Showing posts with label उचलेगिरी. Show all posts
Showing posts with label उचलेगिरी. Show all posts

Sunday, April 18, 2010

पुन्हा चोरशील ??

आजपासून एक नवीन ब्लॉग सुरु करतोय. पण ब्लॉगची जाहिरात करण्यासाठी वगैरे म्हणून ही पोस्ट लिहीत नाहीये. हा ब्लॉग आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षेने आणि खात्रीनेच हे पाउल उचलतो आहे. ब्लॉगचे तपशील पुढीलप्रमाणे 

ब्लॉगचं नाव : पुन्हा चोरशील
पहिली पोस्ट : पहिली चोरी

तीच पोस्ट इथे खाली चिकटवतो आहे.
---------------------------------------------------------------------------------------
गेल्या ५-६ महिन्यांत मराठी ब्लॉग्सच्या जगात मुक्त मुशाफिरी करताना एक लक्षात आलं की इथे एकापेक्षा एक सशक्त लेखन करणारी मंडळी आहेत. नुसतं वाचक म्हणून इथे वावरलो तरीही आपल्या साहित्यविषयक किंवा एकूणच जीवनविषयक ज्ञानात, अनुभवात खूप भर पडेल, पडते आहे. पण दुर्दैवाने लवकरच हेही लक्षात आलं की इथे असे एकसेएक भन्नाट लिहिणारे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक ते लेखन सरळ, जसंच्या तसं, मूळ लेखाचा आणि मूळ लेखकाचा साधा उल्लेखही न करता, त्यांना योग्य ते श्रेय न देता बिनदिक्कतपणे आपल्या ब्लॉगवर टाकणारे, कॉपी+पेस्ट करून इमेल मध्ये चिकटवून फॉरवर्ड करणारे आहेत. अनेक महिने वेगवेगळया अनेक ब्लॉग्सचं वाचन केल्याने (जवळपास) प्रत्येक ब्लॉगरची भिन्न, युनिक शैली, विषय, मांडणी, रचना आणि एकूणच लेखन यामुळे ते लेखन त्या त्या ब्लॉगवर न वाचता (दुर्दैवाने आणि चुकूनमाकून) इतर कुठे वाचायची वेळ आली तरी मूळ लेखक सहज ओळखता येऊ लागला. सुरुवातीला काय करावं ते न कळल्याने 'हे असं चालायचंच' असं वाटून त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्ष केलं गेलं. पण बघता बघता या गोष्टी वारंवार होतायत असं लक्षात यायला लागलं किंवा अशा बाबतीत नजर थोडी जास्तच शोधक बनल्याने अशा चोर्‍या (यापेक्षा सौम्य शब्द मला तरी माहित नाही) जास्तच चटकन दृष्टीस पडू लागल्या. आणि एक दिवस चक्क माझ्याही कवितेची दुसर्‍या एका अशी चोरी झाल्याचं लक्षात आलं. तेव्हा मग त्या ब्लॉगच्या त्या पोस्ट वर जाऊन मी आणि आपल्या ब्लॉगु-ब्लगिनींनी अनेक प्रतिक्रिया देऊन मूळ कवितेची लिंक दिली. कालांतराने त्या ब्लॉगमालकाने माफीही मागितली. पण एक लक्षात आलं की हा प्रकार आपल्या नजरेस पडला म्हणून आपण तिथे जाऊन प्रतिक्रिया देऊन आणि आपल्या मित्रांना प्रतिक्रिया द्यायला सांगून त्या ब्लॉगमालकाला त्याची चूक मान्य करायला भाग पडू शकलो. पण असे असंख्य गुणी लेखक/लेखिका असतील की ज्यांच्या लेखनाच्या रोज चोर्‍या होत असतील आणि त्या बिचार्‍यांना आपलं लिखाण दुसरा कोणीतरी परस्पर आपल्या नावावर खपवून उगाच आपलं श्रेय लाटतोय याची कल्पनाही नसेल. तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा अशा चोर्‍या नजरेस पडल्या तेव्हा तेव्हा त्या लेखाखाली जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायला लागलो. तर बयाच वेळा अशा प्रतिक्रिया दिल्यावर ते ब्लॉगमालक ती पोस्ट अपडेट करून लगेच मूळ लेखकाचं नाव आणि मूळ लेखाची लिंक द्यायला लागले. पण सगळ्यांचं कारण जवळपास एकच असे की "मला हा लेख/कविता इमेल मधून आली होती आणि तिथे मूळ लेखकाचं नाव नव्हतं." खरंतर मूळ लेख शोधणं आजच्या गुगल जमान्यात अजिबात अवघड नाही हे वेगळं सांगायला नको. असो. पण सगळेच जण असे लगेच माफी मागणारे नव्हते. याच्या उलट अनुभवही आले. चोराच्या ब्लॉगवर जाऊन तिथे त्याला मूळ लेखनाबद्दल माहिती करून देणारी प्रतिक्रिया दिली की ती प्रतिक्रिया कधी प्रकाशितच केली जायची नाही. उलट इमेल मधून धमक्या यायच्या की "या ब्लॉगवरील लेखन माझे आहे असं मी कुठेच म्हटलेलं नाही. हा ब्लॉग म्हणजे माझ्या आवडत्या लेखांचा, कवितांचा संग्रह आहे. प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करत जा."  