Saturday, May 19, 2012

साक्षात्कार

किरकिरत्या गजराने चिडचिडतच उठलो..
आन्हिकं उरकली..
नाश्ता झाला, ज्यूस झालं,.. कॉफीही पिऊन झाली.
कपडे करून तयार झालो आणि हापीसला जायला निघालो.
काय माहित पण असं फ्रेश्श नव्हतं वाटत आज............ !!

ट्रेन पकडली, बसायला जागाही मिळाली..
नेहमीप्रमाणे पुस्तक काढून वाचायला घेतलं..
वाचत होतो पण अर्थ डोक्यात शिरत नव्हता..
कंटाळून बंद केलं पुस्तक आणि डोळे मिटून बसून राहिलो.
स्टेशन आल्यावर नाईलाज म्हणून उठून उभा राहिलो आणि उतरलो.
हापीसला पोचलो...
काही कळत नव्हतं का ते पण आज जराही फ्रेश्श वाटत नव्हतं....... !!

कामाला सुरुवात झाली, मेल्स, मिटींग्ज, कॉन्फरन्स कॉल्स सगळं एकामागून एक नेहमीप्रमाणे चालू होतं....
बॉसची बडबड, बॉसच्याबॉसची बडबड, ते मेल्स, एच आरचे टीम-बिल्डिंगचे यंत्रवत मेल्स हेही होतंच...
या सगळ्या गडबडीतून उठून जाऊन एकदा चेहरा चांगला खसाखसा धुऊन आलो...
चांगली लार्ज कॉफी घेऊन डेस्कवर आलो...
पण तरीही.. तरीही मुळीच फ्रेश वाटत नव्हतं आज.......... !!

जेवण झालं, मिटींग्ज, मेल्स, कॉल्सचं चक्र चालूच राहिलं...
ट्रबलशुटींग्ज, एस्कलेशन्स झाले...
भारत-कॉल झाला....
पुन्हा एकदा चेहरा धुवून आणि लार्ज कॉफी घेऊन डेस्कवर आलो...
त.. री... ही... अजिबातच फ्रेश वाटत नव्हतं आज......... !!

पुरेसं राबवून घेऊन झाल्यावर, छळून झाल्यावर दिवस संपत आला...
दिवस संपताना कालच्या दुप्पट मेल्स, इश्युज, प्रॉब्लेम्स हे आपण आज दिवसभरात खरोखर काही केलं की नाही असं वाटायला लावणारे होते...
पण त्या सगळ्यांकडे एक तुच्छ दृष्टीक्षेप टाकून स्क्रीन लॉक केली आणि निघालो.
दिवसभर वाटलं नाही ते आता काय दगड फ्रेश वाटणार होतं म्हणा..... !!

ट्रेनमध्ये बसलो...
दोन पानं वाचून पुस्तक ठेवून दिलं,,..
डोळे मिटून बसून राहिलो...
तेवढ्यात मोबाईल किरकिरला...

आत्ता कोणाचा फोन म्हणून बघायला गेलो तर रिमायंडर वाजत होता.

"पेस्ट घेणे".... स्क्रीनवर शब्द चमकत होते... आयला हा रिमायंडर तर मी काल सकाळी लावला होता.. काल संध्याकाळी टूथपेस्ट विकत घ्यायची आठवण करण्यासाठी. सकाळी अखेरची फाईट मारून झाल्यावर पेस्टने मान टाकली होती. त्यामुळे संध्याकाळी पेस्ट घेतली नाही तर वाट लागणार होती. अरे पण हे सगळं कालचं झालं........... मग आज... आज............... ओह... !!!!!!! रिमायंडरमध्ये कालची तारीख टाकायच्या ऐवजी चुकून आजची तारीख टाकली होती.............

तरीच आज दिवसभर अजिबात अजिबात, जराही, यत्किंचितही, मुळीच फ्रेश वाटत नव्हतं..... !!!!!!!!!! (आणि च्युईंगमचं पाकीटही दुपटीने रिकामं झालं होतं ;) )

Thursday, May 17, 2012

तीन उपाय


कारचं दार उघडताक्षणी बाहेरचा रणरणता उकाडा झपकन आत शिरून कारमधला एसीचा गारवा खाऊन टाकायला लागला. मी चटकन दार लावून घेतलं. उरलेलं कोक संपवलं आणि कारमध्ये बसूनच बाहेरचा अंदाज घ्यायला लागलो. मी रस्ता चुकलो नव्हतो एवढं नक्की आणि पारही तोच होता. पण बाबा काही दिसत नव्हते. शेवटी त्या पाराशेजारीच गाडी पार्क केली आणि नाईलाजानेच गाडीतून उतरलो. त्या असह्य उकाड्याने एकदम गुदमरल्यासारखं झालं. चेहरा आणि मान रुमालाने खसाखसा पुसले आणि शेजारच्या टपरीच्या दिशेने चालायला लागलो. टपरीपर्यंत पोचतोय ना पोचतोय तोच समोरच्या कोपऱ्यात खुणेचं लाल पागोटं दिसलं. होय तेच.. तेच तेच.. बाबाच होते ते. माझ्याकडेच बघत होते. अतिशय आनंदित होऊन मी त्यांच्या दिशेने हात हलवला. पण प्रत्युत्तरादाखल त्यांचा हात हलला नाही की चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. दमले असावेत. आणि ऊनही टिपेला होतं ! मी पटापट पावलं टाकत त्यांच्या दिशेने चालायला लागलो इतक्यात अचानक ते उठून उभे राहिले.

****************

वैतागून मी हातातली पिशवी खाली ठेवली आणि पारावर बसलो. खिशातून मोबाईल काढला आणि नंबर डायल केला.

"हॅलो"

"..."

"अग नाही. इथेच आहे अजून. आधीची एसटी चुकली माझी आणि आता पुढची एसटी कॅन्सल झालीये म्हणे. पुढे काहीतरी अपघात झाल्याने रस्ता बंद आहे"

"..."

"छे. आज जाणं तर नक्कीच होणार नाही. आता परत कसं यायचं बघतो."

"..."

"हो.. बरं फोन करतो नंतर."

आता परत जायला बस कधी आणि कुठून मिळेल काहीच अंदाज नव्हता. आता काय करायचं या विचारात मी इकडे तिकडे बघत तिथेच उभा होतो.

"राम राम"

थोड्या अंतरावरून आवाज आला. एक किंचित वयस्कर गृहस्थ डोळे मिटून शांत बसले होते. मीही हसून राम राम केलं. त्यांनी डोळे किंचित किलकिले उघडून हात हलवला. आता त्यांनी नुसतंच "बरं" अर्थाने हात हलवला की "इकडे या" या अर्थी हलवला हे मला समजलं नाही. आणि या आगजाळ उन्हाने किलकिले केलेले डोळे त्यांनी पुन्हा मिटूनही घेतले. मला तसंही काम नव्हतं आणि कदाचित बोलता बोलता बसची माहिती मिळेल या हेतूने मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो.

"नमस्कार"

"नमस्कार नमस्कार"

"भारीच ऊन आहे नाही?"

"या ऊन्हाचं कौतुक तुम्हा एसीवाल्यांना.. आम्हाला काय रोजचंच आहे" किंचित हसत ते म्हणाले. मीही हसलो.

"त्रासलेले वाटता"

"हुं"

"आणि तेही उन्हाने नाही"

अनोळखी माणसाशी एवढी जवळीक, चौकशी वगैरे मला जरा अप्रस्तुत वाटली. पण तरीही म्हातारबाबा कदाचित काळजीने किंवा सहज काहीतरी संभाषण पुढे न्यायचं म्हणून म्हणत असतील म्हणून मी ही म्हणालो.

"खरंय. पण तुम्हाला कसं कळलं?"

