Monday, December 14, 2009

हलके-मिस्ट झालासे कळस !!!

खरं तर राजू परुळेकरच्या (माझ्या याआधीच्या लेखात मी त्यांचा उल्लेख आदरार्थी करत होतो. पण आता ते त्या योग्यतेचे वाटेनासे झालेत ) दुसर्‍या हलके-मिस्ट्रीला उत्तर देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. सगळ्यांनी त्याच्या लेखावर (आणि त्याच्यावर) एवढी टीका केली होती की त्याचं त्यावर उत्तर येणार हे तर नक्की होतच. आणि ते त्याप्रमाणे आलंच. मीही सवयीप्रमाणे ते वाचलं. सचिनवरील टीकेने बरबटलेली ती हलके-मिस्ट्री  वाचून मनातल्या मनात त्यांची (संस्कार आड आल्याने एकेरीवरून पुन्हा आदरार्थी बहुवाचानाकडे वळतोय.. अरे(रे) संस्कार संस्कार)  कीव यायला लागली. आणि शेवटी तर टीका करता करता साहेबांची भीड एवढी चेपली कि ते स्वतःची तुलना चक्क तुकाराम महाराजांशी करायला लागले. हे जरा फारच "परुळेकरी" होत होतं.. आता तुकाराम महाराजांचा भक्त असण्यासाठी वारकरी असाव लागत नाही किंवा सचिनवर प्रेम करण्यासाठी क्रिकेटर (परुळेकरी भाषेत खेळ्या) असाव लागत नाही. पण यापैकी कोणाचाही अपमान होत असेल तर तुकोबारायांनीच सांगितल्याप्रमाणे "तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैंजारा" हा मार्ग स्वीकारावा लागतो .. आणि त्यासाठीच हा पुनःश्च पत्रप्रपंच..


मी दोन्ही हलके-मिसट्रया पुन्हा पुन्हा वाचून बघितल्या पण सगळ्या unsung aani unhonoured हिरोंना स्मरून सांगतो की सचिनबद्दलचा तीव्र आकस आणि सचिनसारख्या निरुपद्रवी आणि इझी टार्गेट (ऑस्ट्रेलिया  मध्ये भारतीयांवर हल्ले का होतात? कारण तेही तिकडे इझी टार्गेट असतात. ते फिरून प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करत नाहीत) असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून जास्तीत जास्त फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग हे दोन्ही केमिसट्रया मधले सामाईक मुद्दे सोडले तर दुसरी केमिस्ट्रीला मला फारच विस्कळीत आणि संदर्भहीन वाटली.. का ते सांगतो. निदान मला तरी दिसलेले त्यांचे प्रमुख मुद्दे असे.


१. तो  "खेळ्या" उर्फ "ग्लॅडिएटर" आहे .. त्याचं  अधिकाधिक  क्रिकेट  खेळणं आणि  अधिकाधिक  सेन्चुर्‍या  मारणं हे  राज्यसंस्था आणि समाज  यांना शोकांत शेवटाकडे नेणारं आहे.


२. त्याने फेरारीचा कर भरला असता आणि मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे असं सांगितलं असतं तर परुळेकरी भाषेत त्याला चांगला भारतीय ग्लॅडिएटर म्हणता आलं असतं. (म्हणजे एवढ करून पुन्हा 'ग्लॅडिएटर'च बरं का )


३. त्याने (पुलेला गोपीचंद प्रमाणे) पेप्सीच्या जाहिराती  नाकारल्या  असत्या  आणि (मुंबईतील मुले दत्तक ना घेता) स्टीव वॉ प्रमाणे कोलकात्यातील मुले दत्तक घेतली असती तर तो परुळेकरी डिक्शनरी प्रमाणे स्वार्थी व्यक्तिमत्व न  राहता सेल्फलेस सोल म्हणून मान्यता पावला असता.


