Tuesday, April 5, 2022

काश्मिरी पंडितांची भयकारी रोजनिशी : दहशतीच्या छायेत

रोजनिशी स्वरूपात लिहिलेल्या पुस्तकांच्या बाबतीत काही महत्वाच्या बाबी सांगायच्या झाल्यास त्यांची यादी खालीलप्रमाणे करता येईल. 

१. लेखन बऱ्याचदा विस्कळीत स्वरूपात असतं. व्यक्ती, स्थळ, घटना यांची स्पष्ट ओळख दर वेळी असतेच असं नाही. अनेकदा एखाद्या दिवशी एका ओळीची एखादी छोटीशी नोंद असते तर कधी कधी पानभर लिखाण केलेलं असतं. 

२. (दिनांक लिहिला नसल्यास) काळाबद्दल स्पष्ट माहिती दर वेळी मिळतेच असं नाही. लेखनात उल्लेख आलेल्या राजकीय आणि सामाजिक घटना आणि संदर्भ यांच्या आधारे काळाचा अंदाज बांधावा लागतो. 

३. पुस्तक स्वरूपापेक्षा ते बऱ्याचदा 'स्वतःपुरत्या केलेल्या अनुभवांच्या नोंदी' या स्वरूपात असल्याने रोजनिशी लिहिणाऱ्या व्यक्तीची मनःस्थिती, सामाजिक स्थान, आर्थिक परिस्थिती या आणि अन्य बऱ्याच बाबींची छाया त्या अनुभवकथनावर असते.

परंतु एवढे सगळे दोष किंवा उणीवा असूनही अनेकदा अशी पुस्तकं अतिशय लोकप्रिय होतात किंवा अगदी स्तिमित करणारी, काळजाचा तळ ढवळून काढणारी असतात आणि याचं एकमेव किंवा निदान सर्वात महत्वाचं कारण म्हणजे (बऱ्याचदा) ती सत्यघटनांवर आधारित असतात. पुस्तकात घडणाऱ्या अमानुष घटना, अन्याय, क्रौर्य हे कोणीतरी भोगलेलं असतं आणि ते अनुभव लिहून ठेवायला ती व्यक्ती मागे जिवंत राहिलेली असते ही जाणीवच वाचकाचा थरकाप उडवायला पुरेशी असते. किंबहुना लेखकाने भोगलेले सर्व अत्याचार, अन्याय इत्यादी वाचक प्रत्यक्ष अनुभवतो आणि लेखकाशी सहजगत्या जोडला जातो. 

अशा स्वरूपाच्या अत्यंत लोकप्रिय पुस्तकाचं उदाहरण म्हणजे अँन फ्रॅंक या ज्यु मुलीने नाझी अत्याचारांबद्दलचे लिहून ठेवलेले अनुभव जे कालांतराने 'Diary of a young girl' या नावाने प्रसिद्ध झाले. किंवा दोनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं 'The Silent Patient' हे पुस्तक. मराठीत अशा प्रकारची पुस्तकं तुलनेने कमी असली तरी आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक म्हणजे वाचकाला अंतर्बाह्य हादरून टाकण्याची क्षमता असलेली एक नकोशी डायरी आहे.

'Under the Shadow of Militancy: The Diary of an Unknown Kashmiri' या मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक तेज एन धर असून सुजाता देशमुख यांनी 'दहशतीच्या छायेत' या नावाने या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे. हे पुस्तक म्हणजे श्रीनगर मध्ये राहणाऱ्या एका अज्ञात काश्मिरी व्यक्तीने अंदाजे फेब्रुवारी ते ऑगस्ट १९९० या दरम्यान आपल्या आजूबाजूला पाहिलेल्या, ऐकलेल्या, निरीक्षण केलेल्या आणि आपल्या रोजनिशीत नोंदवून ठेवलेल्या घटनांचा लेखाजोखा आहे. या रोजनिशीत कुठल्याही पानावर दिनांक वगैरे नाही. मात्र अखेरच्या पानावर २३ ऑगस्ट १९९० अशी तारीख घालून शेवटची घटना लिहिलेली आढळते. त्यानंतर त्या व्यक्तीचं काय झालं याची स्पष्ट माहिती नसली तरी अखेरच्या नोंदीवरून त्या घटनेनंतर ती व्यक्ती फार काळ जिवंत राहिली नसावी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ही रोजनिशी कमल नावाच्या एका बीएसएफ च्या जवानाला एका पडक्या घरात लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळाली. त्यानंतर काही दिवसांतच त्या जवानाचीही हत्या करण्यात आली. परंतु तत्पूर्वी त्याने ती लेखकाकडे सुपूर्त केली असण्याची शक्यता आहे. कालांतराने लेखकालाही काश्मीर खोऱ्यातून परागंदा व्हावं लागलं.

