Saturday, March 6, 2010

९७

मी मागे कुठेतरी वाचलं होतं की ९७% लोक विचारलेल्या प्रश्नांची योग्य (अचूक, मुद्देसूद किंवा टू द पॉईंट या अर्थी) उत्तरं देत नाहीत. वाचल्यावर ते मला फारच हास्यास्पद आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटलं. पण त्यात दिलेल्या उदाहरणांवरून ते खरंच असं असतं यावर विश्वास ठेवणं भाग होतं. आता हेच बघा ना.

१. ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला की आपला सहकारी विचारतो "काय रे उशीर झाला का आज?" त्यावर आपण म्हणतो "काय यार या ट्रेन्स. जरा पाउस पडला की लेट" वरवर पाहता हे उत्तर बरोबर आहे पण प्रश्न काय होता? "उशीर झाला का?" यावर 'योग्य, अचूक, मुद्देसूद किंवा टू द पॉईंट या अर्थी' उत्तर काय हवं की "हो झाला". आपण देतो ते उत्तर "उशीर का झाला या प्रश्नाचं असतं".

तुम्हाला फालतूपणा वाटेल हा किंवा "हा शब्दाचे किस पाडतोय" किंवा "शब्दांत पकडतोय" असंही तुम्ही म्हणाल. तर असं म्हणायच्या आधी हे पुढचे प्रश्न बघा.

२. चल येतोयस का रे नाक्यावर?
उ. नाक्यावर? अरे आई आधीच चिडलीये जाम.

३. टपरीवर वडापाव खाताना : "हे काय तुला नकोय वडापाव?"
उ. "वडापाव? अरे दुपारी असल्या हादडल्यात ना पुरणपोळ्या की वाट लागलीये"

४. काय ग तू नाही येतेस ट्रेकला?
उ. आता ट्रेकला आले ना तर बाबा घरातून हाकलून देतील.

५. क्रिकेटची कुठलीही मॅच संपल्यावर सामनावीराला विचारला जाणारा प्रश्न "आज मस्तच खेळलास तू. कसं वाटतंय ?" किंवा याअर्थी एखादा प्रश्न.
उ. आज बॉल चांगला येत होता बॅटवर. मुलं खुपच छान खेळली (Ball was coming nicely onto the bat. Boys played really well चं शब्दशः भाषांतर)

त्यानंतर कधीतरी मी अजून एक गोष्टही वाचली होती ती म्हणजे "प्रजेची जशी लायकी असते तसा राज्यकर्ता तिला मिळतो." चर्चिल म्हणाला होता म्हणे असं. यस्स. तरीच.. त्यामुळे होय. आणि त्या क्षणी मला पत्रकार परिषदांमध्ये, बजेटच्याआधी, निवडणुकांच्या आधी (आणि नंतरही), पेपरांत येणा-या इनोदी मुलाखती आणि बातम्यांची (पेड न्यूज की कायसंस) संगती लागली. ३% अचूक बोलणा-या जनतेला राज्यकर्तेही असेच मिळणार नाही का?



प्रश्नोत्तरे वाचण्यापूर्वी (आणि नंतरही) घ्यायची खबरदारी :

१. यातल्या एकाही उत्तराचा त्याच्या (स्वतःच्या) प्रश्नाशी दुरान्वयेही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
२. उत्तरे वाचून आलेल्या नैराश्याच्या झटक्यांना आम्ही जवाबदार राहणार नाही.

--------------------------

प्र. महागाई कमी कधी होईल ?

उ. जीडीपी सव्वा टक्क्याने वाढलाय. इन्फ्लेशन पाऊण टक्क्याने कमी झालंय. ते आम्हाला पुढच्या वर्षी अजून एक टक्क्याने अनुक्रमे जास्त आणि कमी करायचंय आणि ते आम्ही करूच अशी आम्हाला खात्री आहे. आपली अर्थव्यवस्था अतिशय मजबूत आहे. दरडोई उत्पन्न वाढलंय. सेन्सेक्सचा रोख सतत वरच्या दिशेने आहे. सामान्य माणसाच्या हातात पैसा खेळतो आहे. आपण अधिकाधिक परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करतोय. चीनचा जीडीपी आपल्यापेक्षा थोडासाच अधिक आहे. आपली खरी स्पर्धा त्यांच्याशीच आहे. ही स्पर्धा अधिकाधिक निकोप, निर्भेळ आणि निर्दोष राहील या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं आहे. पूर्वी दारिद्र्य रेषेखाली असणारे अनेक लोक आता वर आले आहेत (किंवा वर गेले आहेत). शेजारील देशांशी आयात-निर्यात वाढवणे यावर आम्ही विशेष भर देणार आहोत. इ इ इ इ

प्र. विजेची टंचाई कधी नाहीशी होणार? वीजकपात (load shedding) पूर्ण बंद कधी होणार?

