Thursday, May 23, 2024

'गर्द' काळ्या व्यसनाचं कृष्णविवर!

विस्थापित, दंगलग्रस्त, हळद कारखान्यातले कामगारबिडी कामगार, उकिरड्यात काम करणारे लोक, वेश्या, दारूच्या व्यसनापोटी आयुष्याची धूळधाण उडालेले लोक या आणि अशा असंख्य उपेक्षित जमातींवर अनिल अवचट या अवलियाने विपुल लेखन करून ठेवलेलं आहे. त्यांच्या कुठल्याही पुस्तकाचा फॉर्म बऱ्यापैकी सारखाच असतो. म्हणजे रिपोर्ताज अर्थात अहवाल स्वरूपाचा. त्यात ना कुठली अलंकारिक भाषा असते की वीरश्रीने भरलेला अभिनिवेश असतो. आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या अन्यायकारक गोष्टी, परिस्थितीने गांजलेले, पिडलेले, पिचलेले लोक यांच्या कथा सोप्या भाषेत कथन केलेल्या असतात. ते कुठल्याही स्वरूपाचा निष्कर्ष न काढता घटना, वस्तुस्थिती वाचकांसमोर मांडतात आणि तात्पर्य शोधण्याचा निर्णय सर्वस्वी वाचकांवर सोपवून मोकळे होतात. या अशा प्रकारच्या पुस्तकांमधलं त्यांचं एक जुनं पुस्तक म्हणजे 'गर्द'. अंमली पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि त्यांच्यावर उपचार करणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना बोलतं करून त्यांनी या जीवघेण्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या दुर्दैवी रुग्णांचे भीषण अनुभव वाचकांसमोर मांडले आहेत. साधारण १९८५-८६ साली डॉ आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर सुमारे दीड-दोन महिने राहून रुग्ण, त्यांचे नातेवाईक, अन्य डॉक्टर, परिचित अशा अनेकांच्या अनुभवांतून उभं राहिलेलं हे गर्दचं काळंकुट्ट विश्व अवचट वाचकांच्या समोर उलगडतात. पुस्तकातले काळे अनुभव तितक्याच प्रभावीपणे जिवंत करणारं गडद काळ्या शैलीतलं अप्रतिम मुखपृष्ठ सुभाष अवचटांनी चितारलं आहे.


अगदी दुसरी-तिसरीतल्या शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयात जाणारे आणि गडगंज श्रीमंत ते घरात अठरा विश्व दारिद्र्य असणारे असे कुठलेही दुर्दैवी जीव या भयकारी व्यसनाच्या पोलादी पंजातून सुटू शकलेले नाहीत. अनिल अवचट डॉ नाडकर्णींबरोबर या अशा गर्दपीडित व्यक्तींना जाऊन भेटले, त्यांच्या अनेक बैठकांना उपस्थित राहिले, लोकांना बोलतं केलं, आधार दिला, मदत केली, अधिकाधिक लोकांना या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायला साहाय्य केलं. एकदा बाहेर पडलेले अनेक जीव मोह आवरू न शकल्याने किंवा अन्य काही कारणापायी पुनःपुन्हा गर्दच्या आहारी जात राहिले. अशा लोकांवर विशेष मेहनत घेऊन डॉ नाडकर्णी त्यांना पुनःपुन्हा त्यातून बाहेर काढत राहिले. या आणि अशा असंख्य अनुभवांचं छोटेखानी पुस्तक म्हणजे गर्द. यातला प्रत्येक अनुभव एवढा भयावह आहे की प्रत्येक प्रकरणानंतर पुस्तक बंद करून देवासमोर उभं राहून आपण किती सुदैवी आहोत याबद्दल त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटत राहतं.

गर्दच्या आहारी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला तब्येत आणि खिसा ढासळत गेल्यावर हे व्यसन किती भयंकर आहे हे हळूहळू लक्षात यायला लागलेलं असतं. सुरुवातीला कधीतरी मजामजा म्हणून सुरुवात झालेल्या, कोणाच्यातरी आग्रहावरून सुरु केलेल्या या व्यसनाचा खरा भेसूर चेहरा दिसल्यावर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जाऊ लागतो. पण गर्दच्या विळख्यातून बाहेर पडणं किती अवघड आहे हेही अवचट अनेक व्यसनाधीन लोकांच्या निरनिराळ्या अनुभवांद्वारे आपल्यासमोर मांडतात. 