"ज्योतिषी आहे मी. फक्त चेहरा बघून सांगू शकतो"

"काय?? खरंच?"

म्हातारबाबा अचानक जोराने हसले. "नाही ओ. चेष्टा करत होतो तुमची. तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं ना. त्या अंदाजाने म्हणालो फक्त".... मी काहीच बोललो नाही.

"काही समस्या आहे का?"

अचानक माझे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना घडाघडा सांगून टाकून मोकळं व्हावंसं वाटून गेलं मला. अनोळखी माणसाला सगळं सांगून टाकल्याचा फायदा असा असतो की आयुष्यात तो पुन्हा आपल्याला भेटणार नसतो, अनोळखी असल्याने एकमेकांविषयी काही मतं किंवा पूर्वग्रह नसतात. समोरचा माणूस आपल्याला जज करणार नाहीये ही भावना मन मोकळं करण्यासाठी किती आवश्यक आहे हे तेव्हा मला प्रकर्षाने जाणवून गेलं !! ओळखीच्यांसमोर आपली रडगाणी गाऊन आपल्या 'स्व' ला धक्का लावून घेण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी सोपा !!

काही समस्या?? त्या हिंदी चित्रपटातल्या "एक हो तो बताऊँ" सारखं म्हणावसं वाटलं मला.

"हम्म. अहो काही ना काही प्रॉब्लेम्स चालूच आहेत. एकही धड मार्गी लागत नाहीये. वैतागून आज शेवटी एका ज्योतिषीमहाराजांना भेटायला चाललो होतो. बरेच ज्ञानी आहेत असं ऐकून आहे. तिकडेच चाललो होतो तर नेमकी बसही नाहीये आता."

बाबांनी पुन्हा एकदा किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितलं. पुन्हा डोळे मिटून काही वेळ शांत बसले आणि जरा वेळाने म्हणाले

"मी मगाशी चेष्टा करत नव्हतो. खरं सांगत होतो."

"म्हणजे?"

"भविष्याबद्दल"

"काय????? खरंच?"

"होय"

मग मगाशी थट्टा करतोय असं का म्हणालात?"

"ते उगाच. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही असं वाटलं म्हणून"

"तुम्ही खरंच ज्योतिषी आहात?"

"हो. आणि तोही कुडमुड्या नाही. चांगलं शास्त्रशुद्ध शिकलेला. तुमचा चेहरा बघताक्षणीच तुमच्या सगळ्या समस्या माझ्या नजरेसमोर आल्या. फक्त समस्याच नाही तर त्यावरचे उपायही"

"चेहरा बघताक्षणीच? कधी बघितलात तुम्ही चेहरा? आपण भेटल्यापासून तुमचे डोळे मिटलेले आहेत. अगदी आत्ताही" मी एक शेवटचा खडा टाकून बघितला,

"पहिल्या वेळी रामराम केलं तेव्हा दिसला तेवढंच दर्शन पुरतं मला. पण मला आधी आली होती ती शंका रास्त होती. तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर. तुम्ही तुमच्या बसची शोधाशोध करा. मी निघतो"

"अहो तसं नाही" आता मात्र मी पुरता खजील झालो होतो. "प्लीज तुम्ही रागवू नका. तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचा हेतू नव्हता माझा."

"हम्म.. असो"

"अहो बरेच प्रॉब्लेम्स चालू आहेत सध्या.. घरात, कामात........... "

"एक मिनिट.. " बाबांनी अचानक हात वर करून मला थांबवलं. "मी तुम्हाला तुमच्या समस्या विचारत नाहीये. मला त्या माहित आहेत असं म्हणालो मी. आणि त्यावरचे उपायही...!!! लक्ष नाहीये तुमचं"

"सॉरी. अहो तसं नाही."

"बरं. हे घ्या". त्यांनी खिशातून एक खडा काढला आणि माझ्या हातात दिला.

"तुमच्या घराजवळ गणपतीचं देऊळ आहे?"

"हो अगदी घरासमोरच आहे."

"अरे वा छान.. आणि शनीचं?"

"शनीचं? नाही. म्हणजे आहे पण ते खुपच लांब आहे"

"कितीही लांब असो. उद्यापासून रोज सकाळी उठायचं गणपतीच्या देवळात जायचं. बाहेरूनच दर्शन घ्यायचं. आत जायची गरज नाही. आणि त्यानंतर तिथून थेट शनीमंदिरात जायचं. तिथेही बाहेरूनच दर्शन घ्यायचं. आणि त्यानंतर ती दोन देवळं म्हणजे दोन बिंदू समजून त्या दोन्ही देवळांना मिळून एक अशा प्रदक्षिणा घालायच्या. पण आपल्या नेहमीच्या प्रदक्षिणांसारख्या नाही. धावत. जितक्या जास्त वेगात धावता येईल तितक्या वेगात"

"बरं"

"किती घालाल प्रदक्षिणा? एकवीस. आणि या सगळ्या प्रदक्षिणा सूर्योदयाच्या आत झाल्या पाहिजेत."

"सूर्योदयाच्या आत?"

"का काय झालं? जमणार नाही?"

"नाही नाही. जमेल."

"आणि हा खडा चोवीस तास तुमच्या बरोबर बाळगायचा. एक क्षणही अंतर द्यायचं नाही"

"बरं"

"आणि शेवटची अट म्हणजे आजपासून फक्त खरं बोलायचं. एक कणभरही खोटं नाही. असत्याचा अंशही नको."

"बरं"

"ठीक. या आता"

झालं? एवढंच? अजून काही नाही? पुन्हा भेट, दक्षिणा वगैर काहीच नाही? असे विचार करत मी तिथेच चुळबुळत उभा राहिलो. ते विचार जणु वाचल्याप्रमाणे पुन्हा ते स्वतःच म्हणाले "मी दक्षिणा वगैरे काही घेत नाही. रोज प्रदक्षिणा घालायला जेवढी मिनिटं त्याला दहाने गुणून तेवढे रुपये रोज बाजूला काढून ठेवा. त्या पैशाचं काय करायचं ते नंतर सांगेन. असो. मी सांगितले ते नियम अगदी मनापासून पाळा. बदल दिसेल. नक्की दिसेल. सुधारणा दिसायला लागली की मला इथेच येऊन भेटा. तेव्हा दक्षिणेचं बोलू. या आता" मी एकदम त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. आधी काही म्हणाले नाहीत पण नंतर अचानक मागे सरकले आणि म्हणाले "याची गरज नाही"

****************

बाबांनी सांगितलेल्या उपायांनी सुरुवातीला काहीच फरक जाणवला नाही. तरीही मी ते नेटाने करत राहिलो. प्रदक्षिणा, तो खडा, आणि असत्य टाळणं वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि बघता बघता एकदम फरक जाणवायला लागला. बुडायला आलेलं वर्कशॉप पुन्हा उभारी धरायला लागलं, हातात पैसे शिल्लक राहायला लागले, विकलेली गाडी थोडेसेच जास्त पैसे देऊन पुन्हा विकत घेतली, तब्येतीच्या कटकटी बघता बघता कमी होत गेल्या, झोपेच्या तक्रारी बंद झाल्या, हे म्हणजे एकदम जादूची कांडी फिरवल्यागत होत होतं सगळं !! बाबांना मी रोज मनोमन नमस्कार करत होतो. सुधारणा नक्कीच जाणवत होती. बाबांना भेटायला जायचं होतं पण कामाच्या व्यापात बघता बघता कसे १०-११ महिने उलटून गेले कळलंच नाही. गेल्या उन्हाळ्यात बाबांचे पाय धरून इथून निघालेलो मी पुन्हा या उन्हाळ्यात परतलो होतो. त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांना काय हवी ती दक्षिणा देण्यासाठी. खुणेच्या पाराच्या ठिकाणी येऊन मी कार थांबवली आणि दार उघडलं. कारचं दार उघडताक्षणी बाहेरचा रणरणता उकाडा झपकन आत शिरून कारमधला एसीचा गारवा खाऊन टाकायला लागला. मी चटकन दार लावून घेतलं. उरलेलं कोक संपवलं आणि कारमध्ये बसूनच बाहेरचा अंदाज घ्यायला लागलो.

