Thursday, October 29, 2009

तेरी जात का !!

आज मजा आली. आमच्या एका याहू ग्रूप वर एका सदस्याने तामीळनाडूच्या एका देवळात दलितांना प्रवेश मिळाल्यासंबंधीच्या एका बातमीची लिंक पाठवली होती. आणि झालं मग. एकच चर्चा सुरू झाली.जातपात किंवा जनरल कॅस्ट सिस्टम, धर्मांतर अशा वळणावरुन जाता जाता ती हळूहळू आणि थोडीशी जातीव्यवस्था का हवी, जातीव्यवस्था विसर्जीत (!!!) करण्याआधीतिला योग्य पर्याय शोधायला हवा अशा वळणांवर जायला लागली. मग आम्हीही थोडी आमची लेखणी (आपला कीबोर्ड हो) चालवली. तोच reply जसाच्या तसा खाली देतोय.

--------------------------------

जातीव्यवस्थेला कधीही कुठलाही पर्याय असु शकत नाही. जातीव्यवस्था नष्ट (विसर्जीत हा शब्द जातीव्यवस्थेला खूपच मान देणारा आहे त्यामुळे) करणे हा एकमेव पर्याय आहे. जातीव्यवस्थेतून निर्माण होणार्‍या विषामतेची झळ आपल्याला कधीच बसत नाही, बसली नाही (कारण आपण असे प्रसंग फक्त पुस्तक/वर्तमानपत्रातूनच वाचतो) आणि ज्यांना ती बसते त्यांच्यापासून आपण सुरक्षित अंतरावर असतो त्यामुळे त्याची तीव्रता आपल्याला कळत नाही. ज्या जातीव्यवस्थेने शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर यासारख्या महापुरुषांना सोडलं नाही तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा? जातीव्यवस्थेमुळे झालेले असंख्य दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत. फक्त ते डोळसपणे मान्य करायला लागतील इतकंच. (शिवाजीमहाराजंसारख्या महापुरुषाला राज्याभिषेक नाकारण्यात आला होता तो ते ब्राह्माण की क्षत्रिय की राजपूत या वादामुळेच.)

-- ब्राह्मणात पुन्हा तुम्ही कोकणस्था की देशस्थ की कर्‍हाडे की देवरुखे?.. त्यात पुन्हा यजुर्वेदी की ऋग्वेदी, आणि अजुन घोळ घालायचे असतील तर हे पुढचा ऐका.. तुम्ही शुक्ल यजुर्वेदी की कृष्ण यजुर्वेदी.. ???

-- मराठ्यांमधे पुन्हा कुणबी की ९६ कुळी मराठा की अजुन काही. (मराठा आरक्षणाचा वाद कशा मुळे निर्माण झाला काही अंदाज?)

-- अरे हे तर लेवा पाटील. आम्ही ९६ कुळी.. तुमची आणि आमची सोयारीक जुळु शकत नाही..

-- आम्ही सारस्वत. म्हणजे सरस्वतीचे भक्त. म्हणजे मांस खाणारे ब्राह्मणच.

-- आम्ही सोनार.. म्हणजे दैवद्न्य ब्राह्मण..

असे तट अजूनही पडताना दिसतात. मला नाही वाटत या गटातटातुन कोणालाही काही फायदा होतोय.. !!

या जातीव्यवस्थेमुळेच दादोजी कोंडदेवांना शिवरायांचे गुरू मानायचे की नाही असे वाद घालण्यात येतात. समर्थ रामदसांची रामदास ठोसर अशी संभावना करण्यात येते. बाबासाहेब पुरंदर्‍यांचं शिवाजी महाराजांच्या अभ्यासावरील श्रेष्ठत्व नाकारलं जातं ते या जातीपतीतील भेदांमुळेच. संभाजी ब्रिगेड ची साइट/ब्लॉग एकदा वाचून बघा म्हणजे जाती व्यवस्थेने खोलवर केलेले दुष्परिणाम कळून येतील.

खेडेगावांमधे (ज्यांच्यापसून आपण फक्त काही मैलांवर आहोत किंवा थोडक्यात सुरक्षित अंतरावर आहोत) अजुन ही दलितांसाठी वेगळा पाणवठा असतो. त्यांना गावाच्या विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही. त्यांना देवळात जायला मज्जाव असतो.. २००६ चं महाराष्ट्रातलं भैय्यालाल भोतमांगे प्रकरण एवढ्यात विसरलो आपण?


अनिल आवचटानच कुठलाही पुस्तक काढून वाचा म्हणजे जातीव्यवस्थेचे चटके किती तीव्र असतात ते कळेल.