४. त्याच्याकडे मर्यादेपलीकडे पैसा आहे आणि तो त्याने (टाटा, पु ल, रॉकफेलर, गेट्स दाम्पत्य यांच्या प्रमाणे) सचिन तेंडूलकर फाउंडेशन काढून त्या फाउंडेशन कडे सुपूर्द करायला हवा होता. आणि त्याने तसं केलं असतं तर रा रा परुळेकरांनी त्याच्या सामाजिक बांधिलकीला जाहीर अप्रुव्हल दिलं असतं


(मी खेळ्या, ग्लॅडिएटर, पत्रकार, विचारवंत यापैकी काहीही नसणारा, पेप्सी पिणारा, मुलांना दत्तक न घेतलेला, हेमलकसात काम न करणारा, कुठल्याही फाउंडेशनचा नसणारा असा एक तुच्छ पामर असल्याने माझी मते ही नक्कीच चुकीची असणार याची परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री मला आहे आणि माझी ही तमाम चुकीची मते बदलण्यात ते नक्कीच यशस्वी होतील याचीही मला परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री ........ वगैरे वगैरे.....)


आता पुन्हा एकदा परुळेकर साहेबांच्या मुद्द्यांना मी माझ्या नसलेल्या बुद्धीबाहुल्ल्ल्याने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

१. सचिनच्या क्रिकेट खेळण्यामुळे समाज रसातळाला जात असल्याने तो आपली बॅट म्यान करून घरी बसला असता तरी गांगुली, द्रविड, धोनी, युवराज, सेहवाग, गंभीर, हरभजन, झहीर, इशांत, हे सगळे खेळत राहिलेच असते ना? का सगळ्यांनीच घरी बसायचं आणि भारतीय टीम आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरू द्यायची नाही आणि समाज रसातळाला जाण्यापासून रोखायचं?? मी खरंच प्रचंड बुचकळ्यात पडलो असल्याने रा रा परुळेकर "सचिनच्या बॅटिंग करण्याने समाज कसा काय आणि का रसातळाला जातो" हे अगदी सोप्प्या भाषेत (तिसर्‍या केमिस्ट्रीत) सांगतील का?"


२. हरभजन, धोनी, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी हे आणि परुळेकरांच्या परिचयातल्या असंख्य राजकारण्यांनी इतर अनेक महागड्या गाड्या कर चुकवून आणल्या आहेत. त्यावर परुळेकरांनी किती शाई खर्ची घातली आत्तापर्यंत? आणि परुळेकर साहेबांनी सचिनचं ते वाक्य पुन्हा एकदा तपासून बघाव. अर्थात यावर मी माझ्या पहिल्या पत्रात उत्तर दिलेलं आहेच.


३. सचिनने पेप्सीच्या जाहिराती नाकारल्या असत्या तरी पहिल्या मुद्द्यातील सगळ्या खेळाडूंनी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अमिताभ पासून अक्षय कुमार पर्यंत सगळे जण त्या जाहिराती करत राहिले असतेच त्याचं काय? आणि ज्या अर्थी परुळेकर साहेब सचिनच्या थातुरमातुर (म्हणजे काय रे भाऊ?) सामाजिक कार्यांबद्दलचा उल्लेखही  न करण्याचा सज्जड दम भरतात त्या अर्थी तो सामाजिक कार्य करतो हे त्यांनाही माहित आहे फक्त त्याचा उल्लेख त्यांच्या लेखाला आणि हेतूला बाधक आणि अडचणीचा ठरत असल्याने तो करू नये असे त्यांचे म्हणणे आहे काय?


४. लेखात उल्लेखलेली सगळी फाउंडेशन्स हि त्या त्या व्यक्तींनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस काढली आहेत. राजे, सचिन अजून चाळीशीचाही नाहीये. आणि प पु परुळेकर साहेबांना माहित नसल्यास सांगतो सत्यमची पण "सत्यम फाउंडेशन " आणि "बायराजू फाउंडेशन" अशा दोन संस्था होत्या. त्याचं काय झालं पुढे हे जग जाणतंच.


हुश्श .. संपला बाबा एकदाचा प्रश्नोत्तराचा तास (त्रास!!)


आता थोडे प्रश्न मी विचारतो परुळेकर काकांना.... परुळेकरांनी राजकारण्यांवर लिहिलेल्या केमिसट्रयांमध्ये बहुतांशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते का आहेत हा प्रश्न माझ्या बालमनाला पडला आहे. विधानसभा/लोकसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे पडद्यामागे गुलुगुलू चालू असणे आणि परुळेकर (शिवसेनेचे समर्थक असल्याने... आता माहित नाही) यांनी राष्ट्रवादी नेत्यांचे गोडवे गाणे याला निव्वळ योगायोग समजायचं का?