****************

अतिशय आनंदित होऊन मी त्यांच्या दिशेने हात हलवला. पण प्रत्युत्तरादाखल त्यांचा हात हलला नाही की चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. दमले असावेत. आणि ऊनही टिपेला होतं ! मी पटापट पावलं टाकत त्यांच्या दिशेने चालायला लागलो इतक्यात अचानक ते उठून उभे राहिले. माझ्याकडे पाठ केली आणि उलट दिशेने पावलं टाकायला लागले. पण चालण्याचा वेग अतिशय मंद होता. अचानक माझं लक्ष त्यांच्या हातातल्या लाल-पांढऱ्या छडीकडे गेलं. मी जागच्या जागी थिजून गेलो. वर्षभरात आपण बाबांची साधी चौकशीही केली नाही की त्यांना भेटायला आलो नाही. त्यांच्यावर एवढा भयानक प्रसंग ओढवला आणि आपल्याला त्याची साधी कल्पनाही नाही. खूप अपराधी वाटायला लागलं. मी जागच्याजागी थरथरायला लागलो. किंचित गरगरल्यासारखंही वाटायला लागलं आणि मी एकदम जमिनीवरच बसकण मारली. टपरीवाला माणूस धावत जवळ आला आणि माझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. त्याने दिलेला चहाचा कप थरथरत्या हाताने कसाबसा प्यायल्यावर थोडी हुशारी आली. मी उठून उभा राहिलो. मी ठीक आहे हे बघितल्यावर तो जायला लागला. मी त्याला थांबवलं आणि त्याच्या हातात पाचाची नोट दिली आणि विचारलं

"हे बाबांचं असं कसं झालं? कधी झालं?"

"कोणाचं?"

"ते लाल पागोटंवाले बाबा."

"अच्छा ते. त्यांचं काय?"

"त्यांच्या डोळ्यांना काय झालं? काही अपघात वगैरे झाला का? कधी झाला?"

तो काही न बोलता माझ्याकडे वेड्यासारखा बघायला लागला.

"अरे मी काय विचारतोय? कळतंय का?"

"नाही कळत. खरंच कळत नाहीये"

"म्हणजे?"

"अहो ते म्हातारबा पहिल्यापासूनच आंधळे आहेत"

"काय?" आता वेड्यासारखं बघायची पाळी माझी होती.

"होय"

"अरे कसं शक्य आहे? त्यांनी माझा चेहरा बघून माझं भविष्य सांगितलं. माझ्या समस्या न सांगता त्यांना समजल्या होत्या, त्यावर त्यांनी उपायही सांगितले मला. अरे जेमतेम वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. गणपतीचं देऊळ, शनीचं देऊळ, खडा, सत्य बोलायचं. विश्वास बसणार नाही एवढी प्रगती झाली माझी. कुठून कुठे पोचलो" असं बरंच बरंच काही मी बोलत राहिलो. बराच वेळ. तो फक्त किंचितसा हसला आणि तिथून जायला लागला.

-समाप्त

Wednesday, May 16, 2012

श्री. अभिजीत ताम्हणे यांस

परममित्र अभिनवगुप्त, उर्फ समीक्षाबाई नेटके, उर्फ (काही काळ) निनावी उर्फ .................... श्री. अभिजीत ताम्हणे यांस सप्रेम वंदे,

ताम्हणे, तुम्हाला एक गंमत सांगतो. लहानपणी मला लपाछपीचा खेळ अजिबात आवडायचा नाय. कारण माझ्यावर राज्य आलं की मला कधीच कोणाला शोधता यायचं नाय. मोठेपणी पुन्हा एकदा लपाछपीचं राज्य येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण माझ्या सुदैवाने बालपणीची शोधाशोधी करता न येण्याची सवय मी बदलू शकलो त्यामुळे बराच फायदा झाला माझा. तर लपाछपी !!! गेले काही दिवस आपली जी लपाछपी चालू आहे ना... लपाछपी म्हणजे ते नेहमीचंच आपलं की राज्य पुन्हा माझ्यावरच आणि माझी शोधाशोधी चालूच. मनापासून सांगतो ताम्हणे, मला ही लपाछपी खेळायची नव्हती. मला काही प्रश्न विचारायचे होते तुम्हाला, काही गोष्टींवर चर्चा करायची होती, काही शंकांचं निरसन करून घ्यायचं होतं, काही मुद्दे मांडायचे होते. त्यासाठी मोठ्या प्रयत्नाने शोधलं तुम्हाला. आता खरं सांगायचं तर 'मोठ्या प्रयत्नाने' हे म्हणजे फक्त म्हणायची पद्धत म्हणून. प्रत्यक्षात फार प्रयत्न करावे लागले नायत. तर काय सांगत होतो? हां..

- तर तुम्हाला फेसबुकवर शोधलं, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पण तुम्ही काही ती स्वीकारली नाय.

- तुम्हाला 'वाचावे नेटके' च्या आयडीवर पत्र पाठवलं कित्येकदा, त्यालाही उत्तर आलं नाय,

- 'वाचावे नेटके' वर दिलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेत माझा खराखुरा इमेल आयडी दिला होता. पण त्याचाही काही उपयोग झाला नाय.

- शेवटी ब्लॉगवर खुलं (अनावृत) पत्र लिहिलं, परंतु त्यालाही काही पोच आली नाय.

अर्थात मी काही एवढा मोठा माणूस नाय की तुम्ही माझ्या पत्रांना उत्तरं द्यावीत. मी तर एक सर्वसामान्य ब्लॉगर. कोणीही यावं आणि टपली मारून जावं. म्हणून मग अशा परिस्थितीत सर्वसामान्य ब्लॉगर जे करतो तेच करायचं ठरवलं. बास का आता? करून करून करणार काय मी? अजून एक खुलं पत्र लिहिणार.

तर वर म्हटल्याप्रमाणे काही प्रश्न विचारायचे होते. त्याआधी एक सांगतो. मीही डोंबिवलीचाच बरं का. असो.

१. ताम्हणे, आपलं डोंबिवलीत कधी कोणत्याही प्रसंगी, एखाद्या भेटीत, क्रिकेट मॅचमध्ये, नळाच्या रांगेत, वाण्याच्या दुकानात, फडके रोडवर, भागशाळा मैदानात, गणपती मिरवणुकीत वगैरे वगैरे कुठल्याही प्रसंगी भांडण झालं होतं का ओ?

२. मी तुम्हाला माझ्या ब्लॉगवरच्या एखाद्या पोस्टमधून जाणता/अजाणता कधी नावं ठेवली होती का?

३. मी कधी काळी एखाद्या मराठी संकेतस्थळावर कार्यरत असताना आपले काही मतभेद, वादविवाद, बाचाबाची, तूतू-मैंमै वगैरे काही झालं होतं का? हे कारण असेल तर मला तरी ते कधीच कळू शकणार नाय. कारण ते आयडी प्रकरण मला कधीच झेपलं नाय. त्यामुळे तुमचा आयडी कुठला वगैरे मला माहित नाय आणि मी त्या फंदातही पडलो नाय कारण सगळीकडे मी माझ्या नावानेच वावरत होतो. बादवे, आताचा वावर फक्त आणि फक्त ब्लॉग, हे तुमच्या अवांतर माहितीसाठी...

