Wednesday, March 31, 2010

राही !!

'मांजा'ची भीषणता, खिन्न काळी छटा चार दिवस उलटून गेले तरी जात नाहीये. कधी जाईल सांगता येत नाहीये. पण यात एक थोडासा प्रसन्नतेचा शिडकावा झाला. माझ्या 'जीवघेणी ४० मिनिटं !!' या पोस्ट वर स्वतः राही अनिल बर्वे --तेच 'मांजा'चे कथा-पटकथा-संकलक-दिग्दर्शक असलेले-- यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.

"thanks watwat satyawan.bara-bhikar kasahi aso,manjha lokan paryant fact pohachane garajeche hote.so- thanks."

एवढ्या मोठ्या माणसाने आपल्या ब्लॉगला भेट देऊन, पोस्ट वाचून, आवर्जून प्रतिक्रिया देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. सो आजचा दिवस माझ्या आणि ब्लॉगच्या कौतुकाचा. 'मांजा' मुळे आलेल्या खिन्नतेला तेवढीच प्रसन्नतेची किनार !!

राही, खूप खूप आभार !!!!!!!!!

.

Sunday, March 28, 2010

जीवघेणी ४० मिनिटं !!

श्वास कोंडला गेलाय, जगण्यासाठी विलक्षण धडपड करावी लागतेय, जीवाची प्रचंड घालमेल होतेय, काहिली होतेय, आतून उन्मळून पडल्यासारख वाटतंय, सारं निस्तेज अर्धमेलं वाटतंय असा भीषण अनुभव सलग ४० मिनिटं घेतला आहेत कधी? घ्यावा लागला तर कसं होतं माहित्ये? सरसर कापत जाणार्‍या मांजात अडकल्यासारखं वाटतं.

अगदी असाच अगदी हाच अनुभव कथा पटकथा संकलक दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा 'मांजा' देतो. ४१ मिनिटांची फिल्म. शॉर्ट फिल्म. विषय बाल लैंगिक शोषण. एवढा भयंकर विषय की भांडारकरच्या पेज-३ मध्ये शेवटी नुसता उल्लेख आणि एक पाव मिनिटाचं दृश्य बघून पुढचे दहा दिवस हादरलो होतो ते आठवतं. आणि इथे तर हा संपूर्ण चित्रपट त्यावर बेतलाय. अर्थात ४१ मिनिटं. पण लचका तोडतात ही ४१ मिनिटं.

बिना आई बापाचा १०-१२ वर्षाचा रंका आणि ५-६ वर्षांची त्याची किंचित वेडसर धाकटी बहिण. रस्त्यावरचं जीवन. रंका काचा कुटून, त्या मांजाला फासून मांजा वाळवण्याच्या कामात.. रात्रपाळीचा पिसाट हवालदार... दोघांशी बोलतो. ओळख वाढवतो. पोरीला खायला देतो म्हणून घेऊन जातो. मित्राशी बोलताना रंकाला हवालदाराचं खरं स्वरूप कळतं. रंका पोचेपर्यंत उशीर झालेला असतो !!! बहिणीला घेऊन हताश आणि असहाय्यपणे परतत असताना रंका तिला धीर द्यायला म्हणून खांद्यावर हात ठेवतो. ती झिडकारते आणि पुढे निघून जाते. स्वतःच्या भावालाही स्पर्श न करू देणारी रडत रडत पुढे जाणारी तिची ती ठेंगणी मूर्ती पाहून हलतं आतमध्ये.. आधीच्याच दृश्यात आपल्याबरोबरच रस्त्यावरच्या कुत्र्याला खाऊ घालणारी ती छोटुली हीच का असा प्रश्न पडतो. तिचे आधीचे हसरे डोळे आणि आताचा भेसूर चेहरा यांचा ताळमेळ लागत नाही क्षणभर...

पुढे मग रंका, मांजा, हवालदार, पाठलाग ...खल्लास ..... !!!

अखेरच्या दृश्यात बहिणीच्या कोमेजल्या चेहर्‍यावर हसू आणण्याचा रंकाचा सफल प्रयत्न !!!

झालं.. संपला पिक्चर. स्क्रीनवर संपतो. पण आतमध्ये संपत नाही. ओरखडे उठवून जातो.. सुरुवातीची नावं दाखवायला सुरुवात होते तिथपासूनच या चित्रपटाची भीषणता जाणवायला लागते. काळ्याशार डोहातून प्रेतांसारखी तरंगत वर येणारी नावं पाहून आपल्याला कळतं हे प्रकरण काहीतरी विलक्षण आहे, भयंकर आहे. हे असं कधी बघितलेलंच नाही.  त्यातला एकूण एक प्रकार भयानक आहे. एकूण एक फ्रेम भयंकर आहे , अंगावर काटा आणणारी आहे... आणि सेपिया ट्रीटमेंट मुळे तर पिक्चर अधिकच भीषण, अधिकच वास्तव वाटतो. या अतीव बोलक्या छायाचित्रणाबद्दल पंकजकुमारचे पाय धरावेसे वाटतात. Each frame spoke a thousand words to me.. Really !!!हा चित्रपट रस्त्यावरच्या मुलांचं एक उघडंनागडं जग समोर आणतो. आणि वास्तव वास्तव म्हणजे किती वास्तव असावं तर भांडारकरच्या 'चांदनी बार' किंवा रामूच्या 'सत्या' मधले संवाद नाटकी वाटावेत एवढे वास्तव. ते कानावर येऊन अक्षरशः आदळतात... आणि तेही एका १०-१२ वर्षाच्या मुलाच्या तोंडून...

शेवटचं एक मिनिट आशावादी शेवटाच्या दिशेने घेऊन जातं. पण आधीच्या ४० मिनीटांमधल्या ४० हजार वारांचं काय?

जाऊ दे लिहीवत नाहीये.. बास झालं थांबतो... झोप लागायची नाही आज ... आणि उद्या .. कदाचित परवा आणि तेरवाही !!!
---------------------------------------------------------------------

या चित्रपटाची माहिती करून दिल्याबद्दल तसेच त्याची टोरंट फाईल दिल्याबद्दल अभिजीतचे आभार. या भीषणतेचा कडेलोट पहायचा असल्यास इथे टिचकी मारून सुनिता कृष्णन यांचा व्हिडिओ बघा.

Saturday, March 27, 2010

मटाला 'अनावृत' पत्र


माननीय संपादक,
उगाच काहीतरी भारदस्त दिसावं किंवा लेख प्रचंड वैचारिक वगैरे वाटावा म्हणून असं जडसर शीर्षक देतोय असा समज होत असेल तर तो चुकीचा आहे. किंबहुना एवढं समर्पक शीर्षक मी आत्तापर्यंत माझ्या कुठल्याही लेखाला दिलं नसेल. मी मटा ऑनलाइन चा गेल्या ६-७ वर्षांचा नियमित वाचक. मटा कित्येक वर्षं घरी येत असल्यामुळेच फक्त तो आवडता होता असं मुळीच नाही उलट (निदान मुंबईतल्या तरी) लोकसत्ता किंवा सकाळ, लोकमत आणि इतर असल्या अनेक पेपर्सपेक्षा मटा, त्याच्या बातम्या, अग्रलेख, विविध सदरं, माहितीपूर्ण चर्चा यामुळे तो नेहमीच हवाहवासा वाटायचा. त्यामुळे मुंबई/देश सोडून बाहेर जायची वेळ आल्यावर महाराष्ट्राशी, मुंबईशी नाळ जोडलेली राहण्यासाठी मटा म्हणजे माझा सर्वोत्तम (पत्र नव्हे) मित्र होता. महाराष्ट्रातल्या घडामोडी रोजच्यारोज न कंटाळता, न थकता, न चुकता (आणि फुकट) माझ्यापर्यंत आणून ठेवणारा  मटा हा एक महत्वाचा दुवा ठरला. पण दुर्दैवाने मी हे वाक्य असंच्या असं आताच्या मटा विषयी म्हणू शकत नाही. आताच्या म्हणजे साधारण गेल्या दोन वर्षातल्या मटाला. अनेक कारणं आहेत पण त्यातल्या सर्वात महत्वाच्या आणि मला मटाचा जवळजवळ तिरस्कार करायला भाग पाडणार्‍या कारणाविषयीचं फक्त बोलू आज. कारण इतर कारणांनी मला मटाचा राग येत असला तरी तिरस्कार करावसं कधी वाटलं नव्हतं. ती कारणंही आपण थोडक्यात बघूच नंतर. पण आत्ता मूळ मुद्दा. 

आणि तत्पूर्वी माझी मतं म्हणजे समस्त ऑनलाइन वाचक वर्गाची प्रातिनिधिक मतं आहेत असे भासवण्याचा माझा कुठलाही अविर्भाव नाही. परंतु अनेकांशी झालेल्या चर्चेतून  हेही सांगतो की कदाचित हे प्रातिनिधिक मत असण्याची शक्यता आहे. प्रातिनिधिक नसण्याचं कदाचित अजून एक कारण म्हणजे मी हे बर्‍याच सौम्य भाषेत लिहीत असलो तरी प्रातिनिधिक मत हे अजून जहाल असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

डावा हात आणि घाणेरड्या गोष्टी यांचा परस्पर संबंध जोडून की काय कोणास ठाऊक परंतु ऑनलाइन मटाच्या डावीकडच्या वरच्या कोपर्‍यातल्या बातम्या सोडून आपण खाली सरकलो की तिथल्या बातम्या, त्यांची शीर्षकं बघून मटा आणि त्याच्यामुळे आपणही प्रचंड खाली घसरलो असल्याची जाणीव उगाचच होते. काही वर्षांपूर्वीपासून तिथे 'झणझणीत वेब मसाला' नावाचं नावातच पुरेपूर उथळेपणा असणारं सदर (!!) सुरु झालं आणि तिकडे उगाच मायापुरी किंवा तत्सम तद्दन गल्लाभरू मासिकाचं मुखपृष्ठ वाटावं अशा स्टाईलचे फोटोज आणि बातम्या चमकू लागल्या. आपलं हे सदर भलतंच लोकप्रिय होतंय अशी (अवास्तव) कल्पना मटाने कशाच्या आधारे करून घेतली हे समजण्यास कुठलाही मार्ग नसला तरी त्यांनी त्यानंतर 'मटा फोटोगॅलरी' च्या नावाखाली जे भयंकर फोटोज आणि त्याहूनही भयंकर त्यांची शीर्षकं द्यायला सुरुवात केली त्यावरून 'गॅलरी नको पण शीर्षकं आवर' असं म्हणण्याची पाळी प्रत्येक कुटुंबकबिला असणार्‍या सामान्य माणसावर आली एवढं मात्र नक्की. "एन. डी तिवारी यांचं भांडाफोड" दाखवण्याच्या नावाखाली तीच बातमी वारंवार चघळायची असं टीव्ही स्टाईल वाटत असेल तरी तसा कुठलाही उद्देश नसल्याने आजच्याच (२७ मार्च २०१०) च्या अंकातल्या फक्त २-३ शीर्षकांची उदाहरणं देतो. आणि मटाच्या सुदैवाने आजची शीर्षकं नेहमीपेक्षा फारच साधी आहेत हेही लक्षात असुद्या.

१. जीवाची होतेया कायली...
२. बॉलिवूड बेड पार्टनर्स
३. रात्रीची मोहाली

आणि या तीन शीर्षकांच्या (पुन्हा डावी बाजू) डाव्या बाजूला एक अर्धअनावृत तरुणी लोळताना दाखवली आहे. पुन्हा सांगतो की आजचा फोटो आणि आजची शीर्षकं ही फार म्हणजे फारच साधी वाटावी इतकी भयानक परिस्थिती इतर दिवशी असते. आता अशाच अर्धअनावृत तरूण्या लोळताना (नुसत्याच लोळताना नव्हे तर त्याबरोबरच कायकाय करताना) बघण्याची २४ तास टीव्ही वाहिन्यांमुळे सवय (की सोय?) झाली असतानाच्या या युगात उगाच कुठल्या तरी पेपरमधल्या कुठल्यातरी सदरात उगाच चार थिल्लर फोटो छापून आले म्हणून एवढं आरडाओरडा करणं म्हणजे उगाच संस्कृतीरक्षकाचा आव आणून 'धर्म वाचवा' अशी आरोळी ठोकत धर्मरक्षणाची गुढी खांद्यावर घेऊन नाचत असल्यासारखं वाटत असलं तरी मटा म्हणजे उगाच कुठलाही पेपर नव्हे आणि हे असे चार थिल्लर फोटो रोज छापून येतात हे तपशील विचारात घेतले की हा आक्रोश वृथा नव्हे हे पटेल.

आता अशा प्रसंगांमध्ये किंवा अशा प्रकारच्या चर्चा, लेख यामध्ये सामान्यपणे आणि सातत्याने तोंडावर फेकला जाणारा एक मुद्दा म्हणजे 'रिमोट तुमच्या हातात आहे ना मग बदला ना चॅनल, नका बघू असले प्रकार'. पण हा मुद्दा इथे तेवढाच गैरलागू आहे. कसा ते सांगतो. टीव्हीवर हे दिसणार अशी मनाची तयारी असल्याने वेळप्रसंगी (किंबहुना बर्‍याचदा) चॅनल बदलायच्या तयारीनेच पालक बसलेले असतात. यातला अतिरेक सोडला तरीही दरवेळीही ते करणं शक्य नसतं किंवा एम टीव्ही, एफ टीव्ही, झी टीव्ही आणि २६ इंग्रजी अक्षरांतल्या अशा अनेक एकेका अक्षराने सुरु होणार्‍या विविध वाहिन्यांवर असले प्रकार दिसणारच अशी पालकांनी मानसिक तयारी केलेली असते. पण पेपर आणि त्यातून पुन्हा मराठी पेपरचं असं नसतं. तो पत्र नव्हे मित्र असतो. एखादा वयात आलेला किंवा किंबहुना न आलेला मुलगाही ही अशा प्रकारची माहिती, फोटो इतर अनेक साईट्सवरून मिळवून सहज बघू शकतो हे खुलं सत्य उगाच का नाकारा परंतु अशा फोटोंची ओळख माझ्या मुलाला/मुलीला मटाच्या माध्यमातून होऊ नये अशी कुठल्याही सुजाण पालकाची अपेक्षा असेल आणि ती अवास्तव आहे किंवा रास्त नाही असं मला तरी कुठेही वाटत नाही. आत्ता माझा मुलगा मी ऑनलाइन मटा वाचत असताना माझ्यामागे येऊन उभा राहून "बाबा, तू हे काय वाचतो आहेस" किंवा "काय बघतो आहेस" असं विचारण्याच्या वयाचा सुदैवाने नसला तरीही इतर अनेक पालकांच्या बाबतीत हे असे प्रसंग गेल्या दोन वर्षांत अनेकदा आले असणार. किंवा एखादा मुलगा/मुलगी मटा वाचत असाल तर तो/ती ते तसले फोटो बघतील म्हणून त्यांना काय मटा वाचूच द्यायचा नाही?

मुंबईबाहेरच्या वाचकांना कदाचित असं वाटेल की "काय तो एक पेपर आणि त्यातलं एक सदर त्यावर एवढं लिहायची काय गरज आहे? नका वाचू ना मटा, सोडून द्या तो विषय, झालं संपलं". परंतु पुण्यातील वाचकांच्या मनात सकाळला जे स्थान आहे, जो मान आहे तेच स्थान, तोच मान मुंबईकरांच्या मनात मटाबद्दल आहे. एकदा हे मटा आणि सकाळ (किंवा इतर शहरांतील तत्सम पेपर्स) यांच्यातलं साधर्म्य ताडून बघितलं की माझा मुद्दा कळायला मदत होईल अशी अपेक्षा. 

दुसरं असं की "एवढा राग येतो, नाही आवडत तर नका वाचू मटा" असा इतर वाचकांचाच नव्हे तर कदाचित मटाचाही आक्षेप असू शकतो. यावर उत्तरं एकच "राग कोणाचा येतो? तर आपल्या माणसाचा.. सचिनचं शतक हुकल्यावर त्याला जेवढ्या शिव्या पडतात तेवढ्या दादाला, द्रविडला, सेहवागला किंवा धोनीला पडत नाहीत.."

सध्या तरी फक्त याच मुद्द्यावर लिहिलं आहे. कारण शुद्धलेखनाच्या असंख्य चुका, पानोपानी इंग्रजाळलेल्या आणि हिंदाळलेल्या वाक्यांचा आणि शब्दांचा सढळ  हस्ते वापर ह्या चुका तर मी सध्या गृहीतही धरत नाहीये. पण एवढं एकच सांगतो की यापुढे ही डावी बाजू धुवून, पुसून साफ झाल्याशिवाय "मी मटा वाचणार नाही". याला धमकी समजून "काय वाकडं करणार आहेस" किंवा निषेध समजून "एका वाचकाच्या निषेधाने, बहिष्काराने काय होतंय" अशा प्रकारचे विचार करायला मटाच्या संपादक मंडळाला अर्थातच माझ्या संमतीची आवश्यकता नाही. अर्थात "माझ्या एकट्याच्या निषेधाने काय होणार आहे?" हे मलाही माहित आहे परंतु तुमची रोजची वाचक संख्या जर ९९९९९ (एक काल्पनिक संख्या म्हणून घेतलीये) असेल तर माझ्यामुळे ती उगाच १००००० व्हायला नको एवढाच हेतू. असा एखादा लेख लिहून काय होणार आहे हा प्रश्नच असला तरीही अशा लेखामुळे अशा प्रकारचे अनेक लेख, मतं, प्रतिक्रिया यांना चालना मिळून त्यानिमित्ताने या 'डाव्या' बाजुमुळे त्रासलेल्या सर्व वाचकांनी आपली मतं मांडल्याने मटाचं हे 'वाकडं पडलेलं डावं पाउल' सावरलं तर उत्तमच !!

