Thursday, November 24, 2011

जा..ळ.. !!!


काही काही शब्द बघता बघता एकमेकांचे असे काही प्राणसखे बनतात किंवा बेजावदार माध्यमं आणि अक्कलशून्य नेतेमंडळी त्यांना इतक्या कुशलतेने एकमेकांत गुंफतात की आपल्याला पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दावाचून विचारही करवत नाही. वरच्या वाक्यातला 'बेजावदार माध्यमं/मिडिया' किंवा 'अक्कलशून्य नेतेमंडळी' हे शब्द ही त्यांचीच उदाहरणं होऊ शकतात म्हणा. पण अर्थात योग्य उदाहरणं. असो.... तर चितळ्यांची बाकरवडी, अमूल बटर किंवा मग नेस्लेची कॅडबरी, कॅननची झेरॉक्स वगैरे वगैरे वगैरे ही काही उदाहरणं. तर या दोन जमातींच्या मते अक्कलशून्य नेतेमंडळींना (यापुढे हे दोन शब्द एकत्रित येतील हे अध्याहृत आहे. अनलेस स्पेसिफाईड अदरवाईज !) जनतेद्वारे दिली जाणारी ट्रीटमेंट, त्यांच्याबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया या त्यांच्याविरुद्ध जनतेच्या मनात खदखदत असलेला क्षोभ, असंतोष, कमालीचा संताप, तीव्रतम द्वेष याचा एकत्रित परिपाक असूच शकत नाही. असतो तो फक्त 'भ्याड हल्ला'

भ्याड??????? हल्ला???????

जनहितार्थ (वाचा मिडिया आणि नेतेमंडळी हितार्थ) काही शब्दार्थ-

भ्याड : पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा/री

हल्ला : आक्रमण, जोरदार धडक किंवा शुद्ध बोलीभाषेत हमला/अटॅक किंवा मग धक्काबुक्की करून जोरदार मारझोड

मला शाळेत शिकवलेल्या मराठीनुसार आणि माझ्या वकुबानुसार मी अर्थ दिले आहेत आणि ते बहुधा चुकीचे नसावेत असा माझा कयास आहे !



आता हे शब्द आपण हरविंदर सिंगने शरदरावांच्या श्रीमुखात भडकावून दिल्याच्या घटनेशी जोडून पाहू. तर हरविंदर सिंग पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा आहे का? निश्चितच नाही. तो भित्रा इसम असता तर सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरणाऱ्या शरच्चन्द्रांच्या चंद्र्मुखात (आणि दुखरामाच्याही.. नॉट टू फरगेट) एक सणसणीत चपराक भडकावण्यासारखं कृत्य त्याने केलंच नसतं. शिव्या देणारी पत्रं पाठवली असती, अनामिक इ-मेल आयडीवरून इमेल केले असते, पवारांच्या घरावर रात्रीच्या अंधारात गुपचूप दगडफेक करून पळ काढला असता. त्याने असं काही केलं का? कृती करून तो तोंड लपवून बसला का किंवा अंधारात दडला का? मुळीच नाही. उलट त्याने त्याच्या कृत्याची कारणमिमांसाही दिली. "चोर है सब साले चोर है. सब मालूम है इन्हे (शरदरावांच्या "मुझे कुछ मालूम नही"" या उत्तरला उद्देशून)" असंही सांगितलं. असो. ही व्यक्ती भ्याड नाही हे मान्य करायला एवढे पुरावे पुरेसे असावेत माझ्या मते.

आता हल्ला... हल्ला????? अरे हल्ला एक देश दुसऱ्या देशावर करतो, एक टोळी दुसऱ्या टोळीवर करते, एक समूह दुसऱ्या समूहावर करतो, किंवा मग एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोरदार धक्काबुक्की करून तीव्र जखमी करण्याच्या उद्देशाने करते तो हल्ला असतो.

तर या ठिकाणी असं झालं का? माझ्या मते नाही. उसळत्या आणि सतत चढत्या महागाईने व्याकुळ आणि संत्रस्त झालेल्या जनतेच्या असंतोषाला हरविंदररूपी एका सामान्य माणसाने करून दिलेली वाट, सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरुद्ध व्यक्त केलेली प्रतिक्रिया.. कडकडीत प्रतिक्रिया म्हणू हवं तर. हल्ला नक्कीच नाही. एक विसरू नका की हरविंदरकडे एक छोटा चाकूही होता आणि त्याच चाकूने त्याने स्वतःच्या मनगटावर वारही करून घेतले. हल्लाच करायचा असता तर त्या चाकूएवढं दुसरं कुठलंही योग्य हत्यार त्याच्याकडे त्यावेळी नसावं. हल्लाच करायचा असता तर चाकूने केला असता, जखमी केलं असतं. पण त्याने तसं केलं नाही. कारण हल्ला करणे हा हेतू नव्हताच तर फक्त आणि फक्त असंतोषाला वाट करून देणं एवढाच हेतू होता; रोजच्यारोज हातातोंडाची मिळवणी करताना जनतेवर कोसळणाऱ्या महागाईरूपी संकटाचा आणि बसणाऱ्या झळांचा आणि त्याला कारणीभूत असलेल्या सरकारचा एक प्रतिकात्मक निषेध !!

थोडक्यात हरविंदरने जे केलं तो भ्याड हल्ला नव्हता. भ्याड हल्ला हा असा नसतो. कधीच नसतो.. नसतोच. हा होता तो जा..ळ.. कडकडीत, सणसणीत जाळ!!

मुंबईवर २६/११ ला कसाब आणि त्याच्या भावडांनी केला तो भ्याड हल्ला होता किंवा मग कारगीलवर पाकिस्तानेने केला तो. हरविंदरने जे केलं तो भ्याड हल्ला नक्कीच नाही. तत्कारणात निदान यापुढे तरी प्रसारमाध्यमं आणि नेतेलोक्स यांनी 'भ्याड' आणि 'हल्ला' हे दोन हल्ले एकत्रितपणे वापरण्याची खाज, अर्ज (इंग्रजीतला) रोखून ठेवावी !!

आणि हो.. जाता जाता अजून एक.. हरविंदरची कृती चूक की बरोबर किंवा मिडियाच्या भाषेत "हल्ला झाला" हे चूक की बरोबर असल्या थोतांड विषयात मला पडायचंच नाही. कारण झालं ते अगदी योग्यच झालं. आणि अशा हल्ल्याला पाठींबा देणं हे विकृत, पिसाट आणि भ्याडपणाचं लक्षण असेल तर मी कमालीचा विकृत आणि पिसाट आहे आणि हे असे तथाकथित भ्याड हल्ले वारंवार होवोत आणि या हल्ल्याचं आणि भविष्यात कुठल्याही राजकीय व्यक्तीवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचं मी जाणीवपूर्वक आणि साभिमान समर्थन करतो !!

ता. क. : नेते लोकांना होणारी मारहाण, चपला/बुट फेकणे या संबंधी बोलताना हे असलं करण्यापेक्षा "निवडणुकांच्या वेळी  मतदान करा आणि योग्य व्यक्तीला निवडून द्या" असं सांगणं हे माझ्यामते फारच हास्यास्पद आहे. अशा गोष्टींवर निवडणूका आणि मतदान हे अत्यंत फसवे पर्याय आहेत, अतिशय ढोंगी उपाय आहेत. कारण आपण निवडून दिलेली व्यक्ती सत्तेत आल्याआल्याच भ्रष्टाचार किंवा जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू लागली तरीही ती व्यक्ती पुढची पाच वर्षं आपल्या गळ्यात लोढणं म्हणून अडकून राहतेच आणि करायचा तो भ्रष्टाचार करतेच किंवा जनतेच्या  प्रश्नांकडे दुर्लक्ष करतेच. माकडउड्या मारता मारता लोकसभेत जाऊन पोचलेल्या गोंद्याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. त्यामुळे यावर उपाय म्हणून तेवढी ती मतदानाची उदाहरणं वगैरे प्लीज देऊ नका.

Thursday, November 17, 2011

शब्द : ए ते यु

तम्मत्तद्दो ओ ओ ओ
(कै)त्ता चम्माना आदा नतते दिकादे
तम्मत्तद्दो ओ ओ ओ

अलम हिंदी संगीताच्या दुनियेत हे एकमेव गाणं शिल्लक उरलं असावं किंवा मग सरकारने यच्चयावत सगळ्या गाण्यांवर बंदीची मोहोर उमटवली असून फक्त, फक्त आणि फक्त (ट्रुथ, द होल ट्रुथ अँड नथिंग बट द ट्रुथ किंवा आपल्या हिंदी चित्रपटांच्या कोर्टातल्या सीनमधल्या "सिर्फ सच कहुँगा और सच के सिवा कुछ नही कहुँगा" च्या स्टायलीत) हे एकच गाणं ऐकण्याची (वाचा पुन्हा पुन्हा ऐकण्याची) सक्ती केली असावी अशा थाटात हे गाणं आमच्याकडे वाजतं, वाजत असतं.. म्हणजे इत्त....क्या वेळा वाजत असतं.. अर्थात वर दिल्याप्रमाणे नाही तर नॉर्मल अ-बोबड्या शब्दांत.. त्याचं बोबडेकरण हे अगदी शुध्द होममेड आहे. अर्थात अ‍ॅकॉनने गायलेलं मूळ गाणंही खरं तर बोबड्या शब्दांतच आहे. (आणि कदाचित त्यामुळेच लेकाला ते जवळचं वाटलं असावं... बडबडगीतासारखं).. त्यामुळे ते अजून बोबड्या शब्दांत गायलं तर त्यात काहीच चूक नाही. हवं तर त्याला 'होममेड रिमिक्स व्हर्शन' म्हणू शकतो. अर्थात ते अ‍ॅक्क्याने (कृ. अक्षयकुमारप्रेमींनी गैरसमज करून घेऊ नये.) गायलेलं असल्याने त्याला सगळं माफ आहे. परंतु समजा हेच जर मी (इथे 'मी' हे फक्त उदाहरणादाखल वापरण्यात आलेले सर्वनाम आहे याची समस्त जिज्ञासूंनी कृपया नोंद घ्यावी.) शाळेत हिंदीच्या पेपरात हे असं 'अखियाँ' च्या ऐवजी 'अक्किया' (कृ. अक्षयकुमारप्रेमींनी पुन्हा एकवार गैरसमज करून घेऊ नये.) किंवा मग 'कैसा'च्या ऐवजी 'केस्सा', 'नखरे दिखा' च्या ऐवजी 'नक्रे दिका' आणि 'छम्मकछल्लो' च्या ऐवजी 'चम्मकचल्लो' असं लिहिलं असतं तर फकस्त हिंदीच्याच नाही तर समस्त शिक्षकगणाने मला "धिन मे तारे दिका"वले असते. अर्थात कुठल्या शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात 'छम्मकछल्लो' हा शब्द ऑफिशियली वापरला जातो हा मुद्दा तूर्तास गौण आहे.

तर हे असं 'चम्मकचल्लो' वारंवार ऐकून मला माझ्या उमेदीची वर्षं आठवली. 'चित्रपट प्रेक्षक' या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं.. गोंधळ झाला असल्यास दोन्ही वाक्यं पुन्हा एकदा वाचा.. झालेला गोंधळ शमला असल्यास पुढचं वाक्य वाचा. शमला नसेलच याची खात्री असल्याने तेच वाक्य पुन्हा एकवार व्यवस्थित लिहितो.

