मी 'स्लमडॉग मिलिनियर' प्रदर्शित झाल्या झाल्या लगेच पहिला होता. कारण खूप ऐकलं होतं त्याबद्दल. आणि मांजरेकरचा आक्रस्ताळेपणा आणि शेवटी 'जितेंद्र-जयाप्रदा'च्या जुन्या चित्रपटांसारखं हातपाय विचित्र हलवत केलेलं प्लॅटफॉर्म वरचं 'जय हो' गाणं (तेच ते ऑस्करवालं ) सोडलं तर मला चित्रपट प्रचंड आवडला होता. 'ओ साय्या' सोडलं तर संगीतात विशेष दम नव्हता. यापेक्षा कैक सुंदर सुंदर गाणी रहमानने यापूर्वीच देऊन ठेवली आहेत. पण कथा, पटकथा, संवाद, पार्श्वसंगीत, अभिनय आणि एकूणच दिग्दर्शन यात मला हा चित्रपट खुपच उजवा वाटला. सर्वात मुख्य म्हणजे नायकाच्या बालपणात, तरुणपणात घडलेले विविध प्रसंग आणि त्याला त्या शो मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांशी त्यांचे जुळलेले संदर्भ, ती वीण, तो एकूणच प्रकार मला फार भावला. अर्थात तो ऑस्कर मिळवण्याच्या लायकीचा होता का हा निराळा मुद्दा झाला. माझं वैयक्तिक मत म्हणजे तो ऑस्करच्या योग्यतेचा नव्हता. पण असो. त्याविषयी नंतर बोलू. चित्रपट गाजला तो मुख्यत: त्यात दाखवलेली भारतातल्या दारिद्र्याची, विषमतेची, झोपडपट्ट्यांची, गरिबीची, अस्वच्छतेची, बाल-गुन्हेगारीची दृष्य किंवा ते एकूणच चित्रण यामुळे. अनेकांना ते सगळं आक्षेपार्ह वाटलं. भारताची आणि भारतीयांची गरिबी मुद्दाम जगापुढे मांडण्याचा एका ब्रिटीश दिग्दर्शकाचा धूर्त अट्टाहास आणि त्यायोगे ऑस्कर पदरात पडून घेण्याचा एक डाव असंही नाव त्याला दिलं गेलं. असो.
अचानक 'स्लमडॉग मिलिनियर' बद्दल एवढी बडबड करून त्यावर आत्ता पोस्ट लिहिण्याचं कारण काय असं कोणाच्या मनात येत असेल तर आधीच सांगतो आजची पोस्ट 'स्लमडॉग मिलिनियर' बद्दल नाही. 'स्लमडॉग मिलिनियर' वरून एवढं घडाभर तेल वाहून झाल्यावर पोस्ट त्याबद्दल नाही हे ऐकल्यावर अनेक भुवया उंचावल्या गेल्या असतील. पण आज मी लिहिणार आहे ते 'स्लमडॉग मिलिनियर'सारख्याच एका पुस्तकाच्या संदर्भात. नाही. नाही. विक्रम स्वरूप यांच्या मूळ 'Q and A' या पुस्तकाबद्दलही नाही. मी म्हणत असलेल्या पुस्तकात आणि 'स्लमडॉग मिलिनियर' मध्ये दोन मुद्दे समान आहेत. एक म्हणजे दोन्हीत भारतातली सामाजिक विषमता, गरिबी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दाखवलं आहे आणि दोन्ही त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित आहेत. आणि अर्थातच त्यामुळे त्या दोघांवरही 'भारताचं दारिद्र्य ग्लोरिफाय करून' पुरस्कार हडपल्याचे आरोप झाले. ते आरोप कितपत खरे आहेत ते पुढे बघूच. तर हे पुस्तक आहे अरविंद अडिगा यांचं २००८ सालचं बुकर पारितोषिक विजेतं 'द व्हाईट टायगर'.
