Friday, May 21, 2010

मराठी (आणि) ब्लॉगिंग आणि इतर .... !!!

आम्ही मागे एकदा आमच्या संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त नाटक बसवत होतो. लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळा हौशी मामला होता. पण सगळ्यांना नाटकात काम करायची आवड, इच्छा होती आणि त्याप्रमाणे आपलं शिक्षण, नोकरी आणि इतर उद्योग सांभाळून सगळे जण नाटकात काम करत होते. आमच्या दिग्दर्शक मित्राबरोबर नाटकाची आवड असणारे त्याचे २-३ मित्रही तालमीला येत. दिग्दर्शक सीन समजावून सांगत असताना, संवाद, शब्दफेक, हावभाव, स्टेजचा वापर या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असताना त्याचे हे मित्रही अनाहूत 'सल्ले' देत असत. हा संवाद म्हणताना टोन असा असा असायला हवा, असे असे हातवारे हवेत वगैरे मतं मांडली जात. हे दिग्दर्शकाने सांगितलं असतं तर कोणाला काही वाटलं नसतं पण उगाच त्याचे मित्र आहोत म्हणून आपल्यालाही दिग्दर्शन करण्याचा अधिकार आपसूकच प्राप्त होतो या विचारातून दिले जाणारे हे अनाहूत सल्ले अनेकदा त्रासदायक वाटत. पण दिग्दर्शक सगळ्यांचाच मित्र आणि ती टाळकी त्याचे मित्र म्हणून कोणी विशेष लक्ष देत नव्हतं. कालांतराने नाटकात दोन अतिशय छोट्या भूमिका करायला आम्हाला कलाकार मिळेनात. तेव्हा याच दोन टाळक्यांना या भूमिका देऊ असं ठरलं. ते दोघेही आनंदाने तयार झाले. पण...

सगळ्यांसमोर उभं राहून फक्त पाहिलं वाक्य म्हणताना त्यांची अशी काही तारांबळ उडाली की बास रे बास !!!!

ते अडखळत होते, शब्द चुकत होते, वाक्य पूर्ण करता येत नव्हतं. हावभाव, हातवारे, आवाजातला चढउतार, संवादफेक, स्टेज कव्हर करणं वगैरे वगैरे तर फार फार पुढच्या गोष्टी होत्या.

हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे नीरजा पटवर्धन यांनी मायबोलीवर लिहिलेल्या ब्लॉगर्सच्या लेखाला मिळालेल्या प्रतिक्रिया. १-२ गोष्टी वगळता नीरजा यांचा लेख मला पटला. मराठी ब्लॉगर्सच्या ज्या गोष्टी त्यांना खटकल्या आहेत त्या का खटकल्या आहेत हे त्यांनी योग्य शब्दांत आणि सौम्य भाषेत सांगितलं आहे. त्यामुळे या लेखाचा विषय तो लेख नाही तर त्या लेखावर भरभरून आलेल्या प्रतिक्रिया हा आहे. (सध्या तरी) तीन पानं भरून आहेत. सगळ्या वाचा. काही प्रतिक्रिया विचारी आहेत, संयत आहेत, बॅलन्स्ड आहेत. पण अशा प्रतिक्रियांची संख्या तुलनेने कमीच. इतर अनेक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा, आगाऊपणा, ब्लॉगर्सना क:पदार्थ लेखणार्‍या तुच्छ भावना, स्वतःबद्दलच्या (माझ्या दृष्टीने अनाकलनीय) गर्वाचा (इथे मी गर्व हा गर्व या वाईट अर्थानेच वापरतो आहे. हल्ली वापरला जातो त्या अभिमान या अर्थी नव्हे.) सोसच जास्त. मला प्रामुख्याने खटकलेल्या काही प्रतिक्रिया देतो इथे. (>> च्या खाली मी माझं उत्तर लिहिलं आहे असं वगैरे काही नाही. आधी कोणीतरी लिहिलेल्या प्रतिक्रियेवर पुढच्या व्यक्तीने दिलेली ती प्रतिक्रिया आहे. गोंधळ होऊ नये म्हणून मुद्दाम सांगितलं.)

------

- जरी काही दर्जेदार असले तरी माणशी एक ब्लॉग जर निघाला तर कुणाकुणाचे आणि कितीकिती आणि कायकाय वाचायचे हा प्रश्न उरणारच!
मग त्यातुन आपल्या ब्लॉगचा टीआरपी वाढावा म्हणुन वेगवेगळी मार्केटिंग गिमिक्स वापरली जाण्याचीच आणि दर्जाकडे दु:र्लक्ष (हा शब्द अशुद्ध आहे हे मला माहीत आहे. पण प्रतिक्रियेतला शब्द जसाच्या तसा दिला आहे.) होण्याचीच शक्यता अधिक वाटते!

- >> बाकी ब्लॉग संस्क्रुती वाढेल तसे विषयाचे वैविध्य वाढेल यात शंकाच नाही.
वैविध्य वाढेलही कदाचित पण दर्जाचे काय?
प्रिंट प्रकारात निदान प्रकाशन तरी काही निकषांवर हे साहित्य पडताळुन घ्यायचे... इथे तर ते ही मॉडरेशन नाही!

- अनेक मराठी blog वाचताना मला खटकलेली गोष्ट म्हणजे खुप nostalgic (प्रवीण दवणे छापाचे) लिखाण . विनोदी लिखाणात तोच तोच मराठी मध्यमवर्गीयपणातुन निर्माण होणारा विनोद (इथे पुलछाप म्हणायला हरकत नाही,हा प्रभाव शिरिष कणेकर, मंगला गोडबोले ह्यांच्या लिखाणातही जाणवतो ). हे इतके तेच तेच होते की मग कधीकधी खरे लिखाण असले तरी खोटे वाटायला लागते.
सामाजिक बांधिलकिच्या जाणिवेतुन केलेले लिखाणही कुठेतरी शाळु/teenager types असते (उदा. systemमधे भ्रष्टाचार आहे,राजकारणी वाईट असेच काहीतरी).

- प्रथितरश (वरचाच कंस पुन्हा एकदा.. असो..) ब्लॉगर्स स्वतःच्या मनाने शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करताना दिसतात. ह्या लोकांकडून तू मराठी भाषेसाठी काही करण्याची अपेक्षा करते आहेस का ?

- जिथे फॉर्मचे बंधन नाही, जिथे वाट्टेल ते लिहीता येऊ शकते तिथेही अनुभवांची/कल्पनांची वानवा का? मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणुन पाहिले तर वैचारिक दिवाळखोरीच जास्त दिसते, आणि तसाच समाज असेल तर कोण काय करणार.

- इतकं बोरिंग झालंय मराठी ब्लॉगविश्व.. काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करायचे! किंवा चक्क टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडायचे.. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनचा उत्तम नमुना! लेटेस्ट हॉट टॉपिक असल्याने व 'तू मला छान म्हण, मी तुला म्हणतो' अशा प्रकारच्या कंपुबाजीने(!) कमेंट्स तर बख्खळ पडतात व लेखक समाधान करून घेतो की तो लेख फार भारी जमला होता वगैरे..

- ब्लॉग अकाउंट फुकट काढता येतं. त्यातुनच इतकं पीक उगवलय. बरं बहुत करुन साचेबब्द्ध आयुष्य असलेल्या लोकांच्या अनुभवविश्वात वैविध्य कुठुन येणार ? त्यात प्रतिभेची वानवा.

- आता इतकी प्रचंड गर्दी आलीय की निसटले जाते हे लिखाण, आणि मग उरतात नुसत्याच प्राची ला गच्ची टाईप कविता किंवा फॉर्वर्डेड माल स्वतःच्या ब्लॉगवर टाकणारी जनता.. अरे ही कुठली ब्लॉग काढायची प्रेरणा?

------

सिंडरेला यांच्या १-२ प्रतिक्रिया आणि स्वाती_आंबोळे यांच्या सगळ्याच प्रतिक्रिया पटल्या. निव्वळ त्या प्रतिक्रिया (सिंडरेला यांच्या प्रतिक्रियांमधले काही मुद्दे वगळता) ब्लॉगर्सच्या बाजूने आहेत म्हणून नव्हे तर त्या एकांगी नाहीत म्हणून.
आणि ही आहे शर्मिला फडके यांची प्रतिक्रिया. मला सगळ्यांत जास्त आणि पूर्णपणे पटलेली एकमेव प्रतिक्रिया. कारण त्यांनी अतिशय विचारपूर्वक, इतरांप्रमाणे उगाच आक्रस्ताळेपणा न करता, सगळ्या बाजूंचा सारासार विचार करून, समतोल राखत, ब्लॉगर्सची बाजू अतिशय योग्य रीतीने मांडली आहे. अतिशय माहितीपूर्ण प्रतिक्रिया आहे ही. खाली वाचा.

------

- नेटबाहेरच्या जगात गेली काही वर्षे अमाप संख्येने मराठी पुस्तके निघत आहेत पण त्यापैकी नव्वद टक्के पुस्तकांना दुसर्‍यांदा आवर्जून वाचावे इतकेही वाचनमूल्य नाही. मग मराठी ब्लॉगर्सकडून इतक्याच 'साहित्य निर्मितीची' अपेक्षा करणे चुकीचेच. पण असं असूनही उद्याचे दर्जेदार साहित्य किंवा कंटेपररी साहित्य हे ह्या ब्लॉग्जवरच्या पोस्ट्समधूनच निर्माण होऊ शकेल इतकी क्षमता नक्कीच निर्माण झाली आहे काही ब्लॉगर्समधे.

डायरीवजा लिखाण हा ब्लॉग्जचा काहीतरी 'कमीपणा' मानला जातो पण उलट मला तर ती ब्लॉग्जची स्ट्रेन्ग्थ वाटते. ब्लॉग्ज लिहिणारे सुरुवात 'मी' पासून करत असले तर ते योग्यच. अक्षरशः जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेले मराठी ब्लॉगर्स यानिमित्ताने आपले विविध क्षेत्रातले, विविध समाजांमधले अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवात शाळकरी निबंधासारखी झाली तरी त्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगणे, पलीकडे जाणे यातूनच होते. अनुभवांना थेटपणे भिडून लिखाण करण्याची कुवत त्यांच्यापैकी काहींमधे निर्माण अवश्य होते आहे.

डायरीवजा किंवा 'मी'च्या लिखाणामधे कल्ट साहित्यकृती निर्माण होण्याची किती ताकद असते हे कित्येक क्लासिक्सनी ऑलरेडी दाखवून दिलेले आहे. कोसलाही याचेच उत्कृष्ट उदाहरण.

ब्लॉगर्समधे गुणवत्ता, क्षमता आहे फक्त कमतरता आहे ती सातत्याची आणि वेगवेगळे फॉर्म्स धीटपणे हाताळण्याची. आणि अजून एक वेगळेपणा म्हणजे येणार्‍या इन्स्टन्ट प्रतिक्रिया. ज्या बाहेरच्या जगातल्या लेखकांना कधीच मिळू शकत नाहीत. आपले पुढचे पोस्ट जास्त दर्जेदार किंवा वेगळे करण्याची स्फुर्ती ब्लॉगर्सना यातूनच मिळू शकते मात्र उगीच सामान्य लिखाणाला चढवले गेले तर ब्लॉगर कमी कालावधीत संपूही शकतो. यात मला वाटतं वाचकांचीही जबाबदारी खूप आहे. प्रतिक्रिया देताना परखड वस्तुनिष्ठपणा दाखवणे वाचकाला जमले पाहिजे आणि क्रिटिसिझम योग्य त्या स्पिरीटने घेणे ब्लॉगरला जमले तरच तो पुढे जाऊ शकेल.

वेगळ्या स्टाईलची भाषा, काहीतरी नवा वेगळा विचार, नवा फॉर्म ब्लॉगिंगमधे अचूक पकडता येऊ शकतो. मात्र असा प्रयत्न करणारे खूप कमी. जे करताहेत त्यांचे कौतुक आहे आणि करत नाहीत त्यांनी तो आवर्जून करायला हवा.

डायरीवजा लिखाणाने सुरुवात करुन स्वतःची स्टाईल मिळणे, मग त्यापुढे जाऊन काही वेगळे मांडणे, स्वतःच्या अनुभवांतून वाचकांना स्वतःशी जोडणे, अनुभवांच्या पलिकडचे काहीतरी वाचकांच्या पदरात टाकणे, भाषा समृद्ध करत नेणे, संदर्भ मिळवण्याचा प्रयत्न करणे हे करणारे काही ब्लॉगर्स बस्केने उल्लेख केले आहेतच. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या एका ब्लॉगरला मराठीतल्या मान्यवर प्रकाशकांनी ऑलरेडी तिचे पोस्ट्स संकलित करण्याची ऑफर दिली होती. मराठी प्रकाशकांनी असे जास्तीतजास्त प्रयत्न आता करायला हवेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी काही सीमारेषा मराठी साहित्यकृतींमधे पुढल्या काळात नसावी.

ब्लॉगर्समधे गेल्या काही महिन्यांमधे पेन्शनर्स लिखाणाचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरुन जाताना दिसले अमुक की टाक त्यावर पोस्ट टाईप उत्साह त्यांच्यात अमाप ओसंडून जातो आहे. ब्लॉगर्सचा दर्जा आणि संख्या याचे प्रमाण यामुळे विपरित होईल की काय अशी भिती साहजिकच वाटते. पण हा ब्लॉगर्सचा एक वेगळा, स्वतंत्र प्रकार आहे आणि त्यांचा वाचकही वेगळाच रहाणार. यामुळे तरुण, उत्साही ब्लॉगर्सनी आपला ब्लॉगिंगचा उत्साह गमावता कामा नये. लिहित रहायला हवे.

चांगले, सकस असे काही जन्मतःच प्रत्येकवेळी नसते. ते घडत जाते. ज्यांच्यात क्षमता आहे ते घडतील. बाकी फोलपटे उडून जातील आपोआप.

------

शर्मिला फडके यांचा ब्लॉगही अतिशय उत्तम आहे. नक्की वाचा. !! असो.

तर या अशा प्रतिक्रिया टाकणार्‍या लोकांच्या प्रोफाईल्समध्ये डोकावून मी मुद्दाम त्यांच्या ब्लॉग्सला भेटी देऊन आलो (अनेकांचे तर स्वतःचे ब्लॉग्सही नाहीयेत. निदान प्रोफाईलमध्ये ब्लॉगची लिंक तरी नाहीये.) आणि मला सुरुवातीला सांगितलेली नाटकाची गोष्ट आठवली. याउपर काही लिहीत नाही. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. पण मला काही काही प्रश्न राहून राहून पडले.

१. आपण स्वतः एका ओळीचीही निर्मिती न करता किंवा केलीच तरी नियमितपणे न लिहिता आणि अगदी नियमितपणे आणि दर्जेदार लिहीत असलो तरीही त्यामुळे समग्र मराठी ब्लॉगविश्वावर चिखलफेक (यातून समस्त मराठी माणसाचं दैवत पुल ही सुटलेलं नाही बरं.) करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? हे म्हणजे संभाजी ब्रिगेड सारखी स्वघोषित 'सेन्सॉरबोर्ड गिरी' झाली. संभाजी ब्रिगेड चित्रपट थेटरमध्ये घुसून चित्रपट डायरेक्ट बंद पाडते आणि हे लोक असल्या प्रतिक्रियांमुळे नवख्या ब्लॉगर्सचं खच्चीकरण करून त्यांना लिखाणापासून परावृत्त करून पर्यायाने त्यांचे ब्लॉग्स बंद पडायला कारणीभूत ठरतात. याउलट मला तरी आत्तापर्यंत कुठल्याही मराठी ब्लॉगवर इतर कुठल्या मराठी संस्थळाची किंवा त्याच्या सदस्यांची अशा प्रकारे नाचक्की करणारे लेख वाचायला मिळाल्याचं स्मरत नाही.

२. एखादी व्यक्ती कसं आणि किती उत्तम लिहिते यावर तिच्या लिखाणाचा दर्जा अवलंबून असतो की ती कुठल्या संस्थळावर लिहिते यावर? (त्याशिवाय का यांना ९५% ब्लॉग्स वाचण्याच्या लायकीचे वाटत नाहीत?)

असो प्रश्न अनेक आहेत पण मला मूळ मुद्द्यापासून भरकटायचं नाहीये त्यामुळे प्रश्नावली तूर्तास इथेच थांबवतो. मला वैयक्तिकरित्या उद्देशून कोणीही काहीही लिहिलेलं नसलं तरीही समस्त 'मराठी ब्लॉगर्सना' उद्देशून ताशेरे झाडण्यात आले असल्याने मला मराठी ब्लॉगर्सची बाजू मांडणं आवश्यक वाटतं. (इथे मी समस्त मराठी ब्लॉगर्स मंडळींचा प्रतिनिधी म्हणून हे मांडतोय असा कुठल्याही प्रकारचा माझा दावा नाही. मी फक्त मराठी ब्लॉगर म्हणून माझी बाजू मांडतोय आणि अनेकांची बाजू हीच असेल याची मला खात्री आहे..... उगाच कोणी काही विचारण्याच्या आधीच स्पष्टीकरणं देऊन टाकलेली बरी असतात अनेकदा. नाहीतर पुन्हा एखादा प्रतिक्रिया टाकलेला/ली येऊन विचारायचा/ची "तुम्ही ठेका घेतला आहे का मराठी ब्लॉग विश्वाचा")

१. आत्तापर्यंत किती मराठी पुस्तकं लिहिली गेली असतील? एक अगदी अंदाजे आकडा म्हणून १००० धरू. (मला वेड लागलेलं नाही. खरा आकडा यापेक्षा कित्येक पट अधिक आहे. तरीही तूर्तास आपण अगदी छोटा आकडा धरू).

२. साधारण किती वर्षं पुस्तकं निर्मितीचं काम चालू आहे? पुन्हा अंदाजे १०० वर्षं धरू.

आता हेच दोन प्रश्न आपण आता मराठी चित्रपट आणि मराठी संगीत/गीतं यांना अनुसरून विचारू.