आता conversions विषयी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतर का होतं? सगळे धर्मांतर करणारे अशिक्षित नसतात. सगळीच धर्मांतरे धनाच्या लालसेने किंवा जबरदस्तीने होत नसतात. त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे ही भ्रष्ट जाती व्यवस्था. जर माझ्या धर्मात राहून (निव्वळ माझ्या जातिमुळे जो माझ्या उदात्त (!!) धर्माचाच एक भाग आहे) मला कायम हीन वागणूक मिळत असेल, मला माझ्या सामान्य अधिकारांपासून वंचित ठेवले जाणार असेल तर खड्ड्यात गेला तुमचा धर्म. मी धर्मच बदलतो. सगळ्याच कटकटी मिटल्या. ही आणि फक्त हीच मानसिकता असते. हे फक्त हिंदू धर्मविषयीच आहे असं नाही. अनेक आफ्रो-अमेरिकन्स/ब्लॅक्स हे इस्लाम स्वीकारतात कारण त्यांच्या धर्मात त्यांना सतत हीन वागणूक दिली जाते. मुसलमानांमधे होणारे सुन्नी आणि शिया वाद/दंगली तर सर्वश्रुतच आहेत.

सॉरी.. बरच मोठं आणि विस्कळित झालं ईमेल. पण जे जसं सुचलं/साचलं होतं तसं लिहिलं. कारण जेव्हा एक तरुणांचा ग्रूप २१ व्या शतकात जातीव्यवस्थेच्या फायद्यांविषयी, ती विसर्जित न करण्या विषयी बोलू लागतो तेव्हा एक भयंकर विचित्र फीलिंग येत त्याचाच हा परिपाक !!

14 comments:

  1. Chaan lihale aahes.... pan Jaativyavastha kadhich kadhich Nasht honar nahi.. pato va na pato its fact.

    tula tar mahitch aahe... Ji melyashivay Jaat nahi tich Jaat. aapan/samaj kitihi forward zaala tari at the back of mind ti astitwat asate, aaplyala kahdi tyach trass zalla nahi karna aapan so called varchya jatit janmala aalo.. tyamule aaplyala te samjanar nahi...

    jata jata ek observation saangato... mi kadachit wrong aasen.... mi jya company madhey aahe.... thite mala sagle so called higher cast madhle distat, mazya ek don mitrache suddha hech observation aahe.. Mala hich gosht marathi film industry madhey suddha jaanvali. all the famous stars are either Brahmin or Maratha..

    i agree ki there has been considerable development in the situation and many ppl from backward classes is leading the way... pan he disat nahi re...

    Mrunal

    ReplyDelete
  2. हो मला पण मान्य आहे. जातीव्यवस्था कधीच नष्ट होणार नाहीये ते. आणि मी ते वास्तव आनंदाने स्वीकारलाही असत पण केव्हा ? जेव्हा आपण ती संपवण्यासाठी काही प्रयत्न करत आहोत आणि तरीही यश येत नाहीये त्यावेळी. मला प्रत्येकाने हेच सांगितलं कि जाती व्यवस्था कधीच नष्ट होणार नाही. (किंवा कोणी म्हणालं ती विसर्जित करण्यापूर्वी तिला दुसरा पर्याय शोधला पाहिजे.) पण ती नष्ट होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय याचा कुठेच उल्लेख नाही. जिथे शासनच जातीचे पुरावे मागून आणि जातीपातीच्या आधाराने निवडणुका जिंकून जाती व्यवस्था (त्यांच्या पोटापाण्यासाठी) किती आवश्यक आहे याचा पुरावाच देते तिथे सामान्य माणसाला किती दोष देणार म्हणा. जातीव्यवस्था अजून दहा लाख वर्ष तरी जात नाही हे नक्कीच. दुर्दैव आपलं दुसर काय.

    ReplyDelete
  3. जळजळीत वास्तव आहे हे.:(

    ReplyDelete
  4. खरंच. आणि ते बदलण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही या भावनेने तर अजून संताप होतो.

    ReplyDelete
  5. अजून एक उत्तम लेख, इतक्या दिवसानंतर वाचलं, तरीही परिस्तिथी मध्ये काहीही बदल नाहीये :-(

    ReplyDelete
  6. आभार आनंद. हे कितीही दिवसांनी, वर्षांनी, तपांनी वाचलं तरी परिस्थिती बदलणार नाही हेच तर खरं दुर्दैव आहे आपलं :(

    ReplyDelete
  7. मी ही पोस्ट वाचली नव्हती...उशीरा का होईना प्रतिक्रिया द्यायला हवी..
    हेरंब खरंच जात नाही ती जात असंच झालंय आपल्या इथे...मग लोकं देश सोडून अमेरिकेत आले तरी तिथेही जाती काही सोडत नाहीत असं एकंदरित पाहिलंय...आधी आडनाव विचारतील त्यातुन काही कळलं नाही तर माहेरचं आडनाव आणि तरी कळलं नाही मग सरळ तुम्ही त्या यातले का?? असेही संवाद झालेत....मग जेव्हा यांची मुलं इथेच मोठी होऊन त्यांना जावई/सुन शोधायची वेळ (आलीच तर) मग मात्र भारतीय असली तरी चालेल वर येतात...आणि इतकं झालं तरी नवीन कुणी भेटलं की वरचे संवाद होतातच बरं का?? असो..पाल्हाळ लागेल या विषयावर आणि तरी मूळ गुंता जशाच्या तसाच.....
    काहीवेळा मला वाटतं निदान इथे वाढणार्‍या पुढच्या (भारतीय वंशाच्या) मुलांना निदान हे जातीव्यवस्थेचं बाळकडू तरी मिळणार नाही....