मी जेव्हा सुरुवातीला या पुस्तकाविषयी वाचलं होतं तेव्हा 'बंगलोरमधला एक छोटा उद्योजक भारताच्या राजकीय दौर्यावर येणार्या चीनच्या पंतप्रधांनांना उद्देशून पत्र लिहून त्यात भारतात येताना कसं वागायचं, कसं बोलायचं, काय खबरदारी घ्यायची असल्या काहीतरी सूचना करतो' असल्या काहीतरी मुद्द्यांवर लिहिलेलं पुस्तक आहे असं वाचल्याचं आठवत होतं. ते वाचून तेव्हाच मी मनात म्हटलं होतं की 'छे. हा कसला विषय? काहीतरी विचित्र आणि निरस असणार हे पुस्तक.'. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावरही सुरुवातीची काही (१०-१५ च) पानं मी अशा कंटाळवाण्या मूड मधेच वाचत होतो. किंबहुना सुरुवातीलाच मला 'अनेकांना स्लमडॉग मिलिनियर पाहिल्यावर दिग्दर्शक डॅनी बॉयलचा जसा राग आला होता' तसाच अरविंद अडिगा या पोरगेल्या लेखकाच्या भारताविषयक उद्दाम आणि अपमानास्पद (भासणार्या) लेखनाचा चांगलाच राग आला होता. किंबहुना लेखकाचा भारताला, आपल्या रुढी-परंपरांना, सामाजिक व्यवस्थेला, मागासलेपणाला, आर्थिक/सामाजिक/वैचारिक विषमतेला तिरकस नजरेने पाहून त्यांना करड्या छटेत रंगवण्याचा (पुरेपूर यशस्वी) प्रयत्न मला अजिबात रुचला नव्हता. पण हळूहळू जसं पुढे वाचत गेलो तसतसा अडिगा यांना सलाम ठोकावासा वाटायला लागला. लेखक सुरुवातीलाच म्हणतो की 'आमच्याइथे दोन भारत आहेत. एक 'अंधारलेला' भारत आणि दुसरा 'चमकणारा' भारत'. हे वाक्यही मला सुरुवातीला तसंच नकारार्थी वाटलं होतं. म्हणजे ते नकारार्थी आहेच पण पुढे सरकता सरकता लेखकाचा भारतातील सामाजिक विषमता आणि जातीभेद इ. वर प्रहार करण्यासाठी त्या वाक्याचा चपखल वापर करताना बघून आपल्याला ते वाक्य मनोमन पटतं आणि थक्क व्हायला होतं. आणि लक्षात यायाल लागतं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. हळू हळू अडिगांबद्दलचा मनात असलेला आकस, राग निवळून जायला लागतो आणि त्याची जागा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाबद्दलचं कौतुक घेतं. कारण लेखक सांगत असतो त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नसते. हे असं खरोखर घडतंय आपल्या इथे. पण कोणी हे आत्तापर्यंत अशा गडद शैलीत दणादण शालजोडीतले हाणत अशा प्रकारे कधी सांगितलंच नव्हतं. पुस्तकातला गरीब अशिक्षित नायक जेव्हा स्वतःचा उल्लेख करताना पशु, किडा किंवा टेबलाखाली रांगत जाणार कोळी अशा उपमा अगदी सहजपणे जेव्हा वापरतो तेव्हा त्यातली गडद भीषणता जाणवते. म्हणजे अन्याय होतोय हे तुम्हाला कळण्याइतपत तरी तुमची पंचेंद्रिय जागृत असतील तर तुम्ही त्या घटनांना स्वतःवरील अन्यायाचं लेबल लावू शकणार ना. पण इथे मुळातच हे जातीभेद, वर्णव्यवस्था, गरिबी, शोषण, माणुसकीला ठायी ठायी पायदळी तुडवणं हे अनंत काळापासून असंच चालत आलेले आणि त्यामुळेच आपोआपच तेच योग्य आहे असा सगळ्यांचा समज करून दिलं जाणारे अनेक अन्यायाचे प्रसंग वाचले की मनावर अपार नैराश्याची एक काळी छटा पसरते.
मला वाटतं पुस्तकाचं मोठ्ठं यश म्हणजे लेखकाची सर्वोत्कृष्ठ तिरकस शैली. मला वाटतं सध्याच्या काळात तरी फार कमी लेखकांना इतक्या हलक्या हाताने, सहज रीतीने पण धारदार तिरकस वाग्बाण मारून मंत्री, पुढारी, पोलिस, निवडणुका, न्यायव्यवस्था, गरिबी, उपासमार, धर्मांधता, राजकारण, आर्थिक आणि सामाजिक विषमता, जातीभेद, भ्रष्टाचार या सर्वांचा वेध एका पुस्तकात एवढ्या सहजतेने घेता आला असेल. अशी उदाहरणं फार विरळा. उगाच आगखाऊ भाषणं ठोकून, जडजंबाळ अग्रलेख लिहून, मोठमोठे लेख लिहून कुठल्याही संपादक, विरोधी पक्षनेता नेत्याला जे करता आलेलं नाही ते अडिगा यांनी एका जेमतेम तीनशे पानांच्या या छोटेखानी पुस्तकात अगदी सहजतेने करून दाखवलं आहे. आणि या तिरकस शैलीचा सर्वोच्च बिंदू म्हणजे पान ८९ वरचा 'सर, सर' वाल्या वाक्याचा पूर्ण परिच्छेद. तो काय आहे हे मी इथे सांगणार नाही. तो परिच्छेद किंबहुना हे पुस्तकच प्रत्यकाने मुद्दाम आवर्जून वाचलंच पाहिजे असं आहे. तो वाचल्यावर लेखकाच्या भयंकर चिमटे काढण्याच्या शैलीला दाद दिल्यावाचून राहवत नाही.