तर आता मला सांगा गेल्या १०० वर्षांत निघालेल्या १००० पुस्तकांपैकी सगळीच्या सगळी पुस्तकं चांगली होती का? गेल्या १०० वर्षांत निघालेलं प्रत्येक मराठी गाणं, प्रत्येक मराठी चित्रपट हा सर्वोत्तम होता का? प्रत्येकाचा दर्जा अत्युच्च होता का? चित्रपटांच्या विषयात कमालीचं वैविध्य होतं का? प्रत्येक पुस्तकं/गाणं/चित्रपट भावनेला स्पर्शून जाणारं, अनुभवाची नवीन कवाडं खुलं करणारं, प्रचंड माहितीपूर्ण, सहज प्रयोग म्हणून न करता नवनवीन संकल्पना मांडणारं, नवीन शोध लावणारं असं काही होतं का???

जर मराठी लेखक, चित्रपटकर्ते, संगीतकार/गीतकार १०० वर्षं मिळूनही निर्माण होणारं एकूणएक, प्रत्येक पुस्तक/चित्रपट/गाणं हे प्रेक्षकाला/वाचकाला आवडणारं बनवू शकले नाहीत आणि हे आपण मान्यही करतो तर मग तोच नियम मराठी ब्लॉगविश्वाला लागू का होत नाही? मराठी ब्लॉगविश्वात जन्माला येणारा एकूण एक, प्रत्येक लेख हा वेगळा, अत्त्युच्च दर्जाचा असावा हा अट्टाहास का? (आता कोणी म्हणेल की आम्ही प्रतिक्रियेत म्हटलं आहे की ५% ब्लॉग्स वाचनीय असतात. पण ती शुध्द तांत्रिक पळवाट आहे. ५% ब्लॉग्सना चांगलं म्हटलं तरीही एकूणच मराठी ब्लॉगविश्वाबद्दल असणारा अनाकलनीय आकस लपून रहात नाही.)

इंटरनेट खर्‍या अर्थाने घरोघरी सुरु होऊन आत्ताशी जेमतेम दहा-पंधरा वर्षं झाली आहेत. त्यात ब्लॉग प्रकरण सुरु झालं अंदाजे ६-७ वर्षांपूर्वी आणि त्यातही मराठी टंकायच्या सोयी उपलब्ध होऊन, पूर्णतः मराठीत लिहिले जाणारे ब्लॉग्स सुरु होऊन तर जेमतेम २-३ वर्षं झाली आहेत. तर थोडक्यात वय वर्ष ३ असणार्‍या या बाळाकडून किती जलद आणि किती मोठ्ठाल्या अपेक्षा ठेवायच्या?

लोक आत्ता कुठे मराठी लिहायला लागले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक नवीन ब्लॉग्स सुरु झाले. अनेक नवीन लोक लिहिते झाले. नवनवीन कल्पना, शैली, वर्णनं, बाज, प्रकार यायला आत्ता कुठे सुरुवात होते आहे. माझ्या स्वतःच्या ब्लॉगलाही अजून दोन आकडी संख्या (महिन्यांची) गाठायची आहे. तर अशा वेळी नवीन ब्लॉगर्सना प्रेरणा मिळेल असं काही लिहिता येत नसेल तरी निदान त्यांना झोंबेल किंवा त्यांचा उपमर्द होईल असं तरी आपल्या हातून लिहिलं जाणार नाही याची दक्षता घेणं हे (कमीत कमी आंतरजालावरच्या तरी) प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य नाही का? सगळे ब्लॉग्स अत्त्युच्च दर्जाचे नाहीत हे मान्य करू पण म्हणून काय सगळेच ब्लॉग्स टाकाऊ आहेत, दर्जाहीन आहेत, अर्थहीन आहेत, पाट्या टाकणारे आहेत?

दुसरी गोष्ट आणि अजून महत्वाची म्हणजे वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चित्रपट, संगीत, पुस्तकं वाल्यांप्रमाणे ब्लॉगर्स काही (अजून तरी) व्यावसायिक नाहीत. व्यावसायिक इंग्रजी ब्लॉगर्स आहेत पण मराठीत त्याची संख्या जवळपास नगण्य आहे. आपले नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर सगळ्या बाबी सांभाळून चालवला जाणारा प्रकार आहे हा. पूर्णतः हौशी. (तसं नसतं तर ब्लॉगर्स मेळाव्याचा संपूर्ण खर्च कोणी एका अनामिकाने उचलला नसता. स्वतःच्या प्रोडक्टचे/ब्लॉगचे पोस्टर्स, बॅनर्स लावून त्या मेळाव्यातून व्यावसायिक फायदा काढला असता.) थोडक्यात या हौशी प्रकाराच्या यशाची मोजमाप करताना व्यावसायिक फुटपट्ट्या वापरणं सर्वस्वी अयोग्य.

अजून एक म्हणजे सरसकट सगळ्या ब्लॉगर्सच्या अकलेचे बाजारभाव काढणार्‍यांनी नियमितपणे किती ब्लॉग्स (लिहिले म्हणत नाहीये मी) वाचले आहेत हा प्रश्नच आहे आणि त्यांची (ब्लॉग्स न वाचता केलेली) निरीक्षणं बघून तो प्रश्न म्हणजे वस्तुस्थिती आहे याबद्दल दुमत नसावं. निदान मराठी ब्लॉगर्सचं तरी. मराठी ब्लॉग विश्वातून सलग दोन-तीन आठवडे नजर फिरवली तरी लक्षात येईल की इथे अनियमित पण दर्जेदार लिहिणारे तर आहेतच आहेत पण नियमित आणि दर्जेदार अशा दुर्मिळ मिश्रणाचं कसबही सहजतेने साधणारे अनेक अनेक अनेक लोक आहेत. माझ्या ब्लॉगवर 'माझे ब्लॉगु ब्लगिनी' खाली जी चित्र दिसतायत ना तिथे टिचक्या मारून ते ब्लॉग्स वाचून बघा आणि दुसरं म्हणजे 'मला हे भावतं' च्या खाली जी यादी आहे ना तेही ब्लॉग्स आवर्जून वाचा. बरं यातल्या एकालाही मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही, कोणालाही कधीच भेटलेलोही नाही. ज्या काही ओळखी आहेत त्या ब्लॉग्समुळेच. सगळे ब्लॉग्स वाचून झाले की मग "मराठी ब्लॉग्समध्ये विविधता नाही, दर्जा नाही, वैचारिक दिवाळखोरी आहे, अनुभवांची/कल्पनांची वानवा आहे, फुकट अकाउंट आहे म्हणून ब्लॉग काढले आहेत" ही वाक्य पुन्हा एकदा म्हणून बघा. काहीतरी चुकल्यासारखं जाणवेल (चिखलफेक करणार्‍या सरसकट सगळ्यांना जाणवेलच असा दावा अजिबात नाही. पण निदान काही जणांना तरी जाणवेल.. !!). आणि हे झाले मला माहीत असलेले काही ब्लॉग्स पण मला/आपल्याला माहीत नसलेले किंवा आपल्या नजरेस पडले नसलेले इतरही अनेक मराठी ब्लॉग्स असतीलच की. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अशी आगपाखड करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी आणि कसा दिला? नैतिक अधिकार म्हणतोय मी अधिकार नाही. किंवा सोप्प्या शब्दांत म्हणजे आपलं त्या क्षेत्रात भरीव नाही तरी निदान काहीतरी कार्य आहे म्हणून आपण टीका करू शकतो या जाणीवेतून केली गेलेली टीका असेल तर ठीक आहे. "मी वाचक आहे आणि ब्लॉग्स नेटवर उपलब्ध आहेत म्हणून मी त्यांच्यावर तोंडसुख घेणार" वाल्या अधिकाराविषयी बोलतच नाहीये मी. त्यातून पुन्हा "पैसे मोजून तिकीट काढून चित्रपट बघितलाय त्यामुळे मला एखाद्या रामगोपाल वर्माला किंवा मधुर भांडारकरला नावं ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे" हा मुद्दाही इथे गैरलागू आहे. तिकीट काढून चित्रपट बघितलाय त्यामुळे निर्माता/दिग्दर्शकावर तिखट टीका करण्याचा जो अधिकार आपल्याला लाभतो त्याच अधिकाराने ब्लॉग्सवर (जे वाचायला विनामुल्य असतात) आणि ब्लॉगर्सवर टीका करणंही कदाचित चुकीचं नाही असं म्हणू आपण. पण टीका करताना आपण कुठल्या पातळीवर उतरतो, कुठली भाषा वापरतो याचं भान ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं.  एखादं मराठी संस्थळ म्हणजे इंटरनेटवरील समस्त मराठी विश्व नव्हे हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर माझ्या म्हणण्याचा अर्थ कळायला मदत होईल. असो.. !!

मध्यमवर्गीय विनोद, शाळू विनोद, मॉडरेशन नसलेलं लिखाण, शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करणारे, असल्या लोकांकडून मराठीसाठी काय होणार, अनुभवांची/कल्पनांची वानवा असणारं लिखाण, अतिशय बोरिंग, टिपिकल, मोनोटोनस, कंपूबाजी करणारे (या शब्दाला तर मी प्रचंड हसलो. कारण अशा कित्येक मराठी संस्थळांवर किती कंपूबाजी चालू असते आणि तिथले सभासदच त्यावर कशी टीका करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असो.), बख्खळ कमेंट्स घेणारे (यामागचा आक्षेपच मला कळला नाही. ब्लॉगेटिकेट्स बद्दलच्या अज्ञानातून हे असं म्हटलं गेलं असावं कदाचित), वैचारिक दिवाळखोरी, बौद्धिक दिवाळखोरी, ब्लॉग्सची प्रचंड गर्दी (यात आक्षेपार्ह काय आहे? मराठी संस्थळावर खोर्‍याने सभासदसंख्या झाल्यावर सुखावणारे हेच लोक पण यांच्या मते ब्लॉग्सची गर्दी मात्र होता कामा नये.) अशा वस्तुस्थितीची जाणीव न ठेवता केल्या जाणार्‍या आढ्यताखोर, शेलक्या विशेषणांनी भरलेल्या तुच्छतादर्शक प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का दरवेळी आपलं मत मांडताना?

"हो SSSSSS य .... आहे. अगदी आहे. पूर्ण आहे. कारण पब्लिकली छापल्या जाणार्‍या प्रत्येक लिखाणावर माझं मत देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे." असं उत्तर मिळण्याचीच अधिक शक्यता आहे. पण वर म्हंटल्याप्रमाणे ते मत कुठल्याही भाषेत (लँग्वेज याअर्थी नव्हे पद्धत याअर्थी म्हणतोय) अगदी अपमानजनक भाषेत दिलं गेलं असल्याने मलाही उत्तर द्यावं लागलं आणि एवढं मोठ्ठं उत्तर तिथे प्रतिक्रिया म्हणून देण्यापेक्षा माझ्या ब्लॉगवरच लिहिलं तर समस्त मराठी ब्लॉगजगताला (जगातला प्रत्येक मराठी माणूस माझा ब्लॉग वाचतो असा मुर्खासारखा दावा अजिबात नाहीये इथे.) ब्लॉगविश्वाच्या बाहेर मराठी ब्लॉगर्सविषयी काय मतं आहेत ते लक्षात येईल आणि ते (आणि मीही) आपलं लेखन अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न करतील या हेतूने इथे लिहिलं. ;-)

पण कितीही झालं तरीही ब्लॉगर्सना "काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करणारे, टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडणारे, बोरिंग लिहिणारे, तेचतेच लिहिणारे, वैचारिक दिवाळखोरी असणारे, अनुभवांची/कल्पनांची वानवा असणारे, दर्जाहीन लिहिणारे" अशा पदव्या बहाल करणार्‍यांचं मराठी ब्लॉग किंवा एकूणच मराठी संस्थळांवरचं किंवा मराठी भाषेकरता दिलेलं योगदान काय आणि किती आणि तरीही अशी अपमानास्पद विशेषणं वापरण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले हे प्रश्न उरतातच !!

87 comments:

  1. हेरंब
    सगळे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेस.

    कोणाला दुखवायची इच्छा नाही, पण मलाही त्या संकेत स्थळावर दिलेले बरेच मुद्दे खटकले- आणि ते सगळं वाचलं, आणि खूप अस्वस्थ झालं. एकदा वाटलं की लिहावं यावर काहीतरी. पण तेवढ्यात तुझा हा लेख वाचनात आला.

    त्या कॉमेंट्सला प्रत्युत्तर द्यावं कां? असाही विचार मनात आला होता एकदा, पण सोडून दिलं, कारण एकदा लिहायला लागलो की माझा स्वतःवर ताबा रहात नाही. म्हंटलं जाउ दे नाहीतर उगीच तिथे पुन्हा महाभारत सुरु व्हायचं.

    विनाकारण पुलं सारख्या लोकांवर पण कॉमेंट करण्याइतकं स्वतःला मोठं समजणारे लोकं पाहीले, आणि त्यांच्या मानसिक खुजेपणाची साक्ष पटली. अशा लोकांच्या प्रतिक्रियांना किती किम्मत द्यायची हे पण आपलं आपण ठरवायचं असतं.

    ब्लॉग वर नियमीतपणे लिहिणे म्हणजे कुठल्यातरी पोस्ट वर प्रतिक्रिया देण्या इतके सोपे नाही. मग ते जरी दररोजच्या जीवनातले अनुभव जरी असले तरीही शब्द बध्द करणे अवघड असते.

    या सगळ्या उलट सुलट प्रतिक्रिया देणाऱ्यांना एक सांगतो....उंटावरुन शेळ्या हाकणं आता खूप झालं. स्वतः लिहून पहा ब्लॉग वर , आणि सहा महिने जर स्वतःला दररोज २५० ते३०० शब्दांचा लेख लिहू शकला तर माझ्या तर्फे एक हजार रुपयांची पुस्तकं बक्षीसं देईन मी!

    जेंव्हा स्वतः काही लिहाल, तेंव्हा लक्षात येईल की एखाद्या संकेत स्थळावर जाउन प्रत्येक पोस्ट वर जाउन आपल्या मतांच्या उलट्या काढण्या इतकं सोप्ं नाही ते..

    स्वतःचं नांव लपवून टोपण नांवं घेउन ज्यांची खरी खुरी व्यक्तिमत्व आहेत अशा लोकांवर असे बाष्कळ कॉमेंटस लिहिणारे असे लोकं माझ्या डोक्यात जातात , माझ्या दृष्टीने हे असे लोकं लक्ष देण्याच्या योग्यतेचे पण नाही.

    ReplyDelete
  2. काका, अगदी चपखल उपमा. या यांच्या मतांच्या उलट्याच आहेत.. ब्लॉगवर रोज जाउद्या पण नियमित लिहिणंही किती अवघड आहे हे फक्त ब्लॉग लिहिणारेच समजू शकतात. आणि असं नियमित लिहिताना दररोजच्या आयुष्यातले अनुभव जर आले ब्लॉगवर तर बिघडलं कुठे? ब्लॉग हे माध्यम अजून एवढं नवीन आहे की त्यावर काहीही पण नियमित लिहिलं गेलं तरी ते कौतुकास्पद आहे किंवा निदान लक्षणीय आहे. निदान त्यावर पातळी सोडून गलिच्छ भाषेत टीका तरी होऊ नये इतकीच माफक अपेक्षा.

    >> या सगळ्या उलट सुलट प्रतिक्रिया देणाऱ्यांना एक सांगतो....उंटावरुन शेळ्या हाकणं आता खूप झालं. स्वतः लिहून पहा ब्लॉग वर , आणि सहा महिने जर स्वतःला दररोज २५० ते३०० शब्दांचा लेख लिहू शकला तर माझ्या तर्फे एक हजार रुपयांची पुस्तकं बक्षीसं देईन मी!

    हा हा .. जबरी !!! काका, मी तुम्हाला १०१% सांगतो की तुमचे १००० रुपये वाचले. लिहून ठेवा. सलग सहा महिने काय यातल्या कोणी सलग सहा दिवस जरी ...... !!! असो..

    समोरच्याच्या गुणांचं कौतुक करता आलं नाही तरी निदान त्याला नावं ठेवण्याऐवजी त्याच्या मतांचा आदर करायला शिकतील लोक तोच सुदिन !!!

    ReplyDelete
  3. महेंद्रजींच्या प्रतिक्रियेला १००% अनुमोदन....

    हेरंब अगदी व्यवस्थित मुद्दे मांडले आहेस... आणि सगळ्यांचे प्रातिनिधिक उत्तर दिलेस त्या ढीगभर कमेंट्स ना त्याबद्दल अभिनंदन आणि आभार.....

    ReplyDelete
  4. चांगल्या पद्धतीनं लिहीलं आहेस...
    मराठी ब्लॊगिंग करणार्‍या सगळ्यांची (नसली समजा, तरी बरयाच प्रमाणात) प्रातिनिधिक मतं आहेत.

    या बाबतीत अजुन एक मुद्दा मात्र मांडलाच पाहिजे.
    काही ब्लॊगर्स आहेत, जे "आपण सगळे ब्लॊगर्स म्हणजे साहित्यिक जणु" अशा विचाराचे आहेत हां. मला स्वत:ला तरी हे पटत नाही.


    <>
    या बद्दल दुसरयाच एका चर्चेमधे आलेला मुद्दा: -
    एकजण: तुम्ही टीका करता, स्वत: लिहुन दाखवा...
    दुसरा: "तेंडुलकरवर टीका करण्यासाठी मला तेंडुलकरसारखं क्रिकेट खेळता आलंच पाहिजे असं नाही. "
    --> हे नाकारता नाही येणार... पण इथं मग, तेंडुलकरदेखिल कोणाच्या प्रतिक्रियेला उत्तर देणार हे ठरवतो. (तेंडुलकर हे त्या उदाहरणात आलेलं म्हणुन इथं लिहीलं.. )

    <>
    हे बरोब्बर! इतकीच माफ़क अपेक्षा आहे..
    उगाच "संभाजी ब्रिगेडगिरी" कशाला?