"तर हे असं 'चम्मकचल्लो' वारंवार ऐकून मला माझ्या 'चित्रपट प्रेक्षक' या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं आठवली." हुश्श..

तर तो काळ म्हणजे असा की ज्यावेळी रा. रा. रणजीत (रा. रा. रणजीत हे क... क... किरण प्रमाणे वाचू नये. अन्यथा रा१ बा१ वेळा बघण्याची शिक्षा ठोठावण्यात येईल.), शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद, किरण कुमार वगैरे लोक श्रीदेवी, जयाप्रदा (लांब केस असल्याने लहानपणीची माझी आवडती हिरवीण) झालंच तर पूनम धिल्लो, रीना रॉय वगैरे बायांची त्या 'गाव के नदी पे' पाणी भरायला किंवा मग कपडे धुवायला जात असताना वाट अडवायचे आणि तेव्हा त्या छेडछाड प्रकरणाचा श्रीगणेशा व्हायचा तो याच वाक्याने. "हाय रे म्मेरी छम्मकछल्लो." त्यानंतर मग माफक चर्चेनंतर आणि त्या बाईच्या त्या चित्रपटातल्या स्थानानुसार (म्हणजे हिरोची बहिण/प्रेयसी/बायको) 'हिरव्या' ची एन्ट्री किंवा छम्मकछल्लोचा तो क्लासिक डायलॉग उच्चारणार्‍या कुत्त्या/कमिन्याच्या गालावर एक चपराक आणि त्यानंतर बाईचं अपहरण वगैरे गोष्टी घडायच्या. पण असो. तो आपला आजचा मुद्दा नव्हे.

तर 'छम्मकछल्लो' या शब्दाची ओळख मला झाली ती अशी रणजीत, शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद, किरण कुमार यांच्या तोंडूनच. अमिताभ, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदा, मिथुनदा, संजू बाबा प्रभृतींनी कधीही आपल्या साता जन्माच्या प्रेयसीला छम्मकछल्लो सोडा साधं डार्लिंग/डिअर म्हटल्याचंही स्मरत नाही. गेला बाजार जानू, जान, सनम, दिलबर, जानेमन वगैरेच आणि तेही कटाक्षाने फक्त गाण्यांमध्येच.

तत्कारणात् शाहरुख खानाला त्याच्या बायडीला त्या अलिखित नियमानुसार उपरोल्लेखित साच्यातली हाक न मारता एखाद्या खलनायकाने रस्त्यावरच्या बाईला छेडताना बोलवावं तशा पद्धतीने बोलावताना आणि त्या हाकेला ओ देत त्या बयेने नाचत नाचत पुढे येताना पाहून माझ्यातल्या ऑर्थोडॉक्स प्रेक्षकाला अंमळ कसंसंच झालं आणि सुमारे १२-१५ वर्षांपूर्वीची करीना करिष्मा आठवली. लग्नानंतर करिष्माचं वेगाने गायब होणं आणि त्याच्या जवळपास दुप्पट वेगाने करीनाने पडदा काबीज करणं यामुळे झालंय काय की "त म्हटल्यावर ताकभात" प्रमाणे "क म्हटल्यावर/लिहिल्यावर" आधी करीनाच आठवते (इथे सैफभक्तांच्या किंवा एकताभक्तिणींच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्हास त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. एखाद्याला सैफ किंवा/आणि एकता आवडतो/ते हाच खरं तर पुरेसा गुन्हा आहे !!). करिष्मा डोक्यातही येत नाही. असो..

तर या 'चम्मकचल्लो' (शब्दा) च्या सढळ वापरामुळे मला पंधरा एक वर्षांपूर्वी 'खुद्दार' नावाच्या गोंद्याच्या तद्दन टाकाऊ चित्रपटात करिश्माच्या तोंडी असलेलं "सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले, हाय सेक्सी हॅलो सेक्सी क्यों बोले" वालं गाणं आठवलं. ते गाणं पहिल्यांदा टीव्हीवरच्या 'सुपरहिट मुकाबला' (चित्रहार/छायागीतचं नव्वदीच्या दशकातलं अपग्रेडेड व्हर्शन) नामक कार्यक्रमात ऐकलं आणि धरणीमाय पोटात घेईल तर बरं असे काहीसे भाव अस्मादिकांच्या आणि आमच्या 'चित्रपट-नावडणाऱ्या' पालकांच्या चेहर्‍यावर जवळपास एकाच वेळी दाटले. लगबगीने उठून च्यानेल बदलले गेले हेसांनल. त्यावेळी आमच्या घरात निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण जवळपास मुंबईभर किंवा कदाचित देशभरही ("वचने किं दारिद्रता" च्यायला) पसरलं असावं. कारण दोनच दिवसांनी चित्रहाराच्या कार्यक्रमात ते गाणं चक्क असं वाजलं होतं.

"__ __ __ मुझे लोग बोले
हाय __ हॅलो __ क्यों बोले"

त्यानंतर काही दिवसांतच 'सेक्सी'चं सोवळेकरण करून गाळलेल्या जागा भरत तिथे चतुराईने 'बेबी' शब्दप्रयोगाचा चपखल वापर करून मोठ्या खुबीने तेच गाणं पुन्हा "बेबी बेबी बेबी मुझे लोग बोले" करत राजरोसपणे वाजायला लागलं आणि तमाम 'सेक्सी' प्रकरणावर पडदा पडला. त्याच्यानंतर काही दिवसांनी/महिन्यांनी घडलेली गोष्ट असेल. 'दुलारा' नामक असल्याच लक्षातही ठेवण्याची लायकी नसलेल्या चित्रपटात "मेरी पेँट भी सेक्सी, मेरा शर्ट भी सेक्सी" असं करत करत शेवटी रुमालावर घसरत म्हणजे "रुमालभी सेक्सी है" असं जाहीर करत अचानक गोंद्या उड्या मारताना दिसला. त्याच्या त्या तथाकथित सेक्सी कपड्यांचं ('गोविंदाचे कपडे' आणि 'सेक्सी' हे दोन शब्द एकाच वाक्यात येणे यासारखं विरोधाभासाचं दुसरं उदाहरण नसेल !!) उड्या मारत केलेलं मार्केटिंग त्यानंतर काही दिवस चालू होतं. परंतु तेव्हा त्या गाण्यावर कोणी विशेष आक्षेप घेतल्याचं स्मरत नाही. कदाचित मुलीने स्वतःला सेक्सी म्हण(व)णं आणि मुलाने आपले कपडे सेक्सी आहेत हे तारस्वरात जाहीर करणं यातला दुसरा पर्याय सरकार/सेन्सॉरला कमी निर्लज्ज वाटला असावा.

अर्थात "काय सेक्सी झालीये पावभाजी" किंवा "कसली सेक्सी बाईक आहे यार तुझी" च्या काळात वर सांगितलेलं हे सगळं सेक्सीपुराण म्हणजे निव्वळ चर्वितचर्वण वाटण्याचाच संभव अधिक आहे.. आणि तसंही हे चर्वितचर्वणच आहे. कुठे काही मुद्दा तरी आहे का? उगाच या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणं तर चाललंय. असो.

'छम्मकछल्लो' च्या पॉझिटीव्ह (चित्रपटात स्वतःच्याच बायकोला उद्देशून असल्याने पॉझिटीव्ह) वापरामुळे आणि वय वर्षं अडीच ते वय वर्षं कितीही या सर्वांनी अगदी आवडीने डोक्यावर घेतल्याने असाच अडगळीत पडलेला किंवा निगेटीव्ह (वरच्या कंसाच्या विरुद्ध) अर्थाने वापरल्या जाणार्‍या 'आयटम' या शब्दास सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आम्ही आत्ताच वर्तवून ठेवत आहोत. आणि करीनाने 'छम्मकछल्लो' केल्याने कतरीना 'आयटम' शब्द असलेलं आयटम सॉंग करणार हे जवळपास नक्की आहे !! कदाचित 'दुःशासन : The Dusha's-Son' किंवा मग "कंस : The Con's Story" असल्या एखाद्या नावाच्या चित्रपटात विवेक मुश्रान किंवा शरद कपूर किंवा मग गेला बाजार चंद्रचूड सिंग असल्या एखाद्या दुसरं कुठलंही काम नसणार्‍या महामख्ख चेहऱ्याच्या निरुपद्रवी इसमाला 'Dusha's-Son' किंवा 'The Con' म्हणून आपल्यासमोर उभं करून सल्लू किंवा हृतिक किंवा आमीर 'किसन : The Key-Son' म्हणून आपल्यापुढे उभे ठाकतील. थोडक्यात 'छम्मकछल्लो' च्या अचानक वाट्याला आलेल्या अमाप लोकप्रियतेमुळे त्याच्या धाकट्या भावंडाला (की भगिनीला?) उर्फ 'आयटम' ला मरण नाही हे निश्चित आणि कदाचित आयटमच्या मागोमाग 'माल' आणि तत्सम शब्दही या भल्यामोठ्या यादीत असतील !!!

अनेक वर्षांपूर्वी निळूभौंच्या मराठी सिनेमात एका स्त्रीवर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल बोलताना फक्त 'भानगड' असा काहीतरी शब्द वापरून त्या प्रसंगाचं वर्णन केलं गेलं होतं. त्यानंतरही कित्येक वर्षं जबरदस्ती, बळजबरी असे तुलनेने अहिंसक (वर्णनाच्या दृष्टीने अहिंसक) शब्द वापरण्याचा अलिखित नियम होता. एखादा निवडक 'ए' प्रमाणपत्र असलेला हिंदी चित्रपट आला तर त्यात चुकून 'बलात्कार' हा शब्द ओझरता निघून जायचा. जेमतेम वीस वर्षात चित्रपटांच्या भाषेची, दिग्दर्शकांच्या अकलेची आणि प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेची एवढी 'प्रगती' झाली की एके काळी दबून हलक्या आवाजात उच्चारला जाणारा शब्द 'चमत्कार' ला प्रतिशब्द म्हणून वापरला गेला आणि तो तशा पद्धतीने वापरला गेल्याने जणु त्याची तीव्रता कमी होत असावी अशा प्रकारे त्या शब्दावर विनोद करून पोट धरून हसण्यापर्यंत या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या !!!

खरं तर हेलन, बिंदु, अरुणा इराणी वगैरे बायका म्हणजे आद्य आयटम गर्ल्स. एखाद्या क्लबात कॅबरे वगैरे करणं हे त्यांचं चित्रपटातलं प्रमुख काम. कारण आशा पारेख, शर्मिला टागोर, हेमामालिनी, साधना, बबिता, नूतन वगैरे बायांनी असलं काही करणं हे कमीपणाचं किंवा अशोभनीय समजलं जायचं. पण आता करीना, प्रियांका, कतरिना वगैरेंसारख्या मेन हिरविणीच हे काम आनंदाने आणि प्रसंगी मुद्दाम मागून घेऊन करायला लागल्याने राखी सावंत, इत्यादींसारख्या फुलटाईम आयटम-गर्ल्सवर भुकेकंगाल होण्याची वेळ आली आणि त्यांना एकतर बाष्कळ बडबड करून, बेगडी स्वयंवरं रचून आणि टुक्कार न्यायालयांचे तमाशे मांडावे लागले किंवा मग भुक्कड टीव्ही मालिकांमध्ये भडक काजळं लावून भोळ्याभाबड्या, सहनशील नायिकेच्या नवऱ्यांना पटवण्याची कामं इमानेतबारे करावी लागली.

