Tuesday, April 20, 2010

भी(शि)क्षा

१. एकेक करत हातापायाची सगळी बोटं तोडून टाकणे आणि हळूहळू एकेक अवयव तोडत जाणे.

२. डोळ्यांच्या पापण्या कापून गरम चरचरीत सळई किंवा धारदार चाकू डोळ्यांच्या आत फिरवणे.

३. जाड बांबूने मारत जात जात एकेक अवयव निकामी करून तडफडून मारणे.

४. अंगावरची चामडी सोलून काढून चौकात टांगून ठेवणे.

५. नागडं करून बांधून ठेवून भुकेल्या कुत्र्यांना अंगावर सोडणे.

६. 'पुरुष' नाटकात दाखवलेली शिक्षा जशीच्या तशी भर चौकात देणे

मनोरुग्ण, सायकोपाथ, सेडिस्ट असा काय काय वाटतोय ना मी? पण रोजच्यारोज सकाळी पेपर उघडल्यावर बलात्कारांच्या घटनांनी बरबटलेली पानं (की मनं) वाचताना डोक्याचा पार भुगा होतो.

निम्म्यापेक्षा (कितीतरी) जास्त गुन्हे दाखल होत नाहीत, दाखल झालेल्या गुन्ह्याताल्या अनेक आरोपींवरचे आरोप सिद्ध होत नाहीत, सिद्ध झाले तरी वरच्या कोर्टात अपील केलं जातं, आणि त्या कोर्टातून आरोपीला सोडवण्यासाठी कायद्याच्या बिळात लपून बसलेले वकील कायद्यातले बग्स बरोब्बर हेरून आरोपीला शाही लवाजम्यानिशी घरी पोचवण्याची व्यवस्था करतात.............................

आणि पुढच्या बलात्काराची बातमी येते........ वर्तुळ पूर्ण. अशी कित्येक वर्तुळं तासागणिक पूर्ण होत असतील.

भलेही व्यक्ती तीच नसेल, पण प्रवृत्ती तीच असते, हेतू तोच असतो, नशा तीच असते, वखवख तीच असते.

कधी अपमानाचा बदला म्हणून तर कधी दिलेल्या नकाराचा राग मनात धरून, कधी नवर्‍याने केलेल्या एखाद्या गुन्ह्याची (?) शिक्षा (?) म्हणून तर कधी दहशत बसावी म्हणून, कधी दलित म्हणून तर कधी नुसतीच मादी म्हणून.

कारणं काहीही असोत पण परिणाम एकच, शिक्षा एकच, निकष एकच, निकालही एकच. बाईला नासवली की झाला सूड पूर्ण, झालं पौरुषत्व सिद्ध.

आणि हे प्रकार वाढते, अनेक पटींनी वाढत जाणारे. manifold.. परवापेक्षा कालची संख्या जास्त. कालच्या पेक्षा आजच्या बातम्या जास्त. आजच्या पेक्षा उद्याचा हैदोस अजून जास्त.. आणि उद्यापेक्षा परवाचा अजूनच !!!! हे संपतच नाही कुठे. संपेल अशी चिन्हही दिसत नाहीत.

हे का संपत नाही किंवा काय केलं की अशा सडक्या जनावरांना जन्मभराची अद्दल घडेल, कायमची दहशत बसेल असा विचार करत होतो तेव्हा वरच्या सगळ्या शिक्षा सुचल्या. अ‍ॅक्च्युअली अजूनही भयंकर सुचल्या होत्या. पण त्या इथे देणं प्रशस्त नाही. यातली निदान एखादी तरी शिक्षा निदान एकदा तरी प्रत्यक्षात अंमलात आणली गेली ना तरी पुढच्या वेळी त्या नुसत्या कल्पनेनेच ती जनावरं कापू लागतील. कारण शेवटी मानापेक्षा, बदल्याच्या आगीपेक्षा, वखवखीपेक्षा जीव प्यारा असतो.