असा उद्धटपणाआड लपलेला साळसूदपणाचा आव आणला जायचा. किंवा कधी कधी तर त्या लेखावर "वा वा ", "सुंदर..", "फारच छान.. खूप आवडलं." अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जायच्या पण मूळ लेखनाचा दुवा दिलेली प्रतिक्रिया मात्र हटकून प्रसिद्ध केली जायची नाही. हे असं झालं की संताप व्हायचा. तेव्हा मग मी अजून एक प्रकार करणं सुरु केलं. मूळ लेखकाच्या ब्लॉगच्या त्या लेखावर जाऊन त्याच्या खाली "आपला हा लेख अमुक अमुक ब्लॉगवर चोरीला गेला आहे"' असं लिहून चोरट्या ब्लॉगची लिंक द्यायचो. ही मात्रा मात्र बरेचदा काम करायची. मूळ लेखकाने चोरट्याला मेल/प्रतिक्रिया देऊन खडसावाल्यावर बरेच (सगळे नव्हे. तरीही शिरजोरी करणारेही अनेक बघितले) चोर सरळ व्हायचे आणि मग त्यांच्या ब्लॉगवरून तो लेख काढून टाकायचे. यातला एकही प्रसंग उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी दिलेला नाही. प्रत्येक चोरीचे/मेलचे/प्रतिक्रियांचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण मुद्दामच मी आत्ता इथे एकाही ब्लॉगचं, लिंकचं, लेखकाचं नाव देत नाहीये. कारण जवळपास बरीच प्रकरणं मिटलेली आहेत. तर हे असं पुन्हा पुन्हा झालेलं बघितल्यावर मात्र काहीतरी करायला हवं हा विचार डोक्यात घुमायला लागला. "आपण साधे मराठी ब्लॉगर. आपण काय करणार?" असा विचार मनात येतो ना येतो तोच त्याचं उत्तर मिळालं. आपण ब्लॉगर .. आपण काय करणार?? सोप्प आहे. आपण नवीन ब्लॉग सुरु करणार. हो हो.. नवीन पोस्ट नाही.. नवीन कोरा करकरीत ब्लॉग. कशासाठी?? तर या अशा चोर्‍या सगळ्यांसमोर याव्यात यासाठी. अशा चोर्‍या सगळ्यांसमोर आल्या की आपोआपच त्या कमी होतील. अर्थात पूर्ण नाहीशा होतील असं नाहीच. प्रमाण तरी कमी होईल. तेवढाच आपला खारीचा वाटा.
थोडक्यात काय तर जेव्हा जेव्हा आपल्याला अशी चोरी दिसेल तेव्हा आधी नेहमीप्रमाणे मूळ लेखावर जाऊन चोरीच्या लेखाची आणि चोरीच्या लेखावर जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायची. १-२ दिवस वाट बघूनही चोरीच्या ब्लॉगमालकाचं काही उत्तर आलं नाही तर ती चोरी सरळ या आपल्या नवीन ब्लॉगवर टाकायची. म्हणजे जास्तीतजास्त लोक ते वाचतील. चोरी जगजाहीर होईल आणि आपोआपच चोराला नमतं घ्यावं लागेल. यात फायदा आपल्या सगळ्यांचाच आहे. आपले अनेक लेख/कविता चोरीला जात/गेले असतील पण आता अशा चोर्‍यांवर लक्ष ठेवणारे आपण एकटेच नसू. सगळेजण मिळून हे काम करतील आणि चोरी पकडून देतील. आणि आपल्या या  संघटीत कामामुळे असे चोर आपोआपच दबकून राहतील आणि त्यामुळे कदाचित आपल्या लेखांच्या भविष्यात होऊ शकणार्‍या चोर्‍या रोखल्या जातील. अर्थात या प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यावर ठोस उपाय सध्यातरी कोणालाच माहित नाही (कोपीराईट वगैरे सगळं ठीक आहे. पण त्याच्याने हे प्रकार रोखले जातायत का या प्रश्नाचं उत्तर हो असतं तर हा ब्लॉग सुरु करायची वेळच आलिओ नसती.). पण त्यामुळे स्वस्थ बसण्यापेखा आपण स्वतः काहीतरी केल्याचं आणि हे प्रकार थोडे तरी कमी केल्याचं समाधान. आणि त्यासाठीच हा नवीन ब्लॉग सुरु करतोय. पण आधी म्हटल्याप्रमाणे हा ब्लॉग माझा एकट्याचा नाही. आपल्या सगळ्यांचा आहे. 
आणि हो.. या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागल्या नाही, तशी वेळ आली नाही तर आनंदच आहे.. नाही का? :-)

