Saturday, January 5, 2013

खुशाल

मी मुद्दामच या विषयावर लिहायचं टाळत होतो. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल नेटवर्क्स वगैरे प्रत्येक ठिकाणी तीच चर्चा, नवीन अपडेट्सच्या नावाखाली त्याच भयानक घटनेचं चर्वितचर्वण आणि हे सगळं कमी म्हणून की काय विविध नेते, राजकारणी, पोलीस अधिकारी इत्यादींच्या उसवलेल्या मेंदूंतून आणि फाटक्या तोंडांतून गळणारी अकलेची दिवाळखोरी दाखवणारी, रोजच्या रोजची नवनवीन बेजवाबदार भाष्यं !

परंतु काही काही मुद्दे पुनःपुन्हा येऊ लागले, दाखले दिले जाऊ लागले.. लेख, अग्रलेख, विशेष लेख इ इ सगळीकडेच. जे माझ्या मते चुकीचे होते, आहेत आणि त्याहीपेक्षा त्या दुर्दैवी जीवावर अन्याय करणारे आहेत... म्हणून लिहायला बसलो.

आपल्याकडे किंबहुना जागतिक पातळीवरच एखादी व्यक्ती जी हिंसेची, जशास तसे न्यायाची (Eye for an eye) मागणी करते, त्या विचाराला पाठींबा देते तिला बेधडकपणे असंवेदनशील, बुरसटलेल्या विचारांची, अप्रगल्भ असल्याचं लेबल लावून टाकण्याची पद्धत आहे. प्रसंग काहीही असो, पार्श्वभूमी काहीही असो त्याचा काही संबंध नाही. प्रत्यक्ष तात्याराव सावरकर जिथे सुटले नाहीत तिथे आपली काय कथा ! अजून थोडं स्पष्ट लिहितो.

त्या सहा हरामखोरांना फाशी देऊ नये, जन्मठेप द्यावी असा एक मोठा विचारप्रवाह आहे. का तर फाशीने पटकन सुटका होते. जन्मठेपेने माणूस रोज झिजतो. या मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे. पण...

त्याप्रमाणेच त्यांना ताबडतोब फाशी दिली जावी असं मानणाराही एक मोठा वर्ग आहे. पण माझ्या मते त्याचं कारण वेगळं आहे. कायदा/न्यायव्यवस्था/राज्यघटना.. नाव काहीही द्या.. च्या मते जास्तीत जास्त कठोर शिक्षा म्हणजे फाशी आहे... आणि म्हणून फाशीची मागणी केली जाते आहे. खरंतर फाशी ही सोपी शिक्षा आहे हे त्या प्रत्येकाला मान्य आहे. त्या श्वापदांना खरं तर अत्यंत भीषण, निर्घृण शिक्षा व्हावी अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. त्यांचे हात-पाय कलम केले जावेत किंवा अगदी सौदीतल्या प्रमाणे लिंग छाटण्याची शिक्षा दिली तर अजून उत्तम असं प्रत्येकाला वाटतंय. पण वर म्हटल्याप्रमाणे न्यायव्यवस्थेला या शिक्षा मान्य नाहीत. त्यामुळे न्यायव्यवस्थेला मान्य असणाऱ्या शिक्षांमधली मोठ्यात मोठी शिक्षा कोणती तर फाशी. म्हणून मग निदान त्या दळभद्री माणसांना आपण आपल्या न्यायव्यवस्थेतली जास्तीत जास्त कठोर शिक्षा दिली हे समाधान म्हणून फाशीची मागणी होतेय.

दुसरी गोष्ट म्हणजे आजन्म कारावास म्हणून १४ वर्षांची शिक्षा मिळणार असेल तर काय उपयोग. थोडक्यात चौदा किंवा जे काही आहे तितक्या वर्षांनी, किंवा चांगल्या वागणुकीमुळे शिक्षेत काही वर्षं सुट मिळवून ते लवकर सुटणार !!! असं होईलच असं नाही पण होणार नाहीच असंही खात्रीशीरपणे कोणी सांगू शकतं का? तसाही त्यांच्यातला सहावा राक्षस बलात्कार करण्याइतपत अक्कल असलेला परंतु (आंधळ्या आणि पांगळ्या) कायद्याच्या दृष्टीने सज्ञान नसल्याने कमी शिक्षेत सुटणार आहेच !