पुस्तकातला प्रत्येकचा अनुभव तितकाच भयंकर असला तरी त्यातल्या त्यात त्यातले दोन अनुभव वाचून मात्र मी तीव्र नैराश्याच्या भावनेने ग्रासून गेलो! अनिल अवचट आणि डॉ आनंद नाडकर्णी एकदा कामाठीपुऱ्यातल्या व्यसनाधीन मुलांना भेटायला गेले असता तिथे त्यांना कचराकुंडीतल्या कचऱ्याच्या ढिगात काहीतरी हलताना दिसलं. काही वेळाने कळलं की ती हलणारी वस्तू म्हणजे १५-२० वर्षांचा एक गर्दुल्ला मुलगा होता. हाडांचा सापळा झालेलं, धुळीने माखलेलं शरीर, त्यावर एक काळाकुट्ट कोट आणि तितकीच काळीकुट्ट लुंगी. तो मुलगा कचऱ्यातून कागदाचे तुकडे वेचून त्याच्या पाठीवरच्या पोत्यात टाकत होता. थोडी चौकशी केल्यावर गेली दोन वर्षं या व्यसनात अडकलेला तो एक अनाथ मुलगा असल्याचं कळलं. रोज त्याला किमान पंचवीस (१९८५ सालचे पंचवीस रूपये) रूपयांची गर्द लागते हे कळलं. आणि हे पंचवीस रूपये तो रोज सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत कचरा गोळा करून, तो विकून कमावतो आणि त्या पैशांतून गर्द विकत घेतो. त्यामुळे अन्न घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे उरतच नाहीत आणि अर्थात अन्नावरची वासनाही मेलेली असते. हे असं न खाता किती दिवस चालणार असं विचारल्यावर तो जे उत्तर देतो ते हादरवून टाकणारं असतं.

"बस, इसीमें खतम होने का" !!!!

"मी साक्षात मृत्युशी बोलतोय असं मला वाटलं" या एका वाक्याने अवचट तो प्रसंग संपवतात. पण तो अनुभव पुढचे किती दिवस, महिने आपल्या डोक्यात राहून आपल्याला कुरतडत राहणार असतो हे आपलं आपल्यालाही माहीत नसतं.

हे अनुभव सांगताना अवचटांनी अनेक पुस्तकांचे दाखले दिले आहेत. जेम्स कोलमनच्या अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजी या पुस्तकातला एक अनुभव त्यांनी तिथे नमूद केला आहे जो वाचून कामाठीपुऱ्यातल्या मुलाचा अनुभव कसाबसा पचवत असलेल्या वाचकाला अजून एक भयंकर मानसिक धक्का बसतो.

त्या पुस्तकात एका नुकत्याच जन्मलेल्या आणि लगेच मृत पावलेल्या बाळाचा फोटो दिला असून फोटो खाली माहिती दिली आहे की हेरॉईन अ‍ॅडिक्ट बाई, ती गर्भार असताना हेरॉईन घेत असेल तर गर्भातलं तिचं मूलही आपोआपच अ‍ॅडिक्ट म्हणून जन्माला येतं. जन्मल्याजन्मल्या काही तासांतच ते मूल हेरॉईन न मिळाल्याने उलट्या, जुलाब होऊन डिहायड्रेशन होऊन मरण पावतं.

पुस्तकातली सगळी प्रकरणं अहवाल स्वरूपातली असली तरी अखेरचं प्रकरण मात्र तांत्रिक माहितीने भरलेलं आहे. गर्द म्हणजे नक्की काय, त्याचे विविध प्रकार, हेरॉईन, ब्राऊन शुगर, चरस, हशीश, गांजा, अफू ही आणि अशी इतर अनेक व्यसनं, त्यांच्यातली साम्यं आणि फरक या आणि अशा अनेक मुद्द्यांवर लेखक विस्तृत चर्चा करतो.