असो.. खरंतर हाही विषय नव्हताच आजचा. तसं म्हटलं तर कुठलाच नव्हता किंवा कोणाबद्दल कसली काही तक्रारही नाही. कारण सिनेमा हे जात्याच एवढं बदलतं माध्यम असल्याने हे कधीनाकधी तरी होणार होतंच.. पण तरीही 'चम्मकचल्लो' मुळे चित्रपटांमधल्या बदलत्या भाषेचा प्रवास सहज जाणवून गेला आणि तो थोडाफार इथे मांडला. अर्थात ही पोस्ट म्हणजे काही तो प्रवास मांडण्याचा वगैरेही काही प्रयत्न नव्हता कारण तो समग्र प्रवास मांडण्यासाठी खूपच विस्तृतपणे लिहावं लागेल. हा लेख म्हणजे फार तर फार काही निवडक किंवा एके काळी वाळीत असलेल्या किंवा सभ्य नायकाने चारचौघात वापरण्यावर बंदी असलेल्या शब्दांचा 'ए' पासून 'यु' पर्यंतचा प्रवास असं म्हणू शकतो जास्तीत जास्त आणि मुख्य म्हणजे 'दिल्लीच्या गुरगुरणाऱ्या पोटा' कडे पाहता/ऐकता ही म्हणजे त्या प्रवासाची फक्त, फक्त आणि फक्त सुरुवात आहे असंच केवळ आपण म्हणू शकतो !!

Wednesday, November 9, 2011

सिनेमाच्या ऑटोमॅटिकली प्रेमात पाडणारं 'सिनेमॅटिक'

- अतिशय प्रसिद्ध आणि सगळ्यात गाजलेल्या ' द एक्झॉर्सिस्ट' या भयपटाचा निर्माता आणि त्याच नावाच्या कादंबरीचा लेखक विल्यम पीटर ब्लॅटी हा त्यापूर्वी विनोदी पटकथाकार म्हणून प्रसिद्ध होता आणि 'द एक्झॉर्सिस्ट' लिहिण्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थितीत असलेल्या ब्लॅटीने त्या काळात विनोदी लेखन/चित्रपटांची लाट ओसरल्याने निव्वळ प्रयत्न म्हणून आणि उपजीविकेचं साधन म्हणून एका १४ वर्षांच्या मुलाच्या अंगातलं भूत उतरवण्याच्या अमेरिकेत प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारित ' द एक्झॉर्सिस्ट' नावाची कादंबरी लिहिली.

- मेट्रिक्स चित्रत्रयी बनवताना वाचोस्कींनी त्यांच्यारोबरच 'अ‍ॅनिमेट्रिक्स' ही नऊ अ‍ॅनिमेटेड लघुपटांची मालिका आणि 'एन्टर द मेट्रिक्स' हा संगणकीय खेळ तयार केला. मेट्रिक्स चित्रत्रयीबरोबरच ही लघुपटांची मालिका आणि संगणकीय खेळ बघितल्या/खेळल्याशिवाय मेट्रिक्सचा आनंद पूर्णपणे उपभोगता येत नाही.

- ९/११ ची ऐतिहासिक दुर्घटना घडल्यानंतर पुढची कमीतकमी ४ ते ५ वर्षं अमेरिकन चित्रसृष्टीने त्या विषयाकडे (काही मोजकेच अपवाद वगळता) जाणूनबुजून संपूर्णतः दुर्लक्ष केलं होतं. प्रेक्षक त्या घटनेला पडद्यावर कसे स्वीकारतील हे त्यामागचं प्रमुख कारण होतं.

एक्झॉर्सिस्ट, मेट्रिक्स किंवा ९/११ शी संबंधित चित्रपट माहिती नसलेले/न बघितलेले (इंग्रजी चित्रपटांचे) रसिक हे नक्कीच अगदी फार फार विरळ असतील परंतु वर दिलेले हे मुद्दे किंवा या प्रकारची माहिती ठाऊक नाही असे लोक मात्र नक्कीच तितकेसे विरळ नसावेत. किंबहुना विपुल असतील.

किंवा मग पायरसीच्या विरोधात बोलण्याची (काही प्रमाणात रास्त) पद्धत असतानाही "निव्वळ पायरसीमुळे का होईना दुर्मिळ किंवा आपल्या इथे प्रदर्शित न होणारे चित्रपट सहजगत्या लोकांपर्यंत पोचवणार्‍या पायरेटेड डीव्हीडी मार्केटच्या प्रेक्षक घडवण्याच्या प्रक्रियेतल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल पायरसीचे आभार" अशा प्रकारचा खळबळजनक आणि तितकाच क्रांतिकारक विचार एका सिनेपरीक्षकाकडून मांडला जाऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसेल का?

विशेष आवड म्हणून, लक्षपूर्वक चित्रपट बघणारे , चित्रपट या प्रकारावर प्रेम करणारे असा एक गट आणि जड विषय न आवडणारे आणि मेंदूला उगाच ताण न देता हलकेफुलके, डोकं बाजूला ठेवून बघायचे चित्रपट आवडणारे असा दुसरा गट असे प्रेक्षकांचे दोन ढोबळ प्रकार पाडता येऊ शकतात. पण तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रेक्षक असलात तरीही चित्रपट बघण्यापूर्वी तो चित्रपट कुठल्या घटनेवर बेतला आहे (असल्यास) , तत्कालीन सामाजिक, जागतिक परिस्थिती, लेखक/दिग्दर्शकाची पार्श्वभूमी, विचारधारा, वैशिष्ठ्य इत्यादी तुरळक गोष्टी माहित असतील तर मग कुठलाही चित्रपट अगदी तद्दन विनोदी किंवा गल्लाभरू हाणामारीचा चित्रपट बघतानाही जरा वेगळीच मजा येते किंवा तो चित्रपट आपल्यापर्यंत पोचल्याची एक हलकीशी का होईना जाणीव निर्माण होऊ शकते. अशी चित्रपटांची अंतर्बाह्य ओळख करून देऊन, चित्रपट कसा बघायचा, त्यात नक्की काय बघायचं याची माहिती करून देऊन चित्रपट बघायला शिकवणारे आणि चित्रपटांच्या प्रेमात पडायला लावणारे अशा प्रकारच्या सिनेसमीक्षकांमध्ये गणेश मतकरी यांचं नाव निर्विवादपणे बरंच वर आहे. सुरुवातीला दिलेले तीन मुद्दे आणि ते क्रांतिकारक विधान (आणि इतरही असंख्य महत्वपूर्ण गोष्टी) त्यांच्या नुकत्याच शिकागो येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात प्रकाशित झालेल्या 'सिनेमॅटिक' या पुस्तकाद्वारे आपल्या भेटीस येतात.

'सिनेमॅटिक' म्हणजे मतकरींनी दिवाळी अंक किंवा तत्सम सिनेविषयक विशेषांकांमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या माहितीपूर्ण लेखांचा संग्रह. त्यात रहस्यपट, भयपट, युद्धपट, सुपरहिरोपट, लघुपट, मराठी चित्रपट, साय-फाय यावर प्रत्येकी एक आणि समांतर सिनेमा व ९/११ यावर प्रत्येकी दोन लेख अशा विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या एकापेक्षा एक माहितीपूर्ण लेखांची भरगच्च मेजवानी आहे. या पुस्तकाला अरुण खोपकरांसारख्या दिग्गज जागतिक चित्रपट-अभ्यासकाची प्रस्तावना लाभली आहे.

मागे एकदा रॉजर एबर्ट या जगप्रसिद्ध चित्रपट-समीक्षकाविषयी लिहिताना मतकरींनी समीक्षकांचे ढोबळ मानाने तीन प्रकार सांगितले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर

१. दैनिका, साप्ताहिकांत निव्वळ जागा भरून काढण्यासाठी लिहिणारे.. चित्रपटांचं परीक्षण करण्यापेक्षा गोष्ट तपशीलात सांगून जागा भरण्याकडे या मंडळींचा कल असतो. त्यांना प्रेक्षकांच्या चित्रपट विषयक ज्ञानात भर टाकण्याची गरज वाटत नाही, किंबहूना ते मुळात असावं असाही त्यांचा आग्रह नसतो.

२. चित्रपटांचे अभ्यासक असणारे आणि चालू चित्रपटांना बऱ्या वाईटाची लेबलं लावण्यापेक्षा एकूण चित्रपटांच्या इतिहासात अधिक रस असणारे. हे लोक बऱ्यापैकी दुर्मिळ असतात.

३. आणि तिसरे म्हणजे या दोन्ही प्रकारांचा सुवर्णमध्य साधणारे. या मंडळींचा स्वतःचा असा अभ्यास आहे. त्यांच्याकडून होणारा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे चित्रपट रसिकांना होऊ शकणा-या अचूक मार्गदर्शनाचा. यांचं लिखाण क्लिष्ट नाही, पण काही विशिष्ट अभ्यासातून आलेलं आहे. ते शक्य तितक्या सोप्या भाषेत आपल्या वाचकांपर्यंत नेण्य़ाची त्यांची हातोटी आहे.

मला वाटतं मतकरींनी रॉजर एबर्टसाठी लिहिलेलं हे वर्णन त्यांच्या स्वतःसाठीही अगदी चपखलपणे लागू होतं. सिनेमॅटिकमधला प्रत्येक लेख हा याचा पुरावा आहे. प्रत्येक लेखात त्या त्या प्रकारच्या चित्रपटांच्या निर्मितीपासून तत्कालीन सामाजिक, राजकीय, जागतिक परिस्थितीवर प्रकाश टाकून कुठलाही चित्रपट हा तसाच का बनवला गेला, त्यामागची प्रेरणा काय होती, दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचं होतं या साऱ्या साऱ्या विषयीची विपुल माहिती अजिबात रटाळ किंवा किंचितही क्लिष्ट न होता ओघवत्या स्वरूपात आपल्यापुढे येते. या पुस्तकात उल्लेखलेले काही चित्रपट आपण कधी ऐकलेलेही नसतील पण तरीही त्याची निर्मिती प्रक्रिया, कार्यकारणभाव, उद्देश, त्यासाठी घेतली गेलेली मेहनत आणि त्या चित्रपटाचा समाजावर, लोकमनावर आणि अन्य चित्रपटांवर झालेला परिणाम इ. इ. तर आपण अक्षरशः जगतोच. पण खरी मजा तर पुढेच आहे. कित्येक माहित असलेल्या, लाडक्या असलेल्या आणि अनेकदा पाहिलेल्या चित्रपटांविषयी तो कसा बघायचा, त्या चित्रपटात नक्की काय बघायचं, प्रसंगी त्यात काही काही उणीव कशा आहेत हे दाखवून देऊन आपण इतक्या वेळा बघितलं तरी हा मुद्दा किंवा हा दृष्टीकोन किंवा अगदी हा कॅमेरा अँगल आपल्या अजिबातच कसा लक्षात आला नाही याप्रकारची माहिती वाचून आपण अचंबित होऊन जातो. ठाऊक असलेला चित्रपटही अधिक चांगल्या प्रकारे कसा बघायचा याचं रसाळ मार्गदर्शकच जणु..

