Monday, June 21, 2010

त्याच्या पाईकांचे मेंदू

हा धर्म

१. हा धर्म माझ्यावर कुठल्याही विशिष्ट दिवशी देवळात गेलंच पाहिजे अशी जबरदस्ती करत नाही. मी देवाच्या दर्शनाला कधीही जाऊ शकतो. किंबहुना देवळात गेलंच पाहिजे असाही अट्टाहास नाही.

२. मी देवाला मानत नाही या कारणावरून मला धर्मभ्रष्ट ठरवून माझी समाजातून/धर्मातून हकालपट्टी केली जात नाही किंवा तशा प्रकारचे काही फतवे बितवे निघत नाहीत.

३. हा धर्म माझ्यावर दिवसातून ३-४-५-६-७-८ वेळा प्रार्थना करायची सक्ती करत नाही. किंबहुना प्रार्थना कराच अशीही सक्ती करत नाही.

४. केवळ धर्म सांगतो म्हणून मला याच भाज्या खा आणि त्या भाज्या खाऊ नका असे प्रकार करावे लागत नाहीत. माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीत हा धर्म लुडबुड करत नाही.

५. माझा पोशाख, राहणी आणि सवयी ठरवण्याचा अधिकार या धर्माला नाही आणि समजा असला तरी त्याची सक्ती केली जात नाही. धर्म सांगतो म्हणून मला दाढी वाढवावी लागत नाही की टोपी घालावी लागत नाही. शस्त्रं बाळगावी लागत नाहीत की सक्तीच्या एककल्ली अहिंसेचा मार्ग पत्करावा लागत नाही.

६. हा धर्म आपल्या प्रार्थनास्थळात कुठल्याही अन्य धर्मियाला प्रवेश नाकारत नाही की मला अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळात जाण्यापासून रोखत नाही.

७. हा धर्म "भाकरीच्या किंवा धनाच्या बदल्यात धर्म बदला" असं सांगून कोणाच्याही फसव्या 'लुबाड-मदती' करत नाही की दिशाभूली करून छुप्या सौदेबाज्या करत नाही.

८. मी सगळं खाणंपिणं सोडून देऊन (प्रसंगी तब्येती बिघडवून घेऊन) अघोरी उपास करावेत अशी बळजबरी हा धर्म माझ्यावर करत नाही.

९. धर्मयुद्धाच्या नावावर या धर्माच्या सोडून अन्य सर्वधर्मियांच्या कत्तली करून तोच स्वर्गात जाण्याचा, मुक्तीचा, अंतिम सुखाचा एकमेव मार्ग असल्याच्या भ्रामक, धूर्त, फसव्या, अतिरेकी कल्पना हा धर्म माझ्या मनात भरवत नाही.


पण हाच धर्म

१. पण हाच धर्म लोकाग्रहामुळे अग्निपरीक्षा द्यायला लावून त्यातून सुखरूप बाहेर पडलेल्या आपल्या पत्नीला एका सामान्य धोब्याच्या फुटकळ टोमण्यांवरून ऐन गरोदरपणात वनवासाला पाठवणार्‍या राजाला देवत्व बहाल करतो.

२. "गुरंढोरं, शूद्र आणि नारी म्हणजे ताडनाचे अधिकारी (यांचा जन्म मार खाण्यासाठीच झालेला आहे)" असं अधिकारवाणीने सांगणार्‍याचे ग्रंथ डोक्यावर घेतो.

३. बालविवाह, सतीप्रथेचं परकीयांनी इथे येऊन नियम-कायदे करून सुसूत्रतेने उच्चाटन करेपर्यंत धर्मात सांगितलं आहे म्हणून त्या प्रथा पाळायला लावतो.

४. नवरा मेल्यानंतर स्त्रीचं केशवपन करून तिला कुरूप करून तिच्या दु:खावर अजूनच डागण्या देत ती अधिकाधिक एकलकोंडी कशी होईल हे बघतो. तिला पुनर्विवाह करणं नाकारून, लग्न, आणि अन्य तत्सम धार्मिक आणि सामाजिक सणसमारंभापासून तिला वेगळी काढतो.

५. चातुर्वर्ण्याचे नियम कसे योग्य आहेत हे अहमहमिकेने पटवून देऊन आजच्या युगातही जातीपातीच्या भिंती तोडण्याऐवजी त्या अधिकाधिक उंच आणि बळकट कशा होत राहतील याची खबरदारी घेतो.

६. जबरदस्तीने धर्मांतर झालेल्यांना स्वधर्मात परत घेणं हे कसं अशक्य आहे अशा भाकडकथा सांगतो.

७. एखाद्याच्या जातीवरून त्याला वेदविद्याग्रहणाचे अधिकार आहेत की नाहीत हे ठरवतो.

८. देवाला नैवेद्य म्हणून हजारो मुक्या प्राण्यांच्या कत्तली करण्यास प्रवृत्त करतो.