या तिरकस शैलीत लिहीत लिहीत लेखक जेव्हा जाता येता आपल्या प्रवृत्तीवर, समाजव्यवस्थेवर (एवढंच कशाला, अगदी पोलीस,न्यायालय आणि निवडणुकाही सुटत नाहीत त्याच्या तावडीतून) असंख्य प्रहार करून चिमटे काढत, लाथा घालत घालत पुढे पुढे सरकतो तेव्हा तर आता पुढे काय होईल याची उत्कंठा वाढत जाते. किंबहुना काय होणार आहे, शेवट काय आहे ते लेखक पहिल्या पन्नास-साठ पानांतच सांगून टाकतो. पण उलट त्यामुळे ते कसं होईल याची प्रचंड उत्सुकता लागत जाऊन आपण अधिकाधिक हावरटासारखं तुटून पडतो पुस्तकावर. एक मात्र मान्य केलं पाहिजे की शेवटच्या काही पानांत लेखकाची पुस्तकावरची पकड ढिली झाल्याचा भास होतो (मला तरी झाला) आणि उगाच ते ताणलंय आणि उगाच थोडंसं भरकटलंय असंही वाटून जातं. पण आधीच्या दोन-अडीचशे पानांत जो उत्कृष्ठ अनुभव मिळालेला असतो त्यापुढे शेवटची थोडी गडबड नजरेआड करायला हरकत नाही.
तर भारतावर, आपल्या एकूणच व्यवस्थेवर एवढे प्रचंड आसूड ओढून जगाच्या मनात भारताबद्दलचं चुकीचं चित्र भरवलं गेलं असल्याचे आरोप या पुस्तकावर झाले. अनेक ब्लॉग्स, चर्चा यांमध्येही 'भारताबद्दल काहीतरी वाईटसाईट लिहा आणि पुरस्कार कमवा' अशा प्रकारचे हल्ले झाल्याचं मी वाचलं. मला त्यांचा मुद्दा, त्यांचं म्हणणं, त्यांची मतं काही खोडून बिडून काढायची नाहीयेत. ती प्रत्येकाची स्वतंत्र वैयक्तिक मतं आहेत आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. म्हणून मी फक्त मला दिसलेला व्हाईट टायगर माझ्या नजरेने सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. लेखकाने आपल्या वृत्तीवर, भ्रष्टाचारावर, गरीबीवर, व्यवस्थेवर असंख्य हल्ले केले आहेत हे नाकारणं शक्यच नाही पण ते असत्य आहे का? कपोलकल्पित आहे का? असा प्रश्न आपण स्वतःला विचारल्यास त्याचं उत्तर खचितच नाही असं द्यावं लागतं. त्यामुळे या अशा भीषण व्यवस्थेवर, खोटेपणावर हल्ला करणार्यावर आपण हल्ला करायचा की त्या मूळ समस्येवर हल्ला करायचा हे आपलं आपण ठरवायचं. तसंही बेगडी देशप्रेमाचा बाजार मांडणार्या चोपडा, जोहरांची आपल्या देशात काही कमतरता नाही !!!
मागे याच विषयावर माझ्या इंग्रजी ब्लॉगवर थोडक्यात लिहिलं होतं ते इथे पाहता येईल.
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
रेल्वे स्टेशनच्या बुक स्टॉल्स वर नेहमी दिसणारे हे पुस्तक इतक्या गंभीर विषयावर असेल असे वाटले नव्हते. वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देईन.
ReplyDeleteअरे अतिशय सुंदर पुस्तक आहे. गेल्या एक-दीड वर्षांत मी वाचलेल्या पुस्तकांपैकी हे सर्वात उत्कृष्ठ पुस्तक होतं माझ्या मते. मुख्य म्हणजे मला अरविंद अडिगाची तिरकस शैली प्रचंड आवडली.
ReplyDeleteया बद्दल ऐकलं जरूर होतं, पण वाचलं नव्हतं. आजच पहातो मिळतं का कुठे ते..
ReplyDeleteनक्की वाचा काका. खूप सुंदर पुस्तक आहे. माझ्याकडे इ-बुक आहे. तुम्हाला हवं असेल तर पाठवतो. अर्थातच हार्डबुक वाचण्याची मजा सॉफ्टकॉपीत नाही :-)
ReplyDeleteमी पण फक्त ऐकलय वाचल नाही....आता नक्की वाचेन
ReplyDeleteनक्की वाच. अतिशय सुंदर पुस्तक आहे. नक्की आवडेल..
ReplyDeleteहेरंब पुस्तक वाचायला नक्की आवडेल...इ-बुक पण धाड वेळ मिळाला की...आय पॉडवर वाचता येईल अधेमधे...(लॅपटॉपवर बसायचं म्हणजेही प्रोजेक्ट होऊन बसलंय आजकाल...)
ReplyDeleteअपर्णा, पाठवलंय इ-बुक.. नक्की वाच.. हो तुमची हल्ली चांगलीच धावपळ चालू असेल..
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteतू इतके लिहिले आहेस म्हणजे नक्कीच चांगले पुस्तक असणार. मला पण इ-बुक पाठव ना, घरी नाही जमणार पण ऑफिसमधे मधेच वाचेन थोडे थोडे.
खूप सुंदर पुस्तक आहे. पाठवलं तुला पण इ-बुक..
ReplyDeleteहमको भी प्लीझ बुक धाडो...हम वाचेंगे....अगर वो तिरकस शैली तुमको पसंद आयी है तो हमको लगता है हमको भी आवडेंगी!!