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातली ओळ न् ओळ वाचताना हे सगळं प्रचंड अभ्यासातून आणि निरीक्षणातून आलेलं आहे हे सतत जाणवत राहतं. प्रत्येक लेख, प्रत्येक नवीन परिच्छेद आपल्या चित्रपटविषयक ज्ञानात भर घालत असतो. आणि पुस्तकाच्या अखेरीस दिलेली संदर्भग्रंथांची सूची पाहता त्याची सत्यताही पटते. जागतिक चित्रपटाच्या विविध अंगांवरच्या अनेक पुस्तकांच्या वाचनातून आणि अभ्यासातून प्रत्येक लेख जन्माला आला आहे हे सतत जाणवत राहतं.

प्रत्येक लेख हा निर्विवाद अप्रतिम आहेच तरीही माझे या पुस्तकातले विशेष आवडते लेख म्हणजे 'रम्य नसलेल्या युद्धकथा', 'गरीबांचा सिनेमा', 'समांतर - एका चित्रप्रकाराचा प्रवास', 'हॉलिवूड पोस्ट ९/११' आणि 'हॉलिवूडचा पडदा आणि ९/११' हे लेख. बाकीचे लेखही अत्यंत माहितीपूर्ण आणि अप्रतिम आहेतच परंतु हे लेख अधिक आवडण्याची विशेष कारणं आहेत. युद्धपटांवरच्या लेखात युद्धपटांच्या संक्रमणाचा जो प्रवास मांडला आहे त्याला खरंच तोड नाही. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातल्या किंबहुना अगदी युद्धाच्या आणि त्यानंतरच्या काही वर्षांतल्या चित्रपटांत सैनिक, सैन्य, युद्ध इत्यादींना जे एक स्वप्नील रूप देऊन, हिरो बनवून, युद्धांना रम्यकथा म्हणून दाखवण्यापासून ते काही वर्षांतच युद्धांचे भीषण दुष्परिणाम जाणवायला लागल्यानंतर समाजाच्या आणि त्यामुळे चित्रकर्त्यांच्याही युद्धपटनिर्मितीच्या बदललेल्या जाणिवांवर आणि प्रतिमांवर हा लेख अगदी अचूक बोट ठेवतो. युद्धपटांचं संक्रमण अक्षरशः आपल्यासमोर घडताना दिसतं. तर समांतर सिनेमे खूप जास्त प्रमाणात बघितले नसल्यामुळे समांतर चित्रपटांचा इतिहास, प्रवास वेगवेगळया दिग्गजांनी केलेली हाताळणी, त्याची कारणमीमांसा इ सगळं वाचायला खूप आवडलं. 'गरीबांचा सिनेमा' मध्ये एका पूर्णपणे वेगळ्या ज्यॉनरमधल्या चित्रपटांविषयी लिहिताना 'बायसिकल थिव्ज', 'पथेरपांचाली', 'दो बिघा जमीन' पासून ते थेट 'पीहोटे', 'सलाम बॉम्बे' आणि अगदी आजच्या 'स्लमडॉग मिलिअनेअर पर्यंतच्या चित्रपटांचा तपशीलवार घेतला गेलेला मागोवा फारच रोचक वाटला. अर्थात ९/११ वरचे दोन लेख विशेष आवडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ९/११ बद्दल मला व्यक्तिशः असलेलं प्रचंड आकर्षण किंवा आवड. अर्थात आकर्षण किंवा आवड हे शब्द योग्य आहेत की नाहीत याची कल्पना नाही पण थोडक्यात हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्या विषयावरचा आणि तो विषय हॉलिवूडसारख्या सतत नवनवीन प्रकार लीलया हाताळणाऱ्या चित्रसृष्टीने कसा मांडला हे समजून घेण्याच्या दृष्टीने ९/११ वरचे लेख खूपच आवडले.

पुस्तकाचं मुखपृष्ठही खरंच अतिशय सुंदर आहे. दहा विषयांवरच्या दहा लेखांना दहा स्तंभांमध्ये मांडून दाखवल्याने पुस्तकातल्या विषयांची व्याप्ती मुखपृष्ठापासूनच ध्यानात येते. पण मुखपृष्ठापेक्षाही त्याच्या पुढचं पान हे माझं जास्त आवडतं आहे. त्याला कारणही तसंच आहे !!!




नुकताच गणेश मतकरींच्या भेटीचा योग आला आणि त्यावेळी चित्रपटांवरच्या भरपूर गप्पांच्या मेजवानीबरोबरच प्रत्यक्ष मतकरींकडूनच त्यांनी स्वाक्षरी केलेलं पुस्तक मिळवण्याची सुवर्णसंधी लाभली.

एवढं सगळं लिहिल्यावरही पुस्तक नक्की वाचा असं वेगळं सांगण्याची गरज नाहीच पण तरीही सांगतो प्रत्येक चित्रप्रेमीने अगदी आवर्जून वाचण्यासारखं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करताना मतकरी म्हणतात की "मला वाटतं चित्रपट कसा पाहावा या प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर म्हणून 'सिनेमॅटिक' कडे पाहता येईल." यातलं "माझ्यापुरतं" काढून टाकून "चित्रपट कसा पाहावा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'सिनेमॅटिक' आहे" असं मी म्हणेन. !!

प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन
ऑनलाईन वितरक : बुकगंगा

-मीमराठी.नेटच्या २०११ च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

Monday, October 24, 2011

आशु आणि चित्र-पट(पट) सत्यवान !!'

अआ आणि आशु लोकांसाठी ब्लॉगिंगचे तीन विशेष नियम आहेत.

१. अशा लोकांनी ब्लॉग सुरु करू नये

२. सुरु केलाच तर तो जेमतेम एक वर्षच चालेल अशी पूर्वसूचना ब्लॉगवर ठळकपणे द्यावी. (आणि ब्लॉगवर दिली नाही तरी स्वतःच्या मनाशी तरी पक्की खुणगाठ बांधावी.)

३. वरचे दोन्ही नियम मोडले तर परिणामांना तयार राहावं !!!

ओह सॉरी... सगळ्यात पाहिलं वाक्य "अत्यंत आळशी आणि आरंभशूर लोकांसाठी.... " असं वाचा. नेहमीप्रमाणे जरा आळशीपणा केल्याने ते बाराखडीसदृश लिहिलं गेलं. असो. तर माझ्यासारख्या अति अआ आणि अति आशु माणसाने पहिले दोन्ही नियम मोडले आणि त्यामुळे आपोआपच परिणामांसाठी तयार राहायची पाळी आली. (न राहून सांगतोय कोणाला ! ).. व्हायचं तेच झालं. पहिल्या वर्षी  तब्बल ११० पोस्ट्स पाडणाऱ्या ब्लॉगवर दुसऱ्या वर्षी जेमतेम ४२ पोस्ट्स आल्या. (अर्थात पाठीराखेही १३८ वरुन २१६ वर गेले म्हणा.) ... खरं तर ब्लॉग (रडतखडत का होईना) दोन वर्षं चालू ठेवला म्हणजे आपण (म्हणजे मी) कदाचित वाटतो तेवढे काही आरंभशूर नाही असं जाणवलं.

त्यानंतर हे मधेच आठवलं.

===============================================

आरंभशूर नाही म्हणजे काय आहोत? आरंभशूरचा विरुद्धार्थी शब्द काय बरं ??

आरंभ X अखेर
शूर X भित्रा

अभि.... !!! अखेरभित्रा....... अखेरभित्रा.......!! अखेरभित्रा?? म्हणजे अखेरीस भित्रा असणारा?? म्हणजे आरंभी शूर असणारा?? च्यायला थोडक्यात आशु आणि अभि एकमेकांचे विरुद्धार्थी नाही तर समानार्थी शब्द झाले..

ओके.. इनफ विषयांतर आणि पांचटपणा.. ब्याक टू कन्फेशन !!

===============================================

अर्थात दुसऱ्या वर्षात वेग मंदावण्याची अन्यही काही कारणं होतीच म्हणा. आपल्या सिनेमास्कोपमुळे पूर्वी जेमतेम तोंडओळख असणाऱ्या हॉलीवूड आणि जागतिक सिनेमाशी अधिक चांगली ओळख झाली. नवीननवीन चित्रपटांची माहिती कळली. चित्रपट कसे बघायचे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजलं. त्यामुळे पूर्वी ब्लॉग लिहिण्यासाठी वापरला जाणारा फावला वेळ पूर्णतः हे सिनेमे गिळंकृत करायला लागले. (ऑफ कोर्स नो कम्प्लेंट्स). त्यामुळे आपोआप ब्लॉगपोस्ट्सशी संख्या रोडावली. अनेक वेगवेगळया प्रकारचे, निरनिराळ्या भाषांतले, अनेक देशांतले चित्रपट बघितले. प्रत्येक चांगल्या चित्रपटाबद्दल ब्लॉगवर लिहावंसं वाटायचं. परंतु तोवर वेटिंग लिस्टमधला पुढचा चित्रपट/सिरीज खुणावत असायचा. हे एक कारण आणि दुसरं एक कारण म्हणजे सतत चित्रपटांवर लिहायला आपला ब्लॉग काही चित्रपटविषयक लिखाणाला वाहिलेला ब्लॉग नाही असंही वाटायचं.

आणि मग तेवढ्यात ट्यूब पेटली. जर ब्लॉग चित्रपटविषयक नाही हे एकमेव कारण चित्रपटांविषयीच्या नवीन पोस्ट्स टाकायच्या आड येत असेल तर ते कारणच दूर करून टाकू. एक नवीन ब्लॉग फक्त चित्रपट/टीव्हीसाठीच सुरु करून टाकू. "प्रत्येक अडथळ्याचं रुपांतर संधीत करू" किंवा "टर्न एव्हरी ऑब्स्टॅकल इन्टू अपॉर्च्यूनिटी.. मला मान्य आहे की हे जरा अतिच होतंय. पण हे आत्ता जस्ट सुचलं.. म्हणजे ब्लॉग काढायचं नव्हे.. हे वाक्य.. सुचलं म्हणजे वाक्य सुचलं नाही. ते कोणालातरी आधीच सुचलेलं होतं. ते वाक्य इथे टाकायचं सुचला, असो. तर पहिल्या ब्लॉगच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या निमित्ताने वटवट सत्यवान सादर करतोय चित्रपटांचा नवीन ब्लॉग..... चित्र-पट(पट) सत्यवान !!

अर्थात वटवट सत्यवान उर्फ harkatnay.com वर पूर्वीप्रमाणे भेटूच. पण 'चित्र-पट(पट) सत्यवान !!' उर्फ http://harkatkay.blogspot.com/ वरही नियमित पोस्ट्स टाकायचा मानस आहे. अर्थात हा अति अवि आहे याची मला कल्पना आहे पण वटवटीचा ब्लॉग दोन वर्षं चालल्याने मी आता आशु राहिलो नसल्याने शक्यतो या अवि ला आणि वाचकांच्या सत्यवानावरच्या वि ला तडा जाणार नाही असा प्रयत्न राहील. प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा...

सर्वांना दिवाळीच्या चित्रपटीय आणि ब्लॉगवाचीय शुभेच्छा !!

Tuesday, August 23, 2011

सैतान (?? !!!!)

- अण्णा हजारेंचं आंदोलन म्हणजे सगळा चुकीचा प्रकार आहे.

- सगळा सावळा गोंधळ आहे नुसता. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.

