माननीय गिरीश सर,
ताकाला जाऊन भांडं लपवण्यात किंवा लपवलेलं भांडं तासभर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर हळूच बाहेर काढण्यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे पहिल्याच ओळीत सुरुवात करतो. सध्या लोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाच्या एका सुमार सदराला संपादकीय पानावर स्थान मिळत आहे. लोकसत्ताची मतं पटत नसूनही मी अनेक वर्षं लोकसत्ता नियमित वाचतोय. परंतु मतं पटत नसली तरीही लोकसत्ता/संपादक इत्यादींवर वैयक्तिक चिखलफेक करणे वगैरे बालिश भानगडीत मी कधीच पडलेलो नाही. जेव्हा जेव्हा तीव्र मतभेद झाले तेव्हा तेव्हा त्या त्या बातमीच्या खाली मी माझी प्रतिक्रिया नोंदवली आहे. (छापणे-न छापणे लोकसत्ताच्या (तथाकथित) पॉलिसीवर अवलंबून..). जेव्हा असंवेदनशीलपणाचा कहर होतो आहे असं वाटलं (उदा दिनांक १५ जुलै२०११ चं चिदंबरम यांच्यावर लिहिलेलं अन्वयार्थ.) तेव्हा मी स्वतः तुम्हाला इमेल करून माझा तीव्र निषेध नोंदवला आहे.
हे सगळं एवढ्या सविस्तरपणे मांडायचं कारण इतकंच की माझं भांडं स्वच्छ आहे परंतु वेळोवेळी लोकसत्ता उर्फ 'वाचावे नेटके' च्या नासलेल्या ताकाने ते खराब होतंय हे दाखवणं. लोकसत्तासारख्या आघाडीच्या (निदान मुंबईत तरी.) दैनिकाला ब्लॉगरांवर सदर लिहितोय असं दाखवून उगाच त्यांना टपल्या मारत सुटणे, अपमानास्पद बोलणे, टोमणे मारणे, वैयक्तिक हल्ले करणे, डिवचणे असे (माझ्या आणि सर्वसामान्य ब्लॉगर्सच्या दृष्टीने) हलक्या दर्जाचे प्रकार करणं शोभत नाही. तुमच्या या सदरात वैयक्तिक माझ्यावर विनाकारण, काहीही गरज नसताना आणि अजिबात संबंध नसताना दोन वेळा थेट आणि अनेकवेळा आडून हल्ले झालेले आहेत. त्या सगळ्यांची जंत्री मी या क्षणी देऊ शकतो आणि देऊ इच्छितो. पहिल्या वैयक्तिक हल्ल्याला मी त्याच भाषेत माझ्या ब्लॉगवरून उत्तर दिल्यानंतर हे प्रकार वाढले आहेत. पहिला थेट हल्ला झाला तो दिनांक १२ मार्चच्या लेखात.
" काहीवेळा ‘काय वाट्टेल ते’ किंवा ‘हरकतनाय’ सारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते. "
श्री अभिनवगुप्त यांच्या लेखनाच्या दर्जा, खोली आणि व्याप्ती यावर थेट टिप्पणी करण्याचं टाळूनही मी त्यांचं एका गोष्टीसाठी कौतुक करू इच्छितो. ते म्हणजे सुरुवातीचे काही आठवडे त्यांनी भविष्य, पानिपत, भूकंप, पाकिस्तान, सिरीयामधली यादवी, आंतरराष्ट्रीय अनुवादक, इराण युद्ध, चित्रकला आणि कलासमीक्षक किंवा न्यूयॉर्क टाईम्स मधल्या संपादकीयांचा काही भाग अशा देशविदेशांतल्या अनेक ब्लॉग्जविषयी लिहूनही त्या विषयांमधल्या अंगभूत जडपणापायी आणि त्याहीपेक्षा श्री अभिनव गुप्त यांच्या अजून जड शब्द वापरून स्वतःच्या अगम्य शैलीत ते लिहिण्याच्या अट्टाहासापायीच त्यांनी हे विशेष चालत नसलेलं सदर "घटं भिंद्यात पटं छिंद्यात" करून का होईना चालवण्यासाठी त्यांनी बॉलीवूडछाप मार्गाचा आधार घेण्याचं ठरवलं.