ReplyDeleteअजुन एक, स्लमडॉगबद्दलची तुझी मतं पटली (हो, त्याबद्दल कोणी लिहीलच नाहीये...हे चुकीचे आहे...तु ते तेल नमनाला ओतलेस असे म्हटलास तरी योग्य असे धारा़चे रिफाईंड त्येल हाये त्ये हे सांगाया नगो!!!)
आता वाचलंच पाहिजे.
ReplyDeleteतन्वी :-) .. पाठवलंय तुला पण इ-बुक... तुमको भी तिरकस शैली नक्कीच आवडेगी ग !!
ReplyDeleteमी मुद्दाम स्लमडॉगचा संदर्भ दिला. कारण त्याच्यावर आणि टायगरवर सारख्याच प्रकारची टीका झाली होती आणि दोन्ही टीकांमधले मुद्दे मला तरी पटले नव्हते.
नॅकोबा, नक्की वाच.. खूपच छान पुस्तक आहे..
ReplyDeleteअरे हेरंब, मी व्हाईट टायगर वाचलं नाहीय त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही पण स्लमडॉग मला आक्षेपार्ह एवढ्यासाठीच वाटतो कि एक पराकोटीची दुर्दैवी कथा मुद्दाम पाश्चिमात्य टाळ्या घेण्यासाठी बनवल्यासारखी वाटते. कारण देशाचा एकही चांगला उल्लेख असू नये आणि आय विल शो उ रेआल अमेरिका हा प्रसंग तर हास्यास्पद आहे....आणि दुसरा म्हणजे हाच सिनेमा जर भारतीय माणसाने बनवला असता तर त्याला किती पारितोषिके मिळाली असती. मी स्वतः मुंबईचा आहे म्हणून असेल पण मुंबईत वाइटाबरोबर चांगलाही आहे ते दाखवल्यास सिनेमाचं नुकसान झालं असता असं मला वाटत नाही. अर्थात प्रत्येकाचे आपले मत असते पण मला हा केवळ एक सिनेमा म्हणूनहि बिलकुल आवडला नाही कारण भारताच्या गरिबीचं चित्रण करणं आणि सत्य परिस्थितीचं चित्रण करणं ह्यात स्लमडॉग आणि पाथेर पांचाली एव्हढा मोठा फरक आहे.
ReplyDeleteबाय द वे, मला ई-बुक पाठव ना!
@ the....अर्थात वरचे वाचकमहाशय,
ReplyDeleteतुमच्या मताशी अगदी सहमत. मला एअकच पर्श्न नेहमी पडतो, (सॉरी हेरंब आय कान्ट हेल्प, तुझ्या पोस्टशी फ़ारकत घेणारी प्रतिक्रीय आहे पण विषय निघालाच आहे म्हणून मत द्यावसं वाटतंय. सॉरी अगेन), भारताबाहेरच्या लोकांना इथली फ़क्त गरीबी, चित्र विचित्र रूढी आणि भंकस परंपराच का जगापुढे आणाव्याशा वाटतात. इथल्या प्रचंड सकारात्म गोष्टींकडॆ डोळेझाक का? झोपडपट्टी आणि घाणीशिवाय जागतिक स्तरावर दखल घेण्याजोगं इथे काहीच नाही? या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यावर अनिल कपूरच्या घराबाहेर ढोल बडवत चाललेलं सेलिब्रेशन टीव्हीवर पाहून मला ते करणार्या लोकांच्या दोन कानफ़ाटात (सॉरी अगेन) द्याव्याशा वाटल्या होत्या. भारतातल्या बकालगिरीवर कोणीतरी सिनेमा बनवतं त्याला जागतिक पातळीवर कौतुक (????) लाभतं आणि या बकालगिरीला मिळालेल्या परक्या कौतुकाचा आपण ढोल ताशे बडवत सोहळा साजरा कसा करू शकतो, जर काही वाटायलाच हवं होतं तर ती फ़क्त लाज. असो. हे सगळं वाचून इतकं सगळं वाटलं आणि ते इथे मांडावसं वाटलं इतकंच बाकी हे माझं वैयक्तीक मत आहे.
पुस्तक वाचनीय आहे, भारताची खरी प्रतिमा त्यात दाखवली आहे आपण त्या पुस्तकाची आठवण करून दिली त्याबद्दल आपले अभिनंदन
ReplyDeleteत्यामुळे या अशा भीषण व्यवस्थेवर, खोटेपणावर हल्ला करणार्यावर आपण हल्ला करायचा की त्या मूळ समस्येवर हल्ला करायचा हे आपलं आपण ठरवायचं. तसंही बेगडी देशप्रेमाचा बाजार मांडणार्या चोपडा, जोहरांची आपल्या देशात काही कमतरता नाही !!!
ReplyDeleteShewat apratim..ek khup deep wichar ya chaar olit maadlayes.
Pustak..arthat aata waachalach pahije.
