Tuesday, March 23, 2010

यमाबाईंच्या आत्मचरित्रातील काही पानं !!

पुढील काही महिन्यांत/वर्षांत प्रकाशित होणार्‍या (किंवा न होणार्‍या) रा.रा. बहिणाताई उर्फ भगिनीजी उर्फ यमाबाईंच्या आत्मचरित्रातील ही काही पाने पूर्वप्रसिद्धीस देत आहोत. 'रम्य ते बालपण' या खंडातील हे काही प्रसंग वाचताना बालपणातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही (फक्त स्वतःच्याच) उज्ज्वल भवितव्याचा विचार करणार्‍या यमाबाई बघितल्या की त्यांची दूरदृष्टी बघून अभिमानाने उर भरून येतो.


------------------------------------------------------------------

प्रसंग पहिला : बाहुली

लहानपणी एकदा मला बाहुली हवी होती. म्हणजे माझ्याकडे बाहुल्या होत्या तशा पण मला अजून एक हवी होती माझ्या मनासारखी. म्हणून आईच्या मागे लागून लागून एक दिवस मी तिच्याबरोबर बाजारात गेले. दोन-तीन तास आणि आठ-दहा दुकानं फिरून झाली तरी काही मला माझ्या आवडीची बाहुली मिळेना. आईनेही शेवटी हात टेकले आणि म्हणाली "यमे, इतक्या बाहुल्या बघितल्यास एकही बाहुली आवडत नाही तुला. कशी बाहुली हवी ग तुला?"
"या सगळ्या बाहुल्या फडतूस आहेत. मला माझ्यासाखी दिसणारी बाहुली हवी."
"काय?? तुझ्यासारखी?? अशी बाहुली कुठे असते का कधी? बाहुल्या अशा कोणासारख्या दिसत नाहीत कधी."
"नाही मला माझ्यासारखी दिसणारीच बाहुली हवी. मी तिच्याशीच खेळणार. आणि इतकंच नाही तर सगळ्या मुलींनी फक्त माझ्यासारख्या दिसणार्‍या बाहुलीशीच खेळायचं. सगळ्यांकडे तशीच बाहुली असली पाहिजे."
"काय येड बीड लागलं की काय तुला? काय मुर्खासारखी बडबडते आहेस?"

त्यावेळी आईला माझं बोलणं मुर्खासारखं वाटलं असेल. पण तो अपमान मी विसरले नव्हते. म्हणून पुढे मोठी झाल्यावर मी लहानपणीच्या माझ्यासारख्या दिसणार्‍या बाहुलीचं एक रूप म्हणून, एक प्रतिक म्हणून सगळीकडे माझे पुतळे उभारायला सुरुवात केली. सुदैवाने सत्ता हातात होतीच. अडवायला कोणी नव्हतं. लोकांनी, विरोधी पक्षांनी, प्रसार माध्यमांनी जरा बडबड केली, कोर्टाने फटकारलं (आता फटकारलं हा शब्द पेपरवाल्यांचा नाहीतर इथे मला फटकारायची हिम्मत आहे कोणात?). तर मी माझ्या लहानपणीच्या बाण्याने त्यांनाच उलट विचारलं "जिवंत व्यक्तीचे पुतळे उभारू शकत नाहीत असं कुठल्या कायद्यात लिहिलंय?" सांगा ना.. आहे उत्तर? सगळे एकदम गपगार पाडून गेले. केलं की नाही सगळ्यांना निरुत्तर... !!!