मिडिया नेहमीच सचिन, त्याच्या क्रिकेटची २० वर्षे याला अवास्तव महत्व देते असे परुळेकरांना वाटत असेल तर त्यांनी सचिनला नावे ना ठेवता डायरेक्ट मिडियावरच हल्लाबोल का नाही केला? मिडिया सचिनला अवास्तव महत्व देते तर त्यात सचिनचा काय दोष ? दोष माध्यमांचाच ना??? मग परुळेकरांची लेखणी मिडीयावर का नाही सरसावली?? अरे हो पण परुळेकर पण मिडियावालेच पडले ना. मग जळात राहून माशाशी वैर कस पत्करणार बुवा. उगाच खरं बोलून आणि मिडीयाचे दोष दाखवून आपलं (२० वर्ष पूर करू घातलेलं ) करिअर का बिघडवा? राजे, तेथे पाहिजे जातीचे... म्हणूनच आचार्य अत्रे, नीलकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे एकदाच निर्माण होतात. बाकीचे सगळे असतात ते परुळेकर, राउत आणि (बाळ नाही) "बाल" ठाकरे.

आणि सचिनला टार्गेट केल्याचे २ फायदे.. तो बिचारा उलटून बोलत पण नाही आणि टीका करणार्‍याला (तुमचीच) मिडिया भरपूर प्रसिद्धी पण देते. एक उदाहरण देतो राज ठाकरेंचं. (मला राज ठाकरे यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे हे विसरू नये). राज ठाकरे सगळ्यात जास्त राष्ट्रीय मिडीयाच्या चर्चेत आले ते कधी पासून माहित्ये? सांगतो. मनसेने टॅक्सीवाल्यांना मारलं, रेल्वे परीक्षांना आलेल्या भैयांना मारलं, तलवारी वाटण्याची भाषणं केली त्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन वर शाब्दिक हल्ला केला. रातोरात त्यांचं नाव सगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्सवर (आधी पेक्षाही जास्त ठळकपणे ) झळकू लागलं. ही त्यांची स्ट्रॅटजी होती. पुन्हा सांगतो मला राज ठाकरेंबद्दल पूर्ण आदर आहे पण लोकप्रियता आणि जनाधार मिळवण्यासाठी त्यांना अमिताभ बच्चनवर शाब्दिक हल्ला करावा लागला हे सत्य मी तरी नाकारू शकत नाही .. एक्झॅक्टली तीच स्ट्रॅटजी वापरून परुळेकर सचिनला लक्ष्य करताहेत..

त्यांचं कुठलही पुस्तक मी वाचलेलं नाही (पण ई टीव्ही वरील संवाद चे जवळपास ७०% एपिसोड्स आणि त्यांचे राज, उद्धव, विजय तेंडूलकर यांच्यावरील आणि इतरही अनेक लेख वाचलेले आहेत ) पण त्या पुस्तकाचं मार्केटिंग करण्याचा किंवा मी कसा इतका हजारो माणसांना भेटलोय आणि मी कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना असा एक उगाच संशय येऊन गेला.

परुळेकर जसे अजिबात क्रिकेट ना बघता, किंवा सचिनची बॅटिंग  न बघता त्याच्यावर घणाघाती हल्ला करू शकतात  तर  म्या पामराने त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याचा म्हणजे त्यांची पुस्तके न वाचता त्यांच्या विषयी बोलण्याचा (मी निदान त्यांनी लिहिलेले लेख आणि "संवाद" तरी पहिले आहेत म्हणा) अल्पस्वल्प प्रयत्न केला तर ते वाईट वाटून घेणार नाहीत याची नक्की खात्री आहे.

अजून एक म्हणजे अरुंधती जोशींच्या मताला/लेखाला उत्तर देण्या ऐवजी "अमेरिकेतल्या मराठी माणसांना काय कळतंय, त्यांनी गप्प बसावं.. उगीच "आमच्या" भारतातल्या गोष्टींत लुडबुड करू नये" हा जो सूर आहे ना तो तर अतिशय उबग आणणारा आहे. (मी पण अमेरिकेतूनच लिहित असल्याने त्यांनी माझं उत्तरही तो गंड मनात ठेवून वाचलं तर मग विषयच संपला)