    ReplyDelete
  5. आभार तन्वी. त्या प्रतिक्रिया बघून डोकं फिरलं होतं. तरीही अजिबात वैयक्तिक हल्ले न करता फक्त मतं खोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

    ReplyDelete
  6. aayalaa... te nusate kans ka alet mi lihile tithe? :O atala majakur uDalay. :(

    ReplyDelete
  7. आभार ऋयाम..

    मला खात्री आहे की कदाचित ही अगदी प्रातिनिधिक नसली तरी ९५% [ ;) ] ब्लॉगर्सची मतं तरी नक्की असतील ...

    तेंडूलकरचं उदाहरण वरवर योग्य वाटत असलं तरी त्यात एक मेख आहे. कुठलाही ब्लॉगर इथे स्वतःला (ब्लॉगींग विश्वातला) तेंडूलकर काय साधा साबा करीमही समजत नाहीये. असो..

    आणि त्या 'साहित्यिक' वाल्या मुद्द्याबद्दल तुझ्याशी १०१% सहमत. स्वतःला साहित्यिक मानणारे कोणी ब्लॉगर्स असतीलही कदाचित मला कल्पना नाही (आणि हे चूक/बरोबर हे ज्याचं त्याने ठरवायचं. मला स्वतःला ते मुळीच मान्य नाही.). पण मी स्वतः (आणि माझ्या माहितीतले अनेक ब्लॉगर्सही) स्वतःला साहित्यिक वगैरे अजिबात समजत नाही. फक्त आणि फक्त ब्लॉगरच समजतो.. !! :)

    ReplyDelete
  8. कुठले कंस रे? सगळा मजकूर व्यवस्थित दिसतोय की.. तू अजून काही लिहिलं होतंस का?

    ReplyDelete
  9. तुमची ही नोंद मी www.globalmarathi.org या साईटवर टाकत आहे.

    कृपया आपण हे वाचल्यानंतर इकमेकांशी बोलू यात. मह मी ते करेन. आपला मेल नसल्याने इथे ही प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे.

    सुभाष इनामदार.पुणे

    www.subhashinamdar.blogspot.com
    subhashinamdar@gmail.com
    9552596276
    तुमच्या उत्तराची, फोनची वाट पहातोय. धन्यवाद.

    ReplyDelete
  10. कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना....
    हे होतच राहणार...त्यामुळे त्यात विशेष असं काही नाही....
    आपल्याला वाटेल तसं आणि जमेल तसं लिहीत जावं....
    पुलंच्या भाषेत सांगतो[पुन्हा पुलं आलेच का? ;) ]
    पुराणिकबुवांनी पुराण सांगत जावे...कोण ऐकायला आहे की नाही ह्याची काळजी करू नये. :D

    ReplyDelete
  11. सुभाषजी, चालेल. हा लेख तुमच्या साईटवर टाकण्यास माझी काही हरकत नाही. आभार !

    ReplyDelete
  12. काका, लिहीत तर राहणारच आहोत आपण. फक्त काळ सोकावता कामा नये यासाठी हा पत्रप्रपंच. कोणीही यावं आणि टपली मारून जावं हे खपणार नाही हा निरोप पोचला की आपलं काम झालं.

    ReplyDelete
  13. माफ करा पण तुमच्या लेखात मला जास्त चिडचिडच दिसली. थोडीफार मायबोली या संकेतस्थळाची खिल्ली उडवण्याचा प्रकारही वाटला.
    जे लिखाण येतं/ वाचायला मिळतं त्यामधे तेच ते पणा आहे. एका ठराविक मर्यादेच्या पलिकडे जाणारं नाही. असं वाटल्यास ते म्हणणं कसं काय चुकीचं ठरतं मला समजण्याच्या पलिकडे आहे.
    हे नवीन माध्यम आहे पण म्हणून ते वाढत जाताना त्याकडून काहीच अपेक्षा ठेवायच्या नाहीत ही अपेक्षाही अनाकलनीयच.
    पुलं तुमच्यालेखी ग्रेट होते म्हणून इतर कुणीच पुलंच्या कुठल्याच लिखाणाबद्दल एकही विरोधी उदगार काढायचा नाही. आणि तसा काढल्यास त्या माणसाची वैयक्तिकरित्या लायकी काढण्याइतके तुम्ही मोठे आहात असा तुमचा समज हाही माझ्या दृष्टीने अनाकलनीय.
    >>आणि सहा महिने जर स्वतःला दररोज २५० ते३०० शब्दांचा लेख लिहू शकला<<
    हा वैविध्यपूर्ण आणि चांगल्या लिखाणाचा क्रायटेरीया असेल तर बोलणंच खुंटलं. पैज म्हणून रोज २५०-३०० शब्द पाडणं अजिबात अवघड नाहीये तेवढा वेळ हाताशी असेल तर. पण मग ते रोजचे रोज पाडलेलं दळण कुणाला आवडलं नाही तर रोज लिहितो त्यावर काही बोलायचं नाही असं म्हणणार का?
    म्हणजे थोडक्यात आम्ही जे लिहितो त्यावर चांगलंच म्हणलं गेलं पाहिजे. नाहीतर बोलणारे जे आहेत त्यांची कुवत काढू. आमच्या आदरस्थानांबद्दल तुम्हालाही आदर असलाच पाहिजे नाहीतर तुमची लायकी काढू. असा दहशतवादच झाला की हा. ह्यालाच जास्त ब्रिगेडी म्हणावं लागेल नाही का?

    वरती संदर्भ काढून चिकटवलेल्या प्रतिक्रियांच्यामधे कुणीही हे लिहू नका, ते लिहू नका म्हणालेलं नाही. ते सगळे जण त्यांना काय आवडत नाही, त्यांना काय वाचायचा कंटाळा येतो याबद्दल बोलतायत. जे लिहिलं जातंय त्याच्या पलिकडे जायला हवं अशी अपेक्षा करतायत. आणि तुम्ही या लेखात त्यांची लायकी, कुवत इत्यादी काढताय.

    मायबोली या संकेतस्थळाला निष्कारण नावं ठेवायचा प्रयत्न करणारी ही पोस्ट अनबायस्ड आहे असं जे म्हणतायत त्यांनी मेळाव्यात ’थोडक्यात ओळख’ हा नियम खरंच पाळला होता का हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा नाही का?

    असो...

    ReplyDelete
  14. Heramb dada, tuze he mat marathi bloggers che pratinidhik mat manayala harkat nahi...( Nidan maze tari asach mat aahe..)
    Tuza lekh mala (tari) poornta vichari vaatala.
    Hya babtit maze svatache mat ase aahe ki, Aamache likhan taakau, vaait, koopmandukya vruttiche aahe he kase tharavale gele buva...? Aani changale, tikaau likhan mhanun tumacha jo क्रायटेरीया aahe tya pramaane ch aamhi lihile tar te changale tharnaar ka...??? We are not chefs to serve the people what they want...We are bloggers(Sahityik vaigare nahi haan). Aamhanla jyachyawar aani jase lihavase vatate tase aamhi lihito, Aamchya nikhal aanandasathi...!!!
    Aaju bajula ghadanaarya ghatananwar aamhala mat mandayache aste , aamache man mokale karayache aste...sagale manaat thevun ajirn karun gheun itaranchya likhana war "matanchya ulatya" kadhanya peksha he barr nai ka...? ;)

    ReplyDelete
  15. नीरजा
    "पैज म्हणून रोज २५०-३०० शब्द पाडणं अजिबात अवघड नाहीये तेवढा वेळ हाताशी असेल तर. पण मग ते रोजचे रोज पाडलेलं दळण कुणाला आवडलं नाही तर रोज लिहितो त्यावर काही बोलायचं नाही असं म्हणणार का? "

    यावर एकच सांगावंसं वाटतं की जर दररोज एखाद्या विषयावर आपलं भाष्य लिहिणं इतकं सोपं आहे तर कोणी तरी अवश्य प्रयत्न करावा. मी हजार रुपयांची पुस्तके बक्षीस नक्कीच देईन.

    एखादा लेख लिहायला फार तर पाउण तास लागतो असा माझा अनुभव आहे. त्यामूळे दररोज तेवढा वेळ नक्कीच काढला जाऊ शकतो. न लिहिण्यासाठी वेळ नाही हे कारण देणे काही पटण्यासारखे नाही.

    एखादा लेख आवडला नाही तर नक्कीच त्यावर आवडला नाही, मुद्दे पटले नाहीत अशी कॉमेंट टाकली जाउ शकते. पण ब्लॉग न वाचता, सरसकट सगळ्याच ब्लॉगर्सना एकाच तराजूत तोलणे , आणि त्या बद्दल सरसकट सगळ्य़ा ब्लॉगर्सची लायकी काढणे कितपत योग्य आहे?

    पुलंच्या लिखाणाबद्दल जे काही लिहिलंय ते वैय्यक्तीक रित्या मला पण मान्य नाही.एखाद्याने उगिच उठावे आणि सरळ पुलंच्या वर कॉमेंट करावी हे म्हणजे अती होतंय असे वाटत नाही कां? पुलंचं लिखाण आवडत नसेल तर ठिक आहे, आग्रह नाही. पण ... असो...

    आभाळाकडे पाहून थुंकल्यावर स्वतःचा चेहेरा खराब होणारच, हे तशी कॉमेंट करणाऱ्याने लक्षात घ्यायला हवे होते.

    अशा बिना नावाच्या फेसलेस लोकांच्या कॉमेंट्स ला मी अजिबात किंमत देत नाही. स्वतःचे नांव लपवून केलेल्या अशा कॉमेंट्स तर कोणीही करू शकते.

    ReplyDelete
  16. एखादा लेख लिहायला फार तर पाउण तास लागतो असा माझा अनुभव आहे. त्यामूळे दररोज तेवढा वेळ नक्कीच काढला जाऊ शकतो. न लिहिण्यासाठी वेळ नाही हे कारण देणे काही पटण्यासारखे नाही.<<
    इथेच आपल्यात मतभेद आहेत. मला तरी एक लेख लिहायला (काहीतरी जाणवणे, सुचणे, लिहावेसे वाटणे, अभ्यास, मुद्दे, विस्तार, टाइप करणे या सगळ्यासकट) किमान ५-६ तास लागतात. केवळ पाउण तासात वेळ देऊन केलेले लिखाण हे पोस्ट पाडणे यापलिकडे जात नाही. वेळाचे कारण अतिशय महत्वाचे आहे. असो.

    >>पण ब्लॉग न वाचता, सरसकट सगळ्याच ब्लॉगर्सना एकाच तराजूत तोलणे , आणि त्या बद्दल सरसकट सगळ्य़ा ब्लॉगर्सची लायकी काढणे कितपत योग्य आहे?<<
    न वाचताच हा आरोप जरा अतिरंजित होतोय. जेवढे ब्लॊग्ज त्या प्रत्येकाने वाचले आहेत त्यातले ९५% टक्के कंटाळवाणे किंवा तेच ते पठडीतले वाटले असतील त्यांना तर ते न वाचताच बोलताय हे तुम्ही कुठून काढले? ब्लॊगर्सची लायकी बियकी कोणी काढलेली नाही. लिखाणाबद्दलचं मत आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. यात लिहिणारा प्रत्येक जण स्वत:लाही त्यात गणतो आहे. स्वत:ची भलावण कोणीच केलेली नाही. तेव्हा बोट स्वत:कडेही दाखवले गेले आहे माझ्यासकट आक्षेप घेणारे जे सगळे आहेत त्यांचे.

    >>पुलंच्या लिखाणाबद्दल जे काही लिहिलंय ते वैय्यक्तीक रित्या मला पण मान्य नाही.<<
    ते तुमचं वैयक्तिक मत झालं.
    >>एखाद्याने उगिच उठावे आणि सरळ पुलंच्या वर कॉमेंट करावी हे म्हणजे अती होतंय असे वाटत नाही कां?<<
    अति होण्यासारखं काय आहे यात? पुलंच्या लिखाणाचा कंटाळा येऊच नये असा कायदा आहे की काय? पुलंनी जे लिहिलं ती स्टाइल कॊपी करून दळण घालणारे कमी आहेत की काय? पुलंनी जेव्हा लिहिलं तेव्हा ते नवं होतं आधी तसं कुणी लिहिलं नव्हतं आणि इतरांकडून तेच तेच झाल्यावर त्याचा ताजेपणा, नवेपणा संपला आणि तेच तेच दळण झालं हे मत तुम्हाला पटलं नसलं तरी ते व्यक्त करणं म्हणजे अती बिती किंवा व्यक्त करणाऱ्याची लायकी काढणे इत्यादी हा तर ब्रिगेडी प्रकारच की.
    >>आभाळाकडे पाहून थुंकल्यावर स्वतःचा चेहेरा खराब होणारच, हे तशी कॉमेंट करणाऱ्याने लक्षात घ्यायला हवे होते.<<
    जे तुम्हाला आभाळ वाटतेय ते सगळ्यांना वाटेलच असे नाही हे का लक्षात येत नाहीये?

    >>अशा बिना नावाच्या फेसलेस लोकांच्या कॉमेंट्स ला मी अजिबात किंमत देत नाही. स्वतःचे नांव लपवून केलेल्या अशा कॉमेंट्स तर कोणीही करू शकते.<<
    मुळात वरती चिकटवलेल्या बहुतांश कॊमेंटसचे कर्ते हे मायबोलीवर आपापल्या नावासकट बहुतांश लोकांना परिचयाचे आहेत. तसेच हे इंटरनेटचे जग आहे. अर्ध्याहून अधिक ब्लॊगर्स फेसलेसच आहेत की. आणि जे लोक एका विशिष्ठ नावाने लिहितात तेव्हा त्या प्रत्येकाच्या वास्तवातल्या नावाची खात्री करून घेणे हे कुणालाच शक्य नसते. तेव्हा फेसलेस कॊमेंटस इत्यादीमधे काही अर्थ नाही.

    आणि खरंच तुम्ही या प्रतिक्रियांना किंमत देत नसाल तर कशाला एवढी आगपाखड? कशाला त्यांची लायकी बियकी काढायची?

    ReplyDelete
  17. नीरजा,

    सर्वप्रथम मी माझ्या लेखात तुमच्या लेखाला/मतांना काहीही म्हटलेलं नाही. उलट (१-२ मुद्दे वगळता) तुमची मतं पटली असंच म्हंटलं आहे. माझा आक्षेप होता तो ब्लॉगर्सची अक्कल काढणार्‍या, त्यांच्या लिखाणाला बौद्धिक दिवाळखोरी म्हणणार्‍या, प्रतिभेची वानवा असल्याचे आरोप करणार्‍या एकांगी, आक्रस्ताळ्या आणि म्हणूनच उथळ असणार्‍या प्रतिक्रियांना. आणि तसं मी ठसठशीतपणे लिहिलंही आहे. पण तुम्ही असे एकांगी आरोप करून लिहिणार्‍यांची पाठराखण करून त्यांची ती आक्षेपार्ह भाषा कशी योग्य आहे हे पटवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची मतंही तशीच होती फक्त तुम्ही तुमच्या लेखात स्पष्टपणे लिहिण्याचं धाडस केलं नाहीत असा अर्थ काढायचा का? पुन्हा सांगतो. माझा वैयक्तिक कोणावरही आक्षेप नाही, आक्षेप आहे तो त्यांच्या मतांवर. आणि तुमचीही मतं त्यांच्यासारखीच असतील तर माझ्या लेखात लिहिलेले सगळे मुद्दे तुम्हालाही लागू होतात असं म्हणावं लागेल.


    >> माफ करा पण तुमच्या लेखात मला जास्त चिडचिडच दिसली.
    कोणीही उगाच मराठी ब्लॉगर्सची अनाठायी अक्कल काढत असेल तर चिडचिड होणारच. तरी मी तुमच्या मित्र-मैत्रिणींप्रमाणे पायरी सोडून टीका केलेली नाही हा तपशील तुम्ही सोयीस्करपणे विसरताय.

    >> थोडीफार मायबोली या संकेतस्थळाची खिल्ली उडवण्याचा प्रकारही वाटला.
    माझ्या लेखात फक्त सुरुवातीला एकदा तुमच्या लेखाचा उल्लेख करताना आलेला मायबोलीचा उल्लेख सोडून मी इतर कुठेही तो शब्दही साधा उच्चारलेला नाही. मला मायबोलीची खिल्ली उडवायची अजिबात इच्छा नाही. ते करताहेत ते काम खूप मोठं आहे. पण त्यामुळे मायबोलीवरचे (काही) सभासद आपल्याला जगाला काहीही बोलायचा अधिकार आपसूकच मिळतो असं गृहीत धरत असतील तर त्यावर टीका होणारच. तुम्हाला खिल्ली वाटते इतरांना मतप्रदर्शन वाटू शकतं. तुम्हाला काय वाटावं आणि वाटू नये यांवर माझं बंधन नाही.


    >> जे लिखाण येतं/ वाचायला मिळतं त्यामधे तेच ते पणा आहे. एका ठराविक मर्यादेच्या पलिकडे जाणारं नाही.
    >> हे नवीन माध्यम आहे पण म्हणून ते वाढत जाताना त्याकडून काहीच अपेक्षा ठेवायच्या नाहीत का?

    आणि

    >> अनुभवांची/कल्पनांची वानवा
    >> वैचारिक दिवाळखोरी
    >> इतकं बोरिंग झालंय मराठी ब्लॉगविश्व.. काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करायचे! किंवा चक्क टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडायचे..
    >> त्यात प्रतिभेची वानवा.
    >> इथे तर ते ही मॉडरेशन नाही!

    'आणि' च्या वर लिहिलेली दोन मतं तुम्ही तुमच्या लेखातही लिहिली आहेत. आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या लेखावर आणि तुमच्या सौम्यपणे मत मांडण्याच्या पद्धतीवर आक्षेप नव्हताच.
    पण तीच मतं आपण महान बुद्धिजीवी आहोत, मराठी ब्लॉग लिहिणारे तुच्छ आहेत अशा उघड उघड भावनेतून व्यक्त होऊन ब्लॉगर्सच्या अकला आणि प्रतिभवर प्रश्नचिन्ह उमटवायला लागल्या की 'आणि' च्या नंतरची वाक्य जन्माला येतात. तुम्हाला स्वतःला 'आणि' च्या आधीची बाजू पटते की नंतरची हे तुम्हीच ठरवा.