...................... पण अचानक जागा झालो. मी पांढरपेशा, मध्यमवर्गीय, सीधासाधा, दबलेला, नश्वर (आणि निर्लज्ज कोडगा) मनुक्ष आहे याचं भान आलं आणि ............
"साधी चौकशी आणि सुटका, ३ महिने साधी कैद आणि २००० रुपये दंड, १०,००० रुपयाच्या जामिनावर सुटका, चौकशीत गुन्हा सिध्द झाला नाही, घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार (eye-witness) नसल्याने  आणि ठोस परिस्थितीदर्शक पुरावे नसल्याने निर्दोष मुक्तता, परस्पर संमतीने संबंध ठेवले गेले असल्याने बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला नाही, फिर्यादीच्या पूर्वायुष्यातल्या घटना पाहता तिने केलेल्या तक्रारीत संशयाला नक्कीच वाव आहे" वगैरे वगैरे वाल्या बातम्या पुन्हा निमूटपणे वाचायला लागलो.

54 comments:

  1. काय बोलु...आपली न्यायदेवता (म्हणजे पुन्हा एक स्त्रीच) आणि ती पण आंधळी...यात काय ते आलं....

    ReplyDelete
  2. हो ना. गेले कित्येक आठवडे पेपरात रोज कमीत कमी एक बलात्काराची बातमी तरी असतेच.. आणि हे रोजच्या रोज घडतंय आणि सरकार आणि पोलीस आकडे कितीने कमी झाले हे सांगत बसण्यात कर्तृत्व मानतात.

    ReplyDelete
  3. नो कॉमेंट्स...सॉरी
    काही बोलायला शिल्लकच नाही ठेवलय ह्या @#$%$#

    ReplyDelete
  4. बोगस लोक भोंगळ कामाचे व खाबुगिरीकरून बोगस आकडे जाहीर करण्यातच काय तो पुरुषार्थ दाखवत आहेत.... अन बाईची इज्जत पुन्हा पुन्हा भर घरी-शेजारी, भर चौकात, पोलीस स्टेशनात,जिथे मिळेल तिथे ओरबाडतच आहेत. खरे आहे हेरंब, येथे वाळवंटातलाच कायदा हवा रे... म्हातारी असो, तरणी असो की तान्ही बाळी असो यांना दिसतेय ती फक्त... ’लज्जा’ मध्ये जेव्हां रेखावर तिनेच सुईणपण करून जगात आणलेला पुरूष बलात्कार करतो... तेव्हांची तिची वाक्ये अन प्रसंग काळजाला घरे पाडतो.... पण सत्य याहूनही भयानक आहेच. थांबते इथेच... नाहीतर तुझ्या पोस्ट पेक्षा माझी टिपणीच मोठी व्हायची.
    अगदी मनातलेच लिहीलेस.

    ReplyDelete
  5. खरंय सुहास. सगळा भीषण प्रकार आहे. :(

    ReplyDelete
  6. श्रीताई, निव्वळ कोडगेपणाचा कळस आहे ग हा. खरंय.. या अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी capital punishment च हवी. गुन्ह्याच्या नुसत्या विचारानेही चळचळ कापून घाम फुटला पाहिजे गुन्हेगारांना !!

    ReplyDelete
  7. नेहमीप्रमाणे, विचार करायला लावणारा लेख. खरयं तुझं म्हणणं हेरंब. या परिस्थीतीत अजुन एक भितीचं सावट नुकतच वाचण्यात आलं. इंग्लंडातील मुसलमानांनी तिथे त्यांच्याकरिता "शरिया" कायदा लागू करण्याचा हक्क मागितला आहे. आता ह्या कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा सिद्धं करण्यासाठी कमितकमी ४ पुरुष साक्षीदार किंवा ८ स्त्रिया साक्षीदार लागतात. ४ पुरुष आसपास असताना ते बलात्कार कशाला होवू देतिल? (अर्थात ते स्वत: सामिल नसतील तर). आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ४ पुरुष किंवा ८ स्त्रिया. का? ४ स्त्रिया का नाही चालणार? थोडक्यात त्या कायद्यानुसार स्त्रिया ह्या दुय्यम मानल्या जातात. हा कायदा सौदी अरेबियामध्ये लागू आहे. त्यामुळे पाश्चात्य देशांच्या तुलनेत तिथे बलात्कारांच्या घटना तुरळक आहेत. ह्यामागचे कारण तो समाज या बाबतीत पुढारलेला नसून, असल्या कायद्यामुळे साक्षीदारच सापडत नाहीत. बलात्कार हा स्त्रिच्या आणि तिच्या परिवाराच्या द्रुष्टीने अतिशय भयावहं प्रकार असला तरी तो कायद्यामुळे सिद्धदेखिल करता येवू नये यासारखी वाईट गोष्ट जगात नाही. असला कायदा इतर देशांमध्ये लागू होवू नये हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