परुळेकरांचे (वर उल्लेखिलेले आणि इतरही अनेक) अप्रतिम लेख वाचून, लेखांच्या मांडणीवर आणि त्यातल्या मुद्द्यांवर बेहद्द खुश होऊन मी अनेकदा तोंडात बोटे घातली होती.. पण सचिनवरच्या या २  हलके-मिसट्रया  वाचून तीच बोटे तोंडातून काढून खिशात लपवून ठेवावीत कि त्यांच्याच दिशेने उगारावीत या संभ्रमात असताना पर्याय २ चा प्रभाव अधिक ठरल्याने पत्रोत्तर दिले. केवळ सचिनचा, त्याच्या खेळाचा,त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या गुणांचा अतिशय तीव्र चाहता म्हणूनच नव्हे तर एक मराठी माणूस म्हणून पण मी त्यांचा आणि त्यांच्या लेखाचा अनेकवार निषेध करतो. मूर्तीभंजन केल्याचा आव आणत आणत फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करता करता जनक्षोभाच्या रेट्याने त्यांचे लेखणीभंजन न होवो हीच सदिच्छा


जाता जाता : (पेप्सीच्या जाहिराती करत असल्याने आणि फेरारीचा कर माफ करण्या विषयी विनंती केल्याने) परुळेकर यांना सचिन जर एक महान माणूस वाटत नसेल तरी त्याच्या महान खेळ्या (परुळेकरी डिक्शनरीतला "खेळ्या" नव्हे, "खेळी"चे अनेक वचन या अर्थी), आकडेवारी, संदर्भ हे सर्व नजरेखालून घातल्यावर परुळेकरांना सचिन हा एक सार्वकालिक महान खेळाडू आहे हे तरी नक्की जाणवेल. तेव्हा पुढच्या कुठल्याही लेखात त्यांनी आमच्या सचिन तेंडूलकरचा उल्लेख खेळ्या, ग्लॅडिएटर असा करू नये हि त्यांना कळकळीची विनंती.. !!


(हाच लेख मी माझी प्रतिक्रिया म्हणून राजू परुळेकर यांच्या इ-मेल आयडी आणि लोकप्रभाच्या इ-मेल आयडी वर ही पाठवली आहे.)

29 comments:

  1. काही नाही ओ, परुळेकर एका वेळचेच जेवण घेत असल्याने त्यांच्या केमिस्ट्रीचा लोचा झालाय. अश्या लोकांच्या तुच्छ लिखाणाला उत्तर देउन आपणास काही मिळणार नाहे. अशी लोकं सायकीक असतात. आपन प्रत्युत्तर दिल्यावर ते अजुनच मस्तावणार.... so just forget these creatures !! ashyaa lokaana samajaavane mhanje Gaadhavaapudhe vaachalee geetaa ase aahe...... ashee lok kadhi sudharat naahit.... Vadachyaa jeevaavar jaganaari baandgule aahet !!!!

    ReplyDelete
  2. याला म्हणतात उत्तर!
    श्री रा.रा.परुळेकरांनी ज्या संत तुकारामांचा दाखला दिला आहे त्यांनीच म्हटलेलं आहे "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी", त्याच पद्ध्तीने हे मस्त उत्तर दिलेलं आहे. ज्या विषयाशी आपल दुरान्वयेही संबंध नाही त्या विषयावर "राळ उडवून पसार व्हायचं" ही पद्धत परुळेकर साहेबांनी वापरलेली आहे. त्यामुळे होतं काय की आपण लाईमलाईट मधे राहतो. परुळेकर साहेबांना जर समाजसेवकांची इतकीच आठवण येत होती तर याआधीच्या "हल्केमिस्ट्री" मधून त्यांनी एकाही समाजसेवकाबद्दल का लिहिलं नाही?
    हेरंब, कीप इट अप!

    ReplyDelete
  3. छान. मुद्देसूद चर्चा चालली आहे. :)
    माझी अल्केमिस्ट्रीवरील प्रतिक्रिया येथे वाचावी. http://maajhianudini.blogspot.com/2009/12/blog-post_14.html

    ReplyDelete
  4. धन्यवाद आदित्य आणि ब्लॉग वर स्वागत.. परुळेकरांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये आणि उदाहरणामध्ये इतकी टोकाची विसंगती आणि संदर्भहीनता आहे की ते वाचून आपोआपच उत्तर सुचत गेलं..

    ReplyDelete
  5. धन्यवाद देवदत्त.. प्रतिक्रियेबद्दल आभार. हो तुमची पोस्ट पण वाचली मी. पण प्रतिक्रिया टाकायला वेळ मिळाला नाही. छान लिहिलं आहेत तुम्ही.