उ. आधीच्या सरकारने केलेल्या चुका दुरुस्त करणे हे एक महत्वाचं काम आहे. त्याच चुका आम्ही पुन्हा करणार नाही. आम्ही औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातून एक हजार एकशे एकोणपन्नास मेगावॅट वीज निर्माण केली आहे. पुढील वीस वर्षांत आम्ही अजून चार ठिकाणी अशी वीज निर्मिती केंद्र उभारायच्या विचारात आहोत ज्यामुळे गावागावातल्या घराघरांत वीज खेळवणं शक्य होईल. जेणेकरून घराघरातील, मनामनातील अंध:कार दूर होईल. झालंच तर आण्विक उर्जानिर्मितीवर अधिक भर द्यायचाही आमचा विचार आहे. त्यासाठी आम्ही देशांतर्गत तसेच परदेशी संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत. आत्तापर्यंत मिळालेला प्रतिसाद हा चांगला आहे. अंधाराचा नाश हेच आमचे उद्दिष्ट आहे. तमसो मा ज्योतिर्गमय. वगैरे वगैरे वगैरे.

प्र. शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा कधीपासून सुरु होईल?

उ. जलसंपत्तीवृद्धी प्राधिकरणान्वये आम्ही अधिकाधिक पाणी पुरवठ्याचे उपाय शोधत आहोत. तसेच 'ग्लोबल वार्मिंग आणि जगातील पाणी टंचाई' या विषयावर पुढच्या महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये  भरणा-या परिषदेत आम्ही आमचे प्रतिनिधी पाठवणार आहोत. तसेच 'नेदरलँड्समधील भूमिगत कालवे आणि गटारे' यांचा तौलनिक आणि तात्विक अभ्यास करण्यासाठी आम्ही एक समिती नियुक्त केली आहे. ती समिती या परदेश दौ-यावरून परत येताच त्यावर एक अहवाल तयार करेल आणि तो अहवाल तपासण्यासाठी आणि त्यात सुचवलेल्या उपायांची शक्याशक्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही जलप्रसारक मंडळ स्थापून मंडळाच्या सल्ल्याने पुढील वाटचाल करू. या वाटचालीत सर्व सामान्य माणसाने आम्हाला पावलोपावली साथ देण्याची गरज आहे. फलाणा फलाणा फलाणा


प्र. सर्वत्र झालेली रस्त्यांची दुर्दशा कधी दूर होईल. सगळे रस्ते कधी दुरुस्त होतील?

उ. तुम्ही कुठल्या एखाद्या विशिष्ठ परिसरातील गल्लीतील रस्त्यांबद्दल विचारात आहात का? कारण आमच्या माहितीप्रमाणे आणि आम्हाला मिळणा-या अहवालानुसार तरी सगळे रस्ते अतिशय उत्तम अवस्थेत आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका NGO च्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या मानाने रस्त्यावर होणा-या अपघातात १.३७०४ टक्क्याने घट झालेली आहे. काही ठिकाणी कंत्राटदारांनी रस्ते चुकीच्या ठिकाणी खणून ठेवले असले तरी अशा रस्त्यांची संख्या नगण्य आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा पेपर बघितलात की दरवर्षीप्रमाणेच आमचे आयुक्त शहरातील रस्त्यांच्या अवस्थेचा परामर्श घेताहेत हे आपल्या लक्षात येईलच. तसेच आम्ही पावलोपावली टोल(धाडी)नाके बसवून त्यातून जमा होणा-या उत्पन्नातून रस्त्यांची स्थिती अजून सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी टोलनाक्यांवर सहकार्य देण्याची गरज आहे. blah blah blah.

प्र. वारंवार होणारे अतिरेकी हल्ले पूर्णतः कधी थांबतील?