या पुस्तकातली एक सर्वात आगळीवेगळी गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या शेवटी प्रकट होणारी 'पुस्तक मिटण्यापूर्वी' या नावाची डॉ आनंद नाडकर्णी यांची अत्यंत मुद्देसूद शब्दांत लिहिलेली प्रस्तावना. पुस्तकाच्या आशयाची तीन भागांत मांडणी करून त्यांनी हा विषय अधिकच सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात डॉ नाडकर्णी यांचे प्रयत्न, अनुभव, जिद्दीने या प्रश्नाला वाहून घेण्याची तळमळ अशा प्रकारच्या सकारात्मक नोंदीवर पुस्तकाचा शेवट होत असला तरी दरम्यान वाचलेले असंख्य भयानक आणि त्यातही वर उल्लखलेले दोन भीषण अनुभव तर जगाच्या अंतापर्यंत आपली पाठ सोडणार नाहीत असं वाटत राहतं.

 गर्दचं व्यसन संबंधित व्यक्तीला क्रूरपणे पकडून ठेवून त्याला अखेरपर्यंत आपल्या ताब्यात कसं ठेवत असेल याचा वाचकाला घ्यावा लागणारा हा एक प्रकारचा प्रत्यक्ष अनुभवच नव्हे का?!!

--हेरंब ओक


Thursday, May 2, 2024

समकालीन संदर्भांच्या आधारे बाबराचं वस्त्रहरण

आभास मलदहीयार. शिक्षणाने आर्किटेक्ट असलेला आणि इतिहासाची प्रचंड आवड असलेला एके काळचा कट्टर कम्युनीच, सिक्युलर, इस्लामप्रेमी माणूस अजिंठा आणि वेरूळचं स्थापत्य बघून अक्षरशः आमूलाग्र बदलून गेला आणि त्याने बाबर, अकबर, तैमुर इत्यादी मुस्लिम लुटारू राज्यकर्त्यांच्या मूळ चरित्रांचा सखोल अभ्यास करायला घेतला. आणि कालांतराने त्याने त्याच्या इस्लाम राज्यकर्त्यांच्या सिरीजमधलं पहिलं पुस्तक 'Babur : The Chessboard king' लिहून काढलं. या इतिहासाशी अत्यंत प्रामाणिक असलेल्या पुस्तकाचा प्रवास म्हणजे ही मुलाखत. 

या मुलाखतीदरम्यान लेखकाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

१. ज्याला मुघल साम्राज्य म्हंटलं जातं ते खरंतर मुघल नाहीत.

२. ताजमहाल बांधण्यासाठी (त्या काळातले) ४ कोटी रूपये खर्च झाले. आणि तेही मुख्यत्वाने अतिशय विक्राळ अशा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्यात लाखो लोक भुकेने तडफडून मेले.

३. मुघल आणि ब्रिटिश काळातील GDP आणि per capita income मध्ये कम्युनिस्ट इतिहासकारांनी केलेली फसवाफसवी.

४. अकबराने मक्का, मदिनेसकट जगभर पाठवलेले करोडो रूपये.

५. अकबराने त्याचा दीने इलाही नावाचा पंथ स्थापन करण्यामागचं खरं कारण.

६. बाबर मंगोलवंशातील लोकांचा द्वेष का करत असे?

७. बाबर समलिंगी असल्याचे पुरावे.

८. पुरोगामी आणि UPSC च्या लोकांचे लाडके इतिहासतज्ज्ञा इरफान हबीब आणि रोमिला थापर यांच्यातलं साम्य आणि फरक.

ही मुलाखत खालील लिंकवर 1:46:30 ते 3:52:22 यादरम्यान बघता येईल. 

याच स्ट्रीममध्ये सुरुवातीला 15:02 ते 45:09 च्या दरम्यान आपल्या तडाखेबंद अभ्यासाने आणि समकालीन संदर्भ आणि पुराव्यांच्या आधारे फेबुवर इस्लाम, मुघल, बाबर, औरंग्या यांची नियमितपणे पोलखोल करणारे सत्येन वेलणकर Satyen Velankar यांचीही उपस्थिती असून त्यांनी बाबरच्या आत्मचरित्राच्या आणि इतर अनेक समकालीन संदर्भांच्या आधारे बाबराचं मूर्तीभंजन केलं आहे.