-हेरंब ओक, न्यू जर्सी 

---------------------------------------------------------------------------------------

मागे 'तो आणि ती' वर आलेल्या अनेक प्रतिक्रियांमुळे डोक्यात घोळत असलेल्या या विषयाला शेवटी मी कागदावर उतरवलंच. हे पत्र मी जसंच्या तसं mttumchepan@indiatimes.com आणि bk.raut@sansad.nic.in या इमेल आयडिज वर पाठवलं होतं पण ते दोन्हीकडून बाउन्स होऊन परत आलं. कोणाला मटा संपादक/भारतकुमार राउत किंवा तत्सम योग्य व्यक्तीचा इमेल आयडी माहित असल्यास कमेंट मध्ये टाकावा ही विनंती.

Friday, March 26, 2010

माझे(ही) खादाडीचे प्रयोग !!

लोकं खादाडी खादाडी करत, नव्या रेसिप्या देत, नवीन नवीन हॉटेल्सची आणि तिथल्या डिशेसची नावं सांगत, नवीन नवीन पोस्ट्स टाकत, असले जळवायला लागले आहेत ना आजकाल की म्या बी ठरिवलं की खादाडीवरची कायतरी लय भारी पोस्ट टाकायची आज. तेवढाच जरा दुर्बळाचा जोरकस सूड ('जोर का झटका' चं सुटसुटीत मराठी भाषांतर) !!

रेसिप्या वाचण्यापूर्वी घ्यायच्या दक्षता आणि आपल्या मनाला द्यायच्या सुचना उर्फ मध्यटीप (तळ झाली, माथा झाली आता हीच राहिली होती) :

१. प्रत्येक कृती आपल्या जवाबदारीवर करून आणि खाऊन बघणे. हे असलं खाऊन पोट न बिघडता, कसलेही आजार न होता लेखक सुखरूप राहिला म्हणजे आपणही राहु असे गृहीत धरून चालण्याचे काहीच कारण नाही.

२. कृतीत दिल्याबरहुकूम सर्व करूनही आपला पदार्थ लेखकाच्या पदार्थाएवढा चविष्ठ झाला नाही तरी नैराश्याने ग्रासून घेण्याचे कारण नाही. प्रयत्नांती परमेश्वर.

३. हे इनोदी लिखाण वाटत असलं तरी ते तसं नाही. यातील प्रत्येक पदार्थ लेखकाने जसाच्या तसा करून आणि खाऊन बघितला आहे आणि तृप्ततेची जोरदार ढेकरही दिलेली आहे. हो हो प्रत्येक वेळी.


पदार्थ १ : कोरडं मॅगी

१. मॅगी म्हटल्यावर उगाच धावपळ  करून मटार, बटर, गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असले काही पदार्थ आणायला न धावता एका पातेल्यात न मोजता दोन कप पाणी घाला (पदार्थाच्या यशस्वितेसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा) आणि पातेले गॅसवर ठेवा. अरे हो आणि गॅस चालू करा.

२. एका घावात मॅगीच्या पाकिटाला वरून छेद द्या. (याचा चवीशी काहीही संबंध नसला तरी स्वतःबद्दल 'प्रो' आणि 'यो' फिलिंग हवं असेल तर हे काम एका घावात करता आलं पाहिजे.)

३. मॅगीचे एकसर, समान तुकडे करण्याच्या बिरण्याच्या भानगडीत न पडता दणाद्दण कसेही तुकडे करा. (तोंडात आणि पोटात गेल्यावर कोण बघतंय त्यांची फिगर उर्फ आकार?)

४. हे तुकडे करायला बरोब्बर २ मिनिटं लागतात (मॅगीवाले काय मुर्ख वाटले का २० वर्ष "२ मिनट, २ मिनट" करून ओरडायला?) त्यामुळे तुकडे होताक्षणी ..................... काय कराल सांगा बरं? जर ते तुकडे पातेल्यात घालणार असाल तर फसलात... चूक. आधी गॅस बंद करा लगेच. गॅस बंद झाल्याची खात्री झाल्यावर ३ नंबरचे (म्हणजे ३ नंबरच्या मुद्द्यातले) तुकडे ४ नंबरात आपलं सॉरी गॅसवरच्या उकळत्या पाण्याच्या पातेल्यात घाला.

५. पातेल्यावर ताटली ठेवा. बरोब्बर २ मिनिट हरिनाम घेत निवांत बसा. (दमला नसाल तर बागडण्यास हरकत नाही)

६. २ मिनिटांचा अलार्म वाजल्यावर (मी लावतो बाबा. मॅगी उगाच जास्त का शिजू द्यावं? ग्लोबल वार्मिंग बाब्बा. हो गॅस बंद असला तरी ग्लोबल वार्मिंग म्हटलं की भारदस्त वाटतं ना.) लगेच गॅसच्या दिशेने धावा.

७. मागचा पुढचा विचार न करता पातेल्यातलं सगळं प्रकरण गाळण्यात ओता. तत्पूर्वी गाळण्याखाली वाटी, बौल, ताटली (चमचा चालणार नाही) धरण्यास विसरू नका.

८. सगळंच्या सगळं पाणी काढून झाल्यावर गाळण्यातला सगळा प्रकार पुन्हा बॅक टू पॅव्हीलीयन आणा. म्हणजे पातेल्यात हे तर कोणालाही समजेल. असो.

९. पुन्हा एका घावात मसाला पाकिटाला वरून छेद द्या (इथेही चवीचा काही संबंध नसला तरी आरामात कापत बसल्याने मॅगी गार होण्याची शक्यता असते (म्हणजे होतंच) आणि मग ते चांगलं लागत नाही. म्हणून सांगितलं हो. बाकी काही नाही. बाकी तुम्ही आपल्या मर्जीचे मालक.)

१०. सगळा मसाला पातेल्यात ओतून झक्कपैकी ढवळा.

११. आता ओरपा..

झालं की नाही ४ मिनिटात आणि ११ पावलांत आपलं मॅगी तयार ?

पदार्थ २ : मॅगीवडे

११. कृती क्र १ ते १० अगदी शेम टू शेम. पण कृती क्र ११ मधे ओरपण्याच्या ऐवजी थोडी मेहनत घ्यावी लागेल. ढवळून ढवळून घट्ट करून झाल्यावर पातेल्याला चिकटलेलं मॅगी त्यात जरासं तेल सोडून हलकंफुलकं, तजेलदार, तेलकट करून घ्यावं.

१२. ते ओढून काढून त्याचं वड्याच्या आकाराचं काहीतरी थापून गोल करून घ्या.

१३. कढईत तेल घालून ते गरम होऊ द्या.

१४. तेल गरम झाल्यावर वडेसदृश्य पदार्थ तळायला लागा. खमंग झाल्यावर बाहेर काढा.

१५. पदार्थ-१ मधल्या ११ नंबरच्या वाटेने चालू लागा.

(पदार्थ-१ मधे दिल्याप्रमाणे मॅगी करताना मागे एकदा ते एवढं कोरडं झालं होतं की पातेल्याला चिकटूनच बसलं. आम्हाला पातेल्यात तेल घालून ते ओढून काढावं लागलं. आणि नंतर ते तेलकट मॅगी काय खायचं त्यामुळे त्याचे वडे करून आम्ही चक्क ते तळून खाल्ले होते. कालांतराने हीच आयडिया नेस्टलेच्या डोक्यात येऊन तेही ऑफिशीअली  मॅगी-वडे विकायला लागले असल्याचे स्मरते. असो. या पदार्थाचा जन्म अर्थातच त्या किश्श्यावरून झाला आहे.)

पदार्थ ३ : पांचट मॅगी

एवढं कोरडं मॅगी किंवा मॅगीवडे खायचे नसल्यास पदार्थ-१ मधल्या स्टेप ८ मधे सगळं पाणी काढून टाकण्याऐवजी थोडं पाणी शिल्लक ठेवून त्यात मसाला घालून ढवळा. झालं पांचट मॅगी. यामध्ये तळणासाठी कढईत सोडण्याचं आणि चिकटलेलं मॅगी सोडवण्यासाठी पातेल्यात घालायचं तेल वाचलं आहे. तेवढंच जरा फॅटफ्री, कोलेस्ट्रॉलफ्री मॅगी.

पदार्थ ४ : आपापल्या पद्धतीचं मॅगी

पदार्थ १, २, ३  वाचायला, करायला किंवा करून झाल्यावर खायला आवडले नसतील (आठवा मध्यटीप. म्हणूनच स्पष्ट लिहिलं होतं तसं. उगाच बोलायचं काम नाय) तर आपण आपापल्या पद्धतीने मॅगी करू शकता. अरे हो नाहीतर मॅगीच्या पाकिटाच्या मागेही रेसिपी दिलेली असते म्हणे !!!

तळटीप :

१. कुठलेही फोटो टाकायची आवश्यकता नाहीच नाही का? तरीही त्यातून फोटोजशिवाय पोस्ट अपूर्ण वाटत असेल तर वाईस गुगल करा.
२. कुठल्याही निषेधाशिवाय वाचली जाणारी खादाडीवरची ही पहिलीच पोस्ट असेल !!! :D

Tuesday, March 23, 2010

यमाबाईंच्या आत्मचरित्रातील काही पानं !!

पुढील काही महिन्यांत/वर्षांत प्रकाशित होणार्‍या (किंवा न होणार्‍या) रा.रा. बहिणाताई उर्फ भगिनीजी उर्फ यमाबाईंच्या आत्मचरित्रातील ही काही पाने पूर्वप्रसिद्धीस देत आहोत. 'रम्य ते बालपण' या खंडातील हे काही प्रसंग वाचताना बालपणातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही (फक्त स्वतःच्याच) उज्ज्वल भवितव्याचा विचार करणार्‍या यमाबाई बघितल्या की त्यांची दूरदृष्टी बघून अभिमानाने उर भरून येतो.


------------------------------------------------------------------

प्रसंग पहिला : बाहुली

लहानपणी एकदा मला बाहुली हवी होती. म्हणजे माझ्याकडे बाहुल्या होत्या तशा पण मला अजून एक हवी होती माझ्या मनासारखी. म्हणून आईच्या मागे लागून लागून एक दिवस मी तिच्याबरोबर बाजारात गेले. दोन-तीन तास आणि आठ-दहा दुकानं फिरून झाली तरी काही मला माझ्या आवडीची बाहुली मिळेना. आईनेही शेवटी हात टेकले आणि म्हणाली "यमे, इतक्या बाहुल्या बघितल्यास एकही बाहुली आवडत नाही तुला. कशी बाहुली हवी ग तुला?"
"या सगळ्या बाहुल्या फडतूस आहेत. मला माझ्यासाखी दिसणारी बाहुली हवी."
"काय?? तुझ्यासारखी?? अशी बाहुली कुठे असते का कधी? बाहुल्या अशा कोणासारख्या दिसत नाहीत कधी."
"नाही मला माझ्यासारखी दिसणारीच बाहुली हवी. मी तिच्याशीच खेळणार. आणि इतकंच नाही तर सगळ्या मुलींनी फक्त माझ्यासारख्या दिसणार्‍या बाहुलीशीच खेळायचं. सगळ्यांकडे तशीच बाहुली असली पाहिजे."
"काय येड बीड लागलं की काय तुला? काय मुर्खासारखी बडबडते आहेस?"

त्यावेळी आईला माझं बोलणं मुर्खासारखं वाटलं असेल. पण तो अपमान मी विसरले नव्हते. म्हणून पुढे मोठी झाल्यावर मी लहानपणीच्या माझ्यासारख्या दिसणार्‍या बाहुलीचं एक रूप म्हणून, एक प्रतिक म्हणून सगळीकडे माझे पुतळे उभारायला सुरुवात केली. सुदैवाने सत्ता हातात होतीच. अडवायला कोणी नव्हतं. लोकांनी, विरोधी पक्षांनी, प्रसार माध्यमांनी जरा बडबड केली, कोर्टाने फटकारलं (आता फटकारलं हा शब्द पेपरवाल्यांचा नाहीतर इथे मला फटकारायची हिम्मत आहे कोणात?). तर मी माझ्या लहानपणीच्या बाण्याने त्यांनाच उलट विचारलं "जिवंत व्यक्तीचे पुतळे उभारू शकत नाहीत असं कुठल्या कायद्यात लिहिलंय?" सांगा ना.. आहे उत्तर? सगळे एकदम गपगार पाडून गेले. केलं की नाही सगळ्यांना निरुत्तर... !!!

प्रसंग दुसरा : किल्ला *

लहानपणी आम्ही एकदा दिवाळीचा किल्ला करत होतो. छान तयारी चालू होती. सगळेजण एकदम उत्साहात होते. तेवढ्यात तिकडे एक जण आले आणि आम्हाला म्हणाले "तुम्ही इथे किल्ला करू शकत नाही."
मी पुढे होऊन विचारलं "का?"
"कारण तुम्ही इथे किल्ला बांधलात तर चिखलामुळे, दगडविटांमुळे हा परिसर खराब होईल. तुम्ही दुसरीकडे किल्ला बांधा."
आम्ही ऐकत नव्हतो. शेवटी हो-ना करता करता आम्हाला त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं आणि तिकडे किल्ला बांधता आला नाही. हा अपमानही माझ्या चांगलाच जिव्हारी लागला होता त्यामुळे मी तो विसरणं शक्यच नव्हतं. त्यामुळे नंतर राज्य हातात आल्यावर मी ताजच्या परिसरात पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी नटलेल्या इमारती बांधायला मंजुरी दिली. झालं. पुन्हा त्या सगळ्या पेपरवाले, न्यूजवाले, विरोधीपक्ष, कोर्ट अशा सगळ्यांना माझ्या विरुद्ध रान उठवायला संधी मिळाली की मी "ताजचा परिसर खराब करते आहे, या सगळ्यामुळे पर्यावरणाला, ताजच्या सौंदर्याला बाधा येईल म्हणून." लगेच सगळेजण "ताज कॉरिडोर-ताज कॉरिडोर" म्हणून आरडाओरडा करायला लागले.कोर्टाने तर माझ्या अटकेसाठी वॉरंट देखील काढलं होतं. पण मी पुन्हा एकदा शिताफीने सगळं हाताळलं आणि सगळंच प्रकरण थंडावलं. आता तर ते कोणाला आठवतही नाही. मधेमधे कोर्ट उगाच आपलं सीबीआय ला कानपिचक्या (जळ्ळे मेले ते पेपरवाले. 'कानपिचक्या' हा ही त्यांचाच आवडता शब्द. मला तर हल्ली कोर्ट आणि कानपिचक्या हे जोडशब्द वाटायला लागले आहेत. असो.) देत असतं की त्यांनी केसचा तपास नीट केला नाही म्हणून. जाउदे आपल्याला काय. बसुदेत त्यांना भांडत !!

प्रसंग तिसरा : गजरा

आत्मचरित्रात बालपणीच्या गरिबीचा एक तरी प्रसंग असावा असं म्हणतात म्हणून हा गजर्‍याचा प्रसंग देते आता. बालपणी खूप गरिबी होती आमच्या घरी. मला फुलं, गजरे, वेण्या असे प्रकार फार आवडायचे. पण नेहमी घालायला मिळायचे नाहीत. मी आठवड्याच्या बाजारात जाताना नेहमी आईच्या मागे लागायचे की आज मला गजरा घेऊ म्हणून. आई नुसतं होहो म्हणायची. पण कधीच घ्यायची नाही. एकदा आम्ही गजरा घेत असताना एक आणा कमी होता म्हणून त्या गजरेवाल्याने आम्हाला गजरा दिला नाही आणि वर म्हणतो कसा "एक आणाही नाही आणि चालले गजरे घ्यायला". मला तेव्हा एक आण्याचं महत्व कळलं. आणि हळूहळू आपोआपच माझं फुलं, गजरे  याबद्दलचं प्रेम कमी होत गेलं. पण त्या प्रसंगातून झालेला अपमान मी विसरले नव्हते. तो राग कमी झाला नव्हता. म्हणून मग त्या गजरेवाल्याचा नाकावर टिच्चून परवा मी माझ्याच काही लोकांकडून चक्क हजाराच्या नोटांचा हार घालून घेतला. अहो विशेष काही नाही. असेल काहीतरी ४-५ कोटी रुपड्यांचा हार. त्यात काय एवढं विशेष. पण झालं पुन्हा त्या मिडिया, पेपर, विरोधी पक्ष सगळ्यांना अचानक कंठ फुटला. "ही यमाई कसे लोकांचे पैसे उधळते आहे बघा". हे असलं काहीतरी ऐकलं की असला राग येतो ना. आता हे लोकांचे पैसे कसे झाले? माझ्याच पोरांनी देणग्या गोळा केल्या, त्याचे हार बनवले आणि माझ्या गळ्यात हार घातले यात जनतेच्या पैश्यांचा संबंधच कुठून आला? मला तर ती फुलं मेली आवडत पण नाहीत. म्हणून तर नोटांचा हार घातला. पण उगाच एकदा कानफाट्या नाव पडले की उगाच तेवढीच टेप वाजवत बसतात लोक. सगळ्यांनी त्या हारावरून एवढा गोंधळ घातला की काही विचारू नका. पण यावेळा मी अजिबात गप्प बसणार नव्हते. मी त्यांच्यापेक्षाही जस्त खमकी. मला जे विरोध करतात त्यांच्या नाकावर टिच्चून मला जे हवं ते मी करतेच हे मला दाखवून द्यायचं होतंच. दुसर्‍याच दिवशीच्या एका बैठकीत मी पुन्हा माझ्याच पोरांकडून अजून एक असाच हार घालून घेतला. अर्थात तोही काही फार नव्हता. फार तर एक-दीड कोटी रुपड्यांचा असेल. पण मला विरोध करणार्‍यांना मी कशी चपराक देते हे तरी कळलं ना सगळ्यांना.. बास तर !!