परंतु या सगळ्यांपेक्षा अजून एक मोठा मुद्दा आहे जो विशेष विनोदी आहे. तो म्हणजे "फाशी देऊन बलात्कार कमी होणार आहेत का?" ............ यासारखा बौद्धिक दिवाळखोरीचा प्रश्न दुसरा नसेल.. !!!! अरे बाबांनो फाशी देऊन बलात्कार कमी होणार नसले तरी तुमच्या जन्मठेपांनी तरी ते कुठे कमी झालेत? उलट वाढलेतच की. त्यामुळे निदान फाशीच्या जरबेने का होईना बलात्कार कमी होतील अशी अपेक्षा ठेवून बघायला काय हरकत आहे? कारण शेवटी वखवखीपेक्षा जीव प्यारा असतो.

बलात्कारासाठी फाशीची शिक्षा मागणे ही फक्त एक प्रतिक्रिया आहे. त्यात सारासार विचार नाही असं काहीसं मतही मी वाचलं. वाईट वाटलं ! अर्थात ही प्रतिक्रियाच असणार. नाहीतर एखाद्या निष्पाप जीवावर इतका भयंकर प्रसंग ओढवला तर काय शिक्षा द्यायची याबद्दलची शिक्षा कुठलाही संवेदनशील समाज आधीपासून ठरवून ठेवू शकत नाही. इतक्या भयंकर क्रौर्याचा विचार तरी कोणी करू शकेल का? आणि म्हणून तर कायद्याने रेअरेस्ट ऑफ रेअर गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा संमत केली आहे. त्या काळरात्री जे घडलं त्यापेक्षा दुर्मिळ, भीषण, संवेदनाहीन, पाशवी असं काय असू शकतं?

आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला काय हवंय, काय वाटतंय, कायदा काय सांगतो, तज्ज्ञांचं मत काय आहे, अन्य देश, युनायटेड नेशन्स काय म्हणतायत वगैरे वगैरे सगळ्या फडतूस गोष्टी क्षणभर बाजूला ठेवूया.. आणि एक क्षण फक्त एकच क्षण विचार करुया की जिने त्या रात्री तो नरक भोगला, असह्य वेदनांना तोंड देत अत्यंत दुर्दैवी रीतीने प्राण सोडला, जिच्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या त्या लेकीची अखेरची इच्छा काय असेल? तिला विचारलं असतं, किंवा उत्तर द्यायला जर ती शिल्लक असती तर तिने कुठली शिक्षा निवडली असती? .. बाबांनो, उत्तर देऊ नका हवं तर.. कारण जे उत्तर मिळेल ते पचवणं तुमच्यासाठी अवघड असेल... फक्त स्वतःशीच विचार करा.. काय वाटतं ते सांगा आणि मग खुशाल जन्मठेपेची मागणी करा हवं तर !

26 comments:

  1. त्या सहा जनावरांमध्ये एक अवघं १६ वर्षांचं जनावर होतं! त्यानेच सगळ्यात अमानुषपणा केल्याचं उघडकीस आलंय...
    मी याच विषयावर ब्लॉग लिहिला तेव्हा मला हे माहीत नव्हतं...माहीत झालंय तर मीच 'अघोरी' म्हणून उल्लेख केलेला पर्याय मला योग्य वाटतोय..
    मरेपर्यंत फाशी नको..मरेपर्यंत जगा पण पुरुष म्हणून जगायची लायकी नाही या लोकांची! X=(

    ReplyDelete
    Replies
    1. अरे १६ पण नाही. १७ वर्षं ८ महिने.. जेमतेम ४ महिन्यांनी वाचला तो. पण बोन-टेस्ट वरून त्याच्या वयाची सत्यता पडताळून पाहणार आहेत पोलिस.

      पण आपल्या न्यायव्यवस्थेला अघोरी शिक्षांची अ‍ॅलर्जी आहे ना त्यामुळेच या असल्या जनावरांचं फावतं !