प्रसंग दुसरा : किल्ला *

लहानपणी आम्ही एकदा दिवाळीचा किल्ला करत होतो. छान तयारी चालू होती. सगळेजण एकदम उत्साहात होते. तेवढ्यात तिकडे एक जण आले आणि आम्हाला म्हणाले "तुम्ही इथे किल्ला करू शकत नाही."
मी पुढे होऊन विचारलं "का?"
"कारण तुम्ही इथे किल्ला बांधलात तर चिखलामुळे, दगडविटांमुळे हा परिसर खराब होईल. तुम्ही दुसरीकडे किल्ला बांधा."
आम्ही ऐकत नव्हतो. शेवटी हो-ना करता करता आम्हाला त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं आणि तिकडे किल्ला बांधता आला नाही. हा अपमानही माझ्या चांगलाच जिव्हारी लागला होता त्यामुळे मी तो विसरणं शक्यच नव्हतं. त्यामुळे नंतर राज्य हातात आल्यावर मी ताजच्या परिसरात पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी नटलेल्या इमारती बांधायला मंजुरी दिली. झालं. पुन्हा त्या सगळ्या पेपरवाले, न्यूजवाले, विरोधीपक्ष, कोर्ट अशा सगळ्यांना माझ्या विरुद्ध रान उठवायला संधी मिळाली की मी "ताजचा परिसर खराब करते आहे, या सगळ्यामुळे पर्यावरणाला, ताजच्या सौंदर्याला बाधा येईल म्हणून." लगेच सगळेजण "ताज कॉरिडोर-ताज कॉरिडोर" म्हणून आरडाओरडा करायला लागले.कोर्टाने तर माझ्या अटकेसाठी वॉरंट देखील काढलं होतं. पण मी पुन्हा एकदा शिताफीने सगळं हाताळलं आणि सगळंच प्रकरण थंडावलं. आता तर ते कोणाला आठवतही नाही. मधेमधे कोर्ट उगाच आपलं सीबीआय ला कानपिचक्या (जळ्ळे मेले ते पेपरवाले. 'कानपिचक्या' हा ही त्यांचाच आवडता शब्द. मला तर हल्ली कोर्ट आणि कानपिचक्या हे जोडशब्द वाटायला लागले आहेत. असो.) देत असतं की त्यांनी केसचा तपास नीट केला नाही म्हणून. जाउदे आपल्याला काय. बसुदेत त्यांना भांडत !!

प्रसंग तिसरा : गजरा

आत्मचरित्रात बालपणीच्या गरिबीचा एक तरी प्रसंग असावा असं म्हणतात म्हणून हा गजर्‍याचा प्रसंग देते आता. बालपणी खूप गरिबी होती आमच्या घरी. मला फुलं, गजरे, वेण्या असे प्रकार फार आवडायचे. पण नेहमी घालायला मिळायचे नाहीत. मी आठवड्याच्या बाजारात जाताना नेहमी आईच्या मागे लागायचे की आज मला गजरा घेऊ म्हणून. आई नुसतं होहो म्हणायची. पण कधीच घ्यायची नाही. एकदा आम्ही गजरा घेत असताना एक आणा कमी होता म्हणून त्या गजरेवाल्याने आम्हाला गजरा दिला नाही आणि वर म्हणतो कसा "एक आणाही नाही आणि चालले गजरे घ्यायला". मला तेव्हा एक आण्याचं महत्व कळलं. आणि हळूहळू आपोआपच माझं फुलं, गजरे  याबद्दलचं प्रेम कमी होत गेलं. पण त्या प्रसंगातून झालेला अपमान मी विसरले नव्हते. तो राग कमी झाला नव्हता. म्हणून मग त्या गजरेवाल्याचा नाकावर टिच्चून परवा मी माझ्याच काही लोकांकडून चक्क हजाराच्या नोटांचा हार घालून घेतला. अहो विशेष काही नाही. असेल काहीतरी ४-५ कोटी रुपड्यांचा हार. त्यात काय एवढं विशेष. पण झालं पुन्हा त्या मिडिया, पेपर, विरोधी पक्ष सगळ्यांना अचानक कंठ फुटला. "ही यमाई कसे लोकांचे पैसे उधळते आहे बघा". हे असलं काहीतरी ऐकलं की असला राग येतो ना. आता हे लोकांचे पैसे कसे झाले? माझ्याच पोरांनी देणग्या गोळा केल्या, त्याचे हार बनवले आणि माझ्या गळ्यात हार घातले यात जनतेच्या पैश्यांचा संबंधच कुठून आला? मला तर ती फुलं मेली आवडत पण नाहीत. म्हणून तर नोटांचा हार घातला. पण उगाच एकदा कानफाट्या नाव पडले की उगाच तेवढीच टेप वाजवत बसतात लोक. सगळ्यांनी त्या हारावरून एवढा गोंधळ घातला की काही विचारू नका. पण यावेळा मी अजिबात गप्प बसणार नव्हते. मी त्यांच्यापेक्षाही जस्त खमकी. मला जे विरोध करतात त्यांच्या नाकावर टिच्चून मला जे हवं ते मी करतेच हे मला दाखवून द्यायचं होतंच. दुसर्‍याच दिवशीच्या एका बैठकीत मी पुन्हा माझ्याच पोरांकडून अजून एक असाच हार घालून घेतला. अर्थात तोही काही फार नव्हता. फार तर एक-दीड कोटी रुपड्यांचा असेल. पण मला विरोध करणार्‍यांना मी कशी चपराक देते हे तरी कळलं ना सगळ्यांना.. बास तर !!