------------------------------------------------------------------

यमाबाईंचं बालपण आणि एकूणच सगळं आयुष्य कशा स्फोटक प्रसंगांनी भरलेलं आहे याची वाचकांना कल्पना आलीच असेल. आयुष्य एवढ्या चढउतारांनी भरलेलं असूनही सगळ्या संकटांवर मात करून जिद्दीने वर आलेल्या आपल्या या यमाबाईंचं चरित्र नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल असं आहे. आपण लवकरात लवकर आपली नावे नोंदवून या आत्मचरित्राचं आगाऊ आरक्षण करून मूळ किमतीवर सवलत मिळवू शकता.जाउदे आरक्षण हा शब्द यमाबाईंच्या भलत्याच जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालणारा असल्याने आपण तो न वापरता सरळ सोपा 'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' हा शब्द वापरू.

'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' साठीचे काही नियम

१. 'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' फक्त रोख रकमेतच केले जाईल.
२. 'अ‍ॅडव्हान्स बुकिंग' साठी फक्त हजाराच्याच नोटा स्वीकारल्या जातील.
३. नोटांचा हार करून आणल्यास ५% सवलत मिळेल.
४. ज्यांच्या राहत्या घरांच्या आसपासच्या परिसरात मधमाश्यांची पोळी आहेत अशा लोकांची आधी कसून झडती घेतली जाईल आणि मगच प्रवेश दिला जाईल.

* 'प्रसंग दुसरा : किल्ला' अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी जरा इथे नजर टाका.

Monday, March 22, 2010

२३ मार्च १९३१ !!!

२३ मार्च १९३१ रोजी भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्‍या निधड्या छातीच्या तीन तडफदार वाघांना सहस्त्रकोटी प्रणाम !!


जय हिंद ! वंदे मातरम ! भारतमाता की जय !

Sunday, March 21, 2010

आईशप्पत !!

* लहानपणी आमच्या चाळीत गणपतीच्या शेवटच्या दिवशी सगळ्या वर्गणीदारांची नावं एकत्र करून एका (सगळ्यात.. म्हणजे आमच्यापेक्षाही) लहान मुलाच्या (आता मालिकांमध्ये आणि चित्रपटात दाखवतात तशा चुणचुणीत, आगाऊ मुलाच्या हस्ते नाही, कोणाही सामान्य मुलाच्या) हस्ते तीन चिठ्ठ्या उचलल्या जात. आणि त्या तीन भाग्यवंत विजेत्यांना अनुक्रमे प्लास्टिकची मोठी बादली (किंवा ड्रम/टब वगैरे), मध्यम बादली, आणि छोटी बादली अशी बक्षिसं मिळत. त्या चिठ्ठ्यांमध्ये एकदा तरी आमचं नाव यावं असं मला नेहमी वाटायचं, अहो बादल्या चिक्कार होत्या घरी त्याचा प्रश्न नाही पण ते दिमाखात स्टेजवर जाऊन (गणेशोत्सव मंडळाच्या) अध्यक्षांच्या हस्ते एकदा तरी बक्षीस घेता आलं पाहिजे अशी जाम इच्छा होती. आमच्या शेजार्‍यांची आणि एकूणच सगळ्यांची १०-१० वेळा नावं येऊन गेली पण (दरवर्षी वेळच्यावेळी वर्गणी भरुनही) एकदाही माईकवरून (निदान) 'तिसरं बक्षीस (तरी) ओक' अशी घोषणा ऐकायची माझी इच्छा अपूर्णच राहून गेली. 

* संध्याकाळी मैदानात (मुंबई सोडून डोंबिवलीत आल्यावर .. मुंबईत कुठली आली मैदानं.. वेडे की काय?) क्रिकेट खेळताना नाणं उडवल्यावर 'छापा की काटा' असं ओरडल्यावर मी जर छापा ओरडलो असेन तर काटा किंवा काटा असेल तर छापा येऊन पडायचं. म्हणजे अगदी जणु मी काय ओरडतोय हे त्या नाण्याला ऐकू येतं की काय अशी शंका येण्याएवढं.

* सापशिडी खेळताना इतर पोरांच्या सोंगट्या १५-२० किंवा कित्येकदा ४० पर्यंत गेल्यावरसुद्धा फासे माझ्यावर प्रसन्न होऊन मला सहा टिंबं दाखवतायत असं कधी व्हायचं नाही. एकदा तर एक शूरवीर (नर्व्हस नसलेल्या) नायनटीजमध्ये गेल्यावर मला सहा पडल्याचं मला स्पष्ट आठवतंय. आमच्या बिल्डिंगमधला 'विश्वविक्रम' आहे तो. अगदी आत्तापर्यंत अबाधित राहिलेला.

* नंतर थोडाफार लॉटरी तिकिटं काढून बघायची सवय (नाद नाही सवय) लागली. बरेचदा १००-२०० रुपयांची तिकिटं काढून झाल्यावर ५ रुपयाची लॉटरी लागायची. :(

* नंतर च्यामारिकेत (मीनलचा शब्द) आल्यावर व्हेगस, यॉँकर्स, अटलांटिक सिटी च्या कसिनोंमध्ये (कधीकधी) रात्रभर स्लॉट मशीन समोर बसून कालांतराने पूर्ण कफल्लक होऊन बाहेर पडायची पाळी आली होती. आणि त्यात पुन्हा नुकसानीची डॉलर-टू-रुपये गुणाकाराची दुखरी जखम जास्तच ठसठसणारी..


अरे काय यार सक्काळी सक्काळी नन्नाचा पाढा लावलाय यार? काय झालं एवढं गळे काढायला? हं ?? 
नाही सांगायचा मुद्दा एवढाच की जिथे जिथे म्हणून चिठ्ठीत आपलं नाव येण्यासाठी, छाप किंवा काटा बरोबर पडण्यासाठी, आपण टाकलेल्या फाश्यांवर सहा येण्यासाठी, लॉटरीत किंवा कसिनोत पैसे लागण्यासाठी (आणि इतरही अनेक ठिकाणी वगैरे वगैरे) नशीब लागतं तिथे तिथे या पठ्ठ्याने आमची चांगलीच फजिती केलेली आहे. 

पण आज अचानक रोहनने मला पिंगुन "पुन्हा अभिनंदन" केलं. तेव्हा मला वाटलं की आदितेय चालायला लागलाय त्याबद्दल ब्लॉगपोस्टवर कमेंट टाकून अभिनंदन केलेलं आहेच आणि परत चॅटवर करतोय म्हणून हे "पुन्हा" असावं. पण नंतर मला भाग्यश्रीताईंचं अभिनंदनाचं मेल आलं. आणि ते मेल वाचल्यावर मला कळलं की इतकी वर्षं कुठल्याही स्पर्धांमध्ये, टॉसमध्ये, लॉटरीमध्ये, हौझीमध्ये आपली साथ न देणार्‍या नशिबाचा मूड आज जरा बरा आहे. कारण  'वटवट सत्यवान'ला नेटभेटतर्फे घेण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेत चक्क प्रथम क्रमांक उर्फ पाहिलं बक्षिस उर्फ प्रथम पारितोषिक मिळालं आहे. आणि नशिबाचा मूड बरा आहे म्हणतोय ते यासाठी की हे बक्षिस चक्क लकी ड्रॉ मध्ये मिळालं आहे. वा म्हणजे नुसतं गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या आधारावर कोणीही पाहिलं बक्षिस मिळवेल पण लकी ड्रॉ मधून बक्षिस मिळणं ही कित्ती मोठ्ठी गोष्ट आहे अशा टायपाचं हे वाक्य वाटत असलं तरी इतकी वर्ष हात दाखवून अवलक्षण करणारं नशीब जर एखाद्यावर फिदा होऊन पाहिलं बक्षिस वगैरे द्यायला लागलं तर त्याची (नशिबाची नव्हे माणसाची.. सदरहू प्रसंगात या पामराची) काय अवस्था होईल याचा अंदाज अजूनही आला नसेल तर पहिले पाच तारे (* व्हो) पुन्हा नजरेखालून घाला की राव एकदा.. :-)

स्पर्धेचे निकाल इथे वाचता येतील. आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं बक्षिस म्हणजे नेटभेटतर्फे स्वतंत्र डोमेन नेम दिलं जाणार आहे. म्हणजे http://harkatnay.blogspot.com/ आता लवकरच http://harkatnay.com/ किंवा http://harkatnay.in (किंवा असंच काहीतरी) वर शिफ्ट होईल. हाय की नाय मज्जा? 

स्पर्धेचे निकाल थोडक्यात देतो. (देतो म्हणजे परीक्षक स्टाईलमध्ये नाय वो.. सांगतो याअर्थी.)

================================================

वाचकांसाठीची स्पर्धा - "मला भावलेले मराठी व्यक्तीमत्व"

प्रथम क्रमांक - सुपर्णा कुल्रकर्णी, मुंबई 

द्वितीय क्रमांक - नीला सहस्रबुद्धे, पुणे 

तृतीय क्रमांक -  आनंद घारे, नवी मुंबई


ब्लॉगर्ससाठीची स्पर्धा -

प्रथम क्रमांक - हेरंब ओक    ( http://harkatnay.blogspot.com/ )

द्वितीय क्रमांक -  आल्हाद महाबळ   ( http://alhadmahabal.wordpress.com )

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

================================================

तळटीप (तळटिपेशिवाय आपलं काय होतंय?) : अर्थात हे एवढंसं सांगण्यासाठी एवढ्या मोठ्या पोस्टची गरज नव्हती. पण निकाल बघितल्यावर माझ्या (नेहमीच्या) उतावीळपणामुळे अगदी लगेच बझ करून आणि चॅट स्टेटस अपडेट करून सगळ्या जगाला ओरडून सांगून झालं होतं. सो उगाच कोणाचा (आणि आपला स्वतःचाही) गैरसमज नको म्हणून ही पोस्ट :-) .. भेटूच... !!

Saturday, March 20, 2010

पाउल पडते पुढे !!



माथाटीप (नो तळटीप फॉर अ चेंज) : "झालं.. याची पुन्हा लेकावर पोस्ट. २-३ इकडच्या तिकडच्या काहीतरी पोस्ट्स टाकल्या की आली याची गाडी  पुन्हा लेकावर." पोस्ट वाचायला सुरुवात केल्यावर हे असे काहीतरी विचार तुमच्या डोक्यात येणं स्वभाविक आहे पण आमच्या हिरोचे प्रताप दिवसेंदिवस इतक्या वेगाने "वाढता वाढता वाढे" झाले आहेत की त्या प्रत्येक पराक्रमावर एकेक पोस्ट लिहायची म्हटली तर लवकरच "भेदिले ब्लॉगमंडळा" असं होऊन जाईल. (आपलं कार्ट किती मस्तीखोर आहे, कसं उपद्व्यापी आहे, कसं शांत बसत नाही किंवा थोडक्यात त्याची प्रगती कशी जोरात आहे आणि तो शेजारपाजारच्या त्याच्या वयाच्या इतर चार-सहा पोराटोरांपेक्षा कसा पुढे आहे हे सगळं सांगण्याची पालकांमध्ये जी एक अहमहमिका लागलेली असते तसल्या 'अ'मधून (पूर्ण शब्द पुन्हा लिहायचा पुन्हा कं) जन्माला आलेलं हे वाक्य किंवा ही पोस्ट नाही याची सुजाण पालकांनी आणि पालक नसलात तरी सुजाण असणार्‍या वाचकांनी नोंद घ्यावी. आणि नोंद घेतल्यावरही जर 'अ' वाटत असेल तर वाटो बापडी. आप्पून काय करनार)..
 

प्रगट स्वगत (लाउड थिंकिंग म्हणतात म्हणे याला) : आयला ही टीप आहे की स्वतंत्र पोस्ट. आणि किती ते कंस आणि कंसात कंसात कंस. आणि माथाटीप आहे म्हणून काय डोक्यावर घेऊन नाचणार? पायीची 'टीप' पायीच बरी... त्यामुळे आता बस करा.

प्रगट प्रगट (असा शब्दच नाहीये त्यामुळे याला अजून दुसरं काही नाही म्हणत): नमनाच्या पिंपभर तेलामुळे सुरुवातीलाच जरा तेलकट तेलकट वाटत असेल तर तेच तेल डोक्याला लावून घ्या थोडं. डोक्याला आणि डोळ्याला तेल बरं असतं म्हणतात उन्हाळ्यात..

(खरीखुरी सुरुवात)
तसं पहिलं पाउल सगळ्यांचीच मुलं केव्हा ना केव्हातरी टाकत असली तरी मराठी लोकांना आणि त्यातल्या त्यात आयांना आपली लेकरं पाहिलं पाउल टाकतात याचं जरा विशेष अप्रूप असावं असं मला नेहमी वाटतं. (आठवा "मराठी पाउल पडते पुढे","पुढचं पाउल"... काहीही संबंध नाही.. उगाच आपलं ढकलेश) या विधानाचे म्हणजे कंसाच्या अलीकडच्या विधानाचे सर्व हक्क असुरक्षित. थोडक्यात माझं हे विधान खोडून काढण्याचा सगळ्या आया-भगिनींना पूर्ण अधिकार आहे. अर्थात मी हे असलं डिस्क्लेमर टाकलं नसतं तरी  सगळ्यांनी त्याला खोडून काढलं असतं हे तर झालंच. पण अशी खाडाखोडी, झोडाझोडी, तोडाफोडी (बरं जुळलं डी डी डी) करण्याआधी मी असं का म्हणतोय ते तरी ऐकून घ्या.


परवा माझा मोबाईल जोरात चित्कारला आणि कॉल उचलल्यावर बायको चित्कारली (पलीकडून बोलणार्‍याच्या त्यावेळच्या मूडनुसार मोबाईलची रिंग स्वतःला अ‍ॅडजस्ट करून घेते या भ्रमणध्वनी क्षेत्रातल्या महान शोधाची तंवर मला कल्पनाच नव्हती.) 

"अरे आदितेय थोडं थोडं चालतोय"..
"अरे वा मस्तच" तिच्या अमाप उत्साहापुढे आपला उत्साह म्हणजे अगदी लल्लुपंजू वाटणार नाही आणि ऑफिसमधले लोक उगाच माना वळवून त्रासिक चेहर्‍याने आपल्याकडे बघणार नाहीत अशा पद्धतीच्या, या दोघांचा साधारण सुवर्णमध्य साधणार्‍या सुरात मी उत्तरलो.
"एक-दोन पावलं टाकतो, मग धुपकन पडतो.. पुन्हा चालतो पुन्हा बसतो."
"अरे वा. सहीच. आज संध्याकाळी आल्यावर बघतोच"
"चालेल, बाय" (चार वाक्यात बोलणं संपतं आमचं. उगाच रट्टाळ चौकश्यांचं पाल्हाळ लावायला आम्ही काय गर्लफ्रेंड्ड-बॉयफ्रेंड्ड आहोत की काय (आता)..?)

घरी गेल्यावर टीव्ही, लॅपटॉप, गप्पा या सगळ्यांच्या आडून मध्येमध्ये लेकाशी खेळत तो चालतोय का याच्यावर मी लक्ष ठेवून होतो. पण काहीच चालाचाली न झाल्याने कालांतराने पेशन्स संपल्यावर सगळं लक्ष मी लॅपटॉपकडे केंद्रित केलं आणि त्यानंतर जणु ते समजल्याप्रमाणे लेकाने अचानक दोन पावलं टाकली आणि बसला.

"बघितलंस SSSSS??" मातोश्री चित्कारल्या

"...." आमचं ओशाळ हसु.

"...." तिच्या चेहर्‍यावर फणकारा

मी लॅपटॉपचं झाकण लावून पुन्हा लेकाकडे आशाळभूतपणे पहात राहिलो. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. (याचा नक्की अर्थ काय हे मला कधीतरी कोणीतरी समजावून सांगेल का?). मला मनसोक्त गंडवून झाल्यावर मी पुन्हा लॅपटॉपमध्ये तोंड घालता क्षणी बाळराजांनी पुन्हा दोन पावलं टाकली (असावीत). बायकोने मला पुन्हा हाक मारली (ही असावी नाही.. ही नक्की ). आणि तिच्या हाकेने बावचळून जाऊन राजे पुन्हा बसले (असावेत). डोळे भरून पहात राहण्याजोगं ते दृष्य मी पुन्हा मिस केलेलं बघून मगासच्या 'ओशाळ हसु' आणि 'फणकारा' वाल्या "कोशिश" स्टाईलने संवाद न साधता बायकोने चक्क "सवत माझी दोडकी" (पक्षि लॅपटॉप हे सु सां न ल) वर मनसोक्त तोंडसुख घेऊन त्या दोडक्याचा जबरदस्त उद्धार केला.