४. मागे तुम्ही प्रहारमध्ये 'समीक्षा नेटके' या नावाने लिखाण करत असताना मी तुमच्या कुठल्या लेखावर कधी काही तुमच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती का? किंवा ब्लॉगवर काही (तुमच्या दृष्टीने) आक्षेपार्ह लिहिलं होतं का?

ताम्हणे, मी हे सगळं अगदी मनापासून विचारतोय. कारण या सगळ्या प्रश्नांना माझं उत्तर एकच आहे. "माहीत नाय" !!!!!!..

खरंच सांगा यापैकी काही झालं होतं का? अरे मित्रा, मग कारण तरी काय होतं/आहे असं येता जाता, उगाचच्या उगाच एवढ्या मोठ्या वर्तमानपत्रातल्या, संपादकीय पानावर चालणाऱ्या सदराचा (गैर)वापर करून उगाच माझ्या ब्लॉगला टोमणे मारण्याचं, विचित्र भाषा वापरून लक्ष्य करण्याचं, आडून हल्ले करण्याचं. तू तर महेंद्र कुलकर्णींसारख्या ज्येष्ठ ब्लॉगरलाही सोडलं नायस. तुला ब्लॉगिंग आवडत नसेल. वपु आवडत नसतील, महेंद्र कुलकर्णींचा ब्लॉग आवडत नसेल, माझ्या ब्लॉगकडे तर ढुंकूनही बघायची इच्छा होत नसेल. ठीके रे.. चालतं. त्यात काहीच चूक नाय.. असते एकेकाची आवड निवड. पण म्हणून काय वैयक्तिक हिशोब चुकते करायला (कधीचे हिशोब ते तर फक्त देवच जाणे) 'लीडिंग इंटरनॅशनल मराठी न्यूज डेली' म्हणून मोठ्या मानाने मिरवणाऱ्या पेप्राचा वापर करायचा? (आम्ही त्याला लाडाने 'मिसलीडिंग' म्हणतो), संपूर्ण सदराला वेठीला धरायचं?

असो. क्षणभर, आपण असं समजू की वरच्या चारी प्रश्नांची तुमची उत्तरंही "नाय" अशीच आहेत. अहो फक्त समजा क्षणभरासाठी. तर आपण असं गृहीत धरू की आपल्यात काही एक वाकडं नव्हतं तर मग तुम्ही का केलंत असं? कोणाच्या सांगण्यावरून केलंत? तुमच्या 'मंदीरा'तल्या मित्रांच्या सांगण्यावरून की अन्य 'स्थळांच्या'?? म्हणजे ठिकाणच्या.... असो.

ताम्हणे, मी तुमच्या सदरातले सुरुवातीचे(सुद्धा) लेख वाचले आहेत. एखाद्या 'माहितगाराने' लिहिल्याप्रमाणे माहितीपूर्ण होते पण भारीच शब्दबंबाळ. जड-जड, अगम्य, अतर्क्य शब्दांचा पसारा. अशा विचित्र शब्दांनी भरलेली मोठमोठी वाक्यं. समीक्षा नेटके 'बनून' लिहायचात तेव्हाही असंच करायचात. पण तेव्हा थोडं तरी सुसह्य असायचं. पण आत्ता मात्र जड शब्दांचा नुसता गोंधळ माजला होता. पण शैली मात्र तीच.. समीक्षा नेटकेचीच. पहिल्या लेखातच ओळखलं होतं हो आम्ही सगळ्यांनी की ही म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून समीक्षा नेटकेच च च च.. असो.. मुद्दा तो नाय. तर असे जड शब्दांनी भरलेले त्याहून जड लेख वाचले न गेल्याने सदराला स्वस्तात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी केलंत का हे? सगळेजण असंच म्हणतायत. (अर्थात मी तर म्हणतोच आहे.)..

असो. अजूनही काही बिघडलेलं नाय. एक काम करा. माझ्या ब्लॉगवर 'माझे ब्लॉगु-ब्लगिनी !!' आणि 'मला हे भावतं !!!' हे दोन उल्लेख दिसतायत? त्याखालच्या कुठल्याही दुव्यावर क्लिक करा, कुठलाही लेख उघडा आणि वाचून पहा. किती वेगवेगळ्या प्रकारचं, निरनिराळ्या शैलीत, असंख्य विषयांवर लिहिलंय बघा लोकांनी. काय लिहिलंय ते नव्हतं हायलाईट करायचं मला. दाखवायचं हे आहे की किती साध्या सोप्या सरळ शब्दांत लिहिलंय बघा. उगाच 'विचक्षण' नाय की 'जीवनशैलीची अपरिहार्यता' नाय की 'उद्वेग दाटून येणं' नाय. जे सांगायचं ते उगाच भलत्या शब्दांशी न खेळता, हलत्या भाषेच्या तिरप्या गिरक्या न घेता सरळ वाक्यांत लिहिलंय.

एक काम करा.. अशा साध्या भाषेत लिहून बघा येत्या सोमवारचं 'वाचावे नेटके', नाय उड्या पडल्या वाचकांच्या, नाय धावायला लागलं सदर तर माझा ब्लॉग बंद करेन मी ! मागे एकदा माझ्याच ब्लॉगवर 'तुमच्या मित्रमैत्रिणींना'सुद्धा हे 'माझे ब्लॉगु-ब्लगिनी !!' आणि 'मला हे भावतं !!!' बद्दल असंच सुचवलं होतं मी. त्यांनी वाचलं की नाय याची कल्पना नाय. बहुतेक नसावं वाचलं. म्हणून तर तुम्हाला सुचवलं नाय ना त्यांनी !

कसं आहे ताम्हणे, की तुम्ही तुमच्या सदरात उगाच सगळ्यांचं कौतुक करत सुटावंत, वारेमाप स्तुती करावीत असं कोणाचंच म्हणणं नाय, कोणीच अपेक्षा करत नाय तशी. दोष दाखवा ना, ठेवा नावं. कोण नाय म्हणतंय? पण दोष दाखवायचीही एक पद्धत असते हो. मी म्हणतो म्हणून नाय रीतच आहे तशी. सगळ्या स्त्री ब्लॉगर्सना एका फटक्यात "दुपारच्या मासिकंवाल्या" म्हणणं किंवा मग उगाच चार लेख वाचून पूर्ण ब्लॉगला, त्यातल्या भाषेला अश्लाघ्य भाषेत नावं ठेवणं (आणि वर चार लेख वाचून सदर लिहिण्याच्या पद्धतीचं समर्थन करणं) हे सगळं कोण सहन करेल? आणि कोणी का सहन करावं? आता पुन्हा प्लीज तुमच्या 'त्या मित्रमैत्रिणीं' प्रमाणे म्हणू नका की आंतरजालावरच्या लिखाणावर टीका होणारच वगैरे वगैरे. मी याचं उत्तर आधीच्या लेखात आणि त्याआधीच्या लेखातही दिलं आहे. तुम्ही लोकांकडे ब्लॉग्जच्या शिफारशी मागितल्यात म्हणून तुम्हाला लोकं दुवे (लिंक हो लिंक) देतायत. अर्थात त्या न्यायाने आणि (तुमच्याच) नियमाने तुम्ही माझ्या ब्लॉगबद्दल काहीच लिहायला नको कारण माझा ब्लॉग मी किंवा कोणीही तुम्हाला सुचवलेला नाय. असो.. तर पुन्हा तेच.. शिफारशी मागितल्यात म्हणून दिल्या, प्रत्येक ब्लॉग आवडलाच पाहिजे असं काही नाय. नाय आवडला तर सोडून द्या किंवा योग्य शब्दांत टीका करा ज्यामुळे तो ब्लॉगलेखक खच्ची न होता उलट त्याला अजून लिहायला उभारी येईल. आणि हो.. टीका करताना शक्यतो जमल्यास "बुडाखाली" , "च्यायला" वगैरे शब्द टाळता आले तर बघा. लोकही त्याच शब्दांत उत्तरं देऊ शकतात हो.