    ReplyDelete
  6. धन्यवाद दिपू.. पहिल्या हलके-मिस्ट्रीला उत्तर दिल्यावर दुसर्या वेळी उत्तर देण्याआधी मी पण तुम्ही म्हणताय तसा विचार करून शांत राहणार होतो. पण सचिन-प्रेम वरचढ ठरलं आणि काल रात्री जागून उत्तर लिहून टाकलं. अशांच्या बाबतीत दुर्लक्ष केलं तर म्हातारीही जाते आणि काळही सोकावतो. त्यामुळेच..... !!

    ReplyDelete
  7. कालचं मी लोकप्रभेमधला लेख वाचला आणि सहज वाटलं की आता याला(यांना????) खरंच कुणीतरी झापला पाहिजे..और आपने वो काम एकदम बोले तो एकदम परफ़ेक्ट कियेला है...
    लोकप्रभेनेही ही प्रतिक्रिया छापली पाहिजे पण माझा अंदाज आता या विषयावरची पत्रापत्री बंद केली आहे असं काही लिहीतील..पण बेस्ट त्यांना इ-मेल धाडलीत ते...:)
    दोन्ही लेख मस्तच...एकदाच प्रतिक्रिया देते...:)

    ReplyDelete
  8. धन्यवाद अपर्णा.. आप्पुनकी भी हटेलीच थी.. तभी तो धो डाला ... लोकप्रभा हे छापणार नाही हे तर अगदी १००% नक्की. आपल्याला पण छापायला कुठे हवय. परुळेकर साहेबांना मेसेज पोचला कि झालं..:)

    ReplyDelete
  9. काविळ झालं की सगळं जग पिवळं दिसतं, तसं झालंय बहुतेक राजु परुळॆकरचं. नेहेमीच कसल्या ना कसल्या कॉमेंट्स करित असतो तो. बदनाम हुए तो क्या हुवा.. नाम तो हुवा ?? अशी स्ट्रॅटेजी आहे त्याची ! लेख एकदम मस्त जमलाय. मी तो लोकप्रभामधला लेख वाचलेला नाही, पण या उत्तरावरुन मला कल्पना आलेली आहे की त्या लेखात राजु ने काय लिहिले असेल ते..
    अगदी ’बिन पाण्याने’ केली आहे राजु ची!!!

    ReplyDelete
  10. धन्यवाद महेंद्र काका. हो ना. या २ लेखान्पुर्वी पर्यंत मला परुळेकर यांच्या बद्दल आदर होता पण आता नाही.. आणि yes.. exactly.. त्यांच्या पहिल्या लेखाला मी जे उत्तर दिलाय त्याचं शीर्षक अगदी हेचं आहे. "अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !!!" http://harkatnay.blogspot.com/2009/11/alchemist.html
    आणि हो त्या दोन्ही अल्केमिस्त्र्या वाचा नक्की ... म्हणजे एवढी बिन पाण्याने करायची वेळ का आली ते लक्षात येईल. :)

    ReplyDelete
  11. एकदम भारी झापलयं बघ यांना. मी देखिल त्यांच्या सचिनविषयीच्या पहिल्या लेखाला झणझणीत प्रतिक्रिया दिली होती. (http://www.sachinjosh84.blogspot.com/) पण मग दुसरा लेख वाचुन समजले, अरे ह तर निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. जाऊ द्या बोलु द्या त्यांना काय बोलायचे ते..सचिनला काही फरक पडत नाही. बघा कस खेळतोय आज दिडशे गाठले तरी अजुन ओपनर्स खेळतच आहेत. मस्तपैकी ६९ धावा काढल्यात. मॅच पहात आहात ना परुळेकर काका?

    ReplyDelete
  12. तुमचे दोन्ही लेख वाचले. अगदी मुद्देसुद. तुमचे पुढील दोन मुद्दे अगदी अचूक ज्याचे परुळेकरांकडेदेखील काही उत्तर नसेल ह्याची मला खात्री आहे.
    1. सचिनला टार्गेट केल्याचे २ फायदे.. तो बिचारा उलटून बोलत पण नाही
    2. सचिनला नावे ना ठेवता डाइरेक्ट मिडियावरच हल्लाबोल का नाही केला? मिडिया सचिनला अवास्तव महत्व देते तर त्यात सचिनचा काय दोष ? दोष माध्यमांचाच ना???