    (प्रतिक्रिया फ़ार मोठी झाली आणि मुळ विषयापासून जरा भरकटली याची मला जाणिव आहे. पण असल्या गोष्टी ऐकल्यावर डोक्यात सणक जाते आणि लिहिल्याशिवाय राहात नाही)

    ReplyDelete
  8. आभार अभिलाष. मुस्लीम देशातल्या कायद्यांबद्दल आणि स्त्रियांना मिळणार्‍या वागणुकीबद्दल तर न बोलणंच बरं. मागे 'खालीद हुसेनी' चं 'A Thousand Splendid Suns' वाचलं होतं. त्यात हुसेनीने अफगाणिस्तानातील स्त्रियांचं आयुष्य, शरीया कायदा याबद्दल लिहिलं होतं. ते वाचून अक्षरशः भडभडून आलं होतं. पण आपल्याकडेही बलात्कार सिद्ध करण्याची, आरोपी पुरुष दोषी आहे हे सिद्ध करण्याची जवाबदारी स्त्रीवर असते. पुरुषाला आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं लागत नाही. Shoudn't it be exactly opposite?

    आणि प्रतिक्रिया कितीही मोठी झाली तरी हरकत नाही. मनापासून आलेल्या सगळ्याच प्रतिक्रिया मला आवडतात. अर्थात सगळ्यांच्याच..

    ReplyDelete
  9. आणि बलात्कार करून सुद्धा पुरुष राजरोसपणे फिरतो. स्त्रियांचे मात्र पूर्ण आयुष्य खराब होते, त्यांचा काहीही दोष नसताना.

    ReplyDelete
  10. अभिजीत, अगदी खरंय. आणि हे 'स्त्रियांचं आयुष्य खराब होणे' वगैरे सुद्धा पुरुषप्रधान समाजाने स्त्रियांवर लादलेल्या शील-अशीलाच्या चुकीच्या कल्पनांमुळे. एखाद्या स्त्रीवरदुर्दैवाने अशी परिस्थिती ओढवली तर त्यात तिची काय चूक? पण आपला समाज तिला जगणं नकोसं करून टाकतो.

    ReplyDelete
  11. सत्यवाना ४ वर्षाच्या पिल्लू पासून तर सत्तरीतल्या आजी पर्यंत आज कोणतीही स्त्री सुरक्षित नाही...रोज कुठे ना कुठे एखादी तरी घटना घडतेच....सामान्य किंवा मजुरी करणारी स्त्री असेल तर त्याची कुठेही वाच्यता पण होत नाही....बलात्कार जर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने केला असेल तर जरा जास्त प्रसिद्धी....क्लास वन अधिकारी असेल तर सरकारला थोडी फार जाग येते....अन् चुकुन जर स्त्री दलित असेल तर..... तुम्हाला पुढील सगळ माहीतच आहे....आयचा घो...अरे ती एक स्त्री आहे एवढ बस्स ना...कशाला तिच्या जाती पर्यंत पोहचता....सगळा आन्धळा कारभार आहे....महाराजांनी ह्या साठीच स्वराज्य उभारल होत का?? राजे आम्हाला माफ करा आम्ही षंढ झालो आहोत...आम्हाला फक्त पांढरपेशीच जगायला आवडत....आम्हाला आमच कोष सोडून बाहेर बघायच नाही....अगदी आमच स्वतःच घर जळाल तरी.