    ReplyDelete
  18. Continued

    >> पुलं तुमच्यालेखी ग्रेट होते म्हणून इतर कुणीच पुलंच्या कुठल्याच लिखाणाबद्दल एकही विरोधी उदगार काढायचा नाही. आणि तसा काढल्यास त्या माणसाची वैयक्तिकरित्या लायकी काढण्याइतके तुम्ही मोठे आहात असा तुमचा समज हाही माझ्या दृष्टीने अनाकलनीय.

    तुमचा प्रचंड गोंधळ झालाय किंवा तुम्ही मुद्दाम मी कधीही न उच्चारलेले शब्द पुन्हा पुन्हा माझ्या तोंडात कोंबताय. मी कधीही कोणाचीही लायकी काढलेली नाही. मी शिवराळ आणि पातळी सोडून झालेल्या भाषेतल्या प्रतिक्रिया फक्त इथे चिकटवल्या. आणि त्या मला कशा अमान्य आहेत ते सांगितलं.

    >> ब्लॊगर्सची लायकी बियकी कोणी काढलेली नाही.

    तिथे आलेल्या भयानक प्रतिक्रिया बघून ब्लॉगर्सची लायकी काढली नाह्ये तर मग काय केलं आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला?

    >> न वाचताच हा आरोप जरा अतिरंजित होतोय.

    तिथे काही प्रतिक्रियांमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की "एवढे ब्लॉग्स आहेत. रोज कोण वाचणार एवढे ब्लॉग्स?" किंवा "आता इतकी प्रचंड गर्दी आलीय की निसटले जाते हे लिखाण" किंवा "दहा लोकांचे दहा ब्लॉग उघडुन आज काय नविन आलय हे चेक करण्यापेक्षा मायबोली वरुन फेरफटका मारणे मला अधिक सोयिस्कर वाटते" .. अजून किती पुरावे हवेत हा आरोप अतिरंजित नाहीये हे सिद्ध करायला?????

    >> म्हणजे थोडक्यात आम्ही जे लिहितो त्यावर चांगलंच म्हणलं गेलं पाहिजे. नाहीतर बोलणारे जे आहेत त्यांची कुवत काढू. आमच्या आदरस्थानांबद्दल तुम्हालाही आदर असलाच पाहिजे नाहीतर तुमची लायकी काढू.

    हा आरोप मात्र नक्कीच अतिरंजित होतोय. ब्लॉगर्सच्या लेखांना चांगलंच म्हणाच असं मी कुठेही म्हटलेलं नाही. माझा पुनःपुन्हा असलेला आक्षेप हा त्या टीकेतल्या पातळी सोडून वापरल्या गेलेल्या भाषेला आहे. मला त्या लोकांसारखी टीका करायची असती तर मीही मायबोलीवर दुगाण्या झाडल्या असत्या आणि तिथल्या सभासदांची अक्कल काढली असती. पण मी माझा आक्षेप कोणाचीही लायकी न काढता स्वच्छ शब्दात नोंदवलेला आहे. फरक येतोय का लक्षात??

    ReplyDelete
  19. Continued

    >> वरती संदर्भ काढून चिकटवलेल्या प्रतिक्रियांच्यामधे कुणीही हे लिहू नका, ते लिहू नका म्हणालेलं नाही. ते सगळे जण त्यांना काय आवडत नाही, त्यांना काय वाचायचा कंटाळा येतो याबद्दल बोलतायत. जे लिहिलं जातंय त्याच्या पलिकडे जायला हवं अशी अपेक्षा करतायत. आणि तुम्ही या लेखात त्यांची लायकी, कुवत इत्यादी काढताय.

    या वाक्यातल्या लायकी आणि कुवत वाल्या प्रश्नाला १० वेळा उत्तरं दिली आहेत वर. पण "संदर्भ काढून चिकटवलेल्या" चा अर्थ काय बरं? मी क्रिकइन्फो संस्थळावर "धोनी चांगला कसा खेळत नाही" या चर्चेतल्या प्रतिक्रिया इथे चिकटवलेल्या नाहीत. तुमच्या लेखाखाली आलेल्याच प्रतिक्रिया आहेत त्या.. म्हणून मी मुद्दाम '>>'च्या सकट प्रतिक्रिया घेतली आहे आणि तसं स्पष्ट लिहिलंही आहे.

    >> मायबोली या संकेतस्थळाला निष्कारण नावं ठेवायचा प्रयत्न करणारी ही पोस्ट अनबायस्ड आहे असं जे म्हणतायत.

    शर्मिला फडके यांनी जे लिहिलं आहे तेच अधिक विस्ताराने मी लिहिलं आहे. पण शर्मिला फडके यांच्या प्रतिक्रियेला तुम्ही अनुमोदन दिलं आहेत.. आठवतंय?? हे वाचा."शर्मिला, arc आणि रैना उत्तम पोस्टस."
    पण माझ्या लेखाशी मात्र असहमत आहात. या विरोधाभासाचं कारण कळलं नाही. पुन्हा सांगतो माझ्याशी असहमत आहात हा मुख्य मुद्दा नाही. पण "असंच मत व्यक्त केलेल्या शर्मिला फडके यांच्याशी सहमत मात्र माझ्या लेखाशी असहमत" हा मुद्दा आहे. कोण बायस्ड आणि कोण अनबायस्ड याचा याच्यापेक्षा ढळढळीत पुरावा काय देऊ?

    >> त्यांनी मेळाव्यात ’थोडक्यात ओळख’ हा नियम खरंच पाळला होता का हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा नाही का?

    या मुद्द्यावर आक्षेप नव्हताच. तो मुद्दा पटला होताच. तुम्हाला या मुद्द्यावर आक्षेप कुठे दिसला??

    आणि तुमच्या बाकीच्या प्रश्नांना महेंद्रकाकांनी उत्तरं दिलेली आहेतच. लेख लिहायला एखाद्या व्यक्तीला ५-६ तास लागतात एखाद्या व्यक्तीला पाऊण तास पुरतो. त्यालाही तुमचा आक्षेप आहे का? लेख लिहायला किती वेळ लागतो यावरून लेखाचा दर्जा का आणि कसा ठरवायचा?

    पुलं, (किंवा सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर) आणि त्यांच्यासारखीच हिमालयाएवढी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेली यांना त्यांच्या कलेवरून/गुणांवरून नावं ठेवणार्‍यांविषयी माझं एकच मत आहे की तो फक्त विरोधासाठी विरोध आहे. इतर लाख लोक कौतुक करताहेत न त्यांचं मग मी नावं ठेवणार. तेवढाच जरा प्रवाहापासून वेगळा राहणारा असा शिक्का मारून आणि मिरवून घेता येतो.

    असो. ही माझी (तुमच्या प्रतिक्रियेला) शेवटची प्रतिक्रिया. मी मला काय वाटतंय आणि काय म्हणायचंय हे लेखात आणि माझ्या प्रतिक्रियांमध्ये स्वच्छ लिहिलं आहे. तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल/नसेल हा तुमचा प्रश्न आहे. पण समजून घेऊनही मुद्दाम विरोधासाठी टाकल्या जाणार्‍या प्रतिक्रियांना उत्तरं देण्याएवढा अनाठायी वेळ माझ्याकडे नाही.

    जय ब्लॉगिंग !!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  20. मैथिली आभार..

    >> Hya babtit maze svatache mat ase aahe ki, Aamache likhan taakau, vaait, koopmandukya vruttiche aahe he kase tharavale gele buva...? Aani changale, tikaau likhan mhanun tumacha jo क्रायटेरीया aahe tya pramaane ch aamhi lihile tar te changale tharnaar ka...???

    अगदी अगदी हेच म्हणतोय मी. किती वेळ हेच समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. लेखातही आणि प्रतिक्रियेतही. पण उगाच विरोधासाठी विरोध करणा-यांना समजून घ्यायचंच नसतं. असो.

    >> We are bloggers(Sahityik vaigare nahi haan).

    Exactly.. आपण स्वतःला साहित्यिक समजत असतो तर कामधंदे सोडून देऊन पुस्तकंच पाडत बसलो नसतो का???? But we know our boundries. Thankfully and happily !!!

    कोणी काय लिहावं आणि काय लिहू नये हे ठरवणारे हे कोण? आणि तेही एवढ्या खालच्या पातळीवर उतरून??? कमाल आहे !!

    ReplyDelete
  21. काका,

    "अतिरंजित, टीका, मोठी व्यक्तिमत्व, चांगल्या लिखाणाचे निकष" या सगळ्याच्या व्याख्या वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया मांडणार्‍या लोकांत आणि आपल्यात मतभेद हे असणारच. तेव्हा .... असो !!!

    ReplyDelete
  22. अनुभवाने ९९% लोक सहमत असतील यात शंका नाही, आपण बिनधासपणे लिहित राहावे,

    ReplyDelete
  23. वटवट सत्यवाना,
    अरे तू मांडलेली जवळजवळ सगळीच मतं प्रातिनिधिक आहेत आणि योग्यही आहेत. पण ऋयाम म्हणतो तशागत "सचिनवर टीका करण्यासाठी सचिनसारखं खेळणं आवश्यक नाही." हे पटतं मला. पण एक गोष्ट इथे ध्यानात घेतली पाहिजे. ती म्हणजे ब्लॉगर्सवर इतक्या प्रतिक्रिया मिळण्याचा अर्थच हा की आपली दखल बर्‍याच मोठ्या समुदायाने घेतली आहे, हा आपला विजयच म्हणायचा.
    आणि नीरजाताई, तुम्ही म्हणता तशागत असेलही चिडचिडीचा भाग थोडा, पण तो का असू नये? जर अश्या भाषेमध्ये निरर्थक टीका केली गेली तर जळजळीत प्रत्युत्तराची अपेक्षा का नसावी आणि पुन्हा जर दिलेले सगळे सल्ले जरी एकवेळ मान्य केले, तरी त्या सगळ्याच्या पलीकडे ब्लॉगविश्व फार मोठं आहे ह्याची ह्या अनाहूत सल्लेकरांना कल्पना नाही कारण त्यांनी मागणी केलेला प्रत्येक प्रकार ब्लॉगर्स हाताळतात आणि तोसुद्धा स्वांतसुखाय, कुठल्याही व्यावसायिक इच्छेशिवाय.
    पुन्हा जर सल्लेकर्‍यांचं स्वतःच्या आवडीनिवडी मानण्याचं स्वातंत्र्य मान्य केलं, तरी वापरली गेलेली भाषा आक्षेपार्ह नाही वाटत का?
    बाकी कुठल्याही एका संस्थळाची खिल्ली उडवली गेल्याचं मला तरी जाणवलं नाही, जाणवली तर एक कळकळ आणि आपल्याच माणसांमुळे दुखावलं गेलेलं मन!

    ReplyDelete
  24. संग्राम पाटीलMay 22, 2010 at 2:24 PM

    निरजाबाई
    एक सिनेमा काय चालला नशिबाने त्याचीच पुंगी वाजवत असता तुमी. किति दिवस खानार हो त्या श्वासाचि पुन्याई?
    तुमी म्हणे ड्रेस डीजाइन केला . म्हंजे काय केल ते समजलेच नाही. खाकी चड्डी अन पांढरा मळका शर्ट ,धोतर टोपी म्हंजे ड्रेस डीजाइन म्हंणटा का तुमी त्याला?मी ब्लोग लिहित नाहि पण माबो पेक्षा ब्लोग वरच जास्त चांगल वाचायला मिळते.
    आजचे माबो चे नविन लिखान पहा म्हणजे तुम्हाला समजेल किती खराब लिहितात लोक.
    त्या बाथे चा ब्लोग तर एकदम थर्डक्लास आहे. एकही पोस्ट धड नाही. तुम्हाला तो ब्लोग आवडला - धन्य हो तुमची.

    ReplyDelete
  25. ३रया वेळेस टाकत आहे आता...

    अरे अरे कशाला भांडत बसलाय ...ज्याला जे वाचायचं आहे त्याने ते वाचव ...अन ज्याच आवडलं नाही त्याला(च) चांगल्या (शिवराळ नव्हे) भाषेत प्रतिक्रिया द्यावी...अन जर कोणाच लेखन आवडल तर त्याला(च)
    चांगल्या (शिवराळ नव्हे) भाषेत प्रतिक्रिया द्यावी...असो...९५ % (अबब कमाल आहे तुम्ही १००% ब्लोग वाचता )ब्लोगर जर खराब लिहीत असतील तर तुम्ही ते वाचू नका तुम्हाला कोणीही आवतन दिल नाही ते वाचायला या म्हणून..पण म्हणून सर्वना दोषी ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही..

    वटवटा झाल तेवढ पूरे झाल..उगाच आपल(पण) डोक कशाला खराब करून घेतो...
    एक झक्कास पोस्ट टाक ५* वाली....

    ReplyDelete
  26. हेरंब ही पोस्ट खरच बहुतेक सगळ्याच ब्लॉगर्सची प्रातिनिधिक मत मांडणारी आहे.म्हणुन सर्वप्रथम ही पोस्ट लिहल्याबद्दल आभार.आम्हाला वाटते ते आम्ही लिहतो कोणावर जबरदस्ती तर नाही ना करत ज्याला वाचायच त्यांनी वाचाव आणी वाटल्यास योग्य ती प्रतिक्रिया द्यावी.मी माझ्या ब्लॉगवर माझी ओळख करतांनाही लिहल आहे "वेळ मिळेल तेव्हा मनाला वाटेल ते इथे लिहावे जरी कोणी नाहीच वाचले तर आपण तरी वाचू आपल मन या ब्लोगद्वारे" बस आणखी काही अपेक्षा नाही माझी.आणि मला खात्री आहे माझ्यासारखे असेच इतरही बरेच ब्लॉगर्स असतील जे फ़क्त स्वांतसुखाय म्हणुनच लिहतात ब्लॉग.मग आमच्यासारख्यांनी ब्लॉग लिहण सोडुन दयायच का तुमच्या सो कॉल्ड ’ब्लॉगिंगच्या कक्षा रुंदावण्यासाठी’...तसही ते काम सुदधा होत आहे मराठीब्लॉग विश्व वर नियमीत येणारया पोस्टसमधील विविधता पाहिली कि लक्षात येइल ते...बाकी पोस्ट किति वेळात लिहली हयावर त्या पोस्टचा दर्जा नक्कीच ठरवला जाउ शकत नाही...ज्यांना वाटत ब्लॉगींगमध्ये तोच तो पणा आला आहे त्यांनी स्वत: ब्लॉग सुरु करुन नविन काही तरी करुन दाखवावे मग बोलावे नुसते हवेत बाण मारुन काय उपयोग...विषय,घटना जरी सारख्या असल्या तरी प्रत्येकजण त्याच्या नजरेतुन ते मांडत असतो...उगाच आपण खुप प्रगल्भ असल्याचा आव आणत दुसर्यांना नाव ठेवण्यापेक्षा त्यांच्यासमोर आपल्या अपेक्षा योग्य शब्दात मांडाव्यात किंवा त्यासंदर्भात स्वत:च काही भरीव कामगिरी करुन नवीन उदाहरण घालुन दयावे...

    ReplyDelete
  27. >> अनुभवाने ९९% लोक सहमत असतील यात शंका नाही, आपण बिनधासपणे लिहित राहावे,

    काका, हो.. ९९% ब्लॉगर्स नक्कीच सहमत असतील. त्यामुळे कोणाला आवडो अगर न आवडो ब्लॉगवर लिखाण चालू राहणारच !!

    ReplyDelete
  28. आभार विद्याधर, अरे ऋयामला दिलं तेच उत्तर देतो. इथे कोणीच स्वतःला सचिन काय साबा करीमही समजत नाहीये रे.. असो..

    हो कोणाची इच्छा असो वा नसो, ब्लॉगर्सची दखल तर घेतली जाणारच. फक्त फरक इतकाच की कोणी टीका करतं ते चांगल्या शब्दांत आणि कोणी करतात ते पातळी सोडून..

    पुढच्या परिच्छेदात तू जे लिहिलं आहेस ना अगदी तेच परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मी माझ्या पोस्ट मध्ये. पण कोणी मुद्दाम तिसराच अर्थ काढायला लागलं तर मग काय करणार !!

    अगदी खरंय. तू म्हणतोस तसंच कुठल्याही संस्थळाची खिल्ली उडवण्याचा माझा हेतू नव्हता आणि नाही. खिल्ली उडवण्यासाराखं काही मी लिहिलेलंही नाही. माझे सगळे आक्षेप आहेत ते त्या संस्थळावर आपल्याच आत्ममग्नतेत वावरणार्‍या आणि बाहेरच्या जगावर तोंडसुख घेणार्‍या काही जीवांवर.

    >> जाणवली तर एक कळकळ आणि आपल्याच माणसांमुळे दुखावलं गेलेलं मन!

    हे बाकी अगदी खरं !!

    ReplyDelete
  29. संग्राम :)

    ब्लॉगवर स्वागत !!

    ReplyDelete
  30. सागर, अरे भांडण कसलं रे. :) मी इतर संस्थळांवर मराठी ब्लॉगर्सवर अश्लाघ्य भाषेत केल्या जाणार्‍या टीकेबद्दल स्वच्छ शब्दात नापसंती दर्शवली. पण ब्लॉगर्सना स्वच्छ शब्दांत नापसंती दर्शवण्याचाही अधिकार नाही असं काही लोकांना वाटत असेल तर त्यांच्या भ्रमाचे भोपळे वेळीच फोडलेले बरे.. नाही का? तसंही यापुढे मी विषय सोडून दिल्या जाणार्‍या प्रतिक्रियांना उत्तरं देणार नाहीच.

    ReplyDelete
  31. आभार देव.अगदी अगदी हेच म्हणायचं आहे मला. हेच सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे पोस्ट मध्ये. आता आपल्याला 'स्वतःबद्दल' मध्ये एक वाक्य अ‍ॅड करायला लागणार आहे. "येथे ब्लॉगिंगच्या कक्षा रुंदावण्यासाठी लिखाण केले जात नाही हो !! कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी." .. अरे नवीन नवीन वेगवेगळे ब्लॉग्स वाचले तर कळणार ना पोस्ट्स मधली विविधता आणि दर्जा !!