माज किंवा अहंकार म्हणून सांगत नाही परंतु माझ्या ब्लॉग हिट्स पावणे दोन लाखाच्या वर आहेत, २३४ जण माझ्या ब्लॉगचे फॉलोअर्स आहेत आणि किमान १३० जणांनी माझा ब्लॉग इमेल मधून सब्स्क्राईब केलेला आहे. 'काय वाटेल ते' ब्लॉग लिहिणारे महेंद्र कुलकर्णी तर समस्त ब्लॉगर्सचे आदर्श आहेत ते त्यांच्या लेखनाच्या वारंवारतेमुळे, विषयांच्या वैविध्यामुळे आणि कुठलाही विषय सोपा करून सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे. 'काय वाटेल ते' ची आजची वाचक संख्या जवळपास ९ लाख आहे, किमान ७१३ लोकांनी त्यांचा ब्लॉग इमेलमधून सब्स्क्राईब केलेला आहे. (आम्ही दोघेही कुठल्याही मराठी संकेतस्थळांवर लिहीत नाही (पूर्वी लिहीत असलो तरी आता सोडलं आहे) हे आमच्यातलं एक साम्य). मला वाटतं एवढी कारणमीमांसा आणि पुरावे दिल्यावर न चालणाऱ्या सदराला चालवण्यासाठी आमच्या ब्लॉग्सवर वैयक्तिक हल्ला का झाला असावा किंवा कोणाच्या 'प्रेरणेने' झाला असावा हे आपल्यासारख्या विद्वान आणि बॅलंस्ड संपादकाला समजावून सांगणे म्हणजे आपला (तुमचा) अपमान करण्यासारखं आहे. तेव्हा कारणमीमांसेचा भाग इथेच थांबवतो.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या १२ मार्चच्या लेखापर्यंत श्री अभिनव गुप्त हे निनावी होते. लेखाखाली कोणाचंही नाव नसायचं. परंतु निनावी हल्ले करणाऱ्या श्री गुप्त यांच्यावर अनेक ब्लॉग, फेसबुक भिंतीं आणि काही मराठी संकेतस्थळांवर टीका झाल्यानंतर अचानक 'हजला जावं' त्याप्रमाणे स्तंभलेखकाने त्या लेखांखाली श्री अभिनव गुप्त असं नाव द्यायला सुरुवात केली. (यातलं श्री हे मी माझ्या सोईने वापरलं असून काही चुकलं असल्यास आत्ताच माफी मागतो)
आता माझा नक्की आक्षेप कशावर आहे ते पुराव्यासकट सांगतो.
भाग १ : वैयक्तिक हल्ले
१. माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन सर्वप्रथम थेट हल्ला झाला तो वर म्हटल्याप्रमाणे १२ मार्चच्या सदरात.
काहीवेळा ‘काय वाट्टेल ते’ किंवा ‘हरकतनाय’ सारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते.
२. १२ मार्चच्या सदरातलाच हा अजून एक उल्लेख पहा.
महिलांसाठीची ‘दुपारची मासिकं’ हा सर्वच काळात हसण्यावारी नेण्याचा, पण मोठा वाचकवर्ग असलेला प्रकार होता. त्यात येणाऱ्या कथा वा लेखांवर वाचकांमधून ‘मनात तरंग उमटले..’ पद्धतीच्या प्रतिक्रिया असत. त्या प्रतिक्रिया लिहून, टपालानं संबंधित मासिकापर्यंत पाठवल्या जाण्याची शक्यता फार कमी होती आणि जर कुणी पाठवलीच तर ती छापली जाई. अशा पत्रांना बाकीचे वाचक ‘खुशीपत्रं’ समजत आणि सोडून देत.