    ReplyDelete
  12. खरच यासाठी अशी जबरदस्त (@*%#$^@) शिक्षा द्यायला हवी ती सुदधा ’इन्स्टंट’ कि पुढच्या वेळी स्वप्नातदेखील कोणी असा गुन्हा करण्य़ास धजावणार नाही.हे अती वाटत असल तरी हयावर शिक्षेची दहशत हाच उपाय दिसतो आहे...बाकी खरच पुण्यात जे त्यादिवशी घडल त्यांसारख्या बातम्या वाचुन अगदि कसतरी होते पण आपण करणार काय...

    ReplyDelete
  13. अगदी खरं आहे. आपल्याच पुरूषप्रधान समाजाने या असल्या भोंगळ अब्रु-बेअब्रु च्या संकल्पना रूजवल्या आहेत. त्यामुळे मानसिक-शारिरीक दृष्टया आधिच गांजलेली ती स्त्री समाजातील "बेअब्रु" च्या भितीने-जाचाने अधिकच घायाळ होते. दुर्दैवाने कुटुंबातील सदस्य सुध्दा मानसिक आधार देत नाहीत. या सगळ्यामुळे बरेचदा अन्याय होवुनही स्त्रीया गप्प बसतात. आणि हे नराधम मोकाट सुटतात. स्त्रियांचे मानसिक आणि शारिरीक सबलीकरण; त्यांच्यातील आत्मविश्वास, आत्मनिर्भरता याची वृध्द; समाजाची स्त्रीच्या शील-अशील या संबंधीच्या कल्पना बदलणे हेच उपाय आहेत. इस्लामिक राष्ट्रांसारख्या हात-पाय तोडणे या शिक्षा कामाच्या नाहीत. त्यामुळे स्त्रियांच्या स्थितीत सुधारणापण होत नाही आणि काही वेळा त्याचा दुरूपयोगही करून घेतला जाऊ शकतो.

    ReplyDelete
  14. योगेश, खूप छान लिहिलं आहेस. अगदी तळमळीने. खरंच कुठलीही स्त्री सुरक्षित नाही. तिच्याकडे माणूस म्हणून न बघता मादी म्हणून बघितलं जातं. या असल्या मानसिकतेच्या समाजात तिला न्याय तो काय मिळणार :(

    ReplyDelete
  15. अपर्णा, अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते. पण 'समाजाची स्त्रीच्या शील-अशील या संबंधीच्या कल्पना बदलणे' हा प्रकार खुपच अवघड आहे. एवढा की जवळपास अशक्यतेच्या वाटेवर जाऊ शकतो एवढा. त्यामुळे मानसिकता बदलणे याबरोबरच न्यायदानाच्या नावाखाली जी थट्टा चालते ती ही थांबवली गेली पाहिजे. अगदी शब्दशः हात, पाय, बोटे तोडणे अशा शिक्षा झाल्या नाहीत तरी '१००० रु दंड आणि १ महिना साधी कैद' अशा पोकळ स्वरूपाच्याही नकोत. शिक्षेचा मूळ उद्देश हा गुन्हेगारीला आळा घालणे हा असतो. आपल्या आत्ताच्या कुठल्या शिक्षांनी गुन्हेगारांना जरब आणि गुन्हेगारीला आळा बसतो हा संशोधनाचा विषय होऊ शकतो (आणि कितीही संशोधन केलं तरी हातात काही येणार नाही.. कारण आडातच नाही तर... )

    ReplyDelete
  16. जगातल्या दुसऱ्या लाचखोर देशात रहातोय आपण ! तेंव्हा जरी बलात्कार केला तरी महिना दोन महिन्यात लाच देऊन सुटता येतं. नुकताच शायनी सुटला..
    असं काही पाहिलं की वाटतं ह्या देशाचं काय होणार पुढे?

    ReplyDelete
  17. हो ना. शायनीच्या वेळी त्याला वाचवण्याची त्याच्या बायकोची केविलवाणी आणि निर्लज्ज धडपड बघून संताप झाला होता नुसता. आणि त्यात तो रोज स्टेटमेंट्स फिरवायचा आणि अख्खं बॉलीवुड 'शायनी कसा चांगला आहे, कसा वेगळा आहे, तो असं करणं शक्य नाही' करत त्याच्या आरत्या ओवाळण्यात मग्न होतं.