    >> विषय,घटना जरी सारख्या असल्या तरी प्रत्येकजण त्याच्या नजरेतुन ते मांडत असतो..

    हे एकदम झक्कास बोललास बघ !!

    >> आपल्या अपेक्षा योग्य शब्दात मांडाव्यात किंवा त्यासंदर्भात स्वत:च काही भरीव कामगिरी करुन नवीन उदाहरण घालुन दयावे...

    दोन्हीपैकी एकही दिसलं नाही म्हणून तर हा पोस्टप्रपंच !!

    ReplyDelete
  32. नीरजा

    मला वाटतं की आपलं उगिच वाऱ्याशी भांडल्या प्रमाणे होतंय. असो..

    एखाद्याला लता मंगेशकर फालतू गायिका वाटत असेल किंवा पुलं वाईट लेखक वाटत असतील, श्वास रटाळ सिनेमा वाटत असेल, नलावडेंना अभिनय येत नाही वाटत असेल - तर मी काहीच करू शकत नाही. पण वरची सगळ्याच गोष्टी मला मनापासून आवडतात. मला पुलंनी हसवलंय, नलावडेंनी खूप वर्षानंतर सिनेमा गृहात रडवलंय , लता प्रत्येक वेळी माझ्या बरोबर होतीच गाणी घेऊन प्रेमाची, दुःखाची वगिरे..

    म्हणुन अशा प्रकारे मोठ्या लोकांचे चरित्र हनन करणाऱ्या गोष्टीला मी कधीच दुजोरा पण देऊ शकणार नाही .

    लवकर लिहून होणं म्हणजे पाट्या टाकणं नाही. एकदा विषय डोक्यात आला की लिहायला वेळ लागत नाही. असो. यातही आपले मतभेद आहेतच. बरं जरी तुम्हाला असं दळण दळल्यासारखं लिखण वाटत असेल तरीही हरकत नाही...तसंही लिहिलं तरीही हरकत नाही लिहून दाखवावं.. माझ्या कडून बक्षीसाची रक्कम दोन हजार करतो हवं तर..


    जाउ द्या, मी सपशेल माघार घेतोय.. तुमचंच सगळं अगदी बरोबर आहे.

    ReplyDelete
  33. ब्लॉगर्सना तिखट प्रतिक्रिया देणाऱ्यांकरिता>>>
    Freedom of Expression and Speech च्या तहत कुठल्याही स्वतंत्र देशाच्या नागरिकाला स्वत:ची मते मांडण्याचा अधिकार आहे. (समझदारको इशारा काफ़ी है!)

    ReplyDelete
  34. हेरंब,
    माझ्या दोन्ही पोस्टस मधले सगळे मुद्दे केवळ तुझ्याच पोस्टला लागू होतात असे नाही. माझी पहिली पोस्ट येण्याआधी आलेल्या प्रतिक्रियांवर काही मुद्दे आहेत.
    उदा: पुलंच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी तरी आहे का किंवा रोज लिहिणं अवघड आहे तेव्हा त्याबद्दल काही बोलू नये किंवा फेसलेस कॊमेंटसना किंमत देत नाही असेच अजून.

    भाषेबद्दल... मला ज्या भाषेत जे म्हणायचं होतं तेच मी माझ्या मूळ पोस्टमधे मांडलं. तेव्हा मी स्पष्ट न बोलण्याचा आरोप नको. बाकी काही जणांनी मांडलेले मुद्दे जे तुला आक्षेपार्ह वाटले पण मला वाटले नाहीत.(जसे पुलंबद्दल बोलण्याची तुमची लायकीच काय असा विचारला गेलेला प्रश्न पण मला हास्यास्पद आणि ब्रिगेडी वाटला पण तुला वाटला नाही. मग तुझं पण तेच मत समजायचं का?)
    आता इथे आलेल्या अनेक प्रतिक्रियांमधे माझ्यासकट आक्षेप घेणाऱ्या सगळ्यांवर वैयक्तिकपातळीवर उतरून बडबड केली गेलीये ज्याला तू सपोर्ट पण करतोयस. तर मग तू जे म्हणतोयस की मला वैयक्तिक म्हणायचं नाही ते कितपत खरं?

    माझ्या मूळ पोस्टमधे आणि तथाकथित आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या पोस्टसमधे सुद्धा प्रत्येकाने स्वत:कडे बोट दाखवलं आहे. तुम्ही विरूद्ध आम्ही असा सामना तुझ्याकडून चालू झालाय. त्यात इथल्या प्रतिक्रियांनी भर घातली. ’थोडक्यात ओळख’ या मुद्द्याला उलथवून किमान १०-१२ मिनिटं बोलत रहाणारी(बोलणं आणि व्यक्ती कितीही महत्वाची असली तरीही) व्यक्ती हा लेख अनबायस्ड आहे म्हणून मी जसाच्या तसा दुसरीकडे छापतो असं म्हणत रहाते तेव्हा गंमत वाटते.

    contd.....

    ReplyDelete
  35. >>आम्हाला वाटते ते आम्ही लिहतो कोणावर जबरदस्ती तर नाही ना करत ज्याला वाचायच त्यांनी वाचाव आणी वाटल्यास योग्य ती प्रतिक्रिया द्यावी.<<
    योग्य ती म्हणजे काय? तुम्हाला हवी अशीच? केवळ आवडलं, वा छान वाली?
    >>मग आमच्यासारख्यांनी ब्लॉग लिहण सोडुन दयायच का तुमच्या सो कॉल्ड ’ब्लॉगिंगच्या कक्षा रुंदावण्यासाठी’<<
    विपर्यास करण्याचं उत्तम उदाहरण आहे हे.
    >>ज्यांना वाटत ब्लॉगींगमध्ये तोच तो पणा आला आहे त्यांनी स्वत: ब्लॉग सुरु करुन नविन काही तरी करुन दाखवावे मग बोलावे नुसते हवेत बाण मारुन काय उपयोग...<<
    थोडक्यात केवळ वाचकाच्या प्रतिक्रिया, अपेक्षा यांना काडीची किंमत नाही.
    >>उगाच आपण खुप प्रगल्भ असल्याचा आव आणत दुसर्यांना नाव ठेवण्यापेक्षा त्यांच्यासमोर आपल्या अपेक्षा योग्य शब्दात मांडाव्यात किंवा त्यासंदर्भात स्वत:च काही भरीव कामगिरी करुन नवीन उदाहरण घालुन दयावे...<<
    म्हणजे जे एखादं विरोधी मत व्यक्त करतील ते उगाच आव आणत नावं ठेवतात.

    आता हेरंब या सगळ्या पोस्टला तू पाठिंबा देतोस म्हणजे तुझ्या मनात हेच होते पण स्पष्टपणे लिहिलं नाहीस असं मी म्हणलं तर... :)

    स्वत:च्या कक्षा रूंदावणे या मुद्द्याची जी खिल्ली उडवली जातेय ते बघता तुझ्याही मनात तेच होते पण स्पष्ट लिहिलं नाहीस असं म्हणायला भरपूर वाव आहे.

    >> आपल्या अपेक्षा योग्य शब्दात मांडाव्यात किंवा त्यासंदर्भात स्वत:च काही भरीव कामगिरी करुन नवीन उदाहरण घालुन दयावे...

    दोन्हीपैकी एकही दिसलं नाही म्हणून तर हा पोस्टप्रपंच !! <<
    म्हणजे स्वत: उत्तम लिहित असाल तर आणि तरच प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे का? आणि उत्तम कोण नि कसं ठरवणार? उत्तमची व्याख्या पण सापेक्ष असते. मग कोणाची व्याख्या ग्राह्य धरायची?

    >>म्हणुन अशा प्रकारे मोठ्या लोकांचे चरित्र हनन करणाऱ्या गोष्टीला मी कधीच दुजोरा पण देऊ शकणार नाही .<<
    महेंद्र, तिथल्या एकाही प्रतिक्रियेत पुलंचे चारित्र्यहनन करणारा उल्लेख नव्हता. लिखाण आवडत नाही, कंटाळा येतो आणि चारित्र्यहनन यामधे जमीन अस्मानाचा फरक आहे.

    ReplyDelete
  36. >>एक सिनेमा काय चालला नशिबाने त्याचीच पुंगी वाजवत असता तुमी. किति दिवस खानार हो त्या श्वासाचि पुन्याई?<<
    १. नशीबाने नाही केलेल्या कष्टाने.
    २. इतरांनी कोणी खाण्यापेक्षा मीच खाल्लेली बरी.

    >>मी ब्लोग लिहित नाहि पण माबो पेक्षा ब्लोग वरच जास्त चांगल वाचायला मिळते.<<
    अरे मग इथल्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाही की.
    >>आजचे माबो चे नविन लिखान पहा म्हणजे तुम्हाला समजेल किती खराब लिहितात लोक.<<
    बर मग?
    >>त्या बाथे चा ब्लोग तर एकदम थर्डक्लास आहे. एकही पोस्ट धड नाही. तुम्हाला तो ब्लोग आवडला - धन्य हो तुमची.<<
    बर मग?

    संग्राम पाटील तुम्ही केवळ मुद्द्यांबद्दलच बोला. माझ्यावर वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पण्या करू नका.
    हेरंब, या इतक्या घाणेरड्या पोस्टचे तू स्वागत करतोस तेव्हा तुझ्या पोस्टच्या हेतूबद्दलच शंका घेऊ का मी?

    महेंद्र,
    माझे सगळे बरोबर आहे आणि इतरांचे चूक हा दावा मी कधीच केलेला नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर ते केवळ तुमचे मत आहे. :)

    असो... याहून इथे लिहिण्यात अर्थ नाही. कारण माझ्या मुद्द्यांची खिल्ली उडवली जाणं आणि माझ्यावर वैयक्तिक टिका केली जाणं हे आता इथे लोकं एन्जॊय करायला लागलेत.

    ReplyDelete
  37. हेरंब,
    एकदम सडेतोड पोस्ट. सर्वच मुद्दे पटले. शर्मीला फडके यांच्या मताशी सहमती दर्शवुन तू आधीच स्पष्ट केले होते की ब्लॉग विश्वात नाविन्य आणि सुधारणेला वाव आहे. पण सद्ध्या जे काही ब्लॉग्स आहेत ते एकगठ्ठा खराब आहेत हे म्हणणे चुकीचेच. आणि प्रतिक्रिया द्यायच्या तर त्या constructive feedback प्रकाराच्या असाव्या, उगाच मनोधैर्य खच्ची करणार्‍या नसाव्यात.
    कमेंटमधील कंपुबाजी???? नियमित प्रतिक्रिया देणारे लेख आवडला नाही तर मताशी असमत असणारे कमेंट्स सुद्धा देतात, जर कुणी लक्ष देऊन वाचत असेल तर लक्षात येईल...

    ReplyDelete
  38. हेरंब,
    भारी किल्ला लढविलाय. पुराण संकल्पनांना कवटाळून बसलेल्यांना, नवीन माध्यम, नवीन विचार यांची कशी तसदी होते, याचा हा नमुना आहे. नीरजा पटवर्धन यांचा लेख त्यामानाने एकदी एकांगी नाही वाटला. मात्र प्रतिक्रिया टाकणाऱ्यांची जनरलायझेशनने (ढोबळमानाने)बोलण्याची वृत्ती दिसून येते. मराठीत ब्लॉगच्या प्रांतात वाढीला, विकासाला अजूनही वाव असला तरी जे चाललंय ते मुद्रीत साहित्यप्रांताच्या शतपटीने चांगले आहे, असेच मी म्हणेल. कपाटात वर्षानुवर्षे कुलुपबंद ठेवलेल्या शंभर दर्जेदार पुस्तकांपेक्षा अधिकाधिक वाचकांना मोकळेपणाने वाचता येणारे चार शब्द अधिक महत्वाचे आहेत. या शब्दांचा दर्जा, त्यातून किती लोकांना पुढील सर्जनाची प्रेरणा मिळते यावर अवलंबून असतो.

    ReplyDelete
  39. संग्राम पाटीलMay 23, 2010 at 2:57 AM

    बर मग?
    निर्लज्ज पनाचा कळ्स आहेहा.

    ReplyDelete
  40. अरे हेरंब..


    माझं म्हणणं "सगळे ब्लॊगर्स स्वत:ला तेंडुलकर समजतात" असं आज्याबात नाही...
    पण काही ब्लॊगर्स खरंच असे भेटले, ज्यांचा सुर होता की "यु नो.. वी ब्लॊगर्स.." हे मला पटत नाही इतकंच....

    साहित्यिक वगैरे कोणी निघाला ब्लॊगिंगमधुन तर चांगलंच आहे. (जरुर निघेल आणि !)

    बाकी मात्र तुझ्या, "मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. " किंवा माझ्या "असो चांगलं, असो वाईट, मनाला वाटलं ते लिहीलं शाईत" सारखं असलं की पुरेसं आहे माझ्या मते...


    बाकी उत्तरही भारी लिहीलंयस.. (contd contd :) )
    आणि "शेवटची पोस्ट"घोषित केलीस हेहि चांगलं. इतकं पुरेसं आहे...

    आम्हीही आपल्या नव्या ५* पोस्टच्या प्रतिक्षेत, :)
    -ऋयाम.

    ReplyDelete
  41. "यु नो.. वी ब्लॊगर्स.." => आम्ही साहित्यिक अशा अर्थाने..

    ReplyDelete
  42. Jaaun det re aatta sagale....aapan aapale "Svant Sukhay" blogging suru thevayache....!!!
    Baki, Tuzi hi post aapalya marathi bloggers varachya premane lihili aahes tu he thauk aahe mala...Aani mhanunach Thnak u so much...ekdam chaan vatale tu hya baddal lihiles he baghun....Thts y I like u.... ;)
    Neways...Sagar dada aani Ruyam dada mhanatoy tase, pudhachi 5* post yeun det lawkar... :)

    ReplyDelete
  43. नीरजा,

    >> माझ्या मूळ पोस्टमधे आणि तथाकथित आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या पोस्टसमधे सुद्धा प्रत्येकाने स्वत:कडे बोट दाखवलं आहे.

    बोटं??? कोणी दाखवली आहेत स्वतःकडे बोटं? बस्के सोडून इतर कोणीही नाही. आणि तिनेही इतर ३-४ जणांकडून तिच्या म्हणण्याला विरोध झाल्यावर !!! त्याचं कसलं कौतुक ??


    >>>>
    >>आम्हाला वाटते ते आम्ही लिहतो कोणावर जबरदस्ती तर नाही ना करत ज्याला वाचायच त्यांनी वाचाव आणी वाटल्यास योग्य ती प्रतिक्रिया द्यावी.<<
    योग्य ती म्हणजे काय? तुम्हाला हवी अशीच? केवळ आवडलं, वा छान वाली?
    >>मग आमच्यासारख्यांनी ब्लॉग लिहण सोडुन दयायच का तुमच्या सो कॉल्ड ’ब्लॉगिंगच्या कक्षा रुंदावण्यासाठी’<<
    विपर्यास करण्याचं उत्तम उदाहरण आहे हे.
    >>ज्यांना वाटत ब्लॉगींगमध्ये तोच तो पणा आला आहे त्यांनी स्वत: ब्लॉग सुरु करुन नविन काही तरी करुन दाखवावे मग बोलावे नुसते हवेत बाण मारुन काय उपयोग...<<
    थोडक्यात केवळ वाचकाच्या प्रतिक्रिया, अपेक्षा यांना काडीची किंमत नाही.
    >>उगाच आपण खुप प्रगल्भ असल्याचा आव आणत दुसर्यांना नाव ठेवण्यापेक्षा त्यांच्यासमोर आपल्या अपेक्षा योग्य शब्दात मांडाव्यात किंवा त्यासंदर्भात स्वत:च काही भरीव कामगिरी करुन नवीन उदाहरण घालुन दयावे...<<
    म्हणजे जे एखादं विरोधी मत व्यक्त करतील ते उगाच आव आणत नावं ठेवतात.
    आता हेरंब या सगळ्या पोस्टला तू पाठिंबा देतोस म्हणजे तुझ्या मनात हेच होते पण स्पष्टपणे लिहिलं नाहीस असं मी म्हणलं तर... :)

    हात्तीच्या !!! त्यात काय?? मी या सगळ्याला पाठिंबा देतो आहेच.. मी ते स्पष्टपणे लिहिलं ही आहे माझ्या लेखातही आणि प्रतिक्रियांमध्येही. तुला दिसलं नाही की लक्षात आलं नाही ते???

    अनाठायी टीका करणा-यांनी, बौद्धिक पातळी, प्रतिभेची वानवा असणा-यांनी मैदानात उतरून आधी काहीतरी करून दाखवावं असं म्हंटलं तर वावगं ते काय? मी ही तसंच म्हणतो. त्यात चूक काय? लपवाछपवी काय? मी ते माझ्या लेखात स्पष्टपणेही आणि नाटकाचं उदाहरण देऊन म्हंटलंही आहे. आणि जर ते जमत नसेल ना (आणि जमत असेल तरीही) पातळी सोडून टीका करू नका.

    त्यांची लायकी आहे का तेवढी??? घे इथे मी त्या सगळ्यांची जाहीर लायकी काढतो, त्यांच्यातल्या असल्या नसल्या प्रतिभेला जाहीर आव्हान देतो की काहीतरी लिहून दाखवाच.. आणि तरीही (हे 'तरीही' लक्षात घे नीट) तरीही तरीही टीका करताना भान राखाच. तोंडाची गटारं होऊ देऊ नका.. (त्यांच्याच भाषेत सांगितलं तर त्यांना लवकर कळेल बहुतेक.)

    आणि लक्षात ठेव.. काहीही कारण ण देता उगाच वैयक्तिक टीका करणा-यांच्या प्रतिक्रिया, अपेक्षा यांना काडीचीही किंमत नाहीच !!!!!!!!

    जे पुराव्यांशिवाय विरोध करतात न ते निव्वळ खोटा आव आणूनच नावं ठेवत असतात उगाच.. होयच.. ते मी सिद्ध केलं आहे. फुकटचा दिखाऊपणा बंद करा !!!