बघता बघता १२ वाजून गेल्याने बाळासाहेबांची नसली तरी जगाची झोपायची वेळ झाली असल्याने आम्ही बेडरूमीत शिरलो. आणि बघतो तर काय. एवढ्या रात्री अचानक कुठून एवढा अमाप उत्साह शिरला चिरंजीवांच्या अंगात कोण जाणे पण त्यांनी चक्क उभे राहून दोन पावलं टाकली आणि आमच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेण्यासाठी आमच्याकडे पाहिलं. ते चालणं बायकोने तिसर्‍यांदा (किंवा चौथ्यांदा, पाचव्यांदा ....) बघितलं असलं तरी मी पहिल्यांदाच आणि आम्ही दोघांनी एकत्र पहिल्यांदाच बघितल्याने आम्ही दोघेही सॉलिड खुश होऊन ओरडलो. आमचा लेक ऑफिशियली चालायला लागला होता. (कोणी याला "पावलं टाकायला लागला" म्हणतील. म्हणोत बापडे. आम्ही "चालायला लागला" असंच म्हणणार. आणि हो. हेही 'अ'मुळे नाही हां )

पण खरंच सांगतो ते दुडूदुडू पावलं टाकणं बघून मला इतका प्रचंड आनंद झाला होता ना की अक्षरशः नाचावसं वाटत होतं. जाम खुश झालो होतो. एकदम सही रे सही वाटत होतो. पूर्वी ती एक कुठल्यातरी कॅमेर्‍याची अ‍ॅड लागायची टीव्हीवर. त्यात ते बाळ चालायला लागतं पण बाबा ऑफिसमध्ये असल्याने त्याला बाळाची पहिली पावलं बघता येत नाहीत. पण आई त्या कॅमेर्‍याने बाळाच्या पहिल्या चालण्याचे फोटो काढून ठेवते आणि ऑफिस मधून आल्यावर बाबाला दाखवते. आई-बाबा दोघेही मस्तपैकी खुश होतात. तेव्हा मला ते जाम इनोदी वाटायचं. हे म्हणजे कॅमेरा कंपनीला आपला धंदा वाढवण्यासाठी अ‍ॅड एजन्सीकडून मिळालेली एक मस्त जाहिरात आणि ह्या असल्या इमोशनल अ‍ॅड बनवून उगाच तो कॅमेरा गिर्‍हाइकाच्या गळ्यात मारण्याचं कॅमेरा कंपनीचं साधं सोपं गणित आहे असं वाटायचं. जसं ते मदर्स डे, फादर्स डे आणि आणखी कुठले कुठले 'र्स' डेज त्या आर्चिज, हॉलमार्क वाल्यांकडून आपल्यावर लादले जातात ना अगदी तसंचं. पर नाय बा !! हे प्रकरण काहीतरी वेगळंच होतं. लेकाचं ते हळूहळू, सांभाळत, हळूच बिचकत, धडपडत पावलं टाकणं हा एक सर्वस्वी नवीन अनुभव होता. एक(चि)दंत सारखाच. मी मनोमन त्या कॅमेरा कंपनीची माफी मागितली आणि त्या अ‍ॅडगुरुच्या कल्पकतेला जबरदस्त दाद दिली. "लग्न पहावं करून", "घर पहावं घेऊन" सारखंच "बाप पहावं होऊन" असं जे कोणीतरी म्हटलंय ते किती खरं आहे याची सार्थकता मला पटली. आणि कोणीही म्हटलं नसेल तर या 'बाबा हेरंबानंदांनीच' ते म्हटलं आहे असं त्यांचे भक्तगण (आणि वाचकगण) खुशाल समजू शकतात... नाही समजाच !!

होता होता पहिल्या पावलांचं कौतुक सरू लागलं होतं. म्हणजे ते नित्याचंच झालं होतं किंवा नव्याचे नऊ दिवस सरले होते म्हणून नाही पण बघता बघता त्या पावलांचं क्षितीज विस्तारू लागलं होतं. (आई ग.. चुकून लळित कादंबरीत शिरलो.).. सोप्पू भाषेत सांगायचं तर पूर्वी रांगत येणार्‍या बाळराजांना आता रांगण्यामुळे येणार्‍या अडथळ्यांची पर्वा करायची गरज उरली नव्हती. त्यामुळे अडखळत्या पावलांनी का होईना पण त्यांचा घरभर मुक्त विहार सुरु झाला. मग डायनिंग टेबलजवळ जाऊन चौड्यावर उभं राहून टेबलवरून अंदाजाने हात फिरवणं सुरु झालं, हाताला काहीच लागलं नाही तर टेबलक्लॉथ खेचण्याचे प्रयत्न करून झाले, गॅसच्या बटणांना बोटांची टोकं जेमतेम पोचत असल्याने ती फिरवण्याचे प्रयत्न करून झाले, आंघोळीला गेलो की मागोमाग येऊन बाथरूमच्या बाहेर गाण्या-बजावण्याचे म्हणजे राग 'किरकिर' गाण्याचे आणि बाथरूमचं दार बाहेरून 'बजावण्याचे' कार्यक्रम झाले, ड्रेसिंग टेबलचे ड्रॉवर उघडायचे प्रयत्न करून झाले, ते चुकून माकून उघडले गेलेच तर त्यातल्या वस्तू बाहेर फेकण्याचे प्रयोग करून झाले. तर कौतुक सरू लागलं होतं ते या अर्थी. त्याची जागा उगाच टेन्शनने किंवा त्याच्या मागे कराव्या लागणार्‍या धावपळीने आणि त्यामुळे होणार्‍या दमछाकीने घेतली. थोडक्यात मला आडवा आणि उभा किंवा एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस थोडक्यात हॉरीझॉण्टल आणि व्हर्टिकल यांच्यामधला फरक एवढा सोदाहरण स्पष्ट करून सांगणारा महागुरु आजवर भेटला नव्हता आणि या बळीराजाला तो फरक आम्हाला समजावून द्यायला तीन पावलंही लागली नाहीत.


हल्ली मी आनंदाने पिझ्झा खातो आणि तोही विथ एक्स्ट्रॉ चीज.. पनीरच्या भाज्या, आईसक्रीम्स, पावभाजीवर एक्स्ट्रॉ बटर हे सगळं अगदी बिनधास्त चालू असतं. पूर्वी माझ्या पोटाकडे बघून हसणारे, माझ्या फिटनेसची खिल्ली उडवणारे माझे मित्र हल्ली दबून असतात. "याच्या फ्लॅटस्क्रीन पोटाचं रहस्य काय, कुठल्या जिमला जातो हा" असले प्रश्न त्यांच्या चेहर्‍यावर थुईथुई नाचताना दिसतात मला. पण मी त्यांच्याकडे विशेष लक्ष न देता माझ्या फिटनेस ट्रेनरचं गुपित हे गुपितच ठेवतो. एकीकडे "आज टेबलावरून पडून काय काय फुटलं असेल" असा विचार करत करत..  !!

Wednesday, March 17, 2010

डोसा : भाग ३ (अंतिम)


"नाही. अहो तसं नाही. मी गेल्यावेळी आलो होतो तेव्हा पण हा माणूस इथे होता. त्याच्याबरोबर अशीच २-३ मुलं होती. आज पण ३ मुलं आहेत. पण वेगळीच आहेत ती. गेल्यावेळेसची नाही. कोण आहे हा माणूस? कोण आहेत ती मुलं ? काय प्रकार आहे हा सगळा?"
त्याने मला थोडं बाजूला नेलं आणि बोलू लागला "सर त्याचं नाव शांताराम.....
-----------------------------------------

"सर त्याचं नाव शांताराम.. इथेच पलिकडच्या बिल्डिंगमध्ये वॉचमनचं काम करतो. विदर्भाकडचा आहे. थोडी शेती होती गावात पण दुष्काळाने काही पिकेना. डोक्यावर कर्ज चढत होतं. दोन मुलं, एक लहान मुलगी आणि बायको घरी. त्यांच्या तोंडात काय घालायचं या विचाराने तो दिवसेंदिवस हतबल होत होता. तशात दोन वर्षांपूर्वी बायको साध्या थंडीतापाने गेली. हा आणखीच विवश झाला. मुलांची उपासमार बघवेना. काही झालं तरी इतरांसारखं जीवाचं काही बरंवाईट करायचं नाही हे नक्की ठरवलं होतं त्याने.  म्हणून मग एक दिवस गुपचूप सगळं सोडून मुलांना घेऊन मुंबईला निघून आला. गाडीतून उतरला तेव्हा पोटात अन्नाचा कण नव्हता. रात्रीची वेळ होती. छोटीला भूक सहन होईना. ती काहीतरी खायला द्या म्हणून मागे लागली. रडायला लागली. खिशात फक्त दोन रुपये होते. त्या दोन रुपयात या अशा आडवेळी इथे काय मिळेल हे त्याला कळेना. सगळ्यांची सोय होणार नाही हे तर नक्की होतं. पण निदान छोटीची तरी भूक भागेल असं काहीतरी आणायला म्हणून तो तिथून बाहेर पडला. निघताना मुलांना सांगितलं की इथून हलू नका आणि छोटीवर लक्ष ठेवा. परिसर ओळखीचा नसल्याने त्याला कुठे जावं ते कळेना. तो चालत चालत थोडा लांब गेला. बरंच लांब चालल्यावर त्याला रस्त्यात एक डोश्याची गाडी दिसली. त्याने गाडीवाल्याच्या हातापाया पाडून कसाबसा एक छोटा दोन रुपयाचा डोसा मिळवला. तो सदर्‍याच्या खिशात कोंबून तो परत यायला निघाला तर त्याला लांबून फटाक्यांचे आवाज ऐकायला आले. कसले फटाके आहेत ते कळेना म्हणून तो त्या दिशेने बघायला लागला. पुन्हा आवाज आल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे सध्यासुध्या फटाक्यांचे आवाज नाहीत. कसल्याशा भीतीने तो जोरात धावायला लागला. पण तेवढ्यात अचानक सगळीकडे आरडाओरडा झाला. दोन दिवसांचा उपाशी, धाव धाव धावलेला, मनातली अनामिक भीती आणि त्यात हा भयंकर आरडाओरडा, किंकाळ्या या सगळ्यामुळे त्याला अचानक गरगरल्यासारखं झालं. डोक्यावर हात घट्ट दाबून ठेवून तो अचानक जमिनीवर कोसळला.

नंतर शुद्ध आली तेव्हा मध्ये किती वेळ गेला ते त्याला कळेना. अंगात असलेलं बळ कसंबसं एकवटत तो स्टेशनच्या दिशेने धावला. आतलं दृश्य भयानक होतं. सगळीकडून धूर, आरडाओरडा, किंचाळ्या, कण्हण्याचे आवाज  येत होते. सगळीकडे सामान विखुरलं होतं, रक्त सांडलं होतं. हा कसाबसा आत शिरला. नजर इकडेतिकडे भिरभिरत होती. अचानक तो थबकला. एका कोपर्‍यात त्याच्या बायकोने स्वतःच्या हाताने शिवलेली पिशवी त्याला दिसली. आणि आजूबाजूलाच त्याच्या तीन पोरांची निष्प्राण शरीरं पडली होती."

मी उभ्या जागी हादरत होतो. आतून फुटत होतो. माझं एकंदर रूप बघून त्याने मला चटकन थंड पाणी दिलं प्यायला. आणि पुढे बोलायला लागला.

"त्या दिवसापासून तो वेड्यासारखा भटकत राहिला. भटक भटक भटकला. गावी परत जाण्यात तर काही अर्थ नव्हता. भीक मागणार्‍यातला तो नव्हता. मग तो हळूहळू काम शोधायला लागला. जे मिळेल ते, जिथे मिळेल तिथे. असं करता करता एक दिवस समोरच्या बिल्डिंगमध्ये काम मागायला आला. तिकडे त्याला रखवालदाराची नोकरी मिळाली. दर शुक्रवारी पगार व्हायचा. पगार कमीच होता आणि सुट्ट्याही नव्हत्या. पण त्याला काही फरक पडत नव्हता. त्याची फक्त एकच अट होती की पगार झाल्यावर त्या दिवशी त्याला ४ तासाची सुट्टी हवी होती. बस इतकंच."

"ते कशासाठी?" मी उरलीसुरलेली सगळी ताकद एकवटून अगदी अस्पष्टसं पुटपुटलो.

"तो दर शुक्रवारी पैसे मिळाले की व्हीटीचा प्लॅटफॉर्म गाठतो. तिकडे एक फेरफटका मारतो. तिकडे उभ्या असलेल्या गरीब भिकारी किंवा गोळ्या, पिना, शिट्ट्या, फुगे विकणार्‍या मुलांना भेटतो. त्यातून त्याच्या मुलांच्या साधारण वयाची दोन मुलं आणि त्याच्या मुलीच्या वयाची मुलगी निवडतो. कधी पैसे असतील तर त्यांना नवीन कपडे घेऊन देतो. आणि नंतर त्यांना घेऊन इकडे येतो. पैसे नसतील तर तिथेच त्यांना सार्वजनिक नळावर न्हाऊ माखू घालून त्यांना इकडे घेऊन येतो खायला. बाकी काहीही मागवलं नाही मागवलं तरी त्याची एक डिश ठरलेली असते आणि ती म्हणजे डोसा. डोसा आला की आपल्या हाताने तो मुलीला भरवतो. आणि इतर मुलांनाही जे हवं असेल ते मागवतो. तो स्वतः एका पदार्थालाही स्पर्श करत नाही. मुलं जेवत असतात तेव्हा त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत रहातो. मधेच त्याच्या मुलांच्या आठवणीने हेलावून जातो आणि आकाशाकडे किंवा इथेतिथे अर्थहीनपणे बघत राहतो."

त्याच्या त्या मध्येच कौतुकाने आणि मधेच शून्यात बघण्याचं कारण माझ्या अंगावर अक्षरशः कोसळलं.

"आणि तुम्हाला हे सगळं कसं माहित?"

"हा माणूस बरेच दिवस वेगवेगळया मुलांना घेऊन येतो आणि सारखे डोसे मागवतो हे माझ्या लक्षात आलं होतं. पण म्हटलं असेल काहीतरी आपल्याला काय. एकदा असाच तो आला होता आणि निघताना बिल भरण्यावरून काहीतरी भांडण झालं. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो अगदी काकुळतीला येऊन सांगत होता की माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी इथे नेहमी येतो. दर शुक्रवारी येतो. पुढच्या शुक्रवारी येईन तेव्हा नक्की पैसे देईन. पुढच्या आठवड्यात जास्त काम करून किंवा मालकांकडून थोडे पैसे उधार घेऊन मी पैसे नक्की फेडेन असं अगदी कळकळीने सांगत होता. शेवटी वेटरने मला बोलावलं. मीही त्याला दर शुक्रवारी बघत असल्याने चेहरा तसा ओळखीचा होता. म्हटलं काय झालं? का देत नाही आहात तुम्ही पैसे. त्याने आधी वेटरला सांगितलं होतं तेच सगळं मला पुन्हा सांगितलं. मग माझंही कुतूहल तुमच्यासारखंच जागृत होत गेलं. म्हणून मग मीही त्याला ही मुलं कोण, कुठली, तुझी कोण, तू इथे दर शुक्रवारीच का येतोस, आणि नेहमी डोसाच का मागवतोस असे सगळे मला इतके दिवस पडलेले प्रश्न विचारले. त्याचा बांध फुटला. तो हमसून हमसून रडायला लागला आणि एकेक करत त्याने मला सगळं सांगून टाकलं."

"..."

"तेव्हापासून आम्ही त्याच्याकडून पैसे घेत नाही. पण तो ऐकत नाही. जेवढे असतील तेवढे सगळे पैसे तो देतोच. दरवेळी नवीन नवीन मुलांना घेऊन येतो त्यांना न्हाऊ माखू घालतो, कपडे घेतो आणि पोटभर खाऊ घालतो. जवळपास वर्षभर चालू आहे हे असं."

आतापर्यंत कसबसं रोखून धरलेलं पाणी डोळ्यातून वाहायला लागलं. मी धडपडतच माझ्या टेबलजवळ गेलो. उन्मेष आणि छकुलीला पोटाशी घट्ट कवटाळून धरलं. आणि डोळ्यातून वाहणार्‍या पाण्याची फिकीर न करता बराच वेळ तसाच बसून राहिलो. टेबलावरच्या डिशमध्ये मला एक न खाल्लेला डोसा निपचित पडल्यासारखा वाटला !!

-- समाप्त

Tuesday, March 16, 2010

डोसा : भाग २

भाग १ इथे वाचा

काय हे !!!. काय करत होतो मी !!! कोण कुठला तो माणूस ज्याच्याबिषयी मला एक अक्षरही माहित नव्हतं त्याला आणि त्याच्या मुलांना मी सरळसरळ गबाळं बनवून टाकलं होतं. क्षणभर ओशाळलो मी. पण खरंच ती मुलं म्हणावीत तर तीही अशीच अस्वच्छ आणि मळक्या कपड्यांमधलीच होती. ज्यांना घालायला धड कपडे नाहीत असे लोकं या असल्या हॉटेलमध्ये येऊन पन्नास रुपयांचा डोसा कसा खाऊ शकतात याबददल मला राहूनराहून कुतूहल वाटत होतं.