    ReplyDelete
  8. अगदी खरं आहे. सातासमुद्रापार आले तरी कूपमंडूक वृत्ती जात नाही. "स्त्रीचं वय, पुरुषाचा पगार" च्या चालीवर "कोणाचीच जात विचारू नये" हे घोकून घेतलं पाहिजे अशा लोकांकडून.

    >>काहीवेळा मला वाटतं निदान इथे वाढणार्‍या पुढच्या (भारतीय वंशाच्या) मुलांना निदान हे जातीव्यवस्थेचं बाळकडू तरी मिळणार नाही....

    हे एकदम बरोबर बोललीस. हवंय कशाला ते जातीपातीचं गुर्‍हाळ !!

    ReplyDelete
  9. अगदी मनातलं बोललास..
    शाळेत शेजारी बसणार्‍या मुलीला जात विचारुन मैत्री केल्याचे किंवा वाढवल्याचे चुकूनही आठवत नाही. किंवा तशी शिकवणही नव्हती. शाळा कॉलेजच्या सुरक्षित कोषातून बाहेर पडल्यावर मात्र तुमच्यात असं करतात नां? ती पध्दत आहे नां? वेडेपणाच आहे म्हणून हसणार६य़ा लोकांचा खूप संताप आला होता. सुरवातीला त्यांच अज्ञान दूर करायचा प्रयत्न केला पण नंतर ’गाढवापुढे गीता काय, पुढारीसुध्दा वाचू नये’ हे पटलं.. कान झाकून घेतले.. अज्ञान आणि गैरसमजूतींचा पगडा इतका मोठा असेल असं वाटल नव्हतं.. ६०, ७० वर्षांपूर्वी तुम्ही आमच्यावर अत्याचार केलेत, आता आम्ही तुमच्यावर करणार.. ही तोडगा काढायची पध्दत आहे काय? आणि तुमच्या पुढच्या पिढीचं काय? त्यांना हेच जातपात शिकवत बसणार? बुध्दीमत्तेचा, निर्मळतेचा निकष कुठेच बसत नाही?
    २०१० साली सुध्दा कॉम्पुटर, नेटच्या काळात मराठी लिहण्या वाचण्या करीता एकत्र आलेल्या ब्लॉगविश्वात ’तू ओक आहेस, तुमचेच वर्चस्व असणार’ अशाप्रकारची बौध्दीके(??) घेतली जातात, ही खरचं दुर्दैवाची बाब आहे.

    ReplyDelete
  10. खरंय ग. उगाच नाही म्हणत रम्य ते बालपण. ब्राह्मण म्हणजे मनुवादी, मराठा म्हणजे क्षत्रिय, त्यांचं एकमेकांशी मुळीच जमत नाही हे आणि असले कित्येक विचित्र प्रकार मला अनेक वर्षं माहितही नव्हते. नंतर शाळा/कॉलेज बाहेरच्या जगात आल्यावर 'आयला, हे असंही असतं होय' असं म्हणायची पाली आली होती.
    आणि हे असे संस्कार अगदी घराण्याचे आणि कुळाचे संस्कार असल्यागत बिनबोभाटपणे पुढच्या पिढीवर केले जातात आणि त्या पिढ्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांवर करतात. हे दुष्टचक्र न संपणारं आहे :(

    ReplyDelete
  11. जातीभेदांमुळेच तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षं हो‍ऊन गेली तरीही भारताची म्हणावी तशी प्रगती झाली नाहीये. आपण भारतीय कुठेही गेलो तरी जातपात मानणं काही सोडत नाही. अमेरिकेत येऊन MS केल्यानंतरही केवळ जातीतली नाही म्हणून चांगल्या मुलींची स्थळं नाकारणारे अनेक लोक माझ्या ओळखीचे आहेत. माझ्या काही मित्रांची चालू असलेली प्रेमप्रकरणंही निव्वळ जातीमुळेच तुटलेली आहेत. माणसाचे गुण, त्याचा स्वभाव, त्याची सामाजिक स्थिती या गोष्टींपेक्षाही जातीला जास्त महत्त्व अजूनही दिलं जातं हीच तर दुःखाची गोष्ट आहे. कधी आपण यांतून बाहेर पडणार हे तो एक गणपतीबाप्पाच जाणे.

    ReplyDelete
  12. अरे चांगली उच्चशिक्षित पोरंपोरीही जातीपाती बघतात, आपापल्या जातीच्या कम्युनिटया जॉईन करतात ऑर्कट/फेसबुकवर हे पाहून तर मी थक्कच झालो होतो. अशा कम्युनिटया असूच कशा शकतात अस्तित्वात? आणि आता तर काय खुद्द सरकारच जातनिहाय जनगणना करतंय. जातीभेद पाळण्यावर सरकारी शिक्कामोर्तब दुसरं काय !

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...