तर आजच्या चोरीचे तपशील पुढीलप्रमाणे..

मूळ लेख

आणि भाग तिसरा येतोय. म्हणजे मूळ लेखकाने बिचार्‍याने एका पोस्ट मध्ये लिहिलेल्या लेखाची ही अनेक भागांमध्ये चोरी. छान चाललंय !!!!
मी भाग-१ वर मूळ लेखाची लिंक दिली होती. पण आज बघतो तर भाग-२ सुद्धा आला. म्हणून मी भाग-१ वर जाऊन माझ्या प्रतिक्रियेला काय उत्तर दिलं आहे  हे बघायला गेलो तर तिथे माझी प्रतिक्रिया सोडून इतर सगळ्या "वा वा छान छान" वाल्या प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या आहेत. मग लक्षात आलं की "अरे चोरा, मूळ लेखक अज्ञात नसून तो तुला मुद्दाम अज्ञात ठेवायचा आहे.". पण त्याच्या दुर्दैवाने अति झालेल्या या चोरी प्रकरणांमुळे या ब्लॉगची कल्पना सुचली आणि पाहिलं अपीलही झालं. आता विकेट कधी पडते ते बघुया. मग? बघता काय? चोरीच्या लेखांवर जाऊन पाडा प्रतिक्रियांचा पाउस.

आणि आधी म्हटल्याप्रमाणे या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागू नयेत हीच सर्व चोरांना आणि देवाला प्रार्थना !! :-)

Monday, January 4, 2010

हरकत नाय !!