---------------------------------

"बाSSबाSS, कर ना" उन्मेष.
"अरे का ओरडतोयस? काय करू?"
"अरे छकुलीने तुला दोनदा सांगितलं आईला फोन कर म्हणून, तिला विचार ती कधी येत्ये म्हणून. तर तुझं लक्षच नाही."
"अरे सॉरी करतो आत्ता लगेच फोन. मी जरा ऑफिसच्या कामाचा विचार करत होतो."
फोनवर बायकोचं अपेक्षित उत्तर मिळाल्याने आम्ही हॉटेलमधून निघालो. तिला घरी पोचायला पहाट होणार होती. नंतर विकेंडची कामं, खरेद्या यात वेळ गेला आणि नंतर सुरु झालेला नेहमीसारखाच धावपळता आठवडा यात मी तो प्रसंग पूर्णपणे विसरून गेलो.

**

गुरुवारी रात्री अभ्यास चालू असताना छकुलीने पुन्हा विषय काढला.
"आई, उद्या जाऊयाना पुन्हा हॉटेलात. तू पण यायचंस यावेळी. सगळेजण जाऊ."
"बघू ते... तू आधी तुझा अभ्यास संपव."
"आंSS .. नाही ना... आधी सांग"
"सांगितलं ना बघू म्हणून.... राजा मला खरंच वेळ नाहीये ग."
"जा.... तू उद्या येणार नसशील तर मी अभ्यासच नाही करणार."
"ए त्याचा आणि अभ्यासाचा काय संबंध?"
"नाही नाही नाही.... नाहीच करणार मी अभ्यास."
मायलेकीचा प्रेमळ संवाद भलत्याच दिशेने चाललेला बघून मी मध्ये पडलो.
"बरं उद्या जाऊया. उद्या आई येईल नक्की."
"अरे पण"
मी नुसती डोळ्याने खुण केली तिला गप्प बसण्याची. चिरंजीव उगाचंच हसल्यासारखे वाटले मला पण मी दुर्लक्ष केलं. दोन्ही पिल्लं पुन्हा अभ्यासात रमल्याचं पाहून सौ. ने खुण करून मला किचन मध्ये बोलावलं.
"अरे मी तुला संध्याकाळीच सांगणार होते की मला उद्याही ऑफिसमध्ये बसायला लागणार आहे. उद्याची क्लायंट मीटिंग तर अजून भयंकर होणार आहे. गेल्यावेळी आयत्यावेळी बसायला लागलं म्हणून सगळ्यांनी बडबड केली म्हणून पीएमने आज सकाळीच इंटर्नल मीटिंगमध्ये सांगून टाकलं की Friday will be an all-nighter. आणि कदाचित रविवारी पण जावं लागेल. मी तुला संध्याकाळी सांगणारच होते पण तू नुकताच ऑफिसमधून आलेलास तेव्हा तुझा मूडऑफ नको म्हणून नंतर सांगू म्हटलं."
"हो ना आणि तेवढ्यात मी नेमका माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला." मी हसत म्हणालो. तीही हसली आणि सॉरी म्हणाली.
"पण आता छकुलीला कसं सांगायचं? आता उद्या मी आले नाही तर तिला वाटेल तिने अभ्यास करावा म्हणून आपण खोटं खोटं सांगत होतो असं."
मी म्हटलं "मी बघतो काय करायचं ते"
अभ्यास आणि जेवणं झाल्यावर रात्री झोपायच्या वेळी मी छकुलीला समजावून सांगितलं की आईला उद्या पण काम आहे ऑफिसमध्ये त्यामुळे ती आपल्याबरोबर हॉटेलमध्ये येऊ शकणार नाही. पण आपण नक्की जाऊया. ती आधी थोडी हिरमुसली पण नंतर तयार झाली. आईने आपल्याला न येण्याबद्दल गेल्यावेळसारखं आयत्यावेळी न सांगता आधीच सांगितलं या विचाराने तिला थोडं बरं वाटलं.

**

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी पुन्हा आम्ही तिघेच जण हॉटेलमध्ये पोचलो. पण यावेळी छकुली आणि उन्मेष सुद्धा थोडे खुशीतच होते. एक तर लागोपाठ दुसर्‍या शुक्रवारी हॉटेलमध्ये जेवायला जात होतो आणि दुसरं म्हणजे यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत आईची वाट बघायला लागणार नव्हती. मी ऑफिसमधून येऊन फ्रेश झाल्यावर आम्ही लगेच निघालोही होतो.

"काही झालं तरी तुला यावेळी डोसा मिळणार नाही" असं मी बजावून सांगितल्याने छकुलीने "त्या दादाला सगळं हवं ते देता तुम्ही लोकं आणि मला मात्र नाही" अशी कटकट करत नाइलाजानेच इडली मागवली होती. आमच्या ऑर्डर्स येईपर्यंत मी जरा रेस्टरूमला जाऊन यावं अशा विचाराने उठलो. दोघांनाही जाग्यावरून न उठण्याविषयी सांगून आणि उन्मेषला छकुलीवर लक्ष ठेवायला सांगून मी रेस्टरूमच्या दिशेने निघालो. वाटेत माझी पावलं थबकली. मला पुन्हा तो गेल्या वेळचा गबाळा परिवार दिसला. पण आज जरा बरे वाटत होते सगळे जण. तो माणूस दाढी बिढी करून, स्वच्छ कपडे घालून आला होता. मुलंही जरा बर्‍या कपड्यात दिसत होती यावेळी. पण त्यांची खाण्याची पद्धत जवळपास तशीच होती. त्याच्या डोळ्यातले कौतुकाचे भाव, मधेच शून्यात बघणं हे सारं सारं जसंच्या तसं होतं. पण अचानक मला काहीतरी जाणवलं. ती गेल्या वेळी डोसा खाणारी मुलगी थोडी वेगळी दिसत होती. गेल्यावेळी तिचे केस अगदी लहान होते. पण यावेळी मात्र चांगले मोठे दिसत होते. मी इतर दोन मुलांकडेही बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की खाण्याची पद्धत आणि वयं सारखीच असली तरी ही तिन्ही मुलं गेल्या वेळच्या मुलांपेक्षा वेगळी होती. माणूस तर तोच वाटत होता. नाही नक्की तोच होता. मग ही नवीन तीन मुलं कोण? की याला सहा मुलं आहेत? आणि याची बायको कुठे आहे वगैरे प्रश्नांनी मला त्या दोन मिनिटांत घेरून टाकलं. तेवढ्यात एका वेटरने त्या टेबलवर बटर नान ठेवली आणि जायला लागला. मी त्याला खुण करून बोलावलं आणि विचारलं "कोण आहे रे हा माणूस?"
"आपल्याला काय माहित साहेब. त्याने अजून एक बटर नानची ऑर्डर दिली, आपण दिली बटर नान. आता तो कोणीका असेना"
"अरे तसं नाही. तुझ्या मॅनेजरला बोलाव."
"का साहेब उगाच मॅनेजरला बोलावताय. मी काय केलं. तुम्ही जे विचारलत त्याचं मला जेवढं माहिती आहे तेवढं उत्तर दिलं. माझं काय चुकलं? उगाच मॅनेजरला कशाला बोलावताय?"
"अरे बाबा, तुझ्यासाठी बोलवत नाहीये मॅनेजरला. मला त्या माणसाबद्दल विचारायचं आहे." असं सांगितल्यावर हायसं वाटून त्याने मॅनेजरला बोलावलं.

काही क्षणात स्वच्छ गणवेशातला एक मध्यमवयीन हसतमुख गृहस्थ माझ्यासमोर उभा राहिला.

"गुड इव्हिनिंग सर. काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का? काही हवंय का आपल्याला?"
मी म्हटलं "हो. मला माहिती हवीये त्या माणसाबद्दल. कोण आहे तो. ती मुलं कोण आहेत?" मी माझं कुतूहल वाढवत नेणार्‍या त्या माणसाकडे हलकंच बोट दाखवलं.
"तो काही बोलला का तुम्हाला?"
"नाही"
"मग त्या मुलांनी काही त्रास दिला का?"
"नाही. अहो तसं नाही. मी गेल्यावेळी आलो होतो तेव्हा पण हा माणूस इथे होता. त्याच्याबरोबर अशीच २-३ मुलं होती. आज पण ३ मुलं आहेत. पण वेगळीच आहेत ती. गेल्यावेळेसची नाही. कोण आहे हा माणूस? कोण आहेत ती मुलं ? काय प्रकार आहे हा सगळा?"
त्याने मला थोडं बाजूला नेलं आणि बोलू लागला "सर त्याचं नाव शांताराम.....

-- क्रमशः

- भाग ३ अर्थात अंतिम भाग इथे  वाचा.  

Monday, March 15, 2010

डोसा : भाग १

पहिल्याच रिंगला मी मोबाईल उचलला आणि थोडंसं वैतागूनच विचारलं.

"अग आहेस कुठे? कधीची वाट बघतोय आम्ही.. पोरं तर बिचारी कंटाळून गेली."
"अरे काय सांगू. क्लायंट मीटिंग एवढी लांबली ना की बस. आणि त्यांना मिटींगमध्ये सांगितलेले चेंजेस आजच्या आज करून हवेत."
"काय आत्ता? तुझ्या साहेबाला घड्याळ कळतं ना?"
"प्लीज रागावू नकोस"
"सॉरी. उगाच चिडलो तुझ्यावर. पण मग आता काय करायचं?"
"एक काम करा. तुम्ही पुढे व्हा. मुलं तयार होऊन बसलीयेत. हॉटेलमध्ये जायचं ठरल्यावर ती आता घरी जेवणार नाहीत. तासा-दोन तासात माझं काम संपलं तर मी थेट हॉटेललाच येते."
"बरं. लवकर निघा"
"हो"

**

तिने हो म्हणून फोन ठेवला असला तरी कितीही प्रयत्न केला तरीही तिला हॉटेलला येता येणार नव्हतं हे आम्हाला दोघांनाही चांगलंच माहित होतं.
फोन ठेवल्या ठेवल्या शेंडेफळाने--उर्वी-वय-वर्षं-५-ने-- विचारलं "काय म्हणाली आई?"
"काय म्हणाली काय? ऐकलं नाहीस का? आई येणार नाहीये. त्यामुळे हॉटेल कॅन्सल" उन्मेष रागाने डाफरला.
हा तिच्यापेक्षा तीनच वर्षांनी मोठा असूनही एवढा आगाऊपणे का वागतो कधीकधी असा नेहमीचा प्रश्न मला पुन्हा पडला. मी लगेच सावरून घेत म्हंटलं. "असं काही नाहीये. आपण जातोय हॉटेलमध्ये".
"खर्र्रर्रच?" उर्वी चित्कारली. तिला हॉटेलमध्ये जाणं महत्वाचं होतं. कोण येतंय आणि कोण नाही याच्याशी तिला विशेष कर्तव्य नव्हतं.
"आईशिवाय?" उन्मेषचं मातृप्रेम नको तेव्हा उफाळलं.
"आईशिवाय नाही. आईही येणारे. पण थोडी उशिरा. आईनेच सांगितलंय आपल्याला पुढे व्हायला. ती मागाहून येईल."
उन्मेषला ते विशेष पटल्याचं दिसत नव्हतं पण उर्वीचं तर लक्षच नव्हतं. ती दरवाजाकडे पळालीही होती.
गाडी पार्क करून हॉटेलमध्ये शिरेपर्यंत ९ वाजून गेले होते. शुक्रवार असल्याने गर्दीही चांगलीच होती. पण तरीही २०-२५ मिनिटात म्हणजे गर्दीच्या मानाने लवकरच टेबल मिळालं आम्हाला.
"काय खायचंय?" असं विचारल्यावर उर्वी नुसती हसायला लागली.
"नाही हं छकुली. आज डोसा नाही. दरवेळी पेपर डोसा मागवतेस आणि निम्मा पण नाही संपवत. आम्हालाच संपवायला लागतो.
"आं. मला डोसाच पाहिजे. आज संपवेन मी सगळा. आणि उरला तर आई खाईल."
"आईने खायचा असेल तर घरी न्यायला लागेल." चिरंजीव
"का? ती येणारेना इकडे?" छकुली
"गप रे तू... का उगाच तिला त्रास देतोयस? हो.. आई येणारे इकडे. तोवर जेवढा जाईल तेवढा डोसा खा तू. उरलेला आई खाईल."
चिरंजीवांसाठी चीज पावभाजी आणि चॉकलेट मिल्कशेक, छकुलीसाठी डोसा आणि स्ट्रॉबेरी आईसक्रीम आणि माझ्यासाठी बिर्याणी आणि पेप्सी मागवून झाल्यावर मी सहजच इकडे तिकडे नजर टाकली. मित्रमैत्रिणी, नवीनच लग्न झालेली कपल्स, काही ठिकाणी नुसतीच कॉलेजची गँग आणि काही ठिकाणी आमच्यासारखे सहकुटुंब आलेले लोकं यांनी हॉटेल नुसतं भरून गेलं होतं.
थोड्या वेळाने आमची ऑर्डर आमच्या टेबलवर विराजमान झाली. आम्ही सुरुवात करेपर्यंत चिरंजीवांचा पहिला पाव मटकावून झालाही. मी बिर्याणीचा घास घेईपर्यंत पुन्हा छकुलीच्या हसण्याचा आवाज आला.
"आता काय झालं ग तुला हसायला? पटापटा खायला लागा. मग गार झाला की म्हणशील मला नको म्हणून."
तरी ती हसतच होती.
"उर्वी... !"
आमच्या शेजारच्या टेबलकडे बोट दाखवत ती म्हणाली "बाबा बघ ना ती कशी खात्ये."
मी त्या दिशेने मी बघायला आणि त्या टेबलवरच्या माणसाने आमच्याकडे बघायला एकच गाठ पडली. मी पटकन तिचा हात खाली केला आणि त्याच्याकडे बघून ओशाळसं हसलो. पण सुदैवाने त्याचं आमच्याकडे लक्ष नव्हतं. तो आमच्यातून आरपार बघत असल्यासारखा कुठेतरी पहात होता.
"छकुली, अशी बोटं नाही दाखवायची कोणाकडे... किती वेळा सांगितलंय तुला..... कोणीही कसंही जेवूदे......... आपल्याला काय... तू लक्ष नको देऊ.... चल जेव पटापट......." मी जरा ओरडल्यावर उर्वी शांतपणे मान खाली घालून जेवायला लागली.

**

तिला शांत बसायला लावल्यावर ती कोणाकडे बघून हसत होती हे पहायचा मोह मला आवरेना. दोन्ही मुलं जेवणात गुंग आहेत असं बघून मी हळूच माझी मान शेजारच्या टेबलाकडे वळवली. माझ्याच वयाचा किंवा माझ्यापेक्षा फार तर २-३ वर्षांनी मोठा असलेला तो मगासचा माणूस, त्याच्याशेजारी एक १०-१२ वर्षांचा मुलगा आणि समोर साधारण आमच्याच चिरंजीव आणि कन्यकेच्या वयाचे एक मुलगा आणि मुलगी बसले होते. म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करणारी आमची सौ एकमेव नव्हती तर. बाकीही बर्‍याच बॉसेसना त्यांच्या हाताखाली काम करणार्‍यांच्या पर्सनल लाईफविषयी विचार करण्याची गरज वाटत नव्हती. माझ्या डोळ्यासमोरून वपुंच्या पार्टनरमधला आगरकरांबरोबरचा संवाद तरळून गेला. तेवढ्यात माझं लक्ष त्या मुलीकडे गेलं. मी उर्वीला ओरडलो खरा पण ती मुलगी खरंच खूप विचित्र जेवत होती. तिने पण पेपर डोसाच मागवला होता बहुतेक. पण तो दहा ठिकाणी सांडला होता.तिचे हात सांबार, चटणीने नुसते माखले होते. चेहर्‍याला ठिकठिकाणी सांबाराचे डाग पडले होते. हळू हळू माझं लक्ष बाकीच्या दोन मुलांकडे गेलं. त्यांचीही परिस्थिती विशेष वेगळी नव्हती. वेगवेगळे पदार्थ मागवून, ते अर्धवट खाऊन टाकून, ठिकठिकाणी सांडून ठेवून त्यांचं मनसोक्त खाणं चाललं होतं. माझ्या मुलांनी असं काही केलं असतं तर मी कसला वैतागलो असतो. हा माणूस यांना काही बोलत कसा नाही म्हणून मी त्याच्याकडे नजर वळवली. बघतो तर उलट तो त्या तिघांकडेही अगदी प्रेमाने बघत होता. काय हवं नको विचारात होता. मधेच कधीतरी तो शून्यात कुठतरी बघे मगाशी माझ्यातून आरपार बघितलं होतं तसा. पण क्षणभरच. पुन्हा त्याच्या डोळ्यातून कौतुक बरसू लागे. मला जरा आश्चर्यच वाटलं त्याचं. अर्थात स्वतः दाढीचे खुंट वाढवून आलेल्या, अगदी मळके म्हणता येणार नाहीत पण अस्वच्छ् कपडे घातलेल्या, विसकटलेल्या केसांच्या गबाळ्या माणसाकडून त्याच्या गबाळ्या मुलांना काही शिस्त लागेल ही अपेक्षा ठेवणं वेडेपणाचंच होतं........  काय हे !!!. काय करत होतो मी !!! कोण कुठला तो माणूस ज्याच्याबिषयी मला एक अक्षरही माहित नव्हतं त्याला आणि त्याच्या मुलांना मी सरळसरळ गबाळं बनवून टाकलं होतं. क्षणभर ओशाळलो मी. पण खरंच ती मुलं म्हणावीत तर तीही अशीच अस्वच्छ आणि मळक्या कपड्यांमधलीच होती. ज्यांना घालायला धड कपडे नाहीत असे लोकं या असल्या हॉटेलमध्ये येऊन पन्नास रुपयांचा डोसा कसा खाऊ शकतात याबददल मला राहूनराहून कुतूहल वाटत होतं.