अरेच्च्या पण हा एवढा पॉवरफुल धर्म आहे तरी कोण? कुठला? कसा दिसतो, कसा वागतो, कुठे राहतो, काय करतो? अंगुलीनिर्देश करायचा झाल्यास कोणाकडे करायचा? त्याला त्याच्या नावाने हाक मारली तर ओS देऊन कोण पुढे येईल? असे सगळे विचार करेकरेतो लक्षात आलं की असं कोणी नसतंच.. असं काही नसतंच. एखाद्याकडे बोट दाखवून "हाच तो धर्म" असं बेछूटपणे नाही म्हणता येणार. फार तर काय, हा माणूस त्या धर्माचा, त्या पंथाचा आहे असं म्हणता येईल.. पण तो माणूस, ती बाई, ती व्यक्ती म्हणजेच तो धर्म, तो पंथ असं होऊ शकत नाही. ती व्यक्ती त्या धर्माची आहे पण तीच म्हणजे तो धर्म नव्हे. तर अशा अनेक व्यक्ती मिळून बनलाय तो हा धर्म. ती माणसं आहेत म्हणून तो धर्म आहे. आणि त्या माणसांची मतं, त्या सार्‍या समूहाची मतं ही त्या धर्माची अंतिम सत्य असल्याच्या थाटात मांडली जातात, आदळली जातात, भिरकावली जातात. पण खरं काय तर धरम बिरम सब झुठ... त्याच्या पाईकांचे मेंदू शाबूत आहेत की सडके हेच महत्वाचं !! तेच अंतिम सत्य... !! ओम शांति: शांति: शांति: .... आमेन.. !!

35 comments:

  1. जबरी .... तोडलस....

    ReplyDelete
  2. हम्म्म...अफ़ुची गोळीच ती....काहींना जरा जास्तच लागते....बाकीच्यांना नाही....
    तर काही चक्क ही गोळी देऊन राजकारणं पण करतात....

    ReplyDelete
  3. यस्स.. राजकारणात तर ही गोळी भलतीच प्रभावी आहे. १००% इलाजाची ग्यारंटी !!

    ReplyDelete
  4. कुठलाही धर्म कसलाच अट्टहास करत नाही... एखाद्या गोष्टीला होय किंवा नाही... एकमात्र खरे तो व्यक्तीसापेक्ष आणि मुख्य करून कालसापेक्ष असतो... तेंव्हा... मुळात धर्माची व्याख्या काय घ्यायची??? आजची की जुनी???

    ReplyDelete
  5. मेंदू सडकेच रे..धर्माची व्याख्या स्वताच्या फायद्यासाठी बदलणारे हे लोक काय धर्माच्या गोष्टी सांगतायत :(

    ReplyDelete
  6. जबरदस्त! मान गये सरजी!!

    ReplyDelete
  7. कुठलाही धर्म कसलाच अट्टहास करत नाही...

    पण या सडक्या मेंदुच्या राजकारण्याणी / भोंदु बाबांनी त्यांच्या फायद्यासाठी त्याला पाहिजे तसा वाकवला आहे.
    आणि बर्याचश्या सडक्या मेंदुच्या लोकांनी आंधळेपणाने ते मान्य केल आहे.

    ReplyDelete
  8. ”धर्मकारणाने केलेली गेम’हा हुकुमी व प्रभावी हातखंडा. काल होता आज आहेच व उद्याही असणारच. :(

    ReplyDelete
  9. धर्माच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घ्यायची....प्रत्येक जण आपल्या सोयी नुसार धर्म अन् त्याच्या व्याख्या ठरवत असतो...असो हे असच चालायच!!!

    ReplyDelete
  10. ज्याला तुम्ही वेगवेगळ्र्या पध्दतीने धर्म म्हणता ते कधीच प्राण सोडून दिलेले प्रेत आहे, मग तो हिंदू असो, ख्रिस्ती असो की मुस्लिम. त्यामुळे प्रेताचा कुठला भाग सडला आहे आणि कुठला शाबूत आहे आणि सडलेल्या भागामुळे कुणाला किती संसर्ग झाला आहे याला अर्थ नाही. धर्म कधीच समूहाचा नसतो. कधीतरी कुणा कृष्ण, कधी ख्रिस्त, कधी गौतम सिद्धार्थ, कधी एखादा महंमद, कधी महावीर, कधी जे. कृष्णमूर्ती, कधी रजनीश, कधी एकहार्ट टोली यांना त्यांचा जीवंत धर्म सापडतो, तो त्यांच्या हयातीतच जीवंत असू शकतो - ते गेले की धर्म देखील जातो.

    ReplyDelete
  11. जब्बरदस्त हेरंब, अगदी अक्षर-न-अक्षर पटले.... जाम आवडली ही पोस्ट

    ReplyDelete
  12. हेरंब, अतिशय चोख लेख आजची वस्तुस्थिती अचूक वर्णीत केली आहे...मलातरी धर्माच्या नावाखाली असल्या चीड आणणार्या गोष्टी मुळीच पसंत नाहीत आणि त्या गोष्टींचा उदो-उदो करणारे तर मुळीच नाही...