चला. हरकत नाय... ! झालं तितकं पुरे झालं, सांगायचं ते सांगून झालं. बोळा निघाला. पाणी वाहतं झालं..

फॉर द रेकॉर्ड, माझ्या दृष्टीने या प्रकरणावर पडदा पडला !!!

जय ब्लॉगिंग !!!!!!

Sunday, May 13, 2012

च्यायला, हेही पत्रकार झाले !!



माननीय गिरीश सर,

ताकाला जाऊन भांडं लपवण्यात किंवा लपवलेलं भांडं तासभर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर हळूच बाहेर काढण्यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे पहिल्याच ओळीत सुरुवात करतो. सध्या लोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाच्या एका सुमार सदराला संपादकीय पानावर स्थान मिळत आहे. लोकसत्ताची मतं पटत नसूनही मी अनेक वर्षं लोकसत्ता नियमित वाचतोय. परंतु मतं पटत नसली तरीही लोकसत्ता/संपादक इत्यादींवर वैयक्तिक चिखलफेक करणे वगैरे बालिश भानगडीत मी कधीच पडलेलो नाही. जेव्हा जेव्हा तीव्र मतभेद झाले तेव्हा तेव्हा त्या त्या बातमीच्या खाली मी माझी प्रतिक्रिया नोंदवली आहे. (छापणे-न छापणे लोकसत्ताच्या (तथाकथित) पॉलिसीवर अवलंबून..). जेव्हा असंवेदनशीलपणाचा कहर होतो आहे असं वाटलं (उदा दिनांक १५ जुलै२०११ चं चिदंबरम यांच्यावर लिहिलेलं अन्वयार्थ.) तेव्हा मी स्वतः तुम्हाला इमेल करून माझा तीव्र निषेध नोंदवला आहे. 

हे सगळं एवढ्या सविस्तरपणे मांडायचं कारण इतकंच की माझं भांडं स्वच्छ आहे परंतु वेळोवेळी लोकसत्ता उर्फ 'वाचावे नेटके' च्या नासलेल्या ताकाने ते खराब होतंय हे दाखवणं. लोकसत्तासारख्या आघाडीच्या (निदान मुंबईत तरी.) दैनिकाला ब्लॉगरांवर सदर लिहितोय असं दाखवून उगाच त्यांना टपल्या मारत सुटणे, अपमानास्पद बोलणे, टोमणे मारणे, वैयक्तिक हल्ले करणे, डिवचणे असे (माझ्या आणि सर्वसामान्य ब्लॉगर्सच्या दृष्टीने) हलक्या दर्जाचे प्रकार करणं शोभत नाही. तुमच्या या सदरात वैयक्तिक माझ्यावर विनाकारण, काहीही गरज नसताना आणि अजिबात संबंध नसताना दोन वेळा थेट आणि अनेकवेळा आडून हल्ले झालेले आहेत. त्या सगळ्यांची जंत्री मी या क्षणी देऊ शकतो आणि देऊ इच्छितो. पहिल्या वैयक्तिक हल्ल्याला मी त्याच भाषेत माझ्या ब्लॉगवरून उत्तर दिल्यानंतर हे प्रकार वाढले आहेत. पहिला थेट हल्ला झाला तो दिनांक १२ मार्चच्या लेखात. 

" काहीवेळा काय वाट्टेल तेकिंवा हरकतनायसारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते. "

श्री अभिनवगुप्त यांच्या लेखनाच्या दर्जा, खोली आणि व्याप्ती यावर थेट टिप्पणी करण्याचं टाळूनही मी त्यांचं एका गोष्टीसाठी कौतुक करू इच्छितो. ते म्हणजे सुरुवातीचे काही आठवडे त्यांनी भविष्य, पानिपत, भूकंप, पाकिस्तान, सिरीयामधली यादवी, आंतरराष्ट्रीय अनुवादक, इराण युद्ध, चित्रकला आणि कलासमीक्षक किंवा न्यूयॉर्क टाईम्स मधल्या संपादकीयांचा काही भाग अशा देशविदेशांतल्या अनेक ब्लॉग्जविषयी लिहूनही त्या विषयांमधल्या अंगभूत जडपणापायी आणि त्याहीपेक्षा श्री अभिनव गुप्त यांच्या अजून जड शब्द वापरून स्वतःच्या अगम्य शैलीत ते लिहिण्याच्या अट्टाहासापायीच त्यांनी हे विशेष चालत नसलेलं सदर "घटं भिंद्यात पटं छिंद्यात" करून का होईना चालवण्यासाठी त्यांनी बॉलीवूडछाप मार्गाचा आधार घेण्याचं ठरवलं. 

माज किंवा अहंकार म्हणून सांगत नाही परंतु माझ्या ब्लॉग हिट्स पावणे दोन लाखाच्या वर आहेत, २३४ जण माझ्या ब्लॉगचे फॉलोअर्स आहेत आणि किमान १३० जणांनी माझा ब्लॉग इमेल मधून सब्स्क्राईब केलेला आहे. 'काय वाटेल ते' ब्लॉग लिहिणारे महेंद्र कुलकर्णी तर समस्त ब्लॉगर्सचे आदर्श आहेत ते त्यांच्या लेखनाच्या वारंवारतेमुळे, विषयांच्या वैविध्यामुळे आणि कुठलाही विषय सोपा करून सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे. 'काय वाटेल ते' ची आजची वाचक संख्या जवळपास ९ लाख आहे, किमान ७१३ लोकांनी त्यांचा ब्लॉग इमेलमधून सब्स्क्राईब केलेला आहे. (आम्ही दोघेही कुठल्याही मराठी संकेतस्थळांवर लिहीत नाही (पूर्वी लिहीत असलो तरी आता सोडलं आहे) हे आमच्यातलं एक साम्य). मला वाटतं एवढी कारणमीमांसा आणि पुरावे दिल्यावर न चालणाऱ्या सदराला चालवण्यासाठी आमच्या ब्लॉग्सवर वैयक्तिक हल्ला का झाला असावा किंवा कोणाच्या 'प्रेरणेने' झाला असावा हे आपल्यासारख्या विद्वान आणि बॅलंस्ड संपादकाला समजावून सांगणे म्हणजे आपला (तुमचा) अपमान करण्यासारखं आहे. तेव्हा कारणमीमांसेचा भाग इथेच थांबवतो.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या १२ मार्चच्या लेखापर्यंत श्री अभिनव गुप्त हे निनावी होते. लेखाखाली कोणाचंही नाव नसायचं. परंतु निनावी हल्ले करणाऱ्या श्री गुप्त यांच्यावर अनेक ब्लॉग, फेसबुक भिंतीं आणि काही मराठी संकेतस्थळांवर टीका झाल्यानंतर अचानक 'हजला जावं' त्याप्रमाणे स्तंभलेखकाने त्या लेखांखाली श्री अभिनव गुप्त असं नाव द्यायला सुरुवात केली. (यातलं श्री हे मी माझ्या सोईने वापरलं असून काही चुकलं असल्यास आत्ताच माफी मागतो)

आता माझा नक्की आक्षेप कशावर आहे ते पुराव्यासकट सांगतो. 

भाग १ : वैयक्तिक हल्ले

१. माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन सर्वप्रथम थेट हल्ला झाला तो वर म्हटल्याप्रमाणे १२ मार्चच्या सदरात.

काहीवेळा काय वाट्टेल तेकिंवा हरकतनायसारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते. 

२. १२ मार्चच्या सदरातलाच हा अजून एक उल्लेख पहा.

