मध्यंतरी अनंत अंबानीच्या प्रि-वेडिंग कार्यक्रमात जगभरातल्या सुप्रसिद्ध, बलाढ्य व्यक्तींनी आणि खेळाडू, कलाकार इत्यादींनी हजेरी लावल्याच्या पार्श्वभूमीवर हा एक मीम खूप लोकप्रिय झाला होता. हा मीम खरा असावा की काय असं वाटायला लावणारे संदर्भ असलेल्या, इस्लामच्या खलिफाकाळातली वर्णनं असलेल्या एका ग्रंथाची आठवण झाली.
पर्शियन आणि मुस्लिम सैन्यांदरम्यान नोव्हेंबर ६३६ मध्ये कादिसिया येथे मोठं युद्ध झालं. हे युद्ध दुसरे खलिफा उमर यांच्या काळात झालं. पर्शियन सैन्याचा सेनापती होता रुस्तुम आणि इस्लामी सैन्याचा प्रमुख होता कआका नावाचा एक सरदार. चार दिवस चालू असलेल्या या युद्धात अखेरीस मुस्लिमांनी पर्शियनांवर निर्णायक विजय मिळवला. विजयानंतर मुस्लिमांना अक्षरशः अविश्वसनीय लूट मिळाली. अमूल्य रत्नं, अलंकार, जवाहिर हाती लागले. लुटीचं अंदाजे मूल्य सुमारे १४७० दशलक्ष दिहरम होतं.
इस्लामच्या प्रथेप्रमाणे आणि पैगंबरांच्या आदेशाप्रमाणे लुटीचा पाचवा हिस्सा मदिनेला खलिफांकडे पाठवून देण्यात आला. बाकीची रत्नं, संपत्ती, स्त्रिया प्रथेप्रमाणे मुस्लिम सैन्यात वाटून टाकण्यात आल्या. एवढी लूट बघून मुस्लिम सैन्य अक्षरशः आश्चर्यचकित होऊन गेलं.
लुटीत मिळालेला कापूर बघून त्याचं काय करायचं हेच त्यांना कळेना. कारण कापूर म्हणजे काय हेच त्यांना माहीत नव्हतं. तो त्यांनी मीठ म्हणून वापरला.
एका सैनिकाला लुटीमध्ये एक अतिशय अमूल्य असं रत्न मिळालं. ते त्याने अन्य कोणाला १००० दिहरम अशा नगण्य किंमतीला विकून टाकलं. नंतर त्याला एका जाणकाराने, "इतकं अमूल्य रत्न एवढ्या मातीमोल भावाने का विकून टाकलंस?" असं विचारलं असता तो उत्तरला, "१००० पेक्षा मोठी संख्या असते हेच मला माहीत नव्हतं. नाहीतर अजून मागितले असते."
दुसरा एक सैनिक त्याला मिळालेल्या लुटीतली एक पिवळसर वस्तू हातात धरून ओरडत होता, "या पिवळ्या वस्तूच्या बदल्यात मला कोणी एखादी पांढरी वस्तू देईल का?" काही वेळाने त्याला कळलं की आपल्या हातात असलेल्या वस्तूला सोनं म्हणतात.
संदर्भ : प्रेषितांनंतरचे पाहिले चार आदर्श खलिफा (लेखक : शेषराव मोरे)
तळटीप : चार खलिफांच्या काळात इस्लाम जगभर कसा पसरला आणि युद्धादरम्यानच्या नृशंस कत्तलींची वर्णनं आणि आकडे या ग्रंथात पानोपानी आहेत. त्यावर नंतर सवडीने लिहेन.
--हेरंब ओक
No comments:
Post a Comment