Slumdog? pratikriya tari dyawi ki nahi itaka aawadala navhata mala. concept interesting hoti pan maandani aani sandarbh n pataNyasaarkhe hote niwwal. Ka te lihit basale tar ek akkhi post hoil. Mhanun ithech thambte. Pan punha..ya lekhacha shewat khup khup aawadala.
कहितरि जगावेगळे अणि विक्रुत दाखवले तर लोकान्चे लक्श वेधून घेतले जाते. ओस्कर चा इतिहास पाहिला तर विक्रुती दाखवणार्या सिनेमाना जास्त बक्शिसे मिळलेलि दिसतात.जेव्हढी जास्त अतिशयोक्ती, तेव्हढे चान्सेस जास्त!आणे भारताचा कमिपणा दाखवला तर कोण आवाज उठ्वणार आहे? उलट ते तर स्वताच साग्तात हो आम्ही आहोत ना असे!
ReplyDeleteवास्तव काय आहे ते कोण बघतेय?
पण मला वातते, अडिगा जे लिहितात, त्यात वास्तवता जास्त आहे, आणी ती आपल्य़ाला भावते पण.
हेरंब, मला धाड रे सॉफ्ट कॉपी. प्रत्यक्ष पुस्तक हाती कधी पडेल कोण जाणे. या पुस्तकाबद्दल आधीही ऐकले होते पण अगदीच त्रोटक. तुझ्या या सविस्तर आढाव्यामुळे माझी उत्सुकता फार वाढली आहे.
ReplyDeleteविद्याधर, गफलत होतेय थोडी. ऑस्करच्या लायकीचा तो चित्रपट आहे की नाही हा मुद्दाच नाहीये. किंबहुना नाहीच आहे. पण त्याला ऑस्कर पासून वेगळा काढून बघितलं तर मला एक प्रचंड चांगला चित्रपट वाटला. अरे मी पण मुंबईचाच. (दुर्दैवाने) धारावीच्या झोपडपट्टीत दोन-तीनदा जाण्याचा योग आला होता. तिकडची परिस्थिती बघून भयंकर विचित्र, घाण फिलिंग आलं होतं.
ReplyDeleteअसो. मला त्या चित्रपटाची ट्रीटमेंट आवडली. मी पोस्ट मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यत्वाने ते kbc चे प्रश्न आणि त्या मुलाच्या आयुष्याशी भयानक पद्धतीने निगडीत असलेली त्याची उत्तरं. कसली वेगळी कल्पना आहे ही !!!
माझं म्हणणं पुन्हा एकदा तेच आहे. त्याने जे दाखवलंय ते चुकीचं आहे का? भांडारकरने चांदनी बार, ट्राफिक सिग्नल मध्ये गरिबी, गुन्हेगारी, झोपडपट्टी, शोषण दाखवलं तर वास्तवदर्शन म्हणून आपण त्याची वा वा करतो पण तेच बोयल ने दाखवलं तर ते चूक कसं ठरू शकतं? (त्यातला डोळे फोडण्याचा प्रसंग तर अंगावर आला होता रे माझ्या !! :( )
प्रत्येक चित्रपटात चांगलं आणि वाईट असं सगळं एकत्र कसं दाखवणार? अशी सरमिसळ केल्याने मूळ मुद्द्याला, आशयाला, कथेला धक्का नाही का पोचणार? तसं तर गरिबी, अन्याय, दारिद्र्य हे आपल्या प्रत्येक हिंदी चित्रपटांत वर्षानुवर्ष दाखवताहेत. पण बोयलने दाखवलेलं आपल्याला आवडलं नाही कारण ते आपल्या अंगावर आलं. कारण ते असं होतंय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित्ये फक्त आपण त्यापासून सुरक्षित अंतरावर आहोत त्यामुळे त्याची धग आपल्याला पोचत नाहीये. असो. खूप मोठी झाली प्रतिक्रिया. मी कोणालाही दोष देत नाहीये आणि तसं या प्रतिक्रियेतून वाटत असेल तर आधीच सॉरी. पण तरीही माझ्या मते स्लमडॉग (आणि टायगर ही... मूळ विषय राहिलाच :-) ) हे दोन्हीही कथा, कल्पना, मांडणी या सगळ्याच्या दृष्टीने उच्च कोटीचे आहेत. सर्वोच्च पुरस्कार मिळवण्याच्या योग्यतेचे आहेत की नाहीत हा वेगळा मुद्दा झाला. (माझ्या मते पुरस्काराच्या योग्यतेचे नाहीत.)
तुला इ-बुक पाठवलं आहे. :)
शिनुबाई, अग कितीवेळा सॉरी म्हणशील?? बास की.. अग तुझं मत स्पष्टपणे मांडताना सॉरी कशाला हवंय मध्ये. मला माहित्ये हा वैयक्तिक हल्ला नाही. हे फक्त मतभेद आहेत..