तळटीप : एक्स मुस्लिम साहिल आणि Adam Seeker यांच्या युट्युब चॅनल्सवरच्या live streams मार्फत नेहमीच इस्लामविषयी अत्यंत रंजक माहिती मिळत असते. जे लोक हे ही चॅनल्स नियमितपणे फॉलो करतात त्यांना माहीत असेलच की या चॅनलवर गप्पांदरम्यान कधी कधी अश्लील उल्लेख येऊन जातात. या मुलाखतीदरम्यानही बोलण्याच्या ओघात असे गंमतीशीर उल्लेख १-२ वेळा आले आहेत.

व्हिडीओचा युट्युब दुवा : https://www.youtube.com/live/KneO-jiuKSw

खलिफाकाळातलं दारिद्र्य ते पाकिस्तान : एक चक्र पूर्ण


मध्यंतरी अनंत अंबानीच्या प्रि-वेडिंग कार्यक्रमात जगभरातल्या सुप्रसिद्ध, बलाढ्य व्यक्तींनी आणि खेळाडू, कलाकार इत्यादींनी हजेरी लावल्याच्या पार्श्वभूमीवर हा एक मीम खूप लोकप्रिय झाला होता. हा मीम खरा असावा की काय असं वाटायला लावणारे संदर्भ असलेल्या, इस्लामच्या खलिफाकाळातली वर्णनं असलेल्या एका ग्रंथाची आठवण झाली.


पर्शियन आणि मुस्लिम सैन्यांदरम्यान नोव्हेंबर ६३६ मध्ये कादिसिया येथे मोठं युद्ध झालं. हे युद्ध दुसरे खलिफा उमर यांच्या काळात झालं. पर्शियन सैन्याचा सेनापती होता रुस्तुम आणि इस्लामी सैन्याचा प्रमुख होता कआका नावाचा एक सरदार. चार दिवस चालू असलेल्या या युद्धात अखेरीस मुस्लिमांनी पर्शियनांवर निर्णायक विजय मिळवला. विजयानंतर मुस्लिमांना अक्षरशः अविश्वसनीय लूट मिळाली. अमूल्य रत्नं, अलंकार, जवाहिर हाती लागले. लुटीचं अंदाजे मूल्य सुमारे १४७० दशलक्ष दिहरम होतं.

इस्लामच्या प्रथेप्रमाणे आणि पैगंबरांच्या आदेशाप्रमाणे लुटीचा पाचवा हिस्सा मदिनेला खलिफांकडे पाठवून देण्यात आला. बाकीची रत्नं, संपत्ती, स्त्रिया प्रथेप्रमाणे मुस्लिम सैन्यात वाटून टाकण्यात आल्या. एवढी लूट बघून मुस्लिम सैन्य अक्षरशः आश्चर्यचकित होऊन गेलं.

लुटीत मिळालेला कापूर बघून त्याचं काय करायचं हेच त्यांना कळेना. कारण कापूर म्हणजे काय हेच त्यांना माहीत नव्हतं. तो त्यांनी मीठ म्हणून वापरला. 

एका सैनिकाला लुटीमध्ये एक अतिशय अमूल्य असं रत्न मिळालं. ते त्याने अन्य कोणाला १००० दिहरम अशा नगण्य किंमतीला विकून टाकलं. नंतर त्याला एका जाणकाराने, "इतकं अमूल्य रत्न एवढ्या मातीमोल भावाने का विकून टाकलंस?" असं विचारलं असता तो उत्तरला, "१००० पेक्षा मोठी संख्या असते हेच मला माहीत नव्हतं. नाहीतर अजून मागितले असते."

दुसरा एक सैनिक त्याला मिळालेल्या लुटीतली एक पिवळसर वस्तू हातात धरून ओरडत होता, "या पिवळ्या वस्तूच्या बदल्यात मला कोणी एखादी पांढरी वस्तू देईल का?" काही वेळाने त्याला कळलं की आपल्या हातात असलेल्या वस्तूला सोनं म्हणतात.

संदर्भ : प्रेषितांनंतरचे पाहिले चार आदर्श खलिफा (लेखक : शेषराव मोरे)

तळटीप : चार खलिफांच्या काळात इस्लाम जगभर कसा पसरला आणि युद्धादरम्यानच्या नृशंस कत्तलींची वर्णनं आणि आकडे या ग्रंथात पानोपानी आहेत. त्यावर नंतर सवडीने लिहेन.

--हेरंब ओक

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...