आता तुम्हाला मुद्दा क्रमांक एक मधला विघ्नसंतोषीपणा लक्षात येईल !
३. १२ मार्चच्या सदरातील आक्षेपार्ह उल्लेखामुळे संतापून श्री महेंद्र कुलकर्णी यांनी तुम्हाला म्हणजे श्री गिरीश कुबेर यांना थेट पत्र लिहिलं. ते पत्र चुकीचा मुलामा देऊन १९ मार्चच्या सदरात छापण्यात आलं. हे तुमच्या परवानगीने झालं की कसं यावर मी मतप्रदर्शन करू इच्छित नाही. तो तुमचा आणि श्री अभिनवगुप्त यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
४. आजच्या म्हणजे १४ मेच्या 'वाचावे नेटके' च्या सदरात पुन्हा एकवार माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन हल्ला झालेला आहे. (आणि अवांतर म्हणजे ही टीका करताना श्री अभिनव गुप्त यांनी तळटीपा देण्याची एका ब्लॉगरची शैली जशीच्या तशी चोरली आहे !!!!)
तर तातडीनं ‘वाचावे नेटके’ बंदच करा, अशी मोहीम (अशा संभाव्य मोहिमेतले पहिले १५ ब्लॉगर तर घरचेच असल्यानं) सुरू व्हायला हरकत नाही.*
* (या वाक्यातील हरकत ‘नाही’ हा शब्द ‘वाचावे नेटके’चा गटणेपणा अगदीच सिद्ध करणारा नाही काय?)
कुबेर सर, माझ्या ब्लॉगचं युआरएल हरकतनाय.कॉम असं आहे (FYI)
भाग २ : मराठी ब्लॉगर कम्युनिटीवरील हल्ले
१. १२ मार्चच्या सदरात समस्त स्त्री ब्लॉगर्सना वेठीला धरलं गेलंय (हे मातृदिनाच्या दिवशी तुमच्यापर्यंत पोचावं हा अपूर्व योगायोगच !!).. हा उल्लेख पहा.
अनेकजणींचे ब्लॉग आज ‘दुपारच्या मासिकां’ची उणीव भरून काढतात. अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो.
तुमचे श्री अभिनव गुप्त किती स्त्री ब्लॉगर्सचे ब्लॉग्ज वाचतात हा नियमित ब्लॉगिंग करणाऱ्या आणि मराठी ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निदान माझ्यासारख्या ब्लॉगरसाठी आणि अन्य कित्येक ब्लॉगर्ससाठी मोठाच प्रश्न आहे. किंबहुना फक्त स्त्री-ब्लॉगर्सचेच नव्हे तर एकुणातच ते किती ब्लॉग्ज वाचतात आणि किती ब्लॉग्ज पूर्ण वाचतात हाच खरा प्रश्न आहे. कारण कुठल्याही पुस्तकाची चार पानं वाचून किंवा कुठलाही चित्रपट १५ मिनिटं बघून त्या पुस्तकाचं किंवा चित्रपटाचं समीक्षण करणं आणि कुठल्याही ब्लॉगवरचे २-३ लेख वाचून त्या ब्लॉगवर राष्ट्रीय दर्जाच्या वृत्तपत्रांतून लाथाळ्या झाडणं हा माझ्या दृष्टीने सारखाच प्रकार. फरक इतकाच की चित्रपट आणि पुस्तकाच्या बाबतीत असला बालिश प्रकार करणारे समीक्षक (आमच्या) सुदैवाने निदान आजच्या काळात तरी उपलब्ध नाहीत. (आणि श्री अभिनव गुप्तच्या प्रेरणेने असली फळी जन्मालाही न येओ ही सदिच्छा)
कदाचित तुम्ही म्हणाल की श्री अभिनव गुप्त संपूर्ण ब्लॉग वाचत नाहीत असा दावा तू कशाच्या आधारावर करतो आहेस? तर हे बघा त्याचं उत्तर.