ReplyDeleteअर्थात विद्याधर (the prophet) ला दिलेल्या प्रतिक्रीयेत तुझ्या प्रतिक्रीयेतल्या बर्याच मुद्द्यांना मी आधीच उत्तर दिलं आहे (असं मला वाटतं :-) )
भंकस परंपरांबद्दल म्हणालीस म्हणून सांगतो. तुला आठवतंय काही (१०-१२ तरी निदान) monsoon wedding नावाचा एक अत्यंत भंपक चित्रपट आला होता. त्याचं वास्तवदर्शी भारतीय लग्न म्हणून परदेशात खूप कौतुक झालं होतं. असला थर्ड ग्रेड चित्रपट होता ना तो. भारतात एकही लग्न असल्या फालतू पद्धतीने होत नसेल.. आणि शेवटच्या सीन मध्ये तर त्यांनी कहरच केलं आहे. असो..
हा किंवा असेच अनेक भंपक चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं सामाजिक सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणारे म्हणून प्रसिद्धी मिळवतात तेव्हा माझा संताप होतो. पण स्लमडॉग मधलं सगळं तसंच प्रत्यक्षात घडतंय, घडलंय (आपल्या दुर्दैवाने) !!
आणि विद्याधरला लिहिलं तोच मुद्दा पुन्हा एकदा. एकाच चित्रपटात चांगलं वाईट सगळं एकदम खूप खूप कसं दाखवणार? तसं केलं तर मूळ आशयाला धक्का लागेल. कारण चित्रपटाचा मूळ आशय भारताची गरिबी दाखवणे हा नव्हताच.. तसा समज आपण करून घेतला.. मूळ विषय झोपडपट्टीतला एक साधारण तरुण निव्वळ नशिबाच्या (आणि पूर्वाश्रमीच्या हालअपेष्टांमुळे) एका रात्रीत कसा कोट्याधीश बनतो, आणि त्यात त्याला कशी संकटं येतात हा होता. तेव्हा ते सगळं दाखवताना, नायकाचा संघर्ष दाखवताना आपोआपच नकारात्मक बाबी दाखवल्या जाणार. नाही का?
असो.. तुला दोष देण्याचा किंवा भावना दुखावण्याचा अजिबात मुळीच किंचित जराही उद्देश नाही. तसं वाटत असेल तर सॉरी...
खूप आभार काका..
ReplyDeleteअरुणाताई, मला नाही पटले तुमचे मुद्दे. ऑस्कर मिळालेले बरेच चित्रपट तद्दन फालतू असतात हे मान्य केलं तरी सरसकट सगळ्यांना हा नियम लावू शकत नाही आपण. फोरेस्ट गंप किंवा असे अनेक (आत्ता नावं आठवत नाहीयेत) नितांतसुंदर चित्रपट आहेत ज्यांना ऑस्कर मिळालं आहे. आणि भारताच्या कमीपणाबद्दल मी विद्याधर आणि शिनुला दिलेल्या प्रतिक्रिया पहा. माझा मुद्दा कळेल.
ReplyDeleteअडिगा खरंच फार सुंदर आणि वास्तव लिहितात यात वादच नाही !!
श्रीताई, पाठवलंय तुम्हाला इ-पुस्तक. खूप छान आहे. नक्की वाचा..
ReplyDeleteआभार सोनल.. ब्लॉगवर स्वागत !! नक्की वाच पुस्तक. खुपच सुरेख आहे. (अर्थात तुलाही स्लमडॉग आवडला नसेल तर (कदाचित) 'खुपच सुरेख आहे' हे वाक्य सापेक्ष ठरू शकतं.)
ReplyDeleteमला वाटतं स्लमडॉगबद्दल तुझेही मुद्दे थोड्याफार फरकाने विद्याधर आणि शिनु सारखेच असावेत असा माझा अंदाज. त्यांच्या प्रतिक्रियांना मी उत्तरं दिलेली आहेतच.
या सगळ्यातून एक चांगली गोष्ट म्हणजे सगळ्यांना सगळे चित्रपट/पुस्तकं आवडत नाहीत हे आपलं नशीब कारण नाहीतर सगळे चित्रपट/पुस्तकं सुपर डुपर बंपर हिट झाले असते :-) ..
गंमतीने म्हणतोय.. हलके घेणे.. :)
अरे हेरंब,
ReplyDeleteमी म्हणत होतो कि नुसता वाईट दाखवणं पण ठीक पण हा मात्र मला पटत नाही कारण तो ओवर स्ट्रेच्ड वाटला मला...असो...वैयक्तिक मते आणि मतांतरे...
मला स्ट्रेच्ड नाही वाटला.. वास्तव वाटला उलट.. असो.. अगदी बरोबर. व्यक्ती तितक्या प्रकृती :-)
ReplyDeleteहेरंब, तुझे विद्याधरला दिलेले मत मला अतिशय पटले....१००%... त्याच्याही मतांचा आदर, पण तू अतिशय समर्पक उत्तरे दिली आहेस...
ReplyDeleteआनंद, मनापासून आभार.. !