उ. अतिशय चांगला प्रश्न विचारलात. सर्वप्रथम प्रत्येक हल्ल्यानंतर डगमगून न जाता, अतिरेक्यांचा निडरपणे सामना करून दुस-याच दिवशी पोटापाण्या साठी बाहेर पडणा-या आणि शहराची घडी सुरळीत बसवणा-या जनतेच्या स्पिरीटचं मी कौतुक करतो. त्यांच्या अपार धैर्याला सलाम करतो. आत्ताच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी (उभे राहतात) फोन करून या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि सर्वप्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आम्ही आमच्या मागण्यांचं आणि निषेधाचं पत्र आम्ही अमेरिकेच्या अध्यक्षांना आणि UNO, आणि जागतिक शांतता परिषद अशा सगळ्यांना पाठवणार आहोत. आम्हाला खात्री आहे की आम्ही जगाचं लक्ष या मुद्द्याकडे वेधण्यात यशस्वी होऊ. मी प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना १ लाख आणि जखमींना २० हजार रुपये देण्याची घोषणा करतो. या भ्याड हल्ल्याने आमची शेजारी राष्ट्रांशी चालू असलेली शांतता चर्चा थांबणार नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत राहूच. शेजारील राष्ट्रातील निरक्षरता कमी करून तेथील लोकांना उदरनिर्वाहाची साधने प्राप्त करून देणे, दोन्ही देशांत दळणवळण, व्यापार उदीम वाढवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल. अशा रीतीने अधिकाधिक उद्योगधंद्यांना वाव मिळून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली की अतिरेकी हल्ले आपोआपच कमी होतील असा आम्हाला विश्वास आहे. हे अतिरेकी हल्ले आणि दोन्ही देशांदरम्यानच्या चर्चा याची सरमिसळ करण्याची चूक काही लोक करतात. ते चूक आहे. जय हिंद..

बोला... यातल्या एकातरी 'कधी' चं उत्तर अचूक, 'to the point' वगैरे ऐकलंय????
(अचूक, मुद्देसूद, 'टू द पॉईंट' उत्तर द्या नाहीतर तुम्हीही त्या ९७ टक्क्यातलेच आहात असं खेदाने वगैरे म्हणावं लागेल.)

30 comments:

  1. "३% अचूक बोलणा-या जनतेला राज्यकर्तेही असेच मिळणार" हे पटलं पटलं पटलं...maths ani economics donhi changale aahet asa distay tujhe....

    ReplyDelete
  2. खरंच ग. हे लोक 'कधी' या प्रश्नाचं उत्तर सोडून बाकी सगळा फापटपसारा लावत असतात.

    अग दोन्हीची बोंब आहे खरं तर ;-)

    ReplyDelete
  3. हा हा हा, अगदी नेमका मुद्दा पकडलात....भारताचं तर कळलं, पण जगात इतरत्र कितपत अचूक उत्तरे दिली जातात व त्या त्या ठिकाणचे सरकार, त्यांची कार्यपद्धती याचा अभ्यास करू गेल्यास तो एक वेगळा संशोधनाचाच विषय होईल!

    अरुंधती
    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    ReplyDelete
  4. "३% अचूक बोलणा-या जनतेला राज्यकर्तेही असेच मिळणार" . . .१००% सहमत. . .मुद्द्याच सोडून बाकी सर्व बोलतात!!!

    ReplyDelete
  5. हे हे हे..मस्त एकदम वास्तववादी. राजकारण्यांसाठी हे प्रमाण १००% नाही का? साले कधीच एकसंध बोलत नाहीत.

    ReplyDelete
  6. ९७ % लोक आणी त्यांचे नेते चुकीची उत्तर देत असतील पण त्यावर लिहलेला हा लेख १०० % परफ़ेक्ट आहे.छान विश्लेषण केल आहे नेत्यांच्या वक्तव्याच...

    ReplyDelete
  7. नाही!!!! (शेवटी विचारलेल्या प्रश्नाच अचूक, मुद्देसूद आणि टू द पॉईंट उत्तर.. ;))
    मस्त!!! (ह्या पोस्ट बद्दल अचूक, मुद्देसूद आणि टू द पॉईंट कॉमेंट...)
    btw.. एवढं मुद्देसुद कसं काय लिहु शकतोस? मानलं तुला!!!

    ReplyDelete
  8. एक म्हण आहे जर बुध्दी कमी असेल, आणि काय उत्तर द्यावे हे समजत नसेलत ्तर.. इंग्रजीत म्हण आहे. If you cant convince, better confuse...
    मला आवडते ही म्हण.
    अरे सुपर्णाचा ब्लॉग सुरु केलाय आज. टाइप अर्थात मी केलंय. पुर्वी केलेलं दुरुस्त केलं सगळं ह्र्स्व दिर्घ वगैरे. http://kachapani.wordpress.coom

    ReplyDelete
  9. अरुंधती, जगात सगळीकडेच हे असं चालत असणार याबद्दल तीळमात्र शंका नाही माझ्या मनात. सत्ता हाती आली की तिच्याबरोबर मद, मस्ती, सामान्यांबद्दल तुच्छता, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष हे दुर्गुण आपोआपच येत असावेत. :(

    ReplyDelete
  10. मनमौजी, असल्या राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना टक्केवारी नव्याने शिकवावी लागणार आहे.

