Monday, January 4, 2010

हरकत नाय !!

आधी म्हंटल्याप्रमाणे २ दिवस वाट बघूनही त्या ब्लॉग मालकाचं काहीच प्रत्युत्तर न आल्याने त्याची लिंक देतोय खाली. आणि माझी कविता सुद्धा देतोय. ती माझ्या याच ब्लॉग वर देखील आहे प्रथमा या पोस्ट मध्ये. अर्थातच या ब्लॉगवरचं ते माझं पहिलंच पोस्ट होतं. अर्थात ब्लॉगवर मी ती खूप उशिरा टाकली. ती कधी आणि कशी लिहिली गेली ते तुम्हाला वरचं पोस्ट वाचून कळेलच. थोडक्यात सांगायचं तर ती मी आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या "संकल्प" या त्रैमासिकासाठी २००८ च्या मध्यावर लिहिली. नंतर ती म.टा. च्या ऑनलाईन अंकात देखील छापून आली. २००८ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यात महाराष्ट्रात/मुंबईत घडलेल्या स्थानिक दंगली/अतिरेकावर (डोमेस्टिक टेररिझम) वर ती आधारित होती. कुमार केतकरांच्या घरावर संभाजी ब्रिगेडचा हल्ला, शीख धर्मगुरूच्या अंगरक्षकाने गोळीबार केल्यानंतर शीख तरुणांनी जवळपास १२ तास वेठीला धरलेली मुंबई, सनातन प्रभातचे कथित स्फोट आणि मनसेचे भैय्यांवरचे हल्ले  इ. इ. असो.
आणि मुख्य म्हणजे ही आहे त्या ब्लॉगची लिंक. आणि तिथे त्या महाशयांनी तिला बाल-कविता असं टॅगलं आहे ते बघून तर मला हसावं कि रडावं ते कळेना. मी आधीच्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे "नेटवर मराठीत जे जे आढळेल ते सरसकट (आणि बरेचदा मूळ लेखकाचे नाव न घालता) आपल्या ब्लॉगवर टाकणे" हा त्यांचा अजेंडा असावा असं मला तरी वाटलं.
मंडळी, शोधून बघा. मला तर वाटतं तिथे आपल्या प्रत्येकाचेच लेख/कविता असं काही काही सापडेल. आणि त्याखाली तुमचं नाव असेल तर तुमचं नशीब भलतंच जोरावर आहे असं समजायला हरकत नाय, हरकत नाय!!!

हरकत नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय !!

मारा झोडा ठेचुन काढा
गोळ्या झाडा बाँब फोड़ा
त्यांच डोक आमचा हातोड़ा
ताज्या रक्ताचा पडुदे सडा

एका घावात मागाल पाणी, असे आहोत आम्ही सनातनी
आमच्या देवांची मस्करी करायची नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||१||

खसकन उपसा नंग्या तलवारी
दिसूदे आपली ताकद खरी
भेदरल्या पाहिजेत दिशा चारी
थरथर कापेल दुनिया सारी

आमच्या समोर नको अजीजी, उगाच नही आम्हाला म्हणत "पाजी"
आमच्या गुरु च्या वाटेला जायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||२||

शिवबा आमचा आम्ही त्याचे मावळे
उलट बोलाल तर तोंड करू काळे
आदर व्यक्त करायचे आमचे मार्गच आगळे
फासून डाम्बर घर रंगवू सगळे

मुखी शिवबा हाती ग्रेनेड, अशी आमची राष्ट्रवादी ब्रिगेड
शिवबाचे स्मारक उभारू देत नाही म्हणजे काय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||३||

दिसला भैय्या तर सोडू नका
टँकसया फोड़ा सामान फेका
एकच असा देऊ जोरदार धक्का
की "आपला" खुंटा होइल पकका

नवमहाराष्ट्राची आम्हालाच जाण, आम्ही करू नवनिर्माण
मराठी सोडून दुसर काही बोलायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||४||

पण थाम्बा हे काय !!
हे सगळ अचानक थांबतय काय?
होय ! कारण मी आहे आजचा तरुण, कुठल्याही झापडांशिवाय
मीच गोविन्दसिंह, मीच कृष्ण आणि मीच शिवराय
आमच्या तरुणाईला फसवयाच नाय
याद राखा गाठ आमच्याशी हाय
ज़ातिधर्माच्या नावाने फूट पाड़ाल तर
होय !! आमची हरकत हाय, हरकत हाय, हरकत हाय !!!