रोजनिशी विस्कळीत स्वरूपात आहे. (कारण अनेक पानं पुढेमागे झालेली होती.) अनेक पानं गहाळ झाली असण्याचीही शक्यता आहे. तरीही या सगळ्या अडचणींवर मात करून त्या काश्मिरी पीडित व्यक्तीचे अखेरच्या काही महिन्यांतील भयंकर अनुभव लोकांपर्यंत पोचवण्याच्या लेखकाच्या जिद्दीला दंडवतच घालायला हवं.

रोजनिशी लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव वा अन्य काही तपशील माहित नसले तरी ती व्यक्ती पूर्वाश्रमीची शिक्षक असून नंतर एखाद्या राज्य सरकारी कार्यालयात काम करत असते असे उल्लेख येतात. ही अत्यंत सुशिक्षित, रसिक मनाची, सामाजिक आणि राजकीय जण असणारी असावी हे पुस्तकात अनेकदा येणाऱ्या ग्रीक कथांचे संदर्भ, काव्य तसेच राजकीय परिस्थिती आणि कपटी राजकारणी यांच्यावरील भाष्य इत्यादींवरून जाणवतं.

१९ जानेवारीच्या इस्लामी अतिरेक्यांनी "रलीव-गलीव-सलीव" च्या घोषणा देत काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचं थैमान माजवल्याच्या काही दिवसांनंतर रोजनिशीची सुरुवात होते. त्यावेळी सुदैवाने लेखक काश्मीरमध्ये नसतो परंतु दुर्दैवाने लेखकाची मुलगी आणि पत्नी मात्र तिथेच असतात. त्यांना काय भोगायला लागलं याचे स्पष्ट उल्लेख नसले तरी त्यानंतर लेखक ताबडतोब त्या दोघींना काश्मिरातून अन्य ठिकाणी हलवतो ही प्रतिक्रिया काय घडलं असावं हे याचा अंदाज बांधता यायला पुरेशी आहे.

अनेक वर्षं चालत आलेला हिंदू-मुस्लिम एकोपा ते इस्लामी अतिरेक्यांकरवी करण्यात आलेल्या पंडितांच्या क्रूर हत्याकांडांच्या मालिका असा संपूर्ण प्रवास मांडताना लेखकाने मुस्लिम, त्यांच्या श्रद्धा, अतिरेक, बलात्कार, क्रौर्य, हत्या आणि इतकं सगळं होऊनही मुस्लिमांवर विश्वास ठेवणारे भाबडे पंडित आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उल्लेख तर केले आहेतच. पण त्याचबरोबर राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थिती, उदासीनता, पंडितांकडे केलं गेलेलं दुर्लक्ष याबद्दलच्याही अनेक घटनांच्या नोंदी आहेत.

काश्मीरचा इतिहास, वर्तमान, काश्मिरी पंडित आणि त्यांची हत्याकांडं, त्यांच्यावर झालेले अत्याचार, राजकारण आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती इत्यंभूत यांबद्दल माहिती देणारी अनेक पुस्तकं आहेत. उदा डॉ सच्चिदानंद शेवडे यांचं 'काश्मीरनामा' , दोन वेळा काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम बघितलेले जगमोहन यांचं 'धुमसते बर्फ' किंवा शेषराव मोरे यांचं 'काश्मीर - एक शापित नंदनवन', विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर उठलेल्या गदारोळात एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली ती म्हणजे अशी की उपरोल्लेखित पुस्तकांचे संदर्भ दिले तरी "यातील कोणीही मूळ काश्मिरी नाहीत आणि त्यामुळे त्यांचं लेखन किती विश्वासार्ह असणार किंवा तेव्हा राज्यपाल असलेले जगमोहन हे स्वतःची बाजू मांडणारंच लेखन करणार" असे तद्दन भंपक आणि हास्यास्पद युक्तिवाद मांडणाऱ्या वाचाळवीर महाभागांशी दुर्दैवाने गाठ पडली. या पार्श्वभूमीवर 'दहशतीच्या छायेत' पुस्तकाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाचा लेखक मूळचा काश्मिरी पंडित आहे आणि त्याने स्वतः पाहिलेल्या, ऐकलेल्या भीषण घटनांची मांडलेली जंत्री वर दिलेले भाकड युक्तिवाद मांडणाऱ्या महाभागांना निरुत्तर करते.