२. ९ एप्रिलच्या सदरातला हां उल्लेख.
ओळख करून घ्यावी आणि पुढे वाचत राहावेत अशा ब्लॉग वा संकेतस्थळांवरल्या ताज्या नोंदींआधारे त्यांवर टिप्पणी आणि भाष्य करताना, हेतू तपासण्यासाठी अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील, तेवढय़ा वाचणं इष्ट ठरतं.
"अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील" म्हणजे काय? म्हणजे नक्की किती? हे कोण ठरवणार? श्री अभिनव गुप्त हे का ठरवणार? हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कसा?
"कारण श्री अभिनव गुप्त हे सदर चालवतात" असं बिनाशेंड्या-बुडख्याचं उत्तर इथे अर्थातच ग्राह्य नाही. असो.
३. आता अनेक छोटी छोटी उदाहरणं देतो की ज्यांत त्या त्या ब्लॉग्ज/ब्लॉगर्सवर विनाकारण हल्ले केले गेलेले आहेत. ५ मार्चच्या लेखात मुख्यमंत्री नावाच्या ब्लॉगवर टीका करण्यासाठी आणि लाथाळ्या झाडण्यासाठी खर्ची घातलेला एक संपूर्ण परिच्छेद. आणि दुसऱ्या परिच्छेदात दुसऱ्या एका ब्लॉगला वेठीस धरण्याचा प्रकार.
एक बाब स्पष्ट करून सांगतो की "जेव्हा तुम्ही तुमचं लेखन आंतरजालावर प्रसिद्ध करताय तेव्हा तुम्ही त्यावरील टीकेला तयार असलं पाहिजेत" वालं दिशाहीन आणि चुकीचं समर्थन इथे पूर्णतः गैरलागू आहे. कारण इथे श्री अभिनव गुप्त स्वतः लोकांकडून ब्लॉग्जच्या शिफारशी मागत आहेत (संदर्भ : २ जानेवारीच्या पहिल्या लेखात श्री अभिनव गुप्त (परंतु त्या दिवशी निनावी) यांनी केलेलं आवाहन). आणि जर लोकांनी स्वतःचे किंवा स्वतःला आवडणारे ब्लॉग्ज केवळ आणि केवळ श्री अभिनव गुप्त यांच्या मागणीप्रमाणे दिले तर श्री अभिनव गुप्त यांनी ते ब्लॉग 'संपूर्ण' (point to be noted, Me lord) वाचून ते आवडले नाहीत तर सोडून देऊन अन्य ब्लॉग्ज वाचावेत आणि जे आवडतील ते छापावेत असं अपेक्षित आहे. चांगल्या ब्लॉग्जच्या ओळखीसाठी हे सदर सुरु केलं असून (पुन्हा एकवार २ जानेवारीच्या आवाहनाचाच संदर्भ) जे ब्लॉग्ज आवडले नाहीत त्यांच्यावर लाथाळ्या झाडण्यासाठी नव्हे !
४. १९ मार्चच्या शीर्षकातच 'साडेतीन' टक्क्यासारख्या आक्षेपार्ह बाबीचा उल्लेख करून श्री अभिनव गुप्त यांना नक्की काय म्हणायचं आहे हे केवळ तेच जाणोत !
५. १९ मार्चच्या लेखातलं हे वाक्य स्तंभलेखकाच्या छुप्या हेतूंना बोलकं करण्यासाठी पुरेसं ठरावं.
अशा वेळी आणि अशा स्थितीत ‘वाचावे नेट-के’मुळे सध्यातरी गैरसमज होऊ आणि वाढू शकतात, याचा मासला ठरणारं एक पत्र सोबत आहे.