    ReplyDelete
  18. "गुन्ह्याच्या नुसत्या विचारानेही चळचळ कापून घाम फुटला पाहिजे गुन्हेगारांना !!" - अगदी पटलंय. गेले कित्येक दिवस हाच विचार मनात घोळतोय. त्यातूनच मी ते पोस्ट लिहिलंय माझ्या ब्लॉगवरचं. आणि एवढं सगळं लिहून, बोलूनदेखील प्रश्न तसेच आहेत. कृतीत काही आणता येत नाही याने जास्त चिडचिड होते.. x(

    ReplyDelete
  19. दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

    ReplyDelete
  20. हो ना देव. शिक्षांचं स्वरूप नक्कीच अजून कठीण केलं पाहिजे. अगदी capital punishment नाही तरी गुन्हा करण्यापूर्वी गुन्हेगाराला निदान हजार वेळा विचार करायला लावणार्‍या तरी !!!

    ReplyDelete
  21. मेघा, लक्षात आहे माझ्या तुझं ते पोस्ट. उत्तम लिहिलं होतंस.

    >> "कृतीत काही आणता येत नाही याने जास्त चिडचिड होते"

    हे अगदी मनातलं. काय करायचं याचा थांग लागत नाही.. :-(

    ReplyDelete
  22. मंगेश, अगदी योग्य बोललास !!

    ReplyDelete
  23. Nothing to say.....
    Sagle lihile aahesach tu...ajun kaay bolnaar...?
    Hya asalya baatamya vachalya na ki tadphad hote jeevachi...santaap santaap hoto... pan sadhya matr kahich hot nahi...kahich nahi...!!!!!
    Aani hya sagalya prakarat jevha Baai la JAPANYACHA salla dila jaato na tevha tar talpaayachi aag mastkaat jaate... TIne sat chya aat gharat yaave,Ratri aparatri baher hindu naye, TIche waagane changale have, Kapade neet asavet.... Arrree kaay... Don chaar varshachya chimuradi warahi jevha balatkaar hoto tevha tichya waagnyaat kaay dosh asto..??? Keval purushala wachavayache mhanun baai la wait, uthal tharavayache ha tar nirlajj panacha kalas zala...

    ReplyDelete
  24. खूप घृणास्पद आहे रे सगळंच. तू सांगितलेल्या शिक्षा बरोबर समाजशिक्षण हा एक लाम्बपल्ल्याचा उपायही करावा लागेल आपल्याला.

    ReplyDelete
  25. काय बोलावं यावर समजतच नाही, नुसतीच चिडचिड करुन आजपर्यंत काहीही उपयोग झाला नाही... काडीचाही फरक आपण पाडु शकलो नाहीत बर्‍याच मुद्द्यांवर... जे फरक करु शकतात त्यांची इच्छाशक्तीच नाही, जे खरंच काही करु शकतात आणि करु पाहतात त्यांचे पंख तिथेच छाटले जातात.. अभिजीतच्या ब्लॉगवरच्या 'सुनीता कृष्णन' सारख्या आठवत राहतात...

    ReplyDelete
  26. आपला समाज तर बलात्कारीत स्त्रीकडे सदोष नजरेने पहातोच पण वृत्तपत्रंसुद्धा भान सुटल्यासारखी बलात्काराच्या बातम्या इतक्या सविस्तर का छापतात, हे समजत नाही. मध्यंतरी एका विदेशी तरूणीवर अत्याचार झाल्याप्रकरणी तिला पोलिसांना त्या प्रसंगाचं इत्यंभूत वर्णन लिहून द्यावं लागलं, ते तिचं प्रायव्हेट स्टेटमेंट होतं. मुंबई मिररने ते फ्रंट पेजवर बातमी म्हणून छापलं होतं. ही नेमकी कशाबद्दलची जागरूकता आहे? तू तो सुनीता कृष्णनचा व्हिडीओ दाखवला होतास, त्यात पाहिलंस ना, तीच सांगते we are victimizing the victim.