- जे चाललंय ते सगळं चुकीचं चाललंय.

- अण्णांना पाठींबा देण्यासाठी गर्दी करणाऱ्यांपैकी किती जणांना लोकपाल म्हणजे काय हे माहिती आहे?

- आणि समजा लोकपाल विधेयक आलं तर काय दुसऱ्या दिवसापासून भ्रष्टाचार बंद होणार आहे का?

- आंदोलनं अशी एसएमएस पाठवून आणि "मी अण्णा आहे" च्या टोप्या घालून मिरवून यशस्वी झाली असती तर काय हवं होतं !!

- अण्णांना मिडियाने हिरो केलंय बाकी काही नाही.

- या आंदोलनाला काही दिशा नाही की कसलं प्लानिंग नाही.

- क्रांती अशी पंधरा दिवसांत होत नाही !!

- अण्णा स्वतःचा वैयक्तिक अजेंडा राबवताहेत.

- बेदी आणि केजरीवाल स्वतःचे वैयक्तिक अजेंडे राबवताहेत

- अण्णांच्या आंदोलनामागे कोणाचे आणि काय छुपे उद्देश आहेत हे तिथे येऊन त्यांना पाठींबा देणाऱ्या एकाला तरी माहिती आहे का?

- अण्णांच्या जुन्या आंदोलनांमधले कुठलेही सहकारी त्यांच्या या आत्ताच्या आंदोलनामध्ये अण्णांबरोबर का नाहीयेत?

- अण्णा हे स्वतःचंच म्हणणं खरं करणारे आणि हट्टी आहेत.

- आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या किती जणांनी आत्तापर्यंत कधीच लाच दिलेली नाहीये?

- या आंदोलनात गरीबांचा सहभाग अजिबात नाहीये.

- हे आंदोलन म्हणजे जनतेच्या डोळ्यात पद्धतशीरपणे धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे.

- हे आंदोलन केजरीवाल आणि बेदींनी हायजॅक केलंय आणि ते म्हणतील तसेच निर्णय घेतले जातायत.

- अण्णांचे उद्देश कदाचित योग्य असतीलही पण मार्ग मात्र साफ चुकलाय.

- अण्णा उपोषणाच्या धमक्या देऊन सरकारला वेठीला धरू पहातायत जे साफ चूक आहे.

- सरकार थोडं झुकायला तयार आहे मग अण्णांनीही थोडं नरमाईने घ्यायला हवं.

- अण्णांनी पूर्वीची उपोषणं इलेक्ट्रॉलची पावडर घेऊन केली आहेत म्हणे. (अशा पावडरी घेऊन तर मीही उपोषण करू शकेन आणि तेही वर्षभर)

- अण्णा वाटाघाटीत लगेच नमतात हा पूर्वेतिहास आहे.

इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी..


-----------------------------------------------------

जुलुमी इंग्रजी सत्तेचा बिमोड करून भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मला प्रसंगी सैतानाची मदत घ्यावी लागली तरी ती मी घेईन आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देईन.

- नेताजी सुभाषचंद्र बोस

-----------------------------------------------------

अण्णा कदाचित हट्टी आणि दुराग्रही असतीलही, कदाचित त्यांचा मार्ग चुकला असेल, कदाचित त्यांचं आंदोलन मिडिया आणि विरोधी पक्षांनी मॅनेज केलं असेल किंवा हे एवढेच नाही तर वर लिहिलेले सगळे मुद्दे आणि अण्णांवर केले गेलेले सगळे आरोप खरे असतीलही पण तरीही... हो हो तरीही माझा अण्णांना संपूर्ण पाठींबा आहे. कारण त्यानिमित्ताने का होईना सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, कुठल्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय एकत्र आला, आपण कितीही आणि कितीही करोडोंचे घोटाळे करू शकतो आणि फसव्या कमिट्या नेमून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू शकतो या कॉंग्रेस सरकारच्या अपसमजाला जनतेने अजाणतेपणे आणि न ठरवता का होईना धक्का दिला, सरकारला अक्षरशः उघडं पाडलं, त्यांना पळताभुई थोडी केली, (सोनिया नावाचा) रिमोट कंट्रोल नसेल तर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं सरकार चालवणाऱ्या मुठभर तथाकथित बुद्धिवादी राजकारण्यांची कशी तारांबळ उडते याचं भयानक आणि वास्तव चित्र अण्णांना पाठींबा न देणाऱ्या 'इंटरनेट इंटलेक्च्युअल्स' समोर मांडलं !!!!

आणि हे सगळं बघताना मला वैयक्तिक आनंद होतोय.... अगदी आसुरी आनंद.. कितीही घोटाळे केले तरी घोटाळेबाज मंत्र्यांच्या केसांनाही धक्का न लावणाऱ्या सरकारची अशी गलितगात्र अवस्था बघून मला खरंच भयानक राक्षसी आनंद होतोय.. एक सूड घेतल्याचा आनंद मिळतोय. म्हणून म्हटलं भलेही लोकपाल विधेयक आल्याने किंवा हे अशा प्रकारचं आंदोलन केल्याने भ्रष्टाचार नाहीसा झाला नाही तरी चालेल पण सरकारची पाचर मारता येऊ शकते, भ्रष्टाचाराने पिचलेली जनता सरकारच्या अवघड जागचं दुखणं ठरू शकते ही कल्पनाच कसली सुखावह आहे !!! राहुल, मनमोहन, चिद्या, अहमद, अँटोनी यांच्या साल्या रातीच्या निंदा (झोपा हो) हराम झाल्यात, सगळे एकजात पायात शेपूट घालून अण्णांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या तंबूचे उंबरठे झिजवताहेत ही वस्तुस्थिती अपार सुख देणारी आहे. हर्शोन्मादात चिंब भिजवणारी आहे.

साला पुढचा भ्रष्टाचार करताना, घोटाळे करताना, ते निर्लज्जपणे दाबून टाकताना, कोणाच्या बापाची भीती नसल्यागत बेलगामपणे हिंडणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या डुकरांना क्षणभर जरी अण्णांची, या आंदोलनाची, विशाल जनसमुदायाची आठवण झाली आणि त्या दहशतीने पुढच्या घोटाळ्यांची साईज पाच टक्क्यांनी जरी कमी झाली तरी माझ्या दृष्टीने ते प्रचंड मोठं यश आहे. आणि त्यासाठी सुभाषबाबू म्हणतात त्याप्रमाणे सैतानाची, राक्षसाची मदत घ्यावी लागली तरी माझी हरकत नाही. माझा त्यांना पाठींबाच असेल !!!

Monday, August 8, 2011

तिसरा

काल ना आम्ही त्या चित्रांच्या दुकानात गेलो होतो. बाबाला उशीर झाला यायला. तो ना असलाच आहे. नेहमीच उशीर करतो कुठेही यायला. आणि मग नेहमीच मला त्याचा राग येतो. पण काल नाही आला. कारण त्या दुकानातली ती मस्त मस्त चित्रं बघण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. मी खूप चित्रं बघितली पण मला सगळ्यात आवडलं ते एका छान छोटुल्या चिंटुकलीचं चित्र. काय बरं म्हणाली आई?? पो स ट र.. हां.. असंच काहीतरी.. तर ना त्या चिंटुकलीचे ना डोळे मोठ्ठे होते एकदम आणि टकलूही होती ती.. आणि गुलाबी गाल होते आणि तेही एवढे मोठे नि गुबगुबीत की आता खालीच पडतात की काय असं वाटत होतं. आई म्हणाली की मीही अशीच टकलू होते म्हणून. मग आम्ही दोघी खूप हसलो.

मी आईला म्हटलं की आपण हेच चित्र घ्यायचं विकत. आई काही बोललीच नाही. मला वाटलं तिला ऐकू आलं नसणार म्हणून मी पुन्हा सांगणार होते पण मग तेवढ्यात मला चिप्रा म्हणते ते आठवलं. चिप्रा म्हणते मोठ्या लोकांना आपल्या म्हणण्याकडे दुर्लच्च करायचं असलं की ते असं न ऐकल्यासारखं दाखवतात. तेवढ्यात बाबा आला. मग मी बाबालाही म्हंटलं की आपण या छोटुल्या चिंटुकलीचंच चित्र विकत घेऊ. तर बाबा एकदम चिडलाच. आई म्हणते तसं तो ऑफिसमधल्या कामामुळे चिडचिड करतोय असं मला वाटल्याने मी गप्प बसले. मग जरा वेळाने पुन्हा एकदा त्याला तेच चित्र घेण्याचा हट्ट केला तर एकदम मला म्हणाला कसले ग अभद्र हट्ट करतेस. मला अभद्रचा अर्थ कळलाच नाही. उद्या चिप्रालाच विचारावा लागणार. पण बाबा ओरडून म्हणाला त्याअर्थी काही चांगला अर्थ नसणार हे नक्की.

शेवटी आम्ही एका निळी टोपी घातलेल्या गुबगुबीत बाळाचं चित्र घेऊन घरी आलो.

***

चिप्रा माझी खूप चांगली मैत्रीण आहे पण मला कधीकधी मात्र तिचा खुपच राग येतो. आज शाळेत तिला अभद्रचा अर्थ विचारला तर फिस्सकन हसली त्या घाटपांडे आजींच्या मांजरीसारखी. पण नंतर लगेच अर्थ सांगितलाही. म्हंटलं ना मी ती चांगली मुलगी आहे आणि माझी चांगली मैत्रीणही आहे पण कधी कधी मात्र रागच येतो. अतीच आगाऊपणा करते कधीकधी.. शेता म्हणते की चिप्राला तो लहान भाऊ आहे ना म्हणून जास्त आगाऊपणा करते. पण त्याचा अर्थ मला तरी कळला नाही. तसं तर त्या भावीलाही आहे की लहान बहिण पण ती कुठे असा शहाणपणा करते.. शेताचं आपलं काहीतरीच.

***

"काय बघत्येस? शाळेत नाही का जायचं? उशीर होतोय. आत्ता दहा मिनिटांत येईल स्कूल बस.. आवर ग पटपट.."

खरं तर मला ती गुलाबी चिंटुकली खूप आवडली होती पण आता हे निळी टोपीवालं गुबगुबीत बाळही हळूहळू आवडायला लागलंय. नुसतं त्याच्याकडे बघत रहावसं वाटतं. चिंटुकलीएवढे नसले तरी त्याचेही गाल मस्त गुबगुबीत आहेत. आवडले मला.

"अग जेमतेम सहा वर्षांची तू आणि आरसे कसले बघतेस? आवर ग बाळा फटफट. बस येईल आता"

ही आई पण ना मॅडकॅपच आहे. मी त्या गुबगुबीत चिंटूच्या चित्राकडे बघतेय तर हिला वाटतंय आरश्यात बघतेय. पण मी काही बोललेच नाही. कारण मग ती पुन्हा मलाच ओरडली असती आणि मग पुन्हा तिची ती डोकेदुखी, उलट्या वगैरे सुरु झालं असतं... शी.. त्यापेक्षा नकोच ते... म्हणून मग मी पुन्हा एकदा हळूच त्या चिंटूला टाटा केला आणि लगेच बुट घालायला घेतले.

