--------
--------
चिठ्ठी पूर्ण कोरी होती फक्त पानाच्या मध्यभागी 'अ पेक्षा' असं लिहिलं होतं. मला काहीच कळलं नाही. मी तडक दादांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना ही आनंदाची बातमी द्यायची होती. तेव्हाच त्या मजकुराचा अर्थही विचारू असं ठरवलं.
**
"दादा, दादा"
"अरे कोण देवेश? ये ये.. बस. कसा आहेस ?"
"दादा माझं प्रोजेक्ट त्या कंपनीला खूप आवडलं. त्यांनी त्यांच्या योजनेसाठी माझ्या प्रोजेक्टची निवड केली आहे. मला पुढची बोलणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात बंगलोरला जायचं आहे. खूप खुश आहे मी दादा खूप खुश आहे."
"अरे वा. उत्तम. अभिनंदन."
"दादा, अजून एक. मी तुम्ही दिलेली चिठ्ठी उघडली. पण मला काही नीट कळलं नाही. समजावून सांगाल प्लीज?"
"पुन्हा वाच काय लिहिलंय ते" दादा मंदस्मित करत म्हणाले.
"अपेक्षा" मी पुन्हा गोंधळून जाऊन म्हंटलं.
"आठवतंय मी तुला काय सांगितलं होतं? तू जेव्हा यशस्वी आहेस असं तुला पटेल तेव्हाच तू चिठ्ठी उघडायचीस. तू आत्ता चिठ्ठी उघडली आहेस म्हणजे तू यशस्वी आहेस, आनंदी आहेस हे मान्य आहे तुला?"
"हो आहे."
"पण तुला माहित आहे का की हा आनंद, हे यश चिरकाल टिकत नाही. आपण ते टिकूच देत नाही. कारण आपला स्वभाव. आता तुझं हे प्रोजेक्ट यशस्वी झालं आहे. तू आनंदात आहेस. पण कालांतराने आपल्या अपेक्षा वाढू लागतात. आपल्याला वाटू लागतं की त्या अमक्यातमक्याकडे माझ्यापेक्षा चांगली गाडी, चांगलं घर, चांगली नोकरी/धंदा आहे. त्याच्या मानाने मी तर काहीच नाही. आणि असा विचार करून आपण आपलाच आनंद, समाधान आपल्या हातांनीच गमावून बसतो. आणि जे दुसर्याकडे आहे पण आपल्याकडे नाही असं आपल्याला वाटतं ते मिळवण्याच्या मागे धावू लागतो. ही धावाधाव अविरत असते. कधीच न संपणारी. कारण आपल्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. इतक्या की होता होता त्या अपेक्षा बदलून लोभाचं, हावेचं रूप घेतात. आपल्याला लोभी बनवून जातात. ही हाव, हा लोभ कधीही न संपणारा असतो. पण आपल्याला ते कळतच नाही....
एक सांगू? ? तू माझ्याकडे आला होतास तेव्हाही तू सुखी, यशस्वी होतासच. फक्त तुला त्याची जाणीव नव्हती किंवा तू ते विसरला होतास इतकंच. तू जेव्हा सीए झालास, जेव्हा तुला पहिली नोकरी मिळाली, जेव्हा तू नोकरी सोडून व्यवसायात उतरायचं ठरवलंस, जेव्हा व्यवसाय प्रत्यक्ष सुरु केलास त्या त्या प्रत्येक क्षणी, हरेकक्षणी तू यशस्वी आणि आनंदी होतास. आणि तेही पूर्वीपेक्षा जास्तच. त्या प्रत्येक क्षणी मी तुला जर ती चिठ्ठी दिली असतीस तर तू "होय मी आत्ता सगळ्यात यशस्वी आहे" असं म्हणून ती उघडली असतीस. मला खात्री आहे. बघ नीट विचार करून. त्या प्रत्येक क्षणी तू यशस्वी होतासच... नव्हतास तो फक्त समाधानी.