६. पुन्हा एकदा १९ मार्च. शीर्षकात पुनःश्च एकवार साडेतीन टक्क्यांचा उल्लेख !! आणि त्याहीपुढे एका चांगल्या ब्लॉगचं कौतुक करण्यापूर्वी न चुकता ओढण्यात आलेले ताशेरे.
एक आहे प्रसाद चिक्षे यांचा ब्लॉग. मराठीत, आणि किमान गुगल-क्रोमवर उघडणे कठीण. शिवाय एका वेळी एकच नोंद येताना फार वेळ खाणारा हा ब्लॉग, असा विविध सिस्टीम्सवरचा अनुभव आहे. ही तांत्रिक अडथळय़ांची शर्यत जिंकलात, तर जणू बक्षीस म्हणून
"गुगल क्रोमवर उघडू नका" हे एवढं साधं चार शब्दांत सांगणं किती सोपं आहे. परंतु श्री अभिनव गुप्त यांनी आपल्या अंगभूत (दुर्) गुणाने किमान ३८ शब्द त्यासाठी खर्ची घातले आहेत !!!
७. आता त्याच लेखात हा अजून एक आक्षेपार्ह उल्लेख
नोंदींची भाषा बाळबोध म्हणावी, अशी आहे. ब्लॉगलेखक प्रसाद चिक्षे यांना भाजपसारख्या पक्षाच्या प्रसिद्धीविषयक कामासाठी बोलावणे आले होते असा निष्कर्ष ब्लॉगवरील कुठल्या तरी एका सूचक उल्लेखाचा जरा विचार केल्यावर काढता येत असला, तरी त्यावर विश्वास बसणे कठीण व्हावे, अशी भाषेची रीती!
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास श्री अभिनव गुप्त यांच्या निरर्थक आणि प्रामुख्याने शब्दबंबाळ मराठीपेक्षा मी कुठलंही साध्या भाषेतलं लिखाण कधीही आवडीने वाचेन. पण एखाद्या ब्लॉगरच्या भाषाशैलीवरून त्याला एखादा राजकीय पक्ष कामासाठी बोलावू शकेल की नाही यावर गृहीतक मांडणं हा निखळ मुर्खपणा !! या निरर्थक आणि बिनबुडाच्या मतप्रदर्शनाचा अधिकार श्री अभिनवगुप्त यांना दिला कोणी? ते भाजपचे राष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत की भाषातज्ज्ञ??? माझ्या मते तरी "यापैकी नाही" हेच उत्तर योग्य आहे नाही का?
८. १२ मार्चच्या लेखातील स्त्री ब्लॉगर्सबद्दलच्या अवमानकारक उल्लेखानंतर त्या उल्लेखाच्या निषेधार्थ त्या लेखाखाली अनेक प्रतिक्रिया आल्या (आणि लोकसत्ताने त्यातल्या कित्येक छापल्याच नाहीत) आणि अनेक ब्लॉगलेखकांनी आपल्या ब्लॉगवर/फेसबुक भिंतीवर त्याबद्दल निषेध नोंदवला. त्यानंतर अचानक श्री अभिनव गुप्त यांना १२ मार्चपर्यंत स्त्री ब्लॉगर्सचे “दुपारच्या मासिकांची उणीव भरून काढणारे” ब्लॉग्ज या निषेधमालिकांनंतर अचानक १९ मार्चच्या दिवसापासून “शुद्ध हेतूने लिहिले गेलेले” वाटायला लागले. कंप्लीट युटर्न !!! हा पहा १९ मार्चच्या लेखातला पुरावा.