***

माझा हात पुरत नव्हता म्हणून मग आजीने मला उचलून घेतलं आणि घंटा वाजवायला दिली. चिप्राची आजी खूप छान आहे. नेहमी छान हसत असते बोलताना. आज आईला बरं नव्हतं आणि बाबाला उशीर होणार होता. मला तर घरात बसून अस्सा कंटाळा यायला लागला होता ना. तेवढ्यात चिप्रा आली विचारायला की देवळात येतेस का म्हणून. मी तर काय लगेच तयार झाले. चिप्राची आजी बरोबर येणार होती म्हणून मग आईनेही मला पाठवायला जास्त कटकट केली नाही.

नंतर आजीने चिप्रालाही उचलून घेतलं आणि घंटा वाजवायला दिली. मग आम्ही गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि प्रदच्चिणा घातली.

मग मी आई म्हणते तशी मला चांगली बुद्धी दे असं बाप्पाला सांगितलं. आणि मग हळूच आईला आणि बाबालाही चांगली बुद्धी दे असंही सांगितलं. ते नेहमी मलाच मागायला सांगतात स्वतःसाठी मागतच नाहीत. म्हणून मी ते नसतात तेव्हा हळूच त्यांच्यासाठीही चांगली बुद्धी मागून घेते. बाप्पा ऐकतो की नाही माहित नाही. नसावा ऐकत.

मग मी हळूच ती गुलाबी गालांची चिंटुकली आमच्या घरात येउदे असंही मागितलं. आणि नंतर चिप्रासारखाच मलाही लहान भाऊ दे असंही मागितलं. बरंय चिप्राचा आगाऊपणा तरी जरा कमी होईल.

***

आज आमच्या शाळेत कसलीतरी मोठ्या लोकांची मिन्टीग होती. त्यामुळे शाळा चक्क मधल्या सुट्टीतच सोडून दिली आणि प्रत्येकाला अगदी घरापर्यंत स्कूलबसने सोडलं. नेहमीसारखं त्या जवळच्या चौकात नाही. त्यामुळे मजा आली. दार वाजवलं तर चक्क चक्क बाबाने दार उघडलं. बाSSS बाSSS ?? आज लवकर घरी? मला खूप मस्त वाटलं एकदम. आज त्याचे डोळे लालही नव्हते. संध्याकाळी बाग आणि मग भेळपुरी असं काय काय ठरवायला लागले मी मनातल्या मनात. तेवढ्यात माझं समोर लक्ष गेलं. एक आजोबा बसले होते समोर. म्हणजे खूप म्हातारे नव्हते. पण टक्कल होतं. पांढरा झब्बा आणि लेंगा घातला होता आणि कपाळाला मोठा अंगारा... उमम्म.. अंगारा नाही गंध गंध.. आजीने सांगितलाय मला गंध आणि अंगार्‍यातला फरक.

"बेटा, हे आहेत अण्णा महाराज.. यांना नमस्कार कर बरं" बाबा म्हणाला.

मी नमस्कार केल्यावर त्यांनी मला जवळ घेतलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. आणि माझ्या कपाळाला त्यांनी लावलेलं तसंच गंधही लावलं. आई, बाबा आणि आजी तिघांच्याही कपाळाला असंच गंध होतं. आत्ता लक्ष गेलं माझं. मग आई मला किचनमधे घेऊन गेली आणि चिवडा आणि बिस्किटं खायला दिली आणि मी लवकर कशी आले हे ही विचारलं. मग मी ते मिन्टीगचं तिला सांगितलं.. ती फक्त हम्म म्हणाली. चिवडा खाऊन झाल्यावर मी बाहेर आले तर बाबा म्हणाला की तू चिप्राकडे जा खेळायला. मला मुळीच जायचं नव्हतं तिच्याकडे. मी फक्त आईकडे बघितलं. मग आई म्हणाली की राहुदे. तिला खेळूदे बेडरूममधे.. बाबा खरं तर तयारच नव्हता मग त्या महाराजांनी हसून फक्त हातानेच "चालेल" अशी खुण केली. मग मी बेडरूममधे जाऊन एकटीच भातुकली खेळत बसले. आधी आवडले नव्हते ते महाराज पण त्यांच्यामुळे मला चिप्राकडे जायला लागलं नाही त्यामुळे बरं वाटलं.

बाबा चक्क कोणाचंतरी ऐकतोय हे पाहून तर मला एकदम मज्जा वाटली.

***

आधी तर मला हसायलाच आलं होतं. ही चिप्रा ना कधीकधी ज्याम मॅडकॅपसारखी बोलते. आधी म्हणाली अपत्य म्हणजे संकट. मला तरी काही ते पटलं नाही. मी तिला म्हंटलंही की अग अपत्य म्हणजे संकट कसं असेल? तिला पटेना म्हणून मग ते महाराज आजोबा म्हणाले ते तिला पुन्हा सांगितलं. तिसरं अपत्य मुलगा... आता अपत्य म्हणजे संकट असेल तर "तिसरं संकट मुलगा" असं होतं ना.. आणि ते महाराज आजोबा असं काहीतरी कशाला बरं बोलतील? अर्थ काय त्या वाक्याचा? तर ती म्हणाली की तू आतमधे होतीस तुला नीट ऐकू आलं नसेल. मी तिला पुन्हा एकदा सांगितलं की मी मला सगळं नीट ऐकू नाही आलं कबुल.. पण तिसरं अपत्य मुलगा हे तीन शब्द मात्र मी नक्की ऐकले. पण तरीही तिचं पादुपल चालूच.. मग जरा वेळ थांबली आणि मग मात्र एकदम जीभ चावून पटकन म्हणाली की अग नाही.. आत्ता आठवलं. संकट म्हणजे अपत्य नाही संकट म्हणजे आपत्ती.. तिच्या पपांनी एकदा बातम्या बघताना सांगितलं होतं म्हणाली. पण अपत्य म्हणजे नक्की काय हे तिलाही माहीत नव्हतं. तिलाही माहित नसणार हे मला माहित होतंच. माहित नाहीये तर सरळ कबुल करायचं ना पण आगाऊपणा करण्याची सवय..

नंतर स्वतःच विचारायला लागली की म्हणे नक्की काय बोलत होते ग ते महाराज आजोबा? काय अर्थ असेल त्याचा? तू अजून काही ऐकलंस का?..... आता हिला खरं तर काय गरज आहे मध्ये मध्ये नाक खुपसायची... त्यामुळे मी ऐकलं होतं तरी मी सरळ नाही म्हणाले. तरीही ती मागे लागली तेव्हा मग मीही जास्त नाटकं न करता जे मी अजून ऐकलं होतं तेही तिला सांगितलं. अगदी नक्की ना? खरं ना? असं कायतरी बाबा आणि आजी विचारत होते ते तिला सांगितलं. आजोबा महाराजांचं अस्पष्ट ऐकू आलेलं बोलणंही सांगितलं.. माझ्यावर विश्वास नाही का?.... आणि सहा आठवडे म्हणजे तर काहीच पॉबेम नाही. घाबरू नका... पुढचा तीन नंबरचा....

मला माहिती होतं तसंच झालं. तिलाही यातल्या एकाही शब्दाचा अर्थ माहित नव्हता. हां तसं म्हणजे आमच्या वर्गात एक नेहा विश्वास परब नावाची मुलगी आहे त्यामुळे विश्वास हे नाव आहे एवढं आम्हाला माहित होतं. कदाचित महाराज आजोबांचं खरं नाव विश्वास असेल. पण ते पॉबेम म्हणजे काय हे तर आम्हाला दोघींनाही काहीच कळलं नाही. तो शब्द तसा ऐकला होता मी. पण बाबा वैतागला असला की तो शब्द वापरतो पण त्यावेळी त्याला त्याचा अर्थ विचारायचा म्हणजे संपलंच...

***

आज बरोब्बर चौथा दिवस. घरात कोणीच कोणाशी बोलत नाहीये. निदान आई तरी कोणाशीच नाही बोलते.. सारखी बेडरूममधे बसून आहे. काल तर चक्क डोळे पुसत होती. मी बघितलं एकदा. जाऊन विचारलंही की काय होतंय? तर म्हणाली की काही नाही. असंच थोडं पोटात दुखतंय. पण बरोबरे.. मलाही एकदा पोटात दुखत होतं ना तर तेव्हा मी खूप रडले होते. रात्री आई आणि आजीने रव्याने की ओव्याने कशाने तरी पोट शेकल्यावर थोडं बरं वाटलं होतं. म्हणून मग मी आईला विचारलं सुद्धा की आपण रव्याने तुझं पोट शेकुया का? तर किंचित हसली आणि नाही म्हणाली. काय झालंय आईला कळत नाही. खरं तर गेले चार दिवस तिची तब्येत बरी आहे. उलट्या नाही, डोकं दुखत नाहीये. पण तरीही झोपून आहे. कशामुळे पोट दुखतंय काय माहित. बाबा तर अजूनच उशिरा आला आज. नेहमीपेक्षाही खूप. आजीशी काहीतरी हळू आवाजात बोलला. आई झोपलेलीच होती. आणि आईच्या बाजूला मी. तो बाहेर टीव्ही लावून बसला.

पहिल्या दिवशी शाळा बुडवताना मज्जा आली एकदम. पण आता चार दिवस घरात बसून मला कंटाळा आलाय. परवा आईला डॉक्टरकाकांकडे जायचं होतं. कुठेतरी लांब आहे त्यांचा दवाखाना. खूप वेळ लागणार होता तपासायला. म्हणून मग माझी तयारी करायला, मला डबा द्यायला कोणालाच वेळ नव्हता. म्हणून मग मला दांडी मारायला मिळाली. आई आली ती थेट संध्याकाळी.. आणि चक्क बाबाही होता तिच्याबरोबर. सकाळी जाताना तर एकटीच गेली होती. तर तेव्हा आली आणि जी बेडरूममधे जाऊन झोपली ती झोपलीच. अशीच वागतेय. आणि मला मात्र कधी एखाद्या दिवशी जरा लोळायचं असलं किंवा उशिरा उठायचं असलं की मला मात्र लगेच आळशी म्हणून मोकळे हे लोक. आता कोण आळशीपणा करतंय बघा..

आठ दिवसांनी शाळेत गेले तरी मला कोणी काही म्हणालं नाही की कुठल्या बाई काही ओरडल्या नाहीत. बाबा आला होता सोडायला. तो मुख्यबाईंशीही बोलला काहीतरी.

***

हळूहळू आईला बरं वाटलं. बेडरूममधून बाहेरही पडली एकदाची. आईला किचनमधे बघून बरं वाटलं. आजी तर म्हणतेच की.. की बाईची जागा सैपाकघरात. आजी म्हणते ते अगदी खरं आहे. मलाही पटलं ते. कारण त्या बेडरूममधून बाहेर पडल्यापासून आई पुन्हा नेहमीप्रमाणे माझी तयारी करायला लागली, मला आंघोळ घालायला लागली, माझी पोनी घालायला लागली, मला डबा द्यायला लागली. तिमाही परीक्षेच्यानंतरचे ते चार दिवस सोडले तर आत्तापर्यंत म्हणजे वार्षिक परीक्षेपर्यंत मी एकही दांडी मारली नाहीये. चिप्राने तीनदा मारली आणि भावीने तर चारदा. आता मी महिनाभर मीनामावशीकडे जाणार आहे राहायला. औरंगाबादला. मीनामावशी, श्रीकाका दोघेही एकदम मस्त आहेत. आणि भक्की तर माझी एकदम चांगली बहिण आहे. नाही बहिण नाही.. मैत्रीण मैत्रीण.. बहिण नाही आवडत मला. मैत्रीणच. मी आणि भक्की आता खूप खेळणार.. त्यांच्याकडे जम्पी आहे. मस्त घरभर धावत असतो, उड्या मारत असतो. हातातलं बिस्कीट ओढून घेतो आणि मटकन खाऊन टाकतो आणि मग हळूच हात चाटतो. भक्की, जम्पी आणि मी.. एकदम मज्जा..