ReplyDeleteमी सुदधा आधी शिनु आणि विद्याधर हयांच्यासारखच मत नोंदवणार होतो पण त्यांना आपण जे स्पष्टीकरण दिल ते पटल आपल्याला...बाकी काहीही असो पण हया पाश्चिमात्य लोकांना भारतातील गरीबी,घाण ह्याच खुप अपॄप आहेहे मात्र नक्की म्हणूनच तर भारतात येणारे हे पर्यटक अगदि आवर्जुन झोपडपट्ट्यांना भेट देताना दिसतात.भारताबद्दल किति चांगल साहित्य,चित्रपट निघुन दे पण हे लोक भारतातील घाणीचे विषयच डोक्यावर घेतात...बाकी आपल्या भारतातही सार आलबेलच आहे,सध्याच्या महागाईमुळे तर गरीबी आणि सामाजिक विषमता वाढतच चालाली आहे.जीडीपीचे आकडे आणि मुठभर लोकांचा बँक-बॅलेन्स वाढवुन देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही हे नेत्यांना कधी समजणार कोण जाणे...असो तरीही तुम्ही केलेल्या वर्णनानुसार हे पुस्तक भारताबाहेर बॅन करुन आपल्या देशातील नेत्यांना अगदि जबरदस्तीने वाचायला द्यायला हवे असे मला वाटते...मलाही ई-बुक पाठवा...
ReplyDeleteहो.. पाश्चिमात्य लोकांना भारतातल्या गरीबी,घाण यांचं खुप अपॄप आहे हे मात्र खरं आहे. पण सरसकट सगळ्यांविषयी असं नाही म्हणू शकत. गेल्या वर्षी २६/११ ला जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता तेव्हा माझा गोरा बॉस मुंबई आणि ताजच्या आठवणीने हळहळलेला मी बघितला आहे. थोडक्यात कुठलंच मत generalize करू शकत नाही आपण.
ReplyDeleteतुला इ-बुक पाठवलं आहे आणि हो कधीपासून सांगणार होतो.. अहो-जाहो नको करत जाऊ रे मला. उगाच म्हातारं झाल्यासारखं वाटतं :-)
White tiger he apratim pustak aahe.
ReplyDeletemi he pustak vachal tevha Gurgaon-Delhi la ch hoto. Nayak eka chhotyashya khedyatun Delhi Gurgaon la yeto. aani tyala jya transition madhun jav lagat te khup chhan varnan kel aahe.
khup chhan....
बरोबर आहे,सगळ्यांविषयी अस नाही म्ह् णु शकत..पण बरयाच वेळा हेच चित्र दिसते...बाकी नैसर्गीक असे हल्ले जेव्हा तालिबानी पाकिस्तानवर करतात तेव्हा पाकिस्तानद्वेष्टा असुनही मी आपोआप हळहळतो...असो...बाकी यापुढे मी तु असच म्हणेन हया बाबा हेरंबानंदाना.. :)
ReplyDeleteअगदी बरोबर बोललास प्रसन्न. खेड्यातलं भीषण दारिद्र्य आणि शहरातली अफाट श्रीमंती यातली तफावत फार उत्कृष्ठपणे मंडळी आहे लेखकाने. आभार..
ReplyDeleteहो न.. निरपराध नागरिक, मग ते कुठलेही असोत, मेले तर हळहळ होतेच..
ReplyDeleteहां .. आता कसं. 'तू' बरं वाटतंय ऐकायला.. !! :-)
have you read the catcher in the rye?
ReplyDeleteI havent read the white tiger yet... but something in your post reminded me of this book by salinger.. though they may not have much in common.. you might want to try it. :)
Anon, Nope. I haven't read that. But if it's sarcastic I'd definitely love to read it. I love sarcasm. ll try to grab it from the library in few days.. Thanks for suggestion !! :-)
ReplyDeletehey pustak vikat gheyun 3 mahine zhale pan pahili 10 pane vachali ani nanter sodun dile.. ata parat chikatine vachen..
ReplyDeleteसोनिया, माझं पण असंच झालं होतं सुरुवातीला.. पहिली १५-२० पानं कंटाळवाणी आहेत थोडी. पण त्यानंतर छान वेग आहे पुस्तकाला. नक्की वाच..
ReplyDeleteइ-बुकांच्या लिंक्स मिळाल्या तर मलाही पाठव.
ReplyDeleteकांचन, पाठवलंय तुला इ-बुक.
ReplyDeleteमलाही इ-बुक पाठवणार का?
ReplyDeletevivek.v.khanzode@gmail.com
विवेक, ब्लॉगवर स्वागत.. आपल्याला इ-बुक पाठवलं आहे..
ReplyDeleteThanks...
ReplyDeleteवटवट सत्यवान, तुम्ही नेट पोलिस आहात, फारच छान, याने साहित्य चोरिला आळा बसेल.
ReplyDeletemy hubby had got it and asked me to read it.. such a grip it has.. and you instantly relate to it..
ReplyDeleteAs all say it's a novel depicting the dark humor of the common man.written in a satirical style...
very true..
मला पण हे पुस्तक खूप आवडले होते. आपल्या भारतीयांच्या गुलामी वृत्ती वर हनुमानाचे उदाहरण देऊन मार्मिक भाष्य केले आहे. कधी कधी वाचताना राग येतो पण लिहलेले खोटे पण नाही म्हणू शकत.. पुस्तकाच्या शेवटीच अशी प्रतिक्रिया आहे कि Indian Tourism board will not be pleased!