हेरंब ओक
१५ जुलै '०८

17 comments:

  1. जबरी कविता आहे रे...

    ReplyDelete
  2. मी ’कणा’ कवितेच विडंबन पण हया महशयानी असच ढापल आहे.मी तेव्हा तिथे प्रतिक्रिया देत होतो पण देता आली नाही.मी यासंदर्भात माझ्या कमेंट्मध्ये मागे एकदा लिहले होते.

    http://davbindu.wordpress.com/2009/12/01/
    (हयातील माझ्या कमेंटस वाचा)

    बाकी ’हरकत नाय’ कविता एकदम भन्नाट आहे हो...

    ReplyDelete
  3. धन्यवाद देवेंद्र. मी म्हंटलं ना तिकडे अनेकांच्या कविता/लेख असणार म्हणून. आणि मला खात्री आहे कि अजूनही अशाच तुमच्या सारख्या प्रतिक्रिया येतील मला. प्रत्येकाला तिकडे काहीना काही सापडेल आपलं. आणि हो मलाही आधी तिकडे प्रतिक्रिया देता येत नव्हती. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आधी त्या ब्लॉगचा फॉलोअर व्हावं लागतं मग त्या महाशयांना मेल करता येतं आणि प्रतिक्रिया टाकता येते. आणि प्रतिक्रियेनंतर कोड टाकताना टॅब की ने पुढे पुढे जायला लागतं. नाहीतर कमेंट नाही येत टाकता.

    ReplyDelete
  4. कविता मस्तच आहे. चोराने ह्या कवितेला बाल कविता म्हटलं आहे म्हणजे त्यांना चोर्‍या करण्याबरोबरचं "पा" चित्रपटात Auro ला झालेला progeria रोग ही असावा. चोराचे वय आणि बुद्धी परस्पर विरोधी दिशेला वाढत असणार हे नक्की.

    ReplyDelete
  5. हा हा हा.. चोराला प्रोजेरीया झाला असावा.. हा हा हा .. जाम आवडली कमेंट, सिद्धार्थ !!

    ReplyDelete
  6. मला माझी प्रतिक्रिया तिथे नोंदवता आली नाही आणि मला हेरंब ने सांगितलेली प्रोसेस पूर्ण करण्यायेवढां वेळ नाही म्हणून माझी प्रतिक्रिया इथे लिहीत आहे.

    प्रिय सुप्रीत,
    मी एकदम आवक झालो आहे!! २ कारण आहेत.

    १ हेरंब ह्यांची कविता इथे त्यांना श्रेय न देता publish केली गेली आणि त्याहूनही महत्वाचे
    २. त्याचा अर्थ लक्ष्यात न घेता सुप्रीत साहेबांनी ती चुकीच्या section मध्ये टॅग केल.

    माझ्या मते हे अजून एक उदहारण जे 3i मध्ये पण दाखवल आहे... घोकंपट्टी करण्यापेक्षा विषय समजून घ्या! तुम्हाला जर लिखाणासाठी ('इतरांच्या') श्रेय हवे आसेल तर जरा लिखाण वाचून समजून पब्लिश करा.
    इथे तुम्ही स्वतःचे हसे करून घेतले आहे!!

    ReplyDelete
  7. अरे हो न अमेय. हे म्हणजे काहीतरी भलतंच आहे. असो. जरा शोधून बघ. तुझ्या कविता/लेख पण असतील बघ तिथे. आणि हो तू माझ्या मराठी ब्लॉगवर कसा? बरं झालं आलास ते :)

    ReplyDelete
  8. अरे बस काय हेरंब.... आगोदर पण होतो मी तुझ्या बोलग वर!
    विसरलास? सुरुवात हरकत नाय च्या कॉम्मेंत्स वरूनच झाली होती!

    ReplyDelete
  9. अरे ते तू विंग्रजी ब्लॉगवर होतास. असो. ते जाउदे. पण मस्त वाटलं तुला इथे भेटून.

    ReplyDelete
  10. कवितेवर मी त्याला झापायला म्हणुन कॉमेंट टाकायचा प्रयत्न केला पण कॉमेंट पोस्ट होत नाही. कविता खरंच एकदम मस्त आहे.
    हा प्राणी आहे तरी कोण??