***

मला वाटतं माझ्या आईइतकं कोणपण आजारी पडत नसेल. सारखं डॉक्टर डॉक्टर.. आज पुन्हा जायचं आहे डॉक्टरांकडे.. मला भीती वाटतेय की पुन्हा गेल्या वर्षीसारखी सलग आठ दिवस हे लोक माझी शाळा बुडवतात की काय.

पण आज गंमतच झाली. आज मी शाळेतून घरी आले तेव्हा आई-बाबा अजून डॉक्टरांकडून यायचे होते. मला वाटलं आल्यावर आई आता पुन्हा बेडरूममधे झोपून राहणार. पण उलटंच झालं. आई-बाबा आले ते हसतहसतच. बाबाच्या हातात पेढ्यांचा पुडा होता. तोंड गोड करायला आणलेत असं म्हणत होता तो. आजीसुद्धा एकदम खुश होती. आईही हसत होती थोडी पण नीट कळत नव्हतं तिचं वागणं. मला ना आई आणि चिप्रा शेम वाटतात कधीकधी. कधी नीट वागतात तर कधी एकदम वेगळ्या. चिप्रा हुशार पण आहे आणि येड्चाप पण.. आईही कधी कधी येड्चाप सारखीच वागते म्हणा. आत्ताच बघा ना. मध्येच हसतेय. मध्येच एकदम शांत होतेय. आजीने मला पेढा भरवला आणि मग आई-बाबांच्या खोलीत जाऊन त्या निळी टोपीवाल्या बाळाच्या चित्राचे खूप पापे घ्यायला लागली.

बाबाने पटकन फोन केला आणि कोणाशीतरी काहीतरी बोलला. फोन ठेवल्यावर म्हणाला उद्या येतायत.

***

दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले तर बाबा म्हणाला की आज शाळेत जायचं नाहीये. मी काही बोललेच नाही कारण का विचारलं तरी कोणी काही सांगतच नाही आमच्या घरात. बाबाही आज ऑफिसला जाणार नव्हता बहुतेक. सगळे आंघोळी करून, नवीन कपडे घालून बसले. कोणाची तरी वाट बघत होते बहुतेक. आजीची दुपारची सिरीयल सुरु होणार तेवढ्यात बेल वाजली. बाबाने धावत जाऊन दार उघडलं आणि एकदम आडवाच पडला. मला तर काय कळलंच नाही काय झालं. बघते तर दारात ते महाराज आजोबा आणि ते आत येतायत न् येतायत तोवर बाबाने त्यांना साशांग नमस्कार घातलेला. आजीनेही तसंच केलं. बाबाने आईला खुण केली. आईनेही नमस्कार केला आणि मलाही करायला लावला. महाराज आजोबा सोफ्यावर बसले आणि आम्ही सगळे खाली. गेल्यावेळसारखं आज मला या लोकांनी बेडरूममधेही पाठवलं नाही. पण मला तिकडे बसायचा जाम कंटाळा आला होता म्हणून मग मी मांडीवर बार्बी घेऊन तिला झोपवायला लागले.

बाबा सारखा चमत्कार झाला असं काहीतरी म्हणत होता. सारखा आजोबांच्या पाया पडत होता. आणि आजीच्या तर डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. हे मोठे लोक नक्की कशासाठी रडतात तेच मला कळत नाही.

बाबा पुन्हा म्हणाला.. महाराज तुम्ही नसतात तर आमचं काही खरं नव्हतं. या एवढ्या मआगाईच्या ज्यमान्यात तीन मुलं सांभाळणं आम्हाला या जनमी तरी शक्य झालं नसतं. तुमच्या अचूक भविच्य आणि माग्रदरशनाची साथ मिळाली नसती तर काही हा पेढा आमच्या नशिबात नव्हता....


==========================
सत्यघटनेवर आधारित.. (दुर्दैवाने) !!!!!

Friday, July 15, 2011

अन्वयार्थ आणि दहापैकी अकरा मार्कंवालं संदर्भासहित स्पष्टीकरण !!

प्रिय गिरीश कुबेर,

मी गेली अनेक वर्षं असंख्य नावं ठेवत ठेवत का होईना पण लोकसत्ता नियमितपणे वाचतोय. नावं ठेवण्याचं एक सर्वमान्य कारण म्हणजे कु(सु)मार केतकर आणि त्यांचे कॉंग्रेसचं लांगुलचालन करणारे अग्रलेख आणि अन्य बातम्या. कुमार केतकर बाहेर पडल्यानंतर वाचकांना एकांगी नसलेल्या, कॉंग्रेसचा, राहुलचा, सोनियाचा, मनमोहन सिंगांचा अनाठायी उदो उदो न करणाऱ्या निष्पक्षपाती बातम्या वाचायला मिळतील अशा अपेक्षेने माझ्यासारख्या अनेक सामान्य वाचकांनी सुटकेचा भलामोठा निःश्वास सोडला होता. पण तो आमचा भ्रमच आहे असं काहीकाही बातम्या वाचताना सतत जाणवत रहायचं. अर्थात कुमारसेनेच्या काळापेक्षा लोकसत्ताची आत्ताची कामगिरी नक्कीच उजवी होती.... हो.... आता होती असंच म्हणावं लागेल. त्याचं कारण म्हणजे आजचं (शुक्रवार दिनांक १५ जुलै२०११) अन्वयार्थ.

संपूर्ण लेखच प्रचंड संतापजनक आहे. पण काही काही वाक्यं इतकी भयंकर एकांगी, अर्धवट माहितीवर आधारित आणि मुख्यतः परवाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या दुर्दैवी जीवांच्या मृत्यूचा इतका प्रचंड मोठा अपमान करणारी आहेत की त्यासमोर राहुलचं "सरकार प्रत्येक हल्ला रोखू शकणार नाही" वालं बालिश वाक्यही अतिशय समंजस वाटावं किंवा मग दिग्याचं प्रत्येक वाक्य हे एखाद्या मोठ्या विचारवंताच्या थाटाचं वाटावं. ही बातमी (!!!!!) वाचून मला तर क्षणभर असंही वाटून गेलं की दिव्यभास्करात जम न बसू शकल्याने (ऐकीव माहिती आहे. ऐकीव माहितीवर आधारित बातम्या फक्त लोकसत्तेनेचा द्याव्यात असा कुठे नियम आहे??) सुमार केतकरांचं पुन्हा लोकसत्तेत आगमन झालं की काय किंवा मग हल्लीच्या उथळ पत्रकारितेच्या जमान्यातल्या नियमाप्रमाणे केतकरसाहेब अतिथी संपादक म्हणून पुन्हा आमच्या डोक्यावर बसणार की काय. आम्हा वाचकांच्या दुर्दैवाने हे असं काही जर चुकून माकून जरी घडलं ना तर तेव्हा तुम्ही पत्रकार लोक दंडाला त्या काळ्या पट्ट्या बांधून निषेध बिषेध करत हिंडता ना तसेच आम्ही वाचक लोक loksatta.com ला जाण्यापूर्वी काळे गॉगल लावून मगच 'कॉंग्रेस-सत्ता' च्या बातम्या वाचू.

असो.. मूळ मुद्द्याला मी थेटही सुरुवात करू शकलो असतो पण मुद्दाम थोडी पार्श्वभूमी तयार केली जेणेकरून या असल्या कणाहीन पत्रकारांचं दर्जाहीन वृत्तांकन वाचून एक सामान्य नागरिक आणि वाचक म्हणून आमचा किती संताप होत असेल याची एक अतिशय छोटीशी झलक तुम्हाला मिळावी यासाठी एवढी खरडेघाशी केली. मला खात्री आहे की आजच्या या अर्थहीन अन्वयार्थाच्या संदर्भात तुम्हाला पत्र पाठवून निषेध नोंदवणारी मी पहिली व्यक्ती नक्कीच नसेन. सुदैवाने अनेक सजग वाचक महाराष्ट्रात आणि जगभर आहेत. आणि त्या सगळ्यांनी त्यांचं मत मांडताना या अन्वयार्था..... शी.. हा शब्द मला फारच अस्थानी वाटतोय.. खरंतर याला मला कणाहीन पत्रकाराचा दर्जाहीन लेख उर्फ क. प. द. ले. असं म्हणावसं वाटतंय पण ते जाऊदे...... तर त्या सगळ्यांनी त्यांचं मत मांडताना या दुर्दैवी लेखात त्यांना काय काय गोष्टी खटकल्या हे सांगितलंच असेल पण तरीही माझ्या अल्पस्वप्ल्प बुद्धीला सुचलेल्या गोष्टी मी इथे मांडतो आणि तुम्हाला दुर्दैवाने त्या पुन्हा पुन्हा वाचायला लागत असल्याबद्दल तुमची क्षमाही मागतो.

आता या तिरसट लेखातले कुठले मुद्दे मला आवडले नाहीत असं विचारलं तर साला अख्खा लेखच मला कॉपी पेस्ट करून द्यावा लागेल आणि असं करण्यात कितीही तथ्यांश असला तरी मुद्द्याचं गांभीर्य कमी होण्याची नितांत भीती आहे. त्यामुळे मला प्रचंड खटकलेली आणि माझ्या संतापाचा कडेलोट करू पाहणारी निवडक मुक्ताफळंच इथे डकवतो.

>> १. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारी अपयश नाकारले नाही, पण त्याचबरोबर गेल्या ३१ महिन्यांत मोठा हल्ला झालेला नाही हेही लक्षात आणून दिले.

>> २. दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी येतात याची कल्पना सौम्य शब्दात पण पक्की आकडेवारी समोर ठेवून करून दिली.

>> ३. कितीही दक्षता बाळगली तरी दहशतवादी हल्ला थांबविता येत नाही. तो फक्त लांबविता येतो. चिदम्बरम यांना हीच बाब सांगायची होती.

>> ४. परंतु दहशतवादी हल्ल्यासारखी संवेदनशील घटना घडली की, नेत्याने जबाबदारीने कसे वागावे हे त्यांच्याकडून सर्वच नेत्यांनी शिकण्यासारखे आहे.

>> ५. ते बॉम्बस्फोट टाळू शकले नाहीत. मात्र देशाचा गृहमंत्री स्थिर बुद्धीने, विचारपूर्वक व संतुलित वृत्तीने परिस्थिती हाताळत आहे, हा संदेश त्यांच्या पत्रकार परिषदेतून गेला.

>> ६. मुंबईतील विशिष्ट समाज वा आर्थिक उलाढालीची केंद्रे यांनाच स्फोटाचे लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू नसावा असा दावा त्यांनी केला. पाकिस्तानवर कोणताही आरोप केला नाही, पण पाकिस्तानच्या प्रतिसादाबद्दल भारत समाधानी नाही हेही लपविले नाही.

>> ७. पोलीस चांगली कामगिरी करीत असले तरी या हल्ल्याबद्दल निश्चित माहिती नव्हती याची कबुली दिली.