    ReplyDelete
  13. सडेतोड लिहल आहेस..आवडल..आपल्या फ़ायद्यासाठी लोक धर्माचा हवा तसा वापर करतात...

    ReplyDelete
  14. योग्य लिहिलं आहेस...
    लोक आपल्या मताने धर्माची व्याख्या करतात...पण शेवटी धर्म म्हणजे काय? तुमची सद्सद्विवेकबुद्धी जे सांगते तोच खरा धर्म!

    ReplyDelete
  15. खरंय रोहन. अरे पण यातल्या कित्येक रुढी (केशवपन, सती आणि अशा अनेक वगैरे) कुठल्याही व्यक्तीने आणि कुठल्याही काळात मांडल्या गेल्या असल्या आणि धर्माची कुठलीही व्याख्या घेतली तरीही त्या अमानुषच. आणि राजस्थान, बिहार मध्ये तर बालविवाह अजूनही सर्रास होतातच. अर्थात अतिशय सहिष्णू धर्म असल्याने पहिल्या भागात सांगितलेल्या अनेक चांगल्या गोष्टीही त्यात आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. केशवपनाची पध्दती माझ्या मते फक्त ब्राम्हण/ऊच्च वर्णीयांना लागु होती. अर्थात माझी माहिती अल्प आहे.

      Delete
  16. सुहास. खरंय. अशा बदलत्या व्याख्यांपासून आपण साऱ्यांनीच सांभाळून राहिलं पाहिजे.

    ReplyDelete
  17. अभिलाष, खूप आभार.

    ReplyDelete
  18. अनेक आभार, माऊ.

    ReplyDelete
  19. सचिन, पूर्ण सहमत. आणि दुर्दैवाने हे प्रत्येक धर्मात घडतंय आणि प्रत्येक धर्मातले लोक त्याला बळी पडतायत.

    ReplyDelete
  20. श्रीताई, काळ बदलला, युगं सरली तरी या अशा गोष्टी नियमित आणि अबाधितपणे घडत असतात हे आपलं दुर्दैव !!

    ReplyDelete
  21. योगेश, सामान्य माणसाला त्याच्या धर्माची व्याख्या ठरवण्याचं आणि त्याप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य नाही (हिंदू धर्मात हे किमान थोडं तरी आहे. अन्य धर्मात जवळपास नगण्य प्रमाण) हेच मोठं दुर्दैव. त्यामुळे वर्षानुवर्षं कुठलातरी बाबा, मौलवी, पोप वगैरे हे सगळे नियम ठरवणार आणि जगावर लादणार.. !! असो ..

    ReplyDelete
  22. यशवंत आभार. पण त्या त्या महान लोकांच्या स्वतःला त्यांचे वंशज, प्रेषित म्हणवून घेणार्‍या लोकांचा बुजबुजाट वाढला की समाज रसातळाला गेलाच म्हणून समजा.

    ReplyDelete
  23. आनंदा, मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार्स..

    ReplyDelete
  24. आभार भारत. हीच सद्यस्थिती आणि सत्यस्थिती दोन्ही आहे हे आपलं दुर्दैव..

    >>मलातरी धर्माच्या नावाखाली असल्या चीड आणणार्या गोष्टी मुळीच पसंत नाहीत आणि त्या गोष्टींचा उदो-उदो करणारे तर मुळीच नाही.<<

    अगदी .. मलाही..

    ReplyDelete
  25. देवेन, आभार. त्यांना कोणी विरोध करत नाही ना म्हणून. 'मुकी बिचारी कुणी हाका' वाला प्रकार चालू असतो. दुर्दैव !!

    ReplyDelete
  26. आभार बाबा. सुंदर. ही अगदी साधी सोपी सरळ व्याख्या. पण ही अनेकांच्या फायद्याची नाही ना त्यामुळे स्वीकारली जाणार नाही. :(

    ReplyDelete
  27. धर्म काहीच सांगत नाही, पण राजकर्त्यांनी आपल्या सोई साठी सर्व के ले आहे, राजकारण, अंधश्रद्धा व बेकारी, हि कारणे दाखून राजकारण्यांनी त्याचा फायदा करून घेतला आहे,

    ReplyDelete
  28. Chaan aahe post....Nehmipramanech....!!!
    Aani ho hya adhichi post suddha chaan ch hoti...
    Comment lihayala jamale nahi Admssn chya gadbadi mule.... :)

    ReplyDelete
  29. आभार काका,

    खरंय धर्माचा स्वार्थी अर्थ लावणारे लोकच जवाबदार आहेत याला.

    ReplyDelete
  30. धन्स मैथिली. हो कळलं तुझ्या अ‍ॅडमिशनचं. तुझा बझ वाचला. अभिनंदन..

    ReplyDelete
  31. मला जे लिहायचं होतं, ते पहिल्या प्रतिक्रियेत लिहिलेलं आहे.
    सध्या स्वार्थ हाच धर्म आहे.

    ReplyDelete
  32. आभार कांचन..

    >>सध्या स्वार्थ हाच धर्म आहे.<<

    हेच आपलं सगळ्यांत मोठं दुर्दैव आहे. :(

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...