      Delete
  2. +++++++++++ .....

    तिने दिलेले उत्तर हा मुद्दा आहेच पण त्या प्रत्येक स्त्रीने जिने कधीतरी कुठेतरी असा ओझरता का होइना ओंगळवाणा स्पर्श सहन केलेला आहे त्या प्रत्येकीचे मत असेच टोकाचेच असेल याबद्द्ल मी खात्री देते हेरंबा.... किळस वाटते स्त्रीत्वाची, पुरूषांची, स्वत:ला माणूस म्हणवून घेणाऱ्या सगळ्यांचीच.....
    असे ’पुरूष’ किती किती आहेत याची गणती नाही हे कटू वास्तव :( :( .... कोणाला तरी शिक्षा झाली तर आणि एखाद्याने जरी बोध घेतला तर किती बरे होइल नं !!!

    ReplyDelete
  3. अशा गुन्हेगाराला सजा देताना त्या शिक्षेची समाजाला जरब बसायला हवी हे लक्षात ठेवले पाहिजे. आणि फाशी म्हणजे लवकर सुटका. ती स्त्री ज्या नरकयातनेतून गेली त्याच प्रकारच्या नरकयातना त्या गुन्हेगाराला दिल्या जाव्यात...त्याशिवाय जरब बसणार नाही...असेच वाटते.

    ReplyDelete
  4. फेसबुक वरचा १ स्टेटस.
    एका रस्त्यावर ३ कुत्रे जमलेले असतात. त्या रस्त्याने १ कुत्री जात असते. ३ कुत्र्यांना पाहून ती कुत्री घाबरते. घाबरलेल्या कुत्रीला पाहून ३ कुत्रे तिला बोलतात. घाबरू नको आम्ही कुत्रे आहोत माणूस नाही.

    ReplyDelete
  5. आपल्याकडे सगळ्यात सहनशीलता व उदारता फक्त एकाच ठिकाणी आहे... कायदा. गुन्हेगार अगदी सहजपणे कुठलीही नराधमता करु शकतो पण त्याला त्याच्या नराधमपणाची सजा देताना मात्र प्रचंड उहापोह, मतभेद, तोही कसा माणूस आहे... चुकला असेल... असे एकापेक्षा एक भयंकर सौजन्य उमाळे लोकांना वारंवार येतात. :( सहिष्णूतेची कमाल असह्य होतेय.

    कायद्याची इतकी जरब बसायला हवी की स्वप्नातही कोणीही असा अविचार करु धजावणार नाही. पण..... :( :(

    ReplyDelete
    Replies
    1. @bhanas i totally agree and so well said !!

      Delete
  6. man sunna hota .pan chan express zalay ...........

    ReplyDelete
  7. काहीही शिक्षा केली तरी ती कमीच असेल :राग:

    मानवी हक्कवाले नेहमीच नको तेव्हा आवाज उठवतात.

    ReplyDelete
  8. कदाचीत ४ वर्षांनी तुला तुझीच पोस्ट वर आणावी लागेल... :) एक नवीन पाशवी बलात्कार होईपर्यंत.

    फाशी / जन्मठेप दुर. आधी केस उभी रहुदे. बघुया काय होतय.