आपण हेतूंबद्दल बोलत होतो. अनेकदा, ब्लॉगलेखन करणाऱ्या स्त्रियांचे हेतू अधिक शुद्ध असल्याचं दिसतं. हा नियम नाही. असा लिंगविषमतामूलक नियम मानूही नये. पण तरीही दिसतं. ब्लॉगलेखन करणारा जो ‘आवाज ’ वाचकापर्यंत पोहोचतो, तो तपशिलांमधून जाणवतो. तपशील मांडणं म्हणजे ‘माहिती देणं’ अपरिहार्यपणे आलंच. पण माहिती कशाची द्यायची आहे, त्यातून काय सांगायचं आहे, हे महत्त्वाचं मानण्याची वृत्ती असलेल्या २५ ब्लॉगरपैकी २० स्त्रियाच असतात.. आणि या सर्वच्या सर्व- म्हणजे वीसहीजणींच्या ब्लॉग-लिखाणात अनेकदा, स्वत:सकट सर्वाना पुन्हा पाहण्याची, तपासून घेण्याची विश्लेषक वृत्ती दिसते! स्वत:च्या जगण्याचे हेतू दुसऱ्यांच्या जगण्यातही मिसळलेले असतात, ही व्यक्तिबाह्य अस्तित्वाची पातळी मान्य करणं बहुधा पुरुषांना जमत नसावं, त्यालाही सामाजिकच कारणं असावीत. पण हेतू तपासणारं विश्लेषण मराठी ब्लॉगांवरून करण्यात सध्या स्त्रिया पुढे आहेत.
९. आता हा अजून एक विनोदी उल्लेख ९ एप्रिलच्या लेखातला.
(आणि वाचन, अभ्यास वगैरे नसावं) असं त्यांच्या ब्लॉगवरला मजकूर वाचून वाटत राहतं. मग लक्षात येतं की, फक्त तरुण वयावर खापर फोडून चालणार नाही. भाषा ज्या हेतूंसाठी वापरली जाते आहे, ब्लॉग ज्या प्रकारच्या संवादासाठी लिहिला जातो आहे, तो हेतू एकतर लेखकाला स्पष्ट आहे का आणि वाचकाला पटण्यासारखा आहे का, हे अखेर ब्लॉगचा मगदूर ठरवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं
श्री अभिनव गुप्त यांनी लोकांच्या भाषेवर आक्षेप घेणे हे म्हणजे "शीशे के घर मे....." वाल्या संवादासारखं झालं !!
१०. आता ३० एप्रिलच्या लेखाची ही सुरुवातच बघा.
‘माझे जीवनगाणे माझ्या ब्लॉगमधून मी ऐकवणार’ हा आग्रह अनेकांचा असतो आणि तो अत्यंत कडक आग्रह असतो, हे ‘वाचावे नेटके’बद्दल ज्या चर्चा- प्रतिसाद- प्रतिक्रिया बाहेर अन्यत्र चालताहेत, त्यांतून कुणाच्याही लक्षात येईल.
थोडक्यात हे सगळं जाणूनबुजून चालू आहे आणि स्तंभलेखक त्यातला विकृत आनंद उपभोगत आहे हेच स्पष्ट होतं. यावरून जॉर्ज बर्नार्ड शॉचं "Never to wrestle with a pig. You get dirty, and besides, the pig likes it." वालं वाक्य आठवलं. असो.
भाग ३ : अशुद्ध, चुकीची आणि न समजणारी मराठी
१. २७ फेब्रुवारीच्या लेखातला हा उल्लेख.
अभिनिवेश नाही, पण अतिरेकी निष्ठा! लेखक बहुतेकदा अभ्यासू, पण सारा अभ्यास त्या निष्ठांच्या कक्षेतला. मुद्दा अगदी वकिली बाण्यानं, जणू काही तर्कशुद्धपणेच पटवून दिलेला वरकरणी दिसेल, पण अर्धसत्यच लोकांपुढे मांडून तो आधार कसा निर्णायक आहे हे पटवण्याचा आटापिटा करणं, चुकीच्या किंवा अयोग्य मुद्दय़ांपायी शब्दांचं जाळं रचणं, हे दोष या लिखाणात नेहमीच असतात.