    ReplyDelete
  27. आपल्याकडे गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे, शिक्षणाचा अभाव ,व अंधश्रधा हि दोन कारण आहे,तसेच राजकीय लोकांचा गुन्ह्नेगारीला पाठिबा असलामुळे योग्य शिक्षा होताच नाही, कायद्याचे कठोर पालन होत नाही,

    --

    ReplyDelete
  28. अतिशय उत्तम रितीने मांडलेला हा विषय...बोलाव तेव्हड थोड...खरच आहे ,आपण जगातल्या दुस~या लाचखोर देशात रहातोय...त्यामुळे अशा घटनां किती निर्लज्जपणे घडतात आणि मग त्यातुन असली जनावरे मुक्त होतात..ह्याची संख्या कमी नाही...शायनी सुटलाच आहे..असे अनेक शायनी पुढेही सुटतील...तुम्ही वर सुचित केलेल्या एकतरी शिक्षेची जर का अंमलबजावणी झाली ना तर मग सगळ कस ्छान निट्नेटके रुप दिसले असते..पण.........:(...कठीण आहे....

    ReplyDelete
  29. खरंय मैथिली. आणि या अशा बातम्या रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज येतच असतात. गुन्हेगाराला पकडलंय, सक्तमजुरीची शिक्षा झालीये, फाशी झालीये (अपवाद धनंजय चटर्जी केस) असं कधी ऐकायलाच मिळत नाही.

    आणि ती सातच्या आत घरात, सांभाळून वागा वगैरेचे सल्ले फक्त मुलींना देणे म्हणजे खरंच कहर आहे.

    ReplyDelete
  30. विद्याधर, 'लोकांची मानसिकता बदलणे' हा योग्य उपाय असला तरी it's next to impossible. खूप अवघड आहे. जवळजवळ अशक्य. त्यामुळे शिक्षांचं स्वरूप थोडं कडक करणे हाच यावर एकमेव मार्ग आहे सध्यातरी असं मला वाटतं.

    ReplyDelete
  31. अगदी बरोबर कांचन. प्रसार माध्यमं ही सगळ्यात आघाडीवर असतात असल्या बातम्या चवीने छापण्यात. 'निर्भीड' पत्रकारिता आणि 'पीत' पत्रकारिता यांच्यातली सीमारेषा एवढी पुसट झाली आहे हल्ली की पीत पत्रकारिता म्हणजेच पत्रकारिता असा मीडियाचा समज झालाय आणि तसा समज ते जनतेच्या माथी लादतायत आणि त्यात यशस्वीही होतायत. सुनीता कृष्णन म्हणाल्या ते अगदी खरंय दुर्दैवाने.."we are victimizing the victim." :((

    ReplyDelete
  32. काका, बरोबर बोललात अगदी. गुन्हेगारांना मिळणार्‍या राजकीय संरक्षणामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे गुन्हे करण्याची भीती वाटत नाही. !!

    ReplyDelete
  33. आनंद, "नुसतीच चिडचिड करुन आजपर्यंत काहीही उपयोग झाला नाही... काडीचाही फरक आपण पाडु शकलो नाहीत बर्‍याच मुद्द्यांवर... " हे अगदी खरं आहे दुर्दैवाने. आपण फक्त ब्लॉगवर छापत राहणार आणि चर्चा करत राहणार. :((

    अशा अनेक 'सुनीता कृष्णनां' ची गरज आहे आपल्याला

    ReplyDelete
  34. माऊ, आणि सतत सतत घडतायत अशा घटना. कोणाला कोणाची भीती नाही की जरब नाही. सगळे कायद्याला टांग मारून हवं ते करतायत आणि अशांना वाचवण्यात वकील जनताच आघाडीवर. काय बोलणार. आपल्या शिक्षांचं स्वरूप थोडं जरी प्रखर केलं तरी अशा अत्याचारांची संख्या कित्येक टक्क्यांनी कमी होईल !!!

    ReplyDelete
  35. Law & Order Bharatat kadhich navati / aani nasnar (?).

    Bharat kharya arthane Lokshahi desh aahe.

    jyala je pahije te to karu shakato. te illegal aso naso. Kahi farak padat nahi.