-- क्रमशः

- भाग २ इथे  वाचा. 

अजून एक ...

ह्म्म्म.. आतषबाजी आत्ताच संपली असेल. सगळे आता जमले असतील बोर्डस् आणि बॅनर्स तयार करायला. तसंच उद्याच्या घोषणा तयार झाल्या असतील. त्या म्हणून, घोकून झाल्या असतील. रस्ते, महत्वाचे चौक आता साफ करून झाले असतील. रांगोळ्या काढायलाही सुरुवात होईल आता. कितवं वर्षं बरं हे सगळं असं लांब बसून आठवण्याचं? हम्म ६-७ तरी नक्की झाली. :-( .. 


दिवाळीचे फटाके आणि फराळ नसल्याने, गणपतीच्या आरत्या आणि विसर्जनाच्या मिरवणुका नसल्याने, होळीची, धुळवडीची बोंबाबोंब आणि रंगरंगोटी नसल्याने गुढीपाडव्याचं आकर्षण वाटण्याचं कधीच काहीच कारण नव्हतं पूर्वी. उलट या सगळ्यांच्या मानाने तो सोबर सण. म्हणजे सकाळी लवकर उठा, गुढी वगैरे उभारा, मोठ्या माणसांच्या पाया पडा, श्रीखंड/बासुंदी वगैरे जे पक्वान्न घरी असेल ते खा. झालं !! पुढे काय? काSSही नाही. तर त्यामुळे गुढी पाडवा हा आवडत्या सणांच्या यादीत कधीच नव्हता. पण साधारण दहा-बारा (चू भू दे घे) वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या 'गणेश मंदिर संस्थान प्रतिष्ठान' च्या डोक्यातून एक असामान्य कल्पना जन्माला आली. ती म्हणजे 'नववर्ष स्वागत यात्रेची'. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बिनआवाजी फटक्यांच्या आतषबाजीने नववर्ष स्वागताची सुरुवात करून गुढी पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे डोंबिवलीतल्या सगळ्या सामाजिक, सांस्कृतिक संस्था, युवकवर्ग यांनी मोठ्या संख्येने भागशाळा मैदानात उपस्थित रहायचं आणि तिथून ही स्वागतयात्रा पूर्ण डोंबिवलीभर फिरणार अशी ही कल्पना. प्रत्येक संस्था त्या यात्रेतून काहीना काही विषय मांडण्याचा प्रयत्न करणार, पथनाट्य बसवणार, गीतं बसवणार, त्यासाठीचे बॅनर्स, घोषणा तयार करणार आणि जनजागृती करायचा प्रयत्न करणार अशी साधारण योजना होती. पहिल्याच वर्षी स्वागतयात्रेला अपूर्व सहभाग लाभला आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. यात्रेवर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, नंतर तर आठवडाभर चालणारे असे कार्यक्रम अशी एकेक चढती पायरी होती. हा हा म्हणता हे स्वागतयात्रेचं लोण ठाणे, दादर, गिरगाव, वाशी, पनवेल, नाशिक, सातारा, (आणि चक्क :P) पुणे असं महाराष्ट्रभर पसरलं. आणि बघता बघता गुढी पाडवा माझ्या आवडत्या सणांच्या यादीमध्ये "टॉप-३" स्थानांत विराजमान झाला.

आमच्या संस्थेने गेल्या वर्षी मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करणारं पथनाट्य बसवलं होतं. (मी नाहीये त्यात :( ) ...  ते खाली चिकटवतोय..



आणि तूर्तास तरी त्या सार्‍या घोषणा इथूनच !!

"जयजयजयजय जय भवानी,जयजयजयजय जय शिवाजी"
"भार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रत माता की जSSSSSSSSय"
"वंदेSSSSSS मातरम् !!!!! "

सर्वांना गुढी पाडव्याच्या, हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक, मन:पूर्वक शुभेच्छा !!!

Sunday, March 14, 2010

बोंब-ए-मराठी : अर्थात आझाद-ए-हिंदी - भाग २


खरं तर कुठल्याही लेखाचा दुसरा भाग लिहायला मला आवडत नाही किंवा लिहिता येत नाही.. पण हा लेख थोडासा अपवाद आहे असं म्हणू आपण... कारण हा लेख लौकिकार्थाने आझाद-ए-हिंदी चा भाग-२ आहेही आणि म्हंटलं तर नाहीही. भाग-२ आहे एवढ्यासाठी की हा लेखही मराठी-हिंदीतले शब्द, त्यांचे अर्थ/अनर्थ आणि एकूणच नातेसंबंध याच विषयावरचा आहे (म्हणजे निदान प्रयत्न तरी असाच आहे). पण भाग-२ नाही एवढ्यासाठी की हा लेख आझाद-ए-हिंदी सारखा मिश्कील, चुरचुरीत नसेल. कारण या विषयात चुरचुरीतपणा, खमंगपणाला वाव नाहीये. हे आधीच सगळं सांगून टाकलं की कसं बरं असतं.

आपण मराठीत असंख्य हिंदी शब्द घुसडून ठेवले आहेत किंबहुना आपण मराठी बोलतो तेही प्रचंड हिंदी ढंगाने आणि त्याउप्परही हे एवढं नेहमीचं सवयीचं झालं आहे की आपण चुकीचं मराठी बोलतोय हे आपल्या लक्षातही येत नाही. उगाच भाषा शुद्धीकरण, प्रत्येक हिंदी आणि इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधणे आणि रोजच्या वापरातले सोपे शब्द सोडून ते अवघड संस्कृतप्रचुर मराठी शब्द वापरण्याचा अट्टाहास करणे असा कुठलाही छुपा किंवा उघड हेतू हा लेख लिहिण्यामागे नाही. पण हे असं शब्द घुसडण्याच्या समर्थनार्थ "भाषा प्रवाही हवी, सर्वसमावेशक हवी, तरच ती वाढते, प्रगत होते" या असल्या चुकीच्या सबबी सांगून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला जातो ना त्याचा मला तिटकारा आहे. आता भाषा सर्वसमावेशक करायच्या नावावर काय चुकीचं मराठी बोलायचं सरळसरळ? एक मिनिट. मी 'अशुद्ध' म्हणत नाहीये 'चुकीचं' म्हणतोय. खूप मोठा फरक आहे दोन्हीत. कुठल्याही भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं असं माझं मत आहे. एखादी भाषा बोलणार्‍यांपैकी जास्तीत जास्त प्रमाणावर लोक ज्या प्रकारची भाषा बोलतात ती शुद्ध किंवा मूळ स्वरूपातली भाषा झाली असं माझं मत आहे. छापील स्वरूपातील भाषा लिहिण्या,बोलण्यात आणून तिलाच शुद्ध भाषा म्हणवून मोठ्या प्रमाणावरील लोकांना तुम्ही अशुद्ध बोलताय म्हणून हिणवणं हे मला मुळीच पटत नाही. मुठभर लोकांच्या हातात जर भाषा शुद्ध/अशुद्ध ठरवण्याच्या बाबतीतले निकष लावण्याची जवाबदारी दिली गेली तर अर्थातच ते स्वतः ज्या प्रकारची भाषा, उच्चार, शब्द वापरतात त्याला ते शुद्ध भाषा म्हणवणार आणि ते शब्द/उच्चार सोडून इतर कुठल्याही प्रकारची उच्चार, शब्द वापरणार्‍यांना अशुद्ध म्हंटलं जाणार हे तर सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे नव्हे हा सरळसरळ ढोंगीपणा आहे. 

शुद्ध-अशुद्ध वर एवढं पाल्हाळ लावण्याचं कारण म्हणजे मला 'अशुद्ध मराठी' आणि 'चुकीची मराठी' यातला फरक ढोबळमनाने समजावून सांगायचा होता. पुन्हा सांगतो, अशुद्ध मराठी असं काही नसतं पण चुकीची मराठी बोललेली तुम्हाला पावलोपावली आढळेल आणि तेही अमराठी जनांकडून नव्हे तर १००% मराठी लोकांकडून. ही चुकीची बोलली जाणारी मराठी म्हणजे हिंदीची किंवा काही प्रसंगी इंग्रजीची केलेली भ्रष्ट नक्कल आहे किंवा हिंदी/इंग्रजीतील शब्द तसेच्या तसे वापरून किंवा हिंदी शब्द मराठीत वापरताना अर्थ बदलला तरी तो शब्द तसाच पुढे रेटून मराठीची केली जाणारी गळचेपी आहे. तर या अशा शब्दांची यादी बघायच्या आधी अजून एक मुद्दा सांगतो तो म्हणजे या लेखाचा राज ठाकरे, मनसे किंवा त्यांची चळवळ, राडे यांच्याशी काहीही संबंध नाही. ही माझी वैयक्तित मतं आहेत. अजून एक म्हणजे मला थोडीफार खात्री आहे की हे सगळे शब्दप्रयोग चुकीचे आहेत हे बर्‍याचजणांना पटणार नाही पण... असो.

खूप सारं : खूप सारा/री हा मराठीमध्ये हिंदीतून आंधळेपाने आयात झालेला आणि प्रचंड वापरला जाणारा शब्द. हा 'खूप सारा/री' हिंदीतल्या 'ढेर सारा/री' वरून आलेला आहे. "आज मै ढेर सारे लोगोंसे मिला" हे हिंदी वाक्य बघून "आज खूप सार्‍या लोकांना भेटलो" असं आपण त्याला काही विचार न करता सरळसरळ मराठीत वापरतो. पण हिंदीत ते जेवढं अचूक आहे तेवढंच मराठीत चूक आहे. "आज मी खूप लोकांना भेटलो" म्हंटलं की झालं. त्या 'खूप' नंतर 'सार्‍या' ची गरज नाही.

दुनियाभरचं : "आज मुझे दुनियाभरका काम था" याचं वरच्या 'खूप सारं' प्रमाणे अंधानुकरण करून आपण मराठीत बोलताना "आज मला दुनियाभराचं काम होतं" असं बिनदिक्कतपणे म्हणून टाकतो. हे 'दुनियाभरका' हेही हिंदीत 'खूप' या अर्थानेच जातं. त्यामुळे मराठीत म्हणताना "आज मला खूप काम होतं" म्हंटलं की भा.पो.

गर्व-(अभिमान) : मला वाटतं जराही विचार न करता मराठीत जसाच्या तसा वापरला जाणारा हा हिंदी शब्द म्हणजे समस्त चुकीच्या मराठी शब्दांचा मेरुमणी आहे. याची मूळ गडबड अशी आहे की हे दोन्ही शब्द मराठी आणि हिंदी या दोन्हीत अस्तित्वात आहेत. पण दोन्ही शब्दांचे दोन्ही भाषांतले अर्थ एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. फार पूर्वीपासून हा चुकीच्या पद्धतीने मराठीत वापरला जात आहे आणि त्यात पुन्हा मांजरेकर साहेबांनी त्याला जी झळाळी प्राप्त करून दिली त्यामुळे तर प्रत्येक मराठी माणसाला तो शब्द चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी वापरण्याचं लायसन्सच मिळालं. मागेही यावर लिहिलं आहेच. पुन्हा थोडक्यात सांगतो. गर्व या शब्दाचा हिंदीतला अर्थ म्हणजे अभिमान आणि अभिमान या शब्दाचा हिंदीतला अर्थ म्हणजे गर्व. म्हणजे "गर्वसे कहो हम हिंदू है" मध्ये तो अभिमान या अर्थाने म्हणजे चांगल्या अर्थाने वापरला जातो आणि अमिताभ-जया वाल्या 'अभिमान' मध्ये तो गर्व या अर्थाने वापरला गेला आहे (कारण तोच त्याचा योग्य अर्थ आहे) हे आपण पाहिलंच आहे. गर्व या शब्दाकडे मराठीत दुर्गुण या अर्थाने कसं बघितलं जातं हे लक्षात घेण्यासाठी थोडं बालपणात डोकावून आपल्याला तेव्हा शिकवल्या गेलेल्या "गर्वाचे घर खाली" किंवा "'ग'  ची बाधा" या म्हणी आठवल्या तरी ते लक्षात येईल. अभिमान हा शब्द योग्य ठिकाणी वापरण्याचं एक उदाहरणं म्हणजे "मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे" हे. मी मराठी असल्याचा गर्व आहे असं म्हंटलं तर ते 'गर्वाचं घर खाली' सारखं वाटेल.

काहीतरी : "मुझे तुमसे कुछ कहना है" किंवा "I want to tell you something" वरून आपण मराठीत बोलताना तो प्रकार जसाच्या तसा उचलून असं म्हणतो की "मला तुला काहीतरी सांगायचंय". योग्य मराठी वाक्य हे असं असेल. "मला तुला एक सांगायचंय" किंवा "मला तुला एक गोष्ट सांगायचीये" .... आपण हे "मला तुला काहीतरी सांगायचंय" हे असलं धेडगुजरी मराठी इतक्या वेळा ऐकतो, वाचतो की त्यामुळे ते चुकीचं आहे असं आपल्याला वाटतच नाही. पण मराठीत 'काहीतरी' या शब्दाचा योग्य प्रयोग होतो तो फक्त "तो काहीतरी बडबडतोय" याअर्थी बोलताना. आता यापुढे आपण आपलं ठरवायला हवं की आपल्याला 'एक गोष्ट' सांगायचीये की 'काहीतरी' सांगायचंय.

कोणीतरी : हा 'कोणीतरी' म्हणजे 'काहीतरी' चा जुळा भाऊ. "त्यांच्याकडे 'कोणीतरी' आलंय" हे कोणी अनोळखी व्यक्ती आलीये हे सांगताना बोलणं ठीक आहे. पण "परवा आमच्याकडे एकजण (ओळखीचे) आले होते." असं सांगताना आपण "परवा आमच्याकडे कोणीतरी आले होते" असले शब्दप्रयोग सर्रास बघतो/ऐकतो. अशा वेळी मला त्यांना विचारावसं वाटतं की "अहो उगाच कोणीतरी अनोळखी व्यक्ती कशाला उगाच तुमच्याकडे येऊन बसेल?" असो.

घबराहट : परवा मटा मध्ये बातमी होती की म्हणे "बॉम्बच्या अफवेने तिथे 'घबराहट' उडून गेली." 'नवभारत टाईम्स' किंवा 'हिंदुस्तान टाईम्स' मधून एखाद्याला आणून थेट मटाची बातमी छापायला बसवलं असावं असं मला वाटून गेलं. मी तिकडे खाली जळजळीत प्रतिक्रियाही टाकली पण ती छापून आली नाही हेसांनल..

फसलो : हिंदीमध्ये फसलो/फसना हा शब्द अडकणे याअर्थी वापरला जातो. उदा. "ये कहा आके फस गया मै". पण मराठीत बोलताना "आज ऑफिसमध्ये एका रटाळ मीटिंगमध्ये खूप वेळ फसलो होतो मी" हे असलं विचित्र मराठी बोलायची काय गरज आहे??

माजवला : "शोर मचाया" "हल्लागुल्ला मचाया" चं कोणी "गोंधळ माजवला" किंवा "हैदोस माजवला" असं भाषांतर/स्वतंत्र वाक्य लिहिलं ना की असला वैताग येतो ना. "माजणे/माजाला येणे" या शब्दाचा योग्य अर्थ किती जणांना माहित असा प्रश्न उगाच निर्माण होतो डोक्यात. हैदोस हा घातला जातो माजवला जात नाही. निदान मराठीत तरी नाही.

आवाज दिला : "आवाज दो कहा हो" हे हिंदी हाक मारणं झालं तरी मराठीत हाक मारताना "त्याने मला आवाज दिला" असं का म्हणावं लागतं ते काही कळत नाही.

चालला गेलो : "गेलो" असं म्हणायच्या वेळी "चला गया" या हिंदी वाक्याचं सरळसोट भाषांतर करून "चालला गेलो" हा शब्दप्रयोग मी असंख्य ठिकाणी बघितला आहे.

वर सांगितलेले हे सगळेच्या सगळे चुकीचे शब्दप्रयोग प्रामुख्याने मराठी वृत्तपत्रं, मालिका (किंवा हिंदी/इंग्रजी जाहिरातींचं मराठीत केलं जाणारं अंध भाषांतर) यांत वेळोवेळी आढळतात यासारखं दुसरं दुर्दैव नसेल. आणि त्यामुळे आपोआपच ते सामान्य माणसाच्या बोलण्यातही वापरले जातात. वर दिलेली यादी ही फक्त एक सहस्त्रांश आहे असं मी म्हणेन. हल्ली मराठी मालिका बघणं (सुदैवाने) बंद झालं असल्याने अजून शब्द आत्ता आठवत नाहीयेत. पण जर चुकून एखादी मालिका बघायची वेळ आली तर असले शब्द वाक्यावाक्यागणिक खड्यासारखे लागतात आणि त्यातूनही जर सलग तासभर मालिका बघितल्या तर अजून १५-२० असे शब्द सहज येऊन टोचतात. आणि रोज मालिका बघितल्या तर यादीत अजूनअजून वाढ होत राहील. कारण प्रत्येक भागात नवनवीन चुकांचा भरणा असतोच. 

त्यामुळे कितीही चुकीचं मराठी कानावर पडलं तरीही आपण बोलताना जास्तीतजास्त योग्य/अचूक शब्द असलेलं मराठी बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा एवढंच म्हणू शकतो !