आधी म्हंटल्याप्रमाणे २ दिवस वाट बघूनही त्या ब्लॉग मालकाचं काहीच प्रत्युत्तर न आल्याने त्याची लिंक देतोय खाली. आणि माझी कविता सुद्धा देतोय. ती माझ्या याच ब्लॉग वर देखील आहे प्रथमा या पोस्ट मध्ये. अर्थातच या ब्लॉगवरचं ते माझं पहिलंच पोस्ट होतं. अर्थात ब्लॉगवर मी ती खूप उशिरा टाकली. ती कधी आणि कशी लिहिली गेली ते तुम्हाला वरचं पोस्ट वाचून कळेलच. थोडक्यात सांगायचं तर ती मी आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या "संकल्प" या त्रैमासिकासाठी २००८ च्या मध्यावर लिहिली. नंतर ती म.टा. च्या ऑनलाईन अंकात देखील छापून आली. २००८ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यात महाराष्ट्रात/मुंबईत घडलेल्या स्थानिक दंगली/अतिरेकावर (डोमेस्टिक टेररिझम) वर ती आधारित होती. कुमार केतकरांच्या घरावर संभाजी ब्रिगेडचा हल्ला, शीख धर्मगुरूच्या अंगरक्षकाने गोळीबार केल्यानंतर शीख तरुणांनी जवळपास १२ तास वेठीला धरलेली मुंबई, सनातन प्रभातचे कथित स्फोट आणि मनसेचे भैय्यांवरचे हल्ले  इ. इ. असो.
आणि मुख्य म्हणजे ही आहे त्या ब्लॉगची लिंक. आणि तिथे त्या महाशयांनी तिला बाल-कविता असं टॅगलं आहे ते बघून तर मला हसावं कि रडावं ते कळेना. मी आधीच्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे "नेटवर मराठीत जे जे आढळेल ते सरसकट (आणि बरेचदा मूळ लेखकाचे नाव न घालता) आपल्या ब्लॉगवर टाकणे" हा त्यांचा अजेंडा असावा असं मला तरी वाटलं.
मंडळी, शोधून बघा. मला तर वाटतं तिथे आपल्या प्रत्येकाचेच लेख/कविता असं काही काही सापडेल. आणि त्याखाली तुमचं नाव असेल तर तुमचं नशीब भलतंच जोरावर आहे असं समजायला हरकत नाय, हरकत नाय!!!

हरकत नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय !!

मारा झोडा ठेचुन काढा
गोळ्या झाडा बाँब फोड़ा
त्यांच डोक आमचा हातोड़ा
ताज्या रक्ताचा पडुदे सडा

एका घावात मागाल पाणी, असे आहोत आम्ही सनातनी
आमच्या देवांची मस्करी करायची नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||१||

खसकन उपसा नंग्या तलवारी
दिसूदे आपली ताकद खरी
भेदरल्या पाहिजेत दिशा चारी
थरथर कापेल दुनिया सारी

आमच्या समोर नको अजीजी, उगाच नही आम्हाला म्हणत "पाजी"
आमच्या गुरु च्या वाटेला जायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||२||

शिवबा आमचा आम्ही त्याचे मावळे
उलट बोलाल तर तोंड करू काळे
आदर व्यक्त करायचे आमचे मार्गच आगळे
फासून डाम्बर घर रंगवू सगळे

मुखी शिवबा हाती ग्रेनेड, अशी आमची राष्ट्रवादी ब्रिगेड
शिवबाचे स्मारक उभारू देत नाही म्हणजे काय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||३||

दिसला भैय्या तर सोडू नका
टँकसया फोड़ा सामान फेका
एकच असा देऊ जोरदार धक्का
की "आपला" खुंटा होइल पकका

नवमहाराष्ट्राची आम्हालाच जाण, आम्ही करू नवनिर्माण
मराठी सोडून दुसर काही बोलायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||४||

पण थाम्बा हे काय !!
हे सगळ अचानक थांबतय काय?
होय ! कारण मी आहे आजचा तरुण, कुठल्याही झापडांशिवाय
मीच गोविन्दसिंह, मीच कृष्ण आणि मीच शिवराय
आमच्या तरुणाईला फसवयाच नाय
याद राखा गाठ आमच्याशी हाय
ज़ातिधर्माच्या नावाने फूट पाड़ाल तर
होय !! आमची हरकत हाय, हरकत हाय, हरकत हाय !!!