महिलांसाठीची दुपारची मासिकंहा सर्वच काळात हसण्यावारी नेण्याचा, पण मोठा वाचकवर्ग असलेला प्रकार होता. त्यात येणाऱ्या कथा वा लेखांवर वाचकांमधून मनात तरंग उमटले..पद्धतीच्या प्रतिक्रिया असत. त्या प्रतिक्रिया लिहून, टपालानं संबंधित मासिकापर्यंत पाठवल्या जाण्याची शक्यता फार कमी होती आणि जर कुणी पाठवलीच तर ती छापली जाई. अशा पत्रांना बाकीचे वाचक खुशीपत्रंसमजत आणि सोडून देत. 

आता तुम्हाला मुद्दा क्रमांक एक मधला विघ्नसंतोषीपणा लक्षात येईल !  

३. १२ मार्चच्या सदरातील आक्षेपार्ह उल्लेखामुळे संतापून श्री महेंद्र कुलकर्णी यांनी तुम्हाला म्हणजे श्री गिरीश कुबेर यांना थेट पत्र लिहिलं. ते पत्र चुकीचा मुलामा देऊन १९ मार्चच्या सदरात छापण्यात आलं. हे तुमच्या परवानगीने झालं की कसं यावर मी मतप्रदर्शन करू इच्छित नाही. तो तुमचा आणि श्री अभिनवगुप्त यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

४. आजच्या म्हणजे १४ मेच्या 'वाचावे नेटके' च्या सदरात पुन्हा एकवार माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन हल्ला झालेला आहे. (आणि अवांतर म्हणजे ही टीका करताना श्री अभिनव गुप्त यांनी तळटीपा देण्याची एका ब्लॉगरची शैली जशीच्या तशी चोरली आहे !!!!)

तर तातडीनं वाचावे नेटकेबंदच करा, अशी मोहीम (अशा संभाव्य मोहिमेतले पहिले १५ ब्लॉगर तर घरचेच असल्यानं) सुरू व्हायला हरकत नाही.*
* (या वाक्यातील हरकत नाहीहा शब्द वाचावे नेटकेचा गटणेपणा अगदीच सिद्ध करणारा नाही काय?) 

कुबेर सर, माझ्या ब्लॉगचं युआरएल हरकतनाय.कॉम असं आहे (FYI)

भाग २ : मराठी ब्लॉगर कम्युनिटीवरील हल्ले

१. १२ मार्चच्या सदरात समस्त स्त्री ब्लॉगर्सना वेठीला धरलं गेलंय (हे मातृदिनाच्या दिवशी तुमच्यापर्यंत पोचावं हा अपूर्व योगायोगच !!).. हा उल्लेख पहा.

अनेकजणींचे  ब्लॉग आज दुपारच्या मासिकांची उणीव भरून काढतात. अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका मनातलंलिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो. 

तुमचे श्री अभिनव गुप्त किती स्त्री ब्लॉगर्सचे ब्लॉग्ज वाचतात हा नियमित ब्लॉगिंग करणाऱ्या आणि मराठी ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निदान माझ्यासारख्या ब्लॉगरसाठी आणि अन्य कित्येक ब्लॉगर्ससाठी मोठाच प्रश्न आहे. किंबहुना फक्त स्त्री-ब्लॉगर्सचेच नव्हे तर एकुणातच ते किती ब्लॉग्ज वाचतात आणि किती ब्लॉग्ज पूर्ण वाचतात हाच खरा प्रश्न आहे. कारण कुठल्याही पुस्तकाची चार पानं वाचून किंवा कुठलाही चित्रपट १५ मिनिटं बघून त्या पुस्तकाचं किंवा चित्रपटाचं समीक्षण करणं आणि कुठल्याही ब्लॉगवरचे २-३ लेख वाचून त्या ब्लॉगवर राष्ट्रीय दर्जाच्या वृत्तपत्रांतून लाथाळ्या झाडणं हा माझ्या दृष्टीने सारखाच प्रकार. फरक इतकाच की चित्रपट आणि पुस्तकाच्या बाबतीत असला बालिश प्रकार करणारे समीक्षक (आमच्या) सुदैवाने निदान आजच्या काळात तरी उपलब्ध नाहीत. (आणि श्री अभिनव गुप्तच्या प्रेरणेने असली फळी जन्मालाही न येओ ही सदिच्छा)

कदाचित तुम्ही म्हणाल की श्री अभिनव गुप्त संपूर्ण ब्लॉग वाचत नाहीत असा दावा तू कशाच्या आधारावर करतो आहेस? तर हे बघा त्याचं उत्तर.

२. ९ एप्रिलच्या सदरातला हां उल्लेख.

 ओळख करून घ्यावी आणि पुढे वाचत राहावेत अशा ब्लॉग वा संकेतस्थळांवरल्या ताज्या नोंदींआधारे त्यांवर टिप्पणी आणि भाष्य करताना, हेतू तपासण्यासाठी अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील, तेवढय़ा वाचणं इष्ट ठरतं. 

"अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील" म्हणजे काय? म्हणजे नक्की किती? हे कोण ठरवणार? श्री अभिनव गुप्त हे का ठरवणार? हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कसा?

"कारण श्री अभिनव गुप्त हे सदर चालवतात" असं बिनाशेंड्या-बुडख्याचं उत्तर इथे अर्थातच ग्राह्य नाही. असो.


३. आता अनेक छोटी छोटी उदाहरणं देतो की ज्यांत त्या त्या ब्लॉग्ज/ब्लॉगर्सवर विनाकारण हल्ले केले गेलेले आहेत. ५ मार्चच्या लेखात मुख्यमंत्री नावाच्या ब्लॉगवर टीका करण्यासाठी आणि लाथाळ्या झाडण्यासाठी खर्ची घातलेला एक संपूर्ण परिच्छेद. आणि दुसऱ्या परिच्छेदात दुसऱ्या एका ब्लॉगला वेठीस धरण्याचा प्रकार.

एक बाब स्पष्ट करून सांगतो की "जेव्हा तुम्ही तुमचं लेखन आंतरजालावर प्रसिद्ध करताय तेव्हा तुम्ही त्यावरील टीकेला तयार असलं पाहिजेत" वालं दिशाहीन आणि चुकीचं समर्थन इथे पूर्णतः गैरलागू आहे. कारण इथे श्री अभिनव गुप्त स्वतः लोकांकडून ब्लॉग्जच्या शिफारशी मागत आहेत (संदर्भ : २ जानेवारीच्या पहिल्या लेखात श्री अभिनव गुप्त (परंतु त्या दिवशी निनावी) यांनी केलेलं आवाहन). आणि जर लोकांनी स्वतःचे किंवा स्वतःला आवडणारे ब्लॉग्ज केवळ आणि केवळ श्री अभिनव गुप्त यांच्या मागणीप्रमाणे दिले तर श्री अभिनव गुप्त यांनी ते ब्लॉग 'संपूर्ण' (point to be noted, Me lord) वाचून ते आवडले नाहीत तर सोडून देऊन अन्य ब्लॉग्ज वाचावेत आणि जे आवडतील ते छापावेत असं अपेक्षित आहे. चांगल्या ब्लॉग्जच्या ओळखीसाठी हे सदर सुरु केलं असून (पुन्हा एकवार २ जानेवारीच्या आवाहनाचाच संदर्भ) जे ब्लॉग्ज आवडले नाहीत त्यांच्यावर लाथाळ्या झाडण्यासाठी नव्हे !

४. १९ मार्चच्या शीर्षकातच 'साडेतीन' टक्क्यासारख्या आक्षेपार्ह बाबीचा उल्लेख करून श्री अभिनव गुप्त यांना नक्की काय म्हणायचं आहे हे केवळ तेच जाणोत !

५. १९ मार्चच्या लेखातलं हे वाक्य स्तंभलेखकाच्या छुप्या हेतूंना बोलकं करण्यासाठी पुरेसं ठरावं.