    ReplyDelete
  9. माझ्या मते फासी किंवा जन्मठेप हा मुद्दा एवढा महत्वाचा नाही आहे,
    सध्या महत्वाचे एवढेच आहे की बलात्काराच्या केस मध्ये पिडीत तरुणींना न्याय मिळण्याचा टक्का अत्यंत कमी आहे ,तो कसा वाढवला जाईल.
    पिडीत तरुणीला कोर्टात न्याय मिळण्यासाठी तारखा घ्याव्या लागतात ह्या काळात , ह्यात अनेक पुरावे जर आरोपी श्रींमत असेल तर गहाळ केले जातात.
    साक्षीदार फोडले जातात.
    माझ्या मते फास्ट ट्रेक कोर्ट हा आणि बलात्कारासाठी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मुभा असे कायदे केले पाहिजे.
    आजपर्यंत परदेशी तरुणींचा बलात्कार प्रकरणी हे खटले फास्टट्रेक रीत्या चालवले.
    व त्यांना एक महिन्याच्या आत न्याय मिळाला , हेच भारतीय तरुणींच्या बाबतीत केले पाहिजे.
    परदेशी तरुणीच्या वर बलात्कार होण्याचे सगळ्यात जास्त प्रमाण राजस्थान व आग्रा , दिल्ली येथे आहे , व ह्याच भागात भारत भ्रमण करतांना मी आणि कथारीना , व माझी मेव्हणी ह्यांना अनेक चित्र विचित्र अनुभव आले ते
    मी माझ्या दास्ताने हिंदुस्थान ह्या प्रवास वर्णनात मांडेल.
    पण ह्या दोन परदेशी युवतींच्या बरोबर मला पाहून अनेक गाईड व स्थानिक
    मला ह्यांना कुठून आणले , ह्या मला कुठे भेटल्या .,, इतकेच काय एकाने तर मी त्यांचा दलाल असल्याच्या अविर्भावात मला प्रश्न विचारले ,
    माझ्या सोबत माझी बायको व मेव्हणी आहे हे सांगितल्यावर त्यांचा चेहरा ओशाळलेला पाहून कसे वागावे हेच सुचले नाही,
    आपल्या देशातील आपल्या पूर्वजांनी एक अर्वाचीन महान संस्कृती निर्माण केली
    आणि आज त्यांचे वशंज पशुतुल्य वर्ताव करत आहेत.
    एक भारतीय म्हणून मला ह्याची शरम वाटते,

    ReplyDelete
  10. आजन्म कारावास म्हणजे १४ वर्षांची शिक्षा नाही. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत कारावास.

    ReplyDelete
  11. आंतरजालावर "आम्ही आमच्या मुलांसमोर बसून दारू पितो, त्यांना आत पिटाळून नव्हे कै" अशा फुशारक्या मारणार्‍या आया आहेत. तर आपण मुलांवर काय संस्कार करत आहोत? डोंबल?

    ReplyDelete
  12. I second your thought Heramb...! त्यांना फाशीच व्हायला हवीय... आणि कोणत्या तोंडाने माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज करताहेत?? अजूनही तो प्रसंग विसरला जात नाही.. त्या मुलीवरचे अत्याचार आठवून अंगावर काटा येतो... आधी एक माणूस म्हणून प्रचंड संताप येतो आणि नंतर एक स्त्री म्हणून स्त्रीत्वाचा इतका भयाण अपमान सहन होत नाही.. आग उठते शरीरात नुसती... आपल्या "मायबाप" सरकारमुळे हा संताप वांझोटा न ठरो..!!

    ReplyDelete
  13. फाशीची शिक्षाच दिली पाहिजे त्या नराधमांना... जस्टीस वर्मा कमिटीला ईमेलवर मी काही सूचना पाठवल्या त्या खालीलप्रमाणे

    1. If someone commits sexual violence, His Police records should be link to his Aadhar card number. Once linked to Aadhar number this information will be easily available to government organisation, companies, social organisation so they can keep watch on such criminal.
    2. Share in property of Accused and his parents to be sized to enable victim for her survival throughout her life
    3. At school level, Though lecture, video session we should make kids aware about severity in such crimes and how one's mistake brought trouble and pain to entire family.

    ReplyDelete
  14. निनाद कुलकर्णी +१००! कायद्याला वेग आल्याशिवाय फार काही उपयोग नाही. कारण जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत बलात्कार होत रहाणार. इकडच्या पुढारलेल्या जगात पण ते होत असतात. गरज आहे ती सशक्त कायद्याची आणि वेगवान अंमलबजावणीची!

    ReplyDelete
  15. मी प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो पण सहन होत नाहीये.. तेच तेच पुन्हा वाचून/लिहून शहारे येतायत... ही विकी लिंक पहा !!!! :((

    http://en.wikipedia.org/wiki/2012_Delhi_gang_rape_case

    ReplyDelete
  16. इतक्या दिवसांनी सलग दोन वेळा ब्लॉगवर लिखाण? :) पहिली लेकावरची नेहमीप्रमाणेच मस्त!

