काही काही शब्द बघता बघता एकमेकांचे असे काही प्राणसखे बनतात किंवा बेजावदार माध्यमं आणि अक्कलशून्य नेतेमंडळी त्यांना इतक्या कुशलतेने एकमेकांत गुंफतात की आपल्याला पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दावाचून विचारही करवत नाही. वरच्या वाक्यातला 'बेजावदार माध्यमं/मिडिया' किंवा 'अक्कलशून्य नेतेमंडळी' हे शब्द ही त्यांचीच उदाहरणं होऊ शकतात म्हणा. पण अर्थात योग्य उदाहरणं. असो.... तर चितळ्यांची बाकरवडी, अमूल बटर किंवा मग नेस्लेची कॅडबरी, कॅननची झेरॉक्स वगैरे वगैरे वगैरे ही काही उदाहरणं. तर या दोन जमातींच्या मते अक्कलशून्य नेतेमंडळींना (यापुढे हे दोन शब्द एकत्रित येतील हे अध्याहृत आहे. अनलेस स्पेसिफाईड अदरवाईज !) जनतेद्वारे दिली जाणारी ट्रीटमेंट, त्यांच्याबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया या त्यांच्याविरुद्ध जनतेच्या मनात खदखदत असलेला क्षोभ, असंतोष, कमालीचा संताप, तीव्रतम द्वेष याचा एकत्रित परिपाक असूच शकत नाही. असतो तो फक्त 'भ्याड हल्ला'
भ्याड??????? हल्ला???????
जनहितार्थ (वाचा मिडिया आणि नेतेमंडळी हितार्थ) काही शब्दार्थ-
भ्याड : पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा/री
हल्ला : आक्रमण, जोरदार धडक किंवा शुद्ध बोलीभाषेत हमला/अटॅक किंवा मग धक्काबुक्की करून जोरदार मारझोड
मला शाळेत शिकवलेल्या मराठीनुसार आणि माझ्या वकुबानुसार मी अर्थ दिले आहेत आणि ते बहुधा चुकीचे नसावेत असा माझा कयास आहे !
आता हे शब्द आपण हरविंदर सिंगने शरदरावांच्या श्रीमुखात भडकावून दिल्याच्या घटनेशी जोडून पाहू. तर हरविंदर सिंग पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा आहे का? निश्चितच नाही. तो भित्रा इसम असता तर सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरणाऱ्या शरच्चन्द्रांच्या चंद्र्मुखात (आणि दुखरामाच्याही.. नॉट टू फरगेट) एक सणसणीत चपराक भडकावण्यासारखं कृत्य त्याने केलंच नसतं. शिव्या देणारी पत्रं पाठवली असती, अनामिक इ-मेल आयडीवरून इमेल केले असते, पवारांच्या घरावर रात्रीच्या अंधारात गुपचूप दगडफेक करून पळ काढला असता. त्याने असं काही केलं का? कृती करून तो तोंड लपवून बसला का किंवा अंधारात दडला का? मुळीच नाही. उलट त्याने त्याच्या कृत्याची कारणमिमांसाही दिली. "चोर है सब साले चोर है. सब मालूम है इन्हे (शरदरावांच्या "मुझे कुछ मालूम नही"" या उत्तरला उद्देशून)" असंही सांगितलं. असो. ही व्यक्ती भ्याड नाही हे मान्य करायला एवढे पुरावे पुरेसे असावेत माझ्या मते.
आता हल्ला... हल्ला????? अरे हल्ला एक देश दुसऱ्या देशावर करतो, एक टोळी दुसऱ्या टोळीवर करते, एक समूह दुसऱ्या समूहावर करतो, किंवा मग एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोरदार धक्काबुक्की करून तीव्र जखमी करण्याच्या उद्देशाने करते तो हल्ला असतो.