अर्थात सुखी, समाधानी रहायचं म्हणून "आहे त्यात सुख मानून नवीन ध्येये शोधू नयेत, कुपमंडूक वृत्तीने जगत रहावं, 'ठेविले अनंते' किंवा 'असेल माझा हरी' अशा अविर्भावात जगावं" असं मी अजिबात म्हणत नाहीये, कदापिही म्हणणार नाही. नवीन यशासाठी नवीन प्रयत्न हे केलेच पाहिजेत. पण डोळे उघडे ठेवून. सुख, यश किंबहुना प्रत्येक गोष्ट सापेक्ष असते. फार कशाला... अरे अगदी दु:खही सापेक्ष असतं. तुमच्यापेक्षा अधिक दु:खी असणारा माणूस दिसला की तुम्ही आपोआपच त्याच्यापेक्षा सुखी ठरता. नाही का? त्या बिरबलाच्या रेघेसारखं.. !! म्हणून तुलना करायची असेल तर आपल्यापेक्षा दु:खी लोकांशी कर. त्यांना सुखी कसं करता येईल ते बघ. अर्थात यशाची तुलना आपल्यापेक्षा जास्त यशस्वी लोकांशी करणं उत्तमच पण ते प्रेरणा घेण्यासाठी. त्यातून वैफल्य येता कामा नये. न्यूनगंड निर्माण होता कामा नये. परंतु दुर्दैवाने लोक आपल्यापेक्षा अधिकाधिक यशस्वी माणसं बघून त्यांच्या यशाने गांगरून जाऊन आपल्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा वाढवून ठेवतात आणि मग छोट्या छोट्या अपयशाने उध्वस्त होऊन जातात आणि नशिबाला किंवा असाच उगाच कोणाला तरी बोल लावत रहातात. तू मला जेव्हा पहिल्या वेळी भेटायला आला होतास तेव्हा आठवतंय तू किती निराश होतास, किती खचलेला होतास ? कारण अजून अजून यशाच्या अपेक्षेत तू तोवर कमावलेलं यश विसरला होतास. दुर्दैवाने पुढच्या वेळी जर असा प्रसंग आलाच तर तेव्हा तू तुझं आजचं यश विसरू नको. तू सुखी होतास, आनंदी होतास हे विसरू नकोस. आणि एक लक्षात ठेव हे असे प्रसंग वारंवार येणारच पण त्याला तू अपयश मानतोस की आव्हान समजतोस यावर निकाल अवलंबून आहे.
तात्पर्य, त्या चिठ्ठीत सांगितल्याप्रमाणे 'अपेक्षा' मधला 'अ' काढून टाक आणि उरलेला 'पेक्षा' हा मी कोणा 'पेक्षा' किती अयशस्वी, दु:खी आहे हे बघण्यापेक्षा कोणा 'पेक्षा' किती 'सुखी, आनंदी, यशस्वी, समाधानी' आहे हे बघण्यासाठी वापर. जे तुझ्यापेक्षा दु:खी आहेत त्यांना तुझ्यापेक्षा सुखी करण्याच्या प्रयत्नाला लाग. यश, समाधान अजून वेगळं काय हवं मग?"
मी भारावून जाऊन ऐकत होतो. खरंच हा एवढा विचार मी कधी केलाच नव्हता. उगाच स्वतःची दु:ख कुरवाळत बसण्याची सवय लागली होती मला....... !!! तेवढ्यात मला काहीतरी आठवलं.
"दादा, अजून एक. त्या दिवशीही आणि आजही जे जे लोक तुम्हाला भेटून बाहेर येतात त्यांच्या हातात मी तुम्ही मला दिलीत तशी चिठ्ठी बघितली. काय असतं त्या प्रत्येक चिठ्ठीत?."
"तुला काय वाटतं?" दादा पुन्हा मंदस्मित करत उत्तरले. त्यांच्या प्रश्नातच त्यांचं (आणि माझंही) उत्तर दडलेलं होतं !!!
-- समाप्त.