    ReplyDelete
  11. :D :D :D .. सुहास, अगदी बरोबर बोललास. राजकारण्यांसाठी हे प्रमाण १००% आहे. अगदी खरं.

    ReplyDelete
  12. धन्यवाद देवेंद्र.. जाम करमणूक होते यांच्या मुलाखती वाचल्या की.पहिल्या आणि दुस-या वाक्याचा एकमेकांशी काही संबंध नसतो की धरबंध नसतो.

    ReplyDelete
  13. गजानन, तू अगदी निर्विवादपणे ३ टक्क्यातला आहेस हे मात्र नक्की :)
    अरे पेपर उघडून यांची बडबड वाचली की जाम करमणूक होते. त्यावर काहीतरी लिहीत गेलो तर ते आपोआपच मुद्देसूद झालं. :)

    ReplyDelete
  14. काका, तुम्हाला उत्तर द्यायच्या आधी मी सुपर्णाताईंच्या ब्लॉगवर जाऊन तिकडे कमेंटून आलो आधी :-) .. माझी पहिली कमेंट आहे त्यांच्या ब्लॉगवर. आणि त्यांच्या कविता टाका ना आता लवकर. वाट बघतोय.

    आता माझ्या पोस्टबद्दल :) .. हो ती म्हण तर मस्तच आहे. मलाही आवडते. आपल्या राजकारण्यांना तर एकदम चपखल बसते.

    ReplyDelete
  15. हं! तांत्रिकदृष्ट्या हे उत्तर बरोबर वाटतंय. पण समज "हे काय तुला भजी खायची नाहीत?" या प्रश्नाचं तांत्रिकदृष्ट्या मुद्देसुद उत्तर "नाही" असं दिलं तर कदाचित प्रश्नकर्त्याला राग येऊ शकतो की "काय, मी इतक्या प्रेमाने भजी खाऊ घालतोय नी याला ती खायची नाहीत." मात्र त्याच प्रश्नाचं उत्तर जर "नाही रे, आज उपास आहे." असं दिलं तर प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाचा रोख ओळखून आवश्यक ते मुद्देसुद उत्तर दिल्यासारखं होत नाही का? कारण यात प्रश्नकर्त्याच्या भावनांचा मान राखून त्याला आपल्याही अडचणीची जाणीव करून दिली जाते (थोडक्यात, गैरसमज टळतो). सर्वच प्रश्नांची उत्तरं मुद्देसुद दिली तर एका उत्तरातूनही अनेक प्रश्न निर्माण होऊन निरर्थक खेळ होऊ शकतो म्हणून कदाचित तांत्रिकदृष्ट्या मुद्देसुद नसूनही लांबलचक उत्तराचीच वाट चोखाळली जाते.

    ReplyDelete
  16. कांचन, अगदी बरोबर आहे. मी हा राग येण्याचा मुद्दा मांडणारच होतो. राहून गेला चुकून. पण राग येईल म्हणून मुद्देसूद उत्तरापेक्षा फापटपसाराच अधिक मांडला जातो कधी कधी. आपल्या बोलीभाषेच्या वापरामुळे असेल कदाचित.
    ते आर्टीकल (किंवा व्याख्यान.. आता ते पण नक्की आठवत नाहीये) झाल्यावर आम्ही मित्र मित्र त्याच्यावर ब-याच वेळ बोलत होतो आणि त्यातून एकेक उदाहरणं निघत गेली आणि आम्हाला त्या विधानाची सत्यता पटत गेली. मला सगळी उदाहरणं आठवत नाहीयेत आणि कदाचित मी दिली ती उदाहरणं मुद्दा पूर्ण आणि योग्य मांडतही नसावीत.
    असो. पण राजकारण्यांच्या शब्द-फिरवाफिरवी बद्दल आपलं एकमत असेल हे नक्की. :)

    ReplyDelete
  17. कांचन, आणि अजून एक मुद्दा म्हणजे हे ९७ वगैरे just तोंडी लावण्यापुरतं होतं. (तो किस्सा अगदी खरा आहे मात्र.) मुख्य म्हणजे नेत्यांच्या, राजकारण्यांच्या बडबडीवर (जरा तिरसट) भाष्य करणं हा मुख्य हेतू होता.