    ReplyDelete
  44. Continued

    >> हेरंब, या इतक्या घाणेरड्या पोस्टचे तू स्वागत करतोस तेव्हा तुझ्या पोस्टच्या हेतूबद्दलच शंका घेऊ का मी?

    तुझा प्रचंड गोंधळ झालाय किंवा तू मुद्दाम कळत नसल्याचं दाखवते आहेस. पहिला पर्याय गृहीत धरून मी असं सांगतो की कुठलीही नवीन व्यक्ती (मग तिने माझ्या ब्लॉग/लेखांवर कितीही टीका करूदे) तरीही मी तिचं ब्लॉगवर स्वागतच करतो.
    'इतर कुठे' आहे का ते माहित नाही पण ब्लॉगींग विश्वात असं स्वागत करण्याची पद्धतच आहे. तू माझे जुने लेख (लेख नको वाचुस हवं तर) वाचून बघ आणि तिथल्या प्रतिक्रिया बघ. वेळोवेळी तुला असं स्वागत दिसेल.

    काल तुला उत्तर देण्याचा गडबडीत ब्लॉगवर तुझं स्वागत करायचं राहिलं. त्याबद्दल क्षमस्व आणि ब्लॉगवर स्वागत... अशीच भेट देत रहा.

    आणि तुला माझ्या लेखाच्या हेतूबद्दल शंका घ्यायला वावच नाही. माझा (१-२ मुद्दे वगळता) तुझ्या लेखाला आक्षेप नाही हे मी अगदी ठळकपणे सुरुवातीलाच सांगितलं आहे. आणि वैयक्तिक रित्या केल्या गेलेल्या हल्ल्याचं मी समर्थनही केलेलं नाही. पण तुझ्या लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांमधून ब्लॉगर्सवर जे हल्ले झाले त्याचं तू स्पष्टपणे समर्थनच केलंस. आणि वर इथे येऊन त्यांची बाजू मांडते आहेस हिरीरीने. हा आपल्या दोघांमधला आणि आपल्या हेतूंमधला मोठा फरक !!!

    >> तुम्ही विरूद्ध आम्ही असा सामना तुझ्याकडून चालू झालाय.

    या एवढं हास्यास्पद विधान नसेल दुसरं !! पुन्हा एकदा तुझ्या लेखांवर आलेल्या बिनडोक प्रतिक्रिया वाच. मग तुला लक्षात येईल की हा 'तुम्ही-आम्ही' वाला प्रकार तुझ्या सवंगड्यांनी तिथेच सुरु केला आहे.. कधीच !! त्याचा फक्त भाग-२ मी माझ्या ब्लॉगवर लिहिला. तेही फक्त काळ सोकावू नये म्हणून नाहीतर त्यांच्या आत्ममग्न प्रतिक्रियांना विचारतंय कोण !!!!

    माझ्या लेखात आणि त्यावर आलेल्या कुठल्याही प्रतिक्रियेत तुझी किंवा इतर संस्थळावरील सभासदांची अक्कल, दर्जा, बौद्धिक पातळी, हुशारी, लायकी, प्रतिभेची पातळी काढण्यात आलेली नाही. त्यामुळे मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करतोय असं म्हणणं साफ चूक आहे. पण तुझ्या लेखावरच्या प्रतिक्रियांमध्ये ब्लॉगर्सन उद्देशून सरळ सरळ वर दिलेले अपमानजनक शब्द वापरण्यात आलेले आहेत... आणि त्या तसल्या प्रतिक्रिया देणा-यांची बाजू घेऊन तू इथे माझ्याशी व्बाद घालते आहेस !!उलट मी लिहिताना तुला उद्देशून काहीही लिहिलं नव्हतं. माझा आक्षेप होता आणि आहे तो त्या गचाळ, गलिच्छ प्रतिक्रियांवर... आणि फक्त त्या गलिच्छ प्रतिक्रियांवर मी माझ्या लेखातून टीका केली आणि तू त्यांची बाजू घेऊन वाद घालायला लागल्यावर मी तुला प्रत्युत्तर दिलं. एवढं सगळं सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे हेच की यावरून हे सिद्ध होतंय की माझा हेतू आणि भाषा दोन्ही एकदम स्वच्छ आहे. जे गलिच्छ भाषा वापरताहेत त्यांचा तर निषेधच पण जे त्यांची बाजू घेऊन ती गलिच्छ भाषा कशी बरोबर आहे हे मांडताहेत त्यांचाही निषेध !!! आणि मी हे कुठेही लपवलेलं नाही.. हा आपल्यातला दुसरा मोठा फरक !!!

    जाता जाता एकच सांगतो. फक्त एकच वैयक्तिक प्रतिक्रिया येऊनही तू एवढी चिडली आहेस तर तुझ्या लेखावर आलेल्या त्या वैयक्तिक हल्ले करणा-या असंख्य प्रतिक्रिया वाचून मी त्यांना प्रत्युतर म्हणून लेख लिहिला तर काय चुकलं?
    तुझ्यावर झालेला वैयक्तिक हल्ला कोण्या एका प्रथमच प्रतिक्रिया देणा-या व्यक्तीने केला. पण तुझ्या लेखांवरच्या प्रतिक्रियांमध्ये तर हा हल्ला समस्त ब्लॉगर्सवर झाला !!!!! अश्लाघ्य भाषेत वैयक्तिक हल्ले झाले की कसं वाटतं हे येतंय का लक्षात आता ???

    रच्याक, तू सगळ्यांच्या प्रतिक्रियांना निवडून निवडून उत्तरं दिलीस अगदी पण मी आधी विचारलेल्या किंवा उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिताफीने बगल दिलीस !!! ते का बरं??

    असो, मला वाटतं आता थांबलेलं बरं. निदान मी तरी थांबतो/ उगाच शब्दांचे किस पाडणे, शब्दांत पकडणे, शब्दांचे खेळ करणे वाले प्रकार होतायत आता..and we are going nowhere !!

    उगाच तुझ्या प्रतिक्रियांना उत्तरं देण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी माझ्या ब्लॉगवर काहीतरी चांगलं लिहीन तरी. जय ब्लॉगिंग !!!

    ReplyDelete
  45. अभिलाष, जाऊदे त्यांना समजणार नाही ते. त्यांची तेवढी लायकी नाही !!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  46. आनंद, Constructive feedback कशाशी खातात हे या लोकांना माहित नाही. पायरी सोडून कमेंट्सचा रतीब घालणे ही संस्कृती तिथली !!!

    >> कमेंटमधील कंपुबाजी???? नियमित प्रतिक्रिया देणारे लेख आवडला नाही तर मताशी असमत असणारे कमेंट्स सुद्धा देतात, जर कुणी लक्ष देऊन वाचत असेल तर लक्षात येईल...

    बरोबर आनंद. तेवढ्यासाठी सगळे ब्लॉग्स वाचावे लागणार ना. पण त्यांना त्याचाही कंटाळा, आलास. स्वतःच्या कोषातून बाहेर येण्यासाठी आधी तशी इच्छा तर पाहिजे ना !! असो

    ReplyDelete
  47. देविदास, खूप आभार. नीरजाचा लेख मलाही (काही मुद्दे वगळता) पटला होताच. ते मी लेखाच्या सुरुवातीलाच म्हंटलं आहे. पण प्रतिक्रिया टाकणा-यांच्या कोत्या मनोवृत्तीला माझा विरोध होता, आहे आणि राहीलच.

    >> या शब्दांचा दर्जा, त्यातून किती लोकांना पुढील सर्जनाची प्रेरणा मिळते यावर अवलंबून असतो.

    हे लाख बोललात. पण दुर्दैवाने हे समजण्याची सगळ्यांचीच कुवत नसते हे दुर्दैव... त्यांचंच !!!

    ReplyDelete
  48. ओह ऋयाम. आता आलं लक्षात. सॉरी माझी गडबड झाली.

    जे "यु नो.. वी ब्लॊगर्स.." => आम्ही साहित्यिक अशा अर्थाने." अशा अर्थाने म्हणतात त्यावरही माझा आक्षेप नाही. ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत झालं. पण टीका करणा-यांनी ही आमची टीका "यु नो.. वी ब्लॊगर्स.." => आम्ही साहित्यिक अशा अर्थाने" जे म्हणतात त्यांच्यासाठीच आहे असं स्पष्ट लिहावं. उगाच सरसकट सगळ्यांना शिव्या का? आणि जे ब्लॉगर्स स्वतःला साहित्यिक समजतात त्यांनी कुठल्याही भाषेत शिव्या खाण्याची तयारीही ठेवावी असं मी म्हणेन फारतर..

    >> बाकी मात्र तुझ्या, "मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. " किंवा माझ्या "असो चांगलं, असो वाईट, मनाला वाटलं ते लिहीलं शाईत" सारखं असलं की पुरेसं आहे माझ्या मते...

    खरंच हेच पुरेसं आहे.

    अरे आणि शेवटची पोस्ट घोषित केली खरं पण अर्थाचा अनर्थ काढणे, शब्दच्छल करणे हे जे प्रकार चालले होते त्यातून मुख्य मुद्द्यालाच शिताफीने बगल दिली जात होती. त्यामुळे मुळे मुद्दयाकडे चर्चा पुन्हा आणणे या हेतूने पुन्हा टाकली प्रतिक्रिया.. पण ही नक्कीच शेवटची प्रतिक्रिया.. !!!

    नवीन पोस्ट टाकतो लवकरच :)

    ReplyDelete
  49. आभार मैथिली, ब्लॉगर्सवरच्या प्रेमाने आणि त्यांच्याविरुद्ध अनाठायी, अकारण अपशब्द वापरल्या गेल्याच्या निषेधार्थही. 'हम करे सो कायदा' असं चालणार नाही हा मेसेज ब्लॉगिंगबाहेरच्या जगात पोचला की आपलं काम झालं..

    पुढची जरा बरी पोस्ट टाकतो लवकरच :)

    ReplyDelete
  50. हेरंब, तुला काय वाटले हे एक तर तू मायबोलीवर दिले नाहीस. ही चर्चा तिथे सुरु झाली होती आणि तू संदर्भ सुद्धा तिथल्याच पोस्ट्सचा दिलास. बरं त्या पोस्ट्स आणि आमची नावं (जी काय टोपण-बिपण संतापजनक डोक्यात जाणारी नावं असतील ती) घेऊन इथे छापल्यास तर एका शब्दानेही तू मायबोलीकर किंवा मायबोली अ‍ॅडमिन ह्यांना कल्पना दिली नाहीस. तुला संदर्भ द्यायचेच होते तर नीरजाच्या ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांचे द्यायचे होते. बरं मूळ मुद्दा किंवा त्यावरच्या प्रतिक्रिया अजिबात समजून न घेता जणू काही तिथे लिहिणारे आम्ही सर्व ब्लॉग जगताच्या विरुद्ध आहोत अशा थाटात लिहिले आहेस. तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती भाऊ.

    जाता जाता, तानसेन-कानसेन प्रकार माहिती असेलच. आपण एखाद्या 'प्रकाशित' झालेल्या लेखनावर प्रतिक्रिया देतो ती "वाचक" म्हणून. त्यासाठी लेखक (इथे ब्लॉगर) असलेच पाहिजे असे काही नाही. स्वतःचा ब्लॉग* नसलेल्यांनी प्रतिक्रिया देऊ नयेत वगैरे मुद्दा अगदीच गैर आणि अस्थानी आहे.

    * स्वत:चा ब्लॉग म्हणजे blogspot इ. वर खाते असे तू गृहित धरले आहेस का ? कारण मायबोलीवर 'रंगिबेरंगी' नावाचा जो प्रकार आहे ते 'ब्लॉग'ला दिलेले मराठी नाव आहे. तसेच ह्या अनेक ब्लॉग नसलेल्या लोकांनी वेळोवेळी गुलमोहोर/गणेशोत्सव/दिवाळी अंकांमध्ये लक्षणीय लेखन केले आहे ह्याची तुला कल्पना आहे की नाही माहिती नाही.

    ~सिंडरेला

    ReplyDelete
  51. तृप्ती (सिंडरेला), प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत.

    एक गोंधळ तुझ्या लक्षात येतोय का? नीरजाने ब्लॉग या विषयावरच लेख लिहिला होता. विषयही ब्लॉगर्स मेळावा हाच होता. तो तिने तिच्या ब्लॉगबरोबरच मायबोलीवरही टाकला. त्यामुळे ब्लॉगर्स संदर्भातल्या (नावं ठेवल्या गेलेल्या) लेखाला मी माझ्या ब्लॉगवरून उत्तर दिलं तर बिघडलं कुठे? मी मायबोलीवर रमत नाही. माझ्या ब्लॉगवर आणि ब्लॉगविश्वात रमतो. जिथे आपल्याला आवडतं तिथे वावरणं हा दोष आहे?? की गुन्हा??

    >> आमची नावं (जी काय टोपण-बिपण संतापजनक डोक्यात जाणारी नावं असतील ती) घेऊन इथे छापल्यास तर एका शब्दानेही तू मायबोलीकर किंवा मायबोली अ‍ॅडमिन ह्यांना कल्पना दिली नाहीस.

    मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया बाहेर देताना मायबोलीकर किंवा मायबोली अ‍ॅडमिन ला कल्पना देण्याचा काय संबंध? नियम आहे का तसा? असला तरी तो मायबोलीकरांनी पाळावा. माझ्या ब्लॉगचा अ‍ॅडमिन मी आहे.
    मायबोलीवरचं लिखाण फक्त मायबोलीकरांसाठी नसतं. ते कोणीही वाचू शकतं. त्यामुळे परवानगीचा प्रश्नच नाही.
    धोनी वर टीका करताना BCCI ची परवानगी घ्यावी लागते का? किंवा शाहरुखवर टीका करताना film makers association ची परवानगी घ्यावी लागते का? नाही ना..? तसंच आहे हे..

    >> बरं मूळ मुद्दा किंवा त्यावरच्या प्रतिक्रिया अजिबात समजून न घेता जणू काही तिथे लिहिणारे आम्ही सर्व ब्लॉग जगताच्या विरुद्ध आहोत अशा थाटात लिहिले आहेस.

    मूळ मुद्दा समजावून द्यायला एखाद्या समूहाची अक्कल काढावी लागते, बौद्धिक दिवाळखोरीच्या उपमा द्याव्या लागतात, प्रतिभेवर शंका घ्यावी लागते (आणि ते सगळं अगदी पुराव्याशिवाय) हे माझ्यासाठी नवीन आहे. टीका करू नका असं कोणीच म्हणत नाहीये फक्त पातळी सोडू नका एवढंच म्हणणं आहे आणि होतं. हे मी केव्हाचं ओरडून ओरडून सांगतो आहे.. कीबोर्डमधली शाई संपत आली आता :)

    आणि "अजिबात समजून न घेता" म्हणजे काय बरं? सगळं समजतंय की मला !!!


    >> तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती भाऊ.

    हे आवडलं... :) .. पण इलाज नाही. चूक ते चूकच.


    >> स्वत:चा ब्लॉग म्हणजे blogspot इ. वर खाते असे तू गृहित धरले आहेस का ? कारण मायबोलीवर 'रंगिबेरंगी' नावाचा जो प्रकार आहे ते 'ब्लॉग'ला दिलेले मराठी नाव आहे.

    नाही फक्त blogspot नाही. कुठेही चालेल. पण त्या त्या व्यक्तींनी त्यांच्या रंगीबेरंगी पानाचा दुवा त्यांच्या प्रोफाईलमध्ये दिलेला नाही. असो.


    >> तसेच ह्या अनेक ब्लॉग नसलेल्या लोकांनी वेळोवेळी गुलमोहोर/गणेशोत्सव/दिवाळी अंकांमध्ये लक्षणीय लेखन केले आहे ह्याची तुला कल्पना आहे की नाही माहिती नाही.

    उत्तम !!! पण लक्षणीय लेखन केलं म्हणजे इतरांची (सरसकट सगळ्यांची किंवा ९५% लोकांची) अक्कल काढणे, त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणे, प्रतिभेची वानवा आहे असे टोमणे मारणे या सगळ्याला परवाना मिळतो का? समज मी उद्या असं म्हणालो की मी अतिशय दर्जेदार लेखन करतो तर मला मायबोली आणि तत्सम संस्थळांवरच्या लोकांची जाहीर लायकी काढण्याचा अधिकार मिळेल का? (मी तसं करणार नाही ही गोष्ट वेगळी.)

    तृप्ती, मी हेच मुद्दे कधीपासून समजावून सांगण्याचा (निष्फळ) प्रयत्न करतोय. माझं कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व नाही पण जोरदार आक्षेप आहे तो त्या तुच्छतादर्शक भाषेला..
    खरं तर तूही तुझ्या निरजाच्या या लेखावरच्या अनेक प्रतिक्रियांमध्ये (१-२ वगळता) मी जे म्हणतो आहे तेच म्हणत होतीस. पण मायबोलीबाहेरच्या कोणी त्याला दुजोरा देऊन लेख लिहिला तर तू (आणि नीरजाही) त्याला एकदम माबो विरुद्ध ब्लॉगर्स असं रूप आणता.. ते का बरं?? मला तरी कळलं नाही.. "आपलं मत आपण कुठे मांडतो यावर अवलंबून ठेवायचं" आणि "कुठेही गेलो तरी आपल्या मतापासून ढळायचं नाही" यातलं तुला काय योग्य वाटतं?? तूच ठरव !!!

    ReplyDelete
  52. तृप्ती
    निरजाची भाषा कशी उध्दट सारखी आहे ? उगिच उडवाउडवीचे उत्तरं देउन , किंवा कोणीही काही न म्हंटलेले त्यांच्या तोंडी घालून तिने तिळाचा पहाड केलेला आहे असे दिसते, जे मला बिलकुल आवडलेले नाही.
    भांडणासाठी भांडण करण्यात काही खास अक्कल लागत नाही. उगिच भांडण उकरुन काढते आहे ती.