------------------------------------------------------------------

यमाबाईंचं बालपण आणि एकूणच सगळं आयुष्य कशा स्फोटक प्रसंगांनी भरलेलं आहे याची वाचकांना कल्पना आलीच असेल. आयुष्य एवढ्या चढउतारांनी भरलेलं असूनही सगळ्या संकटांवर मात करून जिद्दीने वर आलेल्या आपल्या या यमाबाईंचं चरित्र नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल असं आहे. आपण लवकरात लवकर आपली नावे नोंदवून या आत्मचरित्राचं आगाऊ आरक्षण करून मूळ किमतीवर सवलत मिळवू शकता.जाउदे आरक्षण हा शब्द यमाबाईंच्या भलत्याच जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालणारा असल्याने आपण तो न वापरता सरळ सोपा 'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' हा शब्द वापरू.

'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' साठीचे काही नियम

१. 'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' फक्त रोख रकमेतच केले जाईल.
२. 'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' साठी फक्त हजाराच्याच नोटा स्वीकारल्या जातील.
३. नोटांचा हार करून आणल्यास ५% सवलत मिळेल.
४. ज्यांच्या राहत्या घरांच्या आसपासच्या परिसरात मधमाश्यांची पोळी आहेत अशा लोकांची आधी कसून झडती घेतली जाईल आणि मगच प्रवेश दिला जाईल.

* 'प्रसंग दुसरा : किल्ला' अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी जरा इथे नजर टाका.

35 comments:

  1. आधी जेंव्हा मी हि पोस्ट वाचायला सुरवात केली तेंव पहिल्या चार ओळी वाचून सोडून दिली कारण काय लिहिलंय मला काहीही कळल नाही...मग जरा परत थोडयावेळाने परत वाचली व हत्ती पाहिला तेंव्हा कुठे उलगडा झाला याचा...मस्त चिमटे काढलेस रे...बऱ्याच दिवसापासून हा विषय डोक्यात होता वाटत...छान लिहिलास फक्त लहानपणीचे दिवस अजून कसे हालाखीचे होते याचे अजून दोन चार प्रसंग हवे होते अस वाटत... मी तर तिला मुर्ख म्हणून सरळ दुर्लक्ष करतो..(तसही मी लक्ष दिल्याने कोणता फरक पडतो म्हणा तिला )
    बाकी पोस्ट एकदम चिमटा ...

    ReplyDelete
  2. apratim chan..asecha lihit raha

    ReplyDelete
  3. ढासू....बोला वटवटरावांच्या नावानं चांग भलं....

    ReplyDelete
  4. आभार सागर.. बापरे तेच म्हणत होतो मी की एवढी अगम्य झालीये की काय पोस्ट :-)
    हो अजून प्रसंग चालले असते पण तोचतोचपणा आला असता म्हणून टाळले.

    ReplyDelete
  5. खूप आभार मंगेश. अशीच भेट देत रहा.. !!

    ReplyDelete
  6. धन्स अपर्णा.. लय भारी.. चांगभलं चांगभलं !!

    ReplyDelete
  7. सही........एकदम मस्तच.....

    ReplyDelete
  8. माझ्या दहा कॉपी रिझर्व कर ..

    ReplyDelete
  9. :) नक्की करतो. आणि हजाराच्या नोटांचे हार करून आणलेत तर ५% सवलत पण मिळेल वर सांगितल्याप्रमाणे :P

    ReplyDelete
  10. चांगल्या आत्मचरित्राची माहिती करुन दिल्या बद्दल धन्यवाद, असे इन्स्पायरिंग वाचले पाहिजेत, आपण फालतु काहीतरी वाचत असतो ;-)
    सही पोस्ट!

    ReplyDelete
  11. हा हा हा... सही प्रतिक्रिया.. जाम हसलोय... खरंच रे मी पण आता असंच काहीतरी वाचायला सुरुवात करतो :-)

    ReplyDelete
  12. hi.. i have never given blogs a thought before and hence have never logged in or read any..... till i noticed your blogs...! Great stuff... thanks for starting my day in a good note (Ithe sakal zaley.. office chi.. :) )

    ReplyDelete
  13. forgot to add... i signed in this Blogger.com or whatever just so that i could at least post my 'compliments' to you... comment karnyaitki ajun poch nahiye ... ;)

    ReplyDelete
  14. राहुल, एवढ्या छान मनमोकळ्या प्रतिक्रियेला काय उत्तरं देऊ तेच कळत नाहीये. खु SSSSSS प बरं वाटलं एवढंच सांगतो.

    ब्लॉगला असेच भेट देऊन उत्साह वाढवत रहा !!