ReplyDeleteखरंच प्रसाद.. ते तिरकस शैलीतलं मार्मिक भाष्य जिव्हारी लागतं. आणि रागावूनही उपयोग नाही कारण ते सगळं खरं असतं. !!
ReplyDeleteYes Shweta, Rightly said !! Adiga's sarcastic tone and black witt literally kills. Makes you laugh and think hard at same time..
ReplyDeleteसौरभ, नाही हो नेट पोलिस वगैरे असं काही नाही. पण हे असे प्रकार थांबले पाहिजेत एवढं मात्र नक्की.
ReplyDeleteata vachte... bara zala triggerchich avashyakata hoti
ReplyDeleteग्रेट ग्रेट.. नक्की वाच.. एकदा हातात घेतलंस की खाली ठेववणार नाही. आणि ब्लॉगला प्रथमच भेट दिलीस. स्वागत !!
ReplyDeleteMi heramb chya aadhicha blog var chi post vachun he pustak vachayla ghetl. suruvat thodi kanTalvani hoti...
ReplyDeletePan nantar matr avghya 3 divsat te pustak vachun sampvla (arthatch office time madhe.. :) ).
I should thanks to heramb to introduce me to such a gud book...
Baa heramba.. Dhanyawaad..
Aani ho, nehemi sarkhich tuzi post mast jamun aaliye... Arvind adiga aani tuzya shailit kuthe tari samya nakki aahe..
Hey Heramb, Mi "The White Tiger" ani "Q&A" wachal ahe. Tasech Slumdog pan pahila ahe. Tujhya matashi mi 100% sahamat ahe... Carry On...
ReplyDeleteअमित, आभार. आपलं पूर्वी झालेलं बोलणं आहे लक्षात. I remember how you too loved the book.
ReplyDelete>> Arvind adiga aani tuzya shailit kuthe tari samya nakki aahe
हे ऐकायला एकदम छान मस्त वाटतंय पण पचायला .... :-) पण आवडलं मला :)
गणेश, ब्लॉगवर स्वागत... हो ना. 'व्हाईट टायगर' आणि 'स्लमडॉग मिलिनेयर' वर सारखीच टीका झाली होती पण दोन्हींची कथा, मांडणी खूप सशक्त होती. त्यामुळे दोन्हींचा संदर्भ देण्याचा मोह मला टाळता आला नाही. प्रतिक्रियेबद्दल आभार असाच भेट देत रहा ब्लॉगला !!
ReplyDeleteइ-बुक/ऑडिओ च्या लिन्क आहेत का ?
ReplyDeleteसोमेश, इ-बुक पाठवलंय तुला.
ReplyDeleteमलापण ई-बुक मिळेल का?..............(पांढरा वाघ)
ReplyDeleteAna Mik (anamiks9@yahoo.co.in)
अनामिक, तुम्हाला इ-बुक पाठवलं आहे. अनामिक राहण्यामागे काही कारण? सहज विचारतोय..
ReplyDeleteमी मध्यंतरी पुस्तकांच्या दुकानात गेले तेव्हा अरविंद अडिगाच 'व्हाईट टायगर' दिसलं. तुमच त्याच परीक्षण आठवलं आणि पुस्तक अपेक्षेनं विकत घेतलं.
ReplyDeleteपुस्तक मला फारच आवडल. बिहारमध्ये मी स्वत: अनेकदा प्रवास केला आहे आणि दिल्लीही बघते आहेच आता - त्यामुळे त्या पुस्तकात एक दोन प्रसंग वगळता (तेवढे चालायचेच!) अतिशयोक्ती अजिबात नाही हे मी नक्की म्हणू शकते. फार वास्तवदर्शी पुस्तक आहे.
हे पुस्तक कदाचित मी वाचलं नसत कधी. पण तुम्ही त्यावर लिहिलत म्हणून मी ते वाचलं.
आभार काही मानत नाही - अशीच अजून पुस्तकांची ओळख करून देत रहा असा आग्रह मात्र जरूर करते.
सविताताई,
ReplyDeleteसर्वप्रथम रिप्लाय द्यायला इतका उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
तुम्हाला 'व्हाईट टायगर' आवडलं हे वाचून आनंद झाला. आणि निव्वळ माझं परीक्षण वाचल्याने तुम्ही ते घेतलंत आणि वाचलंत हे ऐकून तर मला फारच आनंद झालाय.
खरं तर तुमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्या व्यक्तीला हे पुस्तक न आवडतं तरच नवल. यात दिसणारे जातीभेद, उच्चनीचता किंवा शिक्षणाअभावी नशिबी आलेलं दारिद्र्य आणि स्थानिक पुढाऱ्यांनी परिस्थितीचा घेतलेला गैरफायदा इत्यादी गोष्टी तुम्ही स्वतः कित्येकदा तुमच्या खेडोपाडीच्या दौऱ्यांमध्ये अनुभवल्या असाल.
पुन्हा एकदा आभार !