स्वतः एवढं विचित्र, अतर्क्य आणि अगम्य मराठी लिहिणाऱ्या श्री अभिनव गुप्त यांनी अन्य ब्लॉगर्सवर "शब्दांचं जाळं रचणं" हा आरोप करणं हे म्हणजे विरोधाभासाचा माउंट एव्हरेस्ट म्हणावं लागेल !!
२. १२ मार्चच्या लेखातला हा उल्लेख म्हणजे इतर काही नसून फक्त स्वतःला माहित असणारे काही जडबंबाळ शब्द त्यांचे अर्थ न तपासता एकापुढे एक लिहिण्याचा हास्यास्पद प्रयत्न म्हटला पाहिजे !
आपल्या जीवनशैलीबद्दल आपल्याच भाषेत वाचायला मिळणं, ही विचक्षण नसलेल्या ‘सामान्य’ वाचकांची गरज असते. ती कुठल्याही भाषेत असतेच. जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं, हाच या वाचनाचा उद्देश असू शकतो, पण वाचकांना तो या शब्दांमध्ये माहीत नसण्याचीच शक्यता अधिक असते!
"विचक्षणा नसलेला सामान्य वाचक" आणि "जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं" ही दोन वाक्य दिनांक १२ ते १९ मार्चच्या आठवड्यात त्यांच्या अर्थांसाठी सर्वाधिकपणे गुगल केली गेली (आणि तरीही कोणालाही त्याचा अर्थ उमगला नाही) असं ऐकून आहे !!
३. ९ एप्रिलच्या लेखातला हा असाच अजून एक विनोदी उल्लेख.
स्त्री-ब्लॉगर फक्त स्वत:बद्दल लिहितात म्हणून त्या किती छानपैकी हेतू तपासू शकतात, असा छुपा वारही कुणी करू नये.
असले तिरपागडे आरोप अन्य कोणी नाही तर स्वतः श्री श्री अभिनव गुप्त करताहेत हा तपशील ते सोयीने विसरताहेत.
४. २३ एप्रिलच्या लेखातला शेवटच्या परिच्छेदातला हा उल्लेख बघा.
आणि ‘च्यायला.. हेही ब्लॉगर झाले’
आणि श्री अभिनव गुप्त यांची एकूण शब्दनिवड पाहता मला १०१% खात्री आहे की त्यांनी शीर्षकातही हाच शब्द वापरला असणार परंतु आपण किंवा आपल्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ आणि ज्ञानी संपादक/पत्रकाराने वेळीच हस्तक्षेप करून 'च्यायला' ला 'अरेच्चा' मध्ये बदललं असेल. त्यामुळे २३ एप्रिलच्या लेखाचं शीर्षक 'वाचावे नेट-के : अरेच्चा.. हेही ब्लॉगर झाले !' असं मर्यादापूर्ण दिसतोय. माझ्या तीस वर्षांच्या वर्तमानपत्र वाचनाच्या अनुभवात 'च्यायला' सारखा शब्द संपादकीय पानावरील स्तंभात वाचण्याचा हा केवळ पहिला आणि कदाचित एकमेवच योग !!
ब्लॉगर्सवरील यथेच्छ लाथाळीने भरलेल्या या सदरातील आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये एक अपवाद मात्र नक्कीच दिसला. तो म्हणजे श्री चंद्रशेखर आठवले यांच्या ब्लॉगविषयीचा ७ मे २०१२ चा लेख. पण अर्थात एकही अपशब्द न वापरता किंवा खोडसाळपणा न करता हा लेख लिहिण्याचं कारण म्हणजे म्हणजे श्री अभिनव गुप्त यांच्या विचारात झालेला बदल नसून श्री गोखले यांच्यासारख्या ज्ञानी, तल्लख आणि व्यासंगी ब्लॉगरबद्दल अपशब्द काढण्याएवढी आपली पात्रता नाही की प्राज्ञा नाही हे श्री अभिनव गुप्त यांनी त्यांच्या सुदैवाने ओळखलं हे आहे. !!!
