकात स्पर्श केला आहे. भारतीय राजकारणातील अनेक चिरपरिचित पात्रं, त्यांचे स्वभाव, लकबी घेऊन आणि मूळची नावं किंचितच बदलेल्या स्वरूपात आपल्याला भेटतात. त्यात चिदंबरम पासून ते सोनिया आणि मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

भारतीय चलनाची छपाई करण्यासाठीच्या एका यंत्राच्या (LEPE Machine) गुप्त लिलावाच्या घटनेपासून पुस्तकाला सुरुवात होते आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला आणि अखेरीस एकेक नवीन धक्का वाचकांना बसत जातो. अनेक घटनांची मांडणी असूनही वेगवान हाताळणीमुळे पुस्तक कुठेही आणि किंचितही कंटाळवाणं होत नाही. काही वेळातच कोट्यवधी खोट्या नोटा घेऊन केरळच्या किनाऱ्यावर पोचणारं जहाज, त्या पैशाचं शिताफीने आणि अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आलेलं वाटप अशा अविश्वसनीय घटनांबद्दलच्या माहितीबरोबरच त्या पैशाचा लव्ह-जिहाद, लॅन्ड-जिहाद, दहशतवादी उद्योग इत्यादींनासाठी केला जाणार वपर आणि या सगळ्यात पाकिस्तानचा असणारा थेट सहभाग  याविषयी अतिशय खुलेपणाने मांडणी केलेली आढळते. त्याच्याच जोडीला, दरम्यानच्या काळात भारतीय राजकारणात घडणाऱ्या घटना आणि राजकारण्यांचे निर्ल्लज उद्योग वाचताना अक्षरशः संताप येतो.

श्री अय्यर

श्री अय्यर यांच्या मनी सिरीजमधील हे पाहिलं पुस्तक असून दुसरं पुस्तक 'हू पेंटेड माय लस्ट रेड?' हे आयपीएल मधील राजकीय लागेबांधे आणि भ्रष्टाचारावर आधारित आहे. तर तिसरं पुस्तक 'हू पेंटेड माय फ्युचर ब्राईट?' असून ते भारतीय राजकारणातील नजीकच्या भविष्यकाळात घडू शकणाऱ्या घटनांबद्दल आहे. ही  दोन पुस्तकंदेखील लवकरच वाचण्याचा मानस आहे.  

'हू पेंटेड माय मनी व्हाईट?' मध्ये असंख्य छोटे छोटे तपशील आहेत आणि अनेक राजकीय घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघितलं गेलं आहे. त्यामुळे अधिक लिहिण्यापेक्षा हे पुस्तक आवर्जून वाचावं असं मी सांगेन. या पुस्तकाचा अनुवादही उपलब्ध असून घातसूत्रचे लेखक श्री दीपक करंजीकर यांनी 'विघ्नाविराम' या नावे तो केला आहे.

=======================================

'अ रिव्हर इन डार्कनेस' 


'अ रिव्हर इन डार्कनेस' या मासाजी इशिकावा (Masaji Ishikawa) लिखित आत्मचरित्रात उत्तरकोरियाच्या 

कम्युनिस्ट हुकूमशाही सरकारच्या राजवटीत असंख्य हालअपेष्टा आणि भ्रष्टाचार आणि उपासमार यामुळे मरणोन्मुख झालेल्या जनतेचं अत्यंत भयकारी चित्रण आहे. लेखकाचे वडील मूळचे दक्षिण कोरियन असून आणि आई जपानी होती. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या जपानच्या पराभवानंतर सुमारे चोवीस लाख कोरियन सैनिक जपानमध्ये अडकून पडले ज्यात लेखकाचे वडीलही होते. कालांतराने त्यांचं स्थानिक जपानी मुलीशी लग्न होतं. काही वर्षांनी जपानमध्ये अडकलेल्या कोरियन नागरिकांना जवळपास जबरदस्तीनेच उत्तर कोरियाला नेण्यात येतं, ज्यात जपान सरकारचाही अप्रत्यक्ष सहभाग होता.

उत्तर कोरिया म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग असून तिथे जाणं हे जणू  प्रत्येक कोरियन नागरिकाचं कर्तव्यच आहे हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात उत्तर कोरियाला पोचल्यानंतर स्वर्ग तर राहोच पण किमान नागरी सुविधा आणि प्राथमिक गरजा पूर्ण होण्याच्या बाबतीतही तिथे कशी मारामार आहे हे लेखकाच्या कुटुंबियांच्या लक्षात येतं. त्यात पुन्हा जपानमधून आलेले (Returnees) म्हणून कोरियन सरकार आणि जनतेकडून या लोकांना सदैव दिली जाणारी वाईट वागणूक आणि केला जाणारा भेदभाव यामुळे मूळची वाईट परिस्थिती अधिकच भयानक होते.

दिवसचे दिवस होणारी उपासमार, लहान मुलांचं कुपोषण, सरकारी अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी आणि तरीही सतत स्वस्तुतीत मग्न असणारं सरकार पाहून जॉर्ज ऑरवेलच्या १९८४ ची प्रकर्षाने आठवण येते. ऑरवेलने काल्पनिक म्हणून लिहिलेय कादंबरीतील कित्येक घटना उत्तर कोरियात प्रत्यक्षात जशाच्या तशा घडताना पाहून धक्का तर बसतोच पण ऑरवेलच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटल्यावाचूनही राहत नाही. 

मासाजी इशिकावा 

असंख्य लटपटी, खटपटी, मानहानी, अपमान, जवळच्यांचे मृत्यू, आत्महत्येचा प्रयत्न अशा अनेक अविश्वसनीय आणि हेलावून टाकणाऱ्या घडामोडींनंतर लेखकाची उत्तर कोरियातील आणि चीन यांच्या मध्ये वाहणारी यालु नदी जीवाच्या करारावर ओलांडून जाऊन चीनमार्गे जपान मध्ये प्रवेश करण्याची तयारी होते. पुस्तकाच्या अखेरीस का होईना भेटणाऱ्या काही चांगल्या व्यक्ती आणि नशिबाची साथ यामुळे लेखकाचा उत्तर कोरियातील छत्तीस वर्षांचा नरकवास संपुष्टात तर येतो परंतु त्याचबरोबर एक नवीन दुःख त्याची सदैव सोबत करणार असतं.


अतिशय आनंद आणि तितकंच टोकाचं दुःख अशा एका विचित्र मनस्थितीत वाचकाला ठेवून पुस्तक संपतं. शेवटची ओळ वाचून झाली तरी मासाजी इशिकावा आणि त्यांच्यासारख्या असंख्य दुर्दैवी जीवांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी भोगलेल्या अतीव हालअपेष्टा वाचून वाचकांच्या मनात दाटून येणारी विषण्णता काही केल्या जात नाही आणि त्याच वेळी निव्वळ एका चांगल्या देशात जन्म घेतल्याने अन्य लोकांपेक्षा आपण किती सुदैवी आहोत हाही विचार मनात आल्यावाचून राहत नाही!

-हेरंब ओक

इस्लाम ते सनातन, घरवापसीचा एक अविश्वसनीय प्रवास!

 "इथे आत्ता माझ्यासमोर अनेक पालक बसलेले आहेत ज्यांची मुलं सज्ञान वयाची असतील" तोडक्या मोडक्या हिंदीत व्यासपीठावरून एक प्रश्न येत ह...