हत्याकांडं, हल्ले, विश्वासघात, बलात्कार इत्यादींचे अनेकानेक उल्लेख पुस्तकाच्या पानापानावर आढळतात. मुस्लिम शेजारी, मित्र, परिचित यांचं खरं स्वरूप न ओळखता त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकण्याच्या पंडितांच्या स्वभावामुळे त्यांना जीवाला मुकावं लागल्याची अनेक उदाहरणं पाहून मुस्लिमांच्या कपटी आणि पंडितांच्या भाबड्या वृत्तीकडे बघून विषण्ण व्हायला होतं.

सुरुवातीलाच लेखकाचा मित्र भरत याला हेर असल्याच्या संशयावरून मुस्लिम अतिरेकी त्याच्या घरातून फरफटत रस्त्यावर आणून तिथे त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवतात ते वर्णन वाचवत नाही. तो तिळातिळाने मरावा, यासाठी अतिरेकी थोड्याथोड्या वेळाने त्याच्या एकेका अवयवात गोळ्या मारतात, पाणी मागितलं असता जबड्यावर सणसणीत लाथ मारली जाते. आणि अखेरीस छातीत गोळी मारली जाते. त्याच्या प्रेताजवळ कोणीही अगदी त्याच्या आईवडिलांनीही जायचं नाही असा अतिरेक्यांचा सक्त फतवा असतो. हे सगळं भरदिवसा, रस्त्याच्या मधोमध घडत असतं यावर आपला विश्वासच बसू शकत नाही आणि अखेरीस लेखक एक जोरदार धक्का देतो. 

हे सगळं जिथे घडलं तिथून सशस्त्र पोलिसांची स्थानिक पोलीस चौकी जेमतेम शंभर फुटांवर असते !!

सरला आणि सराह या दोन बालमैत्रिणी आणि शेवटच्या क्षणी सराहने आपल्या जिवलग मैत्रिणीशी ती निव्वळ हिंदू असल्याने केलेला दगाफटका भयंकर आहे. सरलाला सराह अतिरेक्यांनी सांगितलेल्या एका विवक्षित ठिकाणी फसवून घेऊन जाते. तिथे सरलाच्या नवऱ्याला आधीच फसवून आणून बांधून ठेवलेलं असतं. सरकारी नोकरीत असणाऱ्या सरलाच्या नवऱ्याकडून अतिरेक्यांना काही माहिती हवी असते जी तो देत नाही. सरलावर तिच्या नवऱ्यादेखतच सामूहिक बलात्कार केला जातो, तिचे स्तन कापून टाकले जातात. हे सगळं असह्य होऊन सरलाच्या नवऱ्याला जबरदस्त मानसिक धक्का बसतो. त्यालाही नंतर हालहाल करून मारलं जातं.

प्रेमी पंडित नावाच्या अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय अशा व्यक्तीला निव्वळ गंध आणि पगडी या हिंदू प्रतिकांमुळे इतकं भयंकर अमानुष मरण येतं की असल्या क्रौर्याची आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. महंतांची बोलणी करण्यासाठी प्रेमींच्या घरी काही तरुण येतात आणि त्यांना बाहेर चलण्याचा आग्रह करतात. रात्र झालेली असल्याने प्रेमींचा मुलगाही त्यांच्यासोबत येतो. थोडं दूर चालत गेल्यावर एका ठिकाणी प्रेमी आणि त्यांच्या मुलाची त्या अतिरेक्यांशी काही बोलाचाली होते. अपमान होतात, धक्काबुक्की केली जाते. गंध आणि पगडी ही हिंदू प्रतिकं न मिरवण्याबद्दल प्रेमींना ताकीद दिली जाते. परंतु ते ऐकत नाहीत. अखेरीस त्यांच्या मुलाला झाडाच्या एका फांदीला लटकावून फाशी दिलं जातं. पण प्रेमींच्या नशिबी इतकं सोपं मरण नसतं. त्यांची पगडी खाली पाडून ती लाथांनी तुडवली जाते. शरीराचा अक्षरशः लोळागोळा होईपर्यंत त्यांना जबरदस्त मारहाण केली जाते. त्यानंतर त्यांना झाडाला लटकावून, कपाळावर बरोब्बर गंधाच्या जागी एक मोठा खिळा ठोकला जातो, त्यानंतर त्यांचे डोळे फोडून बाहेर काढले जातात. पंडित आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांना दहशत बसावी यासाठी त्यांची प्रेतं तिथेच तशीच ठेवली जातात. एवढं सगळं होऊनही कोणाचीही तोंडातून एक शब्दही काढण्याची प्राज्ञा नसते.