अशा वेळी आणि अशा स्थितीत वाचावे नेट-केमुळे सध्यातरी गैरसमज होऊ आणि वाढू शकतात, याचा मासला ठरणारं एक पत्र सोबत आहे.  

पुन्हा एकदा १९ मार्च. शीर्षकात पुनःश्च एकवार साडेतीन टक्क्यांचा उल्लेख !! आणि त्याहीपुढे एका चांगल्या ब्लॉगचं कौतुक करण्यापूर्वी न चुकता ओढण्यात आलेले ताशेरे.

एक आहे प्रसाद चिक्षे यांचा ब्लॉग. मराठीत, आणि किमान गुगल-क्रोमवर उघडणे कठीण. शिवाय एका वेळी एकच नोंद येताना फार वेळ खाणारा हा ब्लॉग, असा विविध सिस्टीम्सवरचा अनुभव आहे. ही तांत्रिक अडथळय़ांची शर्यत जिंकलात, तर जणू बक्षीस म्हणून  

"गुगल क्रोमवर उघडू नका" हे एवढं साधं चार शब्दांत सांगणं किती सोपं आहे. परंतु श्री अभिनव गुप्त यांनी आपल्या अंगभूत (दुर्) गुणाने किमान ३८ शब्द त्यासाठी खर्ची घातले आहेत !!!

७. आता त्याच लेखात हा अजून एक आक्षेपार्ह उल्लेख 

नोंदींची भाषा बाळबोध म्हणावी, अशी आहे. ब्लॉगलेखक प्रसाद चिक्षे यांना भाजपसारख्या पक्षाच्या प्रसिद्धीविषयक कामासाठी बोलावणे आले होते असा निष्कर्ष ब्लॉगवरील कुठल्या तरी एका सूचक उल्लेखाचा जरा विचार केल्यावर काढता येत असला, तरी त्यावर विश्वास बसणे कठीण व्हावे, अशी भाषेची रीती! 

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास श्री अभिनव गुप्त यांच्या निरर्थक आणि प्रामुख्याने शब्दबंबाळ मराठीपेक्षा मी कुठलंही साध्या भाषेतलं लिखाण कधीही आवडीने वाचेन. पण एखाद्या ब्लॉगरच्या भाषाशैलीवरून त्याला एखादा राजकीय पक्ष कामासाठी बोलावू शकेल की नाही यावर गृहीतक मांडणं हा निखळ मुर्खपणा !! या निरर्थक आणि बिनबुडाच्या मतप्रदर्शनाचा अधिकार श्री अभिनवगुप्त यांना दिला कोणी? ते भाजपचे राष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत की भाषातज्ज्ञ??? माझ्या मते तरी "यापैकी नाही" हेच उत्तर योग्य आहे नाही का?

८. १२ मार्चच्या लेखातील स्त्री ब्लॉगर्सबद्दलच्या अवमानकारक उल्लेखानंतर त्या उल्लेखाच्या निषेधार्थ त्या लेखाखाली अनेक प्रतिक्रिया आल्या (आणि लोकसत्ताने त्यातल्या कित्येक छापल्याच नाहीत) आणि अनेक ब्लॉगलेखकांनी आपल्या ब्लॉगवर/फेसबुक भिंतीवर त्याबद्दल निषेध नोंदवला. त्यानंतर अचानक श्री अभिनव गुप्त यांना १२ मार्चपर्यंत स्त्री ब्लॉगर्सचे दुपारच्या मासिकांची उणीव भरून काढणारेब्लॉग्ज या निषेधमालिकांनंतर अचानक १९ मार्चच्या दिवसापासून  शुद्ध हेतूने लिहिले गेलेलेवाटायला लागले. कंप्लीट युटर्न !!! हा पहा १९ मार्चच्या लेखातला पुरावा.

आपण हेतूंबद्दल बोलत होतो.  अनेकदा, ब्लॉगलेखन करणाऱ्या स्त्रियांचे हेतू अधिक शुद्ध असल्याचं दिसतं. हा नियम नाही. असा लिंगविषमतामूलक नियम मानूही नये. पण तरीही दिसतं. ब्लॉगलेखन करणारा जो आवाज वाचकापर्यंत पोहोचतो, तो तपशिलांमधून जाणवतो. तपशील मांडणं म्हणजे माहिती देणंअपरिहार्यपणे आलंच. पण माहिती कशाची द्यायची आहे, त्यातून काय सांगायचं आहे, हे महत्त्वाचं मानण्याची वृत्ती असलेल्या २५ ब्लॉगरपैकी २० स्त्रियाच असतात.. आणि या सर्वच्या सर्व- म्हणजे वीसहीजणींच्या ब्लॉग-लिखाणात अनेकदा, स्वत:सकट सर्वाना पुन्हा पाहण्याची, तपासून घेण्याची विश्लेषक वृत्ती दिसते! स्वत:च्या जगण्याचे हेतू दुसऱ्यांच्या जगण्यातही  मिसळलेले असतात, ही व्यक्तिबाह्य अस्तित्वाची पातळी मान्य करणं बहुधा पुरुषांना जमत नसावं, त्यालाही सामाजिकच कारणं असावीत. पण हेतू तपासणारं विश्लेषण मराठी ब्लॉगांवरून करण्यात सध्या स्त्रिया पुढे आहेत. 

९. आता हा अजून एक विनोदी उल्लेख ९ एप्रिलच्या लेखातला.

(आणि वाचन, अभ्यास वगैरे नसावं) असं त्यांच्या ब्लॉगवरला मजकूर वाचून वाटत राहतं. मग लक्षात येतं की, फक्त तरुण वयावर खापर फोडून चालणार नाही. भाषा ज्या हेतूंसाठी वापरली जाते आहे, ब्लॉग ज्या प्रकारच्या संवादासाठी लिहिला जातो आहे, तो हेतू एकतर लेखकाला स्पष्ट आहे का आणि वाचकाला पटण्यासारखा आहे का, हे अखेर ब्लॉगचा मगदूर ठरवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं

श्री अभिनव गुप्त यांनी लोकांच्या भाषेवर आक्षेप घेणे हे म्हणजे "शीशे के घर मे....." वाल्या संवादासारखं झालं !!

१०. आता ३० एप्रिलच्या लेखाची ही सुरुवातच बघा.

माझे जीवनगाणे माझ्या ब्लॉगमधून मी ऐकवणारहा आग्रह अनेकांचा असतो आणि तो अत्यंत कडक आग्रह असतो, हे वाचावे नेटकेबद्दल ज्या चर्चा- प्रतिसाद- प्रतिक्रिया बाहेर अन्यत्र चालताहेत, त्यांतून कुणाच्याही लक्षात येईल. 

थोडक्यात हे सगळं जाणूनबुजून चालू आहे आणि स्तंभलेखक त्यातला विकृत आनंद उपभोगत आहे हेच स्पष्ट होतं. यावरून जॉर्ज बर्नार्ड शॉचं "Never to wrestle with a pig. You get dirty, and besides, the pig likes it." वालं वाक्य आठवलं. असो.

भाग ३ : अशुद्ध, चुकीची आणि न समजणारी मराठी 

१. २७ फेब्रुवारीच्या लेखातला हा उल्लेख.

अभिनिवेश नाही, पण अतिरेकी निष्ठा! लेखक बहुतेकदा अभ्यासू, पण सारा अभ्यास त्या निष्ठांच्या कक्षेतला. मुद्दा अगदी वकिली बाण्यानं, जणू काही तर्कशुद्धपणेच पटवून दिलेला वरकरणी दिसेल, पण अर्धसत्यच लोकांपुढे मांडून तो आधार कसा निर्णायक आहे हे पटवण्याचा आटापिटा करणं, चुकीच्या किंवा अयोग्य मुद्दय़ांपायी शब्दांचं जाळं रचणं, हे दोष या लिखाणात नेहमीच असतात. 