    Bharat kasa chalato te dekhil tyamule kalat nahi.

    Nyayvyavstha etc tar sagal navala aahe.

    Paise deun sagal settle karata yet. mi dekhil tech karato.

    mala jar passport kadhun hava asel aani police ne paise magitale tar tatv aad yet mhanun mi without passport rahnar nahi. mi paise denar.

    many aahe ki hyatun dusaryach nuksan hot nahiye (jas balatakaramule hot tas)
    pan hi vrutti chukichi ch aahe. aani hyala solution kai te mahiti nahi.

    krupaya asalyas kalavave.
    halli tar maz man dekhil marun gelay. batamya hya rape, chori, bomb blast, corruption chyach astat as vatayala laglay. joparyant swatachi jalat nahi toparyant sagal aalbel aahe as samajan mhanje keval shandhpana aahe.

    Aso.

    ReplyDelete
  36. न्यायव्यवस्थेचा धाकच कोणाला उरलेला नाही. गुन्हेगारांना शिक्षा करणे, त्यांना जरब बसवणे आणि त्यायोगे गुन्हे कमी होतील हे बघणे या न्यायव्यवस्थेच्या मूळ उद्देशालाच खो दिला गेलाय. प्रवृत्ती बदलली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे खरं आहे. पण अशी वृत्ती बदलायला किती युगं लागतील कोण जाणे !!

    ReplyDelete
  37. हेरंब,
    मांडलेला मुद्दा १०० टक्के कबूल, जरब बसावा अशी शिकशा हवी पण, अशी‌ शिक्षा अस्तित्वात आल्यानंतर त्याचा सरळ पुरूशांच्या विरोधात 'शस्त्र' म्हणून वापर करणाऱ्या स्त्रीयादेखील अस्तित्वात असतील ना .. कारण आपण जगातील दोन नंबरच्या लाचखोर देशात रहातो ! :)
    क्षमस्व, जे होतय ते नियंत्रणा आणणं गरजेच आहे, पण समाजशिक्षणाने तसं झाल्यास जास्त उचित होईल, केवळ कायद्याच्या चाकोरीत बसवण्याचा प्रयत्न करून चालणार नाही, कारण कायदा xxवर खेळणारे आहेत.

    ReplyDelete
  38. सोमेश, तुझा मुद्दा पटतोय. पण 'हे' केलं तर 'ते' होईल अशा नुसत्या कल्पनेने काहीच करायचं/बदलायचं नाही हेही मला पटत नाही. तसंही आत्तासुद्धा अनेक कायदे मोडून, तोडून, वाकवून त्याचा आपल्या भल्यासाठी वापर करण्याचे प्रकार चालतातच. मी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलंय त्या शिक्षा शब्दशः मलाही अपेक्षित नाहीत. ती फक्त मनातली तगमग बाहेर निघाली. पण एकूणच शिक्षा या सध्याच्या शिक्षांपेक्षा अनेक पटींनी कडक असाव्यात असं मला वाटतं. तरच गुन्हेगारांना आणि पर्यायाने गुन्ह्यांना (निदान अशा स्वरूपाच्या तरी) काही प्रमाणात का होईना आळा बसेल.

    ReplyDelete
  39. tumhi sangitlelya sarv shiksha agadi manya..
    pan
    HYYA GOSHTI NA SHIKSHA DEUN KAMI KARNE AAJ tri PRACTICALLY SHAKYA NAHI Pan HE THAMBAVANYASATHI AAPAN NAKKICH BARACH KAHI KARU SHAKTO...
    AAJACHI "MEDIA" AGADI SURUVATI PASUN LAHAN MULANVR PARINAM KARTE AAHE. he sagle aapan kadhi thambavnar??? VELICH he kami nahi kele tr udyachi pidhi sudha balatkaari hou shakte. Shevti "Prevention is always better than cure naa.."

    ReplyDelete
  40. विश्वास, ब्लॉगवर स्वागत.