आता अजून एक अतिशय महत्वाचं परंतु कित्येकांना न रुचणारं निरीक्षण नोंदवू इच्छितो. ज्या ब्लॉग्जची अतिशय स्तुती करण्यात आलेली आहे ते ब्लॉगर्स एक तर कुठल्या ना कुठल्या मराठी संकेतस्थळाचे प्रतिनिधी आहेत किंवा ज्यांनी कुठल्याही मराठी संकेतस्थळाशी जाणीवपूर्वकच संबंध ठेवलेला नाही (उदा श्री चंद्रशेखर आठवले). माझ्या ब्लॉगची शप्पत घेऊन सांगतो की त्यांच्याची माझं वैयक्तिक शत्रुत्व मुळीच नाही की त्या ब्लॉग्जचं कौतुक झाल्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही असूया नाही. उलट एक मराठी ब्लॉगर या नात्याने दुसऱ्या एका मराठी ब्लॉगरचं कौतुक होणं हे माझ्यासाठी खचितच अभिमानास्पद आहे आणि त्याउपर जाऊन म्हणायचं तर श्री अभिनवगुप्त सारख्या छिद्रान्वेषी इसमाला निदान कुठल्यातरी ब्लॉगबद्दल त्या ब्लॉगला लाथा न घालता निव्वळ स्तुरी करावीशी वाटली हे पाहून तर तो अभिमान अजूनच दुणावला. असो.
श्री अभिनव गुप्त यांच्या माझ्यासारख्या मराठी ब्लॉगर्सच्या ब्लॉगपोस्टमधील लिंक्स मधून (का होईना) वाचक वाचावे नेटके पर्यंत पोहोचोत अशा विक्षिप्त हेतूला बळी न पडता मुद्दामच वाचावे नेटकेच्या लिंक्स न देता लेखांतले आक्षेपार्ह उल्लेख इथे कारणांसहित नोंदवले आहेत. तुम्ही त्याची योग्य ती दखल घ्यालच. अर्थात फक्त दखलच आणि कारवाई नाही कारण "च्यायला, हेही पत्रकार झाले !!"
दर सोमवारी प्रसिद्ध होणारे हे सगळे लेख इतक्या काळजीपूर्वक आणि बारकाईने वाचता की नाही याची खात्री नसल्याने मुद्दाम सगळे मुद्दे आणि आक्षेप कारणांसहित तुमच्यासमोर मांडत आहे. जाता जाता एकच छोटा प्रश्न विचारावासा वाटतो की इतक्या मोठ्या वृत्तपत्रात अशा प्रकारचं सदर चालवणं यासाठीची पात्रता काय आहे? कारण आजच्या घडीला कित्येक ब्लॉगर-पत्रकार आंतरजालावर आणि वर्तमानपत्रांमध्ये उपलब्ध आहेत जे वृत्तपत्रीय लेखन आणि ब्लॉगलेखन हे दोन्ही सारख्याच ताकदीने सांभाळतात आणि त्यातल्या कित्येकांना मी वैयक्तिक ओळखतो. कदाचित ते श्री अभिनव गुप्त यांच्यापेक्षा वयाने आणि पदाने कनिष्ठ असतील परंतु त्यांचं लेखनकौशल्य निर्विवादपणे श्री अभिनव गुप्त यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे तसंच कुठलाही पूर्वग्रह ठेवून दुषित लिखाण न करता निर्भेळ लेखनावर त्यांचा अधिक विश्वास आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो आणि अशी अनेक नावं मी याक्षणी सुचवूही शकतो !!
So, Mr Girish Kuber, Are you watching closely??
तळटीप : हेच पत्र मी श्री गिरीश कुबेर आणि श्री अभिनव गुप्त यांना त्यांच्या इमेल आयडीवर पाठवलं आहे.