स्वतः एवढं विचित्र, अतर्क्य आणि अगम्य मराठी लिहिणाऱ्या श्री अभिनव गुप्त यांनी अन्य ब्लॉगर्सवर "शब्दांचं जाळं रचणं" हा आरोप करणं हे म्हणजे विरोधाभासाचा माउंट एव्हरेस्ट म्हणावं लागेल !!

२. १२ मार्चच्या लेखातला हा उल्लेख म्हणजे इतर काही नसून फक्त स्वतःला माहित असणारे काही जडबंबाळ शब्द त्यांचे अर्थ न तपासता एकापुढे एक लिहिण्याचा हास्यास्पद प्रयत्न म्हटला पाहिजे !

आपल्या जीवनशैलीबद्दल आपल्याच भाषेत वाचायला मिळणं, ही विचक्षण नसलेल्या सामान्यवाचकांची गरज असते. ती कुठल्याही भाषेत असतेच. जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं, हाच या वाचनाचा उद्देश असू शकतो, पण वाचकांना तो या शब्दांमध्ये माहीत नसण्याचीच शक्यता अधिक असते! 

"विचक्षणा नसलेला सामान्य वाचक" आणि "जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं" ही दोन वाक्य दिनांक १२ ते १९ मार्चच्या आठवड्यात त्यांच्या अर्थांसाठी सर्वाधिकपणे गुगल केली गेली (आणि तरीही कोणालाही त्याचा अर्थ उमगला नाही) असं ऐकून आहे !!

३. ९ एप्रिलच्या लेखातला हा असाच अजून एक विनोदी उल्लेख.

स्त्री-ब्लॉगर फक्त स्वत:बद्दल लिहितात म्हणून त्या किती छानपैकी हेतू तपासू शकतात, असा छुपा वारही कुणी करू नये. 

असले तिरपागडे आरोप अन्य कोणी नाही तर स्वतः श्री श्री अभिनव गुप्त करताहेत हा तपशील ते सोयीने विसरताहेत. 

४. २३ एप्रिलच्या लेखातला शेवटच्या परिच्छेदातला हा उल्लेख बघा.

आणि च्यायला.. हेही ब्लॉगर झाले

आणि श्री अभिनव गुप्त यांची एकूण शब्दनिवड पाहता मला १०१% खात्री आहे की त्यांनी शीर्षकातही हाच शब्द वापरला असणार परंतु आपण किंवा आपल्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ आणि ज्ञानी संपादक/पत्रकाराने वेळीच हस्तक्षेप करून 'च्यायला' ला 'अरेच्चा' मध्ये बदललं असेल. त्यामुळे २३ एप्रिलच्या लेखाचं शीर्षक 'वाचावे नेट-के : अरेच्चा.. हेही ब्लॉगर झाले !' असं मर्यादापूर्ण दिसतोय. माझ्या तीस वर्षांच्या वर्तमानपत्र वाचनाच्या अनुभवात  'च्यायला' सारखा शब्द संपादकीय पानावरील स्तंभात वाचण्याचा हा केवळ पहिला आणि कदाचित एकमेवच योग !!

ब्लॉगर्सवरील यथेच्छ लाथाळीने भरलेल्या या सदरातील आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये एक अपवाद मात्र नक्कीच दिसला. तो म्हणजे श्री चंद्रशेखर आठवले यांच्या ब्लॉगविषयीचा ७ मे २०१२ चा लेख. पण अर्थात एकही अपशब्द न वापरता किंवा खोडसाळपणा न करता हा लेख लिहिण्याचं कारण म्हणजे म्हणजे श्री अभिनव गुप्त यांच्या विचारात झालेला बदल नसून श्री गोखले यांच्यासारख्या ज्ञानी, तल्लख आणि व्यासंगी ब्लॉगरबद्दल अपशब्द काढण्याएवढी आपली पात्रता नाही की प्राज्ञा नाही हे श्री अभिनव गुप्त यांनी त्यांच्या सुदैवाने ओळखलं हे आहे. !!!

आता अजून एक अतिशय महत्वाचं परंतु कित्येकांना न रुचणारं निरीक्षण नोंदवू इच्छितो. ज्या ब्लॉग्जची अतिशय स्तुती करण्यात आलेली आहे ते ब्लॉगर्स एक तर कुठल्या ना कुठल्या मराठी संकेतस्थळाचे प्रतिनिधी आहेत किंवा ज्यांनी कुठल्याही मराठी संकेतस्थळाशी जाणीवपूर्वकच संबंध ठेवलेला नाही (उदा श्री चंद्रशेखर आठवले). माझ्या ब्लॉगची शप्पत घेऊन सांगतो की त्यांच्याची माझं वैयक्तिक शत्रुत्व मुळीच नाही की त्या ब्लॉग्जचं कौतुक झाल्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही असूया नाही. उलट एक मराठी ब्लॉगर या नात्याने दुसऱ्या एका मराठी ब्लॉगरचं कौतुक होणं हे माझ्यासाठी खचितच अभिमानास्पद आहे आणि त्याउपर जाऊन म्हणायचं तर श्री अभिनवगुप्त सारख्या छिद्रान्वेषी इसमाला निदान कुठल्यातरी ब्लॉगबद्दल त्या ब्लॉगला लाथा न घालता निव्वळ स्तुरी करावीशी वाटली हे पाहून तर तो अभिमान अजूनच दुणावला. असो.

श्री अभिनव गुप्त यांच्या माझ्यासारख्या मराठी ब्लॉगर्सच्या ब्लॉगपोस्टमधील लिंक्स मधून (का होईना) वाचक वाचावे नेटके पर्यंत पोहोचोत अशा विक्षिप्त हेतूला बळी न पडता मुद्दामच वाचावे नेटकेच्या लिंक्स न देता लेखांतले आक्षेपार्ह उल्लेख इथे कारणांसहित नोंदवले आहेत. तुम्ही त्याची योग्य ती दखल घ्यालच. अर्थात फक्त दखलच आणि कारवाई नाही कारण "च्यायला, हेही पत्रकार झाले !!" 

दर सोमवारी प्रसिद्ध होणारे हे सगळे लेख इतक्या काळजीपूर्वक आणि बारकाईने वाचता की नाही याची खात्री नसल्याने मुद्दाम सगळे मुद्दे आणि आक्षेप कारणांसहित तुमच्यासमोर मांडत आहे. जाता जाता एकच छोटा प्रश्न विचारावासा वाटतो की इतक्या मोठ्या वृत्तपत्रात अशा प्रकारचं सदर चालवणं यासाठीची पात्रता काय आहे? कारण आजच्या घडीला कित्येक ब्लॉगर-पत्रकार आंतरजालावर आणि वर्तमानपत्रांमध्ये उपलब्ध आहेत जे वृत्तपत्रीय लेखन आणि ब्लॉगलेखन हे दोन्ही सारख्याच ताकदीने सांभाळतात आणि त्यातल्या कित्येकांना मी वैयक्तिक ओळखतो. कदाचित ते श्री अभिनव गुप्त यांच्यापेक्षा वयाने आणि पदाने कनिष्ठ असतील परंतु त्यांचं लेखनकौशल्य निर्विवादपणे श्री अभिनव गुप्त यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे तसंच कुठलाही पूर्वग्रह ठेवून दुषित लिखाण न करता निर्भेळ लेखनावर त्यांचा अधिक विश्वास आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो आणि अशी अनेक नावं मी याक्षणी सुचवूही शकतो !!

So, Mr Girish Kuber, Are you watching closely??

तळटीप : हेच पत्र मी श्री गिरीश कुबेर आणि श्री अभिनव गुप्त यांना त्यांच्या इमेल आयडीवर पाठवलं आहे.

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...