    इथे काही प्रतिक्रिया दिली गेली नसती, तर हा लेख फारसा प्रसिध्द पण झाला नसता. अशा भांडाळ कॉमेंट्स मुळेच हा लेख जास्त प्रसिध्द झालाय. मला आजच मेल मधे पण आला म्हणुन इथे कॉमेटचा प्रपंच.

    तिने इथे अस काही लिहिलंय की जसे वकीलपत्र घेतलय माबोच. माबो करांना तिच्या वकिलीची गरज आहे असे वाटत नाही. बरे, कमीतकमी भाषा तरी जरा व्यवस्थित वापरायला हवी होती. तिची उध्दट उर्मट कॉमेंट वाचल्यावर आपल्याला जगापेक्षा जास्त समजतं हा गैरसमज लक्षात येतो वाचल्यावर. इथे विनाकारण कॉमेंट देऊन स्वतःची कुवत दाखवुन दिलेली दिसते.

    समजा एखादा लेख लिहायला जर एखाद्या व्यक्तीला ५-६ तास लागत असतील तर त्या व्यक्तीच्या क्रियेटिव्हिटी बद्दलच्या लिमिटेशन्स कन्स्ट्रेंट्स बद्दल खात्री पटते.

    जास्त काय लिहू? हा मुद्दा इथेच संपावा अशी एक माबोकर म्हणुन इच्छा आहे.

    ReplyDelete
  53. ∙∙‹ †âNv!:

    हेरंब,

    माझं मत मांडण्यापूर्वी मला आवर्जून सांगावस वाटत की मी काही कोणी ब्लॉगर नाही...
    पण एक सु्जाण वाचक मात्र नक्की आहे... तुम्ही म्हटल्या नुसार...ते कॉमेंट्स आणि त्यातली भाषा ही खरच आक्षेपार्ह
    वाटते.... मुळात स्वत:ला मराठी म्हणणार्‍यानी आणि कक्षा वाढवणाऱ्या भाषा करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ही "मराठी संस्कृती" नाही....आपल्या जवळ गुण असतील कदाचित परंतु याचा अर्थ इतरांना मूर्ख ठरवणे असा नाही...... ही आपली संस्कृती नाही...उलट आपण मानतो की "झाड जितके डेरेदार तितके वाकलेले असते" अर्थात कर्तुत्वाने मोठी असलेली माणसं जास्त नम्र असतात.......पण केवळ ४ दिवस लिखाण करून आणि केवळ ओळखीने किवा विकत घेऊन बक्षिसे मिळविणार्‍या लोकांकडून अशीच भाषा अपेक्षित आहे... आणि या लोकांनी पु.लं. बद्दल लिहीणे म्हणजे गल्लीत क्रिकेट खेळून एखाद्याने तेंडुलकरच्या कर्तुत्वावर भाष्य करण्यासारखे आहे.....आणि हो विशेष म्हणजे सिनेमा क्षेत्रातील लोकांना तर ही सवय असते "मार्केटिंग स्ट्रॅटेजी" , वाद ग्रस्त मुद्दे लिहिले की आपोपाप प्रसिद्धी मिळते असा त्यांना विश्वास असतो.....मग तो मुद्दा आपल्याच परिवारातील (ईथे ब्लॉगर्स परिवार) ईतर सदस्यांबद्दल का असे ना....असो...

    तुम्ही जे केलेत ते म्हणजे समर्थांच्याच भाषेत, "नाठाळाच्या........." ते योग्य आहे..... पण त्याच वेळी समर्थांनीच सांगितल्या नुसार "दिसा माजी काही....." तेव्हा या असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे...
    आणि दर्जेदार लिखाण असेच चालू राहू दे..आमच्या सारख्या वाचकांचा तुम्हाला पुर्ण पाठिंबा आहे.....

    "जय ब्लॉगिंग!!!!!!!!!!!!"

    अमित

    ReplyDelete
  54. हेरंबा अरे काय चालवलयस रे हे ! मराठी माणसं इथे सुद्धा भांडायला लागली तर :) चालू द्या !! मला एक कळत नाही कोणी काय लिहावं, नाही‌ लिहावं, प्रतिक्रीया द्यावी नाही‌ द्यावी .. अदीवर आपण चिकीचं/बरोबर असा शिक्का मारू शकत नाही‌. कारणा प्रतेय्कजण त्याच्या कोनातून बरोबर असतो. .. आता राहिला प्रश्न डाव्या बाजूचा : त्यांना प्रश्न : बाबांनो तुम्हाला मराठी‌ ब्लॉगर्सकडून काय हवय ? :‌ नासिफडके स्टाईल सेक्सी‌ कथा की भारताची‌ सुधारित राज्यघटना ? मराठी ब्लॉग छंद म्हणून लिहितात हे 'त्या' गाढवांना कधी कळणार .. ? जाऊ द्या .. एकदा काविळ झाली की पिवळच दिसतं .. मित्रांनु तुम्ही गो अहेड !!

    जाता जाता :‌तुझा TRP वाढतोय रे ! ;)

    ReplyDelete
  55. आभार अमित. तुमच्यासारख्या मूक पण सुजाण वाचकांच्या अशा योग्य वेळी येणार्‍या बोलक्या प्रतिक्रिया खूप आधार देऊन जातात आणि लिखाणाचा उत्साह वाढवतात. खरंच मनापासून आभार !!!

    ReplyDelete
  56. सोमेशा, सगळेजण करतात तीच चूक तूही करतो आहेस. यात मराठी अमराठी हा प्रश्नच नाही. सडक्या प्रवृत्तीचा आणि कोत्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे. तू ही ब्लॉगर आहेस. त्या नात्याने त्यांनी वाहिलेल्या लाखोल्या (अन्य ब्लॉगर्सप्रमाणे) तुलाही लागू होतात हे विसरू नकोस.. आता तुझ्या लक्षात येईल की यात मराठी-अमराठी हा वादच नाही.. !!!

    >> मला एक कळत नाही कोणी काय लिहावं, नाही‌ लिहावं, प्रतिक्रीया द्यावी नाही‌ द्यावी .. अदीवर आपण चिकीचं/बरोबर असा शिक्का मारू शकत नाही‌. कारणा प्रतेय्कजण त्याच्या कोनातून बरोबर असतो. .

    अगदी खरंय रे.. पण हेच तर कळत नाही न काही लोकांना .. (त्यांच्या) दुर्दैवाने !!

    >> मराठी ब्लॉग छंद म्हणून लिहितात हे 'त्या' गाढवांना कधी कळणार .. ?

    त्यांना कळो न कळो आपण लिहीत राहणार हे तर नक्कीच !! काय :)

    आणि नको रे.. माझा TRP वाढण्यासाठी अशी कारणं मुळीच नकोत.. :)

    ReplyDelete
  57. अरे बापरे. २ महिने ब्लॉग विश्वापासून दूर राहिलो तर इतक्या घडामोडी झाल्या?? :) बराच उहापोह झालाय या बाबत त्यामुळे मी नव्याने मांडण्यासारखं काही नक्कीच नाहीय, पण तरीही राहून राहून असं वाटतं की आपापसात आर्ग्युमेंट्स करून काहीही साध्य होणार नाहीय. प्रत्येकाच्या ब्लॉग विश्वाकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. सर्वांच्या सर्वच अपेक्षा पूर्ण होणं फारच कठीण आहे. त्यात ब्लॉग विश्व म्हणजे काही पैसे मोजून पूर्ण करता येणार्‍या सॉफ्टवेर च्या रिक्वायरमेन्टस नाहीत, त्यामुळे पटलं तर घ्यावं नाहीतर सोडून द्यावं असा दृष्टीकोन जमलं तर ठेवावा. बरेचसे मुद्दे या दृष्टीकोनामुळे निकाली लागू शकतील :)
    चला जाऊ द्या, एक फक्क्ड लेख येऊ द्या कसं...

    ReplyDelete
  58. अरे हेरंब, आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांच ते कार्ट ही एक अपप्रवृत्ती बरीच आढळते आणि त्यावरून असल्या प्रतिक्रियांचा जन्म होतो. आपला छंद बरा की वाईट हे ठरवायचा अधिकार फक्त तुलाच.. कारण तो जोपासणारा तू असणार आहेस. प्रतिक्रिया देणारा नव्हे. म्हणून मी तरी हाच सल्ला देईन की भोचक प्रतिक्रिया काढून टाकाव्यात आणि त्या लक्षात घेऊ नये.

    ReplyDelete
  59. हेरंब, अतिशय योग्या मुद्दा मांडला आहेस...त्याबद्दल तुझ विशेष अभिनंदन. ब्लॉगिंग करणा, वाचणा, त्यावर प्रतिक्रिया देण हे आपण करतोच. पण लिखाण स्वातंत्र्यावर कुरघोडी करत, पांचट कॉमेंट टाकून जो काय प्रकार केला गेला आहे त्याचा तीव्र निषेध. मी सुरुवातीपासूनच ह्या अश्या संकेतस्थळापासून दूर आहे..चीड येते त्यांची आणि कीव ही..आणि तिथे आणि वर दिलेल्या कॉमेंट्स मधून नी ने दिलेले प्रतिसाद वाचून हसू की रडू असा होताय...काय म्हणायाच याला? ज्याना वाचायच त्यानी वाचाव नाही तर नका वाचू कशाला अश्या प्रतिक्रिया देऊन माझ्यासारख्या अश्या अनेक ब्लॉग्गेर्सची अक्कल काढता..
    महेन्द्रकाका बरोबर म्हणाले - आभाळाकडे पाहून थुंकल्यावर स्वतःचा चेहेरा खराब होणारच, हे तशी कॉमेंट करणाऱ्याने लक्षात घ्यायला हवे होते. :) :) :)

    ReplyDelete
  60. हेरंब, काल कमेंट टाकली होती पण गायबच झाली.( ज्याम वैतागलेय ) तुझी पोस्ट, त्यावरील प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप... सगळे वाचले. सगळ्यात प्रथम हा मुद्दा अतिशय नीटस, अजिबात एकांगी विचार न करता मांडलास, अभिनंदन! शेवटी आपल्या मनातील विचारच आपण मांडतो तेव्हां तू ’बायस्ड ’ नाहीस हे स्पष्ट दिसते आहे. मुळात ब्लॉग किंवा कुठल्याही संकेतस्थळावर कोणीही लिहीते कारण आपल्या मनातले विचार, लिहीण्याची-व्यक्त होण्य़ाची उर्मी गप्प बसू देत नाही म्हणूनच. देशाबाहेर-जगभर विखुरलेल्या मराठी ( व इतरही भाषिक )मनांना आपल्या माणसांशी संवाद साधण्याची मनापासून ओढ असते. गेल्या काही वर्षांपासून जालावर ही संधी सहज उपलब्ध झाली असल्याने अश्या संवादाच्या कक्षा व पसारा वाढतोय. यातून अनेक गोष्टी साधल्या जातात.नवनवीन माहिती चटकन शेअर होते ( प्रत्येकजण जगात घडणारे सगळेच वाचतो-ऐकतो असे होऊच शकत नाही ) अनुभवांमुळे ’मागच्याच ठेच पुढचा शहाणा” हा फायदा होतो. विचारांची देवाणघेवाण, निकोप चर्चा, तात्विक मतभेद, अनेकविध विषयांची हाताळणी होत असते. हे सारे महत्वाचे आहे की ते माबोवर लिहीलेय का ब्लॉगरने लिहीलेयं वा कुठल्याश्या संकेतस्थळावर लिहीलेय हे महत्वाचे???

    आजच्या इतक्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या घरातल्या माणसांशीही चार घटका निवांत बसून गप्पा मारण्यासाठी आठवडे आठवडे वाट पहावी लागते. मग खिल्ली उडवणारे, अपमान-उपमर्द करणारे, अक्कल/लायकी काढणारे, वैचारिक दिवाळखोरी वगैरे प्रतिसाद कशाला? जो तो आपल्या मतीनुसार व कुवतीनुसार जे त्याला आवडेल ते लिहीतो. शेवटी आजमितीला तरी सगळेच स्वांन्त सुखायं लिहीत आहेत. " इथे मी ’ होतकरु लेखक ’ हा शब्दही वापरलेला नाही. पण पुढे कदाचित या सा~या प्रपंचातून कदाचित कोणी खरेच चांगला लेखक निर्माण होईलही. आज जर अमुक एका कम्युनिटीला किंवा व्यक्तिला नामोहरम करत राहीले तर उद्या लिहीणेच बंद होईल किंवा त्याची दिशाच बदलून जाईल. शिवाय आपण काय वाचावे हे तर वाचकाच्या ( आपल्या सगळ्यांच्या ) हातात असतेच नं? एके काळी आपल्या मनात येणारे कागदावर उतरवून आपल्या भोवतालची चार माणसे वाचत तेच आज जगाच्या कानाकोप~यात ते सहजी पोहोचतेयं हा आनंद किती मोठा आहे. हे जर नसते तर एकंदरीतच हौशी लिखाण ( ब्लॉगर्स, माबो व सगळी संकेतस्थळे ) कितपत शेअर झाले असते? मग हा सगळा खटाटोप एकमेकांची अशी उणीदुणी काढण्य़ासाठी का केला जातोयं? याचा अर्थ, नुसतीच वाहवा करा असा थोडाच आहे. जे खटकेल ते जरूर व्यक्त व्हावेच, अन्यथा प्रगतीचा मार्गच खुंटेल.पण इथे व्यक्तिची निंदा, अपमान न होता विषयाला धरून टिका व्हावी तीही तारतम्य ठेवून.शब्द अचूक भाव व्यक्त करतात व जिव्हारी लागतात याचे भान ठेवायलाच हवे नं...

    बाकी, काही लोक असेही आहेत ज्यांना प्रतिक्रियांची दखलही घ्यावी असे वाटत नाही. इतर लोकांचे ब्लॉग कसे वाचायचे हे मुळी आम्हाला समजतच नाही... खूप सारे फॉलोवर्स आहेत पण त्यांच्या ब्लॉगवर कसे बरे जायचे हेच कळत नाही..... वेळच नसतो कोणाचेही काही वाचायला... अशा लोकांपासून दूरच राहावे हे उत्तम. उगाच आपले डोके दुखवून घ्याच कशाला नं?

    ReplyDelete
  61. कुणी कितीही काही बोलो ...मी चंगला ब्लोग जो पर्यंत लिहीन शिकत नाही तो पर्यंत जय ब्लॉगिंग...अन जर चुकून चांगल लिहायला लागलो मग तर जय जय ब्लॉगिंग...

    ReplyDelete
  62. आभार प्रवीण.. तुझ्या प्रतिक्रिया बझवर बघायची सवय होती. ब्लॉगवर येऊन योग्य वेळी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार आणि स्वागत.

    >> त्यात ब्लॉग विश्व म्हणजे काही पैसे मोजून पूर्ण करता येणार्‍या सॉफ्टवेर च्या रिक्वायरमेन्टस नाहीत, त्यामुळे पटलं तर घ्यावं नाहीतर सोडून द्यावं असा दृष्टीकोन जमलं तर ठेवावा.

    अगदी अगदी सहमत.. सगळं 'टेलरमेड' मिळवायचा अट्टाहास असलेल्यांना हे जितक्या लवकर कळेल तितकं उत्तमच !!

    ReplyDelete
  63. आभार भारत. खरंय रे.. आणि त्या कार्ट्याला ठोकण्यासाठी मग हवी ती विशेषणं वापरायची. हो आता यापुढे असल्या प्रतिक्रियांकडे लक्ष देणार नाहीच. तसल्या प्रतिक्रिया देणा-यानाही ते कळलं असेल ही अपेक्षा.

    ReplyDelete
  64. मनापासून आभार, सुहास. अरे यात कुठल्याही संकेतस्थळाचा दोष नाही पण त्यावर काही वर्षं काढलेले सभासद बाहेरच्या जगात वावरतानाही त्या संस्थळाचे सभासद आहे म्हणून दुगाण्या झाडतात त्याची नक्कीच चीड येते.. असो.. मूळ मुद्दा कोणाचीही अक्कल काढायचा अधिकार कधीच कोणीच कोणालाही दिलेला नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि अक्कल काढली गेलीच तर त्यावर प्रतिसादही तसाच मिळणार हेही विसरू नये. !!

    बाकी काकांचं वाक्य +१

    >> आभाळाकडे पाहून थुंकल्यावर स्वतःचा चेहेरा खराब होणारच..

    ReplyDelete
  65. आभार श्रीताई.. ती कोत्या मनाने आणि पातळी सोडून केली गेलेली टीका बघितली आणि व्यथित झालो. आणि म्हणूनच पोस्ट टाकली. पण आता तर त्या शिवराळ भाषेचं समर्थन करायलाही लोकं पुढे येत आहेत हे बघून अजूनच सखेद आश्चर्य वाटलं.

    >> मग खिल्ली उडवणारे, अपमान-उपमर्द करणारे, अक्कल/लायकी काढणारे, वैचारिक दिवाळखोरी वगैरे प्रतिसाद कशाला?
    >> याचा अर्थ, नुसतीच वाहवा करा असा थोडाच आहे. जे खटकेल ते जरूर व्यक्त व्हावेच, अन्यथा प्रगतीचा मार्गच खुंटेल.पण इथे व्यक्तिची निंदा, अपमान न होता विषयाला धरून टिका व्हावी तीही तारतम्य ठेवून.

    अगदी अगदी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. पण ब-याच जणांना समजतच नाहीये ते (किंवा समजून घेत नाहीयेत) आणि उलट अशा विखारी भाषेचं समर्थनही करताहेत. तशीच भाषा त्यांच्या बाबतीत वापरली गेली तर ते मात्र त्यांना चालत नाही. सगळा दुतोंडीपणा.

    >> शब्द अचूक भाव व्यक्त करतात व जिव्हारी लागतात याचे भान ठेवायलाच हवे नं...

    हे लाख बोललीस. हे समजण्याइतकं तरी प्रत्येकाने आपल्या मनाची दारं उघडली ना तरी बास !!

    ReplyDelete
  66. सागर !! मस्तच.. सही बोललास.. ये हुई ना बात !! अशा लोकांना अनुल्लेखाने मारणं केव्हाही उत्तम !!!