>> ८. एकंदर चिदम्बरम यांची पत्रकार परिषद ही संतुलित. जबाबदार आणि आपले काम गंभीरपणे करणाऱ्या नेत्याची पत्रकार परिषद होती. आपले काम व आपल्या मर्यादा यांची त्यांना व्यवस्थित जाणीव आहे हे लक्षात येत होते.

ही दर्जाहीन बातमी छापणाऱ्या कणाहीन पत्रकाराचं नक्की काय म्हणणं आहे? दर ३१ महिन्यांनी आम्ही आमच्या मोबाईलवर रिमायंडर लावायचे का "की बाबा रे आता ३१ महिने झाले. उद्या बॉम्ब फुटणार हो SSSS". कुबेरसाहेब, तुम्हाला खरंच सांगतो. मला पी चिदंबरम यांच्या निष्क्रियतेचा भयंकर राग येतो. बट गेस व्हॉट.. ही बातमी... तेच ते हो.. दर्जाहीन वगैरे.. तर ती वाचून मला चिदंबरमपेक्षाही ही बातमी छापणाऱ्या पत्रकाराचाच विलक्षण राग आला. हे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराची 'रीडिंग बिटवीन द लाईन' करण्याची क्षमता कसली जबरी असेल हाच विचार माझ्या मनात राहून राहून येतोय !!! म्हणजे चिदुभाऊ एक वाक्य बोलले की त्याचा (आमच्यासारख्या) सर्वसामान्य लोकांच्या अधूबुद्धीत शिरू न शकणारा नक्की अर्थ कोणता? ते असं म्हणाले तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचं होतं, त्यामागे असलेली त्यांची भूमिका कोणती?, प्रत्येक वाक्य उच्चारल्यानंतर त्या वाक्याच्या अनुषंगाने (फक्त सदरहू पत्रकाराच्याच) लक्षात येणारे चिदुभाऊंचं कर्तृत्व अधोरेखित करणारे, त्यांच्यात दडलेले सुप्त गुण कोणते इत्यादी इत्यादींचं दहावीतल्या संदर्भांसहित स्पष्टीकरणच्या थाटात वर्णन करताना या बातमीदाराने इतक्या असंख्य अस्पर्श मुद्द्यांना शिताफीने स्पर्श केला आहे की त्याला दहावीत 'संस्प' मध्ये दहापैकी अकरा मार्क नक्की मिळाले असणार याची खात्री पटली !!

आता पहिलाच मुद्दा बघा ना. ए.. क.. ती.. स.. (आकड्यात लिहिलं की पटकन संपल्यासारखं वाटतं म्हणून मुद्दाम अक्षरात लिहितोय.) महिन्यात एकही बॉम्बस्फोट झाला नाही हे सांगायला ना चिदुभाऊची गरज होती ना तुमच्या त्या पेड न्यूजवाल्या पत्रकाराची. काये की सामान्य माणूस बुद्धीने कितीही अधू असला तरी ज्या हल्ल्यांत आपल्या घरातले, नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी, ओळखीचे, आपल्याबरोबर ऑफिसमध्ये काम करणारे लोक गेले तो हल्ला किती वर्षांपूर्वी झाला होता एवढं साधं गणित तो करू शकतो हो. कारण त्याला समांतर म्हणून अजून एक गणित त्याच्या (म्हणजे आमच्याच हो.. तुमच्या त्या संदर्भांसहित वाल्या पत्रकाराच्या नव्हे..) डोक्यात चालू असतं आणि ते म्हणजे गेले ३१ (मुद्दाम आकड्यात लिहिलंय. कारण सरकारच्या दृष्टीने ते फक्त ३१ आहे. पटकन म्हणून होणारं. ए क ती स सारखं लांबलचक नव्हे.) महिने आमच्या आप्तस्वकीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या कसाब नावाच्या किड्यालाही आम्ही पोसतोय.. हे ते गणित. तो अजूनही मेला नाहीये हा संदर्भ आणि तो जिवंत असण्यामागे त्याचा महान धर्म कारणीभूत आहे हे त्याचं स्पष्टीकरण. तर ही एवढी सगळी गणितं डोक्यात घुमत असल्याने ३१ महिन्यात हल्ला झालेला नाही हे आम्हालाही माहित्ये. पण मग ३२ महिन्यात दोन प्रचंड मोठे हल्ले झाले हे साधंसुधं अपयश झालं का? मला तरी खरंच कळलं नाही नीट. तुमच्या त्या पत्रकाराला चिदुभाऊला विचारायला सांगाल का प्लीज? आणि त्यांनी त्याला समजावून सांगितलं की पुढच्या अन्वयार्थमध्ये त्याचं पुन्हा एक भलंमोठं 'संस्प'ही छापायला सांगा..

दुसरा मुद्दा.. आकडेवारी !!!! हाहाहाहाहा.. चिदुभाऊ खुर्चीत आल्यापासून मी तर त्याला फक्त आकडेवारी मांडतानाच बघतोय. नक्षलवादी हल्ल्यात अमुक इतके पोलीस मेले, अमुक इतके गावकरी मेले, बॉम्बहल्ल्यात इतके इतके लोक आणि तितके तितके पोलीस मेले. अहो आणि दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी येतात याची का आम्हाला कल्पना नाही?? अहो ज्या सामान्य माणसाला तीन आकडी किंमतीच्या भाज्या, तिसऱ्या आकड्याकडे विसावू पाहणारं पेट्रोल आणि चौथ्या आकड्याकडे सरकू पाहणारा गॅस इत्यादी बेसिक गोष्टी आकाशाला भिडलेल्या दारात खरेदी करायला भाग पाडलं जातं (आणि तेही घामाच्या पांढऱ्या पैशाने.. काळ्याबिळ्या नाही हो.) थोडक्यात रोजचं साधं आयुष्य जगतानाही इतक्या असंख्य अडचणींचा मुकाबला करावा लागतो त्याला सरकारच्या अडचणी माहित नसतील हे असं गृहीत धरणं आणि तसं बोलून दाखवणं म्हणजे शुद्ध दिग्विजयपणा  झाला. तर ब्रोकन रेकॉर्ड प्रमाणे पुन्हा मुद्दा तोच.. दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी सांगणे आणि आकडेवार्‍या समोर मांडणे यात एखाद्या व्यक्तीचं गृहमंत्री म्हणून काय कर्तृत्व असू शकतं हो?

खरं तर ज्याप्रमाणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पायात पाय अडकवून वाटचाल चालू आहे त्याचप्रमाणे या बातमीतल्या मुद्द्यांचेही एकमेकांत पाय अडकलेलेच आहेत. कारण आता तिसरा मुद्दा बघा. अहो हा मुद्दा मांडण्यात 'चि'चं काय कर्तृत्व असेल हे तर मला अजूनही लक्षात येत नाहीये !! अर्थात तुमच्या त्या महान पत्रकाराला दिसलंही असेल कर्तृत्व पण त्याने ते अधिक विस्ताराने विस्कटून सांगण्याची काही तसदी घेतलेली नाही... कारण येताजाता अमेरिकेचा जप करणाऱ्या, अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर बनून राहणाऱ्या सरकारने त्याच अमेरिकन सरकारने एकदा झालेल्या महाहल्ल्यांमुळे सजग होऊन सुरक्षा यंत्रणा एवढी बळकट केली की त्यानंतर १० वर्षांत कितीही धमक्या आल्या तरी प्रत्यक्ष हल्ले झाले नाहीत ही बाब "कितीही दक्षता बाळगली तरी दहशतवादी हल्ला थांबविता येत नाही. तो फक्त लांबविता येतो." असं म्हणताना चिदुभाऊ विसरले आणि त्यांचं कौतुक करण्याच्या नादात या असल्या धेडगुजरी मुद्द्यावर आसूड ओढण्याचं तुमचा पत्रकारही विसरला !! असो.. चालायचंच...

खरं तर प्रत्येक मुद्द्याबद्दल प्रचंड विस्ताराने लिहिता येईल आणि इतकं लिहूनही तुमच्या त्या विशाल अंतःकरणाच्या पत्रकाराला त्या प्रत्येक ओळीत सामान्य माणसाला पर्वताप्रमाणे दिसणारे दोष/चुका/अपराध न दिसता त्या प्रत्येक वाक्यात, कृतीत रारा चिदंबरम साहेब यांचं महान कर्तृत्वच कसं दिसलं आणि ते त्याने एका शब्दाबद्दल अनेक शब्द वापरून विस्ताराने उद्धृतही कसं केलं हे माझ्यासारख्या अल्पमती माणसाला न झेपणारं आहे. अर्थात मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि अति झालं आणि हसू आलं (हे माझं सुमार केतकरांच्या बाबतीतलं आवडतं वाक्य आहे. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी) असं माझ्या बाबतीत होऊ नये यासाठी फक्त अजून एकच खूप महत्वाचा आणि प्रचंड खटकलेला मुद्दा मांडून माझं रटाळ पुराण थांबवतो.

तर काय सांगत होतो?? हां.. तो चौथा मुद्दा वाचलात? काय लिहिलंय?? "दहशतवादी हल्ल्यासारखी संवेदनशील घटना घडली की" घडली की???? घडली की??? अशी भयानक घडली की जवाबदारीने वागायचं असतं गृहमंत्र्यासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीने की ती घटना घडायच्या आधी?? किंवा थोडक्यात कायमच?? ही अशी घटना वारंवार (किंवा चिदुभाऊच्या भाषेत दर ३१ महिन्यांनी) होऊ नये म्हणून जवाबदारीने वागणं अपेक्षित आहे की घटना घडल्यानंतर??? मला तर क्षणभर काहीच उमगेनासं झालंय.

आमच्यासारख्या सामान्य जीवांना न कळलेले, कधीच न कळणारे अनेकानेक छुपे अर्थ हे खरे की बातमी वाचून डोक्यात शिरणारा साधासोपा अर्थ खरा? कोण खरं कोण खोटं? माझ्या तरी मते तुमच्या या धडाडीच्या पत्रकाराने पत्रकारितेतले आणि एकूणच पावसाळे आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि किमान बुद्धीच्या वाचकांपेक्षा जास्त पाहिले असल्याने तोच बरोबर असेल असं मला तरी मनोमन वाटतंय. पण पुन्हा बातमी वाचल्यावर आम्हाला जे वाटतंय तेच खरं असावं असंही वाटतंय. थोडक्यात गोंधळ झालाय माझा. खूप मोठा गोंधळ. तुम्ही सोडवू शकाल तो गोंधळ? द्याल उत्तर? किंवा मग साध्या (आणि बिनडोक) वाक्यांतून ओढून ताणून अन्वयार्थ शोधून काढणाऱ्या तुमच्या महान पत्रकाराला तरी विचारा न याचं उत्तर आणि पुढच्या अन्वयार्थ मधून कळवा.. वाट बघतोय. शक्यतो पुढच्या स्फोटांच्या/हल्ल्यांच्या आत दिलंत तर अजून बरं कारण नाहीतर मग आम्हा लोकांचा अजून अजूनच गोंधळ उडत राहील. म्हणून म्हणतो लवकर द्या उत्तर.. द्याल ना?

-हेरंब ओक

हेच पत्र गिरीश कुबेर यांना त्यांच्या girish.kuber@expressindia.com या इमेल आयडीवरही पाठवलं आहे. !!

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...