    मी म्हटलेल्या शिक्षा अगदी जसाच्या तशा अंमलात आणाव्या असं माझं म्हणणं नाही. ते शक्यही नाही आणि अर्थातच ते चूक आहे हे मलाही मान्य आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की सध्याच्या किरकोळ शिक्षा बंद करून त्यातला कठोरपणा वाढवावा जेणेकरून अशा अत्याचाराच्या घटना घडण्यापूर्वीच
    (कडक शिक्षेच्या भीतीने का होईना) थांबतील.

    ReplyDelete
  41. बोलावे/लिहावे तितके कमी आहे... तुला मागे सुद्धा बोललो आहे.. इकडे कायदे शिवरायांसारखेच हवेत... प्रत्येकाचा 'सखोजी गायकवाड' व्हायला हवा... :X

    ReplyDelete
  42. खरंय रे अगदी.. पण ते प्रत्यक्षात होणं केवळ अशक्य आहे :-(

    ReplyDelete
  43. खरंच बोलावं तेवढं कमी आहे या विषयावर. अशा नराधमांना योग्य ती (उदाहरणार्थ: फाशी) आणि योग्य वेळी (धनंजय चॅटर्जीला फाशी झाली, पण ती १४ वर्षांनी! तोपर्यंत तो सोकावला होता, आजूबाजूचे लोक प्रकरण विसरून गेले होते. हेतल पारेखचे कुटुंबीय मात्र ती १४ वर्षं होरपळत होते. आधी लेकीवर झालेल्या बलत्काराच्या मानसिक वेदना आणि नंतर त्या हरामखोराला शिक्षा न झाल्याने होणारी धुसफूस.) शिक्षा होणं फार महत्त्वाचं आहे. तेच तर होत नाही. पैसे फेकले की खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं करायला सगळे वकील सरसावतात. आणि समोर दिसत असलेल्या गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा कागदी पुराव्यांनाच जास्त महत्त्व देते आपली न्यायव्यवस्था. आणि म्हणूनच अरुणा शानबागच्या बलात्कार्‍याला थोड्या शिक्षेनंतर कामावर परत घेण्यात आलं. रुचिका गिरहोत्रावर बलात्कार करणारा नराधम इन्स्पेक्टर राठोड अनेक वर्षं मोकळा फिरत होता. एवढंच नव्हे, तर त्याला नोकरीत बढतीही मिळाली अनेक वेळा!

    ReplyDelete
    Replies
    1. सगळंच विषण्ण करणारं आहे रे !! :(

      Delete
  44. बाकी सगळं ठीके, पण गुन्ह्यांची संख्या जास्त वाढलीये असे नै वाटत. रादर त्यांचे रिपोर्टिंग जास्त होतेय.

    -Nikhil Bellarykar.

    ReplyDelete
    Replies
    1. काहीही असलं तरी तितकंच वाईट ना !

      Delete
  45. पैसे मोजले की वकील लोक पण इतके बेशरमपणे बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला पाठीशी घालू शकतात ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. पैशासाठी काहीही करतील ते लोक !

      Delete
  46. चौरंग करा रे ह्यांचे.....

    ReplyDelete
    Replies
    1. महाराज हवे होते आज :(

      Delete
  47. इतकं असाहाय्य, हतबल कधीच वाटले नव्हते पण दिवसेंदिवस अस वाटू लागलंय .....कायदा नावाची चीज या देशात फक्त पोलिस, वकील आणि न्यायाधीश जमातीची पोटे भरण्यासाठी अस्तित्वात आहे....या पलीकडे काही नाही. एकीकडे इतकी भयावह परिस्थिती स्त्रियांसाठी असताना "स्त्री भ्रूण हत्या" थांबवा असे कसे म्हणायचे? एक विशस सर्कल होवून बसलंय हे सारं.

    एका आईला विचारा ....दर दिवशी लेकीला घराबाहेर पडताना भीतीने जीव कसा होतो ते. अशी भीती जी बोलूनही दाखवता येत नाही आणि सहनही होत नाही. :(:(:(

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय.. फार भयंकर आहे हे. एका आईसाठी तर फारच !

      Delete
  48. रात्र वैऱ्याची आहे...
    http://www.youtube.com/watch?v=M9pmGMu5PF0

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...