    ReplyDelete
  13. धन्यवाद सचिन. परुळेकर काका लपून बसून तिसर्या अल्केमिसट्री तयारी करत असतील.. :)

    ReplyDelete
  14. धन्यवाद सिद्धार्थ.. हो ना. नक्कीच त्यांच्याकडे उत्तर नसणार. आणि अशा वेळी ते मग रोमन साम्राज्य, त्याचं पतन, राज्य संस्थेचा शोकांत शेवट, असले काहीतरी संदर्भहीन मुद्दे मांडून (तिसरा) लेख सुद्धा भरकटवतील याबद्दल मला जराही शंका नाही.

    ReplyDelete
  15. micchh
    parulekar parulekar....
    kay kelet he
    baki heramb dada uttar yogya ...

    ReplyDelete
  16. धन्यवाद विनायक. आणि ब्लॉग वर स्वागत. अगदी बरोबर. परुळेकरांच्या मी-मी पणाचा खरंच कंटाळा आलाय.

    ReplyDelete
  17. Awesome !! Very well written !!

    ReplyDelete
  18. धन्यवाद पामर.. !!!

    ReplyDelete
  19. Uttam...Ati uttam....

    Ya parulekar chi baju dharun thewanare kahi mahabhag mala Singapore madhye pan bhetale...pan tevha watala " Sinva jevha chalato tevha bhunkanarya kutryancha tyala tras hot nahi "......

    sachin gr8 aahe yaat wadach nahi.... ani Parulekar sarakhya manasane aadhi he tari baghawe ki apali layaki aahe ka sachin baddal bolayachi....

    kadhi kadhi mala etaka raag yeto ki Parulekar samor ala tar hatachi pachahi bota saral galawar umatawawit.... pan ...Are sanskar sanskar !!!

    ReplyDelete
  20. हो ना शार्दुल. हा परुळेकर म्हणजे अगदी कामातून गेलेला माणूस आहे. आपली लायकी काय, आपण कोणाव तोंडसुख घेतोय याचीही शुद्ध राहिली नाही त्याला. एक गोष्ट जी आपल्यकडे आहे, सचिन कडे आहे पण परुळेकरांकडे नाही ती म्हणजे हेच "अरे संस्कार संस्कार"

    ReplyDelete
  21. जरा उशिराच लिहितोय comment कारण मी दोन्हीही लेख पहिले नव्हते .. पण आपण देलेले प्रतिउत्तर पटते .. परळकरांना कसेही करून प्रसिद्धी मिळवायची आहे असे दिसतेय .. अहो सचिन हा खेळाडू आहे त्याला खेळण आवडतं .. तो काही समाजसुधारक नाहीये, आणि दुसर्यांनी एक गोष्ट केली म्हणून सगळ्यांनी तेच करावं?? अहो जर तुम्हाला आवडत नसेल तर TV बंद करा ना.. त्याने काय सगळ्या मेडियाला बोलावून जाहिरातीचे पैसे दिलेत का ?? अहो त्याचा खेळ लोकांना आवडतो म्हणून त्याने खेळणे सोडावे.. ह्या परळकरांना काय म्हणायचे आहे तेच कळेना .. शेवटी चीदातायात कुणावर सचिन वर कि मेडिया वर ... हा माणूस स्वतःला तुकाराम महाराजांशी compare करतो.. देव भलं करो याचं!!!

    ReplyDelete
  22. पवन, मी आधी म्हटल्याप्रमाणे सचिनबद्दलचा तीव्र आकस आणि त्याला नावं ठेवून फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा सोस हे दोनच हेतू मला तरी दिसतात. ते चिडलेत खरं तर सचिनवरच (कारण त्यांना त्याचं यश बघवत नाहीये) पण मिडियावर चिडलोय असं दाखवून मिडियाल नावं ठेवतोय असं म्हणत त्यांनी सचिनवर केले आहेत. हे तर अजूनच धोकादायक.