श्रीनगरमध्ये मुलं, सुना, आज्या, लहान मुलं अशी सुमारे सुमारे डझनभर माणसं असलेलं एक कुटूंब त्यांचं मोठं राहतं घर सोडून जायला तयार नसतं. हा एवढाच दोष असतो त्यांचा. एके दिवशी भल्या पहाटे त्या घरात घुसून अमानुष गोळीबार केला जातो. हा गोळीबार एवढा मोठा आणि इतका सतत चालला होता की त्या गोळीबाराचा आवाज पुढे अनेक दिवस वातावरणात घुमत राहतो. गोळीबार थांबल्यावर काही वेळाने आजूबाजूचे लोक घरात शिरतात आणि अक्षरशः हादरून जातात. घरभर प्रेतांचा खच पडलेला असतो. एक घराच्या पोर्चमध्ये, दोन जिन्यांवर, मुलं त्यांच्या बिछान्यात, एक बाई स्वयंपाकघरात तर दोन वृद्ध स्त्रिया दिवाणखान्यात मरून पडलेल्या असतात.

जागरनाथ नावाच्या एका पंडितांची काही मुस्लिम तरुणांशी ओळख होते आणि ते तरुण नियमित त्यांच्याकडे यायला जायला लागतात. जागरनाथ यांची मुलगी शीला हिच्याशीही त्यांची चांगली मैत्री होते. कालांतराने वातावरण पेटायला लागल्यावर जागरनाथ आपली आई, बायको आणि अन्य मुलं यांच्याबरोबर काश्मीर सोडून जायला निघतात. त्याचवेळी ते मुस्लिम तरुण त्यांना अडवतात आणि त्यांना शीलाला नेता येणार नाही असं सांगतात. ट्रक चालकाने ताबडतोब ट्रक चालू न केल्यास तो इथेच उडवून दिला जाईल अशी धमकी देऊन त्यांना तिकडून हाकलून दिलं जातं. त्यानंतर अतिरेक्यांचा समूह शीलाला अक्षरशः इतकं वापरतो की ती अगदी शुष्क होऊन जात जात अखेरीस आपलं मानसिक संतुलन गमावून बसते आणि यातना, वेदनांचं एक नवीन प्रतीक बनते.

श्रीनगरमध्ये राहणारं एक म्हातारं जोडपं आपल्या मुस्लिम मित्राला त्यांचं मोठं राहतं घर विकणार असतं. व्यवहार पक्का होतो. त्यानंतर काही मुस्लिम लोक आणि अतिरेकी त्या मुस्लिम कुटुंबियांकडे येतात आणि धमकवतात की तुम्ही आपल्या पवित्र कार्याच्या आड येताय. पंडितांकडून घर विकत घेण्याची काय आवश्यकता आहे. तसंही ते घर आपलंच होणार आहे. त्यांना फक्त धमकी देऊन हाकलून दिलं की झालं. दुसऱ्या दिवशी ते मुस्लिम कुटुंब त्या पंडित कुटुंबाला धमकी देऊन हाकलून देतं आणि घरावर कब्जा मिळवतं.