----

* हा लेख टाकून झाल्यावर काही तासांतच मटाने "मुंबई बचावली" असे अकलेचे तारे तोडलेले सागरने दाखवले. मी फक्त एक मोठ्ठा सुस्कारा टाकला !!! 

Friday, March 12, 2010

हरवले ते ... !!!

त्या विश्वसुंदर्‍यांच्या स्पर्धांमध्ये विचारतात ना की "बाई ग, इतिहासातली कोणती घटना तुला बदलायला आवडेल" तसल्या प्रश्नाच्या धर्तीवर जर मला कोणी ('विश्व-सुंदर'स्पर्धेत भाग घ्यायाला न लावता) विचारलं की "बाबा रे, तुला इतिहासात कुठली घटना अ‍ॅड करायला आवडेल" तर मी मध्यरातीच्या गाढ झोपेतून उठूनही सांगेन की "या शास्त्रज्ञांनी जे हे गाडी, टीव्ही, आय-पॉड, लॅपटॉप, मिक्सर, व्हॅक्युम क्लिनर असले जे (फुटकळ) शोध लावले आहेत ना त्यांच्या जोडीला (किंवा प्रसंगी त्यांच्या ऐवजी) अशा एखाद्या मशीनचा शोध लावूदेत की जे हरवलेल्या, नेहमी हरवणार्‍या, 'आत्ता तर इथे होता आता गेला कुठे' अशा विचारात आपल्याला टाकून गायब होणार्‍या वस्तू क्षणार्धात आपल्या पुढ्यात हजर करून ठेवेल. किंवा हे असलं मशीन तयार करणं त्यांना फार अवघड आणि आव्हानात्मक वाटत असेल तर गेला बाजार असं काहीतरी केलं पाहिजे की प्रत्येक वस्तूला अशी काहीतरी सोय असेल की जिच्यामुळे आपण जसा हरवलेला (पक्षि कुठे ठेवलाय ते आठवत नसल्याने सापडत नसलेला) मोबाईल शोधण्यासाठी दुसर्‍या मोबाईल वरून कॉल करतो तसा हरवलेल्या (मगासचा मोबाईलवाला कंस विसरू नका) वस्तूलाही मिस कॉल किंवा रिंग देता आली पाहिजे. हे असलं काही दुकानात मिळायला लागलं ना तर काय धम्माल येईल या नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शिरशिरी आली आहे. आणि हे असले काही प्रसंग घडले ना की मग तर मला माझ्या या लाडक्या, हव्याश्या वाटणार्‍या पण अस्तित्वात नसणार्‍या यंत्राची उणीव अतीवच तीव्रतेने जाणवते.

आता हे रिमोटच बघा. मला वाटतं रिमोट या वस्तूचा टीव्हीला (आणि त्यामुळे आपल्यालाही) कंट्रोल करण्यापेक्षा हरवण्यासाठीच जन्म झाला असावा. (सीडीज, पुस्तकं यांचा जन्म मित्रांना ऐकायला/वाचायला
दिल्यावर विसरून जाण्यासाठी झाला असावा या (माझ्याच असल्याने) माझ्या अत्यंत आवडत्या वाक्यावरून आधीच्या वाक्याचा जन्म झालेला आहे.) एवढे मोठ्ठाले टीव्ही बनवतात आणि त्यासाठी रिमोट हा एवढासा? अर्थात समप्रमाणात बनवा असलं काही म्हणत नाहीये मी. समप्रमाणात बनवायला तो काय गोडाचा शिरा आहे की घातली साखर आणि रवा समप्रमाणात. पण निदान उघड्या डोळ्यांना दिसेल इतपत तरी? "At least visible to bare eyes?"... दिवसांत निदान २०-२५ वेळा तरी टीव्ही चालू-बंद, आवाज कमी-जास्त करणे यासाठी रिमोट लागत असेल तर त्यातल्या निम्म्या वेळा आम्ही स्वतः उठून टीव्ही चालू-बंद करतो, आवाज लहान-मोठा करतो आणि उरलेल्या निम्म्या वेळा उठायचा आळस करतो. गणित चुकलं असलं तरी उरलेल्या १-२ वेळा रिमोट दृष्टीक्षेपात असल्याने वापरला जातो म्हणा पण ते प्रमाण एवढं नगण्य आहे की मी उल्लेख करायलाही विसरून जाणार होतो. आणि अर्थात यात मी चॅनल सर्फिंग गृहीत धरलेलं नाही. कारण रिमोट नेहमीच हरवला असल्याने चॅनल सर्फिंगची लक्जरी आम्हाला परवडत नाही ;). त्यामुळे टीव्ही बघताना आम्ही रिमोट-पूर्व काळातल्या कृष्ण-धवल युगात वावरत असतो.
आता त्याऐवजी जर रिमोटला मिस कॉल देणारं असलं काही यंत्र अस्तित्वात असतं तर कसली सोय झाली असती. अहाहाहा... हरवला रिमोट, द्या मिस कॉल... हरवला रिमोट, द्या मिस कॉल.. एकदम जबर्‍या.. भलेही त्याच्यामुळे मोबाईलची किंवा त्या मिस कॉल देण्याच्या यंत्राची बॅटरी संपली तरी काही हरकत नाही. बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करू पण रिमोट हरवू देणार नाही. जय हो.

तीच गोष्ट प्रवासाला गेल्यावर हरवणार्‍या वस्तूंची. कधी ऑफिसच्या कामासाठी कुठे बाहेरगावी(देशी) गेल्यावर तर मला माझी बॅग म्हणजे आपल्या अंतरंगात (माझ्याच) अनंत वस्तू लपवून ठेवून गनिमी काव्याने लढत लढत माझा पुरता पराभव करणारी चतुरंग सेनाच वाटते. मी पहिल्या वेळी जेव्हा एकटा परदेशी गेलो होतो तेव्हा गॉगल, कंगवा, कॅप अशा विशेष आवश्यक नाहीत असं वाटणार्‍या पण त्या त्या वेळी आपलं महत्व जाणवून देणार्‍या किंवा अगदी टुथपेस्ट, ब्रश, सॉक्स सारख्या अतिमहत्वाच्या वस्तूंनी पुरता चकवा दिलेला आहे. अगदी एवढा की एकदा तर माझ्यावर चक्क बायकोला भारतात कॉल करून विचारायची वेळ आली होती  "अग ती माझ्या जॅकेटची कॅप सापडत नाहीये. कुठे ठेवली असेल माहित्ये का?" आणि तिने अगदी न गडबडता, न डगमगता, न गोंधळता (आणि हसणं न थांबवता) "मोठ्ठ्या हिरव्या बॅगेच्या डाव्या कप्प्याच्या आतल्या दुसर्‍या चेनमध्ये जो टॉवेल आहे ना, त्याच्या मागेच असेल" असं उत्तर दिलं होतं. आणि ते इतकं म्हणजे इतकं अचूक निघालं की क्षणभर माझी हिरवी बॅग एक चटपट भारत दौरा करून आली की माझी सुविद्य पत्नी मनोवेगाच्या वारूवर स्वार होऊन अमेरिकेतल्या हिरव्या बॅगेच्या डाव्या कप्प्याच्या आतल्या दुसर्‍या चेनमध्ये डोकावून गेली हे मला कळेना. "तुला पांढरी जादू (काळी म्हणजे वाईट) येते की काय किंवा असंभवातल्या सुलेखासारखी आत्म्यांची अदलाबदल/लपाछपी वगैरे खेळता येते की काय?" असले प्रश्न विचारायचा अनिवार मोह मला दाबून ठेवावा लागला होता. आणि त्याहीपुढे जाऊन पुढच्या वेळी परदेश दौरा करताना बॅग भरून झाल्यावर बायकोने बॅगांच्या पुढच्या चेन मध्ये चिठ्ठ्या टाकून ठेवल्या आणि त्या चिठ्ठ्यांवर लिहून ठेवलं की त्या बॅगमध्ये काय काय आहे ते. म्हणजे पुन्हा उगाच "पेन कुठाय, घड्याळ कुठाय, निळा टी-शर्ट कुठाय?" असल्या फडतूस प्रश्नांना आय एस डी कॉलवरून उत्तरं द्यायला नकोत. आता त्याऐवजी जर माझं ते प्रिय यंत्र माझ्याबरोबर असतं तर काय बिशाद होती त्या चतुरंग सेनेची (आणि माझ्या बायकोची) माझा पाडाव करण्याची. मला वाटतं सकाळी उठल्यापासून मी त्या यंत्राची बटनंच दाबत बसलो असतो. आणि तेही अगदी स्पेशल रिंगटोन सेट करून. म्हणजे टूथब्रश/पेस्ट शोधण्याचं बटन दाबल्यावर ब्रश आणि पेस्ट "वज्रदंती वज्रदंती, व्हीको वज्रदंती" असे बोंबलायला लागले असते किंवा शेव्हिंग क्रीम शोधायचं बटन दाबल्यावर "The Best the man can get" असं कोकलत जिथे असेल तिथून टुणकन उडी मारून जिलेट समोर आलं असतं. ** .. पण नाही ना... ते स्वप्नवत यंत्र कोणी शोधलं नाही नी माझे पोपट व्हायचे काही थांबले नाहीत.

(** लेखाचा एकूण विषय, व्याप्ती आणि दर्जा पाहता रोजच्या वापरातल्या प्रत्येक वस्तूवर मी हे असलं फुटकळ गाणं शोधू शकतो किंवा प्रसंगी पाडू शकतो. पण अतिपांचटपणाने पाणी पाणी झाल्याने वस्तूंची आणि गाण्यांची यादी आवरती घेतली आहे.)
पण बघता बघता हे असले किस्से एवढ्या वेळा आणि इतक्या वारंवारतेने (फ्रिक्वन्सी वो) घडायला लागले की मेऱ्येम्येक्ये आत्मसम्मान को ठेच्यच्य पौचने लगी (च्यायला त्या हिंदी पिक्चरच्या..).. मग मी पण पिसाळलोच.. म्हणजे चांगल्या अर्थाने. रेबीजवाल्या अर्थाने नव्हे. म्हटलं दर वेळी हे असले वाभाडे काढून घेण्यापेक्षा काहीतरी बदललं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. वस्तू कुठे ठेवली आहे हे लक्षात ठेवण्याची दैवी कला आत्मसात करणे हे तर माझ्या मेंदूवर असणार्‍या अत्यल्प सुरकुत्यांची संख्या पाहता (पाहता म्हणजे कल्पना करता या अर्थी) सर्वस्वी अशक्य होतं. म्हणून मी दुसरा सोप्पा मार्ग निवडला. दिवसरात्र एक करून, नाना खटपटी लटपटी, शोधाशोध करून, नेट पालथं घालून शेवटी मीच ते महान यंत्र बनवलं. आणि त्यात पहिला प्रोग्राम टाकला तो अर्थातच रिमोट शोधण्याचा. आणि काय सांगू तो झालाही  यशस्वी. फक्त त्यात थोडीशी गडबड होत होती. रिमोट शोधण्यासाठीचं बटन दाबलं की रिमोट सापडण्याऐवजी टीव्हीची चॅनल्स आपोआप बदलली जाऊन आपोआपच जिथे सोनिया किंवा बाळासाहेब यांची काही बातमी, कार्यक्रम, फोटो दाखवत असेल ते चॅनेल लागायचं. म्हटलं तर यंत्र अचूक होतं म्हटलं तर त्यात बग होता. पण हा बग फार किचकटीचा नसला तरी तसा काही मानवणाराही नव्हता. त्यात लवकरात लवकर दुरुस्ती करणं हे आवश्यकच होतं. पण इतक्या दिवसांच्या अपार आणि अविश्रांत मेहनतीने शरीराने आणि (त्याच त्या कमी सुरकुत्यावाल्या) मेंदूने संप पुकारला होता. म्हणून "उद्या बघू त्या यंत्राचं" असा विचार करून मी त्या दिवशी जरा लवकरच निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसर्‍या दिवशी उठताक्षणी आधी ताबडतोब मी त्या यंत्राच्या दिशेने धाव घेतली. पण ते माझ्या स्टडीटेबलवर नव्हतं. पण मला आठवत होतं त्याप्रमाणे तरी मी ते तिथेच ठेवून मग ते निद्रादेवीच्या अधीन बिधीन झालो होतो. (आयला उगाच ते निद्रादेवी वगैरे. आधीच्या वाक्यात सरळ झोपलो असं लिहिलं असतं तर ते निद्रादेवी आणि अधीन असं दोनदोनदा लिहायला लागलं नसतं. आणि या वाक्यातलं धरून तीनदा. ओह नो.). मी पुन्हा सगळीकडे शोधलं. सगळी कपाटं, सगळे कप्पे, सगळ्या बॅगा सगळं सगळं सगळं शोधून झालं. पण ते माझं दैवी यंत्र काही सापडलं नाही. आणि 'हरवलेल्या वस्तू शोधण्याचं यंत्र' हरवलं तर ते कसं शोधायचं यावर तर मी अजून विचारच केलेला नव्हता !!! :-(

परवा एक मित्र आला घरी. समोर टीव्हीवर रट्टाळ 'फूड' चॅनेल चालू असलेलं पाहून आणि आमचे कंटाळलेले चेहरे बघून त्याला क्षणभर काहीच अर्थबोध होईना. पण क्षणार्धात त्याला परिस्थितीची कल्पना आली. "ओह, पुन्हा रिमोट" असं म्हणून तो उठला आणि झटक्यात टीव्ही बंद केला. त्याच्या मेंदूवर माझ्या मेंदुवरच्या सुरकुत्यांपेक्षा जास्त सुरकुत्या असल्या पाहिजेत नक्कीच !!!

Tuesday, March 9, 2010

'ग्रिशमा'तला श्रावण

*  नायक वॉशिंग्टन डीसी मधला प्रथितयश वकील. अनेक वजनदार नेते, सिनेटर्स, मोठमोठे वकील, उद्योजक, कारखानदार यांच्याशी वैयक्तिक, आर्थिक संबंध असलेली एक बडी असामी. काहीतरी बिनसतं (काय ते कालांतराने कळतं) आणि या वैभवाच्या शिखरावर असलेल्या वकिलाला सात वर्षं अंधारकोठडीची शिक्षा होते. अगदी भयंकर मानसिक हाल करणारी ही शिक्षा. पण काही वर्षं शिक्षा भोगून एफ बी आय च्या दबावाने आणि प्रेसिडंटच्या हस्तक्षेपामुळे त्याला शिक्षा माफ केली जाते आणि युरोपातल्या एका देशात सोडून दिलं जातं. अनेक देशांच्या गुप्तहेर संघटनांचे मातब्बर गुप्तहेर त्याच्या मागावर, त्याच्या जीवावर टपलेले... कारण काय त्याला मारण्यासाठी एवढं जीवाचं रान करण्याचं? त्याच्यापुढे सुटकेची आशा जवळपास शून्य, इतकंच काय तर त्याला आपला शत्रू कोण आहे, कोण आहे आपल्या मागावर हेही माहित नसतं. तो एक कळसूत्री बाहुली बनून गेलेला असतो. काय होईल शेवटी?

----

* एका माणसाला ब्राझील मध्ये पकडलं जातं. हालहाल करून काही विशिष्ठ माहिती त्याच्याकडून मिळवली जाते. पण अर्धवटच माहिती. कारण तेवढ्यात त्याने आधी रचलेल्या सापळ्याप्रमाणे पोलीस आणि एफ बी आय चे लोक त्याला पकडणा-या गँगच्या मालकालाच पकडतात. त्याला सोडून दिलं जातं पण ते एफ बी आय च्या तावडीत देण्यासाठीच. हाही वकीलच. तो तुरुंगात बसून,कैद्याला जेवढे मर्यादित अधिकार असतात त्यांचा खुबीने वापर करून, वकील मिळवून, केस लढवून आणि आधीच्या प्लान प्रमाणे सगळ्या गोष्टी घडवून आणून, अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं देत आणि थक्क करणा-या किंबहुना प्रसंगी अशक्य वाटाणा-या गोष्टी प्लान करून एक विलक्षण शेवट घडवून आणतो. अर्थात तो त्याच्या (किंवा आपल्याही) मनासारखाच शेवट असतो का हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे.

-----

* एका नुकत्याच लॉ कॉलेजमधून बाहेर पडलेल्या आणि होऊ घातलेल्या वकिलाला (पुन्हा एकदा वकील नायक) कॉलेज जीवनातल्या काही गुन्ह्यांवरून एफबीआय चे लोक पकडतात आणि त्याला ब्लॅक मेल करून एक मोठं रहस्य उलगडण्यासाठी एक कळसूत्री बाहुली म्हणून त्याला वापरण्याचा प्लान केला जातो. सगळ्या दिशांनी मार्ग बंद झालेला हा असहाय्य वकील एक विलक्षण खेळी खेळतो. पण शेवटी काय होतं?

-----

रहस्यमय कादंब-यांचे पंखे असलेल्यांनी एव्हाना ही वर्णनं कसली आहे हे नक्कीच ओळखलं असेल. किंबहुना पुस्तकं कोणती तेही ओळखलं असेल. तर हा आहे माझा अत्यंत आवडता लेखक जॉन ग्रिशम. आणि वरचे तीन प्रसंग म्हणजे मला (अतिशय आवडलेल्या.. कारण त्याची सगळीच पुस्तकं आवडतात ) आवडलेल्या पुस्तकांची एक ढोबळ रूपरेषा.