    ReplyDelete
  11. धन्यवाद काका. मी देवेंद्रला दिलेल्या प्रतिक्रियेत दिलंय कि त्या ब्लॉग वर प्रतिक्रिया कशी द्यायची ते. जरा कटकटीचंच काम आहे. कोण आहे माहित नाही पण बरेच जणांचे लेख/कविता आहेत तिकडे. तुम्ही पण शोधून बघा. तुमचे तर बरेच सापडतील :)

    ReplyDelete
  12. हेरंब जी अश्या लोकांना अटकाव कसा करता येईल ते जरा पहाना? एक तर तेथे आपोआप मूल धागा गेला पाहिजे किंवा आपले स्वतःचे साहित्य,लेख,कविता इ.संरक्षित कसे ठेवावे मृदुलकराना (साफ्टवेर) विचारून तशी व्यवस्था करता येते का ते पहावे. सर्वानाच याचा उपयोग होईल.माझ्यासारखे नवखे त्यामुळेच येथे लिहायला घाबरतात.

    ReplyDelete
  13. प्रिय सावधान,

    अशा लोकांना अटकाव करणं म्हणजे फारच कठीण दिसतंय सध्या तरी. २-३ उपाय म्हणजे आपल्या ब्लॉग मधून +C चा ओप्शन डिसेबल करणे. आपल्याला जर अशा चोऱ्या आढळल्या आपण तिथे कमेंट टाकणे, आपल्या ब्लोगवर त्याविषयी पोस्ट टाकणे. तसेच twitter, ओर्कुट, मेल्स च्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवाराला कळवणे आणि त्यांना सगळ्यांनाही तेथे कमेंट टाकायला सांगणे. (ही twitter आणि +C ची आयडिया मला सिद्धार्थ आणि अपर्णा कडून कळली.)

    अजून एक म्हणजे freecopyright किंवा अशा एखाद्या साईट वर रजिस्टर करून आपल्या साहित्याचे अधिकार सुरक्षित करणे.

    आणि राहता राहिलं लिहिण्याविषयी. लोकं चोऱ्या करतात म्हणून आपण लिहिणं थांबवणार थोडंच? उलट लोकांना चोऱ्या करावसं वाटतं एवढं चांगलं आपण लिहितो याचं समाधान मानायचं आणि लिहीत रहायचं नेहमीसारखंच.. आपल्या लिखाणाला माझ्या शुभेच्छा..

    ReplyDelete
  14. Mitraa, pharach chhan aahe re kavita!! ani tuza blog hi... mazi blog wachayla suruwat tar ithunach zali :)
    Marathi madhe comments kase takayche te nahi kalala ajun mala. koni madat karel kay?

    ReplyDelete
  15. धन्यवाद अभि आणि ब्लॉगवर स्वागत. मराठी लिहायला गुगल IME, बरहा वगैरे वापरू शकतोस. आणि तरीही मराठीत कमेंट जात नसेल तर तो blogspot चा प्रॉब्लेम असावा. मागे पण एकदा असंच झालं होतं.. जरा वेळाने आपोआप सुरु होतं..

    ReplyDelete
  16. त्या ब्लॉग मालकाने मला संपर्क केला आज (८ फेब २०१०) आणि क्षमा मागितली.
    ----------------------

    मी सुप्रीत ,

    हे मित्रा हेरम्ब ,

    actually मित्रा मी ज्या ब्लोग्वर कविता टाकल्या होत्या त्या खरच माज्या नवत्या , मी आणि माज्या मित्रानी ORKUT वरील स्क्रैप येथे पोस्ट केले होते , तसेच गेला एक महिना मी माज्या ब्लोग्च्या संपर्कात नव्हतो म्हणून मला तुज्या कमेन्ट कळल्या नाहीत . आणि मला हेही माहीत नव्हते की या कविता तुज्या ब्लोग्वर आहे . तुज्या कमेन्ट नंतर मी copyscap वर चेक केले असता माज्या बर्याच कविता तेथे सापडल्या , तेव्हा मी सर्व कविता Delete करत आहे .


    तुम्हाला ज़ालेल्या सर्व त्रासाबद्दल मला मला मनापासून क्षमा करा , येथून पुढे मी ORKUT SCRAP पोस्ट करण्याआधी त्या कवीचा अपमान होणार नाही याची कालजी घेइल ,

    ----------------------------------

    सुप्रीत, मला यावर काहीही बोलायचं नाहीये. तू तुझ्या ब्लॉगवरच्या सगळ्या चोरलेल्या कविता डिलीट करून टाकल्यास हे वाचून आनंद वाटला. यापुढे स्वत:चं नसलेलं कुठलंही साहित्य शक्यतो ब्लॉगवर टाकू नकोस आणि त्यातून टाकलंसच तर त्यापूर्वी मूळ लेखकाची परवानगी नक्की घे. !!

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...