    ReplyDelete
  23. तुझा दुसरा लेख सुद्धा राजूने वाचला आहे का रे ??? 'दुसरया तोंडात मारलील की तू त्याच्या' ... चेला.. जबऱ्या रे.. हा लेख आधी वाचला होता मी पण आज प्रतिक्रया देतोय. :D

    ReplyDelete
  24. उद्देश तोच होता. :) त्याने वाचलंय कि नाही ते माहित नाही. पण मी तिथे म्हटल्याप्रमाणे मी हे त्याच्या आणि लोकप्रभाच्या इ-मेल आयडी वर पाठवलं आहे. Glad u like it :)

    ReplyDelete
  25. परुळेकरांच्या सुरुवातीच्या दमदार लिखाणाचे कायमच कौतुक वाटत आले पण आताशा सेनेचा हात सोडून राजच्या प्रती आपल्या निष्ठा समर्पित केल्यावर त्यांच्या(खर तर एकेरी उल्लेख करण्याचा आत्यंतिक मोह होतोय पण संस्कार आडवे येतात) प्रत्येक लिखाणात सेना ,उद्धव ,बाळासाहेब यांच्या बद्दलच विखारच जास्त जाणवतोय असे का बरे व्हावे?याच उत्तर तेच योग्य प्रकारे देवू शकतात
    सच्च्यावरचे त्यांचे लिखाण म्हणजे कुपमंडुक असल्याचे द्योतक .सामनामधुन सच्च्यावर आसुड ओढले गेले तर मग हे तरी कसे मागे राहतील?मला सचिन सारखे होता आले नाही म्हणुन तर त्यांच्या लिखाणातुन डोकावणारा हा विषाद्,मत्सर तर नसावा?

    ReplyDelete
  26. हो ना मनाली. त्यांच्या लिखाणाचा दर्जा घसरत चालला आहे यात मुळीच दुमत नाही. सचिनबद्दलचा तीव्र आकस, द्वेष हेच एकमेव कारण आहे त्यांच्या सचिन बद्दल असं उलट सुलट लिहिण्यामागे.

    ReplyDelete
  27. हेरंब, तुझा हा लेख आवडला. सगळ्याच्या सगळ्या मतांन अनुमोदन.


    मी स्वतः राजू परूळेकर यांना ई-पत्र लिहून 'तुमच्या पत्रकारितेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे' असं सरळ सांगितलं होतं.

    (१) हा माणूस निलेश राणे ह्या 'स्वाभिमानी गुंडा'च्या समर्थनार्थ लेख लिहीतो म्हणजे कहर आहे.

    (२) आणखी एक गोष्ट म्हणजे ते वापरतात तो एक अपशब्द. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की लोकप्रभा सारखं मासिक 'चुत्या' हा अत्यंत अर्वाच्य असा शब्द कशा छापू शकतात?

    (३) "आणि सचिनला टार्गेट केल्याचे २ फायदे.. तो बिचारा उलटून बोलत पण नाही आणि टीका करणार्‍याला (तुमचीच) मिडिया भरपूर प्रसिद्धी पण देते."

    अरे सुर्यावर थुंकणारे अनेक असतात पण सुर्याने कुणावर उलटून थुंकल्याचे ऐकीवात नाही ना !!!

    (४) "पण त्या पुस्तकाचं मार्केटिंग करण्याचा किंवा मी कसा इतका हजारो माणसांना भेटलोय आणि मी कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना असा एक उगाच संशय येऊन गेला."

    तसा प्रयत्न ते जवळ जवळ प्रत्येक लेखात करतात. आणि वर आपली किती जवळीक आहे त्या माणसाशी ते दाखवायला त्या माणसांचे भ्रमणध्वनी क्रमांक पण देतात त्याच लेखात. आहे की नाही गंमत.

    (५) अरुंधती जोशींचं पत्र/प्रतिक्रिया अतिशय सडेतोड पण तरीही संयत अशी होती.

    अर्थात. परुळेकर यांच्या इतक्या खालच्या पातळीला कुणीच उतरु शकत नाही म्हणा!!

    जाता जाता इतकेच म्हणेन की सचिन फक्त चांगला खेळाडू आहे म्हणुन तो तुला-मला आणि इतरांना आवडत नाही. तर त्यापलिकडेही जाऊन सचिन हा एक चांगला माणूस आणी बरंच काही आहे म्हणुन लोकांना त्याच्याविषयी आदर वाटतो.

    पण परुळेकरांसारख्या काजव्याला ते कसे कळणार बरे?

    ReplyDelete
  28. मंदार, तपशीलवार प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. तो राजू हल्ली हल्ली तर फारच डोक्यात जायला लागला आहे. अलिकडे तर त्याच्या लिखाणाला कसलाच धरबंध नसतो. नुसती उचलली जीभ की लावली टाळ्याला असा प्रकार असतो.. !!

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...