हे काही निवडक प्रसंगच आहेत. अशा धक्कादायक आणि अमानुष प्रसंगांची मालिका पुस्तकाच्या पानोपानी दिसते. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यातील राजकारणावर देखील लेखकाने धिटाईने भाष्य केल्याचं आढळतं. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग म्हणजे रुबिया सईद हिच्या अपहरणाचा प्रसंग. १९८९ साली मुफ्ती मोहम्मद सईद या तत्कालीन गृहमंत्र्याच्या मुलीचं अतिरेक्यांकडून अपहरण केलं जातं आणि काही दिवसांपूर्वीच पकडलेल्या ५ अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी केली जाते. या प्रसंगाचं वर्णन करताना लेखक म्हणतो की राज्य आणि केंद्र सरकारकडून हे प्रकरण अतिशय ढिसाळपणे हाताळलं गेलं. एखादं नाटक चालू असल्याप्रमाणर सगळं अगदी ठरल्याबरहुकूम घडलं. लेखक म्हणतो की हे ओलीस प्रकरण म्हणजे अतिरेक्यांनी अनेक लोकांच्या सहभागाने आखून रेखून, ठरवून केलेली कृती होती हे लवकरच सिद्ध झालं. खुद्द सरकारमधले काही जण या नात्यात सहभागी होते. एखाद्या नाटकाची संपूर्ण तालीम पाठ असावी त्याप्रमाणे अनेकांना अपहरणापासून ते सुटकेपर्यंतच्या सर्व घटनांची इत्यंभूत माहिती होती. अनेकांना या अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व लोकांची नावं, पत्ते ही माहिती तर होतीच पण कैदेत असताना रुबिया कुठे कुठे राहिली, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिला कसं आणि केव्हा नेलं गेलं या सगळ्याचीही समग्र माहिती त्यांना होती. माहिती नव्हती ती फक्त सरकारला आणि त्यामुळे सरकारचं हसं झालं. आणि हे सगळं पुस्तकात ज्या सहजतेने येतं ते आणि गृहमंत्री असलेला एक इसम निव्वळ धर्मापायी इतक्या नीच पातळीचा देशद्रोहीपणा करू शकतो हे वाचून अक्षरशः चक्रावून जायला होतं आणि संतापही येतो. अजून एक असंच धक्कादायक प्रकरण म्हणजे घरं बांधण्यासाठी सरकारकडूनच पंडितांना भरीस पाडलं जातं ती घटना. जुनी घरं स्वस्तात विकून, नवीन घरं घेण्यासाठी पंडितांकडून कर्जं काढली जातील, घरं बांधली जातील आणि काही वर्षांतच पंडितांना तिथून हुसकावून लावलं जाईल अशा प्रकारची योजना सरकारी पातळीवर शिजून तिची अंमलबजावणी केली गेली होती हे ऐकून तर भयंकर संताप संताप होतो.

शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, बक्षी आणि इतर तत्कालीन राजकारणी आणि त्यांचे स्वार्थी डावपेच यांचा उल्लेख असलेल्या अनेक घटना कधी तपशीलात तर अनेकदा त्रोटक स्वरूपात येतात. पानागणिक काश्मीर मधील बदलत चाललेली परिस्थिती, दहशत, आपलं राहतं घर सोडून जाऊन जीव वाचवावा असा लेखकाच्या मित्रमंडळींचा आग्रह आणि काही झालं तरी आपली जन्मभूमी न सोडण्याबद्दलचं लेखकाचं ठाम मत या या दोलायमान परिस्थितीत भिरभिरणारी लेखकाची अवस्था वाचताना अंगावर काटा येतो. काही प्रसंगांमध्ये अगदी थोडक्यात जीव वाचल्याची उदाहरणं तर काही वेळा निव्वळ हिंदू म्हणून दिला जाणारा त्रास आणि त्या त्रासातून लुटली जाणारी मजा असेही अनुभव लेखकाने सांगितले आहेत.

शेवटच्या प्रकरणापर्यंत लेखकाच्या मानसिक अवस्थेचा लंबक दोन टोकांमध्ये फिरत राहतो. पण त्याला कुठल्याही अंतिम निर्णयावर ठाम होऊ देत नाही. अखेरीस दहशतीच्या छाया गडद होत जात जात अधिक समीप येतात आणि दरवाज्यावर धडका ऐकू येतात. कदाचित अखेरच्याच. लेखकाला ते नक्की माहीत नसतं आणि आपल्यालाही. पण काय झालं असेल, कसं झालं असेल याचा अंदाज वाचक बांधू शकतो. संपूर्ण पुस्तकावर भय आणि विषण्णता यांची एक खिन्न पण तितकीच भयंकर सावली आहे. पुस्तक संपल्यावरही पुस्तकातले कित्येक प्रसंग, क्रूर अतिरेकी आणि धूर्त राजकारणी आपल्या डोळ्यांपुढून हलत नाहीत. संताप येतो, भीती वाटते आणि सतत एक अस्वस्थता जाणवत राहते आणि पुढचे अनेक दिवस आपल्याला या 'दहशतीच्या छायेत'च राहायचं आहे याची खूणगाठ आपण मनाशी बांधू लागतो!!

-हेरंब ओक 

1 comment:

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...