    दुसरी बद्दल मलाही अगदी असच काही वाटत होते. परवा गाडी चालवत असताना मनात विचार आला....."एखादी कृती करताना आपल्या मनात त्याच्या "मटेरियल लॉस" चा विचार कुठेतरी होत असावा, म्हणजे रस्त्यात कोणी वेडी वाकडी गाडी चालवत असेल, तर जास्तीत जास्त आपला वाद होतो, आपण किंवा तो रागाने त्याची /किंवा तो आपली गाडी ठोकतो का? नाही तर तिथे मटेरियल लॉस असतो" आताही खून केला तर फाशी / जन्मठेप अशी शिक्षा घटनेत आहेच ना? म्हणून खून व्हायचे थांबले आहेत का? नाही ना ....कारण तत्काळ मटेरियल लॉस काही नाही....कधी गुन्हा नोंदवला जाईल, कधी गुन्हेगार पकडला जाईल, कधी खटला उभा राहील आणि कधी शिक्षा होईल? कदाचित होणारच नाही. त्यामुळे.....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनघा.. कधी कधी मस्त मूड जमून जातो आणि लिखाण होतं. (अर्थात हे लेकाच्या पोस्टबद्दल).. दुसरी पोस्ट मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे टाळत होतो. पण काही गोष्टी बोलल्याशिवाय राहवलं गेलं नाही !

      Delete
  17. आपला मध्यम्वर्ग बुळा आणि भ्याड आहे आणि स्वतःला फार समजते, उदारमतवादीपणा, पुढारलेपणा वगैरेच्या आडून काहीही ठोस करायचे टाळतो. तो फक्त तोंड-पाटिलकी करतॊ आणि मोठेपणाचा आव आणतो. त्याला सधी मनापासून चीड्पण व्यक्त करता येत नाही.काय घडलय आणि आपण काय प्रतिक्रिया देतो याचे ही भान नाही. तथाकथित धार्मिक बुव आणि सरकारचे लाळ्घोटे तर त्या मुलीलाच दोषी धरायला निघले! त्यांच्या लीला संस्कार वाहिनीवर पहा! किळस येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. सगळंच फार निराशाजनक आहे आणि कुठलाच मार्ग दिसत नाहीये अशी परिस्थिती आहे सध्या :(((

      Delete
  18. मालक, बरेच दिवस झाले....आताशा जास्त लिहित नाहीयेस का? की आम्ही वाचक inspire करत नाही आहोत? काय झालं?

    लेखांचा ओघ एकदम आटल्यासारखा वाटतो.....अर्थात हे मी तुझा एक पंखा या नात्याने म्हणतो आहे.

    आणि हे मत बाकी कुठे नोंदवावं हे न कळल्यामुळे, latest post च्या प्रतिक्रियांमधे टाकतो आहे.....sorry!

    पण बघा जरा...येत असतो येथे वरचेवर...वाट पाहत असतो तुझ्या नवीन लिखाणाची!

    असो. तुलाही तशीच कारणं असतील....[नाहीतर तुला काय कल्पना नाही तुझ्या पंखावर्गाची? :)]

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब,

      मनःपूर्वक धन्यवाद. अशा प्रतिक्रिया अतिशय उत्साह देऊन जातात. लवकरच ड्राफ्टसचं रुपांतर पोस्टमध्ये करतो :)

      पुन्हा एकदा खूप आभार !

      Delete
  19. तू आणि नचिकेत गद्रे हे मला तरी आजचे वपु, नवरे वाटतात!

    ReplyDelete
  20. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  21. Hi
    I am pratik puri. I read your blog and liked it. I am also a writer and happen to work in Dailyhunt news and e-book mobile application. Dailyhunt releases news and e-books in 12 Indian languages. I would like to contact you regarding publishing your blog matter on our app. I look after the Marathi language. I would like to publish your blog content on our app for free or paid. In Marathi we have a readership of over 50 lakh people. We would be pleased to have you work with us. Please contact me for further details at pratik.puri@verse.in so that I can give you details of the proposal. Thank you!

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...