    ReplyDelete
  18. १०१% अचूक विश्लेषण. पण अनेकदा खरं बोललं तर खुर्ची जायची पाळी येईल ना रे.... मग अशी गोलमोल घुमवाघुमवी करत राहायची. मुळात कुठलीही चर्चा घ्या, कुठून सुरू होते आणि कुठे संपते... शेवटी मुद्दा राहतो बाजूला आणि भलतीच गुद्दागुद्दी सुरू होते. तीही तावातावाने. गेल्या सहा-आठ महिन्यात किती प्रत्यय आलाय की याचा. बाकी लय भारी बरं का.:)

    ReplyDelete
  19. या 'कधी'च उत्तर हे लोक कधीच सरळ देत नाहीत आणि देणार हि नाहीत

    ReplyDelete
  20. अगदी बरोबर बोललात भाग्यश्रीताई. खुर्ची जपण्यासाठीची केविलवाणी धडपड करताना चर्चा फक्त नावापुरत्याच राहतात. आणि ज्यांनी जवाबदारीने काम करायचं त्यांचे चित्रविचित्र 'जवाब' ऐकून हसावं की रडावं ते कळेनासं होतं.

    ReplyDelete
  21. अगदी बरोबर बोललास विक्रम. ९७ नाही ९८ नाही अगदी १००% सत्य.

    ReplyDelete
  22. राजकारण्यांच्या मुलाखती फारच बारकाईने वाचतोस बुवा तू... :)
    त्यांचा फापटपसार्‍यासारख्या मुलाखती ह्यामुळेच वाचणे सोडुन दिल्या..
    पण तुझे निरिक्षण १००% बरोबर आहे...

    ReplyDelete
  23. हा हा हा... अरे जेव्हा पेपर उघडावा (क्लिकावा) तेव्हा तेव्हा हे असलंच काहीतरी अगम्य आणि अर्थहीन वाचायला लागतं. म्हणून म्हंटलं हाणूया थोडे जोडे.. !!

    ReplyDelete
  24. छान लिहिली आहे पोस्ट... :-) आपले षंढ राजकारणी ’कधी’चंच नाही तर कुठल्याच प्रश्नाचं उत्तर टू द पॉइंट देत नाहीत. उलट प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणं आणि प्रत्येक वेळी आपलीच टिमकी वाजवणं हेच प्रकार चालू असतात नेहमी. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर माननीय(??) आबा पाटील म्हणाले होते, ’दहशतवाद्यांचा ५००० माणसं मारण्याचा डाव होता. आमच्या कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे त्यांनी फक्त ५०० च माणसं मारली!’ Very to the point answer... I am really impressed.

    ReplyDelete
  25. खरंय रे. या राजकारण्यांमुळे तर हा ९७ चा नियम अजूनही यशस्वीपणे सिद्ध होऊन तग धरून राहिलाय !

    >> 'दहशतवाद्यांचा ५००० माणसं मारण्याचा डाव होता. आमच्या कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे त्यांनी फक्त ५०० च माणसं मारली!’

    वा आबा वा. महान आहात. त्या पाचशेत तुम्हीही का नाही गेलात.. अरेरे :(

    ReplyDelete
  26. खरं आहे. मी पण आत्ता लक्ष्यात ठेवेन. राजकारणी सुधारणार नाहीत पण निदान मी रीतसर उत्तर देऊन ते ३% वाढवण्याचा प्रयत्न करेन.

    आणि हो रे... प्रत्येक सामनावीराच्या बॅटवर बॉल चांगलाच येतो (अगदी सर सचिन पण न चुकता हा डायलॉग मारतो). मी पण पकलोय हे ऐकून. कधीतरी कुणीतरी "समोरचा बोलर/बॅट्समन फडतूस होता आणि संपूर्ण विरोधी टीम गल्ली क्रिकेट खेळायच्या पण लायकीची नसताना देखील आम्ही केवळ प्रेक्षकांचे पैसे वसूल व्हावे म्हणून हा सामना जाणूनबुजून अतीतटिचा बनवून खेळलो" असे म्हणा रे!!!

    ReplyDelete
  27. सिद्धार्थ, राजकारणी तर कधीच सुधारणार नाहीत.. आपणच ३% वाढवायचा प्रयत्न करायचा :)

    हा हा.. खरंय रे.. असं कोणीतरी एकदा म्हटलंच पाहिजे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये. सगळं गुडी गुडी चालु असतं तिथे !

    ReplyDelete
  28. far manavar gheu naka.
    3 % che 3.5 % honya var Baragaddi ne bandi ghatali ahe.

    3.5 % chi Bamane. thoka tenala.:):)

    ReplyDelete
  29. हा हा अनामिक धन्यवाद. ही पोस्ट लिहिली तेव्हा या नव्या टक्केवारीची जाणीवही नव्हती डोक्यात :)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...