ग्रिशमच्या पुस्तकात काही काही साम्यस्थळं हटकून आढळतात. एक तर ९९% नायक वकील असतो. खून, रहस्य, सिनेटर, ब्लॅकमेल , एफ बी आय, वाक्यावाक्यातल्या शब्दाशब्दागणिक लॉं-फर्म्स, त्यांची दादागिरी, लोभी आणि मतलबी प्रवृत्ती, या सगळ्या स्वार्थी व्यवस्थेचे एक अंग झालेले वकील या काही किंवा प्रसंगी सगळ्याच गोष्टी या प्रत्येक पुस्तकात आढळतात. पण तरीही प्रत्येक कादंबरीत एक वेगळा विषय असतो, वेगळी आव्हानं असतात. नायकाला हतबल करणारे घटक, संकटं वेगळी असतात. त्यावर मात करण्याची त्या त्या नायकाची शैली आणि पद्धत सर्वस्वी वेगळी असते. इतकी की ही पुस्तकं एकाच लेखकाने लिहिली आहेत ना असा संशय येतो कधी कधी.

पण नुसत्या चक्रावून टाकणा-या घटना आणि वेगवान कथा हा एकमेव गुण किंवा USP (Unique Selling Point) असता तर असल्या चिल्लर कादंब-या पडणारे पैशाला पसरी मिळतात. पण ग्रिशमच्या पुस्तकांमध्ये आढळणारा महत्वाची बाब म्हणजे त्याची वाहती  वर्णनशैली. वाक्यावाक्यात केलेली शब्दांची कलाकुसर. म्हणजे क्लिष्ट अशा अर्थाने नव्हे उलट हलकीफुलकी, प्रसंगी चिमटे काढणारी. शब्दांशी खेळून नवीन नवीन वाक्प्रचारांना जन्म देण्याची त्याची हातोटी तर विलक्षणच.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याचं सामाजिक भान. वास्तवाशी असलेली नाळ. तो नायकांची उंची जीवनशैली, रंगिलेपण, महागड्या गाड्या, क्लब्स, राजकारण, प्रेसिडंट ऑफिस, एफ बी आय, सी आय ए आणि त्यांच्यातले हेवेदावे, छुपी युद्ध जेवढ्या ताकदीने उतरवतो तेवढ्याच किंवा प्रसंगी जास्त आत्मीयतेने वर्णन करतो ते समाजातील भेदभाव, आर्थिक, सामाजिक उच्चनीचता, कातडीच्या रंगावरून केले जाणारे भेदभाव.

त्याच्या जुन्या पुस्तकांमध्ये ब-याचदा क्लू-क्लक्स-क्लान (केकेके)ची वर्णनं आढळतात. काही कादंब-या तर सर्वस्वी त्या विषयाला वाहिलेल्या आहेत. केकेके ही संस्था अमेरिकेतील सवर्णांनी (म्हणजे गो-यांनी) स्थापन केलेली एक संस्था. पूर्णतः हुकुमशाही तत्वांनी बाधित. गोरे लोक हे शक्तिमान आहेत, त्यांचा अमेरिकेवर प्रथम अधिकार आहे आणि त्यांना त्यांचे अधिकार, गतवैभव परत मिळावं (?) या हेतूंनी (???) ही संस्था अमेरिकेतील दक्षिण भागातील मेम्फिस, मिसिसिपी, अलाबामा या आणि अशा ब-याच राज्यात पूर्वी काम करत असे. अमेरिकेत होणा-या गुलामांच्या खरेदी-विक्रीला विरोध करणारा कायदा अस्तित्वात आल्यावर त्या कायद्याला, सिव्हील राईट्स मुव्हमेंटला विरोध करणा-या आणि पर्यायाने अमेरिकन सिव्हील वॉरला कारणीभूत ठरलेल्या समूहांमध्ये केकेके ग्रुप आघाडीवर होता. या केकेकेचे सभासद अमेरिकेत अजूनही आहेत अर्थात त्यांच्या चळवळीला आता अर्थ राहिला नसल्याने ती संस्थाही आता क्षीण झालेली आहे. तर अगदी ७०-८० च्या दशकातही हा काळा-गोरा वर्णभेद, कृष्णवर्णीयांची घरं जाळणे, त्यांना जिवंत जाळणे, छळ करणे, लुटमार करणे, कृष्णवर्णीयांना मदत करणा-या गो-या किंवा ज्यू लोकांवर हल्ले करणे, धमकावणे असले प्रकार या दक्षिणेतील राज्यांत राजरोसपणे चालू होते. त्या काळातली अंगावर काटा आणणारी अन्यायाची वर्णनं, स्त्रियांवरील अत्याचार, अशा प्रसंगात जर आरोपी गोरा असेल तर त्याला केकेकेकडून बिनदिक्कतपणे दिला जाणारा पाठिंबा, किंबहुना बरेचदा न्यायाधीश, ज्युरी असे न्यायप्रणालीत, निर्णयात महत्वाची भूमिका बजावणारे लोकही केकेकेला सामील असत किंवा केकेकेचे छुपे सभासद असत. असो विषयांतर झालं. पण विकीवर यासंबंधात चिक्कार माहिती आहे. सुरुवातीला कधी कधी ग्रिशमची पुस्तकं वाचताना काही तपशील कळत नसत. तेव्हा मी असाच विकी करायचो.

तर या सगळ्या गोष्टींवरची ग्रिशमची मतं, त्यासाठी त्याने दिलेले दाखले त्याच्या सामाजिक जाणीवा जागृत असण्याची साक्ष देतात. किंबहुना त्याच्या एका कादंबरीत त्याने बेघर, गरीब लोक, त्यांचे हाल, त्यांच्यावर होणारे अन्याय या सगळ्याला अप्रतिमरित्या वाचा फोडली आहे. आणि एका जीवनमरणाच्या प्रसंगामुळे आयुष्याला कलाटणी मिळालेला एक कॉर्पोरेट वकील (पुन्हा वकील) आपलं करियर, लाखो डॉलर्सची नोकरी यांच्यावर पाणी सोडून या बेघर लोकांसाठी कळकळीने काम करण्यासाठी कसा उद्युक्त होतो याचं उत्तम वर्णन त्याने केलं आहे.


प्रत्येक कादंबरीतील नायक वकील असणे हा योगायोग आहे का? तर मुळीच नाही. कारण ग्रिशम स्वतः शिक्षणाने वकील आहे. आठ-दहा वर्षं वकिली केल्यानंतर एका हादरवून टाकणा-या केसमुळे त्याला पुस्तक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली आणि १९८९ मध्ये जन्माला आलं त्याचं पाहिलं पुस्तक "A Time to Kill". अर्थात त्यानंतर काही वर्षांतच त्याने वकिली सोडून पूर्णवेळ लेखणी (की-बोर्ड) हाती घेतला. अजून एक गम्मत म्हणजे बेसबॉलवर प्रचंड प्रेम असल्याने त्याला बेसबॉल प्लेयर व्हायचं होतं. पण त्यासाठी आवश्यक गुण आपल्यात नाहीत हे कळून चुकल्यावर त्याने वकिली शिक्षण घेतलं, वकिली केली आणि कालांतराने तेही सोडून देऊन एकापेक्षा एक धडाकेबाज legal thrillers लिहून "Master of the legal thrille" बनला. संदेश बिंदेश देत नाहीये फक्त माहिती सांगतोय काय तो अर्थबोध ज्याने त्याने घ्यायचा.

त्याने १९८९ पासून लेखनाला सुरुवात केली आणि आजतागयात दर वर्षाला त्याची एक कादंबरी प्रकाशित होते आहे. यातल्या २ कादंब-या वगळता सगळ्या रहस्यमय कादंब-या आहेत. आणि कित्येक कादंब-या अनेक आठवडे/महिने न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेल्या. अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे पहिली कादंबरी सोडली तर प्रत्येक कादंबरीचं शीर्षक "The" ने सुरु होतं. त्याच्या अनेक कादंब-यांवर अमेरिकेत चित्रपट निघालेत आणि त्यांनी करोडोंनी गल्ला केला आहे. त्याच्या कादंबरीवर आधारित चित्रपटांमध्ये (माझ्या मते) 'The Pelican Brief' सर्वोत्कृष्ठ आहे. अर्थात त्यात ज्युलिया रॉबर्टस आणि डेन्झेल वॉशिंग्टन सारखे सामर्थ्यवान आणि गुणी कलावंत आहेत. तसेच 'The Firm', 'The Client', 'A Time to Kill' हेही  आवर्जून पहावेत असे चित्रपट.


अर्थात आखुडशिंगी, बहुदुधी काहीच नसतं. ग्रीशमही त्याला अपवाद नाही. त्याच्या लिखाणामध्ये, कादंब-यांमध्ये काही काही दोष आहेत. अर्थात मला आढळलेले दोष. "पर अप्पुन पब्लिक है पब्लिक. जो अच्छा नही लगा उसका डब्बा गुल" असा प्रेमळ, लडिवाळ संदेश रंगील्या मुन्नाने आधीच देऊन ठेवल्याने ग्रिशमच्या लेखनातले दोष काढण्याचं धाडस करतोय. त्याची वर्णनं, कादंब-यांमधल्या घटना कधी कधी फारच लांबतात, रटाळ होतात. तो कादंबरी, प्रसंग पाणी घालून उगाच वाढवतोय असं वाटत राहतं. अनेक घटना घडतात त्या उगाच क्लिष्ट, लांब लचक, अनाठायी  वाटतात. त्या घडल्या नसत्या किंवा त्यांचं इतकं तपशीलात वर्णन आलं नसतं तरी चाललं असतं असं वाटत राहतं. आणि याचा अगदी हटकून अनुभव घ्यायचा असेल तर 'The Chamber' वाचा. प्रत्येक कादंबरीत असे काही काही असणारे रटाळ प्रसंग या कादंबरीत पानोपानी भरलेत. किंबहुना ही कादंबरीच तद्दन टाकाऊ वाटली मला कारण शेवटी काहीच घडत नाही. या कादंबरीत चांगलं असं काहीच वाटत नाही. अर्थात केकेकेच्या अन्यायाचं अंगावर काटा आणणारं भयंकर वर्णन सोडलं तर. किंवा 'Playing for Pizza' हे देखील त्याचं असंच एक रटाळ पुस्तक. पण खिळवून ठेवणा-या, पुढे काय घडतंय, घडेल या विचारात कादंबरीच्या नायकाशी एकरूप व्हायला भाग पाडणा-या अनेक कादंब-या विचारात घेतल्या तर अशा एक-दोन कादंब-यांना माफी देऊ एक डाव :D

नुसतं नावडत्या कादंब-यांची नावं सांगण्याचा कद्रूपणा करणार नाही मी. आवडते चित्रपट वर सांगितलेच. आवडत्या कादंब-या सांगायच्या तर

१. The Broker
२. The Partner
३. The Associate
४. The Street Lawyer
५. The Testament

अर्थात या यादीतही 'The Firm', 'The Client', 'A Time to Kill', 'The Pelican Brief' हे आहेतच पण मी आधीच चित्रपट बघितल्याने ही पुस्तकं वाचली नाहीयेत.

त्याच्या  सगळ्या पुस्तकांची यादी इथे मिळेल किंवा त्याच्या स्वतःच्या संकेतस्थळावरही मिळेल. थोडक्यात एकदा तरी अनुभावावाच असा हा 'ग्रीशमा'तला श्रावण आणि एकदा अनुभवलात की पुन:पुन्हा अनुभवल्याशिवाय चैन न पडू देणारा !!

Sunday, March 7, 2010

तो आणि मी (आणि तीही)

प्रसंग पहिला :

मी त्याला कडेवर घेऊन फिरतोय. तो झोपावा म्हणून देवाचा (आणि त्याचाही) धावा करतोय. थोड्या वेळाने तो झोपतो. नाक फुरफुरत असतं. सर्दीने वहात असतं. मी त्याला खाली ठेवतो. त्याचं नाक पुसतो. त्याच्या अंगावर शाल घालून झोपणार एवढ्यात तो रडत रडत उठून बसतो. पुन्हा कडेवर घेऊन फिरणं, खाली ठेवणं आणि त्याचं रडणं असं चक्र दोन-तीन वेळा झाल्यानंतर मी त्याला घेऊन उठतो आणि (नाईलाजाने) सुवर्णमध्य म्हणून बीनबॅगवर जाऊन रेलतो. त्याला डुलवत डुलवत झोपवण्याचा प्रयत्न चालूच. तो मधेच झोपतो.. थोडा वेळच. पुन्हा रडत उठतो. त्याच्या नाकातल्या आणि डोळ्यातल्या पाण्याने माझा खांदा भिजत असतो. जागा असेन तेव्हा तेव्हा मी अंधारातच त्याचं नाक/डोळे पुसत असतो. असं अर्धवट जागत अर्धवट झोपत चरफडत चरफडत आणि दुस-या दिवशीच्या ऑफिसमधल्या कामाचा विचार करत मी रात्र काढतो. पहाटे कधीतरी झोप लागते.

सकाळी गजराच्या लाथेने मी उठतो. त्याला जरा शांत झोप लागलेली असते. त्याला खाली ठेवण्यापूर्वी एकदा त्याच्या चेह-याकडे बघतो. वाहतं नाक कधीच थांबलेलं असतं. चोंदलेलं असतं. सुकलेलं असतं. म्हणजे रात्री खांदा भिजवणारं पाणी फक्त डोळ्यातलं असतं. नाकातलं नाही. कारण एक नाकपुडी कधीच बंद झालेली असते. मी चरकतो. रात्रभर एका नाकपुडीने आणि तोंडाने श्वास घेण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो आणि त्यातून ती रडरड, अस्वस्थता आलेली असते. माझ्या अंगावर काटा. हजार पातकांचं ओझं खांद्यावर पडल्याप्रमाणे भासतं. मी अजूनच गुदमरतो.

प्रसंग दुसरा : (काही आठवड्यांनंतर)

रात्री दोन-अडीचचा सुमार.. शेजारी चुळबुळ होते. ती वाढते, रडण्याचा आवाज. स्वर चढत चढत जात टिपेला लागतो. त्याला प्रेमाने, दामटवून झोपवण्याचे सगळे प्रयत्न फसल्यावर कडेवर घेऊन फिरण्याचा एकमेव रामबाण उपाय शिल्लक असतो. मी त्याला उचलतो, कडेवर घेतो, फे-या मारायला लागतो. साधारण ४० सेकंदात तो एकदम गाढ ... मला पुन्हा झोप लागायला १५-२० मिनिटं लागतात.

दुसरी रात्र. घड्याळ अंदाजे ३ वाजवत असावं. शेजारी चुळबुळ, रडं आणि टिपेचा आवाज ठरल्या क्रमाने घडतं. मी पुन्हा रामबाण मारतो. ५० सेकंदात लक्ष्यवेध. मला झोप लागेपर्यंत अर्धा तास उलटून जातो.

तिसरी रात्र. मी प्रचंड दमलेला. सलग ३-४ रात्रींची अनियमित आणि अर्धवट झोप. त्यामुळे गाढ गाढ गाढ झोपेत. इतका की मला थेट 'टिपेचा आवाज' वाली शेवटची पायरी ऐकू येते. शक्तिपात झाल्यासारखा मी उठत नाही. उठू शकत नाही. पण रडं सहन न होऊन अखेर उठावं लागतंच. "च्यायला, काय वैताग आहे" असं उधळत.. पण क्षणभरच. पण अचानक मला एवढ्या झोपेत असूनही काहीतरी चुकीचं बोलल्याचं जाणवतं. मी जीभ चावतो. चुकीच्या जाणीवेने की चुकीचं बोलल्याला शिक्षा देण्याच्या जाणीवेने? दुसरं असावं बहुतेक.

प्रसंग तिसरा : (काही दिवसांनंतर) 

नुकताच ऑफिसमधून घरी आलेलो. जेमतेम कॉफी पिऊन होते ना होते तोवर पिल्लू उठतं. रडायला लागतं. त्याला कडेवर घेतो. फे-या मारतो. तरीही हळू आवाजात रडरड चालूच. मी जरा ओरडल्याच्या स्वरात बोलून जातो "अरे कडेवरच आहेस की... आता काय डोक्यावर घेऊन नाचू?" अर्धवट झोपेत आपली मान माझ्या खांद्यावर विसावणा-या त्याला प्रश्न पडला असावा की हा एवढा का बिथरला? एवढं ओरडायला झालं काय? त्याचं उत्तर माझ्याजवळ नसतं. यावेळी मी नजर चुकवत नाही की जीभ चावत नाही. सरळ माफी मागतो त्याची. "सॉरी राजा सॉरी" असं म्हणत. होप त्याला कळलं असेल मला काय म्हणायचंय, काय सांगायचंय. "सॉरी राजा सॉरी" मागे मोठ्ठाच्या मोठ्ठा माफीनामा दडलेला असतो !!!

-----------------------

* या सगळ्या प्रसंगांत उल्लेख फक्त 'तो' आणि 'मी' चेच असले तरी 'यत्र, तत्र, सर्वत्र' किंवा फरहान अख्तरने सोप्या भाषेत '"सन्नाटा सुनाई नही देता और हवाए दिखाई नही देती" म्हटल्याप्रमाणे 'ती' सगळीकडे आहेच. त्याच्याबरोबर, माझ्याबरोबर आणि आम्हा दोघांबरोबरही. आणि कधीही सॉरी म्हणायची पाळी येऊ न देता !!!

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...