    ReplyDelete
  67. गेले तीन दिवस हा लेख परत परत वाचत नवीन वाचतोय अशा पद्धतीने वाचत होतो. अगदी समर्पक लेखन केले आहेस. सर्व मुद्दे अगदी व्यवस्थित मांडलेत. संयत भाषा आणि नेमका प्रहार आवडला. मीही अशाच एका संकेतस्थळावर लिहिणे फोटो टाकणे सोडून दिले. कारण माझ्या भटकंतीविषयक लेखनाला, भटकण्याशिवाय दुसरे काही काम नसते का? किंवा फोटो खोटे का वाटत आहेत.. झालंच तर शुद्धलेखन सुधारा वगैरे कमेंट्स शालजोडीविनाच शेलक्या शब्दांत मिळत होत्या.

    लेख आवडला आणि पटलाही.

    ReplyDelete
  68. हेरंब,

    घरातील गडबडीमुळे गेले ३-४ दिवस वर नेट पहाणे झाले नाही आणि पाहतो तर मराठी ब्लोग वर बरीच चर्चा चालू आहे. पुढच्या २-३ दिवसाची वाचनाची सोय झाली. अजून सर्व वाचले नसले तरी तुझा लेख, मूळ लेख आणि काही वाद जनक प्रतिक्रिया वाचल्या. तुझा लेख बराचसा पटला. पण मला वाटते काही अनाहूत टीकाकारांना उगाच महत्त्व प्राप्त होत आहे. उदा: पुलं बद्दल लिहिणारे. ह्यांच्या टीकेला प्रतिक्रिया देणे म्हणजे त्यांना अवास्तव महत्त्व प्राप्त करून देणे असे वाटते. अश्यांना पूर्णपने दुर्लक्षित करणे हेच योग्य.

    ReplyDelete
  69. एक मेळावा, त्यावरची पोष्ट, त्यावरच्या प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रियांवर पोष्ट, त्या पोष्टीवरही प्रतिक्रिया. त्याही सर्व प्रकारच्या. कौतुक, संताप, निर्विकारता, प्रगल्भ मतं, सबुड किंवा बिनबुडाचे आरोप-प्रत्यारोप, समज-गैरसमज, थोडं भांडण थोडा वाद... मराठी ब्लॉगिंगला खऱ्या अर्थानं 'सामाजिक' स्वरूप प्राप्त झालंय असं जमजायला हरकत नाही आता.
    जय मराठी, जय ब्ल़ॉगिंग.
    दर्जाचं म्हणाल तर त्या दर्जा उधृत करणाऱ्या प्रतिक्रियांचा दर्जा किमान धरून त्यापेक्षा बरं लिहायला बघायचं. पंच्याण्णव टक्के ब्लॉगर्स निदान तेवढं बरं नक्कीच लिहीत असतील.

    ReplyDelete
  70. आभार पंकज. कितीही संताप झाला असला तरी लेख अतिरेकी होणार नाही याची जाणूनबजून काळजी घेतली. आणि नेमके मुद्दे मांडलेत पण त्यांनी त्या मुद्द्यांना यशस्वीपणे बगल देऊन "तू आम्हाला असं म्हणालास म्हणून आम्ही तुला तसं म्हणालो" वाले वाद घालायला सुरुवात केली. योग्य बचाव नसण्याचंच हे उदाहरण. असो..

    >> मीही अशाच एका संकेतस्थळावर लिहिणे फोटो टाकणे सोडून दिले. कारण माझ्या भटकंतीविषयक लेखनाला, भटकण्याशिवाय दुसरे काही काम नसते का? किंवा फोटो खोटे का वाटत आहेत.. झालंच तर शुद्धलेखन सुधारा वगैरे कमेंट्स शालजोडीविनाच शेलक्या शब्दांत मिळत होत्या.

    जे आपण करत नाही, आपल्याला जमत/झेपत नाही ते दुसरा कोणी करत असेल तर त्याला वेड्यात काढायचं आणि तेही सगळ्यांनी मिळून अशी प्रवृत्ती अनेक ठिकाणी आढळते. माझ्या माहितीप्रमाणे तरी यालाच कंपूबाजी म्हणतात. जी ब्लॉगविश्वावर अजिबात नाही पण इतरत्र खोर्‍याने आढळते... असो. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  71. आभार निरंजन. मलाही पटतंय अनुल्लेखाने मारणं. पण बर्‍याच लोकांना आपण त्यांना अनुल्लेखाने मारतोय हे कळतच नाही. त्यांना वाटतं आपल्याकडे उत्तरं नाहीत, मांडायला आपली बाजू नाही आणि त्यामुळे आपण गप्प बसलो आहोत. आणि दुर्दैवाने यामुळे काळ सोकावतो. त्यामुळे त्यांची मुक्ताफळं सगळ्यांपुढे आणून त्यांना खणखणीत उत्तर देणं हाच हेतू होता. आणि तो बव्हंशी सफल झालाही.. !!
    पुन्हा एकदा आभार.

    ReplyDelete
  72. आभार नचिकेत.

    >> मराठी ब्लॉगिंगला खऱ्या अर्थानं 'सामाजिक' स्वरूप प्राप्त झालंय असं जमजायला हरकत नाही आता.

    हा हा.. अगदी खरं बोललास.. अर्थात मराठी ब्लॉगिंगच्या दर्जावर शिक्कामोर्तब करण्यासाठी कोणाही बाहेरच्याची गरज नाही. मराठी ब्लॉग जगत सक्षम आहे ते करण्यासाठी..

    आणि त्या तसल्या प्रतिक्रियांपेक्षा कैक पटीने चांगलं लिहितात ब्लॉगर्स.. आणि ९५ नाही अगदी १००% ब्लॉगर्स :)

    ReplyDelete
  73. हेरंब खरं तर सुट्टी संपुन आल्या आल्या वादविवादाचं वाचुन (आधीच इथल्या शांततेत फ़िरलेलं) डोकं आणखी फ़िरवायचं का असा विचार करत होते पण राहावत नाही..तू तुझी बाजु व्यवस्थित मांडली आहेस..खरं त्यातली फ़डके यांची प्रतिक्रिया विचार करण्यासारखीच आहे आणि इतर काही ब्लॉगर्सबरोबरच श्रीताईंनी लिहिलेलं सॉलिड खरं आहे...
    ब्लॉगर या शब्दाची आपण आपल्या सोयींने काहीतरी व्याख्या करतो आणि बरीच जण त्यात आपण जास्त साहित्यिक बुवा या स्वतः निर्माण केलेल्या भ्रमात राहतात...अर्थात अशांचे डोळे आपण उघडू शकुच असं नाही. महेंद्रकाकांनी मागे जी ब्लॉग एटिकेट्स म्हणून एक पोस्ट लिहिली होती त्यावर जाणत्यांनी स्वतःच विचार करावा..म्हणजे मग अशी चव्हाट्यावर भांडायची वेळ येणार नाही...मराठीत काही लोकं आपले अनुभव किंवा थोडक्यात त्यांना जे काही वाटतं ते लिहू लागली त्याबद्दल इतका उहापोह का?? एक वाचक म्हणून जे पटलं ते वाचावं, लागल्यास त्या-त्या लेखावर टिका असल्यास ती करावी पण उगाच सगळ्यांचा जाहिर उद्धार नको....

    ReplyDelete
  74. अपर्णा, तेच ग. मी फक्त आपली सगळ्यांची बाजू मांडत होतो आणि आपल्याबद्दल जे बोललं जातं ते कसं निराधार, चुकीचं आहे एवढंच सांगायचा प्रयत्न करत होतो. पण बघता बघता त्याला वादावादीचं स्वरूप आलं :(..शर्मिला फडके यांची प्रतिक्रिया अतिशय मुद्देसूद आहेच आणि श्रीताईची अतिशय सडेतोड !!

    >> महेंद्रकाकांनी मागे जी ब्लॉग एटिकेट्स म्हणून एक पोस्ट लिहिली होती त्यावर जाणत्यांनी स्वतःच विचार करावा..
    मी पण अगदी तेच म्हणत होतो. म्हणून तर माझ्या लेखात मुद्दाम लिंक पण दिली त्यांच्या लेखाची.

    आणि उगाच कोणीही येऊन ब्लॉगर्स/ब्लॉगिंग च्या त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार काहीही व्याख्या करायच्या आणि माग ९५% लोक त्या व्याख्येत बसत नाहीत म्हणून बोंबा ठोकायच्या..

    सरसकट सगळ्यांचा जाहीर उद्धार तर नकोच आणि पातळी सोडूनही टीका नको.. !!

    ReplyDelete
  75. मंडळी,

    कोणाचाच कोणालाही मुद्दाम दुखवायचा अजिबात उद्देश नसला तरी अनेक प्रतिक्रियांमध्ये अनवधानाने, गैरसमजाने किंवा अन्य काही कारणांमुळे परस्परांवर वैयक्तिक हल्ले झाले. हा लेख लिहिताना हा उद्देश अर्थातच किंचितही नव्हता. मला वाटतं मी लेखातून आणि माझ्या उत्तरांमधून माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला होता. तरीही सर्वांनीच मनात किंतु न बाळगता सगळं विसरून जावं ही विनंती. आणि तरीही कोणी दुखावलं गेलं असेल तर त्या प्रत्येकाची मी या ब्लॉगचा चालक या नात्याने मनापासून क्षमा मागतो.. !!

    -हेरंब

    ReplyDelete
  76. हेरंब अपेक्षित कमेंट आले बघ तुझ्याकडून.... हिरीरीने मुद्दे (योग्य हं !!!) मांडलेस तरी तू या मतभेदांच्या वाऱ्यांना ब्लॉगवर खूप दिवस वाहू द्यायचा नाहीस अशी कल्पना आलीच होती....

    जियो!!!

    मतभेद सगळीकडेच असतात, ते वेळोवेळी जाहीर होणेही तितकेच गरजेचे आहे.... पण ते मान्य करून पुढे गेलो तरच प्रगती आहे...

    तेव्हा जय ब्लॉगिंग!!!

    ReplyDelete
  77. हो ग. अशा प्रकारचे तात्विक वाद-चर्चा बरे असतात अधून-मधून पण त्या मतभेदांतून उगाच मनभेद होता कामा नयेत यासाठी मुद्दाम टाकली प्रतिक्रिया. आभार.

    ReplyDelete
  78. कोणतीही गोष्ट जगासमोर आली की त्याच्यावर उलट सुलट प्रतिक्रिया या येणारच. लिहिणा-याने आवडेल त्यावर लिहित जावे आणि वाचणा-याने पटलं तर वाचत जावे. ब्लॉग हा प्रत्येक जण आधी स्वत:साठी लिहित असतो. ज्याला जे वाटतं, तो त्याच्यावर लिहीतो. प्रतिक्रिया आणि टोमणे यातला फरक जवळजवळ सर्वच ब्लॉगर्सना समजतो त्यामुळे टिकात्मक प्रतिक्रियाही सकारार्थी घेता येतात. ज्यात सकारार्थ असूनही टोमणेच मारलेले असतात, अशा प्रतिक्रियांकडे दुर्लक्श करावे. कमेंट मॉडरेशन त्यासाठीच आहे. (चला, या विषयावर आता ब्लॉगवालेवर एक लेख लिहिते.)

    ब्लॉगिंगच्या जग अजून खूप छोटं आहे. त्यात मराठी ब्लॉगर्सचं विश्व तर आणखीनच छोटं. तरीदेखील सर्व ब्लॉगर्सच्या पोस्टस वाचणं कुणालाच शक्य नाही. ब्लॉगर्सना फुकटे म्हणणा-यांनी आधी हा विचार करावा की त्यांनाही हे सर्व फुकट वाचायला मिळतं आणि जर फुकटचं साहित्य जर ते वाचतच नसतील, तर ब्लॉगर्सबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना आहेच कुठे? विकतचं साहित्य घेऊन वाचा आणि त्यांच्याच नावाच्या चिपळ्याही वाजवा.

    थोडी कठोर प्रतिक्रिया पण काय करू? स्वत:चं प्रोफाईलही बनवू न शकणारी मंडळी जेव्हा ब्लॉगींगबद्दल आपलं मतप्रदर्शन करतात तेव्हा असं लिहिल्याशिवाय रहावत नाही. काठावर बसून पोहायचं कसं हे शिकता येत नाही, हे या मंडळींना माहित नसावं.

    ReplyDelete
  79. आणखी एक लिहायचं राहिल होतं. - पेन्शनर्सचा सुळसुळाट झालाय म्हणजे काय? आजी आजोबांकडून गोष्टी ऐकत नव्हतो आपण? कट्ट्यावर बसून शिळोप्याच्या गप्पा मारणारे आपल्या आजी आजोबा - आई वडीलांच्या वयाचे पेन्शनर्स जर नेट सॅव्ही होत असतील, तर त्याचा आपल्याला अभिमान, कौतुक असायला हवं. त्यांनी जर आधुनिक तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली तर ’जुनी पिढी म्हणजे...’ असं म्हणून आजच्या पिढीने त्यांचा उद्धार केला असता. तिच जुनी पिढी आपले अनुभव ब्लॉगच्या मध्यमातून कथन करते, तेव्हा या तथाकथित प्रतिक्रिया देणा-यांना नेमका कसला त्रास होतो? ब्लॉगर्सचं पिक आलंय, तर वेबसाईट्सचं नाहिये? गटागटाने नवख्या व्यक्तीची हुर्यो उडवणा-या टग्यांमधे आणि या लोकांमधे मला काहीच फरक दिसत नाही.

    ReplyDelete
  80. अगदी बरोबर कांचन.. आधी टोमणे मारायचे आणि मग समोरून प्रत्येक मुद्द्याला जशीच्या तशी ठासून उत्तरं मिळाली की म्हणायचं की आम्ही तर आमचं मत सांगत होतो फक्त. सगळा दुतोंडीपणा.. आपला तो बाब्या.. !! दुसरं काय...

    >> ब्लॉगिंगच्या जग अजून खूप छोटं आहे. .......<<

    अगदी अगदी.. हा संपूर्ण परिच्छेद पटला.. मी तेच सांगायचा प्रयत्न करत होतो की ब्लॉगिंग विश्व आणि त्यात पुन्हा मराठी ब्लॉगिंग विश्व किती लहान आणि नवीन आहे. सगळा हौशी प्रकार आहे.. त्याला उगाच व्यावसायिक गणितांच्या फुटपट्ट्या कशाला !! निदान एवढ्यात तरी नको.. त्यावर मात्र यांच्याकडे उत्तर नाही..

    थोडी कठोर प्रतिक्रिया?? अग तिकडच्या तोंडफाटक्या (त्यांचाच शब्द) प्रतिक्रिया बघितल्या तर तुझी प्रतिक्रिया म्हणजे अगदी हलकी फुलकी म्हंटली तरी चालेल..

    >> गटागटाने नवख्या व्यक्तीची हुर्यो उडवणा-या टग्यांमधे आणि या लोकांमधे मला काहीच फरक दिसत नाही. <<

    हे लोकं आहेतच मराठी ब्लॉगर्सच्या रस्त्यावर उभे राहून चिखलफेक करणारे टगे. दुर्लक्ष करण्यापेक्षा जशास तसं उत्तर देऊन गप्प बसवण्याच्या लायकीचे !!!!!

    ReplyDelete
  81. न्यायाधीश महाराज... बऱ्याच उशिराने वाचतोय हे सर्व...

    मेळाव्याच्या ९ तारखेनंतर आम्ही मोहिमेच्या तयारीसाठी गायब होतो ना... :) सर्व लिखाण वाचले आणि प्रतिक्रया सुद्धा... पंकज कुठल्या संकेतस्थळाबद्दल बोलतोय ते तूला कळले असेलच... ;) बाकी तुझा एक-अन-एक मुद्दा फिट्ट पटला रे...

    शेवटी काय रे...
    लोक तुम्हाला 'नावे ठेवायला लागली' की एक गोष्ट नक्की समजायची... ती म्हणजे ... 'आपण प्रगती करतोय'

    अधिक काहीच लिहित नाही...

    बहुत काय लिहिणे... आपण सुज्ञ असा...

    ..............लेखनसीमा..............

    ReplyDelete
  82. सेनापती, आता धुरळा खाली बसला आहे. पण अर्थातच वाचलंत ते बरंच झालं. रयतेत काय घडामोडी चालू आहेत हे आपल्यालाही माहित असलेलं बरं.

    अरे 'आपण प्रगती करतोय' (आपण म्हणजे मराठी ब्लॉगर कम्युनिटी या अर्थी) हे तर सत्यच आहे. पण ते असं सिद्ध करण्यासाठी उगाच कोणीही तिर्‍हाइत येतात आणि हवं ते बडबडून जातात हे मुळीच चालणार नाही हे त्यांना कळावं म्हणून हा पोस्टप्रपंच.. असो..

    ReplyDelete
  83. मी हा लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रया आत्ता पुन्हा वाचल्या... 'माबो'वर जाउन लिखाण करू की नको ह्या विचारात आहे मी अजून... :)

    ReplyDelete
  84. हा हा.. माझं प्रांजळ मत विचारशील तर अजिबात काही गरज नाही तिथे लिहिण्याची. तिथे सतत मारामाऱ्या, एकमेकांच्या पाठी खाजवणं एवढेच उद्योग चालू असतात. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर एक ५-६ जण सोडले तर विशेष बरं लिहिणारंही नाही कोणी तिथे.. ब्लॉगवर हा लेख लिहिल्याने त्यांच्या टोळीने माझ्या तिकडच्या दुसरया एका लेखावर कसे वैयक्तिक हल्ले चढवले होते हे तुला आठवतच असेल. असो. मला तरी अतिशय वाईट अनुभव आला. विषाची परीक्षा घ्यायची असेल तर तू लिहून बघ. कदाचित तुला चांगला अनुभवही येईल (पण मी तरी काही फार आशावादी नाही.)

    ReplyDelete
  85. हेरंब, १००% अनुमोदन.

    ReplyDelete
  86. वरच्या कांचन कराई यांच्या प्रतिक्रियेत व्यक्त केलेल्या मतांनाही अनुमोदन.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...