तर या ठिकाणी असं झालं का? माझ्या मते नाही. उसळत्या आणि सतत चढत्या महागाईने व्याकुळ आणि संत्रस्त झालेल्या जनतेच्या असंतोषाला हरविंदररूपी एका सामान्य माणसाने करून दिलेली वाट, सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरुद्ध व्यक्त केलेली प्रतिक्रिया.. कडकडीत प्रतिक्रिया म्हणू हवं तर. हल्ला नक्कीच नाही. एक विसरू नका की हरविंदरकडे एक छोटा चाकूही होता आणि त्याच चाकूने त्याने स्वतःच्या मनगटावर वारही करून घेतले. हल्लाच करायचा असता तर त्या चाकूएवढं दुसरं कुठलंही योग्य हत्यार त्याच्याकडे त्यावेळी नसावं. हल्लाच करायचा असता तर चाकूने केला असता, जखमी केलं असतं. पण त्याने तसं केलं नाही. कारण हल्ला करणे हा हेतू नव्हताच तर फक्त आणि फक्त असंतोषाला वाट करून देणं एवढाच हेतू होता; रोजच्यारोज हातातोंडाची मिळवणी करताना जनतेवर कोसळणाऱ्या महागाईरूपी संकटाचा आणि बसणाऱ्या झळांचा आणि त्याला कारणीभूत असलेल्या सरकारचा एक प्रतिकात्मक निषेध !!
थोडक्यात हरविंदरने जे केलं तो भ्याड हल्ला नव्हता. भ्याड हल्ला हा असा नसतो. कधीच नसतो.. नसतोच. हा होता तो जा..ळ.. कडकडीत, सणसणीत जाळ!!
मुंबईवर २६/११ ला कसाब आणि त्याच्या भावडांनी केला तो भ्याड हल्ला होता किंवा मग कारगीलवर पाकिस्तानेने केला तो. हरविंदरने जे केलं तो भ्याड हल्ला नक्कीच नाही. तत्कारणात निदान यापुढे तरी प्रसारमाध्यमं आणि नेतेलोक्स यांनी 'भ्याड' आणि 'हल्ला' हे दोन हल्ले एकत्रितपणे वापरण्याची खाज, अर्ज (इंग्रजीतला) रोखून ठेवावी !!
आणि हो.. जाता जाता अजून एक.. हरविंदरची कृती चूक की बरोबर किंवा मिडियाच्या भाषेत "हल्ला झाला" हे चूक की बरोबर असल्या थोतांड विषयात मला पडायचंच नाही. कारण झालं ते अगदी योग्यच झालं. आणि अशा हल्ल्याला पाठींबा देणं हे विकृत, पिसाट आणि भ्याडपणाचं लक्षण असेल तर मी कमालीचा विकृत आणि पिसाट आहे आणि हे असे तथाकथित भ्याड हल्ले वारंवार होवोत आणि या हल्ल्याचं आणि भविष्यात कुठल्याही राजकीय व्यक्तीवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचं मी जाणीवपूर्वक आणि साभिमान समर्थन करतो !!
ता. क. : नेते लोकांना होणारी मारहाण, चपला/बुट फेकणे या संबंधी बोलताना हे असलं करण्यापेक्षा "निवडणुकांच्या वेळी मतदान करा आणि योग्य व्यक्तीला निवडून द्या" असं सांगणं हे माझ्यामते फारच हास्यास्पद आहे. अशा गोष्टींवर निवडणूका आणि मतदान हे अत्यंत फसवे पर्याय आहेत, अतिशय ढोंगी उपाय आहेत. कारण आपण निवडून दिलेली व्यक्ती सत्तेत आल्याआल्याच भ्रष्टाचार किंवा जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू लागली तरीही ती व्यक्ती पुढची पाच वर्षं आपल्या गळ्यात लोढणं म्हणून अडकून राहतेच आणि करायचा तो भ्रष्टाचार करतेच किंवा जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतेच. माकडउड्या मारता मारता लोकसभेत जाऊन पोचलेल्या गोंद्याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. त्यामुळे यावर उपाय म्हणून तेवढी ती मतदानाची उदाहरणं वगैरे प्लीज देऊ नका.