    ReplyDelete
  15. chhan ahe.. adhi survatila kalale nahi mag kalayala survat zhali.. vachun maja ali
    sonia(kolkata)

    ReplyDelete
  16. सही!
    एकदम खुमासदार पद्धतीने शालजोडीतलेच मारलेस :)

    ReplyDelete
  17. पुढील वर्षी शालेय अभ्यासक्रमात या आत्मचरित्राचा समावेश करावा अशी आपण शालेय पाठ्यपुस्तक मंडळाला विनंती वजा आदेश पाठवू या.शालेय जीवनात अश्याच स्फोटक व्यक्तीमत्वाचा परीचय होणं अत्यावश्यक आहे...यमाबाईच्या नावाने चांगभल!!!!

    ReplyDelete
  18. खुपच मस्त...तोडलस एकदम..चाबुक...मनमौजी, खरच पुढील वर्षी शालेय अभ्यासक्रमात या आत्मचरित्राचा समावेश करायला हवा....

    ReplyDelete
  19. অনেক ধন্যবাদ সোনিয়া.. हम्म. कसं लिहू तेच कळत नव्हतं आधी. त्यामुळे काहीतरी लिहिता लिहिता थोडंसं कन्फ्युझिंग झालं असावं बहुतेक :-(

    ReplyDelete
  20. हो सोनाली. पण हे असले लातोंके भूत (खुमासदार शालजोडीतल्या) बातोंसे (भी) नही मानते !!

    ReplyDelete
  21. हा हा हा मनमौजी. युपी च्या शालेय अभ्यासक्रमात तर या आत्मचरित्राचा समावेश already झालाही असेल :-)
    चांगभलं !!

    ReplyDelete
  22. आभार देव. युपी च्या शालेय अभ्यासक्रमात तर केला जाईलच आणि महाराष्ट्रात पण करण्याचा हट्ट धरला जाईल हे असंच चालू राहिलं तर !!

    ReplyDelete
  23. हा हा ... एवढं स्फूर्तीदायक चरित्र वाचायलाच हवं ... सही लिहिलं आहेस !

    ReplyDelete
  24. नक्कीच वाच. नोटांचे हार पाठवून 'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' करून टाक ;-)

    ReplyDelete
  25. हेरंबा, अगागाSSS... कसले शालजोडीतले हाणलेस रे. अगदी एक एक सही जागी फिट बसलाय. अर्थात तिची कातडी गेंड्याची रे.... असे अनेक पचवून मस्त माजलीये. :D

    ReplyDelete
  26. आभार श्रीताई.. कधीपासून हाणायचे होतेच पण ते दोन हार तात्कालिक कारण ठरले आणि मग झालो सुरु :-)

    खरंच ती तर महाकोडगी आहे. तिला काय फरक पडतोय म्हणा :(

    ReplyDelete
  27. मस्तच! आणि निळा हत्ती बरं..
    यमाबाईंच्या आत्मचरित्राचं उद्घाटन चेक्स ची फित फाडून होणार नाहीये नं?

    ReplyDelete
  28. हा हा.. आयडिया चांगली आहे ग पण यमाबाईंना रोकड्याची भाषाच समजते. त्यांना चेक्स नाही चालणार. फक्त हजाराच्या नोटाच :)

    ReplyDelete
  29. kahi lokanch nashib pan kahihi mhana jorat asat... kitihi paap keli tari pachatat tyana... aani war laaj,lajja wagairecha door door sambandh pan nasato... aso "I still love India".
    btw post= zakkas

    ReplyDelete
  30. आभार श्वेता..
    अगदी खरंय.. आणि ही बाई म्हणजे अशा लोकांची शिरोमणी आहे. :-(
    Of Course I too love India minus Indian politics :-)

    ReplyDelete
  31. हेरम्ब
    तुम्ही म्हणताय ते खरेच आहे. इतकी जाड कातडी पाहिली नाही अजुन. सगळे राजकारणी गेन्ड्याच्या कातडीचे असतात, प्ण this lady takes the cake! हे इतक्या योग्य रीतीने मराठीत नही सान्गु शलले असते. .
    अनुस्वार कसा लिहितात?

    ReplyDelete
  32. खुप मस्त लेख लिहला आहे आवडला खुप मस्त लेख लिहला आहे आवडला

    ReplyDelete
  33. आभार अरुणाताई. या बाईमुळे आता 'गेंड्याची कातडी' ऐवजी 'मायावतीची कातडी' असा शब्दप्रयोग रूढ झाला तर आश्चर्य वाटायला नको.

    मी मराठी लिहायला गुगल IME वापरतो. त्यात म अर्धा किंवा न अर्धा किंवा अनुस्वार असे पर्याय येतात. आपण आपल्याला हवं तो निवडू शकतो.

    ReplyDelete
  34. आभार कृष्णा.. आणि ब्लॉगवर स्वागत. असेच भेट देत रहा.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...