हेरंब ओक
१५ जुलै '०८

Sunday, January 3, 2010

अल्पविराम संपला... पण !!!!

गेला आठवडाभर (न सांगता) घेतलेला अल्पविराम किंवा मध्यंतर/ब्रेक/टाईम-प्लीज वगैरे वगैरे संपला/ली. कोण वाट बघताय म्हणा माझ्या पोस्टची. पण ही अशी सुरुवात केली कि जरा बरं वाटतं आपलं आपल्यालाच. अल्पविरामाचं कारण म्हणजे घर-बदली उर्फ मुव्हिंग. आठवडाभर पॅकिंग, अन-पॅकिंग करत करत शेवटी आलो एकदाचे नवीन घरात. नवीन म्हणजे, कोरं करकरीत वगैरे नाही हो. आधीच्या घराऐवजी आता हे दुसरं घर. म्हणजे नवीनच नाही का. तर हे मुव्हिंग प्रकरण संपवून, नवीन घरात समान लावून, (इंटरनेट सुरु व्हायला २ लागलेले दिवस धरून) जवळपास आज ४ दिवसांनी आलो नेटवर. म्हटलं काहीतरी खरडूया ब्लॉगवर. मुव्हिंग, नवीन वर्ष, स्नोफॉल कशावरही. एकीकडे मेल्स, जुन्या पोस्ट्सवरचे कमेंट्स अप्रूव करणं चालू होतं आणि आपले नेहमीचे मराठी ब्लॉग्स पण चाळत होतो. कमेंट्स टाकत होतो. आणि बघता बघता अचानक कळलं उचलेगिरी झालीये. मी लिहिलेल्या एका जुन्या कवितेची. पुन्हा नीट बघितलं. कविता माझीच होती पण माझा नामोल्लेख कुठेही नाही. वाईट वाटलं थोडं. ब्लॉगच्या मालकाच्या काही खाणाखुणा, नाव-गाव, contact-me वगैरे काही आढळलं नाही सुरूवातीला. ब्लॉगचा फॉलोअर म्हणून जॉईन झाल्यावर एक लिंक मिळाली ब्लॉग-मालकाशी संपर्क करायची. २-३ जण मालक आहेत असं आढळलं. ज्याने माझ्या कवितेचं पोस्टिंग केलं होतं त्याच्या नावाने मायना टाकून त्याला सौम्य शब्दात जाणीव करून दिली आहे. बघुया काही प्रतिसाद मिळतो का. १-२ दिवसात काहीच उत्तर आलं नाही तर नवीन पोस्ट टाकेन त्या ब्लॉगची आणि माझ्या मूळ कवितेची लिंक देऊन.
नंतर सहज म्हणून तो ब्लॉग चाळत होतो. भरपूर लेख, कविता, गाणी, चित्रपट सामिक्षेसारखं काहीतरी असे बरेच प्रकार आहेत. काही ठिकाणी मूळ लेखकाची नावे आहेत तर बऱ्याच ठिकाणी नाहीत. माझा साधारण असा अंदाज आहे कि "नेटवर मराठीत जे जे आढळेल ते सरसकट (आणि बरेचदा मूळ लेखकाचे नाव न घालता) आपल्या ब्लॉगवर टाकणे" हा अजेंडा असावा. असो.
खरंतर काहीतरी चांगलं, नवीन किंवा थोडक्यात मी वर जे काही लिहिलं आहे ते न लिहिता दुसरं काहीतरी लिहायचं होतं. पण उचलेगिरी बघून जरा मूड गेलाय. अर्थात तात्पुरताच. ही नवीन गडबड संपली की लिहीनच पुन्हा.

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...